ही वाट दूर जाते...

By

जगण्याच्या स्वाभाविक गरजपूर्तीसाठी कुठल्याशा भूप्रदेशावर चालते झालेले माणसाचे पहिले पाऊल इहतलावरील वाटांच्या निर्मितीचे कारण असेल का? की त्याच्याआधी कुठल्या जिवांनी जगण्याच्या सहजप्रेरणेतून केलेल्या यातायातमधून त्या आकारास आल्या असतील? की कसल्याशा कारणाने कोरल्या गेलेल्या ठश्यांचा माग काढत केलेल्या प्रवासाचा तो परिपाक असेल? की त्यांच्या निर्मितीमागे आणखी काही कारणे असतील? असेलही तसे कदाचित किंवा नसेलही...! कुठलंतरी एकच एक कारण या सगळ्यासाठी कारण ठरलं हे सांगणं बऱ्यापैकी अवघड आहे. कारणे काहीही असोत, पण वाटेचे वय माणसांच्या धरतीवरील वास्तव्याइतकंच किंवा त्याहून अधिक पुरातन आहे, एवढं मात्र नक्की. 

निसर्गाने म्हणा, नियतीने म्हणा किंवा आणखी काही. जगण्याच्या स्वाभाविक आवश्यकतेतून निर्धारित केलेल्या मार्गाने निघणाऱ्या माणसांच्या पावलांनी केलेल्या प्रवासाचा आरंभ वाटांच्या निर्मितीचे प्रयोजन ठरले असावे. 

नजरेत साठलेल्या अन् मनात गोठलेल्या क्षितिजांपर्यंत पोहचण्यासाठी पायाखाली पडलेल्या जमिनीच्या तुकड्याची संगत करीत माणसे मार्गस्थ झाली. पुढे पडत्या पावलांनी मातीच्या कपाळी कोरलेल्या आकृत्या मागे येणाऱ्यासाठी पथदर्शक झाल्या अन् त्याच्या असण्याला निर्णायक दिशा देण्याचे कारण ठरल्या, असं म्हणणं काल्पनिक असेलही कदाचित, पण अतिशयोक्त आहे असं नाही.

चालत्या पावलांना घडणारी वाटांची सोबत केवळ अनभिज्ञ प्रदेशात नेणारा रस्ता नसतात, तर कारणासह अथवा कारणाशिवाय मनात उदित होणाऱ्या अनेक आकांक्षांना मुखरित करणाऱ्या अन् मुक्कामाच्या पडावावर पोहोचवण्याच्या माध्यम असतात. खरंतर वाट हा एक लहानसाच शब्द, पण अर्थाच्या अनेक आयामांना सोबत करणारा. मनोविश्वात साकारणाऱ्या प्रतिमांना प्रत्यक्षात आणण्यासाठी दूरवरच्या परगण्यात नेण्यास कारण असणाऱ्या, तशा आपल्यांना जवळ आणणाऱ्यासुद्धा वाटाच. वाटेची संगत करीतच माणूस जीवनप्रवासाची अडनीड वळणे अन् आयुष्याचे पडाव पार करीत चालतो आहे. त्याच्या चालण्याला विराम नाही अन् नसेलही.

वाटा केवळ वळत्या पावलांना दिशा देण्याचे साधन नसतात, तर जगण्याच्या प्रयोजनांना मोहरलेपण देणाऱ्याही असतात. अज्ञात प्रदेशांना जोडणाऱ्या वाटेवरचा प्रवास गरजांचा शोध असतो. कदाचित तात्कालिक प्रयोजनांचा तो परिपाक असेल अथवा अन्य. अर्थपूर्ण जगण्याची इच्छा माणसाच्या मनात कायमच वसतीला असते. अशाच कोणत्यातरी कांक्षांच्या पूर्तीकरिता परिस्थितीने निर्धारित केलेल्या वाटा निवडून वर्तावे लागते. 

‘पोटासाठी दाही दिशा का हिंडविशी आम्हा जगदीशा’, असे म्हणतात. कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपसित माणसे हवे असणारे काही शोधत राहतात. देशांतर घडून ज्ञात-अज्ञात परगण्यात पोहचतात, ते कोणत्यातरी वाटांची सोबत करीतच. गरजेतून हे घडत असेलही. चालत्या वाटा अपेक्षांचे नवे क्षितिज त्याच्या नजरेत  पेरतात. पुढे पडते पाऊल प्राक्तनाचे संदर्भ पालटते. चालण्याला विकल्प नसतो म्हणूनच ‘थांबला तो संपला’ म्हणत असावेत. 

