शिक्षण

By

शाळा, शिक्षण या शब्दांचा जीवनातील अर्थ समजायला आयुष्याची काही वर्षे खर्ची करायला लागतात, तेव्हा त्याचं महत्त्व पुढे जाऊन कुठेतरी समजतं, हे खरंय. जोपर्यंत ते समजत नाही, तोपर्यंत शाळा जीवनातील नकोसा वाटणारा अध्याय असतो. शाळा आयुष्यातील अनिवार्य बाब असूनही किती जण तिचा आनंदाने स्वीकार करतात? माणसांना शिकवावे लागते. त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागते, तिचे काही नियम तयार करून सभोवती काही चौकटी कोरून घ्याव्या लागतात, हेही खरेच. पण नियमांच्या चौकटीत जिज्ञासेने, आपुलकीने प्रवेश करणे दूर राहून त्याची जागा आवश्यकता, अनिवार्यता घेत असेल तर शिक्षणातून आनंद निर्माण होईल कसा?

यशस्वी माणसांच्या आयुष्याचं थोडं अवलोकन केलं तर कळतं, त्यांच्या आयुष्यात शिक्षण जरूर होतं; पण शाळा नावाच्या चौकटीत ही माणसं अशी रमलीच किती? पुस्तकांनी घडविलेले आयुष्य सोबत घेऊन वंचितांच्या आयुष्यातील गुलामगिरीच्या शृंखला विखंडित करणारे अब्राहम लिंकन, शाळेतील अभ्यासात फारशी प्रगती नसणारा; पण जीवनाची गती आणि प्रगती विज्ञानातून शोधणारा आईनस्टाईन, हलाखीच्या परिस्थितीने शाळा सुटली; पण हातातील पुस्तक न सोडणारा न्यूटन ही नावे आभाळाच्या छताखाली, जग नावाच्या मुक्त शिक्षणव्यवस्थेतून जेवढे शिकले, तेवढे शाळेतून शिकले असते का, हाही एक प्रश्नच आहे. आपण शाळेत असताना पुस्तकांमध्ये काय शिकलो, हे विसरून गेल्यानंतर मागे शिल्लक राहते, ते शिक्षण असते. शाळांना जीवनशिक्षण मंदिर नाव दिले, म्हणून तेथून जीवनाचे धडे मिळतीलच, असे नाही. शिक्षणाचा संबंध जीवनाशी जोडता येतो. त्यातून माणसं जोडणं आणि जोडलेली माणसं घडणं अभिप्रेत असतं. पण शिक्षणाचे वर्तुळ भाकरीच्या वर्तुळाशी जोडून आपण त्याला चाकरी पुरते सीमित केले आहे. भाकरी महत्त्वाचीच; पण ती मिळवताना कशी आणि कोणत्या मार्गाने मिळवावी, हे ज्ञानही असणे महत्वाचे नाही काय?

शिक्षण न थांबणारा प्रवाह आहे. काही या प्रवाहात आपली तहान भागवण्यासाठी येतात. काही चारदोन घोट घेण्यासाठी, तर काही एखादी चूळ भरण्यासाठी. कोण काय घेतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न. शिक्षणातून ज्ञानाची तहान निर्माण व्हायला हवी. अँड्रयू कार्नोगी या विचारवंताने म्हटले आहे, सामान्य माणूस आपल्या क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश एवढे काम करतो. जी माणसं क्षमतेच्या पन्नास टक्के काम करतात, त्यांना जग सलाम करतं. जी माणसं क्षमतेचा पूर्ण वापर करून शंभर टक्के काम करतात, त्यांना जग डोक्यावर घेतं. जगाने डोक्यावर घ्यावे अशी संपन्न व्यक्तित्वे घडविण्यासाठी प्रयत्नरत असणारी शिक्षणव्यवस्था अप्रिय कशी ठरेल? प्रश्न आयुष्याच्या गुणवत्तेचे असतात. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेचेही. केवळ गुणपत्रिकेतील गुणांमध्ये गुणवत्ता शोधणारे आय.क्यू. (इंटेलिजन्ट कोशंट) मोजून समाधानी असतील आणि जगणं समृद्ध करणारा इ.क्यू. (इमोशनल कोशंट) दुर्लक्षित राहत असेल, तर जगणं श्रीमंत कसे होईल?

शिक्षणाच्या स्वतःच तयार केलेल्या ठोकळेबाज कप्प्यांमध्ये आम्ही आम्हालाच बंदिस्त करीत आहोत का? शिकणाऱ्याच्या हाती रोज एक आयता मासा दिला जातो. मासा पकडण्यासाठी लागणारं जाळं आणि ते कसं टाकावं यासाठी लागणारी कौशल्ये किती दिली जातात? मुलांना स्वावलंबी बनवणारं, आत्मविश्वास जागृत करून मनात ज्ञानलालसा निर्माण करणारं शिक्षण पुस्तकातील पाठांमध्ये लपलं आहे. पण ते शोधण्यासाठी उत्खनन होणे आवश्यक आहे. दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यातील बऱ्याच जणांना डॉक्टर नाहीतर इंजिनियरच व्हायचंय. जणू काही आता या देशात अन्य व्यवसायांची आवश्यकताच उरली नाही. आपण आपल्यापुरत्या तयार केलेल्या संकल्पित ठोकळ्यात उभं राहून धडपडत राहणं, हा विचार शिक्षणाला कोणत्या संपन्न पथावर नेणार आहे? ठरावीक व्यवसायातील आर्थिक गणिते अभ्यासणे आणि त्यातून जीवनात प्रवेशणारी स्थिरता, संपन्नता, स्टेटस या गोष्टीना अनाठायी महत्त्व मिळत जाणे, हा शिक्षणयोग नाही. मेळघाट व्हॅली विसरून सिलिकॉन व्हॅलीची स्वप्ने मनात रुजत असतील, तर दोष कुणाचा, शिक्षणाचा की शिकणाऱ्यांचा?
••

2 comments:

  1. सर,अतिशय सरळ व सोपे स्पष्टीकरण सद्य परिस्थिचे.

    ReplyDelete