पाऊले चालती...

By

पाऊले चालती...

हेतू, साध्य, अपेक्षा, प्रयोजने काही असू दे. ती प्रत्येकासाठी असतात, तशी प्रत्येकाची वेगळी असतात. प्रयोजनांच्या पूर्तीसाठी प्रयत्न असतात. ती पूर्ण होतातच असंही नाही. न होण्याची कारणे शोधता येतात. नसली तर निर्माणही करता येतात. प्रश्न असतो, तो विकल्प निवडता येण्याचा. अर्थात, प्राप्त पर्यायही प्रासंगिकतेची वसने परिधान करून येतात. ते पर्याप्त असतातच असे नाही. आयुष्याचा प्रवास घडत असतो. त्याच्या वाहण्याला विराम नसतो. विकल्प असू शकतात. प्रयोजनांना प्रवास असतो. प्रवासाला पावलांची सोबत. चालत्या पावलांना मनाच्या आज्ञा प्रमाण मानायला लागतात. मन कुणाच्या अधिनस्थ असावे, याबाबत तर्कसंगत मांडणी करणे अवघड असू शकते. तो प्रासंगिक विचारांचा परिपाक असू शकतो.

मुळात माणसाइतका श्रद्धाशील जीव इहतली आहे की नाही, माहीत नाही. बहुदा नसावा. त्याच्या अंतर्यामी अधिवास करणाऱ्या श्रद्धा जगण्यास प्रयोजने देत असतात. आयुष्यातल्या आस्थांचा आशय आकळावा म्हणून काही प्रयोजने शोधावी लागतात. मग ती अज्ञात असतील, अगम्य असतील अथवा अनाकलीय. किंवा आकलन सुलभही असू शकतात, तशी साक्षातही असतात. देव, दैव गोष्टी असतील, नसतील. त्या नसाव्यात असे नाही आणि असाव्यात असेही नाही. मानणे न मानणे ज्याच्या त्याच्या आकलनाचा, आस्थेचा भाग. देवाबाबत माहीत नाही; पण इहलोकी माणूस नांदतो आहे, हे वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही. पण खरं हेही आहे की, तो असूनही नितळ, निर्व्याज, निखळ रुपात सापडत नाही. हीच विज्ञानयुगाची खंत आहे.

येथे सगळं असून सगळेच सुटे सुटे होत आहेत. सकलांशी सख्य ही फक्त संकल्पनाच उरली आहे. श्रद्धाशील मने अनेक वर्षांपासून आपआपला भगवंत शोधत आहेत. तो मिळत असेल अथवा नसेल, त्यांना ठाऊक. काही गोष्टी संदेहाच्या धुक्याआड असतात. काही सहजपणाचे साज लेवून समोर येतात. आकलनाचे गुंते असतात. गुरफटणेही असते. परमेश्वरपण एक सापेक्ष संज्ञा. वादविवादांच्या वर्तुळात तिचा अधिवास. टोकाचे मत प्रवाह. त्यातून वाहणारे विचार. कधी त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा. कधी साध्यापासून लांब. तर कधी निष्कर्षांपासून खूप दूर. काहींसाठी अगम्य, तर श्रद्धावंतांसाठी गम्य. तसंही यातून काय हाती लागावं, हा भाग अलाहिदा. मानवाचा माधव होणे, ही भूलोकाची सार्वकालिक आवश्यकता आहे. माणसाला माधव नाही होता आलं, तर निदान माणूसपणाकडे नेणारी एक वाट वळती व्हावी. वारीही तीच एक वाट. कितीतरी वर्षांपूर्वी कोरलेली, माणसाला माधव करण्यासाठी म्हणा किंवा त्यातला माधव शोधणारी म्हणा. ती चालतेच आहे श्रद्धेचे काठ धरून.

वारी सौख्याची सूत्रे नाही शोधत, तर स्नेहाचे धागे विणते. वारीकडे अध्यात्म, भक्ती, परंपरा वगैरे चौकटी टाकून सीमांकित परिप्रेक्षात पाहणे, हा एक भाग अन् परिघापलीकडेही आणखी काही असू शकते, हा दुसरा विचार. विचारांच्या अवकाशाचा संकोच न होईल, हे पाहणे ही तिसरी मिती. एखाद्या गोष्टीवरील आवरण काढून, तिच्या भोवती असणाऱ्या चौकटी वगळून पाहता आलं की कळतं, तिचंही स्वतःचं एक अवकाश असतं. वारी आपल्यात एक विश्व घेऊन नांदते आहे. माणसे शेकडो वर्षांपासून वारीच्या वाटेवरून अनवाणी पायाने पंढरपूरला का पळतायेत? कारणे अनेक असतील; वैयक्तिक, सामूहिक अथवा व्यवस्थेने जतन केलेली. सगळ्या वर्तुळाचा परीघ आकळतोच असं नाही. वारी एक वर्तुळ आहे, अशाच काही विचारांना आपल्यात सामावणारे. 

