Haravalele Kahi | हरवलेले काही

By
‘लहानपणी मी खूप श्रीमंत होतो, कारण पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझेपण दोनतीन जहाजे चालायचे. कागदाची का असेनात; मोकळ्या हवेत स्वतःची विमाने उडवायचो. चिखलाचा का असेना; पण स्वतःचा किल्ला असायचा. आता हरवली ती श्रीमंती अन् बालपणही.’ व्हॉट्सअपवर आलेला मॅसेज वाचला. त्यातले शब्द नकळत भूतकाळात घेऊन गेले. मनपटलावरची दृष्ये एकेक करून सरकू लागली. बालपणातल्या हरवलेल्या श्रीमंतीसह पुन्हा एकदा आठवणींच्या हिंदोळ्यावर मन झुलायला लागले. बालपणातील स्मृतींचा जागर घडत राहिला. मनाचा एक कोपरा स्पंदित झाला. ‘लहानपण देगा देवा’ वाक्याचा अर्थ नव्याने लावण्याचा मन प्रयत्न करू लागले. हातून काहीतरी निसटल्याची अस्वस्थता मनाच्या आसमंतात दाटून आली. आठवणींचे मळभ झाकोळून टाकायला लागले. बालपणातला काळ स्मृतींची सोबत करीत नव्याने जागा होऊ लागला. क्षणपळाची गणिते जुळवत काळ चालत राहतो. त्याला कुणासाठी थांबायचं काहीही कारण नसतं. क्षणांमागे क्षण येतात आणि पुढे जातातही. तो वाहत राहतो. प्रवाहासोबत माणसे चालत राहतात. वाढत्या वयाने मोठी होतात. अनुभवाने प्रगल्भ होतात, तशी जाणिवांनीही समृद्ध होतात. जगण्याचे संदर्भ बदलत राहतात. सांसारिक व्यापात आलेल्या जबाबदाऱ्यांची ओझी उचलून कधीही न संपणाऱ्या वाटांनी आपलं स्वतःच असं काहीतरी शोधण्यासाठी चालत राहतात. आपापले पंख घेऊन भराऱ्या घेत राहतात.

जगणं सगळ्यांच्या वाट्याला येत असतं; पण लहान-लहान गोष्टीतून हाती आलेलं संपन्नपण घेऊन जगणं किती जणांचं घडतं? सांगणे अवघड आहे, असे असले तरी ज्याचा-त्याचा विठोबा जसा वेगळा असतो, तशी त्याची भक्तीही वेगळी. आपला भक्तिभाव घेऊन माणसे जगतात. जगणं संपन्न व्हावं म्हणून आपलं स्वप्न शोधण्यासाठी धडपड करतात. या धडपडीत साधेपणाने घडणारं जगणं हातून कधी निसटतं, ते कळतही नाही आणि जेव्हा कळते तेव्हा बरेच पुढे निघून आले असल्याने वळायचे राहून जाते. वयाच्या मर्यादांचे बांध मनाला सीमांकित करून सभोवती बंधनांच्या चौकटी उभ्या करतात. या चौकटींच्या तुकड्यांमध्ये माणसं आपलीच आपल्याला शोधत राहतात. सुखाच्या शोधात वाट चालत राहतात. ‘तुज आहे तुजपाशी’ ही साधीशीच जाणीव विसरून.

‘लहानपण’ या लहानशा शब्दात गतकालीन स्मृतींचे सौख्य सामावलं आहे. जीवनाचा सुवर्णकाळ साकोळलेला आहे. जगाच्या व्यवहारापासून अलिप्त राहून, आपल्याच विश्वात लिप्त राहणारा आणि जे आहे तेच पर्याप्त मानण्याचा तो काळ स्वतःपुरतं एक वेगळंच जग असतं. ऐहिक श्रीमंती नगण्य मानणारा; पण भावनिक श्रीमंतीने भरून वाहणारा. भाववेड्या भावनांनी सजलेला. व्यावहारिक जगापासून कोसो दूर असणारा. सगळ्याच गोष्टीना एक निरामय निर्व्याजपणा लाभलेला. स्वार्थपरायण जगण्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या आणि आपल्याच विचारविश्वात मग्न असणाऱ्या या लहानग्या जगाचेही संदर्भ काळाच्या ओघात बदलत आहेत. त्यालाही बदलत्याकाळाच्या पाऊलखुणा आपल्या वाटेने चालण्यास बाध्य करीत आहेत. विज्ञानप्रणीत जगाचा संग घडताना निसंग विचाराने वर्तणारे ते निरागस परगणे स्वतःभोवती कोणीतरी दाखविलेल्या सुखाच्या संकल्पित जगण्याच्या चौकटी उभ्या करीत आहे. भौतिक सुखांना प्रगती समजण्याचा मोठ्यांनी केलेला प्रमाद येथेही घडत आहे. ‘मनसोक्त’ शब्दाचा अर्थही बदलतो आहे. हसणे, खेळणे, हुंदडणे, उंडारणे, भटकणे या लहानपणाशी निगडित शब्दांच्या अर्थछटा बालपणातील जगण्यातून निसटून शब्द्कोशातल्या शब्दांच्या अर्थापुरत्या सीमित होत आहेत. काळाच्या बदलत्यासंदर्भांनी आत्मकेंद्रित जगण्याला प्रतिष्ठा मानणाऱ्या विचारांच्या वाटेवर आणून उभे केले आहे. लहानग्यांचे निर्व्याज जगही याला आता अपवाद राहिले नाही.

