उगवून यावं नव्याने...

By
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२५ अंक बदलून त्याजागी २०२६ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक लहानसा तुकडा- जो गणनेच्या सुविधेसाठी कोरून घेतलाय, तो संपेल. क्षणाला लागून आलेल्या क्षणाच्या कुशीतून नव्या क्षणांचे आगमन होईल. तोही पुढच्या क्षणाला जुना होईल. काळ आपल्याच नादात आणखी काही पावले पुढे निघून गेलेला असेल. त्याला आठवताना स्मृतिरुपात असणारे संदर्भ तेवढे समोर येत राहतील. 

भविष्याच्या पटलाआड दडलेल्या आनंदाची नक्षत्रे वेचून आणण्याच्या कांक्षेतून काहींनी संकल्पित सुखाचें साचे कोरून घेतलेले असतील. ते हाती लागावेत म्हणून काही आराखडे आखून घेतले असतील. त्यांच्या पूर्तीसाठी शोधली जातील काही आवश्यक कारणे. काही अनावश्यक संदर्भ. घेतला जाईल धांडोळा निमित्तांचा.

माणूस उत्सवप्रिय असल्याने सणवार साजरे करण्यासाठी कोणतीतरी निमित्ते पहातच असतो. तेवढेच आनंदाचे चार कवडसे आयुष्याच्या जमा खाती असण्याचे समाधान. खरं तर, समाधान शब्दही तसा समाधानकारक नाही. कधीही समाधान न देणारी आयुष्यातील एकमेव गोष्ट म्हणजे, समाधान. अर्थात, हे अवगत असूनही समाधान नावाच्या ठिकाणाचा माणूस शोध घेतोच आहे. समाधानाच्या परिभाषाही प्रवासाच्या प्रत्येक पडावावर पालटत राहिल्या आहेत अन् मिळवण्याच्या पद्धतीही विचलित होत राहिल्या आहेत.

कालपटावरील ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी बिंदूना सांधणाऱ्या रेषेवरच्या क्षणांत समाधान संपादनाचे प्रयोजन माणसांनी पाहिले. अर्थात, हे काही नवं आहे असं नाही. नव्यावर्षाच्या स्वागताला समोर जावं कसं, याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. काहींनी स्वतःच स्वतःकरिता तयार केलेली सूत्रे समोर घेऊन समीकरणे सोडवायची नियोजने केली असतील. आपआपल्या वकुबानुसार आनंद शोधत राहतील माणसे. कुणी काय करावं सांगणं अवघड. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंद फेसाळ रात्रीला काहींची बेधुंद पाऊले थिरकतील. कुठे मध्यरात्री बाराच्या ठोक्याला कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंदीतून काही शोधतील नव्या वर्षाचे अर्थ. अर्थात, सगळेच काही असं करत असतील, असं नाही. नसतंही तसं. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची पणती हाती घेवून अंधारल्या वाटा पावलापुरत्या का असेनात, उजळून टाकण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता मार्गस्थ झालेले असतील.

निमित्ताचे धागे धरून येणारा आनंद साजरा करण्याचं भाग्य साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेलं नसतं. नववर्षाचं स्वागत हजारो माणसं करत असतील, तेव्हा शेकडो माणसं अर्धपोटी- उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी हव्या असणाऱ्या भाकरीचं स्वप्न सोबत घेऊन निद्रेची आराधना करत असतील. आयुष्यातील सरलेलं वर्ष भाकरीच्या शोधात संपलं. निदान येणारं वर्ष भाकरीच्या विवंचना सोबत घेऊन अंगणात उभे राहू नये, याची कामना करत असतील. कुणी कुठेतरी डोंगरदऱ्यात, रानावनात जगणं आशयघन करणाऱ्या वाटांचा माग काढत भटकत असतील. भटके आयुष्य अन् फाटके जगणं दिमतीला घेऊन कितीतरी जीव पुढ्यात पसरलेल्या चौकटीत पोटापुरती भाकर आणि निवाऱ्यापुरतं आखर शोधत असतील. प्रश्नांच्या आवर्तात अडकलेला प्रपंच नेटका करावा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतात पेरलेल्या पिकात सुखांच्या सूत्रांचा कुणी धांडोळा घेत असतील. 

