Pathey | पाथेय

By

शुभेच्छा... एक लहानसा शब्द. म्हटलं तर खूप मोठा आणि नाहीच मानलं, तर अगदी बिंदूएवढा. आस्थेने पाहिलं तर आभाळाएवढा; नाहीच असं बघता आलं तर अगदीच नगण्य, नजरेत न भरण्याएवढा. तरीही या शब्दाच्या असण्या-नसण्याला मर्यादांचे तीर धरून वाहणाऱ्या आयुष्यात अनेक आयाम असतात. ते असावेत की नाही, याबाबत कोणास काय वाटते माहीत नाही. पण कोणी कुणाला शुभेच्छा दिल्यात म्हणून प्रगतीची शिखरे एखाद्याला सत्वर संपादित करता येतात असं नाही. आणि नाही दिल्यात, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात फार काही क्रांतिकारक बदल घडतात असंही काही नसतं. आपल्याकडून काही देणं आणि कुणाकडून काही घेणं हे दैनंदिन व्यवहाराचं एक वर्तुळ असतं. अशी कुठलीतरी वर्तुळे माणूस आत्मीय समाधानासाठी शोधत असतो. म्हणून ती जगण्यात कोरून घेणे आवश्यक असतं का? आणि नाहीच आखून घेता आली अशी एखाद्याला, म्हणून जगण्याचे प्रवाह पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असंच सांगता येईल.

पण...

तरीही 'पण' हा शब्द उरतोच. या 'पण'मध्ये सकारात्मक, नकारात्मक भावनांचा किती कल्लोळ एकवटलेला असतो. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. अंतरीचे वणवे अंतरीच दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखण्यासाठी कसरत करायला लागते. जगण्याचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो. जगण्याचे सूर सापडले की, आयुष्याला सौंदर्याचे साज सहज चढवता येतात. सद्विचारांचे साज लेवून आयुष्याला देखणेपणाच्या कोंदणात अधिष्ठित करावे लागते. सौंदर्याचे ताटवे उभे करून निगुतीने सांभाळावे लागतात. आयुष्यात सकारात्मक विचारांना सांभाळता आले की, जगण्याला सजवणे सुगम होतं, एवढं मात्र नक्की.

संघर्ष माणसाच्या जगण्याचे आदिम अंग आहे. ती उपजत प्रेरणा असते. निसर्गाच्या अफाट पसाऱ्यात टिकून राहण्याचा प्रवास सुगम कधीच नव्हता आणि नसतो, म्हणून माणसाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता अनवरत नांदती असते. हे अस्वस्थ असणं जेवढं शाश्वत, तेवढंच सुखांचा शोध घेणं. संघर्षाचा प्रवास अक्षर असतो, तितकाच टिकून राहण्याचा कलहही अक्षय असतो. टिकून राहण्यासाठी प्रेरणांचे पाथेय सोबत असले की, जीवनावरची श्रद्धा अगणित आकांक्षांनी मोहरून येते. मोहर दीर्घकाळाचा सोबती नसतो, पण गंधाळलेपण घेऊन नांदतो, तेव्हा जगण्याचे श्वास आपल्याला आश्वस्त करीत राहतात. हे नांदणेच संस्कृतीचे संचित असते आणि ते अक्षय असणे माणसांच्या सांस्कृतिक जगण्याचे अंतिम प्रयोजनसुद्धा. तुमच्या जगण्यात, असण्यात, विचारांत, उक्तीत, कृतीत ही प्रयोजने अनवरत प्रवाहित राखण्याची अपेक्षा म्हणूनच समाज नावाचा किमान समान विचारांना सोबत घेऊन चालणारा घटक करीत असतो. अपेक्षांच्या वाटेने चालणे सुगम कधीच नसते. हे सुगमपण आयुष्यात नांदते ठेवण्यासाठी आपलेपणाने ओथंबलेला किमान एक शब्द तरी आपल्यासाठी असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि हे आपलेपण आयुष्याच्या ओंजळीत सामावून घेण्यासारखं दुसरं सुख इहतली नसतं.

म्हणूनच...