मागच्याच महिन्यात गावी गेलो होतो. गावातल्या शाळेत माझ्यासोबत शिकलेला सवंगडी भेटला. त्याच्याशी बरचसं इकडचं-तिकडचं बोलणं झाल्यावर ‘तुझी मुलं सध्या काय करतायेत?’ म्हणून विचारले तर म्हणाला, “शहरात त्यांना घर घेऊन दिले आहे. राहतात तेथेच. शिकायला हवे ना! नाहीतर राबराब राबून होतील माझ्यासारखे.” त्याला थांबवत म्हणालो, “अरे, राहू देत त्यांना शहरात. शिकू दे काही नवे, त्याशिवाय आपल्याकडे आहे तरी काय त्यांना द्यायला; पण सध्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत ना शाळेला! मग ते गावी नाही आले?” “कशाला येतील? आणि तसेही मीच त्यांना नाही येऊ दिलं! सुट्या शाळांना आहेत; पण क्लासेस, शिबिरे आहेत, जातात त्यांना. शिकतात तेथे काहीतरी नवे. येथे येऊन काय करतील, मातीतच लोळतील ना! त्यापेक्षा आहेत तेथेच बरे आहेत.” एका दमात सगळं कथन करीत आपलंच म्हणणं कसं योग्य आहे, हे तो मला सांगत होता.

तरीही मी तोच विषय पुढं दामटत म्हणालो, “ही काळीमाती आपलं अस्तित्व आहे. या अस्तित्वाच्या मुळांनाच तू उखडून टाकायला निघाला निघालायेस का?” “कसली माती? कसली मुळं? कसलं अस्तित्व? आपल्याकाळी ठीक होतं सगळं. गावाला निदान गावपण तरी होतं. गावातील जगण्याच्या साऱ्या खुणा सोबत घेऊन माणसं साधसंच का असेनात; पण समाधानाने जगत होती तेव्हा. सगळीच नसतील; पण त्यातली थोडी का असेनात होती चांगलेपणाने वागणारी. चुकलो की पाठीत दोन धपाटे घालायलाही कमी न करणारी; पण प्रसंगी माया करणारी. हे सगळं आपलंपणच हल्ली हरवलंय. जमिनीतल्या आटत जाणाऱ्या पाण्यासारखे प्रेमाचे पाझरही आटत चालालेयेत. जो-तो आपापले स्वतःचे जग उभे करून जगतो आहे. स्वतःला त्यातला राजा समजतो. सोबत एक सामाजिक जगही असतं आणि त्यातही माणसाला जगायला लागतं, याचं भान नाही राहिलं कोणाला. आपल्याच दुनियेत हरवलेत सगळे.” मनातला राग त्याच्या बोलण्यातून प्रकटत होता, हातून आपलं काहीतरी निसटत चालल्याची खंत त्याच्या मनाला अस्वस्थ करीत होती. काळजात जपून ठेवलेला आठवणींचा ठेवा हरवत असल्याची वेदना त्याच्या बोलण्यातून नकार बनून प्रकटत होती.

