Pariksha | परीक्षा

By
दहावीच्या परीक्षेचे रीसिट वर्गात विद्यार्थ्यांना देत होतो. मुलंमुली एकेक करून आपापले प्रवेशपत्र घेऊन त्यावरील नोंदी व्यवस्थित आहेत का, याची खातरजमा करत होती. ज्यांना शंका होत्या ते विचारून समजून घेत होते. वर्गातून बाहेर निघून पुढे सूचनाफलकावरील तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक पाहत उभे होते. तेथे जमा झालेली गर्दी वर्गातून पाहत होतो. प्रत्येकाला आपली परीक्षा कोणत्या बॅचला याची उत्सुकता. प्रत्येक जण गर्दीतून आपला क्रमांक, बॅच शोधून परीक्षा केव्हा आहे, ते आपल्याकडील कागदांवर, वहीत लिहित होते. काही चाणाक्ष मंडळीनी लिहिण्याच्या भानगडीत न पडता आजूबाजूला पाहिले. जवळपास कोणी शिक्षक नसल्याची खात्री करून घेतली आणि खिश्यातून गुपचूप मोबाईल काढले. फलकावरील बैठकव्यवस्थेचे फोटो घेतले. गर्दीतून जरा बाजूला सरकून मोबाईलस्क्रीनवर पाहू लागले. सूचनाफलकाजवळ विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला. वाढत्या गर्दीला सावरण्यासाठी दोनतीन शिक्षक धावत आले. रागावले थोडे त्यांच्यावर. सारे विद्यार्थी रांगेत नीट उभे राहिले.

माझ्या वर्गात परीक्षाप्रवेशपत्र वाटून झाले. काही दोनचार शिल्लक होते, त्या राहिलेल्या विद्यार्थ्यांची वाट पाहत थोडा सैलावलो. बसलो खुर्चीत. थोडा अवधी गेला असेल नसेल, बाहेरून पाचसहा मुलामुलींचा घोळका वर्गात येऊ का, म्हणून विचारीत आत आला देखील. त्यांच्याकडे पाहिलं थोडं. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नांकित भाव पाहून एक विद्यार्थिनी बोलती झाली. “सर, आमच्या तोंडी परीक्षा उद्याच्या बॅचला आहेत. त्याविषयी विचारायचं आहे थोडं.” “हा, विचारा काय विचारायचे आहे?”- मी. “सर, परीक्षा कशा घेतल्या जातील?” एका मुलाचा प्रश्न. “जशा मागीलवर्षी घेतल्या तशाच.” मी त्यांना म्हणालो. आणखी एक मुलगा सहभागी होत म्हणाला, “म्हणजे नेमकं काय विचाराल सर? आम्ही प्रश्न कोणत्या प्रकारचे तयार करायचे?" मी त्यांच्याकडे आश्चर्यदग्ध नजरेने पाहत होतो. “सर, परीक्षा खूपच कठीण घेतल्या जातील का? आम्हांला तर खूपच भीती वाटतेय! काय होईल या विचाराने काहीच सुचत नाहीयेय. काय करावे कळत नाही.” घोळक्यातून एक घाबरलेला, गोंधळलेला आवाज.

सर्वांचं बोलणं थांबलेलं. क्षणभर शांतता. तेवढी शांतताही त्यांना अस्वस्थ करीत होती. केव्हा एकदा सर आपल्याशी बोलतात म्हणून त्यांची अस्वस्थ चुळबूळ चाललेली. बोलण्यासाठी मुद्दामच मोठा पॉज घेतला. “सर, सांगा ना! परीक्षा कशा घेतल्या जातील?” एका मुलीने शांततेला छेद देत विचारले. माझ्या चेहऱ्यावर मिस्कील हास्य. मी त्यांचे चेहरे निरखतोय. चेहऱ्यावरील तणावाच्या रेषा लांबत चाललेल्या. त्यांच्याकडे पाहत म्हणालो, “जशा नववीच्या वर्गात संबंधित विषय शिक्षकांनी घेतल्या, तशाच याही वर्षी. त्यात घाबरून जाण्यासारखं आहे काय? बोर्डाने परीक्षेचा आराखडा  ठरवून दिलेला असल्याने, आणखी कोणत्या वेगळ्या प्रकारे घेण्याचा प्रश्नच येतो कुठे!” मुलं थोडी स्थिरावली. त्यांच्या मनावरील ताण थोडा कमी झाला. थोडं इकडचं तिकडचं, थोडं अभ्यासाचं बोलणं करीत राहिले. तुमचा अभ्यास तुम्ही नीट करीत राहा, परीक्षांत नवं असं काय असतं? असे म्हणीत त्यांना धीर दिला अन् वाटलीच भीती, आलं दडपण मनावर तर भेटा मला, म्हणून सांगितले. साऱ्यांचे चेहरे थोडे खुलले. वाटलंच तर तुम्हाला भेटू असे म्हणून निघाली घरी जायला. सारी पावलं दरवाज्यातून बाहेर चालत निघाली. त्यांच्या पावलांच्या आवाजासोबत आपापसातील बोलण्याच्या सरमिसळ आवाजाची चिवचिव कानी येत हळूहळू अस्पष्ट होत गेली.