भटकंती जिवांची सहजवृत्ती असल्याने चालणे घडतच आले आहे. त्याला काळाचा कोणताही तुकडा अथवा कोपरा अपवाद नाही. जगातल्या कुठल्याशा प्रदेशात जन्माला आलेला माणूस नावाचा जीव उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने मार्गस्थ झाला. त्याच्या चालत्या पावलांनी खंड व्यापले. पोहचला तेथे काहीकाळ विसावला. काही तेथेच रमले. काही रंगले. काही स्थिरावले. पण याहून आणखी काही हवं असणाऱ्यांना अपेक्षित असे काही हाती न लागल्याने त्यांची पावले पुढच्या पडावाच्या वाटेने वळती झाली. 

कालसंगत मार्गाने वर्तताना यथावकाश प्रगती घडत गेली आणि भटकंतीला विसावा मिळाला. अपेक्षांच्या गगनाला निवाऱ्यासाठी सदन मिळाले. ओंजळभर का असेना, पण संपादित केलेल्या प्रगतीचे पंख लेऊन हाती लागलेलं जगणं सुखावह झालं अन् अस्वस्थ वणवण सोबत घेऊन चालणाऱ्या वाटाही विसावल्या. म्हणून थांबल्या असं नाही. कधी प्रासंगिक प्रयोजनांनी, कधी प्रस्तुत-अप्रस्तुत कारणांनी असेल, कधी गरजांच्या पूर्तीकरिता असेल, पण प्रवास घडतोच आहे. वाटा जगण्याची सोबत करीत आहेतच.

चुकलेल्या वाटांमुळे अनेकांची वाट लागली, तसं पावलांना अपेक्षित पथ गवसल्याने अनेकांचं असणं वाटी लागलं, ते वाटांमुळेच. म्हणूनच असेल की काय, जिवांच्या जगण्यातलं वाटेचं वर्चस्व तसूभरही कमी झालं नाही अन् तसं होण्याची सुतराम शक्यताही नाही.

अंगावरील पाऊलखुणा मिरवीत नागमोडी वळणे घेत पुढे पळणाऱ्या पाऊलवाटेपासून चकचकीत देहकांती धारण करून धावणाऱ्या महामार्ग, द्रुतगतीमार्गांपर्यंत प्रत्येक वाटेचं अंगभूत सौंदर्य असतं. लाभलेल्या वैभवाचा साज चढवून त्या चालत असतात. वेड्यावाकड्या वळणांची सोबत करीत धरतीवर सांडलेल्या क्षितिजाला कवेत घेण्यासाठी अनवरत पळत असतात. 

‘पाणंद’ नाव धारण करून माणसांच्या वसतीतून हलकेच बाहेर पडणाऱ्या पाऊलवाटेचा नखराच न्यारा. आपला शिडशिडीत देह अन् अंगकांतीला मिरवीत ती चालत राहते. हिरवाई पांघरून डोलणाऱ्या पिकांची सोबत करीत झोकदार वळणे घेत अलगद पुढे सरकणाऱ्या वाटा अलवार बनतात. नवथर मुलीसारख्या लचकत, मुरडत चालतात. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरींनी भिजलेल्या वाटा सचैल स्नान करून आनंदतात, सुस्नात लावण्यवतीसारख्या. आपणच आपलं भिजून चिंब झालेलं रूप पाहून आपल्यावरच अनुरक्त होतात. कोण्या सौंदर्यवतीने दर्पणासमोर उभं राहून स्वतःला निरखीत आपणच आपल्याशी हसावे तशा.

वाटेच्या दोन्ही हातांना धरून चालणाऱ्या शेतांतून तारुण्याचा मुग्ध साज चढलेल्या पिकांचा सरमिसळ गंध रानावनाच्या मनात आमोद निर्माण करीत असतो. लुसलुसणाऱ्या गवताच्या गालिच्यावरून अंथरलेल्या वाटांचा हिरवागार रंग मनात साकळलेल्या रंगांना गहिरेपणाची डूब देत राहतो. रिमझिमणाऱ्या पावसाने ओलावून निसरड्या झालेल्या वाटा आरस्पानी सौंदर्याने नटतात. मातीला मुलायमपणाचा स्पर्श घडून पावलांना बिलगणारे लोण्याचे गोळे गंधगार संवेदना बनून प्रकटतात. 