कोणी कोणाला शुभेच्छा दिल्या म्हणून वर्ष चांगलं जाईल आणि नाहीच दिल्या; म्हणून वाईट असेल असेही नाही. काळ त्याच्याच मस्तीत चालत असतो. म्हटलं तर वर्षांच्या वाटचालीत बदलत काहीच नसतं. बदलतात कॅलेंडरची पानं. दिसा-मासाचे पंख लावून गिरक्या घेत राहतात ती नुसती. गतीची चाके पायाला बांधून चालणाऱ्या अनेक वर्षांतील आणखी एका वर्षाने माणसांनी निर्धारित केलेल्या कालगणनेतून निरोप घेतलेला असतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या जिवांच्या आयुष्यातून एक वर्ष वजा झालेले असते. आणि काळाच्या गणतीत एकाने वाढलेले असते. खरंतर कमी होणे काय आणि वाढणे काय, हे सगळेच विभ्रम. आभास आणि आनंद यांच्या सीमारेषांवर कुठेतरी रेंगाळणारे. अनंत, अमर्याद, अफाट अवकाशात विहार करीत वर्षे येत राहतात आणि जातातही. त्यांचं येणं आणि जाणं माणसांना नवे नाही आणि प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधण्याचे प्रयत्नही फार अलीकडचे नाहीत. कालचक्राच्या अफाट पसाऱ्यातील वर्ष हा एक लहानसा तुकडा. असे किती तुकडे आपल्या आयुष्यात असतात? अगदी ओंजळभर! पण माणसे ते साकळत राहतात. हाती लागलेल्या चारदोन तुकड्यांना आनंदतीर्थ बनवण्यासाठी उगीच धडपडत राहतात. याचा अर्थ असा नाही की, माणसांनी आनंदाचे तुकडे वेचून आपल्या अंगणी आणण्यासाठी यातायात करू नये. पण सत्य हेही आहे की, तुमची इच्छा असो वा नसो, जे घडतं तेही अटळ असतं आणि नाही घडत तेही नियतीचं देणं असतं, आपण त्या बदलाचे फक्त साक्षीदार.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना जोडणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांच्या स्वागताला समोरं जावं कसं, याची नियोजने झाली असतील. प्रत्येकजण आपापल्यापरीने आनंद मिळवतील. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंध फेसाळ रात्रीला काहींची बेधुंध पाऊले थिरकतील. मध्यरात्री कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या थंड वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंधीत नवं वर्ष येईल आणि पुढे जाईल. अर्थात, सगळेच नववर्षाचं असं स्वागत करत असतील, असं नाही. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची छोटीशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठीही निघतील.

जगात वावरताना विसंगतीचा प्रत्यय पावलोपावली येतच असतो. म्हणून सगळं जगच विपर्यासाने भरले आहे असेही नसते. जगाचे दैनंदिन व्यवहार चौकटींच्या कठोर कुंपणात बंदिस्त केलेले असतात. त्यांना ध्वस्त करण्याचं बळ किती बाहूंमध्ये असतं. शोधलं तर प्रवाहाच्या विरोधात पोहणारी अशी मूठभरही माणसे हाती लागत नाहीत. म्हणून सामान्यांनी जगण्याशी भिडू नये, असंही नसतं. ज्यांच्या ललाटी नियतीने सुखांची रेखा अंकित केली असते, ते तरी पूर्ण समाधानी असतात का? रोजच्या जगण्याला भिडणारी माणसे योद्धेच असतात. भाकरीचा चंद्र सदनी आणण्यासाठी कष्टाचे पहाड उपसायला लागतात. सुखाच्या चांदण्या वेचून आणणे हा काही सहजसाध्य खेळ नसतो. खेळ खेळून बघताना जिंकण्या-हरण्याची क्षिती बाळगून आयुष्याचे तारू किनाऱ्यावर लागत नसते. वादळाच्या वंशजांना वादळाची मोट बांधून आणण्याची स्वप्ने येत असतात. तसेही अनेक वादळे झेलल्याशिवाय किनारे कोणाला गाठता आले?

माणसांच्या आयुष्यात समस्यांची कमी कधी होती? कधीच नाही! कालानुरूप त्यांची रूपे कदाचित वेगळी असतील इतकेच. पोटात खड्डा पाडणारी भूक माणसाला अस्वस्थ वणवण करायला भाग पाडते. आयुष्य पणाला लावणारा संघर्ष सार्वकालिक सत्य आहे. या पसाभर वर्तुळाचा शोध आयुष्यभर पुरतो. अनेकांची आयुष्ये वर्तुळाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपली. आजही यात फार मोठ्याप्रमाणात सुगमता आली आहे असे नाही. माझ्या वाट्याला जरा अधिक सुखे आली म्हणून जगाच्या विवंचना संपल्या असा अर्थ होत नाही. पण मी याचा विचार किती करतो? अर्थात, हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडून देता येईलही, पण बराच मोठा समूह विवंचनेच्या वर्तुळात गरगरतोय, हे विसरणे आपल्या अंतस्थ अधिवास करणाऱ्या नैतिक विचारांचा अधिक्षेप नाही का? कुणास वाटेल, जगाच्या विवंचना, प्रश्न कधी नव्हते? काल अधिक होते, आज प्रखर आहेत आणि उद्या तीव्र असतील कदाचित. संपतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. कुणाला वाटेल, कुठल्यातरी अनभिज्ञ विवंचनांचा विचार करत कुणाचातरी येणारा उद्या सजवण्यासाठी आमचा आज का म्हणून वाया घालवायचा? आम्हाला आनंदतीर्थी नेणारी वाट गवसली असेल, तर का म्हणून वेदनांच्या वस्त्यांकडे वळायचे? तात्विकदृष्ट्या असा युक्तिवाद कितीही समर्पक असला, तरी तो संयुक्तिक असेल असे नाही. एक समूह समस्यांशी संघर्ष करतांना पिचतो आहे आणि आम्ही सुखांच्या शिखरांवर पोचण्याच्या मनीषेने पळतो आहोत. याला विपर्यास नाही तर आणखी काय म्हणता येईल?