खरंतर, ही सगळी मुलं काही पहिल्यांदाच परीक्षेला सामोरी जात नव्हती. आईबाबांचे बोट धरून रडत-रडत बालवाडीच्या वर्गात आले, तेव्हापासून एकेक परीक्षांना सामोरे जात येथपर्यंत पोहचले, ते परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळेच. मग आताच परीक्षेचा ताण त्यांच्या मनावर का यावा? तसं पाहता मनावर थोडाफार ताण असल्याशिवाय यशाचे मार्ग आपल्याला आक्रमिता येत नाहीत, हेही खरंच. पण हा ताण जेव्हा तुटेपर्यंत ताणला जातो, तेव्हा प्रश्न मोठे होतात आणि उत्तरे लहान. उत्तरांपेक्षा प्रश्नांनाच खूप महत्त्व दिले जाते, तेव्हा साध्यासाध्या समस्याही खूप अवघड झालेल्या असतात. मुलं परीक्षांना सामोरे जात असताना त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी, समाजाने भावनिकदृष्ट्या त्यांच्या सोबत राहणे म्हणूनच आवश्यक असते.

पण असं न घडता सगळ्याच नाही; पण काही पालकांकडून आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा मुलांवर लादल्या जातात. आपणास जे करता आले नाही, ते आपल्या मुलांनी करायलाच हवं, असा अट्टाहास केला जातो. या अट्टाहासापायी मुलांना स्पर्धेत धावणारे घोडे समजून त्यांना धाप लागेपर्यंत पळवत राहतो. पालकांना वाटते याने अधिक गुण मिळवायलाच हवेत. तुला काय हवे ते सांग? तुला ते आणून देतो, पण नव्वदपेक्षा कमी गुण नकोच. शाळांना अग्रमानांकित व्हायची घाई म्हणून पळवा मुलांना स्पर्धेत. मी शिक्षक कसा उत्तम म्हणून हाकला मुलांना अभ्यासाच्या रस्त्याने. चांगला निकाल नाहीच लागला, तर अनुदानाचे काय? मग दामटा मुलांना अभ्यासाच्या गर्दीत. तुझ्या ताईने / दादाने एवढे गुण मिळविले, तुला नाही मिळाले तर नातेवाईक काय म्हणतील? म्हणून पळ टक्के मिळवायच्या रस्त्याने. पडला, ठेचकाळला, रक्तबंबाळ झाला तरी मध्येच नाही थांबता येणार. होऊ दे जे व्हायचे ते. असं सगळं असेल तर अशावेळी मुलांनी करायचे तरी काय?

आमची पिढीत परीक्षेच्या निकालाच्या दिवशी आम्हाला प्रश्न विचारले जायचे, पास झाला का? झाला ना पास, मग पुरे. पण आज निकालाच्या दिवशी प्रश्न असतो, किती टक्के गुण मिळविलेत? म्हणजे पास होणे गृहीतच. एखाद्याने सांगितले, “मिळालेत ऐंशी टक्के.” ऐकताच समोरच्याचा चेहरा प्रचंड चिंताग्रस्त होऊन म्हणतो, “अररे! ऐंशी टक्के, काही फार नाहीत. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश कसा व्हायचा एवढ्या गुणांनी?” वरून त्या कॉलेजमध्ये एवढी, एवढी कट ऑफ लिस्ट असते. असे उपदेशाचे डोज. कमी गुण मिळवून याने फार मोठा अपराध केला आहे आणि आता तो जगायला लायकच नाही जणू, असा भाव विचारणाऱ्याच्या चेहऱ्यावर असतो. त्यांच्या गुणांची टक्केवारी ऐकून आंबट चेहरा अन् लांबट तोंड करणारे आपण किती गुण मिळवले होते, हे तेव्हा सोयिस्कर विसरलेले असतात. दिलीच करून त्यांच्या गुणांची, शैक्षणिक कारकिर्दीची आठवण, तर उत्तर “अहो, तेव्हा एवढी स्पर्धा होतीच कुठे? जेमतेम गुण मिळाले, तरी पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यापुरती व्यवस्था व्हायची आमच्याकाळी. झाली ना आमची! पण अस्सं कुठं राहिलं आहे आता.”

खरंतर शाळेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून मिळणाऱ्या गुणांचा आणि जीवनाच्या गुणवत्तेचा संबंध असतोच किती? शाळेत शिकवलेलं विसरून गेल्यावर, समाजात जगतांना तुमच्याकडे जे उरते तेच खरे शिक्षण. काही दिवसापूर्वी माझा एक विद्यार्थी बीजगणिताचे पुस्तक सोबत घेऊन माझ्याकडे आला. म्हणाला, “सर, गणिताच्या शिक्षकांना भेटायला जायचे आहे. जाऊ का?” त्याला थोडं थांबवलं. म्हणालो, “बघू काय आहे?” तो काही न बोलता माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत राहिला. त्याला वाटले असावे; सर, तुम्ही मराठी विषयाचे शिक्षक. तुम्हाला काय कळतंय गणितातलं. खरंतर एकही शब्द न बोलता त्याने माझ्या कुतूहलजनक प्रश्नाचे उत्तर दिलं होतं. कधीतरी शिकविताना मी म्हणालो असेन, शाळेत शिकत असताना मला गणितातील एकच संख्या आवडायची, ती म्हणजे बावन्न. (आमच्या वेळी पासिंग एवढ्याच गुणांचे असायचे ना!) तुमचं ते एक्स मानू आणि वाय समजू, हे आपल्याला कधी समजलंच नाही आणि समजलं नाही म्हणून मानलंही नाही. आपलं एक्स आणि वायचं ज्ञान तो विषय पास होण्यापुरतं. खरंतर गणित, इंग्रजी हे विषय त्यांच्याविषयी वाटणाऱ्या भीतीमुळे, चुकीच्या दृष्टिकोनामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या कुंडलीत नेहमी वक्रीच असतात. मग त्यांना संतुष्ट करण्यासाठी धावाधाव सुरु होते. अर्थाशिवाय पाठांतर आणि घोकंपट्टीच्या समिधा टाकून अभ्यासकुंड प्रज्वलित ठेवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड. आमच्यावेळीही असंच होतं. त्यात फारसा फरक पडला आहे, असे नाही. इतिहास शिकविताना गमतीने मुलांना मी नेहमी सांगतो, “मी इंग्रजांना कधीच घाबरलो नाही; पण इंग्रजी समोर दिसली की, आपलं पानिपत ठरलेलं. पानिपतचा इतिहास काही असो, तुम्हाला तुमचं पानिपत होऊ द्यायचं नसेल, तर राहा उभे इंग्रजीशी दोन हात करायला. नाहीतर आपलं अज्ञानात सुख आहेच शेवटी!”

