Bhumika | भूमिका

By // 4 comments:
श्वास सोबत घेऊन आलेला प्रत्येक जीव आपल्या उपजीविकेच्या वाटा शोधत इहतली नांदतो. श्वासांची सोबत असेपर्यंत त्याचा प्रवास सुरु असतो. जीवन सगळ्यांच्या वाट्याला येतं, पण जगणं किती जणांचं घडतं? सांगणे अवघड आहे. पण जगण्याच्या सूत्रांना सोबत घेत सगळेच काहीना काही शोधत असतात. हा शोध सुखांच्या क्षितिजांचा असतो. आयुष्याचे पोत तलम असावेत. नाती आस्थेच्या धाग्यांनी गुंफलेली असावीत. आपलेपण त्यातून झुळझुळ वाहत राहावं. प्रसन्नतेचा परिमल घेऊन परिसर दरवळत राहावा. सुखांचं इंद्रधनुष्य आयुष्याच्या क्षितिजावर कमान धरून उभं राहावं. जीवनाचे मळे बहरलेले राहावेत. अशा आयुष्याची चित्रे माणूस मनात रंगवत असतो. जगणं आनंदपर्यवसायी असावं, म्हणून अनेक खटपटी करून सुखतीर्थे गाठण्याचा प्रयत्न करीत असतो. सुख अंगणी नांदते असणाऱ्या आयुष्याची सगळ्यांनाच आस लागलेली असते. असे असण्यात अप्रस्तुत काही नाही. सुंदर आयुष्याची संकल्पित चित्रे मनाच्या कॅन्व्हासवर माणसे सतत साकारत असतात. पण आयुष्य काही आखून दिलेल्या चाकोऱ्यांच्या रेषा धरून पुढे सरकत नसते. दिसल्या उताराने पाण्यासारखे वाहत नसते. त्याच्या मार्गात अनेक व्यवधाने असतात. ते असतात म्हणून पर्याय शोधावे लागतात. याचा अर्थ शोधलेले प्रत्येक पर्याय अचूक असतातच असे नाही. त्याची व्यवहार्यता, उपयुक्तता, प्रासंगिकता तपासून बघायला लागते. कोणत्यातरी विचाराने आणि भूमिकेने वर्तावे लागते. म्हणूनच शोधलेल्या पर्यायांना आणि धारण केलेल्या भूमिकांना वैचारिक अधिष्ठान असावे लागते.

आयुष्यात प्रत्येकाला स्वतःची एक चौकट हवी असते आणि ती सुरक्षित असावी असेही वाटत असते. सुरक्षेच्या अशा चौकटी उभ्या करून माणूस प्रवाहासोबत वाहत असतो. फार थोडे असतात, ज्यांना प्रवाहाच्या विरोधात पुढे जाण्याची स्वप्ने येतात. जगणं काही आखीव रेखीव साच्यांच्या चौकटीत सामावलेला आनंदाचा उत्सव नसतो. सरळ रेषेत पुढे सरकत नसतं ते कधी. त्याच्या प्रवासाच्या वाटा अडनिड वळणं घेत पळत राहतात. इच्छा असो नसो तुम्हांला चालावे लागतेच. पायाखालच्या वाटेची सोबत असतेच. फक्त त्या निवडता यायला हव्यात. निवडलेल्या वाटांची सोबत करीत माणसे निघतात, आपलं असं काही आणण्यासाठी. काही धावतात, काही रखडत सरकत राहतात, काही सरपटत राहतात, एवढाच काय तो फरक.

वैगुण्ये, वंचना, उपेक्षा, अपेक्षा, दुःख, वेदना, समस्या, प्रश्न कुठे नसतात? त्यांचं सर्वत्रिक असणं सार्वकालिक सत्य आहे. ते सगळीकडे असतात आणि सगळ्यांसाठी असतात. त्यांना राव-रंक सगळे सारखेच. त्यांच्या असण्यात काही फरक असलाच, तर प्रत्येक प्रश्नांचे पैलू निराळे आणि उत्तरांचे पर्याय वेगळे असतात. पण प्रश्न नाहीत, असा माणूस आसपास असणे जवळपास असंभव. प्रश्न असतात म्हणून उत्तरेही असतात. फक्त ती शोधावी लागतात. प्रत्येकवेळी ती अचूकच असतील असेही नाही. बऱ्याचदा अपेक्षाभंग करणारी असतात. म्हणून प्रश्न बदलता नाही येत. प्रश्न केवळ एकेकटेच असतात असेही नाही. अनेक गुंत्याना घेऊन त्यांचा प्रवास घडत असतो. आपल्या अंगणी त्यांचा अधिवास घडणे सगळ्यांना अप्रिय असते. अर्थात, सकारात्मक विचार अन् सर्जनशील कृती घेऊन येणारे प्रश्न यास अपवाद असतात, हे काही वेगळं सांगायला नको. काही प्रश्न साधेपणाची घोंगडी पांघरून येतात, काही समस्यांची वसने परिधान करून. म्हणून ते नाहीत, असे सहसा घडत नाही. कधी परिस्थितीनिर्मित प्रयोजनांची सोबत करीत ते आयुष्यात येतात. कधी प्रासंगिक पर्याय बनून दारावर दस्तक देतात, तर कधी हात दाखवून आपणच ओढवून घेतलेले असतात. माणूस त्यांच्या परिघात फिरत असतो. हे फिरणंही अटळ भागधेयच. हजारो वर्षापासून सुरू असणारी ही भटकंती कितीतरी पिढ्यांची सोबत करीत चालतेच आहे. चालणं तिचा धर्म आणि पर्यायांच्या शोधात भटकणं माणसाचं कर्म असतं.

प्रत्येकाचा जगण्याचा पैस ठरलेला असतो. जीवनविषयक काही धारणा असतात. निवडलेल्या विचारधारा असतात. अंगीकारलेल्या भूमिका असतात. आपला वकुब ओळखून पर्याय मात्र त्यालाच शोधायला लागतात. पुढ्यात येणारे प्रश्न प्रत्येकवेळी निराळे असतात, म्हणून उत्तरेही तशीच निवडावी लागतात. त्यांचे साचे नसतात, आधीच निर्धारित केलेल्या कोंदणात ओतून हवा तसा आकार देणारे. आयुष्यात अकल्पित येणाऱ्या गोष्टी काही सांगून येत नसतात. अनपेक्षितपणे दारावर दस्तक देतात त्या. त्यांच्या स्वागताची तयारी मात्र ठरवूनच करायला लागते. जगण्यात समस्यांची कमतरता कधी नसते? त्यांचं असणं आहेच, म्हणून त्यांची धग अनुभवण्याची तयारी असायला लागतेच. यापासून कुणी सुरक्षित राहिला आहे, असे सहसा घडत नाही. अर्थात, ही जाणीव नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. समजा सापडलाच असा एखादा तर, तो एकतर वेडा असला पाहिजे किंवा सर्वसंग परित्याग केलेला यती, संत, महंत तरी.

उत्तरांच्या आत अनेक प्रश्न दडलेले असतात. एकाचं उत्तर शोधावं, तर आणखी दुसरे जन्माला येणारे. म्हणूनच दिसणारे प्रश्न निरखून घ्यावे लागतातच, पण त्यांच्याआड दडलेले पैलू पारखून घ्यायला लागतात. अर्थात, ते सगळ्यांनाच ज्ञात असतील किंवा असायला हवेत असे नाही. ते तसे असतात की नाही? माहीत नाही. समजा असलेच, तर त्यांच्यापर्यंत किती जणांना पोहचता येत असतं? मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची दिशा निश्चित करायला लागते. त्यासाठी आखून दिलेल्या चौकटी पुरेशा नसतात. इप्सितस्थळी पोहचवणारे रस्ते पायघड्या टाकून अंथरलेले नसतात. परिस्थितीच्या प्रत्येक आघाताला प्रतिकार करीत ते घडवावे लागतात. कोणत्यातरी विचारावर विश्वास ठेवून वाटा तुडवत निघावं लागतं.

जगणं साकारण्यासाठी भूमिका घ्यावी लागते. उन्नत, उदात्त जगणं काही सहजी हाती लागत नसतं. त्यासाठी साधना लागते. कोणाच्या आशीर्वादाने ते घडत नसतं. तीर्थक्षेत्री जावून ते आकाराला येत नसतं. कोणाचातरी अनुग्रह घेऊन आयुष्याला सुखांचे रंग नाही भरता येत. आपलेच कुंचले हाती घेऊन आपणच आपल्याला रंगवल्याशिवाय जगण्याचं इंद्रधनुष्य नाही उमलून येत. त्यासाठी विचारांना दिशा असायला लागते. परिस्थितीचे भान असायला लागते. परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य असायला लागतं. ते कुठून उधार आणता येत नाही. त्याकरिता भूमिकांचे परीघ समजून घ्यायला लागतात. कोणत्यातरी भूमिकेने वर्तावे लागते. पण भूमिकेबाबत भूमिका घेणारे किती असतात? सांगणे अवघड आहे. वास्तव हेही आहे की, बऱ्याच जणांना भूमिकांची वर्तुळे आकळत नाहीत, म्हणून भूमिका नाहीत, हे खरे आहे. भूमिकांच्या परिणामांची किंवा पलायनाची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. ती शोधावी लागतात. समजून घ्यावी लागतात.

आयुष्याच्या वर्तुळाभोवती परिवलन करताना केवळ फेऱ्या घडत नसतात. प्रत्येक फेरी पदरी काहीतरी टाकून जाते. पदरी पडलेलं दान काही दैवाचं देणं नसतं. त्या-त्यावेळी घडणाऱ्या वर्तनाचा तो परिपाक असतो. हाती लागलेल्या कवडशांचे अर्थ समजून घ्यायला लागतात. त्या प्रकाशात स्वतःच स्वतःला शोधत वाटा चालाव्या लागतात. कधी दिशा चुकतात. वाटा सुटतात. मार्ग भरकटतात. काही माणसे चुकलेल्या वाटांची चिंता करतात, काही चिंतन. चिंतेच्या निबिड जंगलात हरवलेली माणसे आपल्याभोवती समस्यांची झाडे वाढवत राहतात. काही प्राप्त परिस्थितीतून आस्थेचा दिवा विझू न देता मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतात. मनी वसतीला असलेल्या परगण्यात पोहचण्यासाठी पावले अपेक्षित दिशेने वळती करायला लागतात. कालसंगत पर्यायांशी सख्य असणाऱ्यांना आव्हाने आपली वाटत, पण प्राप्त परिस्थितीच्या विभ्रमांशी अनभिज्ञ असणारी माणसे समस्यांचे ओझे खांद्यावर घेऊन सरकत राहतात. काही साचेबंद चौकटींच्या कुंपणात उत्तरे शोधत राहतात. अभ्यासाच्या वाटेने घडणाऱ्या चिंतनातून काही पर्याय हाती लागतात. पण ‘स्व’ सुरक्षित राखण्याची काळजी करत घडलेले चिंतन परीघ हरवून बसते.

परिशीलनाने माणूस परिणत होत असतो. जाणिवा विस्तारतात, हे मान्य. पण त्यांना सुरक्षेच्या कुंपणात कोंडून ठेवले, तर प्रगतीचे पथ आक्रसत जातात. समस्यांची उत्तरे शोधून आणण्यासाठी प्रश्नांना भिडावे लागते. अभ्यासाने शहाणी झालेली माणसे प्रश्नांपासून पलायन करू पाहतात, तेव्हा पर्याय हरवतात. ओंजळभर स्वार्थ साध्य करण्यासाठी कोणतीच बाजू न घेता सत्तेचे सापळे हाती असणाऱ्या मंडळींच्या वर्तुळात वर्तताना विचारांना तिलांजली देणे वर्तन विपर्यास ठरतो. सत्तेचे सोहळे साजरे करण्यात काहींना सौख्य सामावलेले दिसते, तर काहींना सत्तेच्या परिघापासून शक्य तितके अंतर राखून ठेवण्याचा पर्याय संयुक्तिक वाटतो. अंतरावर राहणे सीमित अर्थाने रास्त विकल्प असू शकतो, पण त्यात परिस्थितीला भिडायचे धाडस नसते. अगरबत्त्या हाती घेऊन पूजा बांधणाऱ्या आणि आरत्या ओवाळणाऱ्यांना समोर असणाऱ्या प्रश्नाचे अर्थ समजत नसतात. त्यांच्यासाठी स्वार्थ हाच एकमात्र अर्थ असतो.

सत्तेचे गालिचे पसरून त्यावर सिंहासने मांडून बसलेल्यांना दुखावले, तर संधी हातातून निघेल, म्हणून सावधगिरी बाळगणारे आसपास असतातच. त्यांचे प्रश्न सुरु होतात त्यांच्यापासून आणि संपतात स्वतःजवळ. अशा विचारधारांना विकल्पांशी काही देणे-घेणे नसते. प्रत्येक पर्याय अशांसाठी स्वतःच्या संकुचित विश्वाच्या वर्तुळाएवढे असतात. निष्क्रिय कर्मवादाचे अनुसरण करणाऱ्या प्रत्येकाची तीर्थक्षेत्रे असतात. लहानमोठ्या पायऱ्या आखून घेतलेल्या असतात त्यांनी. तेथील प्रसाद हाती लागला, माथ्यावर आशीर्वादाचा मळवट भरला की, अशा विचारधारांना आणि त्याप्रती असणाऱ्या निष्ठांना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही उरत. त्यांचे तसे असणेच निष्ठांची परिभाषा असते.

काहींना कुणाच्या अध्यात पडायचे नसते, ना कुणाच्या मध्यात. आपले मूठभर अस्तित्व सांभाळत अशी माणसे वाट्यास आलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घालत राहतात. सारी ताकद एकवटून आलेला दिवस ढकलत नेतात पुढे. त्यांच्यापुरते ते सुख असल्याचे सांगतात, पण या सुखाला समाधानाची किनार खरंच असते का? आणि अशा समाधानाला नैतिकतेचे अधिष्ठान असते? स्वतःसाठी जगणारे स्वतःपुरते उरतात. इतिहासाची पाने यांच्या कार्याच्या नोंदीनी कधी अक्षरांकित होत नसतात. काहींना मुळात कसल्याच वादात पडायचे नसते. कशाला हात दाखवून अवलक्षण करून घ्या, अशा विचारांनी वर्तणारी माणसे काही मतप्रदर्शनासाठी धाडस गोळा करू शकत नाहीत. विशिष्ट विचारातून निर्मित भूमिकांचा अंगीकार तर यांच्यासाठी खूप दूरची गोष्ट असते. यांच्या धाडसाच्या कहाण्या इतरांच्या पराक्रमात आनंद शोधणाऱ्या असतात.

आयुष्याच्या वाटेने प्रवास घडताना काही विचार, काही मते घेऊन पावले उचलावी लागतात. परिस्थितीचे अवलोकन करीत जगण्याची दिशा ठरवावी लागते. काही आडाखे बांधायला लागतात, काही गणिते आखायला लागतात. सूत्रे शोधायला लागतात. घेतलेल्या भूमिका तपासून बघायला लागतात. विचारांशी पडताळून पाहायला लागतात. भूमिका अनुकूल असो अथवा प्रतिकूल. तिची किंमत मोजण्याची मानसिकता अंतर्यामी रुजून यावी लागते. रुजलेल्या विचारांच्या साक्षीने चालत राहावे लागते. भूमिका घेतली, तर त्यासाठी किंमत मोजण्याची तयारीही असायला लागते. अशी तयारी नसल्यामुळे काहीजण गप्प राहतात. परिस्थितीपासून पलायन करणाऱ्या, वेगवेगळ्या कारणांनी वजा होत जाणाऱ्यांना वगळले तर उरतात किती?

व्यवस्थेच्या खडकावर कशाला डोके आपटून घ्या, म्हणून मागच्या रांगेत उभे राहून पाहणारे अनेक असतात. एकेक वजा होत जाणारे निघाले की, वावटळींना अंगावर घेण्याची तयारी असणारी मूठभर माणसे मागे उरतात. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात ठाम भूमिका घेणाऱ्यांचे प्रमाण तसेही फार मोठे नसते. हे सावर्कालिक सत्य आहे आणि ते तेवढेच राहील, हेसुद्धा वास्तवच. काळाच्या कोणत्याही तुकड्यात यांना शोधले, तरी सुरक्षित अंतर राखणारी माणसे सहज हाती लागतील. प्रश्नांना भिडणारी माणसे शोधल्याशिवाय सापडत नसतात. नुसती नजर इकडे-तिकडे वळवली, तरी मिरवणारे असंख्य जीव आसपास वळवळताना दिसतील. कोणताही काळ याला अपवाद नसतो. सांप्रत काळही यास कसा अपवाद असेल.

सहकार्य, साहचर्य, सहिष्णुता ही सार्वकालिक मूल्य आहेत. त्यांच्या कक्षा कधीही संकुचित नसतात. सोयीचे अर्थ काढून माणसे आपल्या भूमिकांना त्यात घट्ट बसवण्याचा प्रयत्न करतात. समाज काही सतत निरामय विचारांनी वर्तत नसतो. त्यात दुरिते असतात. वैगुण्ये असतात. ती वाढू नयेत म्हणून प्रयत्न करायला लागतात. त्यात कालानुरूप परिवर्तन घडवावे लागते. बदलांना परिपूर्णता तेव्हाच प्राप्त होते, जेव्हा त्यांच्यामागे नैतिक विचारांचे अधिष्ठान असेल आणि विचारांना कार्यान्वित करणारी भूमिका. लोकशाही शासनप्रणाली विचाराने वर्तणाऱ्या समाजाचा सहिष्णुता श्वास असते. जगण्यात ती रुजावी म्हणून योजनांची मुळाक्षरे गिरवावी लागतात. स्वीकारलेल्या विचारांचे परिशीलन घडून त्यांची वर्तुळे विस्तारायला लागतात. प्रत्येकवेळी आपलेच विचार रास्त असतात असेही नाही. काही कमतरता असल्यास, त्या दूर करता यायला हव्यात. म्हणून अंगीकारलेल्या भूमिकांची पडताळणी करून अनावश्यक भाग खरवडून काढता यायला हवा. समानता सन्मानाने समाजात सामावली की, अंतरे मिटवता येतात. संकुचित विचारातून निर्मित अहं प्रगतीच्या प्रवासाला खीळ घालतात. सर्वांप्रती समत्वदर्शी नजरेने बघणारे विचार, हीच माणसाची खरी कमाई. सत्याला सामोरे जातांना विचारांत सहजपण सामावलेले असले की, विकासाचे पथ प्रशस्त होत असतात.

माणसाला जीवनयापन करताना कोणत्यातरी भूमिकांचा स्वीकार करून वर्तावे लागते. समाजात भूमिका घेणारे आहेत. तसे नाकारणारेही असतात. सगळ्याच भूमिका सगळ्यांना मान्य असतील असेही नाही. नसल्या मान्य, म्हणून त्या त्याज्य असतात असं नसतं. माणूस माणूस म्हणून मोठा व्हायचा असेल, तर त्याचे विचार, त्याचे स्वातंत्र्य मान्य करायलाच हवे. त्याच्या वर्तनाचा प्रतिवाद मान्यतेच्या चौकटीतच करता यायला हवा. समाजाच्या वर्तन व्यवहाराचे सगळेच साचे काही ठरवून घडवता येत नसतात. काळाच्या ओघात त्यांचे आकार बदलत जातात. समाज त्यानुरूप बदलत राहावा असे वाटत असेल, तर सकारात्मक सुधारणांना संधी असायला हवी. सुधारणेचे सगळेच मार्ग संयुक्तिक असतीलच असे नसते.

काळाचे प्रश्न घेऊन समाजाच्या वर्तनाच्या दिशा निर्धारित होतात. अनुकूल आणि प्रतिकूल काय, हे कळले की विकासाचे पथ प्रशस्त होतात. या पथावरून मार्गस्थ होणारी पावले प्रगतीचे आयाम उभे करतात. त्यांची उपयुक्तता प्रासंगिक असो अथवा सार्वकालिक, ती पारखून स्वीकारायला हवी. माणूस आकांक्षांच्या गगनात विहार करीत असतो. कोणत्यातरी अपेक्षांनी सुखांच्या शोधत चालत असतो. समाधानाच्या परिभाषा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या आणि त्या सगळ्याच पूर्ण होतीलच असे नसले, तरी त्यातून समन्वय साधत सम्यक मार्गाची निवड करणे अशक्य नसते. निर्धारित विचारातून निवडीला आकार देता येतो. कोणत्यातरी भूमिकेच्या चिंतनातून, मंथनातून ती साकारत असते. त्याला आकार द्यायचा असला, तर प्रत्येकाला निदान किमान काही तरी समान विचार असणारी भूमिका घेता यायला हवी, नाही का?
     
(चित्र गूगलवरून साभार)

Shetmajuranchya Kavita | शेतमजुरांच्या कविता

By // No comments:

अस्तित्वाचा अन्वय शोधू पाहणाऱ्या ‘शेतमजुरांच्या कविता.’


कालोपघात बदल घडणे अनिवार्यच. त्यांना टाळून किंवा वळसा घालून मार्गस्थ होणे अवघड असते. काळ बदलतो आहे, तशी माणसेही बदलत आहेत. त्यांच्या जगण्याची, वागण्याची प्रयोजने आणि उद्दिष्टेही बदलत आहेत. वर्तनाचे सारे व्यापार स्वार्थाच्या दिशेने मार्गस्थ होताना आदर्शांचे अर्थ सोयीच्या समीकरणात शोधले जातायेत. उदात्तपण घेऊन आलेली मूल्ये जगण्यातून कापरासारखे उडत आहेत. पडझड अभिशाप ठरू पाहते आहे. समस्या, संबंध, साधने, साध्य, संस्कार, संस्कृतीकडे बघण्याची परिभाषा बदलली आहे. नव्वदनंतरच्या काळातील प्रश्नांचा आलेख अधिक अस्थिर आणि दोलायमान झाला आहे. प्रगतीच्या वाटेने दारी आलेल्या जागतिकीकरणाने तर माणसांच्या जगण्याची प्रयोजने आणि प्रश्नही बदलले आहेत. साहित्यही यास अपवाद नसते. साहित्यातला आदर्शवाद कायम असला, तरी त्याची जागा समकालीन वास्तवाने घेतली आहे.

काळाचा हात धरून आलेल्या प्रश्नांना भिडणारे साहित्य वाचकाला आपले वाटत असते. अनुभवांचे संचित हाती देऊन काळ पुढे निघतो. वळताना मागे काही प्रश्न ठेऊन जातो. काळाने समाजजीवनावर ओढलेल्या रेषांचा शोध साहित्यिक सतत घेत असतो. संवेदनांच्या प्रतलावरून वाहणाऱ्या प्रवाहात जगण्याच्या गुंत्याची उकल करू पाहत असतो. व्यवस्थेच्या वर्तुळात जगताना हरलेल्या, हरवलेल्या समूहाची विखंडीत स्वप्ने अधोरेखित करणारी साहित्यकृती व्यवस्थेने नाकारलेल्या उत्तरांचा शोध असते. काळाचे किनारे धरून उत्तरांच्या शोधात ती पुढे जात असते.

काळाचे गुंते उकलत प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या साहित्यामध्ये आश्वस्त करणारा आशावाद कायम असतो. आस्थेचा ओंजळभर ओलावा घेऊन वेदनांची उत्तरे शोधू पाहणाऱ्या अशा कवितांमध्ये नामदेव कोळींच्या कवितेचा अंतर्भाव आवर्जून करावा लागतो. सामान्यांना विकल करणाऱ्या वर्चस्ववादी नीतीवर प्रहार करण्यात कवीची लेखणी यशस्वी झाली आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या चौकटींमध्ये बेगडी अस्मिता गिरवणारा एक वर्ग व्यवस्थेत सतत वास्तव्याला असतो. संकुचित विचारांना व्यापकतेचे परिमाण देऊन सामान्यांना आपल्या प्रभावात आणण्याची कोणतीही संधी हा वर्ग सहसा सोडत नाही. स्वहित हाच याचा प्राधान्यक्रम असतो. काळाच्या कोणत्याही तुकड्यात याला शोधला, तरी त्याच उन्मादात जगताना तो आढळतो. तर दुसरीकडे आयुष्यात अभावाचाच प्रभाव असणारा आणखी एक वर्गही येथे जगण्याशी दोन हात करत सुखाच्या चांदण्या वेचून अंगणी आणण्याची स्वप्ने पदरी बांधून नांदतो. ज्याच्या समस्यांची उत्तरे सहसा सुगमपणे हाती लागत नाहीत.

व्यवस्थेच्या वर्तुळात हरवलेल्या समूहाचे आवाज ही कविता मुखरित करते. वर्गीय चौकटींच्या परिघांना ओलांडून नव्या परगण्यांचा शोध घेत वास्तवाच्या प्रांगणात येते. व्यवस्थेतील वैगुण्ये मांडतांना विचारप्रवृत्त करते. आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळताना नव्या क्षितिजांचा शोध घेऊ पाहते. आसपासच्या आसमंतातील प्रश्न घेऊन व्यक्त होणारी ही कविता म्हणूनच अधिक परिचयाची आणि आपलीही वाटते.

परिसरातून प्राप्त होणाऱ्या अनुभवांचे पाथेय सोबत घेऊन लेखक व्यक्त होत असतो. त्याचे व्यक्तिमत्त्व, जीवनदृष्टी साहित्यनिर्मितीच्या केंद्रस्थानी असते. ती वेगळी गृहीत धरता येत नाही. जगणं काळाशी अन् परिसराशी निगडीत असतं. समाजातून मिळालेलं संचित दिमतीला घेऊन कविता ‘स्व’ शोधता शोधता साकार होते, व्यक्तीकडून समष्टीकडे नेते. नामदेव कोळींची कविता यास अपवाद नाही. या कवितेतून प्रकटणारे प्रश्न भले प्रासंगिक असतील, सीमित असतील; पण प्रकृतीनुसार तसे सार्वत्रिकच आहेत. त्यांना समजून घेताना कवी त्यांच्याशी भिडतो. त्यांत आपले अस्तित्व शोधू पाहतो. त्यांच्याशी समरस होतो. म्हणूनच ते जितके कवीचे असतात, त्याहून अधिक वाचकांचे वाटतात.

साहित्यातून साहित्यिकाला शोधण्याचा प्रयत्न होतच असतो. त्याच्या भूमिका त्यातून पडताळून पाहता येतात. कवीच्या अंतर्यामी भावनांची अनेक आंदोलने स्पंदित होत राहतात. त्यांचा नाद संवेदनशील वाचकाला टिपता येतो. काळोखाच्या कातळावर काव्यतीर्थे कोरण्याची कवीच्या अंतर्यामी असणारी आस साक्षात्कार बनून प्रकटते. एकेक अनुभवांची, प्रश्नांची दाहकता दृगोचर होत जाऊन वाचकांचे वैचारिक स्थित्यंतर ही कविता घडवू पाहते. प्राप्त परिस्थितीवर परखड भाष्य करते. कवी म्हणतो,

साधूचे कुळ पुसू नये,
नदीचे मूळ पुसू नये,
काळोखाचे गूढ पुसू नये.


प्रत्येकाच्या अंतर्यामी काळोखाचे काही कप्पे असतात, पण या काळोखाला चिरत जाण्याची उर्मीही त्याच अंतःकरणातून उदित होत असते. कवितेची सर्वमान्य व्याख्या करणे एक अवघड प्रकरण असते. काळाच्या गर्भातून उगवणाऱ्या वाटेने येणाऱ्या असंख्य प्रश्नांचा तो शोध असतो. कविता वाचतांना आपलं असं काही हाती लागलं, की वाचकाला ते आपलेच वाटायला लागते. परकेपणाच्या सीमा धूसर होत जातात. शब्द कुणाचेतरी; पण अनुभव आपले, असे लेखन म्हणजे कविता. असे म्हटले तर नामदेव कोळींच्या कवितेतून वाचकाला आपलं असं काही गवसल्याने ती आपलीच वाटू लागते.

इतिहास संस्कृतीचे अपत्य आहे. पण संस्कृतीच्या चौकटींमध्ये इतिहासच स्वातंत्र्याला संकुचित करू पाहतो, तेव्हा अंधाऱ्या वाटांवरून चालणारा कोणीतरी पथिक संदर्भांना असणारे पदर उलगडू लागतो. शब्द इतिहासाची पाने तपासून पाहत वास्तवाला सामोरे जातात, तेव्हा काळोखात कुणीतरी खोदकाम करून पलीकडचा उजेडाचा काठ शोधत राहतो. कवी म्हणतो,

इतिहासात
काळोखाचे संदर्भ आहेत
अर्थात ...
काळोखालाही इतिहास आहे.


व्यवस्थेत शतकांपासून चालत येणारी विषमता काही अद्याप संपवता आली नाही, भलेही त्याचे पीळ जरा सैलावले असले तरी. अशा व्यवस्थेत स्वतःचा शोध घेऊ पाहणारा कवी विषमतेची दाहकता विसरू शकत नाही. खरंतर काळोखाचा इतिहास स्वतःहून कधीच बदलत नसतो. तो प्रयत्नपूर्वक बदलावा लागतो किंवा घडवावा तरी लागतो. जगण्याच्या अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटलेला फाटका माणूस अवस्थ पातळीवर उभं राहून ती बदलण्याची आस ठेवतो.

परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग केल्याच्या कितीही वार्ता घडत राहिल्या, तरी सामान्य माणसांच्या जगण्यातले भोग काही केल्या मिटत नाहीत. मूठभरांच्या सुखांच्या संकल्पित संकल्पना म्हणजे जगणं नसतं. जगण्याला अनेक कंगोरे असतात. त्यांचे परीघ असतात. प्रगतीच्या स्वप्नांना सामान्यांच्या ओंजळभर आकांक्षा का पूर्ण करता येत नसतील, हा प्रश्न अधिक अस्वस्थ करीत जातो. खूप मोठ्या अवकाशाला आपल्यात सामावणारी त्यांची ‘सरकारी दवाखाना’ ही कविता जीवनाच्या संगती-विसंगतीवर प्रखर भाष्य करते. कवी म्हणतो,
 
शहरातल्या सरकारी दवाखान्यात
भरती झालंय गाव,
कुणीतरी वयात आलेली पोरगी
मोजतेय शेवटच्या घटका
आयसीयूच्या पलंगावर
आवडत्या जोडीदाराशी
थाटता आला नाही संसार
अन् परक्या जातीतल्या
मुलाशी नाव जुळल्यानं
बदनामीच्या भीतीपोटी
जीव संपवण्याचा प्रयत्न केलाय तिनं


ज्यांच्या जगण्यात सदैव अंधारच साचलाय, त्यांचं जगणं मुखरित करणाऱ्या नामदेव कोळींच्या ‘शेतमजुरांच्या कवितेचं’ नातं सतत भळभळणाऱ्या जखमांशी आहे. सर्वसामान्यांच्या जगण्यात असणारी असुरक्षिता, अस्वस्थता, अगतिकता घेऊन कवी व्यक्त होतो. गाव, समाज, तेथील माणसे, त्यांचे जगण्याचे प्रश्न, आयुष्यातले गुंते, समस्यांशी त्यांच्या लेखणीचं सख्य आहे. काळ बदलला, त्याची परिमाणे बदलली, तरी परंपरेच्या धाग्यांपासून तुटून दूर जाणे अवघड असल्याची जाणीव या कवितेतून व्यक्त होत राहते.

