Avakali | अवकाळी...

By
हिवाळ्यातील गारव्याला निरोप देत ऋतू सावकाश कूस बदलतो. वातावरणातला हवाहवासा गारवा जाऊन मार्च महिना येतो, तो सूर्याच्या तापदायक किरणांना सोबत घेऊनच. बोचऱ्या थंडीने निरोप घेतलेला असतो. जगाचे दैनंदिन व्यवहार नियत मार्गाने सरू असतात. उन्हाच्या तीव्रतेवरून यंदाचा उन्हाळा कसा असेल, याचे काही आडाखे बांधले जातात. खरीपाचा हंगाम कधीच आवरून झालेला असतो. रब्बीची स्वप्ने परिपक्व होऊन एकत्र साकोळण्याचा समय समीप आलेला असतो. समृद्धीचे माप पदरी टाकण्यासाठी लक्ष्मी शेतकऱ्याच्या घराकडे निघालेली असते. बारोमास राबणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे तिच्या आगमनाकडे लागलेले असतात. निदान वर्षभर जगण्याएवढी संपन्नता घरी येत असल्याचा आनंद मनात जागा झालेला असतो. स्वप्ने मातीच्या कुशीत रुजवण्यासाठी घेतलेले कष्ट फळाला येण्याची खात्री असते. पतपेढ्यांचे, सावकाराचे कर्ज उतरवून उरलेच चार पैसे गाठीला अधिक, तर मुलामुलींचं लग्न उरकून घ्यायचं असतं. नसेल हे जमत तर चार खणांच्या घराचं थोडं का होईना, रूप पालटता आले तर घ्यावे पालटून असा विचार मनात घर करीत असतो. कारभारणीसोबत संसाराच्या सुखवार्ता करण्यात कारभारी विसावलेला असतो. मनातील स्वप्नांचे रंग आस्थेच्या क्षणांना घनगर्द करीत असतात. अंतरंगातून उमलणाऱ्या भावनांना संवेदनेचा मोहर यायला लागतो. स्वप्नांमध्ये रममाण होऊन जगण्याची उमेद माणूस बांधत असतो. आणि... एक दिवस सारं होत्याचं नव्हतं होतं. हातातोंडाशी आलेला घास दैवाच्या खेळाने विखरून जातो.

मनात साकोळलेली इंद्रधनुष्यी स्वप्ने करपतात. नियतीच्या एका फटक्यानं सारी राखरांगोळी होते. मागे उरतात खिन्न, उदास अस्वस्थतेचे भग्न अवशेष. स्वप्नांचा असा अचानक चुराडा होताना जगण्याला काळाची नजर लागते. जीवनाचे सारे रंग क्षणात पालटतात. मागे उरतो परिस्थितीच्या हताशेचा भयाण अंधार. जीवनाला व्यापून टाकणारा, तरीही थोडासा मागे उरणारा. हरवलेली स्वप्ने, विखुरलेले जीवन घेऊन अंधारवाटेने चालायचे असते. आशेच्या किरणाच्या शोधात. हाती आलेल्या कवडशाच्या साक्षीने लख्ख प्रकाश शोधायचा असतो. पावलापुरत्या उजळलेल्या वाटेने चालत येणारी स्वप्ने मनपटलावर गोंदवून पुन्हा काळ्याआईच्या कुशीत रुजवायची असतात. आसपास दैवाने केलेल्या पराभवाच्या खुणा दिसत असतात. त्यांचा मागोवा घेत चालणे प्राक्तन बनते. उसवलेल्या जगण्याला टाके घालण्यासाठी तो उभा राहतो. दैवाला आणि देवालाही आव्हान देत.

सन्मानाने जगण्यासाठी झगडणाऱ्या साऱ्यांनाच नियतीने नेमून दिलेल्या परीक्षेला सामोरे जावेच लागते. या परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतील, असेही नाही. नाही उत्तीर्ण होता येत काहींना दुर्दैवाने. सत्व पाहणाऱ्या प्रवासात थकतात ते हरतात. हरले म्हणून थांबतात अन् थांबलेले परिस्थितीच्या आघाताने विखंडित होऊन संपवून घेतात. संपणाऱ्यांप्रती हळहळ व्यक्त करणारे चार शब्द ऐकायला येतात. नियतीच्या क्रूर आघातातून जीवनाची अवकाळी सांगता झाल्याने समाजमनातून राग व्यक्त होतो. धुमसणारा असंतोषाचा वणवा कालौपघात कमी होत जाऊन स्वभावानुरूप विस्मरणात जातो. नव्हे विसरावाच लागतो, कारण संघर्ष केल्याविन जीवनयात्रेची सफल सांगता कुणालाच करता येत नसते. नियतीने दिलेले दान पदरी घेऊन जगण्याचा शोध घेण्यासाठी माणसं मुकाटपणे चालतात. मनाचीच समजूत घालतात. आजचा दिन आयुष्याला मातीमोल करून गेला; पण निदान येणारा उद्याचा दिवस तरी जीवनात सफलतेचे रंग भरणारा असेल.

