Shantiparate Nahi Sukh | शांतीपरतें नाही सुख

By
संत तुकाराम महाराजांचा ‘शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख॥’ पाठ्यपुस्तकात असलेला हा अभंग वर्गात शिकवीत होतो. अभंगाच्या ओळींमधल्या आशयाचे विवेचन माझ्या आकलनाच्या परिप्रेक्षात ज्ञात असलेल्या उदाहरणांच्या साह्याने विशद करीत होतो. वर्गाची ‘ब्रह्मानंदी टाळी’ लागलेली. अशा वातावरणात शिकविताना आम्हा शिक्षक जमातीच्या अंगात नेहमीच एक अनामिक उत्साह संचारतो. अनुभव आणि वाचनातून ज्ञानाचं संचित जमा केलेलं असतं. त्यातून असेल नसेल ते आठवून सांगण्याचा प्रयत्न सुरु असतो. विवेचनाने बऱ्यापैकी वेग धारण केलेला असतो. मीही यास कसा अपवाद असेन. जीवनातील शांततेचे महत्त्व, आवश्यकता विशद करून सांगण्यात रंगलो. वर्ग शांतपणे ऐकतोय. माझ्या विवेचनाची वरची पट्टी लागलेली. वाक्यांमागून वाक्ये हात धरून पुढे चालली आहेत. मला थांबवत एक आवाज वर्गातून उमटतो. “सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू!” माझं विवेचन थांबवलं. म्हणालो, “विचार! काय म्हणायचे आहे तुला?” “सर, तुम्ही जीवनातील शांतीचे महत्त्व सांगत आहात, ते सगळं ठीक आहे; पण आपल्या आसपास शांतता खरंच दिसतेय का?”

प्रश्न तसा साधाच होता. उत्तर काय सांगायचे, यासाठी मनातल्यामनात वाक्यांची जुळवाजुळव केली. त्याचे समाधान होईपर्यंत स्पष्टीकरण करीत होतो. त्याच्यासह इतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे पालटणारे भाव नजरेने टिपत राहिलो. साऱ्यांच्या चेहऱ्यावरील संमिश्रभाव आपल्या आसपास यातील काहीतरी, कुठेतरी कमी असल्याचे सांगत होते. उक्ती आणि कृतीतील तफावत जाणवत होती. तास संपला वर्गातून बाहेर पडलो. मुलांच्या शंकांचे निरसन करूनही एक संदेह अस्वस्थपणे सोबत करीत होता. वाटले मुलांना शांततेचे महत्त्व तर पटले; पण शांतता आपल्या आसपासच्या आसमंतात अस्तित्वात नसल्याचे यांना का वाटत असावे? यांच्या आसपासचे वातावरण खरंच एवढे प्रदूषित झाले आहे?

‘शांती’ फक्त दोन अक्षरांचा शब्द. यात माणूस आणि माणूसपण सुरक्षित असण्याचे आश्वस्त करणारे केवढे समाधान साठलेले आहे. माणसांना जीवनयापनासाठी कितीतरी गोष्टी आवश्यक असतात. पण त्यासह शांतताही सोबत असायला लागते. ती नसेल तर सर्वकाही असून नसल्यासारखेच. माणूस कशासाठी जगतो, या प्रश्नाचं उत्तर अनेक पर्यायात देता येईलही. मला वाटतं आयुष्यात येऊन विसावणाऱ्या शांततेच्या चार क्षणांना मिळवण्यासाठी माणूस जगतो. ते मिळाले म्हणजे कृतार्थ जीवन जगण्याचं समाधान अंतर्यामी विलसत राहते. नाहीच ते आनंदाचे चार क्षण मिळवता आले तर अंतर्यामात अस्वस्थता वसतीला येऊन सोबत करते. जीवनातील निरामय आनंदापासून माणूस वंचित राहतो. म्हणूनच तुकाराम महाराजांनी मनाच्या प्रसन्नतेचे सुक्त गायले असेल.

पद, पैसा, प्रतिष्ठा सारेकाही आहे, पण जीवनात शांतताच नसेल तर लाख खटपटी, लटपटी करून महत्प्रयासाने मिळवलेल्या या गोष्टीचे मोल उरतेच किती? अशावेळी मातीमोल शब्दाचे महत्त्व काय आहे, याची जाणीव प्रकर्षाने होते. हजारो वर्षापासून माणूस सुख सर्वत्र शोधतो आहे. अजूनतरी ते त्याला मिळाले नाही. मिळाले असते तर आपल्या आसपास प्रसन्नतेचा परिमल दरवळला असता. कलहाचे नामोनिशाण दिसलेच नसते. प्रसन्नता पहाटेच्या प्रहरी परसदारी पसरलेल्या पारिजातकाच्या फुलांच्या परिमलासारखी असते. तिच्या गंधाने मनाचं आसमंत भरून आलं म्हणजे सुखाचा सुगंध जीवनात प्रवेशित होतो. हे सर्वांबाबतीत घडेलच, असेही नाही. सुखातून समाधान आणि समाधानातून शांतता आपल्या अंगणी प्रवेशित होत असते.