बापाला परिस्थितीच्या चक्रात फिरण्याचा शाप नियतीने दिलेला आहे. नियतीच्या अभिलेखाना नाकारून परिस्थितीवर स्वार होत लढण्याचे वरदानही अभावग्रस्त जगण्याने दिले आहे. बापाचं नातं गावातील मातीशी घट्ट जुळलं आहे. परिस्थितीची दाहकता सहन करूनही न मोडणारा, एकाकी झुंज देणारा योद्धाच जणू. आयुष्याच्या उतरणीवर लागूनही बापाचं संस्कृतीशी, संस्कारांशी असणारं नातं दोलायमान होत नाही. शेत, शिवार, गुरावासरांशी त्याच्या मर्मबंधाच्या गाठी बांधल्या आहेत; गोठ्यात एकही ढोर शिल्लक नसले तरीही. कवी याच विजिगीषू संस्कारात वाढला, घडला आहे. परिस्थितीच्या परिघात स्वतःचा शोध घेत राहिला आहे. त्यांचे अनुभव, दुःख नुसते परिघाभोवतीचे परिवलन नाही, म्हणूनच त्यांचे शब्द अंगभूत सामर्थ्य घेऊन अभिव्यक्त होतात. गावमातीच्या गंधाची सोबत करीत राहतात.

महात्मा गांधींनी खेड्यांना सक्षम करण्याचे स्वप्न पाहिले. पण काळाचा रेटाच मोठा असल्याने त्यांच्यात घडणारे बदल थांबवता आले नाहीत. साठ-सत्तर वर्षापूर्वी दिसणारी गावे आज गावपण विसरून शहरी सुखांच्या उताराने वाहत आहेत. परिस्थितीच्या आवर्तात सापडलेली गावं जागतिकीकरणाच्या वाटांनी चालताना अगतिकीकरणाच्या वळणावरून वळत आहेत. पण व्यवस्थेच्या चौकटी अभ्येद्यच आहेत. त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक आघात करूनही त्यांचा टवकासुद्धा उडत नाहीये. मूठभर लोकांच्या खिशात आलेल्या पैशाने देशाला महासत्ता होण्याची स्वप्ने येत आहेत. पण सर्वसामान्यांच्या जगण्याच्या स्वप्नांची वाताहत होते आहे. माणसं सैरभैर झाली आहेत. शोषण काही संपले नाही. हा विचार व्यक्त करताना ‘दोन नोंदी’ या कवितेत कवी म्हणतो,

घर चालावं म्हणून
बाप
दुसऱ्याच्या वावरात
राबराब राबला
रेताड बखळ जमीन
रक्ताचं पाणी
हाडांची काडं होईस्तोवर
आतड्यांना पीळ देत
सुपीक केली
घराची बिघाभर जमीन मात्र
शेवटपर्यंत
पडीकच राहिली.


व्यवस्थेने ललाटी लेखांकित केलेला हा अध्याय अद्याप बदलत नाही. यालाच कोणी प्रारब्ध, प्राक्तन वगैरे असे काही म्हणत असतील, तर काहींच्याच वाट्यास हे भोग का असावेत? दुसऱ्याचं जगणं सावरताना स्वतःचं जगणं उद्ध्वस्त झालेला बाप व्यवस्थेने आखून दिलेल्या वर्तुळाभोवती गरगर फिरतो आहे. आणि त्याच्यासोबत सप्तपदी करून आलेली माय अस्तित्वात नसणाऱ्या क्षितिजावर सुखाचा सूर्य शोधत आहे. जो तिच्या सरणापर्यंत कधीच येणार नाही, हे माहीत असूनही. म्हणूनच कवितेतल्या या नोंदी नुसत्या नोंदी राहत नाहीत, तर वाचकास प्रश्न विचारतात. गरिबांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार आमच्या व्यवस्थेत आहे का? असेल तर किती? मनात निर्माण होणाऱ्या अशा प्रश्नांनी वाचक अस्वथ होत जातो. अंतर्मुख होतांना विचारचक्रात फिरत राहतो.

व्यवस्थेने अन्याय करूनही कोणताही आक्रस्थाळेपणा, आक्रोश, आक्रंदन आदी भावनांचा हात न धरता कवितेतले शब्द संयतपणे जगणं सांगण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तरीही मनाच्या मातीत दडलेला वणवा दाहकता घेऊन नांदता राहतो. ‘हिशोब’ कवितेत ते म्हणतात,

पाटलाच्या पोरीनं वापरलेली पुस्तकं
मला मिळावीत म्हणून
खंडीभर ढोरं गव्हाऱ्यात फुकट वागवलीत बापानं
त्याच पुस्तकातून शिकलो
इतिहास, नागरिकशास्त्र
अन मूल्यसंस्कार जपणं.


जुनी पुस्तके आपल्या मुलास शिकण्यासाठी मिळावीत, म्हणून बाप पाटलाची खंडीभर ढोरे कोणत्याही मोबदल्याशिवाय चारतो आहे. उद्याचे उज्ज्वल भविष्य पाहताना, आजच्या शोषणास विसरू पाहतोय. पुस्तकातल्या अक्षरातून इतिहास बदलण्याची स्वप्ने पाहत कवी शिकतो आहे. अभावाच्या अंधारल्या क्षितिजावर परिवर्तनाची नवी पाहट आणण्यासाठी व्यवस्थानिर्मित चौकटींच्या तुकड्यात नवी मूल्ये शोधतो आहे. पण येथला इतिहास बदलण्यास तयार नाहीच. व्यवस्था कूस बदलायला तयार नाही. इतिहासच शोषणाचा असेल, शास्त्र नागरिक म्हणून सन्मान देण्यास सक्षम नसेल आणि मूल्य मूठभरांची मिरासदारी असेल, तर कोणत्या क्षितिजाला इमानी सूर्याचे दान आपण मागावे, असा प्रश्न नकळत कवी उपस्थित करतो.

मास्तराने उदात्त, उन्नत मूल्यांची आणि जगण्याची प्रयोजने आपल्या आचरणातून मनात रुजवावित. सतशील विचारांची दीक्षा द्यावी, त्या गुरूने गुरुकुलाचा वारसा विसरणे विपर्यस्त वाटते. ज्ञानासाठी आसुसलेल्या एकलव्याला दिलेल्या विद्येचे मोल म्हणून घरातील अठराविश्वे दारिद्र्याशी झगडणारी आई गुरुदक्षिणा म्हणून दाळ-दाणा देत राहिली. हे वास्तव वाचून व्यवस्थेत माणूस पराभूत असतो, यावर विश्वास ठेवावाच लागतो. अक्षरशून्य माय-बापाला जगण्याच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना हिशोब कदाचित कळला नसेल; पण शोषण हाच पाया असणाऱ्या व्यवस्थेला मात्र ती संधीच वाटत राहिली. परिस्थितीने अगतिक झालेल्यांना हिशोब कळेलच कसा? परंपरेचे पायबंद पडल्यावर प्रगतीचे पथ आक्रसत जातात. या मार्गाला प्रशस्त करण्याचा उपाय शिक्षण असल्याचं निरक्षर माय-बापाला ठावूक आहे. म्हणूनच पोरगं शिकतांना आभाळभर आनंद ही माणसे शोधत आहेत.

‘शेतमजुरांच्या कविता’ व्यवस्थेतील शोषक आणि शोषित भाव व्यक्त करते. शेत मालकाला जास्तीचं काम करून हवंय. अडचणी पाचवीलाच पुजल्या असल्याने कधी आस्मानी, कधी सुलतानी संकटांशी दोन हात करताना शेतकरी, शेतमजूर हवालदिल होतो आहे. कुणाचा बाप गेला, कुणाचा बैल गेलेला. प्रत्येकजण आपले मरण आपल्यात शोधतो आहे. परिस्थितीने सर्वबाजूंनी कोंडी केलेली. निदान शासनस्तरावरून काही हाती लागेल, या आशेने तो अपेक्षा करतो आहे. पण योजना तशा कागदावरच राहतात. योजनाप्रिय शासनातील लोककल्याणकारी कारभारावर भाष्य करताना कवी मनातला सल व्यक्त करताना म्हणतो,

शासनाकडून अपेक्षा करतोय
शेतमजूर
साऱ्या योजना पुसून गेल्या आहेत
कागदावरून.


नोकरशाही, लालफितीचा कारभार, लोकनेते यांच्या वागण्याची निर्लेपवृत्ती खूप खणूनही पाझर न सापडणारी. नियमांच्या शुष्क चौकटींमध्ये कामं अडतात. मजूर मात्र आश्वासनांच्या क्षणिक तुषारांवर जगण्याची उमेद घेऊन उभा आहे, परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी झुंजत. हाती केवळ शून्यच असणारा जन्मदत्त वारसा. पद, पैसा, प्रतिष्ठा यापासून कोसो दूर ठेवला गेलेला. शतकांपासून भाकरीचा शोध घेत पोटाच्या पसाभर परिघाभोवती गरगर फिरतो आहे.

निरक्षरता कष्टकऱ्यांच्या जीवनाला मिळालेला शाप आहे. अज्ञानाने केलेले अनेक आघात झेलत, ते नियतीशी लढत आहेत. पण धनदांडग्यांच्या दांडगाई विरोधात अवाक्षर उच्चारण्याचा या माणसांना धीर होत नाही. हाताला काम, कामाला दाम आणि दामाला सन्मान असे काहीसे विचार समाजवादी व्यवस्थेत चांगले वाटत असले, तरी भांडवलशाहीच्या दमननीतीत सगळे वाद संपतात. मागे उरतो तो केवळ निराशावाद. निढळाच्या घामाचा पैसाही राबणाऱ्यांच्या हाती वेळेवर मिळत नाही. हे वास्तव अंतरंगात झिरपत जाते. ‘ही कुठली दहशत?’ या कवितेतला प्रत्येक शब्द अंगार बनून समोर येतो. ढोर मेहनत करणारा बाप, धसकटे वेचताना अधमेली होणारी माय, सगळं काही करूनही मुलांच्या शाळेची फीसुद्धा वेळीच देऊ शकत नाहीत. अन्यायाविरोधात कोणीच कसे बोलत नसेल, या विचाराने वाचकाला अस्वस्थ करणारी, ही कविता शब्दांची शस्त्रे यत्ने करायला लावणाऱ्या तुकाराम महाराजांच्या शब्दांशी नाते शोधू पाहते.

कष्ट, उपेक्षा, अभाव या साऱ्या घटनांना घेऊन कवी आपल्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करीत जातो. कवितेतून अंगारफुले शोधू पाहतो. आटोपशीर असणाऱ्या या कविता संग्रहात शब्द मात्र ताकदीने समोर येतात. कदाचित त्यांनी मांडलेलं दुःख, ते व्यक्त करण्यासाठी निवडलेले शब्द वैयक्तिक असतील. अनुभवांचे प्रयोजन वैयक्तिक असेल, ते प्रासंगिकही असू शकते; पण अनुभवाची चिंतनशीलता, खोली वैश्विक आहे. काव्यलेखनात कवी अनुभवांची अलिप्तता जपत असतो, असे म्हणतात. या कवितेतून कवीला वाचक वेगळे काढूच शकत नाहीत, इतका तो वास्तवाशी एकजीव झाला आहे. त्यांचा प्रत्येक शब्द मनात रुजत जातो, धरतीच्या कुशीत रुजणाऱ्या बिजासारखा. परिस्थितीची दाहकता दाखवणारा दर्पणच जणू.

मायबाप कष्टात जगणारे. रात्रंदिन श्रम करून आपापला विठोबा शोधणारे. उद्याच्या सुंदर दिवसांची कामना करणारे. कवी कधीतरी तारुण्यसुलभ भावनेतून या साऱ्या कष्टांना विसरतो. माध्यमांच्या मायाजालात गुंततो. या मोहमयी रंगबेरंगी दुनियेत हरवतो. वास्तवाच्या विखारातून निसटण्याचा प्रयत्न म्हणूनही असेल कदाचित. मृगजळी सुखाला आपलं समजून जगाशी कनेक्ट राहताना आपल्यांच्या दुःखाशी डिसकनेक्ट होत राहतो.

बाप फाटक्या कपड्यानिशी देहाची दुखणी सोबत घेऊन शेतात राबतो. माय पायात काट्यांनी केलेल्या कुरूपांची वेदना घेऊन शेतातून घरी परतणारी. आयुष्याच्या वाटेने चालताना परिस्थितीने दिलेली अनेक कुरूपे वागवणारी. वेदना चेहऱ्यावर दिसू न देता, देव आणि दैवाशी झगडणारी. माणसं सगळीकडे देहाने सारखीच; पण मनाच्या वेदना भिन्न असतात. या वेदनांशी नातं सांगणारी ही कविता काळजाला चरे पाडते.

घर, गाव, परिसर, श्रद्धा, समस्या, संकटे, आस्था, अपेक्षा अशा अनेक पातळ्यांवर वावरणारी ही कविता माणसांच्या मनात उदित होणाऱ्या भावांदोलनांना नेमकेपणाने पकडते. मनात आस्थेचा सूर्य जागवणारी ही माणसे परिस्थितीचे वारंवार पडणारे तडाखे झेलूनसुद्धा न मोडणारी. झुंजारपण दिमतीला घेऊन जगण्याच्या प्रश्नांशी भिडतात. या सगळ्याच कवितातून एकेक सत्य वास्तवाच्या गाभ्यातून अंकुरित होते. वरवरचे अनुभव घेऊन शब्दांशी केलेली ती झटापट नाही. वास्तवाला भिडणारा अनुभव, हेच या कवितेचे बलस्थान आहे. माय कवितेत ते म्हणतात,

माय
बापाला आंधणासोबत मिळालेली
जिवंत वस्तू
माय
सदा खुंट्यांवर बांधलेलं
गरीब जित्राब.


तेव्हा अजूनही वाटते महिला सक्षमीकरणाच्या, हक्कांच्या कितीही वार्ता केल्या, तरी बदलाचा वारा येथल्या मानसिकतेला अद्याप स्पर्शून गेलाच नाही.

माय
वास्तवाच्या विस्तवावर भाजलेली
गवरीची राख...
माय
सासरच्या आगीत जळलेली
अधमेली चिता.


या ओळींमधून जाणवणारी धग संवेदनशील मनात कालवाकालव करते.

प्रेम, प्रणय, हृदयातील गुंता या भावनांपासून अलिप्त असणारी कवीची लेखणी हृदयातील आग धगधगत ठेवते. वास्तवाच्या वेदनाच इतक्या मोठ्या आहेत की, त्यांना प्रणयातल्या धुंदपणाचं अप्रूप वाटत नसेल. संघर्ष करीत जगणारी माणसे कष्टालाच रोमान्स समजतात. हताश होऊनही अंतरी वाहणारा आस्थेचा ओलावा जपत पुढे चालण्याची उमेद ही माणसे नाही सोडत. भरारी घेण्याचं सामर्थ्य अंगी असणारी वृत्ती माणसांचे मोल वाढवते. आपत्तीचे आघात सतत झेलणाऱ्या या माणसांविषयी म्हणूनच आपलेपणा वाटतो.

पाण्याच्या प्रश्नांनी वैतागून शिव्या घालणाऱ्या बाया. मोडका संसार सांभाळून झुंजणारी माय, शिक्षणासाठी धडपडणारा पोरगा ही कष्टाची अधोरेखिते समोर रोजच दिसत असताना साहजिकच वास्तवाच्या वाटेने अनुभव शब्दांकित झाले आहेत. समकालीन वास्तवाचे भान ठेवीत चिंतनाच्या वाटेने कवी एकेक अनुभव शब्दांकित करून काही सांगू पाहतो. अनुभवाचं आकाश आपल्या कवेत घेऊ पाहतो.

साहित्यिक मूल्यांनी परिपोषित होणारी ही कविता जगण्याचे उमदेपण घेऊन येते, तशी माणसाला त्याच्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देताना विचार करायलाही भाग पाडते. ‘सातपुडा’ या कवितेत ते म्हणतात,

उडत चाललेल्या हिरवळीसारखी
सातपुड्यातून निघून चाललीयेत
माणसं देशभर
शेतमजुरी करत
विखुरलीयेत शेतमाळावर
गावोगावच्या गावदरीवर


गावपरिसरात प्रगतीच्या पाऊलखुणा दिसू लागल्या, त्या पावलांचे ठसेही तेथल्या मातीत गोंदले गेले; पण त्यासाठी मोल चुकवणाऱ्या माणसांचं काय? पुसल्या जाणाऱ्या त्यांच्या पाऊलखुणांना कुठलेच आयाम का नसावेत? विस्थापित होणं हेच प्राक्तन असेल, तर व्यवस्थेनेच ते यांच्या ललाटी लेखांकित केले आहे. वैधव्य भोगणारा यांचा वर्तमान वळचणीला, तर भविष्य अंधारात विसकटलेलं जगणं शोधत आहे.

अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम घेऊन येणारी ही कविता अस्वस्थ वेदना व्यक्त करते. मूल्यप्रेरित जगण्याला समजून घेताना समाजातील दुरितांचे सम्यक भान राखणारी नामदेव कोळींची कविता सत्य, शिव, सुंदराची आराधना करीत मांगल्याची प्रतिष्ठापना करू पाहते. ‘प्रश्नांचं मोहळ, भंगतीचा पाय, पाण्याचा धर्म या कविता वाचकाला नुसते सजगतेचे भान देत नाहीत, तर नेणिवेच्या पातळीवरून जाणिवेच्या पातळीवर आणून उभं करतात.

एक समृद्ध; तरीही अस्वस्थ करणारा अनुभव नामदेव कोळींची कविता वाचकाला देते. भाषा सहज आविष्कृत होणारी आणि साधेपणाचे साज घेऊन आलेली. आलंकारिकता, अतिशयोक्ती, अभिनिवेशांचे कोणतेही अवडंबर नसणाऱ्या या कविता प्रांजळ मनातून प्रकटलेले भाषिते वाटतात. मूल्यव्यवस्थेवर भाष्य करणारी ही कविता जशी प्रतिमांच्या माध्यमातून प्रकटते तशीच माणसांच्या आणि कवीच्या मनातील श्रद्धांचाही वेध घेते. निसर्ग, पर्यावरण, पाणी, गावाचं दुभंगलेपण, शहरी सुखांची आस, निसटलेलं बालपण या साऱ्यातून कवी उजेडाची एक तिरीप शोधू पाहतो आहे. गावाच्या मातीत अस्तित्वाची मुळे घट्ट रुजवणारी, तेथल्या संस्कारांशी नाळ बांधून ठेवणारी आणि गावातल्या माणसांना शोधणारी ही कविता मनात रुजते. नुसती रुजतच नाही, तर वाढत जाते. जाणीवेच्या सकस रोपांना रुजवण्याचं काम नामदेव कोळींची कविता करते आहे. ज्याच्या साहित्याकडे आश्वासक भावनेतून पाहता येईल, असे हे एक नाव मराठी काव्यविश्वात आपली ‘नाममुद्रा’ अंकित करीत आहे. त्यांच्या कवितेकडे पाहताना एक आश्वासक चित्र मनाच्या कॅनव्हासवर रेखांकित करण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे, हे म्हणणं अतिशयोक्त ठरणार नाही, असे वाटते.
*
शेतमजुरांच्या कविता
कवी: नामदेव कोळी
संवाद: ९४०४०५१५४३
*
चंद्रकांत चव्हाण
संवाद: ९४२०७८९४५५

अंधार

By // No comments:
अंधार खेळत राहतो
उजेडाच्या तुकड्यांशी अन्
अस्तित्व विरलेल्या आकृत्या
सलगी करत राहतात उगीच
हरवलेल्या सावल्यांशी

पोकळीच्या गर्भात आस्थेचा कोंब
रुजण्याची धडपड करीत राहतो
सर्जनाची स्वप्ने पाहताना
आवरणात दडलेल्या आकांक्षा
सोलत राहतात स्वतःच स्वतःला
जगण्यावर घट्ट चिकटलेले
एकेक पापुद्रे उलगडताना
अपेक्षांचे अंश रुजत जातात
वेदनांच्या अनेक कळा घेऊन

भविष्याच्या धूसर पटलावर
कोरली जातात अनंत स्वप्ने
ज्यात मी असतो, माझे असतात;
पण आपले क्वचित दिसतात

चौकटींना गहिरे रंग भरताना
काहीतरी निसटतेच
माझा मी माझ्यापुरता उरतो
काळाच्या कपाळावरील
प्राक्तनाचे अध्याय शोधत

***

Kshitij | क्षितिज

By // 3 comments:

धुक्याआडचं क्षितिज

“अरे किती फिरशील आणखी, असा इकडे-तिकडे कल्पनेचे तीर धरून! नेहमीच नसत्या गोष्टींच्या लाटांवर का तरंगत असतोस? जरा वास्तवातही जगायला शिक. वास्तवाचं भान असणारं जगणं काही अवघड नसतं रे! आपण फक्त आपलं आखून दिलेल्या चाकोरीत चालावं अन् पायाखालच्या वाटा आपल्या म्हणीत मुकाट्याने सरकत राहावं पुढे. चारचौघांसारखं जगावं शहाण्या माणसाने. ना कुठले प्रश्न, ना कुठल्या चिंता. प्रश्नच नसले अन् त्यांच्यासोबत चालत येणाऱ्या चिंता नसल्या की, मग कसल्या आल्यायेत समस्या आणि समस्याच नसल्या की, गुंत्याचा प्रश्नच नसतो, नाही का?”

“झालं तुझं बोलून? आता मी बोलू का थोडं? हे पहा, तुझं म्हणणं कदाचित स्वतःभोवती आखून घेतलेल्या कुंपणाच्या जगाचा विचार केला, तर वाटेल किती चांगलं वगैरे आहे म्हणून. पण मला एक सांग, मखरात मंडित करून सजवलेल्या विचारांना विस्तार असतो? त्यांना पलीकडील क्षितिजे सारखी खुणावत असतात...? नाही ना! मग तिथंच कुजायचं असेल, तर कशाला आपली ओळख माणूस म्हणून करून द्यायची? सांगायचं ना, निसर्गचक्राचा हात धरून इहतली अवतारकार्य धारण करून आलेल्या आणि अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा मागे कोरून न जाता जसे आले, तसे गेलेल्या अनेक जिवांसारखा मीही एक जीव. अनेकातील एक, अनेकांसारखा. ना कुठल्या आकांक्षा, ना कुठली स्वप्ने. समोर पसरलेल्या वाटांवर सरपटत मूठभर भविष्याच्या दिशेने सरकणारा.”

“ओ साहेब, पुरे! तुझं सगळं ज्ञान, तत्वज्ञान माहितीयेय मला. तुझं हे असलं काही चौकटींच्या पलीकडलं बडबडणं माझ्या मेंदूला पेलवणं जरा अवघडचं...! पण एक सांगतो, स्वप्ने आवाक्यात असली की, जगणं सोप्पं होतं.”

“हो, होत असेलही. पण सोपं असलं, म्हणून समाधानी असेलच असे नाही.”

“सोड रे, ते सगळं! समाधान, डिव्होशन, गगनाला गवसणी वगैरे घालणाऱ्या आकांक्षा या गोष्टी वेगळ्या आणि वेगळ्या लोकांसाठी असतात. ते येड्यागबाड्याचं काम नसतं काही. स्वप्ने बघायचीच असतील, तर ‘स्व’ कसा सुरक्षित ठेवता येईल, याची बघ! तीच माणसांची प्राथमिक गरज आहे.”

हे असले संवाद काही नवीन नाहीत. मला, त्याला आणि आम्हांला ओळखणाऱ्यांनाही. याचा नेहमीच सुरक्षित पवित्रा. सामना जिंकण्यासाठी खेळायचा नसतोच याला कधी. तो वाचवता आला म्हणजे झालं. खेळलो हेच मोठं समाधान. एवढाच याचा विचार. कवचात कसं सुरक्षित राहता येईल याचा आधी विचार करणारा. कासव एकवेळ त्याच्या सुरक्षाकवचातून बाहेर काय चालले आहे, डोकावून बघेल. पण याचं कवचाच्या बाहेर पडणं... अजिबातच नाही. याचं एक नित्याच काम. न मागता सल्ला देण्याचं सत्कर्म करीत राहणं. सत्कर्म हाही शब्द त्याचाच. सर सलामत... असणं याच्या दृष्टीने आयुष्यातलं एक मोठ्ठं काम. सल्ला मोफत वाटण्यात याला कोण आनंद! अर्थात, हे काम काही त्याच्यासाठी अवघड नाही आणि आमच्याकरिता नवं नाही. याला असे सल्ले देण्यासाठीच नियतीने म्हणा अथवा निसर्गाने, काही म्हटले तरी फार फरक पडत नाही, जन्माला घातले असावं असं वाटतं. याला कारण हा कधी चौकटींच्या पलीकडे आणखी एक जग असतं आणि त्यात आपल्यासारखेच, पण ‘स्व’ संभाळत स्वतंत्र विचार करणारे जीव विहार करीत असतात, याचा हा चुकूनही विचार करत नाही.

“हे बघ, सुरक्षित तर किडेमुंग्याही असतात. त्यांच्या जगाची आणि जगण्याची कोण दखल घेतो का? गरजेपुरती घेतही असतील, पण बहुदा नाहीच. पण माणसांच्या जगण्याच्या लहानसहान पैलूंनाही दुर्लक्षित नाही करता येत. तुझं काय आहे सांगू का? तुझं जग सुरु होतं तुझ्यापासून आणि जावून संपतं तुझ्या खोप्यापर्यंत. आपल्याला अवगत असणाऱ्या वर्तुळापेक्षा आणखीही एक मोठे वर्तुळ आहे, त्यालाही त्याचा परीघ आहे, याचा तू कधी विचार करायला तयार नाहीस आणि या पलीकडच्या जगात स्वतःच विहार करायला लागतो, या साध्यासरळ जाणिवेपासून कोसो दूर असणारा तू.”

“असेल, मग काय? या अफाट जगाचा विचार करणे खरंच गरजेचं असतं का? आणि एवढ्या जगाचा विचार करायला मी कोणी असामान्य कोटीतला, अद्वितीय, अलौकिक वगैरे कर्तृत्त्व असणारा नाही की, कोणी मोठी आसामी नाही. समजा असलंच यातलं थोडं काही, तर त्यातून आपल्या गरजा तेवढ्या निवडाव्यात. बाकी गोष्टींशी काही देणंघेणं असण्याचं कारणच काय आपल्याला? आणि असलं तरी त्यानी काय फार मोठी उलथापालथ घडणार आहे माझ्यासारख्यांकडून?”

घरातला एकटाच म्हणून सगळ्यांनी याला स्वप्नासारखा सांभाळला. साधी शिंक आली तरी औषध-गोळ्या घेऊन याच्या दिमतीला उभा राहणारा परिवार. याने काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला की, हे आपलं काम नाही. का उगीच या वाटेने जातो. झेपत नाही, तर कशाला खोल डोहात सूर मारायचा. हे किंवा असेच काहीसे अमृततुल्य विचार कानांवर आदळणार. या नन्नाच्या पाढयांनी याच्या विचारविश्वाचा परीघ कधी मोठा झालाच नाही. इतरांचे विचार याच्या जीवनवृक्षावर बांडगुळसारखे वाढू लागले. स्वप्ने पाहता येतात आणि जगताही येतात, याचं भानच कधी आलं नाही. कधीतरी मस्त मजेत जगावं. अगदी मनाला येईल तस्सं. असतील काही जगण्याचे गुंते इकडे-तिकडे गुरफटलेले ते समजून घ्यावेत. आलं त्यांना उकलता, तर घ्यावेत सोडवून आणि नाहीच जमलं, तर जावं सहज विसरून. हे कधी जमलंच नाही याला. मुक्तीचे पंख कधी याच्या देहावर वाढलेच नाहीत. आकाश पंखावर घ्यावं, असं कधी वाटलंच नाही. नवी अनोळखी क्षितिजे बघून यावीत, हा विचार चुकुनही कधी मनाला शिवला नाही याच्या. याचं एकच स्वप्न नशिबाने मस्त सुख लाभलं आहे, तर घ्या त्याच्यात लोळून.

“खरं सांगू का तुला! तुझ्या मनाला बरं वाटावं म्हणून तोंडदेखले चांगलं बोलायला हवं, या भ्रमात मी कधीच नसतो. तुला हेही माहितीयेय की, हा असं काही बोलणार नाही आणि करणार तर नाहीच नाही. मग कशाला शब्दांचे बुडबुडे उडवतोयेस? आपल्या विचारधारा दोन ध्रुवांवरच्या. त्यांचे बिंदू जुळणे अवघड आहे. आमची आणि तुझी स्वप्ने कधी जुळलीच नाहीत. कारण तुझी स्वप्ने फक्त तुझीच आहेत. ती तुझ्यापासून सुरु होऊन तुझ्याजवळ संपतात. आमची स्वप्ने आमच्यापासून सुरु होऊन इतरांपाशी संपतात. जगातलं जे काही भलं-बुरं, योग्य-अयोग्य असेल त्याला सामोरं जावं. आलं पुढ्यात ते आनंदाने स्वीकारावं एवढं साधंसरळ गणित आमचं.”

“मग, आमची स्वप्ने काय स्वप्ने नाहीत?”

“आहेत ना! पण त्यांना ना विस्तार, ना क्षितिजे. पसाभर, मूठभर अस्तित्वाला आपलं म्हणणारी तुझी क्षितिजे. त्यात कसले आलेत वादळे, कसल्या आल्यात लाटा? अथांग, अफाट, अमर्याद शब्दांना जागा नसणाऱ्या तुझ्या चौकटी. नियतीने तुला हवं ते सगळं दिलंच, पण नको तेही अधिकचं दिलं. आणि एक सांगू, सगळंसगळं दिलं; पण स्वप्ने द्यायला विसरली.”

“असं कसं असेल, स्वप्ने सगळ्यांनाच असतात, मग मी कसा अपवाद असेल? हां एक मात्र खरंय, तुम्ही अपवाद समजत असाल, तर त्याला काही इलाज नाही.”

“कदाचित तसंही असेल! असेल तुझं एखादं स्वप्न कुठलंतरी, पण ते पूर्ण करावं कसं, याबाबत तू कधी गांभीर्याने विचार केल्याचे निदान मला तरी स्मरत नाही. अर्थात, या मर्यादा तू मान्य करणार नाहीच, हे काही वेगळं सांगायला नको. असतील तुझी काही स्वप्ने, पण ती खरंच स्वप्ने आहेत का? हेही तपासून पहा एकदा. जगात स्वप्न न पाहणारी माणसे स्वप्नातही शोधून सापडणार नाहीत. पण तुला मात्र अपवाद करता येईल. नव्हे तू स्वतःच आपल्याला अपवाद करून घेतला आहे.”

“म्हणून अपवाद काही नियम नसतो होत.”

“मान्य आहे, सगळ्याच अपवादांना नियम नाही बनवता येत. असं म्हणतात की, स्वप्ने ही वीरांची दौलत असते. भिकाऱ्याची स्वप्ने खजिन्यात बंदिस्त असतात. वीरांना स्वप्नांची कमी नसते. देशाच्या सीमेवर टक्क डोळ्यांनी पहारा देणाऱ्या डोळ्यात सुरक्षा स्वप्न बनून जागी असते. त्याच्या स्वप्नात देश वसतो. समाजसेवेचं व्रत अंगीकारणाऱ्याला सेवेत स्वप्ने सामावलेली दिसतात. एखाद्या प्रयोगशाळेत वर्षानुवर्ष स्वतःला गाडून घेणाऱ्या संशोधकाला स्वप्नांचा अर्थ केलेल्या प्रयोगात गवसतो. आईबापाला मुलांच्या यशाची स्वप्ने आपली वाटतात. प्रेमात आकंठ नाहणाऱ्यांची स्वप्ने हेच सदन असतं. आकांक्षांच्या गगनात विहार करणाऱ्यांना समर्पणाच्या तारका स्वप्ने बनून लुकलुकताना दिसतात. कोलंबसने भारताच्या भूमीवर पाय ठेवण्याचे स्वप्न पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य सर्वांचं व्हावं, हे स्वप्न पाहिलं. बाबासाहेबांच्या स्वप्नात वंचितांच्या वेदनामुक्तीच्या वाटा साकळल्या होत्या. गांधीजींच्या जीवनयात्रेत सामान्यांना अस्मिता देण्याचं स्वप्न साठलेलं होतं. भगवान बुद्धांच्या नेत्रात अहिंसा स्वप्न बनून अधिवास करीत होती. ज्ञानेश्वरांच्या पसायदानात जगाच्या कल्याणाच्या वार्ता स्वप्ने पाहत होत्या.”

