Gavakadachi Maati | गावाकडची माती...

By
बऱ्याच दिवसापासून गावी गेलो नव्हतो. घरी जाण्याचे अनेक प्रसंग आले, पण काही ना काही निमित्त काढून जाणं टाळत गेलो. हे जाणं आपण का टाळतोय, या प्रश्नाचं उत्तर आज तरी नीटसे देता येणार नाही. पण या टाळण्यात मी शहरवासी झालोय आणि शहरातील सुखसुविधा अंगवळणी पडल्यानं गावी जाऊन उगीच गैरसोय का म्हणून करून घ्यावी, हा स्वार्थपरायण विचारही असावा. गेल्या आठवड्यात घरी जाणं आवश्यक होते. गेलो घरी. थांबलो. बोललो परिवाराशी. बोलताना आईकडे पाहत होतो. वार्धक्याच्या खुणा तिच्या देहावर अधिक स्पष्ट दिसायला लागल्या आहेत. देहावरील, चेहऱ्यावरील सुरकुत्या जीवनाचा प्रवास क्षणाक्षणाने पुढे सरकत असल्याच्या पाऊलखुणा बनून अस्तित्वाची जाणीव घट्ट करताना दिसतायेत. इकडच्या, तिकडच्या, महत्वाच्या, बिनमहत्वाच्या गोष्टी सुरु होत्या. बोलणं थोडं थांबलं. थोडा वेळ निरव, निशब्द शांतता.

त्या शांततेला विराम देत आईने विचारले “कसा आहेस रे, तुझी लेकरं कशी आहेत? सारं ठीक चाललय ना!” “हो, सगळं व्यवस्थित आहे आणि मुलंही चांगली आहेत. मी येथे येताना पोरगं म्हणालं, शक्य असेलतर आजींना काही दिवसासाठी का असेना घेऊन या! मी अनेकदा फोन करून आजीशी बोललो. निदान दोनचार दिवसासाठी ये आणि राहा; पण प्रत्येकवेळी आजीची कारणं ठरलेली, आज काय तर शेतात पेरणी धरलीय. उद्या काय तर निंदणी करायचीय. परवा पिकांना खत द्यायचे. तेरवा काय कापूस वेचायचाय. पुढे हंगामानुसार कामांची यादी वाढतच जाते. सवड निघेल तशी येईन म्हणते. पण उसंत असतेच कुठे आजीला आणि शेतीची कामं थाबतात कुठे?” पोराचं म्हणणं आईला सांगतो. आईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. येईन, सांग त्याला म्हणून बोलते.

मीच पुढे बोलतो “तू आलीस तरी घरी राहतेच किती दिवस? झाले एक दोन दिवस की पुन्हा तुझं सुरु, घरी परत जायचंय. शेताची, घरची कामं खोळंबली असतील. गोठ्यातल्या गुरावासरांना नीट वैरणपाणी झालं असेल का? घरी शेतीकाम करणारी पोरं नीट सांभाळत असतील की, दुर्लक्ष करून गावाच्या पारावर चकाट्या पिटत बसली असतील. सारी काळजी तुलाच. ते आता काही लहान राहिले नाहीत. करू दे ना त्यांचं त्यांना! सांभाळतील सगळं नीट.” मला थांबवत म्हणाली, “ती लाख सांभाळतील सारं; पण त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. ते तुमच्यासारखे शिकलेच कुठे चार पुस्तकं सारंच काही व्यवस्थित करायला. लागली इकडच्या तिकडच्या वाकड्या वाटांना चालायला तर. नाहीतरी आता गावात गावपण कितीसं राहिलं आहे असं?” सुखं शहरातून पायवाटांनी खेड्यात, गावात आलीत. त्या सुखांनी समृद्धीही आली; पण सोबत सैलावलेपणही आलं. असल्या बेगडी सुखाच्या फसव्या मृगजळापासून आपण दूर राहिलेलं बरं, असं तिचं व्यवहारिक तत्वज्ञान. यामुळेच तिचं येणं, थांबणं आणि जाणं यातील अंतर तसं कमीच. आपली मुलं मोठी झाली, त्यांचं ते बघतील, काय करायचं ते. यावर तिचा विश्वास असला, तरी गाव, गावाकडील माती आणि गावातील नाती यातच तिचा श्वास अडलाय.