शांतता मनाची अशी स्थिती आहे, जी जगण्याचे प्रयोजन अधोरेखित करते. जगावं कसं, या प्रश्नाचं उत्तर कुसुमाग्रजांच्या ‘आकाशापरी जगावे, मेघापरी मरावे, नदीकिनारी फिरुनी तृणपात्यातून उरावे’ या काव्यपंक्तीमधून आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर अन्य स्त्रोत शोधण्याची आवश्यकता राहणार नाही. विद्यमान जगाकडे कटाक्ष टाकल्यास काय दिसते. कलह, संघर्ष, संकटे, शोषण, अतिरेक याचं प्राबल्य वाढत चालले आहे. अन्याय, अत्याचार सहज दृष्टीस पडतो आहे. त्याचीही आम्हाला आता सवय होत चालली आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे आणि संघर्ष करणारे रियल लाईफमधले हिरो दुर्मीळ होत आहेत. चित्रपटाच्या रिल लाईफमध्ये आम्ही त्यांना शोधतो आहोत. शोषक शोषितांच्या असाहयतेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी पद्धतशीर करतात. अन्याय घडतो, तो समोर दिसतोही. पण संघर्ष करायला बळ असावे लागते, ते आमच्याकडे असूनही आमची अवस्था किंकर्तव्यमूढ अर्जुनासारखी झाली आहे. संघर्ष करावासा वाटतो. परिस्थितीशी दोनहात करण्याचे विचार मनात येतात. पण का उगीच आपल्या मनाची शांतता घालवून बसा, म्हणून निष्क्रिय प्रारब्धवाद प्रबळ होत जातो. माणसं आहे त्यात समाधान मानायला लागतात.

अस्वस्थ जग आपल्या आसपास नांदत असताना शांतता कशी निर्माण करता येईल? जगातील कलह शांततेच्या मार्गानेच सोडवता येतील, या विचारावर विश्वास असणाऱ्या माणसांनी शांततेचे पथ निर्माण करण्याचे प्रयत्न केले. शांततापूर्ण सहअस्तित्वातून घडणारे सुंदर जग निर्माण करण्याचे स्वप्न अनेक धुरिणांनी आपआपल्या काळी पहिले. पण त्यांच्या प्रयत्नांना फलप्राप्तीचा मोहर आला का? कदाचित पुरेसा नाही. शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात सत्ताकांक्षी, साम्राज्यवादी मानसिकतेने वर्तणाऱ्यांकडून विद्वेषाचे वणवेच पेटवले गेले आहेत. विद्वेषातून युद्धे घडली. युद्धाने सारेच प्रश्न सुटू शकतात, असे बऱ्याचदा वाटतेही. अशा विचारांवर विश्वास ठेऊन समर्थन करणाऱ्यांना काही कळत नाही असे नाही. युद्धपिपासू मानसिकतेतून आणखी जटील प्रश्नांचा जन्म होतो. हे आपण सोयिस्कररित्या का विसरतो? 

शंभर वर्षापूर्वी लाखो लोकांच्या जिवाची आहुती देणारा पहिले महायुद्ध नामक रक्तरंजित खेळ विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी माणसाने खेळून पहिला. यातून जगात कोणती शांतता प्रस्थापित झाली? युद्धातून तह आले. तहातून अपमानजनक अटी. अपमानकारक अटीतून हुकूमशाही विचारधारा प्रबळ होत जाऊन हुकुमशहा घडत, वाढत राहिले. हुकूमशहांच्या महत्वाकांक्षेतून अनिर्बंध, अविवेकी अस्वस्थता प्रबळ होत राहिली. अशा अवस्थ अशांततेतून भीषण संहार पुन्हा घडलाच ना! या रक्तलांच्छित खेळातून आपणास खरंतर शहाणपण यावयास हवे होते; पण ते न येता पुढच्या वीस वर्षात पुन्हा एकदा त्याहून भीषण संहार घडवणारा कलंकित अध्याय इतिहासात दुसऱ्या महायुद्धाच्या रूपाने लिहिला गेला.