चाकोऱ्या अंगावर गोंदून वेडीवाकडी वळणे घेत वाट विस्तारत जाते. धावणाऱ्या चाकांचा आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद आनंदाचं गाणं बनून पुढे पळणाऱ्या वाटेला तरल भावनांचे सूर देतो. पावसात चिखल बनून लदबदलेल्या वाटा अंगावर ऊन झेलीत दिसामासाचा हात पकडून धावण्याच्या नादात कणाकणाने अन् क्षणाक्षणाने शुष्क होत जातात आणि उन्हाळ्यात कोरड्याठाक होतात. त्यावरील देखणे हिरवेपण हळूहळू हरवत जाते. हिरवाई हरवलेलं रूप आठवताना उदासपण सोबत घेऊन आळसावलेल्या अंगाने पहुडलेल्या असतात. कोण्या चालत्या पावलांच्या आवाजाने जाग येऊन अंगावरील धूळ झटकीत हरवलेला आनंद उगीच शोधत राहतात. गावातून माळावर चरण्यासाठी जाणाऱ्या गुरावासरांच्या पावलांच्या नक्षीचे गोंदण करून सजतात वाटा. सूर्य मावळतीकडे कलतांना घरच्या ओढीने परतणाऱ्या गुराढोरांच्या पावलांनी उडणारा धुळीचा गुलाल पश्चिम क्षितिजावर पडदा धरताना वाटा रंगवेड्या होतात. धुळीचा पदर पकडून आभाळाला पकडू पाहतात.

वाटा कोरभर कोटरात सुरक्षित आणून पोहोचवणाऱ्या, तशा घर नावाच्या वर्तुळापासून विलग करणाऱ्या. मनी विलसणाऱ्या हिरव्या स्वप्नांना अंकुरित करण्यासाठी शेत-मळ्यात नेऊन सोडणाऱ्या, तशा कोरड्याठाक वावराकडे बघून विकल होणाऱ्या. रोजच्या राबत्याने सरावाच्या झाल्यामुळे घरी आणणाऱ्या, तशा कधी कुठल्याशा कारणाने भूल पडून भटकवणाऱ्याही. जगण्याला सतत सोबत करीत चालणाऱ्या, म्हणून कधी अति परिचयात अवज्ञा होऊन गृहीत धरल्याही जाणाऱ्या. कधी प्रयासांचे कातळ कोरून आकाराला आलेल्या. कधी कल्पनेचे कोपरे पकडून प्रवास घडवून आणणाऱ्या. 

पुढ्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाटा माणसांना अनोळखी प्रदेशात नेऊन सोडतात अन् आश्वस्तही करतात. मदतीची प्रासंगिक सोबत करीत कधी मुक्कामाचं ठिकाण गाठतात, तर कधी नाठाळ पोरासारख्या खट्याळ होतात. कधी भरकटत ठेवण्यात आनंदणाऱ्या, तर कधी चालत्या मार्गावरच्या त्याच वर्तुळावर आणून उभे करणाऱ्या. अशावेळी मनातल्या मनात चरफडून स्वतःला दोष देण्याशिवाय चुकलेला वाटसरू आणखी करू शकतो तरी काय? 

चालत्या वाटा अनपेक्षितपणे एखाद्या निबिड रानात हरवतात. त्यांची सोबत करीत चालणारा कोणी जीव त्या जाळ्यात अलगद अडकतो. समोर सगळं दिसत असूनही काहीच समजत नसल्याने वाटा सैरभैर होतात. कधी यातून बाहेर पडेन असं वाटायला लागतं. पुढ्यात पडलेला एकेक क्षण युगाएवढा होत जातो. मन कासावीस करणाऱ्या वाटा अशावेळी नकोशा होतात. पण मन अन् मती थाऱ्यावर ठेवून त्यांचा माग काढीत नेमक्या दिशेने निघाले की, मार्गीही त्याच लावतात. 