“विसर ते आता सारं! राहू दे, काही माणसं विसरली असतील कदाचित असं साधेपणाने जगणं; पण या मुलांना ते साधसं जगणं समजायला नको का? नदी, नाले, विहिरी, शेतं, गुरं-वासरं, मंदिरे, जत्रा, रीतिरिवाज, रूढी-परंपरांनी समृद्ध असलेलं जगणं सांगितल्याशिवाय आणि स्वतः अनुभवल्याशिवाय त्यांना कळेल कसे काय?” माझ्या मनातील गावपण सोबत घेऊन सजलेल्या आठवणींनी बांधलेला विचार त्याला समजावून सांगतोय. पण मला मध्येच थांबवत म्हणाला “तू काय किंवा मी काय लहान असतानाचा जगलेलो गाव विसर आता. तो भूतकाळ झाला आहे. गावातली नदी, शेते, मंदिरे, शाळा, गावाच्या जत्रा पहिल्यासारख्या राहिल्या आहेत कोठे आता? जत्रा नावापुरत्या उरल्या आहेत. मंदिरातल्या भजनाचे सूर हरवले, नदीचे पाणी आटत गेले, तसे संस्कारही आटत चाललेयेत. अरे, अशात नदीकडे जाऊन पाहा! बाराही महिने वाहणाऱ्या त्या नदीचे डबके झाले आहे. नदी उजाड होऊन दरिद्री झाली; पण तिच्या पात्रातील वाळूने मात्र अनेकांचे भाग्य उजळले. गावात मंदिरे नव्याने बांधली गेली; पण मंदिरात मनास मिळणारी शांतता झगमगाटात हरवली. गाभाऱ्यातला तेवणारा दिवाही हल्ली मलूल वाटायला लागला आहे. गावात पैसा आला, घरे बांधली गेली. मातीची घरे पाडून सिमेंट, विटांच्या सुंदर इमारती उभ्या राहिल्या. घराला लागून असलेले गुरांचे गोठे बदलले; पण गोठ्यातल्या गुरावासरांनी भरलेली श्रीमंती संपली. आता दारासमोर बैलजोडी असणं अजिबात प्रतिष्ठेचे राहिले नाही. ट्रॅक्टर असणं सन्मानाचे झाले आहे. जगण्याचे सारेच व्यवहार जेथे फायद्याच्या गणितांनी ठरत असतील अन् पैशालाच जीव लावण्यात सारे रमले असतील, तेथे या मुक्या जिवांमध्ये कोण जीव गुंतवतो.” त्याच्या मनातला बदलत्या परिस्थितीविषयी असणारा राग काहीकेल्या कमी व्हायचं नाव घेत नव्हता. कदाचित त्याचं बोलणं टोकाचं असेलही; पण तो काय चुकीचं सांगत नव्हता. आम्ही या धावत्या जगात आणखी किती आणि काय काय हरवणार आहोत, कोणास ठाऊक?

लहानपण शब्दाची परिभाषाही सध्या बदलत चालली आहे. लहानपणालाही त्याच्यापुरते प्रतिष्ठेचे वलय लाभते आहे. प्रत्येकाला स्पर्धेत चमकायची घाई झाली आहे. प्रत्येकाला काहीतरी भव्यदिव्य करायची स्वप्ने येतायेत. या चमकणाऱ्या आणि प्रसिद्धी देणाऱ्या काळात कधीकाळी जगलेल्या बालपणाचे संदर्भ हरवले, जगणेही बदलाच्या वाटांनी नव्या वळणावर येऊन उभे आहे. नुसते बालपणच नाही, तर त्यावेळचे मुलांचे खेळणे, पळणे, शाळा सारंसारंच हरवले आहे. स्मार्टफोन हाताळणाऱ्या हातांमध्ये कागदाच्या होड्या अन् विमाने हल्ली शोभतच नाहीत. ते आउटडेटेड झाले आहेत. कागदाच्या का असेनात होड्या करून साचलेल्या पाण्यात सोडायला रस्त्यावर डबकी तर असायला पाहिजेत ना! रस्ते, वाटा पक्या झाल्या. आणि तसाही डबकी भरण्याइतका पाऊस हल्ली येतोच कितीदा? झडीचा पाऊस, संततधार, मुसळधार हे शब्दही मुलांना समजणं अवघड आहे. निसर्गही माणसासोबत बदलतो आहे. त्याचीही बदलण्यासाठी स्पर्धा लागली आहे. तोही स्वतःची ओळख हरवत चालला आहे.

रिमोटवर चालणारी विमाने खेळण्यासाठी हाती आल्याने कागदाची विमाने उडवणार आहे कोण? आणि चिखल-मातीत खेळून हातपाय, कपडे मळवून घ्यायला आईबाप मुलांना उसंत तरी देतात का? दहा सेकंदात हात स्वच्छ करणारे, नव्याण्णव टक्के निर्जंतुक करणारे साबण सोबत असतानाही कोणी चिखलात हात भरून घ्यायला उत्सुक नसतो. ‘दाग अच्छे है!’ म्हणणं जाहिरातीपुरतं ठीक वाटायला लागलं आहे. पण कोणालाही चिखल सोबतीला नको. कपड्यांवर पडलेले चिखलमातीचे डाग हल्ली गावंढळपणा ठरतो. चिखल तुडवीत शाळेत जाण्याचा काळ इतिहास जमा झाला आहे. गावातले रस्ते काँक्रिटच्या झुली परिधान करून टणक बनले आणि त्यावरून चालणाऱ्या माणसांची मनेही तशीच कठोर होत आहेत. मुलांच्या प्रगतिपत्रकातील गुणांची चिंता करणाऱ्या आईबापाना मुलांच्या सहज जगण्याचं चिंतन करायला वेळ आहेच कुठे?