दुसऱ्या महायुद्धात जपानवर अणूहल्ले करून अमेरिका कोणती शांतता प्रस्थापित करू पाहत होती? अविवेकी आकांक्षेतून, अनिर्बंध कृतीतून कोणते सुख, शांती विश्वाच्या ललाटी लेखांकित होत होती. सहकार्य, सहजीवन ही विद्यमान विश्वाची अनिवार्य आवश्यकता असताना अनेक देश, प्रदेश आजही धुमसत आहेत. दहशतवादी, अतिरेकी कारवाया करणारे बंदुकीच्या टोकावरून कोणती शांतता प्रस्थापित करू पाहत आहेत. महत्वाकांक्षा असणाऱ्या धुरिणांच्या अविवेकी निर्णयातून निरपराध लोकांचे जिणे असह्य होत आहे. इराकमध्ये बंदुकी, बॉम्बच्या ज्वालांनी बळी जाणाऱ्या नागरिकांचा दोष काय? इस्त्राईल, इराण, इजिप्त, सिरीया, युक्रेन अफगाणिस्थान यासारख्या देशातून एकांगी विचार का वाढत चालला आहे? अशा विचारला अस्मिता समजणे, हे जगण्याचं कोणतं सुयोग्य तत्वज्ञान आहे? मोठ्या प्रमाणात घडून येणाऱ्या बदलास क्रांती म्हणतात. असा बदल जाणीवपूर्वक घडवून आणला जातो. अन्यायाच्या विरोधात तो एल्गार असतो. पण अविवेकी विचारातून घडवून आणलेल्या क्रांतीने कोणता सकारात्मक बदल माणूस घडवू पाहत आहे. दहशवादी कारवाया करणारे कोणते नवे जग घडवू पाहत आहेत? रक्ताने माखलेल्या पथावरून सत्तेचे सिंहासन मिळवून सत्ता प्राप्त करता येईलही; पण अशा रक्तलांछित सिंहासनावर अधिष्ठित होऊन शांती कशी निर्माण करता येईल?

‘खायला कोंडा आणि निद्रेला धोंडा’ अशी एक म्हण आपण ऐकतो. अंतर्यामी शांतता वसत असेल, तर भोजनपात्रातील कोंडाही पक्वान्नासमान वाटतो. प्रामाणिक परिश्रमाने थकलेल्या शरीराला सुखनिद्रा येण्याकरिता वातानुकूलित घराची आवश्यकता नसते. थंडी, ऊन, वाऱ्यात असेल तशा परिस्थितीत शांत झोप तेव्हाच लागते, जेव्हा हृदयात मनःशांतीने निवारा शोधून वसती केली असते. आपलं अंतर्याम शुद्ध, स्वच्छ, नितळ, निर्विकार, निर्विकल्प असेल तर निद्रा येईल कशीही आणि कोठेही. पण मनात दोषाचं डबकं साचलं असेल, विकल्पाचं तण वाढलं असेल, अविवेकाचं मोहळ उठले असेल, तर पैसा देऊन विकत घेतलेल्या भौतिकसुखांमध्ये झोप येईलच कशी? जीवनातील शांततेने निरोप घेऊन मन सैरभैर झाले म्हणून माणसं शांततेच्या शोधात वणवण भटकंती करीत राहतात. तीर्थक्षेत्री जाऊन देवाला साकडं घालतात. त्याच्याकडे हात पसरून सुख, शांती मागतात. तेथे जाऊन ती मिळते? माहीत नाही. ‘तुझं आहे तुज पाशी; पण जागा चुकलाशी’ अशी स्थिती आपली झाली आहे. हृदयातील भगवंत हृदयातच उपाशी आहे.

आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक तापांनी मन पीडलेले असेल, तर स्वस्थता लाभेलच कशी? आध्यात्मिक ताप साधकांच्या वाट्याला येतो म्हटल्यास आधिभौतिक, आधिदैविक हे दोन ताप आपण सामान्य माणसांच्या वाट्यास विपुल प्रमाणात येतात. ते नाहीसेही करता येतात. याकरिता मनाची प्रसन्नता आपल्या अंतर्यामी असायला नको का? मन शांत असल्यावर असे ताप चढतीलच कसे? केवळ भौतिक सुखालाच जीवन मानणारे संतुष्ट नाही होऊ शकत. आपल्याकडचा पैसा फेकून भौतिकसुविधा प्राप्त केल्या म्हणजे शांतताही जीवनात प्रवेशित होते, असे म्हणणे आपल्या मनाची वंचना नव्हे काय? सौख्य आणि शांती चंद्रमौळी झोपडीतही आवास करीत असते. त्यासाठी दोनतीन कोटीचा बंगला नावावर असायलाच हवा, असे नाही. इंद्रियसुखांना अविवेकी, अतिरेकी महत्त्व दिल्याने त्यांची तृप्ती होणे संभव नाही. आनंदाची प्राप्ती क्षणिक भौतिकसुखांच्या, सुविधांच्या संपादनात नसून अंतरात्म्याच्या समाधानात असते. चिरंजीव आनंदाचे उगमस्थान आपले अंतर्यामच आहे. शरीराचे सोहळे साजरे करणारी सुखं ‘ययातीचं’ जगणं ललाटी लेखांकित करतात. तारुण्याचं वरदान मागता येईलही; पण चिरतारुण्य म्हणजेच सुख असू शकत नाही. देह वृद्ध झाला म्हणून काही बिघडत नाही. मन मात्र तरुण असायला हवे. तारुण्यातच जीवनाला आकार देण्याचे सामर्थ्य असते. हे सामर्थ्य विवेकी विचारातून घडत जाते. अशा घडलेल्या विचारातून शांतीचा सहवास लाभतो.

अमूप सुख ओटीत टाकणाऱ्या साधनांची निर्मिती विज्ञानाने केली, पण या साधनांमुळे जीवनात शांतता आली नाही. अणुशक्तीने विध्वंसही करता येतो आणि विकासही करता येतो. तिचा वापर करायचा कसा, हे माणसाला ठरवावे लागते. विवेकी विचार करणाऱ्यांच्या हाती ती लागली, तर काळवंडलेले आभाळ प्रकाशित करता येते; पण अविवेकाच्या हाती हे सामर्थ्य आले तर अंधाराचे साम्राज्य विश्वात उभे करता येते. वापर करायचा कसा, हे आपल्यालाच ठरवावे लागते. मनात शांतता असल्याशिवाय हे नीट कळेल कसे? कालच्या जगाचं जगणं आणि आजच्या जगाचं जगणं यात खूप अंतर आहे. पूर्वी जीवनात फारशा सुविधा नसतानाही माणसं संतुष्ट वाटत होती. संकटकाळी मदतीला धावून जात होती. आज मला काय त्याचं, या अलिप्ततावादी धोरणाने जगत आहेत. विद्यमानकाळी खूपकाही हाती लागूनही मनातील सुखांची लालसा काही कमी होत नाही. कामक्रोध खवळत आहेत. विवेकशून्य विचार प्रबळ होत आहे. भडकलेल्या कामक्रोधाने जिणं दुष्कर केले आहे. असुरक्षित वाटू लागले आहे. संयमाचे बांध उध्वस्त होत आहेत. कोणातरी निरपराध निर्भयाच्या जीवनयात्रेची सांगता घडत आहे. थोड्याशा धनाच्या लालसेसाठी कोणाचातरी देह धारदार शस्त्राच्या वेदीवर चढत आहे. ‘सुरक्षितता’ शब्दालाच सुरक्षित करायची वेळ आली आहे.

विश्वात माणसाइतका विचारी सजीव कोणीच नाही, हे वास्तव आहे. पण माणसाइतका अविचारही कोणी करू शकत नाही, हेही सत्य नाकारून चालत नाही. उत्क्रांतीच्या टप्यात वानराचा नर आणि नराचा नारायण होणं अपेक्षित आहे. पण परिस्थिती ‘नरेचि केला किती हीन नर’ अशी होत चालली आहे. अशांत विश्वात शांतीचा अधिवास शोधावा कसा आणि कुठे? काय केले असता मानसिक शांती मिळेल, असा प्रश्न निर्माण होतोय. विकारांनी शरीराची बजबजपुरी केली असेल तर तेथे शांती राहीलच कशी? विकारग्रस्त चित्ताला तिळमात्रही शांतता लाभत नाही. विकारांचं अधिष्ठान असणाऱ्या ठिकाणी शांतता असू शकत नाही. मग याकरिता काय करावे? याचे उत्तर तुकाराम महाराजांच्या  ‘बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त । तया सुख अंतपार नाही ॥’ या अभंगाच्या विचारात आपणास मिळेल. शोधून तर पहा. निष्काम शोधयात्रा आपल्या अंतर्यामी सुख, शांतीचे अधिष्ठान निर्माण करते.

0 comments:

Post a Comment