एकट्याने चालताना नीरस वाटणाऱ्या वाटा प्रियजनांची सोबत असताना हव्याहव्याशा होतात. कालपटाचा पडदा दूर सारून भविष्य वेचून आणण्याची स्वप्ने पाहत हातात हात घेऊन चालणाऱ्या प्रेमी जिवांना सतत समीप असणाऱ्या सोज्वळ सखीसारख्या वाटतात. कोण्या सासुरवाशिणीला माहेरच्या वाटेची हुरहूर लागते. सणवाराला घ्यायला येणाऱ्या भावाच्या पावलांकडे तिचे डोळे लागलेले असतात. त्याला घेऊन येणाऱ्या वाटेशी ती गुज करीत राहते. माहेरची वाट तिच्या हळव्या मनात ममतेचे मोरपीस बनून बसते. निरोप घेऊन दूरदेशी जाणाऱ्या लेकराला गावाच्या वेशीवर सोडायला आलेल्या मातेच्या नेत्रातून झरणाऱ्या पाण्यासोबत त्या हेलावतात. 

आषाढीला विठ्ठलाच्या ओढीने पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांसह वाटाही भक्तिरंगात रंगतात. गावालगतच्या टेकडीवरील देवालयाकडे वळतांना लीन होतात. यात्रा जत्रेच्या निमित्ताने गावाकडे येणाऱ्या वाटा आनंद घेऊन वाहत राहतात अखंड. भाकरीचं वर्तुळ हाती लागावं म्हणून गाव नावाचं गारुड पार करून गेलेली पावले चार दिवसासाठी का असेनात, पण त्यांना परतताना पाहून वाटा अंतरी सुखावतात. गावपरिघाला वेढून असणाऱ्या लहानमोठ्या आनंदक्षणांच्या साक्षीदार होताना वेडावतात.

गावात शिकायची व्यवस्था नसल्याने शेजारच्या गावातील शाळेकडे शिकण्यासाठी नेणारी वाट आयुष्याला नेमकं वळण देणारी असते. भल्याबुऱ्या अनुभवांची शिदोरी हाती देताना जीवनाचे शिक्षण देणारी गुरु होते. खोड्या करीत, हसत-खिदळत-खेळत शाळेत जाणारी मुले, त्यांची लहानमोठी भांडणे, मारामाऱ्या अन् पुढच्या पळी होणारे समेट पाहून ‘लहानपण देगा देवा’ म्हणण्याचा अनावर मोह त्यांनाही होत असेल. 

वनराईने बहरलेल्या वाटांवरून येणाऱ्या रानगंधाची सोबत मनाला संमोहित करीत राहते. माळावरून जाणाऱ्या वाटा हिरव्यापिवळ्या गवतपात्यांशी गुज करीत राहतात. कधी वाळवंटात पसरलेल्या वाळूच्या पसाऱ्यातून पळत राहतात. कधी चिखलगाळातून मार्ग शोधत राहतात. कधी रखरखत्या उन्हात झाडांच्या गर्दीतून सावली बनून येतात. कधी चढण बनून दमछाक करणाऱ्या, तर कधी उतरण बनून घरंगळत खाली जाणाऱ्या. कधी काट्याकुट्यांचे टोकं बनून रक्ताळलेल्या जखमा देणाऱ्या. कधी डोंगर सुळक्यावरील दगडधोंडे आणून अडथळे होणाऱ्या. 

उन्हाच्या तापात भाजून काढणाऱ्या, तशा हिवाळ्यातील बोचऱ्या वाऱ्याचा थंडगार स्पर्श बनून बहरणाऱ्याही होतात. कधी झडीच्या पावसाने चिंब चिंब भिजत कुडकुडत राहतात. वाटा ऋतूंच्या वळत्या वाटेला प्रतिसाद देतात. त्यांचा हात धरून सोबत पळत राहतात. पानगळीच्या मोसमाला सहजपणे झेलतात, तशा वसंताच्या संजीवक स्पर्शाने पुलकित होऊन पानाफुलांच्या पायघड्या अंथरून स्वागतही करीत राहतात.