“केवढी मोठी ही माणसे! आपण यांच्या पासंगाला तरी पुरणार आहोत का? काय उदाहरणे कुठे द्यावीत, याचं काही भान आहे की, नाही तुझ्याकडे? यांना हे सगळं जमलं, कारण ही सगळी माणसे अलौकिक कोटीतील होती.”

“पण ही सगळी माणसेच होती ना! माणूस म्हणून त्यांच्याही काही मर्यादा होत्या, असतील; म्हणून त्यांनी स्वप्ने पाहायचं नाही टाकून दिलं. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीकरिता त्यांनी जिवाचं रान केलं. स्वप्नांच्या मागे वेड्यासारखी धावली. का धावली? तर धावणं आम्हाला शिकवावं म्हणून. आम्हाला हे पेलवणारं नाही, प्रयत्न करूनही शक्य होत नाही, हे कळलं. मग आम्ही सोपा मार्ग शोधून काढला. ह्या माणसांच्या वेगळेपणाला नाही अंगीकारता येत ना, मग माणसांना शक्य नाही ते देव करतो म्हणून चौकटींच्या कुंपणापलीकडे असणाऱ्या सगळ्या अलौकिक कर्तृत्वाच्या धन्यांना देवत्वाच्या पातळीवर आणून उभं केलं. एखाद्या कर्मयोग्याला असं उभं करता आलं की, आमची जबाबदारी संपते आणि माणूस म्हणून आमचं अस्तित्वही अबाधित. कारण देवालाच हे शक्य आहे. माणूस तर काय बिचारा पराधीन आहे पुत्र जगी.... नाही का?”

“तू काहीही म्हण. त्यानी फार काही फरक पडत नाही. अशी अलौकिक माणसे जगाच्या गोंधळात असे किती असतात? फार थोडी आणि हे थोडं असणं अपवाद वगैरे असतं.”

“अपवाद वगैरे विसर रे! अपवाद काय सोयीसाठी तयार करता येतात. स्वप्ने पाहणारे अनेक असतात, पण पूर्ण करणारे किती असतात? सांगणं अवघड असतं. म्हणून हा अपवाद वगैरे प्रकारचा समर्थनाचा मार्ग प्रशस्त होतो. समाज नावाच्या व्यवस्थेचं गणित कोणत्याही सूत्राने सोडवलं तरी उत्तर बरोबरच यायला हवं, म्हणून पर्यायांच्या पायऱ्या पार करणाऱ्यांच्या बेरजांची स्वप्ने समाजाची व्हायला हवीत. पण समाजाची स्वप्नेच चुकत असतील तर... अनेकांच्या आकांक्षांचे दिवे अकाली विझतात. सावली बनून आश्वस्त करणारी झाडे अविचारांच्या वणव्यात करपतात. आसपास अंधाराचं सावट गडद होत असेल, तर पाहणाऱ्या डोळ्यातील ज्योती काजळतात.”

“जगण्यातील उजेड हरवणं मलातरी कुठे मान्य आहे! उजेड साऱ्या जगात पोहचवता येणार नाही, हे माहीत असूनही मी का उगीच वाती पेटवत राहायचं? आहे तो दिवा तेवत ठेवायचा. त्याचा उजेडाला आपली दौलत समजायचं आणि एवढं समाधान अंतरी नांदते राहिले की, जगायला आणखी काय लागते?”

“मला माहिती आहे, तू आहेस तसाच राहणार आणि मी कधी नाही सुधारणार. पण हेही लक्षात घे की, जग माणसाचं आहे. ते माणसांसाठी असावं आणि माणसांनी त्याच्या कल्याणाच्या वार्ता कराव्यात. अमंगलाचा परिहार करून मांगल्याच्या प्रतिष्ठापनेची स्वप्ने पहावीत. त्याला आणखी सुंदर करण्यासाठी माणसांनी पुढे यावं. एवढं जरी घडलं तरी हरवलेल्या, सुटलेल्या, निसटलेल्या अनेक गोष्टी पूर्णत्वाच्या दिशेने मार्गस्थ होतील.”

“हो, पण असे प्रशस्त पथ कोण आखणार आहे? माहीत नसलेल्या दिशांनी वाटा शोधत जाणं एवढं काही सोपं काम नसतं. नसेल आपल्याला हे सगळं करणं शक्य, तर चाकोरीतला रस्ता काय वाईट असतो.”

“स्वप्ने पाहण्याचा अधिकार सगळ्यांना असला, तरी पूर्ण करण्याची जबाबदारीही त्याचीच असते. निर्लेप, निर्व्याज, नितळ, निरामय विचारांनी विलसणारं जग हे एक सुंदर स्वप्न आहे. असं जग नुसतं आपल्या आसपास अनाहतपणे नांदते राहणे आवश्यक नसून, ते तसे टिकवून ठेवण्याचं उत्तरदायित्वही माझंच आहे, याची जाणीव आत कायम धगधगत राहायला हवी. अशी स्वप्नं किती जण पाहत असतील? माहीत नाही. पण ती पहायची की नाही, हे ज्याचं त्यानेच ठरवावे. अपेक्षा एकच असते, स्वप्ने फक्त जागेपणी पाहता यायला हवीत.”

“झालं तुझं तत्वज्ञानाचं अत्तर लावून? हे सगळं पुस्तकात छापायला आणि व्याख्यानात फेकायला चांगलं असतं. प्रत्यक्षात दिसतं तितकं सोप्पं नसतं.”

“मला माहिती होतं, तू असा काही बिनबुडाचा युक्तिवाद करशील. कारण तुझे वाद आणि युक्तीवादही असेच असतात. तुझ्या वर्तुळांना व्यापणारे आणि परिसराचा परीघ हरवलेले. ज्यांना विस्ताराची स्वप्ने नाहीत, ते काय क्षितिजे शोधतील?”

आकाश हरवलेलं हे पाखरू आज कुठे थोडे पंख पसरून झेप घ्यायच्या तयारीत होतं. त्याच्यासमोर उभं केलेलं क्षितिज पाहत वेडावत होतं. तेव्हाशी मोबाईलवर संदेश आला. कोटरात परतायची आज्ञा अक्षरांचे पंख लावून आली. मोठ्या प्रयासाने पसरलेले पंख परत दुमडून खोप्याकडे निघला, सोबत कोणती स्वप्नं घेऊन माहीत नाही.
 
(चित्र गूगलवरून साभार )

Apur | अपूर

By // No comments:

पापण्याआडचं पाणी टाळता न येणारं वास्तव, बाकी बऱ्याच गोष्टी येतात अन् जातात. त्या प्रासंगिक असू शकतात. त्यांचं सार्वकालिक असणंही नाकारता येत नसतं. कदाचित तात्कालिक घटितांचाही तो परिपाक असू शकतो. पण सगळ्याच गोष्टींना काही प्रासंगिकतेची परिमाणे वापरून मोजता येत नाही. सुख, दुःख, हर्ष, वेदनांचा प्रवाह जीवनातून अनवरत वाहत असतो. आस्थेचे तीर धरून वाहणारे आपलेपण मात्र समजून घ्यायला लागते. संवेदनांचे साचे काही घडवता येत नाहीत. सहजपणाची वसने परिधान करून त्या अंतर्यामी सामावलेल्या असतात. आपलेपणाचे पाझर आटत चालले आहेत. अशा शुष्क पसाऱ्यात आतला झरा सतत सांभाळावा लागतो. पापण्यांनी पेलून धरलेलं भावनांचं आभाळ समजून घ्यायला लागतं. पापण्यांच्या परिघात सामावलेलं ओथंबलेपण डोळ्यातून उतरून मनात वसतीला आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. आपलेपण समजून घेता आलं की, आयुष्याच्या वाटा भले प्रशस्त होत नसतील; पण परिचयाच्या नक्कीच होतात. त्यांच्याशी संवाद साधता आला की, परिसराशी सख्य साधणे सुगम होते. सख्य साधता आलं की, आसपासचा आसमंत चैतन्य घेऊन उमलत राहतो. उमलण्याची पुढची स्वाभाविक पायरी बहरणे असते. असे असले, तरी बहरलेले परगणे सांभाळून समृद्ध करायला लागतात.

पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला परिपूर्णतेचा परिसस्पर्श घडणे कितीही सुंदर वाटत असले, तरी तो प्रवास काही सहजसाध्य नसतो. त्याकरिता आपल्या मर्यादांना समजून घेत मनी वसणाऱ्या परिघाचा विस्तार पारखून, निरखून, समजून घेतल्यावर तो कुठेपर्यंत न्यायचा याच्या मर्यादा आखून घ्यायला लागतात. मोठं होणं म्हणजे काय, हे आकळून घ्यायला लागतं आणि हे सगळ्यांनाच समजतं असंही काही नसतं. मोठेपणाची परिभाषा आधी समजून घ्यायला लागते. मोठेपणाच्या वाटेने चालताना आपल्याला पडलेले मर्यादांचे पडलेले बांध आधी ओलांडता यायला हवेत. माझा वकूब समजणे, म्हणजे मला माझ्या कुंपणांचे आकलन होणे. आपल्या परिघाचा विस्तार समजणे, म्हणजे मोठं होण्याच्या दिशेने पडलेलं पाहिलं पाउल असतं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

माहात्म्याची महती सांगून काही कोणाला मोठं होता येत नसतं किंवा एखाद्यावर माहात्म्याच्या गोण्या लादून कोणी मोठं झाल्याचं उदाहरण नाही. मोठेपणाच्या परिभाषा प्रत्येकवेळी वेगळ्या असतात आणि प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. माणसे त्या ठरवतात. त्यांच्या मर्यादाही तेच आखून घेतात आणि निकषांच्या पट्ट्या हाती घेऊन मोजतातही तेच. त्यांचे साचे तयार असतात. तुम्हाला तुमचा आकार त्या साच्यात सामावण्याएवढा करता आला की, तुमच्या प्रवासाला महानतेची लेबले चिटकवताना सोपं होतं. आयुष्याच्या वाटेवर चालताना कुठलीतरी चौकट सोबत घेऊन अशी लेबले समोर येत असतातच.

संकल्पित सुखांचे प्रत्येकाचे आकार वेगळे असतात. कधी त्याच्या मनाजोगत्या आकृत्या साकारतात, तर कधी त्यांचे कोपरे दुभंगतात. या प्रवासात अभंग राहता येतं, त्यांचा संग सगळ्यांनाच निःसंग वृत्तीने घडतो का? अवघड प्रवास असतो तो. आसपास कायमच धग असते त्याची. त्याची दाहकता अनुभवायला लागते सतत. मोठेपण काही मागून नाही मिळत. ते प्रयत्नपूर्वक संपादित करायला लागते. म्हणून की काय माग काढणारे त्याचा शोध घेत हिंडतात. कोणी पदाच्या वाटेने तो मिळवण्याचा प्रयत्न करतो, कुणी पदामुळे चालत येणाऱ्या प्रतिष्ठेला मोठेपणाच्या परिभाषेत बंदिस्त करू पाहतो, तर कुणी त्याचे मोल पैशात लावून मोठेपणाच्या चौकटी आखून घेतो. साधनसंपत्तीच्या बेगडी झगमगाटात डोळे दिपवणारे क्षणिक कवडसे मोठेपण परिभाषित करतात. माणसे अशा चमकदमकलाच वास्तव समजायला लागतात. अर्थात, अशा विकल्पांचा उपयोग करून मोठेपण मिळेलच असे नाही. समजा मिळवून मिरवता आले, तरी त्याला चिरंजीवित्व असतेच असे नाही. अप्रस्तुत पर्याय जगण्यातील सात्विकता संपवतात. म्हणूनच मोठेपणावर लोकमान्यतेची मोहर अंकित होणे आवश्यक असते. ते फुलासारखे सहज उमलून यायला हवे. उमलून येणे साध्य झाले की, आरास मांडायची आवश्यकता नाही उरत. ये आतूनच देखणेपण घेऊन येते.

मिरवून घेण्याची मनीषा असणाऱ्यांना तर नाहीच मोठं होता येत. तो मोठेपणाचा आभास असू शकतो. मृगजळही पाण्यासारखे दिसते, म्हणून त्यामुळे काही तहान भागत नाही. आयुष्याचं आभाळ सांभाळत सगळ्यांनाच आपापली क्षितिजे शोधावी लागतात. जीवनाच्या वाटेवरुन पुढे पळताना आपणास काय करायचं आहे, एवढं कळलं तरी पुरेसे असते. मोठेपणाच्या पाऊलखुणांचा माग काढत वणवण करून हाती काही लागते का? बहुदा नाही. कारण काही गोष्टी स्वयंभू असतात. स्वतःच्या विचारांवर विश्वास असणाऱ्यां जाणत्यांना दिशाहीन वाटांनी वळायची आवश्यकता नाही उरत. योजकतेने उचललेली त्यांची पावले योजनांची मुळाक्षरे ठरतात. नेणत्यांसाठी सगळेच पर्याय फोल ठरतात. विचारांच्या वाटेने चालणारी माणसे मोठेपणाचा परीघ स्वतः आखतात आणि आवश्यकतेनुरूप विस्तारत नेतात. तो कुठे थांबतो हे जाणतात आणि थांबायचे कुठे हेही समजून असतात.

मखरांमध्ये मंडित होता येतं, पण मनात आसनस्थ होणं अवघड असतं. आरास मांडून अगरबत्त्यांच्या धुरात ओवाळूनही घेता येतं, पण अंतर्यामी झिरपता नाही येत. मढवून घेऊन मिरवणूक सहज काढता येते, पण मिरवून घेतांना धुरळा अंगावर येतो. रंग देहावर चिकटतात, त्यांची जबाबदारी समजून घ्यावीच लागते. नव्हे असे माखलेले रंगच माणसाला त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतात. जाणिवा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा विसर नाही पडू देत. माणूस म्हणून माझे कर्तव्य काय? या प्रश्नाची सोबत ज्याला असते, त्याला मखरात मढवायची आवश्यकता नसतेच. मखरे मळतात, पण मने मळायला नको. एवढं जरी कळलं तरी खूप असतं, माणूस म्हणून इहतली जीवनयापन करायला.

बाकी प्रश्न काय असतातच. उत्तरेही असतात, पण नेमकं उत्तर शोधणारे आणि ते मनाजोगते हाती नाही लागत म्हणून धडपड करणारे किती असतात आपल्या आसपास? समजा नसतीलही, मग आपण या गर्दीत नेमके कोठे उभे आहोत, हे तरी आपल्याला नीटसं उमगलेलं असतं का? नसेल समजलं तर मी काय करतो, हे तरी आपल्याला अवगत असते का? माहीत नाही. पण हे शोधायची आवश्यकता असणे, म्हणजे अपूर्णता, नाही काय?
(चित्र गूगलवरून साभार)
***

Vatani | वाटणी

By // 1 comment:

उन्हाळ्यातील रणरणती दुपार. सूर्य आकाशातून धिम्या पावलांनी नेहमीच्या वाटेने निघाला होता. मावळतीच्या मुक्कामावर उतरायला त्याला अजून बरीच मजल मारायची होती. वारा रुसलेल्या पोरागत कुठेतरी लपून बसलेला. माणसे सकाळीच शेतात कामाला गेलेली. घर सांभाळत थांबलेल्या म्हाताऱ्यांचा सखारामबापूंच्या अंगणातील निंबाच्या सावलीचा आधार घेत नेहमीप्रमाणे गप्पांचा फड रंगला होता. गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांचा गोंगाट तेवढा कानी पडत होता. गावाच्या दक्षिणेकडील टोकावर असलेल्या सरुमायच्या घराकडे तशी शांतताच होती. अंगणातील पिंपळाच्या झाडावर विसावलेल्या दोन-चार चुकार पाखरांच्या चिवचिवाटाशिवाय कसलाही आवाज नव्हता. नदीच्या वाटेने उतरणाऱ्या गल्लीच्या शेवटच्या टोकावरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज तेवढा अधूनमधून शांततेला दुभंगत होता. झाडाचं पानही हलत नव्हतं. ओसरीवर हताश चेहरा घेऊन सरूमाय बसलेली. ती केवळ देहाने ओसरीवर होती. मन वाट चुकलेल्या पाखरासारखं सैरभैर भटकत होतं. कुठल्या अनोळखी वाटेने ते पळत होतं, तिलाच कळत नव्हतं.

उन्हाच्या उकाड्याने बाहेरही पडता येत नव्हते आणि बसल्याजागी मनही लागत नव्हतं. झाडाच्या बुंध्याला सावली पाहून कुत्रं धापा टाकत बसलेलं. त्याच्याभोवती उडणाऱ्या माशांनी हैराण झालेलं. अंगावर बसून चावे घेणाऱ्या माशांना हाकलण्याचा प्रयत्न करूनही त्याला फारसं काहीही करता येत नव्हतं. सरुमाय लुगड्याचा पदराने चेहऱ्यावरला घाम पुसत होती. वारा घालून जिवाला थोडं बरं वाटत होतं, म्हणून तिचे हात तेवढे हालचाल करीत होते. मनात अस्वस्थता दाटून आलेली. बसल्याजागी घडणाऱ्या हालचालीतून तगमग तेवढी जाणवत होती. मनात उठलेली वादळे मनातच थोपवून ठेवण्याचा तिचा प्रयत्न अधिक केविलवाणा वाटत होता. डोळे शून्यात हरवलेले. आपलं असं काहीतरी शोधत होते. ते मिळणं शक्य नसल्याचे कळत असूनही उगीचच त्यांच्यात आशेचे कवडसे काजव्यांसारखे अधूनमधून चमकून जात होते. हे सगळं थांबवता येईल, अशी वेडी आशा मनात मृगजळासारखी धावत होती. तिला आकार तर होता, पण अस्तित्व होतंच कुठे? वंचना शब्दाचा अर्थ तिला माहीत असणं शक्यच नव्हतं, पण समोर पडलेल्या पसाऱ्यात ते सगळं दिसत होतं.

दुभंगणारी स्वप्ने आणि हातून निसटणारी सुखे कितीतरी दिवसापासून म्हातारी सावरून धरत होती. पोरांच्या मनात घर करून बसलेल्या मतलबीपणाने नात्यांचे धागे अधिक ताणले जात होते. त्यांची सहन करण्याची क्षमता संपली. तुटायचेच होते, ते तुटले. तुटायला कारणे अनेक होती. आजचा दिवस निमित्तमात्र ठरला एवढेच.

घरचं घरपण गेल्या वर्षभरापासून क्षणाक्षणाने हरवत गेलं. हसत्या खेळत्या घरच्या धावत्या पावलांना खीळ बसली. जगण्याचा सगळा नूर बदलून गेला. परिवाराच्या मनातून पाझरणारा आपलेपणाचा झरा आटत गेला. ममतेचे तीर धरून वाहणारा प्रवाह हरवला. आपलेपणाची डूब घेवून भरलेलं पात्र रितं झालं. वर्षानुवर्षे काडीकाडीने जमा केलेला संसार कोलमडण्याच्या टोकावर येऊन उभा राहिला. म्हातारीने हिमतीने आणि हिकमतीने आतापर्यंत त्याला सावरून धरले होते. तो सावरून धरायची तिची ताकद क्षीण होत गेली. माणसांचे अहं तुटेपर्यंत ताणले गेले आणि हाती उरले त्याचे विद्रूप तुकडे. दोष तरी कुणाला द्यायचा? आपलेच बेईमान असतील, तर कुणाला जबाबदार धरून परिस्थितीत बदल थोडाच घडणार होता. नशिबाला दोष देवून काहीही उपयोग नव्हता. जगण्याचे भोग म्हणून म्हातारी आल्या प्रसंगाकडे विकल होऊन बघत होती. आतून तीळतीळ तुटत राहिली. आपले काय चुकले याचा शोध घेत राहिली.

सकाळी सकाळी लोकांची शेतात कामावर जायची धांदल उडली होती. शक्य तितक्या लवकर त्यांना वावरात पोहचायचे होते. जो-तो आपापल्या धावपळीत. गल्लीत अचानक गलका वाढला. सरुमायच्या घरातून जोरजोरात भांडण्याचे आवाज यायला लागले. हातातील काम टाकून माणसे तिकडे वळले. गर्दी जमा होऊ लागली. काय झाले म्हणून चौकशी करू लागले. हे सगळं नवीन नसलं, तरी अनपेक्षित होतं. सरुमायच्या घरात भांडणं अनेकदा झाली, पण ती घरची घरातच मिटली होती. त्यांनी एवढं तीक्ष्ण टोक कधीच गाठलं नव्हतं. प्रत्येकजण प्रसंगाचा अर्थ शोधू लागले. काहींना हे एक ना एक दिवस घडणार असल्याची जाणीव होतीच. ते दोनही पोरांना दोष देत होते. बायाबापड्या हळहळत होत्या. सरुमाय पोरांना आवरत होती. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. त्यांची झटापट सुरु. तुकारामच्या अंगावरील सदऱ्याच्या चिंध्या झाल्या. दिनूच्या सदऱ्याची डावी बाही झोंबाझोंबीत तुक्याच्या हाती लागल्याने सदऱ्यापासून वेगळी होऊन लोंबत होती. दोघेही रेड्यांसारखे एकमेकांना धडका देत होते. कुणीच मागे सरकायला तयार नव्हतं. त्यांचं असं भांडणं चांगलं वाटत नव्हतं, म्हणून काहींनी आवरण्याचा प्रयत्न केला. तरीही ते दाद देत नव्हते. माणसे जमा झाल्याचे पाहून दोघांनाही जास्तच चेव आलेला.

“तू हात लाई तं देख घरमान्हन्या वस्तुसले. कसा वाटा पडतस, तेच देखस मी.” तुकाराम दिनूच्या अंगावर धावून जात बोलला.

“ये तू पुढे! आठेच तूनं तंगडं तोडीसन तुनाच हातमा नही दिधं तं खानदाननं नाव सांगाव नही.” तुकारामच्या चिंध्या झालेल्या सदऱ्याची हातात अडकलेली बाही ओढत दिनू बोलला.

दोघेही हातघाईला आलेले. शेजारी राहणारा पांडुरंगतात्या त्यांच्या भांडणात पडला. “अरे, तुमले जराशी काही लाज-बीज कायी शे का नही! सकायमा कोणी देवनं नाव ली राह्यनं, कोनी वावरमा जावासाठे तयारी करी राह्यनं, आनी तुमी एकदुसरासना कपडा फाडी राह्यनात. अरे, तुम्ही कोनी माणसं शेतस का हैवान?”

गर्दीत जमलेल्यांना तात्यांच्या बोलण्याने धीर आला. तुकारामच्या मित्रांनी हात धरून ओढतच थोडं बाजूला ढकललं आणि त्याला समजावू लागले. काही दिनूला सावरण्याचा प्रयत्न करीत होते. 

तेवढ्यात दिनूची बायको सुरेखा मनातला राग काढत म्हणाली, “तात्या, तुमी गावना करताधरता शेतस. तुमीच न्याय करा. सगळं मोठासनाच वाटले येवाले जोयजेल का? मोठाच फकस्त सरुमायना आंडोर शे. आनी आमीन काय नदीमा वाही येयेल शेतस का? मनी सासूबी जवयं देखो तवयं त्यास्नीच बाजू लीसन बोलस. कवयंमवयं आमनंबी आईकी लिधं तं घरवर काय संकट येवाव शे का?”

तिचं बोलणं मध्येच तोडत सुमन बोलती झाली. “हा वं बायजाबाई, तुम्ही मोठा धोयेल तांदूई ना मईक शेतस. तुमनं कोन कवयचं आईकतत नही. आमीनच तेवढा धल्लीना लाडका शेतस. आनी तुमनासाठे काहीच नही. आवं, कितलं खोटं बोलशी? थोडी लाज वाटू दे वं! गावमांन्हा लोके काय आंध्या-बहिरा शेतस का? त्यासले काहीच दिखत-आईकत नही का? खोटं बोलाले काही मर्यादा राहास. कोलेबी पटीन एवढंच खोटं बोलो मानूसनी.”

दोनही बायांनी भांडणात आणखी तेल ओतलं. लहान लेकरं बावचळून त्यांच्याकडे पाहू लागली. आपले मायबाप असे का भांडतायेत, याचा त्यांना काही उलगडा होत नव्हता. त्यांच्या रडण्याने गलका आणखी वाढला. लोकांनी समजावल्यामुळे आतापर्यंत शांत बसलेल्या दिनूचा सुमनच्या बोलण्याने पारा चढला. सकाळीसकाळीच हातभट्टीची ठासून आल्याने आधीच वाऱ्यावर तरंगत होता. त्याला आणखी चेव चढला. जिभेवरचे नियंत्रण सुटले. अदवातदवा बोलू लागला. त्या बोलण्याने चिडून तुकाराम दिनूच्या अंगावर धावून गेला. पाठीत एक सणसणीत लाथ घातली. आधीच पिलेला असल्याने दिनू तोल जावून कोसळला. निपचित पडला. काहीही हालचाल नाही. दिनूकडे पाहत त्याची बायको मोठ्याने रडायला लागली. शिव्याशाप देऊ लागली.

शेजारी उभ्या असलेल्या अण्णाने कुणाला तरी पाणी आणायला सांगितलं. त्याने तांब्या भरून अण्णाच्या हाती दिला. ओंजळीत पाणी घेऊन दिनूच्या तोडावर शिंपडले. थोडी हालचाल झाली. कसाबसा उठून बसला आणि पुन्हा शिव्या देत ओरडायला लागला.

रुखमामाय, जानकाबाई, कमलबाई सरुमायला समजावत होत्या. शेजारी आणखी चारपाच बाया म्हातारीला धीर देत होत्या.

जिजाबाई पोरांवर खेकसत म्हणाली, “याच दिन दाखाळना बाकी राह्येल होतात रे भाऊस होन! हाई दखासाठेच सगळं करं तिनी... तुमनाकरता दिन देखा नही, रात देखी नही... हौसमौस नही, कपडालत्ता नही. नुसती ढोरसारखी राबत राहिनी. आतडा तोडत बसनी. कोनासाठे करं तिनी हाई सगळं? गह्यरा चांगला पांग फेडी राह्यनात तुमीन. आरे, पायेल कुत्रंबी इमानदारी इसरत नही. तुमीन तं त्यानापेक्षा गयेलगुजरेल दिखी राह्यनात!”

म्हातारीने डोळ्याला पदर लावला आणि हमसून हमसून रडू लागली. बाया तिची समजूत काढू लागल्या.

तुकारामला मित्रांनी ओसरीवरून उठवून शेजारच्या ढोरघराकडे ओढून नेले. तात्या शहाणपणाच्या चार गोष्टी सांगून काठी टेकत ओसरीवरून उतरले. भांडण सोडवायला आलेले एकेक करून त्यांच्यामागे चालते झाले.

सगळे आपापल्या कामाकडे निघाले. एकमेकांशी बोलत होते. “असं कसं होयनं. सरुमायना पोरं असा तं कवयचं नही होतात. मंग आतेच कसं होयनं?”

“काय सांगता येत नही रे भो! सगळा मतलबना धनी शेतस. दुनियानी रीतच असी शे, त्याले कोन काय करीन. ज्याले-त्याले आपलीच पडेल शे. सगळं मालेच भेटाले पाहिजेल, मंग बाकींना खड्डामा का जायेत ना.”

“इतलाबी चांगला समजू नका तुमीन त्यासले. सरुमाय खमकी होती म्हनीसन आतेलोग त्या आवरायनात. नही तं कवयसना घरदार फुकी देतात त्या.”

“अरे, तो दिन्या, त्यांनी तं सगळी लाज सोडी देयेल शे. दिनभर दारूना अड्डावर पडेल राहस. घरदार कसा-कसानी चिंता नही. मोठाभी कवयलोग आवरीन. त्याले एखलालेच पडेल शे का? हाऊ आईतखाऊ बसीसन खाईन आनी वरतून रुबाब करीन, कसं सहन करी तोबी.”

प्रत्येक जण आपल्या अनुभवानुसार मते मांडत होता.

सरुमायला चार गोष्टी समजुतीच्या सांगून, थोडा धीर देवून बाया घराकडे वळत्या झाल्या.

अख्खा दिवस सरुमाय विचार करत बसली. तिच्या थकलेल्या डोळ्यातलं पाणी वेदना बनून निथळत राहिलं. भविष्याच्या वाटेवर साकोळून आलेलं दाट धुकं तिला दिसू लागलं.

सत्तरी पार केलेली सरुमाय आयुष्याच्या वाटेवरून एक एक पावलांनी वार्धक्याच्या दिशेने सरकत होती. मुळचा गोरा वर्ण रात्रंदिन राबराब राबून रापलेला. सुमार उंची. तरतरीत नाक. चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावनांना गहिरेपणाची डूब देणारे डोळे वाढत्या वयाचे पडदे धरून धूसर होऊ लागलेले. सुख अंगणी नांदते ठेवण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली, कष्टाशिवाय त्यात दुसरे भाव कधी दाटून आलेच नाहीत. आज तेच डोळे आपलं काहीतरी हरवलेलं शोधत होते. देहावर सुरकुत्यांचे जाळे अंथरायला लागलेलं. त्याच्या रेघा वाढत गेल्या, तसा वर्तमान अधिक गुंतागुंतीचा बनत गेला. वर्तमानाच्या थकल्या क्षणांमध्ये आयुष्याचे अनेक चढउतार पाहणारा भूतकाळ हरवला. काळाची चाके अशी काही गरगरली की, भविष्य पाचोळ्यासारखे दिशाहीन भिरकावले गेले. वाऱ्याच्या स्वाधीन पाचोळ्याला निदान वारा देईल ती तरी दिशा असते. पण हिला कोणतीच दिशा आपली म्हणून स्वीकारायला तयार नव्हती. मनात साकोळलेली सगळी स्वप्ने हरवली. सोबत उरले वास्तवाचे अस्ताव्यस्त विखुरलेले तुकडे.

कधीकाळी आनंदाच्या किलकिलाटाने भरलेलं घर आज प्रत्येक चौकटीत रितंरितं वाटू लागलं. सुख बनून निनादणारे सूर थबकले. सौख्याचा गंध परिस्थितीच्या वणव्यात कापरासारखा उडून गेला. ज्या घराच्या ओसरीवर आलेला याचक कधी विन्मुख होऊन परत गेला नाही, ती ओसरी आज ओसाड वाटू लागली. आतून कुणीतरी आतडी कुरतडतो आहे असे वाटू लागले.

सरुमायने कष्टाने संसार उभा केला. पै-पै जोडून सजवला. हवं नको ते साठवत गेली. भांड्याकुंड्यापासून ते औतफाट्यापर्यंत सगळंच जमा करीत राहिली. घराचा कोपरान कोपरा तिच्या ममतेने सजत राहिला. तिच्या प्रेमळ स्पर्शाने पुलकित होऊन हसत राहिला. तिच्या ओंजळभर सुखांनी मोहरला. आनंदाच्या क्षणांनी हसला. दुःखाने हिरमुसला. संकटांनी कोमेजून मलूल झाला. पण वात्सल्याच्या वर्षावाने पुन्हा नव्या उमेदीने उभाही राहिला.

नशिबाचे खेळ नियती खेळत असली, तरी जीवनाच्या पटावर टाकलेलं दान पदरी घेऊन आस्थेने आला दिवस सुखाचा करायचे कौशल्य तिने कधी विस्मरणात जाऊ दिले नाही.

भाऊ नसल्याने दोन बहिणीतली मोठी म्हणून वडिलांची लाडकी लेक बनून वाढलेली. बापाने कमावलेलं होतं नव्हतं, ते सगळं लेकींसाठी होतं. अनुरूप स्थळ चालून आलं. पदराच्या गाठी बांधून सप्तपदी घडली. नव्या नात्यात बद्ध झाली. गाठींना असणारे रेशीमबंधाचे पीळ घट्ट होत गेले. पहिल्या लेकराच्या आगमनाने घरात सुखाची पावले दुडूदुडू धावू लागली. त्यांची सोबत करीत दोन वर्षाच्या अंतराने आणखी लहानगी गोंडस पावले येऊन मिळाली. घर आनंदाच्या लाटांवर तरंगत होतं. कशाची ददात नव्हती. घराचा पसारा मोठा. पन्नाससाठ बिघे जमीन. सालदार, मजुरांचा सतत राबता. शेतात बहरून येणाऱ्या पिकांनी आणि गोठ्यातल्या गायी-वासरांनी संसारात चैतन्य भरून नांदत होते. दह्यादुधाने शिंक्यावर आसन मांडलेलं. सुख घेऊन वारा चहुबाजूने वाहत होता. त्याची झुळूक मनाला सुखावत होती.