शहरातील आपल्या मुलांकडे आली तरी तिला नाही थांबवत. येथील सुविधातही तिला अवघडल्यासारखं होतं. गावातील गावपण नाही मिळत तिला येथे. येथील झगमगीत तिची तगमग वाढते. घराच्या पेंट केलेल्या चकचकीत भिंतीवरून तिचा हात फिरताना अडतो. त्यातही एक बुजरेपण असतं. गावाकडील घराच्या मातीच्या भिंतीवरून पोतेरं फिरवताना तिला आपलंपण वाटतं. पोतेऱ्यातील मातीचा गंध आपलासा वाटतो. येथील रूम फ्रेशनरच्या सुवासाला तिचा मातीचा गंध खूप लांबचा वाटतो. घराच्या अंगणातील तुळशीला भक्तिभावाने दिवा लावताना, पाणी घालताना तिचा भक्तिभाव त्यात उतरून येतो. शहरातल्या टू रूम किचनमध्ये विज्ञानाने सुखाची अनेक यंत्रे आणली. पण जात्यावरून तिचा हात फिरताना ओठी येणारं गीत गिरणीतून दळण दळून आणताना अडलं. पाट्यावरवंट्याचं आपलंपण मिक्सरच्या चक्रात फिरताना हरवलं. सकाळी रेडिओ, टीव्हीवरचे भक्तिगीतांचे सूर ती ऐकते. पण शेतातून थकून भागून घरी परतल्यावर रात्रीच्या शांत प्रहरी गावातल्या मंदिरातील भजनांच्या साध्याशा सुरांनी तिच्या हृदयी उमलून येणारा भक्तिभावाचा गंध गायनाच्या शास्त्रीय चौकटीत बसवलेल्या सुरांना नसावा. शहराच्या गर्दीत हरवलेले सणवार तिला नकोत. गावातल्या साऱ्यांनी मिळून साजरे केलेले साधेसेच सणवार अंतर्यामी रुजले आहेत. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी जीवन संगीत बनून येणारा वारा, मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने शेतातून गावाकडे धुळीच्या आवरणाला पांघरून परतणारी माणसं, गुरंवासरं आणि गोठ्यातील वासरांच्या ओढीने हंबरत परतणाऱ्या गायी तिला येथे दिसतील तरी कशा आणि कुठे?

गावातील हे सारं गावपण जपताना आपल्या परक्या माणसातील नातीही आई आग्रहाने जपते आहे. नात्याचं बहरलेलं गोकुळ तिच्या मनाचा आनंददायी विसावा आहे. लेकीबाळी, सुना, नातवंडे, मुलं सारीसारी तिला आपल्याजवळ असावीत असं वाटतं. पण हे नेहमी, नेहमी शक्य नाही; म्हणून नात्यांचे पीळ घट्ट बांधण्यासाठी काहीना काहीतरी निमित्त शोधत राहते. कधी सणवाराच्या, तर कधी घरातील मंगलकार्याच्या माध्यमाने साऱ्यांना एकत्र आणू पाहते. एकत्र जमलेली मुलंबाळं पाहताना तिला जीवनाचं सार्थक झाल्याचे वाटते. पण तिचा हा आनंदही तसा क्षणिकच. चार दिवस झाले की, सारे पुन्हा पोटापाण्याच्यामागे परतीच्या ठिकाणी निघतात. तशी तिच्या मनाची घालमेल वाढत जाते. तसं जाणवू देत नसली तरी, ते कळतंच. परतीसाठी बॅगा भरल्या जातात. बॅगा भरताना तिचा हात जडावतो. निरोप देताना स्वर कातर होतो. डोळ्यांच्या कडा ओलावतात. थकलेला, थरथरता हात नातवंडांच्या पाठीवरून, डोक्यावरून मायेने फिरतो. थांबून, थांबून ही मुलं अशी कितीकाळ थांबणार, म्हणून थोड्या वेळाने तीच म्हणते, “निघा बाळांनो, सुखानं राहा! अधून-मधून येत राहावं. जीवाला तेवढंच बरं वाटतं.”

सारे निघण्याच्या तयारीत असतात. तरीही तिची पाऊले तेथून निघत नाहीत. शेवटी न राहवून मी म्हणतो, “आणखी किती थांबशील अशी येथे! निघतो आता आम्ही. पोहचलो की, कळवतो तसे फोन करून.” तिची पाऊले अनिच्छेने अस्वस्थ हालचाल करतात. आमची पाऊले परतीच्या वाटेला लागतात. आपल्या गोतावळ्याच्या अस्पष्ट होत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे ती पाहत राहते. हळूहळू त्या प्रतिमा धूसर होत जाऊन दृष्टीआड होतात. पुढे निघालेली पावले गावमातीचा गंध घेतलेली धूळ सोबत घेऊन चालत असतात. त्यांच्या चालण्याने पाठीमागे पसरत जाणाऱ्या धुळीच्या पडद्याआड वार्धक्याने नजर क्षीण झालेल्या डोळ्यातून आठवणींची सय घेऊन पाणी दाटत असते.

0 comments:

Post a Comment