चोरांच्या वाटा चोरांना ठाऊक असतात, असे म्हणतात. या वाटा मात्र माणसांच्या राबत्यापासून काहीशा अलग अलग राहणाऱ्या. कोणाच्या पदचिन्हांचे ठसे जेथे सहसा कोरले जात नाहीत अशा एकाकी. कदाचित जगण्याच्या दैनंदिन व्यवहाराच्या गणिताची उत्तरे त्या दिशेने मिळण्याची संभावना नसल्यामुळे अलिप्त असणाऱ्या, म्हणूनच शर्विलकांना सुरक्षेचे कवच पुरवणाऱ्या. तर दुसरीकडे माणसांच्या सततच्या गजबजाटाने गोंधळलेल्या. कुठल्याशा निमित्ताने हजारो पावलांना आपल्या अंगाखांद्यावर घेऊन गोंधळगीत गाणाऱ्या. स्वरांचा साज चढवून जगण्याला आनंदाचे सूर देणाऱ्याही  वाटाच. 

डोंगरकड्यांच्या कडेवर विसावलेल्या मंदिराकडे भक्तिभावाने अलगद ओढून नेणाऱ्या, तशा अडनिड घाटवळणे पार करीत जीव मुठीत घेऊन चालायला लावणाऱ्याही वाटाच. निसर्गाच्या नवनवोन्मेषशाली आविष्कारांनी नटून नितळ सौंदर्याची पखरण करीत वाटा डोंगरदऱ्यांच्या कुशीत हलकेच शिरतात. झाडाफुलापानांचा सुंदर संभार अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवीत वाटा देखणेपणाची परिभाषा परिसराच्या पदरी पेरतात. सौंदर्याची नवी परिमाणे काळ्या कातळावर कोरतात. प्रसन्नतेचा परिमल मुक्तपणे उधळीत राहतात. कुण्या रुपगर्वितेच्या तोऱ्यात आपणच आपल्याला मिरवीत राहतात. सुंदरतेला साद द्यायला अन् मोहात पडायलाही कारण वाटाच. वाटा वाऱ्यासोबत शिळ घालीत गाणे गात राहतात, तर कधी झऱ्यासोबत झुळझुळ वाहत राहतात.

वाटांना केवळ भूगोलच नसतो. त्यांच्यासोबत इतिहाससुद्धा डौलाने चालत असतो. सह्याद्रीच्या विशालकाय देहावर विसावलेल्या वाटा कडेकपारीतून मुक्त संचार करणाऱ्या मावळ्यांना अंगाखांद्यावर खेळवताना आश्वस्त करीत राहिल्या. तशा शत्रूला चकवा देताना मदतीलाही धावून आल्या. दऱ्याखोऱ्यातून पळणाऱ्या अनेक वाटा-आडवाटांनी राज्याच्या रक्षणकर्त्यांचे रक्षण केले. कधी घाटात कोंडी करून गनिमाला ठोकून काढणाऱ्या झाल्या, कधी प्रतिपक्षाची दाणादाण उडवून पळता भुई थोडी करत्या झाल्या.

जगाचा भूगोल ज्ञात असणाऱ्यांनी पृथ्वीगोल पालथा घातला. त्यांच्या पावलांना सोबत करीत वाटा विस्तारत गेल्या अन् इतिहासात लेखांकित घटनांच्या साक्षीदारही झाल्या. खुष्कीचा मार्ग अवरुद्ध करून आटोमन तुर्कांनी युरोपियनांचे श्वास कोंडले. त्यांची सगळीकडून कोंडी झाली. त्यातून मुक्त होण्यासाठी अन्य पर्यायी पथ पायी लागतात का, हे तपासून पाहणे आवश्यक होते. तिकडे नेणारे विकल्प हाती लागावेत म्हणून वणवण करणाऱ्यांच्या शोधयात्रेला कारण वाटाच झाल्या. 

बिकट वाट वहिवाट नसावी, असं म्हणतात. माणसांच्या जगण्याच्या वाटा सहज, सुगम, सुरळीत असाव्यात, ही अपेक्षा सार्वकालिक आहे. पण माणूस समजतो तेवढ्या कधीही सहजसाध्य नसतात त्या. सहज नसल्याने त्यांचं अप्रूप अधिक, म्हणूनच अज्ञात प्रदेशांची माणसांच्या मनावर मोहिनी पडत आली आहे. 

ध्येयानुरक्त मनातील साहस अवघड वाटा निवडण्यास वेड्यापिरांना नेहमीच प्रेरित करीत आले आहे. ध्यासपंथे चालणाऱ्या अशाच काही ध्येयवेड्यांना निबिड अरण्यात नेऊन सोडणाऱ्या वाटा कुठल्यातरी धाडसाच्या साक्षीदार झाल्या. नायजर, नाईल, कांगोच्या खोऱ्यातील गूढरम्य प्रदेशात काय असेल? या प्रश्नाच्या उत्तरांच्या शोधापायी माणसे या प्रदेशांकडे नेणाऱ्या वाटांनी वळली. तिकडील प्रदेशाकडे पोहोचवणाऱ्या वाटांना कुणीतरी मंगोपार्क, सर सॅम्युएल, कॅप्टन स्पेक, स्टॅन्ले आपल्या मानतो. कुतूहल बनून खुणावणाऱ्या वाटा मनात घर करतात. स्वप्नपूर्तीच्या सुगंधी फुलांना वेचण्यासाठी तिकडील वाटांवरून ते निघतात आणि जगाला अज्ञात प्रदेशात यायला मार्ग मिळतात. 

साम्राज्यवादी, वसाहतवादी राष्ट्रांना ज्ञात झालेल्या मार्गाने आणून सोडण्याचे काम वाटांनी केले. नवे प्रदेश, नव्या वाटा अवगत झाल्याने अनेक देशांचे-प्रदेशांचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण बदललं. वास्को-द-गामाच्या हाती भारताच्या भूमीकडे येणारा मार्ग लागला अन् त्या एका वाटेने त्याचे नशीब बदलले. विस्ताराची समीकरणे सोडवण्यास आतुर असणाऱ्या राष्ट्रांचे प्राक्तनही पर्यायी पथ हाती आल्याने त्याच्या सोबत पालटले. मिशन बनून काही वाटा नव्याने ज्ञात प्रदेशांकडे धर्मप्रसारासाठी चालत्या झाल्या. काही व्यापाराच्या निमित्ताने फिरणाऱ्यांच्या आर्थिक गणितांना बरकत देणाऱ्या ठरल्या. धेयसिद्धीच्या मार्गाने मार्गस्थ होणाऱ्यांच्या वाटा विजीगिषू इच्छाशक्तीचे द्योतक झाल्या. 

प्रभू रामचंद्रांना विजनवासात नेणाऱ्या वाटांनी अगणित गहिवर पाहिले असतील. डबडबलेल्या डोळ्यातून आसपास धूसर होताना अनुभवला असेल. पांडवांना वनवासात नेणाऱ्या वाटांनी कालपटावर कितीतरी कल्लोळ कोरले. प्रेषित मुहम्मद पैगंबरांचे मक्केहून मदीनेला स्थलांतर घडवणाऱ्या वाटांनी कालगणनेला नवे परिमाण दिले. शुद्धिपत्रप्राप्तीसाठी संत ज्ञानेश्वरादी भावंडाना पैठणच्या पथावर प्रवास घडताना आता पुढे काय, म्हणून वाटांच्या मनात प्रश्नांकित काहूर उठले असेल का? संत तुकोबांना भंडारा डोंगरावरील भामनाथ मंदिराच्या निवांतस्थळी नेणाऱ्या वाटा आत्मशोधनाच्या पथावरील पर्याय झाल्या. साधनेचे संदर्भ पारखून पाहताना अन् मनाचा मनाशी संवाद घडताना पाहून त्याही सुखावल्या असतील का?

चालणाऱ्या पावलांनी जगण्यात भरभराट आणली, तसं भकासपणही त्यांची संगत करीत चालत आलं. वाडीवस्तीवर अंग आकसून बसलेल्या वाटा कालगतीचे आवाज ऐकून जाग्या झाल्या. ओंजळभर अवकाश घेऊन आपल्याच भावविश्वात रममाण असणाऱ्या वाटा नव्या नादाने वेडावून शहराकडे वळत्या झाल्या अन् शहरांच्या कपाळी कितीतरी प्रश्न कोरून गेल्या.

जगाच्या सामरिकनीतीला दिशा देणाऱ्या वाटा इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या ठरल्या. कधी पलायनाचा पर्याय म्हणून, कधी प्रहाराच्या साक्षीदार झाल्या. कधी पराभूत पावलांना परतीच्या पथावरून माघारी वळताना विकल झाल्या. कधी मरगळलेल्या मनात नवी उमेद बांधून प्रतिकारासाठी आश्वस्त करीत राहिल्या. 