जगण्याच्या वाटा हाती देणारी उत्तरे शाळेत शिकवलेल्या पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून कचऱ्याच्या कुंडीत किती कोवळे हात आयुष्याचे अर्थ शोधत असतील. घागरी डोईवर घेऊन वणवण फिरणाऱ्या वाडीवस्तीवरील बायाबापड्या पाण्याचा ओंजळभर पाझर पाहत असतील. शिक्षण नावाच्या वर्तुळातून व्यवस्थित पार पडलेला, पण पदवी हाती असूनही व्यवस्थेने पुढ्यात पेरलेली परीक्षा प्रयत्न करूनही पार करू न शकलेला सुशिक्षित बेरोजगार जगण्याच्या परीक्षेत खरंच आपण नापास आहोत का, या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल. 

कालचक्राच्या गतीत अशी कितीतरी आयुष्ये गरगर फिरत असतील. काळाचे किनारे धरून प्रगतीचे पर्याय पहात अनामिक आशा घेऊन पुढे सरकत असतील. परिस्थितीचा पायबंद पडून काही अभाग्यांच्या आयुष्याचे अर्थ हरवले असतील. कितीतरी जीव शक्यतांचा परिघात स्वतःला शोधत असतील. आयुष्याला अर्थ देणाऱ्या संदर्भांचा धांडोळा घेऊनही फारसं काही हाती लागत नसल्याने हताशेच्या प्रतलावरून प्रवास करताना क्षीणशा कवडशांची कामना करत असतील. 

जाणारं आणि येणारं वर्ष वार, महिन्यांच्या हिशोबाने सारखंच असलं, तरी काहींच्या वाट्याला त्याने आणलेल्या आकड्यांचे हिशोबच जुळत नाहीत. काहींसाठी सुखाच्या पायघड्या घालत येतं ते अन् काहींच्या पुढ्यात दुःखाच्या ओंजळी घेऊन उभं राहतं. हे असं का असावं? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं अशक्य नसलं, तरी बऱ्यापैकी अवघड आहे. कुणी म्हणतील, शेवटी ज्याचं त्याचं प्राक्तन. मग हेच जर दैव असेल, तर काहींच्याच वाट्यास का? हा पंक्तीभेत नियतीने तरी का करावा? देव, दैव  वगैरे काही असेल तर त्यानं माणसा-माणसांमध्ये अंतर का राहू द्यावं? 

अर्थात, काही प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी काळाचे कोपरे कोरावे लागतात. प्रत्येकाला, प्रत्येकवेळी ते साधेलच असं नाही. तरीही आशेचा एक अंकुर अंतरी असतोच. फक्त तो बहरून येण्याची परिस्थिती पुढ्यात असावी. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षेचा प्रवास कुणाचा कसा असेल सांगणं अवघड असलं, तरी जात्या वर्षाला विसंगतीची वर्तुळे नसतील मिटवता आली, निदान येणाऱ्या वर्षात संगतीची सूत्रे सापडावीत. कोरभर प्रकाश घेऊन त्याने दारी दस्तक द्यावी. वंचितांच्या, उपेक्षितांच्या, अपेक्षितांच्या अंगणी पळभर पडाव टाकावा. त्यांच्या उसवलेल्या जगण्यात ओंजळभर चांदणं पेरून कोरडं अंगण उजळून टाकावं. अशी कामना करायला काय हरकत असावी? नाहीतरी माणूस आशावादी आहेच ना! 

चंद्रकांत चव्हाण  
**

0 comments:

Post a Comment