नियतीच्या मनात काय होते, कुणास ठावूक. एका अवचित क्षणी तिने कूस बदलली. सुख, समाधान घेऊन वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा पालटली. नितळ झऱ्यासारख्या झुळूझुळू वाहणाऱ्या सुखांना नजर लागली. नवरा नावाचं नातं घेऊन जीवनात सामावलेला पुरुष कसा असेल, हे कदाचित नियतीलाही कळत नसावं. नवऱ्याच्या हाती दारूची बाटली अलगद येवून विसावली आणि घरचे वासे फिरले. 

वडिलांनी वाढत्या वयाच्या वाटेने काळाचा हात धरून डोळे मिटले. घर-जमीनजुमल्याच्या वाटण्या झाल्या. नशिबाने मांडलेले खेळ जीवनपटावर सजू लागले. नियतीने टाकलेलं प्रत्येक दान जगण्यातून काहीतरी घेण्यासाठीच येऊ लागलं.

नवऱ्याचं नशेत तर्र होऊन घरी येणं नित्याचं झालं. कटकटी वाढू लागल्या. मारझोडपर्यंत मजल गेली. नांदत्या घरात गोंधळ नित्याचा झाला. शेजारी, नातेवाईक मध्यस्थी करीत राहिले. समजावत धीर देत राहिले. सरुमाय परिस्थितीच्या अंधारात उद्याच्या प्रकाशाचा कवडसा शोधत राहिली.

पदरी पडलेलं पवित्र मानून सरुमाय सगळं सहन करीत राहिली. नवरा नावाला आणि कपाळावरचा कुंकू सौभाग्याला. त्याला ना घराची चिंता, ना पोरासोरांची काळजी, ना कसली जबाबदारी. द्यायचं काहीच नाही, पण होतं तेवढं सुखही हिरावून नेलं. सुखाचे सूर कधी छेडले नाहीत, पण कली बनून संसारात नाचू लागला. आपल्याच मस्तीत जगत राहिला, असून नसल्यासारखा. घर रोजच नव्या आघातांनी हादरू लागलं. सरुमाय पडक्या संसाराला आवरू लागली. पोट पिकून पदरी पडलेल्या पोरवाड्याला घेऊन संसाराचा सुटणारा तोल हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून सावरू लागली.

सततच्या पिण्याने खंगलेल्या नवऱ्याने नशेतच एक दिवस मान टाकली. जगाचा निरोप घेतला. सरुमाय जाचातून मुक्त झाली. सगळं सहन करूनही कुंकवाचा धनी म्हणून नवऱ्याची काळजी करत होती. त्याने एक लाज सोडली मी कशी काय दगडाच्या काळजाची बनू, म्हणून नवऱ्याला दोष देणाऱ्यांना सांगत होती. कसा का असेना, पण जगण्याला त्याची सोबत होती म्हणणारी सरुमाय नवऱ्याच्या जाण्याने हबकली. त्याच्या त्रासातून सुटली, पण परंपरांच्या परिघातून तिला मुक्त होताच आले नाही. कपाळावरचे कुंकू पुसले गेले. पण नियतीचे खेळ एवढ्या लवकर मिटले जाणार नव्हते.

आज नियती तोच दुभंगवणारा खेळ नव्याने खेळायला सज्ज झाली होती. फक्त सोंगट्या तेवढ्या बदललेल्या होत्या. ठसठसणारी जखम भळभळून वाहू लागली. मनात दिशाहीन वादळे घोंगावू लागली. अर्धा संसार पार पडला होता, अर्धा विसकटून परिस्थितीच्या वाऱ्यावर सैरभैर होऊन हेलकावे खात होता.

असं का? या प्रश्नांचं उत्तर शोधूनही तिच्या हाती लागत नव्हतं. पोटाला चिमटा देत प्रसंगी अंगावरील दागदागिने गहाण ठेऊन, कधी मोडून घरचा गाडा ढकलत राहिली. मनात खूप इच्छा होती पोरांनी शिकावं. ढोर मेहनत करूनही हाती चतकोर भाकरीशिवाय काहीही न देणाऱ्या जमिनीत राबून जीव मातीचा करून घेऊ नये, म्हणून धडपडत होती. पोरांना तिची तगमग कधी समजली नाही. अडाणी बाई शिक्षणातून पोरांचं भविष्य शोधत होती, पण त्यांनीच आपण होऊन अंधाराचं राज्य निवडलं. त्याला ती तरी काय करणार होती. तिची स्वप्ने प्रत्येक वळणावर हरत होती. येथेही गारद झाली.

म्हातारीच्या डोळ्यात झोप नव्हती. डोक्यात विचारांचं काहूर दाटून आलेलं. रात्रीच्या अंधारात तिला उद्याच्या विसकटलेल्या वाटा दिसत होत्या. फार ताणून उपयोग नव्हताच. आतापर्यंत तिने घर विभक्त होण्यापासून सावरून धरलं होतं. प्रसंगी रागावून, कधी दोन पावले मागे घेऊन अभंग ठेवण्याचा प्रयत्न केला; पण आता पाणी डोक्यापार पोहचलं. तिचा जीव गुदमरायला लागला. मनात काहीतरी निश्चय करून पाहट होण्याची प्रतीक्षा करू लागली. खूप उशिरा केव्हातरी तिचा डोळा लागला.

पहाटे प्रभातफेरीला निघालेल्यांच्या टाळमृदुंगाच्या आवाजाने तिला जाग आली. कोंबड्याच्या आरवण्याने सकाळच्या आगमनाची नांदी दिली. गुरा-वासरांची धावाधाव सुरु झाली. पाखरे आभाळात किलबिल करीत मुक्त विहार करू लागली. नेहमीप्रमाणे अंगणात सडा टाकला. चूल पेटवून अंघोळीसाठी पाणी तापवत बसली. सूर्य चांगला कासराभर वर आला. सगळं आवरून घरातल्या कोपऱ्यात मांडलेल्या देव्हाऱ्यातून देव काढले. त्यांना अंघोळ घातली. देव्हाऱ्यातला आरतीचा दिवा शेजारीच पडलेल्या फडक्याने स्वच्छ केला. त्यात तेल घातले. फुलवात काढून त्यात टाकली आणि आगकाडी ओढून पेटवला. प्रकाशाची क्षीण थरथर भिंतीवरील तिच्या सावलीशी खेळत राहिली. दिव्याच्या थरथरत्या वातीकडे बराचवेळ बघत राहिली. ओंजळभर प्रकाशाने पसाभर परिसर उजळून टाकणाऱ्या वातीकडे बघताना तिच्या मनात भक्तीभाव दाटून यायचा. देव्हाऱ्यातला दिवा आजही तोच होता. प्रकाशही रोजच्यासारखाच. पण प्रसन्नतेचे दान पदरी टाकणाऱ्या दिव्याची वात आज सरुमायला मलूल वाटू लागली. परिसरात पसरलेला प्रकाश थकल्यासारखा भासत होता.

पांडूतात्या अंगणात खाट टाकून खोकत बसलेला. बिडीचे उरलेलं थोटूक हातात धरून उगीचच त्याच्याकडे पाहत होता. सरुमाय तात्यांकडे चालत आली आणि म्हणाली, “तात्या, आते मी घर कितलबी आवरी धराना प्रयत्न करा तरीबी उपयोग होवाव नाही! तुमीन एक काम करा, तुमना भावड्याले सांगीसन पोरस्ना काकाले आनी बळीराम अण्णाले बलावनं धाडा. यासना बिल्ला मोक्या करीसन मीबी सुटस रोजना कटकटमाई. वाटा करीसन मीभी सुटसू सगळा जंजाय मायीन. उंडारा कथाभी. मंग जे व्होवाव हुईन, ते होवो.”

तात्या तिच्या चेहऱ्याकडे नुसता पाहत राहिला. काय बोलावे काही सुचेना. कशीतरी शब्दांची जुळवाजुळव करीत सरुमायला समजावू लागला. म्हणाला, “असं कसं म्हनी राह्यनी माय तू? तू काय सांगी राह्यनी, तुले समजी राह्यनं का? होस थोडंसं आथं-तथं, म्हनीसन लगोलग काहीभी करानं का? चुकायनात पोरं, मान्य शे! पन पोरंच नं त्या. त्या नही चुकावतीन, तं कोन चुकाईन मंग. सुधरतीन, जाईन त्यासना राग. लागतीन आपापला कामले.”

तात्यांना थांबवत सरुमाय बोलली, “असं काही होवाना लक्षनं नही दिखी राह्यनात तात्या. त्या आणि त्यासन्या बायका काही कोनंच आईकाव नहीत. त्यासनापेक्षा त्या चुडेलीसलेच वाटा पाडानी ज्यास्ती पडेल शे. कवयं वाटा पडतीन आनी आपन रान्या बनसूत यानीच जल्दी लागेल शे तिसले. ते काही नही, तुमी मनं एवढं काम कराले सांगा भावड्याले फकस्त.”

तात्याचा नाईलाज झाला. त्यांनी मुलाला अंगणातूनच आवाज दिला. बोलावून सगळं सांगितलं. सरुमाय पुन्हा घराकडे वळती झाली. ओसरीच्या कोपऱ्यात पडलेल्या खाटेवर येऊन बसली. शेजारीच दोनही नातू खेळत होते. त्यांच्याकडे शून्य नजरेने पाहत राहिली. मोठ्या नातीने घरातून चहा आणून दिला. बशीत ओतून पिण्यासाठी घेतला, पण कोणीतरी गळा आवळून धरल्यासारखे वाटत होते. चहाचा घोट मोठ्या मुश्किलीने ती पोटात ढकलत होती.

दुपारीच नारायण काका आणि बळीराम अण्णा घरी आले. दोनही पोरांना समोर बसवून समजावून सांगितले. थोडे रागावले, दम भरला; पण काहीही उपयोग नव्हता. त्यांच्या डोक्यात वेगळं व्हायचं भूत स्वार झालेलं. बोलून फायदा नव्हताच. नाईलाज झाला. अखेर यांना बंधनातून मोकळे करा म्हणून सगळ्याचं मत झालं.

दिवस मावळतीला उतरू लागला. तिसऱ्या प्रहरी मंडळी घरच्या ओसरीवर बसलेली. तात्या, जिभाऊ, अण्णा सगळे जमले. एकेक करून घरातील भांडीकुंडी बाहेर येऊ लागली. सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या. सरुमाय कोपऱ्यात बसून खिन्न नजरेने पाहत होती. वर्षानुवर्षे जमा केलेला संसार विखरून पडलेला तिला बघवत नव्हता. कमलबाई, जानकाबाई तिला समजावत होत्या. नात्यातली, परिचयातली माणसे शांततेत वाटेहिस्से करा म्हणून सांगत होते. पण पोरांच्या डोळ्यांवर स्वार्थाच्या पट्ट्यांनी झापडबंद अंधार केलेला. हे सगळं समजून घ्यायला तयार होतेच कुठे. कोणालाच काही समजून घ्यायचं नव्हतं. एकेक वस्तूंवरून वाद सुरु झाले. कोणीही मागे सरकायला तयार नव्हतं. आपण काय करीत आहोत आणि कशासाठी याचं भान उरलंच नव्हतं.

मुलांचा मतलबीपणा म्हातारीला असह्य झाला. मनात सलणाऱ्या वेदना कोंडून धरणे अशक्य झालं. जमिनीतून लाव्हा उसळून वर यावा तसा म्हातारीचा संताप उसळून आला. थरथरत ती ओरडली, “आरे, नालायकसहोन जराशी जननी नही, तं मननी तरी लाज ठेवा रे! असा कसा औस ना पोटे कौंस जलमले उनात रे! जलमताच कसा नही मरणात. असाबी तुमना राहीसन फायदाच काय शे? आख्खी जिन्दगानीभर तुमनासाठे ढोरना मईक राबनू! ऊन देखं नही, पानी देखं नही. वारा-वावधन देखं नही. रातदिन हाडसना काडं करात. याच पांग फेडासाठे होतं का रे हाई समदं?”

म्हातारीच्या बोलण्याकडे ढुंकूनही न बघता पितळच्या मोठ्या पातेल्याकडे हात दाखवत तुकाराम त्याच्या बायकोला म्हणाला, “उचल वं हाई बघोनं. कोन आडावंस माले ते देखस!”

आधीच हातभट्टीची टाकून तर्र झालेला दिनू भडकला. मोठ्याच्या अंगावर धावून येत बोलला, “देखस नं मी! तू कसा काय बघोनाले हात लावस ते. तू हात लाई तं देख, तोडीच टाकस का नही तवयं बोलजो. सगळंच तुना बापनं शे का!” झोकांड्या खात त्याने बघोनं ओढून बाजूला ठेवलं.

माणसं अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली. पांडूतात्या समजावण्याचा प्रयत्न करू लागला. “अरे, कोनीतरी दुसरं भांडं ल्या ना! एक हाई ठेवा, दुसरानी ते ठेवा. थोडं आथं-तथं होयनं तं काय मरी जावव शेतस, का कंगाल हुई जावव शेतस तुम्हीन?”

तात्याला अडवत दिनकरची बायको बोलली, “तात्या, आमीन धाकला शेत, माहीत शे सगळी दुनियाले. पण मनी सासू कवयं आमले त्यासना समजनी. जवय देखो तवय भेदभाव करस. आमीन कोनीच नहीत का यासना? न्याय काय डोया मिटीसन बसेल शे. हाऊ अन्याव कोलेच कसा दिखत नही. तरीबी आमीच समदं आयकाले जोयजेल का?”

समोर बसलेली माणसे काय करावे या विवंचनेत. कोणीही कोणाला जुमानायला तयार नव्हते. आबा-बाबा करीत शेवटी कशीतरी समजूत काढून मोठ्याला शांत बसवले. त्यांच्या बोलण्याने तो थोडा वरमला. बायकोला काही बोलू नको म्हणून खुणेनेच सांगितलं. लहान्याच्या मनात हे सगळं पोहोचणं शक्य नव्हतं. तो ऐकण्याच्या पलीकडे कधीच पोहचला होता. मनात सगळा अंधारच असल्याने विचारांचा कवडसा दिसणे शक्य नव्हते.

कसेतरी करून वाटे हिस्से झाले. त्यांच्या बायका भांडीकुंडी उचलून वाट्याला आलेल्या घराच्या हिश्शात रचू लागल्या. ओसरीत अस्वस्थ शांतता पसरली. भांड्यांच्या आवाजाने सरुमायच्या मनाला वेदना होऊ लागल्या. तो आवाज तिला कासावीस करू लागला. सगळं बोलणंच संपलं. पर्याय थकले. मनातल्या अहंकाराने घराच्या मधोमध न दिसणारी, पण नात्यांच्या गहिरेपणाला वेगळं करणारी रेषा ओढली गेली कायमची. मध्यस्ती करायला आलेली माणसे घराकडे चालती झाली.

पांडूतात्या, नारायण काका आणि बळीराम अण्णा बराच वेळपर्यंत म्हातारीशी बोलत बसले. तिच्या मनातली वादळे आस्थेच्या शब्दांनी थांबवण्याचा प्रयत्न करीत राहिले.

सकाळपासून घरात चूल पेटलीच नव्हती. जेवणाचं काहीतरी बघावं म्हणून सरुमाय चुलीकडे वळली. इकडे-तिकडे विखरून पडलेल्या भांड्यांमधून बाजरीच्या पिठाचा डबा शोधू लागली. तेव्हाशी राधामायचा निरोप घेऊन पांडूतात्यांचा भावड्या आला. सगळ्यांना आपल्या सोबत जेवणासाठी घरी घेऊन गेला.