परकीय आक्रमकांच्या घोड्यांच्या टापांनी हादरलेल्या वाटांनी भूमीचे अभिलेख बदलले. सोबत नवे प्रश्न आणले. आगंतुकांच्या आगमनाने आसपासच्या चौकटी विचलित होऊन जीवनाचे संदर्भ पालटले अन् समाजाचं जगणं पर्यायी उत्तरांच्या शोधार्थ अन्य वाटांकडे वळते झाले. गझनीच्या महंमदास भारतातील संपत्तीचा अनावर मोह झाला. त्याच्या धनलोलूप मनीषा पूर्ण करणाऱ्या वाटा लुटीच्या वाटा झाल्या. दिल्लीहून देवगिरीला राजधानी आणणाऱ्या वाटा मुहम्मद तुघलकच्या वेडेपणाने विस्मयचकित झाल्या. तशा ‘कदम कदम बढाये जा’ म्हणीत मायभूमी परकियांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी निघालेल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या पावलांत चैतन्य पेरत राहिल्या. फौजांना इम्फाळ, कोहिमापर्यंत आणून आशेचा बंध बांधणाऱ्या, तशाच नजरेच्या टप्प्यात आलेल्या लक्षाला दूर नेणाऱ्याही वाटाच होत्या. महात्मा गांधींच्या पावलांना सोबत करणाऱ्या वाटांनी साबरमती ते दांडी पदयात्रा बनून इतिहास घडवला. किनाऱ्यावरून उचलेल्या मूठभर मिठाच्या सामर्थ्याकडे पाहून वाटा विस्मयचकित झाल्या. सर्वंकष सत्तेच्या दमननीतीला आव्हान देत वाडीवस्ती, रानावनापर्यंत पोहचलेल्या प्रतिकाराच्या पर्यायांनी पुलकित झाल्या. 

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका अनुभवणाऱ्या वाटा अफाट साहसाची थरारकथा झाल्या. महाराजांची सुटका केवळ सहीसलामत आपल्या परगण्यात पोहचण्याचा प्रयत्न नव्हता, तर त्या प्रदेशातल्या वाटांच्या सखोल अभ्यासाचा परिपाक होता. भूगोलाला समजून इतिहास घडवण्याचा यशस्वी प्रयास होता. सजग सत्तेच्या डोळ्यात धूळ फेकून केलेल्या पलायनाचा वस्तुपाठ होता. असीम पराक्रमाची परिभाषा सत्तेच्या कपाळी कोरून निघालेल्या साहसी पावलांच्या आकृत्या देहावरून मिरवताना वाटा कृतकृत्य झाल्या.  

धरतीच्या देहावर पहुडलेल्या वाटा किती किती घटना अन् घडामोडींच्या साक्षीदार झाल्या असतील. शिवाजी महाराजांचा पन्हाळगड ते विशालगड वाटेचा अवघड प्रवास अमर्याद धाडसाची अन् अथांग भक्तीची सत्यकथा होती. घोडखिंडीत नाकाबंदी करीत सिद्दी जौहरच्या पाठलाग करत्या वाटा थांबवणाऱ्या बाजीप्रभूंना वाटांचं महत्त्व ज्ञात होतं. कडेकपारींचा हात धरीत कोंडाण्यावर चढून पराक्रम गाजविणाऱ्या तानाजी मालुसरेंचे साहस स्वतःच स्वतः शोधलेल्या वाटेने केलेला ‘न भूतो न भविष्यति’ प्रवास होता. कराल पादशाही सत्तेने सक्तीने जमा करून सुरतेत साठवलेले आणि गोठवलेले धन स्वराज्यात पोहोचवणाऱ्या वाटा अफाट धाडसाच्या साहसकथा ठरल्या.

वाटा सर्वच क्षेत्रांना व्यापून कणभर शेष उरणाऱ्या आहेत. अविभाज्य भाग बनून आयुष्यात आल्याने त्यांची सोबत टाळून वर्तने कोण्याही जिवास असंभव. वाटा केवळ तात्कालिक भावभावनांचा आविष्कार नसतात, तर आयुष्याला आकार देणाऱ्या चौकटीही असतात. कधी आनंदाने ओसंडून वाहतात त्या, तर कधी दुःखाने काळवंडून जातात. कधी विकल झालेल्या मनाने चालताना चैतन्य विसरतात. 