आनंद साजरा करण्याचं भाग्य इहतलावरील साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेले नसते. जाणाऱ्या आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा हजारो माणसं अशीही असतील, जी अर्धपोटी, उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी भाकरीची स्वप्ने पाहत असतील. कदाचित आपल्याला ती दिसत नसतील किंवा आनंदाच्या शिखरावर विहार करीत असल्याने आपण त्यांच्याकडे पाहिले नसेल. शेकडो आदिवासी डोंगरदऱ्यात, रानावनात आपल्या मूठभर जगण्याचा शोध घेत भटकत असतील. भटके विमुक्त आपापली पालं घेऊन व्यवस्थेच्या चौकटीत आपलं हरवलेलं अस्तित्व शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात उद्याची सुखं शोधत असेल. हक्काच्या शिक्षणाचा कायदा असूनही शाळेत शिकून जगण्याची कोणतीही स्वप्न पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून लहान, लहान हात कचऱ्याच्या कुंडीत जगण्याचे वास्तव कुणीतरी फेकलेल्या उष्ट्यात शोधत असतील. नियतीने, परिस्थितीने पदरी घातलेलं जगणं सगळंच काही आखीव चौकटींमध्ये बसवता येत नसलं, तरीही मनात एक आस असतेच, निदान यावर्षात तरी आहे त्यापेक्षा अधिक समाधान माझ्या अंगणी नांदावे.

माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, हे खरेच. पण ते साजरे कसे व्हावेत, याची काही परिमाणेही असतात. मर्यादांची कुंपणे असतात. समाजाचे वर्तन व्यवहार सुरळीत मार्गस्थ व्हावेत, म्हणून अनेक वर्षांच्या अनुभवातून संकलित केलेलं हे संचित असतं. अर्थात, ही बंधने ऐच्छिक असली तरी त्यांत स्वतःला बांधून घ्यायचं की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोंदणात अधिष्ठित झालेला हिरा अधिक सुंदर दिसतो. पण सांप्रत अशा गोष्टींना महत्त्व न देण्याइतपत विचारांत शुष्कपण येत आहे. ताटव्यात फुललेल्या फुलांचा बहर जेवढा देखणा असतो, तेवढाच कोमलही. असं देखणंपण त्याच्या सौंदर्यासह जपता यायला हवं. उच्छृंखलपणा जगण्याची गुणवत्ता उतरणीला लावतो. हाती साधने आहेत म्हणून त्यांचा बाजार मांडणे कितपत रास्त असते? नजरेचा थोडा कोन बदलून आसपास पाहिलं तरी कळेल, जगाचा चेहरा आनंदापेक्षा चिंतेचाच अधिक आहे. मान्य आहे, जगाचे सगळेच चेहरे मला प्रमुदित करता येणार नाहीत. पण चिंताग्रस्त चेहऱ्यावरची एक रेघ मिटवता आली तरी खूप आहे. त्यासाठी फार मोठा अलौकिक त्याग वगैरे करायची आवश्यकता नाही. आपल्या अंगणभर पसरलेल्या उजेडातला कोरभर कवडसा अंधारल्या जगात पोहचवता आला तरी खूप आहे. आपल्या चांदण्यातला चतकोर तुकडा वेगळा करता येतो त्याला जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. त्यांचं जगणंच चांदणं झालेलं असतं.

हा सुखाचा पांढरा आणि दुःखाचा काळा अशा रंगात जगण्याला विभागता नाही येत. काळा आणि पांढरा या दोघांच्या संयोगाने जो ग्रे शेड असणारा रंग तयार होतो, तोच शाश्वत असतो. बाकी सगळं आभासाच्या झुल्यांवर हिंदोळे घेणं. या रंगाच्या डावी-उजवीकडे थोडं इकडेतिकडे सरकताना हाती ज्या छटा लागतात, त्याच आयुष्याचे खरे रंग असतात. बाकी फक्त झगमग. तिलाही सार्वकालिक चमक असेलच असे नाही. किंबहुना ती तशी नसतेच. म्हणूनच 'जगी सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे' असा प्रश्न मनाला रामदासांनी विचारला असेल का? तसेही आयुष्य काही फुलपाखराचे रंग लेऊन विहार करीत नसते. त्यात संगतीपेक्षा विसंगतीच अधिक असते. उपेक्षा, विवंचना, समस्यांना कमतरता कधीच नसते. म्हणून सुखांची आस असू नये, असं कुठे असतं. सुखांचा सोस असणे वेगळे आणि पावलापुरता प्रकाश शोधत अंधारलेल्या कोपऱ्यात उजेडाचं चांदणं आणण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, त्याहून वेगळे असते आणि हे वेगळेपण जपणारी माणसेच काळाची खरी ओळख असतात. अशा माणसांची धडपड म्हणूनच आस्थेचा विषय असते. काळाच्या पालखीला खांदा देणारी माणसे समाजजीवनाचे संचित असतात. प्रेरणा असतात, जगावं कसं, हे समजून घेण्यासाठी.

2 comments: