Nibandh | निबंध

By
स्थळ: शाळेचे शिक्षकदालन. वेळ: सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान कोणतीतरी. शाळेतील पाचवी ते नववीच्या वर्गांच्या वार्षिक परीक्षा सुरु आहेत. काही शिक्षक शिक्षकदालनात थोडे निवांत बसलेले. शाळेचा शिपाई सूचनापत्र हाती घेऊन आला. सूचनापत्रातील विषय निबंध लेखनासंबंधी होता. संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षकांसाठी निबंधलेखन स्पर्धा शाळेत दरवर्षी आयोजित केली जाते. लिहून देण्यासाठी अंतिम मुदत दिलेली. निबंध सर्वांना लिहिणे अनिवार्य. कोणत्याही कारणाने सवलत नसल्याबाबत स्पष्टीकरण दिलेले. सूचनापत्र वाचून शिक्षकांनी त्यावर स्वाक्षरी केली. शिपाई दुसऱ्या खोलीकडे वळला. क्षणभर स्तब्धता. शांततेला छेद देत एक शिक्षक म्हणाले, “सर, निबंधाचा विषय अवघड वाटतो काहो?” त्यांचं बोलणं ऐकून दुसरे एक शिक्षक आपल्या मनातील सात्विक संताप व्यक्त करीत म्हणाले, “सर, निबंध लेखनासाठी थोडा तरी सोपा विषय नव्हता का सूचवता येत तुम्हाला?” “सर, तुमचं काहीतरी चुकतंय. अहो, विषय सूचवणारा मी कोण? मी सूचवलेला नाही. मुख्याध्यापकांकडून माझ्या समोर आलेली विषयाशी संबंधित संकल्पना फक्त शब्दांत लेखांकित केली आहे, एवढंच.” मी म्हणालो.

आणखीही पुढे काही बोलणार होतो; पण माझं बोलणं मध्येच थांबवत एक शिक्षक म्हणाले,  “सर, विषय कठीण की, सोपा ते जाऊ द्या. आधी मला हे सांगा, ‘शिक्षण’ संकल्पना तरी आपण स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षात नीट समजून घेतली आहे का? संकल्पनाच आम्हाला नीट समजली नसेल, तर पाश्चात्त्य शिक्षणपद्धती आपल्यासाठी खूप दूरचा विषय नाही का?” विषयाची वर्तुळांकित चर्चा झोकदार वळणे घेत हळूहळू पुढे सरकायला लागली. चर्चेत सहभागी होत एक शिक्षक म्हणाले, “शिक्षणाची गंगाच प्रदूषित झाली आहे, त्यावर उपाय शोधता शोधता नाकीनऊ येते आहे. तर सुधारणा, परिवर्तन, ही खूप लांबची गोष्ट झाली. आणि परिवर्तन केव्हा होते, जेव्हा परिवर्तनप्रिय विचार आपल्या आसपासच्या आसमंतात असतात तेव्हाच ना! येथे परिवर्तनालाच अपमृत्यूचा शाप आहे. ते नेहमी कुपोषितच राहत असेल, तर बाळसं धरेल तरी कसे?”

चर्चा ऐकणारे एक शिक्षक सहभागी होत म्हणाले, “जेथे नावीन्याचे कोणतेही कौतुक नाही. काही करायला गेले तर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. तर शिक्षण परिपूर्ण होईल कसे? बदल करण्यासाठी हाती काही असायला लागते. काहीच नसेल आणि स्वातंत्र्याच्या भ्रामक संकल्पना सोबत देऊन बदलाचे मार्ग शोधण्यासाठी अनभिज्ञ दिशेला, अनोळखी वाटेला पाठविले जात असेल, तर बदल काय आणि कशात होणार आहेत?” या विचारांचा धागा हाती घेत पहिले शिक्षक आपले मत पुन्हा मांडते झाले. म्हणाले, “सर, सन्मानजनक जीवनयापन घडावे म्हणून माणसांना शिक्षण दिले जात नसेल, त्याऐवजी आपापले परगणे सांभाळण्यासाठी शिकावे म्हणून शिक्षणाचे महत्त्व सांगितले जात असेल, तर शिक्षण परिवर्तनाचे वगैरे साधन म्हणून माणसांना प्रेरित करेलच कसे? जगण्यासाठी परिपूर्ण करण्याऐवजी चौकटीत बंदिस्त करण्याकरिताच शिक्षण दिले-घेतले जात असेल, तर तेथे बदलाच्या वाटा प्रकाशित करणारा सूर्य कोणत्या क्षितिजावरून आणि कसा उदित होईल?”