ज्ञानविज्ञानाने माणसांचं जग संपन्न केलं; पण त्यात साचलेपण येत चालले आहे. निसर्गाच्या सहवासात आपणही निसर्गाचेच एक घटक होऊन जगण्याचे दिवस संपल्यात जमा आहेत. असं जगण्यासाठी अंतर्यामी इच्छा असायला लागते, तिच हरवत चालली आहे. निसर्ग समजून घेण्यासाठी कोणतेतरी निमित्त शोधून सहली आयोजित कराव्या लागतात किंवा ट्रेकिंग, समर, विंटर वगैरे गोंडस नावांनी सजलेले कॅम्प आयोजित केले जातात. पैसे मोजून पालक मोठ्या हौसेने मुलांना तेथे पाठवतात; पण पैज लावून टेकडीवर धावत चढण्याचा आनंद दुर्लक्षित झाला आहे. पालकांची नजर चुकवून नदीच्या पाण्यात पोहत राहण्याचा सराव आता नाहीच, कारण स्वीमिंग टँकमध्ये सूर मारण्यात समाधान मानण्याचा या काळात नद्यांमध्ये दाखवायलाही पाणी शिल्लक नसेल, तर तिच्या वाहत्या पाण्यातला सूर कसा सापडेल? पावसाळ्यात बरसणाऱ्या पाण्यात डोक्यावर घोंगडी घेऊन साचलेल्या डबक्यातले पाणी उडवत शाळेत जाण्याची सवय रेनकोटच्या सुरक्षेत हरवली आहे. गावातल्या मातीतले खेळ मातीमोल होत आहेत. क्रिकेट खेळणे प्रतिष्ठित प्रकार झाला आहे. विटीदांडू, भोवरे, गोट्या खेळणारे मागास ठरत आहेत. सूरपारंब्यातला सूरच हरवला आहे. गुरावासरांसोबत सहवासाने सहज निर्माण होणारा जिव्हाळा संपून डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट चॅनेलवरील प्राण्यांपुरता कळवळा उरला आहे. माळावरून चरून सायंकाळी घराकडे वासराच्या ओढीने धावत येणाऱ्या गायींचं वासरासाठी हंबरणं दूरदूरपर्यंत ऐकू येईनासे झाले आहे.

निसर्गाचे आविष्कार आजही तसेच असले तरी ते पाहण्यास शाळा, क्लासेसच्या वेळापत्रकामुळे वेळच नाही. काळ्या मातीतले पिकांचे ऋतूमानाप्रमाणे बदलणारे रंग शेतात राहिले; पण मनातून हरवले. गावे ओस पडत आहेत. गावाचा पार सुनासुना झाला आहे. शेतांना अर्थकारण न मानता जगण्याचे कारण मानणारा साधाभोळा शेतकरी स्टेटसच्या चौकटीत बसत नसल्याने दूरवर राहिला आणि त्याच्या जगण्याचे विषय प्रश्नपत्रिकेतील निबंधाच्या विषयापुरते सीमित झाले. शेतं उजाड होत असताना तेथे आपलं भविष्य शोधतो कोण? शेतीच्या मशागतीच्या अवजारांची नावेही माहीत नसणाऱ्या पिढीचा शिबिरांच्या नावाने निसर्गाच्या सानिध्यात रुक्ष संचार घडतोय, तोही शिस्त नावाचं ओझं मानगुटीवर घेऊन आणि या ओझ्यालाच सौख्य मानणाऱ्यांची मांदियाळी वाढतच चालली आहे. असे सगळे घडत असताना सहजपणे उपलब्ध होणाऱ्या श्रीमंतीचे ओझे उचलण्याची ताकदच उरली आहे कोठे? गाव, गावातलं जगणं, गावातली माणसं, गावातली शाळा, गावातले खेळ, गावातले सणवार, संस्कार सारंसारं बदलाची झूल पांघरून आधुनिकतेने मंडित होत आहे. बदलांच्या वाटेने नव्या क्षितिजाला कवेत घेण्यासाठी निघाले आहे.

बदल घडणं कालसंगत असेल, अनिवार्य असेल तर ते जरूर घडावेत; पण त्यासाठी जगण्याच्या सहजपणाचं मोल माणसांनी द्यावं का? सहजपणाने जगण्यातील श्रीमंती विसरून भौतिक सुखांनी निर्मित झगमगीतून आलेल्या श्रीमंतीला संपन्नता मानणं ही वंचना नाही का? बदल असावेत, त्या बदलांनी आलेली भौतिक श्रीमंतीही असावी; पण आपल्या जगण्यातील सहजपणाने आलेल्या श्रीमंतीचं मोल देऊन नाही.

4 comments:

  1. लेख आवडला... तुमचा ई मेल मिळू शकेल का?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!
      माझा ईमेल : chandrakantchavan@live.com

      Delete