आजही या स्थितीत फारसा बदल घडला आहे, असं नाही वाटत. तुम्हाला आवडो अगर न आवडो शाळेने, बोर्डाने ठरवलेले, शाळांनी निवडलेले तेच विषय घ्या (अद्याप तरी आपल्याला आवडतील ते कोणतेही गाभा विषय निवडून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे मला माहीत नाही, ऐकिवात नाही.) आणि पास होऊन दाखवा. यासाठी परीक्षा नावाचं आव्हान यांच्यासमोर उभं. बरं, या परीक्षापद्धतीविषयी, अभ्यासक्रमाविषयी किती शिक्षणतज्ज्ञांचे ही एकमेव आणि दोषरहित मूल्यमापनपद्धती असल्याचं मत आहे? तसं पाहता आजची परीक्षापद्धती स्मरणशक्तीचीच परीक्षा आहे. वर्षभर घोका अन् दोन-तीन तासात ओका. बस्स, एवढंच. ज्याला उत्तरपत्रिका लिहिताना उत्तरे योग्यवेळी आणि चांगल्यापैकी आठवून लिहिले, त्याच्या गुणपत्रिकेत उत्तम गुण. बाकी कौशल्यांच्या प्रकटीकरणासाठी आमच्या परीक्षातंत्रात कितीसा वाव असतो? महात्मा गांधीजी म्हणाले होते, ‘आमच्या शिक्षणपद्धतीत दोन्ही हातांचा वापर कधी होत नाही. आणि जो एक हात वापरला जातो तो गृहपाठ, उत्तरपत्रिका लिहाण्यापुरताच.’ आमच्या शिक्षणातून जर अर्ध्याच क्षमता वापरात येत असतील, विकसित होत असतील, तर या व्यवस्थेला परिपूर्ण तरी कसे म्हणता येईल? स्वामी विवेकानंदांनी अपेक्षीलेले ‘मॅन मेकिंग अॅण्ड कॅरेक्टर बिल्डिंग’ या विचारांना घडवणारं शिक्षण या व्यवस्थेतून मिळत आहे का?

गुणांवरून गुणवत्ता ठरवण्याच्या आजच्या जगात जर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद विद्यार्थी म्हणून शिकायला असते, तर गुणवत्तायादीत आले असते का? छत्रपती शिवाजी महाराज हे काही राज्यशास्त्र विषयात विद्यापीठचे गोल्ड मेडलीस्ट नव्हते, संत तुकाराम महाराज समाजशास्त्राचे पदवीधर नव्हते, संत ज्ञानेश्वरांनी काही तत्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा, राजनीतीचा अभ्यास करणारे सगळेच स्वकीय-परकीय इतिहासकार, विद्वान एकमुखाने महाराजांच्या राजनीतीला, सामर्थ्याला गौरवान्वित करतात. महाराजांविषयी लिहताना त्यांच्या लेखणीला बहर येतो. ‘बुडती हे जन देखवे ना डोळा’ असे म्हणीत अंतर्यामी अस्वस्थता निर्माण करणारी भावना संत तुकाराम महाराजांच्या वर्तनात समाजाविषयी असणाऱ्या आस्थेतून, कळवळ्यातून प्रकटली होती. ती निर्माण व्हावी म्हणून त्यांच्याकडे समाजशास्त्रीय विचार वृद्धिंगत करणारी कोणती पदवी नव्हती. तो अंतरीचा जिव्हाळा होता. ‘बंधू-भगिनी’ या दोनच शब्दांनी जगाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या नावापुढे केवळ बॅचलर ऑफ आर्ट, ही पदवी होती.

रायबाचं लग्न नंतर, आधी कोंडाण्याचं असं म्हणणारे तानाजी मालुसरे, लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणीत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे बाजीप्रभू कोणत्या शाळेत त्याग, समर्पण, स्वामिनिष्ठा शिकले. न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन त्यांच्या विद्यालयांच्या गुणवत्ता यादीत आले होते का? शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या लोकांच्या लोकविलक्षण जीवनकथा आम्हांस माहीत असूनही अंगभूत गुणवत्तेला नाकारून गुणपत्रकातील गुणांचाच आग्रह का, कशासाठी? थ्री इडियट चित्रपटात एक संवाद आहे, ‘काबिल बन, कामयाबी अपने पीछे आयेगी.’ जर यशस्वी होणं गुणांवरच अवलंबून असेल, तर मग समाजातील बहुसंख्य माणसे, जे गुणवत्ता यादीत कधीच आले नव्हते, ते जगायला अपात्र ठरतील. आणि गुणवत्ता यादीत जे आलेले असतात, त्यापैकी बऱ्याच जणांचे काय चालले आहे, त्यांनी पुढे जाऊन काय केले आहे, हे तरी कुठे आपणास माहीत असते. अनुभवातून आलेले शहाणपण घेऊन जगणारा एखादा खेडूतही कधी कधी प्रकांड पंडिताला व्यावहारिक शहाणपणात शरण जात नाही. हे सारं पाहून, दिसूनही आपलं त्याकडे दुर्लक्ष का होतं?