काळाच्या लहानमोठ्या तुकड्यांना घेऊन पुढे चालणाऱ्या वाटा कधी वीरांच्या मिरवणुका बनून गर्दीने फुलल्या. कधी पराजयाच्या प्रहाराने पराभूत झाल्या. कालपटावर नाममुद्रा अंकित करीत मोहरल्या, तर कधी वेदनांच्या साक्षीदार झाल्या. कधी पानिपतच्या पराभवाने खचल्या. कधी गनिमाला चहूबाजूने कोंडीत पकडून कात्रजचा घाट दाखवीत मिळवलेल्या विजयाच्या उत्सव झाल्या. 

दुष्काळाच्या ससेहोलपटीने गाव सोडून निर्वासित झालेल्यांच्या डोळ्यातून झरणाऱ्या पाण्याने वाटा गहिवरल्या. चाऱ्यासाठी रानोमाळ हिंडणाऱ्या गुराढोरांच्या वैराण वणवणने अस्वस्थ झाल्या. उदास मनाने हिरवाईचा ओला अंकुर शोधत आभाळाकडे आशाळभूतपणे पाहत राहिल्या. कधी कथा, कादंबरीतून माणसांच्या जगण्याच्या अनुभूतीची अक्षरे बनून सोबत करीत राहिल्या. कधी कविता तर कधी गीतांचा आवाज बनून गुणगुणत राहिल्या.

कालोपघात वाटांचा कायापालट झाला. पाउलवाट, गाडीवाट, रस्ता, हमरस्ता, महामार्ग, द्रुतगतीमहामार्ग अशी देखणी नावं अन् रूपं धारण करून बदलत राहिल्या. बदलांचं देखणेपण सोबत घेत चालणारी माणसंही बदलली. पायी चालणारी, बैलगाडी घेऊन प्रवास करणारी माणसे केवळ साहित्य अन् सिनेमापुरती उरली. विज्ञानाची वसने लेवून अन् तंत्रज्ञानाचे पंख लावून मोहात पाडणारी वाहने आली. ती घेऊन माणसे त्यांच्या वेगाने अन् आयुष्याला वेढून असणाऱ्या आवेगाने धावायला लागली. प्रगतीचे अर्थ बदलले तसे गतीचेही संदर्भ पालटले. गतीने वाटांच्या ललाटी प्रगतीचे नवे अभिलेख कोरले. 

धूळमातीने माखलेल्या साध्याशाच वाटेवरील अवकळा झाकून खडीमातीने टणकपणा आणला. डांबर-सिमेंटने त्यांना मढविलं. आपलं बदलणारं रूपं पाहून त्या हरकल्या. त्यांनाही वेग आला. लक्षाच्या दिशेने धावू लागल्या, पण हा वेगच अनेकांच्या जीवावर उठला. याच वाटांनी अनेकांच्या जीवनाचा अवकाळी अंत पाहिला. अनेकांना कायमचं जायबंदी बनवलं. भान विसरून बेभान धावणाऱ्यांच्या गाफिलपणाला कदापि क्षमा नसते. सुरक्षा हाच जीवनाचा मंत्र असतो, असे म्हणीत प्रबोधनाचे फलक खांद्यावर घेऊन प्रवास करणाऱ्यांना वाटाच सावध करीत आहेत. पण माणसं सावध होतीलच याची शाश्वती ना देवाला कधी देता आली, ना दैवाला त्याचं भाकीत सांगता आलं. माणूस आपल्या सवयी सहजी बदलायला काही तयार नाही. कधीतरी काही अनुकूल घडेल या आशेने वाटा उभ्या आहेत, ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस’, असा प्रश्न विचारणाऱ्या कवयित्री बहिणाबाईंची खंत घेऊन. 

चालणाऱ्याचे भाग्य चालते, असं म्हणतात. चालणाऱ्या अनेकांचे भाग्य अशाच कोणत्यातरी वाटेने उजळून टाकलेलं असतं, तसं काहींचं कोमेजूनही. हे सगळं खरं वगैरे असलं, तरीही एक वास्तव अस्वीकार करून पुढच्या वाटेने वळता नाही येत, ते म्हणजे माणूस इहतली असेपर्यत चालतच राहणार आहे आणि त्याला अशाच कोणत्यातरी वाटेची सोबत असणार आहे. कारण चालण्याला अंत नाही, तसाच वाटेलासुद्धा विराम नाही, नाही का?

चंद्रकांत चव्हाण 
**

0 comments:

Post a Comment