जेवणं करून सगळे ओसरीतच पडले. बराच वेळपर्यंत नारायण काका आणि बळीराम अण्णा बोलत होते. त्यांच्या बोलण्याकडे सरुमायचं लक्षच नव्हतं.

रात्रीचा हात धरून अंधार जमिनीवर हलक्या पावलांनी उतरू लागला. जसजसा अंधार गडद होऊ लागला. तसा सरुमायच्या मनाचा कोपरानकोपरा भीतीने भरून आला. राहून राहून तिचे डोळे भरून येत होते. पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांना काही दिसणे शक्यच नव्हते. तसेही तिच्यासाठी बघण्यासारखे उरलेच काय होते? भविष्याच्या वाटेवर दाटून आलेल्या अंधारात तिचं भरकटणारं आयुष्य हरवत होतं. घर, जमीनजुमला सारंसारं काही तुकडे होऊन विखुरलं. पोरांनी वाटून घेतलं... पण तिचं काय? कोण तिच्या उतार वयाच्या सरकत्या वर्षांना आपल्या वाट्याला घेणार होते?
सरुमायच्या डबडबलेल्या डोळ्यांतून उसळणाऱ्या लाटा किनाऱ्याकडे धावत होत्या, पण त्यांचा काठ हरवला होता.
***

Pathey | पाथेय

By // 2 comments:

शुभेच्छा... एक लहानसा शब्द. म्हटलं तर खूप मोठा आणि नाहीच मानलं, तर अगदी बिंदूएवढा. आस्थेने पाहिलं तर आभाळाएवढा; नाहीच असं बघता आलं तर अगदीच नगण्य, नजरेत न भरण्याएवढा. तरीही या शब्दाच्या असण्या-नसण्याला मर्यादांचे तीर धरून वाहणाऱ्या आयुष्यात अनेक आयाम असतात. ते असावेत की नाही, याबाबत कोणास काय वाटते माहीत नाही. पण कोणी कुणाला शुभेच्छा दिल्यात म्हणून प्रगतीची शिखरे एखाद्याला सत्वर संपादित करता येतात असं नाही. आणि नाही दिल्यात, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात फार काही क्रांतिकारक बदल घडतात असंही काही नसतं. आपल्याकडून काही देणं आणि कुणाकडून काही घेणं हे दैनंदिन व्यवहाराचं एक वर्तुळ असतं. अशी कुठलीतरी वर्तुळे माणूस आत्मीय समाधानासाठी शोधत असतो. म्हणून ती जगण्यात कोरून घेणे आवश्यक असतं का? आणि नाहीच आखून घेता आली अशी एखाद्याला, म्हणून जगण्याचे प्रवाह पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असंच सांगता येईल.

पण...

तरीही 'पण' हा शब्द उरतोच. या 'पण'मध्ये सकारात्मक, नकारात्मक भावनांचा किती कल्लोळ एकवटलेला असतो. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. अंतरीचे वणवे अंतरीच दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखण्यासाठी कसरत करायला लागते. जगण्याचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो. जगण्याचे सूर सापडले की, आयुष्याला सौंदर्याचे साज सहज चढवता येतात. सद्विचारांचे साज लेवून आयुष्याला देखणेपणाच्या कोंदणात अधिष्ठित करावे लागते. सौंदर्याचे ताटवे उभे करून निगुतीने सांभाळावे लागतात. आयुष्यात सकारात्मक विचारांना सांभाळता आले की, जगण्याला सजवणे सुगम होतं, एवढं मात्र नक्की.

संघर्ष माणसाच्या जगण्याचे आदिम अंग आहे. ती उपजत प्रेरणा असते. निसर्गाच्या अफाट पसाऱ्यात टिकून राहण्याचा प्रवास सुगम कधीच नव्हता आणि नसतो, म्हणून माणसाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता अनवरत नांदती असते. हे अस्वस्थ असणं जेवढं शाश्वत, तेवढंच सुखांचा शोध घेणं. संघर्षाचा प्रवास अक्षर असतो, तितकाच टिकून राहण्याचा कलहही अक्षय असतो. टिकून राहण्यासाठी प्रेरणांचे पाथेय सोबत असले की, जीवनावरची श्रद्धा अगणित आकांक्षांनी मोहरून येते. मोहर दीर्घकाळाचा सोबती नसतो, पण गंधाळलेपण घेऊन नांदतो, तेव्हा जगण्याचे श्वास आपल्याला आश्वस्त करीत राहतात. हे नांदणेच संस्कृतीचे संचित असते आणि ते अक्षय असणे माणसांच्या सांस्कृतिक जगण्याचे अंतिम प्रयोजनसुद्धा. तुमच्या जगण्यात, असण्यात, विचारांत, उक्तीत, कृतीत ही प्रयोजने अनवरत प्रवाहित राखण्याची अपेक्षा म्हणूनच समाज नावाचा किमान समान विचारांना सोबत घेऊन चालणारा घटक करीत असतो. अपेक्षांच्या वाटेने चालणे सुगम कधीच नसते. हे सुगमपण आयुष्यात नांदते ठेवण्यासाठी आपलेपणाने ओथंबलेला किमान एक शब्द तरी आपल्यासाठी असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि हे आपलेपण आयुष्याच्या ओंजळीत सामावून घेण्यासारखं दुसरं सुख इहतली नसतं.

म्हणूनच...

कोणी कोणाला शुभेच्छा दिल्या म्हणून वर्ष चांगलं जाईल आणि नाहीच दिल्या; म्हणून वाईट असेल असेही नाही. काळ त्याच्याच मस्तीत चालत असतो. म्हटलं तर वर्षांच्या वाटचालीत बदलत काहीच नसतं. बदलतात कॅलेंडरची पानं. दिसा-मासाचे पंख लावून गिरक्या घेत राहतात ती नुसती. गतीची चाके पायाला बांधून चालणाऱ्या अनेक वर्षांतील आणखी एका वर्षाने माणसांनी निर्धारित केलेल्या कालगणनेतून निरोप घेतलेला असतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या जिवांच्या आयुष्यातून एक वर्ष वजा झालेले असते. आणि काळाच्या गणतीत एकाने वाढलेले असते. खरंतर कमी होणे काय आणि वाढणे काय, हे सगळेच विभ्रम. आभास आणि आनंद यांच्या सीमारेषांवर कुठेतरी रेंगाळणारे. अनंत, अमर्याद, अफाट अवकाशात विहार करीत वर्षे येत राहतात आणि जातातही. त्यांचं येणं आणि जाणं माणसांना नवे नाही आणि प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधण्याचे प्रयत्नही फार अलीकडचे नाहीत. कालचक्राच्या अफाट पसाऱ्यातील वर्ष हा एक लहानसा तुकडा. असे किती तुकडे आपल्या आयुष्यात असतात? अगदी ओंजळभर! पण माणसे ते साकळत राहतात. हाती लागलेल्या चारदोन तुकड्यांना आनंदतीर्थ बनवण्यासाठी उगीच धडपडत राहतात. याचा अर्थ असा नाही की, माणसांनी आनंदाचे तुकडे वेचून आपल्या अंगणी आणण्यासाठी यातायात करू नये. पण सत्य हेही आहे की, तुमची इच्छा असो वा नसो, जे घडतं तेही अटळ असतं आणि नाही घडत तेही नियतीचं देणं असतं, आपण त्या बदलाचे फक्त साक्षीदार.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना जोडणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांच्या स्वागताला समोरं जावं कसं, याची नियोजने झाली असतील. प्रत्येकजण आपापल्यापरीने आनंद मिळवतील. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंध फेसाळ रात्रीला काहींची बेधुंध पाऊले थिरकतील. मध्यरात्री कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या थंड वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंधीत नवं वर्ष येईल आणि पुढे जाईल. अर्थात, सगळेच नववर्षाचं असं स्वागत करत असतील, असं नाही. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची छोटीशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठीही निघतील.

जगात वावरताना विसंगतीचा प्रत्यय पावलोपावली येतच असतो. म्हणून सगळं जगच विपर्यासाने भरले आहे असेही नसते. जगाचे दैनंदिन व्यवहार चौकटींच्या कठोर कुंपणात बंदिस्त केलेले असतात. त्यांना ध्वस्त करण्याचं बळ किती बाहूंमध्ये असतं. शोधलं तर प्रवाहाच्या विरोधात पोहणारी अशी मूठभरही माणसे हाती लागत नाहीत. म्हणून सामान्यांनी जगण्याशी भिडू नये, असंही नसतं. ज्यांच्या ललाटी नियतीने सुखांची रेखा अंकित केली असते, ते तरी पूर्ण समाधानी असतात का? रोजच्या जगण्याला भिडणारी माणसे योद्धेच असतात. भाकरीचा चंद्र सदनी आणण्यासाठी कष्टाचे पहाड उपसायला लागतात. सुखाच्या चांदण्या वेचून आणणे हा काही सहजसाध्य खेळ नसतो. खेळ खेळून बघताना जिंकण्या-हरण्याची क्षिती बाळगून आयुष्याचे तारू किनाऱ्यावर लागत नसते. वादळाच्या वंशजांना वादळाची मोट बांधून आणण्याची स्वप्ने येत असतात. तसेही अनेक वादळे झेलल्याशिवाय किनारे कोणाला गाठता आले?

माणसांच्या आयुष्यात समस्यांची कमी कधी होती? कधीच नाही! कालानुरूप त्यांची रूपे कदाचित वेगळी असतील इतकेच. पोटात खड्डा पाडणारी भूक माणसाला अस्वस्थ वणवण करायला भाग पाडते. आयुष्य पणाला लावणारा संघर्ष सार्वकालिक सत्य आहे. या पसाभर वर्तुळाचा शोध आयुष्यभर पुरतो. अनेकांची आयुष्ये वर्तुळाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपली. आजही यात फार मोठ्याप्रमाणात सुगमता आली आहे असे नाही. माझ्या वाट्याला जरा अधिक सुखे आली म्हणून जगाच्या विवंचना संपल्या असा अर्थ होत नाही. पण मी याचा विचार किती करतो? अर्थात, हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडून देता येईलही, पण बराच मोठा समूह विवंचनेच्या वर्तुळात गरगरतोय, हे विसरणे आपल्या अंतस्थ अधिवास करणाऱ्या नैतिक विचारांचा अधिक्षेप नाही का? कुणास वाटेल, जगाच्या विवंचना, प्रश्न कधी नव्हते? काल अधिक होते, आज प्रखर आहेत आणि उद्या तीव्र असतील कदाचित. संपतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. कुणाला वाटेल, कुठल्यातरी अनभिज्ञ विवंचनांचा विचार करत कुणाचातरी येणारा उद्या सजवण्यासाठी आमचा आज का म्हणून वाया घालवायचा? आम्हाला आनंदतीर्थी नेणारी वाट गवसली असेल, तर का म्हणून वेदनांच्या वस्त्यांकडे वळायचे? तात्विकदृष्ट्या असा युक्तिवाद कितीही समर्पक असला, तरी तो संयुक्तिक असेल असे नाही. एक समूह समस्यांशी संघर्ष करतांना पिचतो आहे आणि आम्ही सुखांच्या शिखरांवर पोचण्याच्या मनीषेने पळतो आहोत. याला विपर्यास नाही तर आणखी काय म्हणता येईल?

आनंद साजरा करण्याचं भाग्य इहतलावरील साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेले नसते. जाणाऱ्या आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा हजारो माणसं अशीही असतील, जी अर्धपोटी, उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी भाकरीची स्वप्ने पाहत असतील. कदाचित आपल्याला ती दिसत नसतील किंवा आनंदाच्या शिखरावर विहार करीत असल्याने आपण त्यांच्याकडे पाहिले नसेल. शेकडो आदिवासी डोंगरदऱ्यात, रानावनात आपल्या मूठभर जगण्याचा शोध घेत भटकत असतील. भटके विमुक्त आपापली पालं घेऊन व्यवस्थेच्या चौकटीत आपलं हरवलेलं अस्तित्व शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात उद्याची सुखं शोधत असेल. हक्काच्या शिक्षणाचा कायदा असूनही शाळेत शिकून जगण्याची कोणतीही स्वप्न पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून लहान, लहान हात कचऱ्याच्या कुंडीत जगण्याचे वास्तव कुणीतरी फेकलेल्या उष्ट्यात शोधत असतील. नियतीने, परिस्थितीने पदरी घातलेलं जगणं सगळंच काही आखीव चौकटींमध्ये बसवता येत नसलं, तरीही मनात एक आस असतेच, निदान यावर्षात तरी आहे त्यापेक्षा अधिक समाधान माझ्या अंगणी नांदावे.

माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, हे खरेच. पण ते साजरे कसे व्हावेत, याची काही परिमाणेही असतात. मर्यादांची कुंपणे असतात. समाजाचे वर्तन व्यवहार सुरळीत मार्गस्थ व्हावेत, म्हणून अनेक वर्षांच्या अनुभवातून संकलित केलेलं हे संचित असतं. अर्थात, ही बंधने ऐच्छिक असली तरी त्यांत स्वतःला बांधून घ्यायचं की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोंदणात अधिष्ठित झालेला हिरा अधिक सुंदर दिसतो. पण सांप्रत अशा गोष्टींना महत्त्व न देण्याइतपत विचारांत शुष्कपण येत आहे. ताटव्यात फुललेल्या फुलांचा बहर जेवढा देखणा असतो, तेवढाच कोमलही. असं देखणंपण त्याच्या सौंदर्यासह जपता यायला हवं. उच्छृंखलपणा जगण्याची गुणवत्ता उतरणीला लावतो. हाती साधने आहेत म्हणून त्यांचा बाजार मांडणे कितपत रास्त असते? नजरेचा थोडा कोन बदलून आसपास पाहिलं तरी कळेल, जगाचा चेहरा आनंदापेक्षा चिंतेचाच अधिक आहे. मान्य आहे, जगाचे सगळेच चेहरे मला प्रमुदित करता येणार नाहीत. पण चिंताग्रस्त चेहऱ्यावरची एक रेघ मिटवता आली तरी खूप आहे. त्यासाठी फार मोठा अलौकिक त्याग वगैरे करायची आवश्यकता नाही. आपल्या अंगणभर पसरलेल्या उजेडातला कोरभर कवडसा अंधारल्या जगात पोहचवता आला तरी खूप आहे. आपल्या चांदण्यातला चतकोर तुकडा वेगळा करता येतो त्याला जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. त्यांचं जगणंच चांदणं झालेलं असतं.

हा सुखाचा पांढरा आणि दुःखाचा काळा अशा रंगात जगण्याला विभागता नाही येत. काळा आणि पांढरा या दोघांच्या संयोगाने जो ग्रे शेड असणारा रंग तयार होतो, तोच शाश्वत असतो. बाकी सगळं आभासाच्या झुल्यांवर हिंदोळे घेणं. या रंगाच्या डावी-उजवीकडे थोडं इकडेतिकडे सरकताना हाती ज्या छटा लागतात, त्याच आयुष्याचे खरे रंग असतात. बाकी फक्त झगमग. तिलाही सार्वकालिक चमक असेलच असे नाही. किंबहुना ती तशी नसतेच. म्हणूनच 'जगी सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे' असा प्रश्न मनाला रामदासांनी विचारला असेल का? तसेही आयुष्य काही फुलपाखराचे रंग लेऊन विहार करीत नसते. त्यात संगतीपेक्षा विसंगतीच अधिक असते. उपेक्षा, विवंचना, समस्यांना कमतरता कधीच नसते. म्हणून सुखांची आस असू नये, असं कुठे असतं. सुखांचा सोस असणे वेगळे आणि पावलापुरता प्रकाश शोधत अंधारलेल्या कोपऱ्यात उजेडाचं चांदणं आणण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, त्याहून वेगळे असते आणि हे वेगळेपण जपणारी माणसेच काळाची खरी ओळख असतात. अशा माणसांची धडपड म्हणूनच आस्थेचा विषय असते. काळाच्या पालखीला खांदा देणारी माणसे समाजजीवनाचे संचित असतात. प्रेरणा असतात, जगावं कसं, हे समजून घेण्यासाठी.