काळ कोणताही असू द्या. परीक्षापद्धती कोणतीही असू द्या, विद्यार्थी तोच असतो. परीक्षा नामक दिव्यांस सामोरे जाणारा. त्याच्या भावस्थितीचा आपण कधी पुरेसा विचार करतो का? इवलासा कोमल अंकुर वाढत, वाढत आकाश कवेत घेण्याचे स्वप्न घेऊन ऊन, वारा, पाण्याशी सख्य साधत जमिनीत रुजतो. सुरक्षेचे कवच असले, तर निर्वेधपणे त्याची वाढ होते. आम्ही आमच्या मुलांना आश्वस्त करणारं भावनिक सुरक्षेचं कुंपण कधी देणार आहोत? विद्यार्थ्याचा कर्तृत्वसिंधू उचंबळून यावा, म्हणून आपला स्वतःचा जीवनबिंदू अर्पून त्याला असीमता कधी प्रदान करून देणार आहोत? झाडाच्या सळसळत्या हिरव्या पानांत, झुळझुळणाऱ्या झऱ्यात, गाणाऱ्या पक्षांच्या गळ्यात, दूरदूर वनराईत नेणाऱ्या वळणावळणाच्या पायवाटेत, नदीच्या खळाळत्या पाण्यात खरं शिक्षण सामावलेलं आहे. पुस्तकं दडली आहेत. ती उघडून वाचण्यासाठी आम्ही त्यांना तेथे कधी नेणार आहोत का? की गुणांच्या वणवण शोधाच्या भोवऱ्यात ढकलणार आहोत?

शिक्षण एक पद्धती आहे. ती आत्मसात करावी लागते. ती प्रयत्नसाध्य आहे. या प्रयत्नात कदाचित काही चुका जाणते-अजाणतेपणी मुलांकडून घडतीलही. अपयश पदरी येईल; पण अपयश हा काही शेवट नाही. फारफारतर अपयश हा यशाचा चुकलेला मार्ग असू शकतो, तो रस्त्याचा शेवट नाही. रस्ते आणखीही आहेत. नसतील तर नव्या पाऊलवाटा तयार करता येतात. ते रस्ते मुलांना दाखवू या! कारण चाकोरीतला रस्ता कोणतंही नवं ठिकाण शोधू शकत नाही. प्रत्येकाकडे त्याच्या क्षमता असतात. त्याला त्या शोधू द्या. नसतील समजत तर मदत करा. धावण्याच्या क्षमतेवर कविता राऊत यशस्वी होते. निरीक्षणबळावर न्यूटन थोर शास्त्रज्ञ होतो. डॉ. कलाम आपल्याकडील अंगभूत गुणांनी मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. मदर तेरेसा सेवेने जग फुलवतात. बाबा आमटे आनंदवनात आनंदाचे मळे फुलवतात. क्रीडांगणावरील फलंदाजीच्या नैपुण्याने तेंडूलकर महान होतो. कोणी उंच उडी, कोणी लांब उडी मारून उच्चांक करतो. यश मिळवू शकतो. थोडे वेगळे काम करायची तयारी असली, थोडी युक्ती असली की यशाचे मार्ग निर्माण करता येतात. पोहण्यासाठी आधी पाण्यात सूर मारावा लागतो. तेव्हा पोहण्याचा सूर सापडतो. मुलांना त्यांच्या पद्धतीने जगण्याचा सूर सापडावा, म्हणून जगण्याच्या नव्या सुरावटींचा साज निर्माण करून दिला, त्यांचं जीवनसंगीत तन्मयतेने घेतले समजून तर...! नाहीतरी यशस्वी होण्यासाठी कशावरतरी, कोणावरतरी श्रद्धा असावी लागते. जर ही श्रद्धास्थाने समाज, पालक, शाळा, शिक्षक झाले, तर मुलांच्या मनातील परीक्षेची भीती, अभ्यासाच्या समस्या, जगण्यातील गुंता सहज संपवता येईल. नसेल सुटत सगळा गुंता, निदान प्रकाशाचा थोडासा कवडसा तरी नजरेस येईल. त्या प्रकाशाच्या दिशेने जातील त्यांची पाऊले चालत. घेतील शोध आपणच आपल्या ध्येयाचा आणि देतील जीवनास आकार. कारण, श्रद्धेच्या बळावर एकलव्यसुद्धा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकतोच ना!

0 comments:

Post a Comment