इतकावेळ शांतपणे चर्चा ऐकणारे एक शिक्षक आपले म्हणणे परखडपणे विशद करीत सहभागी होत म्हणाले, “अहो, शिक्षण देणाऱ्या संस्थांची संस्थाने होत आहेत. ज्यांच्या हाती त्यांचे नियंत्रण आहे, ते संस्थानिकाच्या डौलाने वर्तत असतील, तर परिवर्तनवाद्यांना परिवर्तनाचा प्रारंभ करण्यासाठी स्वातंत्र्य उरतेच किती आणि कुठे? शिक्षणाचा प्रवाह वाहत ठेवण्याऐवजी अवरुद्ध करण्यासाठीच सारी ऊर्जा खर्च होत असेल, तर शिक्षण पाश्चात्त्य पद्धतीचे असले काय किंवा भारतीय असले काय, त्याने असा काय फरक पडणार आहे. काही शिक्षणसंस्थांमधील शिक्षणविषयक आस्था संशोधनाचा विषय व्हावा अशी झाली आहे. येथून ज्ञानाने संपन्न विचारांचे प्रदेश निर्मिण्याऐवजी स्वतःचे परगणे उभे करण्यासाठी कलह उभे राहत असतील, तर अशा कलहप्रिय विचारातून शिक्षणात परिवर्तन घडेलच कसे? समजा घडलेच, तर त्याची गती आणि प्रगती काय असेल?”

एक शिक्षक उत्साहाने आपले मत प्रदर्शित करीत संवादात सहभागी झाले. म्हणाले, “अहो, तुम्हा सर्वांचं म्हणणं क्षणभर मान्य करू या! ते खरंही आहे. आपल्या आजूबाजूला अंधार गडद होतो आहे. पण एवढं सगळंच काही अंधारलेलं नाहीये अजून. आशेचा पुसटसा का होईना प्रकाश दूरवर दिसतोय. तुम्ही तो का पाहत नाहीत. मिळेल एखादी पावलापुरती वाट त्यातून. चालूया त्या वाटेवर परिवर्तनाची एखादी मशाल हाती घेऊन.” सरांचा आशावाद काही अतिशयोक्त नव्हता. त्या सूत्राला हाती घेत मी मत मांडता झालो. “विश्वाचे दैनंदिन व्यवहार कशाच्या बळावर सुरु आहेत? उद्याचा दिवस खूप चांगला असेल, या आशेवरच ना! मग विचार कशाला करतात एवढा. कोणतेही परिवर्तन एका व्यक्तीचं काम नाही, हे खरंय. कुणाला तरी पुढे यावेच लागेल ना! तुम्ही असा की, मी की आणखी कोणीतरी. तो कुणीतरी आपणच का होऊ नये? असतील आपल्या व्यवस्थेत वाईट गोष्टी बऱ्याच; पण काहीतरी चांगलंही असेलच की! घेऊ या ना त्याचा शोध. नसेल समग्र, पण थोडा तरी प्रकाश सापडेल आपल्याला. तो आपल्या पावलापुरता का असेना! पण नसेलच शोध घ्यायचा कुणाला, तर परिवर्तन खडकावरचा पाऊस ठरेल. त्याच्या नशिबी वाहणं असेल; पण रुजणं नसेल” चर्चा आणखीही पुढे सुरु राहिली असती; पण पेपरचा वेळ संपला म्हणून उठले सगळे. निघाले शिक्षकदालनातून बाहेर. लागले आपापल्या कामांना.

मीही उठलो. वळलो शाळेच्या माझ्या कामाकडे. पण मेंदूला काम लागले. विषय तर मिळाला. लिहावे काय? पाहू पुढचं पुढे! म्हणून विसरलो तो विषय. तरीही मनात एक अस्पष्ट विचार पिंगा घालतच होता. स्पर्धेसाठी दिलेल्या विषयाचा आवाका खरंच मोठा आहे का? असेलही. पण या विषयावर आपले मतप्रदर्शित करणारे शिक्षक सुरक्षिततेच्या चौकटीत आपला ‘स्व’ सुरक्षित राहावा म्हणून तुम्ही अवघड विषय का दिला सर, असं उगीचच म्हणत असतील का? माहीत नाही. त्यांचं अवघडलेपण खरं आहे असं समजू. पण हेसुद्धा खरंय अवघड गोष्टीच आपली अंगभूत पात्रता तपासून घेत असतात. प्रत्येक जण आपल्या पावलापुरती निष्कंटक वाट पाहत असतो. त्यावरून चालत मुक्कामाचे सुरक्षित ठिकाण शोधत असतो. पण स्वतःसाठी सुरक्षित कवच शोधताना विसरतो की, परिस्थिती परिवर्तनासाठी आपण निवडलेल्या वाटा नेहमी अनुकूल असतीलच असे नाही. नसल्यास कल्पकतेने तयार कराव्या लागतात. पण तरीही एक प्रश्न उरतोच, त्या चांगल्याच असतील, असे कशावरून?

0 comments:

Post a Comment