कोणी देव वगैरे असल्याचे मानतो. कुणी मानत नाही. विज्ञानही तो असल्याचे स्वीकारत नाही. ही विचारधारा अनुमान, प्रयोग, निष्कर्षांचे सोपान चढून मुक्कामी पोहचते. देव आहे मानणाऱ्यांना तो सर्वत्र असल्याचं वाटतं. नाही म्हणणाऱ्यांना तो कुठेच नाही, हे जाणवतं. अर्थात, या आपापल्या श्रद्धा. भगवंत भोवताली आहे असं मानणाऱ्यांनी त्याला कुठेही पाहावं. नाही म्हणणाऱ्यांनी आहे म्हणणाऱ्यांना तेवढं स्वातंत्र्य द्यावं आणि नाही म्हणणाऱ्यांना आहे म्हणणाऱ्यांनी तेवढी मोकळीक. श्रद्धाशील अंतःकरणे त्यांच्या आस्थेने आपलेपणाचा शोध घेतात. अज्ञेयवादी आपल्या आकलनास सम्यक वाटणाऱ्या गोष्टी प्रमाण मानतात. रास्त काय अन् अयोग्य काय, हा प्रश्न प्रत्येकवेळी वेगळा करून पाहता यायला हवा. ज्या गोष्टी निष्कर्षांनी सिद्ध करता येत नाहीत, तेथे श्रद्धेची परिमाणे प्रमाण होतात. विज्ञान थांबते, तेथून श्रद्धेचा परगणा सुरू होतो. श्रद्धेचं कुठलंही शास्त्र नसतं. अशावेळी एकच करावं त्यातून माणूस शोधून पहावा. त्याची संगत करीत चालत राहावे, माणूसपणाच्या परिभाषा समजून घ्याव्यात, करून द्याव्यात. निघावं परिणत परिघांचा शोध घेत. माणूस गवसणं महत्त्वाचं. वारकरी हेच करीत असावेत का? सत्तेची वस्त्रे अंतरावर ठेऊन वारीत विरघळून जाता आले की, माणूस शब्दाचा अर्थ आवाक्यात येतो. आस्थेचं अंतर्यामी असणारं नातं आकळलं की, आपलेपण आपोआप वाहत राहतं. मनाला वेढलेल्या अहंकाराच्या झुलींचा विसर पडणे माणूस समजण्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल असतं. पंढरीच्या वाटेने धावणारी पावले काही तालेवार नसतात, पण जगण्याचा तोल सुटू नये, म्हणून ते चालत राहतात. विठ्ठलाच्या रूपाने त्यांना सावरण्याचे सूत्र सापडते आयुष्याची उत्तरे शोधण्यासाठी. फक्त या शोधयात्रेत आपल्या मर्यादांचे किनारे धरून पुढे सरकता यायला हवं.

पंढरपुरात कोणी कशासाठी जावं? हा प्रश्न तसा गौण. कुणाला आयुष्याची प्रयोजने सापडतात. कुणाला जगण्याची कारणे. कुणाला आणखी काही. आपण आपल्याला शोधण्यासाठी जावं. मनात अधिवास करून असणारे अहं गळून पडावेत, म्हणून वारीत चालत राहावं. माणसाची मनोगते समजून घेता यावीत, म्हणून माणूस बनून मिसळून जावं माणसांत. समूहात विसर्जित करून घ्यावं जतन करून ठेवलेलं आपलं वेगळेपण. आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी काय हवं, किती हवं, याच्या परिभाषा करता यायला हव्यात. आपण नेमकं काय शोधतो? काही हवं म्हणूनच शोधायला जावं का? शोध केवळ सुखांचाच असतो का? माहीत नाही, पण माणूस अवश्य शोधावा तेथून. समाधानही शोधता यायला हवं. त्यासाठी आयुष्याचे कोपरे सुखांनी भरलेले असावेतच असे नाही. अंतर्यामी पर्याप्त या शब्दाचा अधिवास असणे पुरेसे असते त्याच्यासाठी. कोणी म्हणतं हे सुखाचं सुख शोधण्यासाठी आम्ही वारीच्या वाटेने चालतो. श्रद्धेचे तीर धरून सरकणारे भक्तीचे प्रवाह वाहत आहेत असेच अनेक वर्षांपासून. ना त्यांच्या स्थितीत बदल घडला, ना त्यांच्या समाधानाच्या परिभाषेत. समजा नाहीच जाता आलं, तर आहे तेथेच आपला विठोबा शोधावा. शेवटी विठ्ठल एक प्रतीक आपणच आपल्याला ओळखण्याचं. नाही का? कारण प्रत्येकाचा विठोबा वेगळा. आस्तिकाचा तो आहेच, नास्तिकांसाठी नाही असंही नाही. मानला तर आहे अन् नाहीच मानला तर नाही. त्याचं असणं-नसणं गौण. त्याच्या निमित्ताने 'मी'पणाचा परीघ आकळत असेल, मनात विहरणाऱ्या विकल्पांच्या वर्तुळांचा विस्तार कमी होत असेल, अंतर्यामी दाटलेले अविचारांचे तणकट काढता येत असेल तर त्यात वावगे काही नाही. मांगल्याचे अधिपत्य आयुष्याच्या चौकटींना अर्थ देते. विठ्ठल आयुष्याला आयाम देणारे प्रयोजन, प्रतीक म्हणून पाहायला काय हरकत आहे. प्रघातनीतीच्या पलीकडे पाहून अमंगलाचा परिहार करणारे काही गवसत असेल तर ते वेचावे. मांगल्याची प्रतिष्ठापना हाच विठ्ठल नाही का? तो कुणाला कुठे गवसेल कसे सांगावे? कोणाला तो वारीत भेटतो, तर कुणाला वावरात सापडतो. त्याच्या मूळरंगात आपलं अंतरंग शोधता आलं म्हणजे झालं. नाही का?

• चंद्रकांत चव्हाण

6 comments:

  1. सही है सर जी

    ReplyDelete
  2. देव नाही यात शंकाच नाही, परंतु तरीही श्रद्धाळूची संख्या दिवसेंदिवस वाढतांनाच दिसते कारण मानव विश्वासार्ह राहिला नाही, तेव्हा कपटी माणसापेक्षा दगडाचा देव बरा. तो भलेही चांगलं करीत नसला तरी वाईट मात्र निश्चितच करीत नाही

    ReplyDelete