नानाविध रंगानी धरतीला नटवून मोहरलेपण देणाऱ्या वसंताचे आगमन निसर्गातील सर्जनाचा साक्षात्कार असतो. धरती सर्वांगाने फुलून येण्याचा खरंतर हा ऋतू. अनंत रंगानी नटून धरतीने साजशृंगार करण्याआधीच अवकाळी पावसाने आणि गारपिटीने सप्तरंगी छटांना अवकळा आणून रंगाचा बेरंग केला. मागे उरला निराशेचा उदास, भकास विसकटलेला रंग. मार्च महिना गारपिटीचे दुर्दैवी दान सोबत घेऊन आला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. वैभवाने झुलणारी, डुलणारी शेतं उध्वस्ततेची अवकळा घेऊन विखुरली. भग्न अवशेष सांभाळीत उभ्या असलेल्या वास्तुसारखी उदास दिसायला लागली. रात्रंदिन राबून, उधार उसनवार घेऊन, कर्ज काढून फुलवलेले मळे, शेतं उजाड झाली. पिकं गारांनी झोडपून काढली. लाखमोलाचं धन घेऊन उभ्या असणाऱ्या धरतीच्या देहावरील रया पार लयाला गेली.

राजाने छळले, नवऱ्याने मारले, पावसाने झोडपले, तर दाद कुणाकडे मागायची असं म्हटलं जातं. नवऱ्याने मारले तर कायद्याने प्रश्न सुटू शकतो. राजा, राजपाट कालौघात संपले आहेत. त्याऐवजी शासन नावाची व्यवस्था माणसांनी उभी केली. ती चुकत असेलतर लोकमताच्या रेट्याने तीही बदलता येते. पण पावसानं झोडपलं तर दाद मागायची कुठे? अस्मानी संकटांचा दावा कुठल्या न्यायालयात दाखल करायचा? नशिबाला दोष देणं, हा एकच पर्याय परिस्थितीने विकलांग केलेल्यांच्या हाती उरतो. पण हाच एक उपाय आपल्या हाती असतो का? की शासनव्यवस्थेकडे मदतीकरिता पाहणे हाही एक उपाय असतो.

गारपीट माणसांना तशी काही नवीन नाही. या आधीही अस्मानी संकटे शेतकऱ्याने अंगभूतबळावर, आंतरिक इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर परतवून लावली आहेत. संकटांनी तो कोलमडला असेल; पण कोसळला मात्र कधीच नव्हता. गारपिटीने मात्र त्याला भुईसपाट केला. पुन्हा उठून उभं राहण्याइतकंही त्राण त्याच्याठायी राहू दिले नाही. गेल्या चाळीसपन्नास वर्षात माझ्या पिढीने एवढी गारपीट पाहिल्याचे, निदान मला तरी आठवत नाही. कुटुंबासोबत शेती कसताना माझ्या शेतकरी घराला कधीही एवढी हताशा आल्याचे दिसले नाही. संकटे आली नाहीत, असे नाही. संकटांशी दोन हात करीत माणसं पुन्हा नव्या जिगीषेने उभी राहिली आहेत. आस्थेचा कणा ताठ ठेऊन जगण्याचा आणि जीवनाचा नम्र शोध घेत राहिले आहेत.

काही दिवसापूर्वी गावी फोन करून आईला गारपिटीच्या संदर्भात विचारले. ती म्हणाली, “सारं होत्याचं नव्हतं झालं रे बाबा! उजाड शेतं आणि उध्वस्त पिकं तेवढी हाती शिल्लक राहिली आहेत. काय करावं, काही कळत नाही? माणसानं खावं काय आणि जगावं कसं? माणसं एकवेळ सावरतील कशीतरी; पण मुक्या जित्राबांचेही पार हालहाल केले या गारपिटीने. कुण्या जन्माचे भोग बघायला लावले दैवाने कोण जाणे?” आईच्या शब्दातील वेदना मनाला अस्वस्थ करीत होती. स्वतःला सावरत म्हणाली, “माझं नशीब त्यातल्या त्यात बरं म्हणावं लागेल. पोरं थोडं का होईना पोटापुरती कमावती आहेत. मिळतील चार घास खायला. खातील कोंड्याचा मांडा करून. पण बाकीच्यांचं काय? ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांनी करावं काय? हातातोंडाशी आलेला घास देवानं असा हिरावून घ्यावा. त्यांनी कुणाचं काय बिघडवलं होतं?” शेतीशी असणाऱ्या पिढ्यानपिढ्यांच्या नात्यावरच आघात झाल्याचं दुःख आईच्या शब्दातून प्रकटत होते. निराश, हताश बोलण्यातून अवकाळी उध्वस्त झालेल्यांच्या ललाटी नियतीने लेखांकित केलेल्या असाहय दुःखाची ठसठसणारी वेदना जखम बनून शब्दातून वाहत होती. व्यक्तीच दुःख हेच समष्टीचं दुःख असतं, असं मानणारं मन हळहळणाऱ्या शब्दांतून व्यक्त होत होते.

बाकीच्यांचं काय? हा केवळ एक प्रश्न नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधणं इतकं सोपंही नाही. संकट अस्मानी असलं, ते कोणाच्या हाती नसलं, तरी ते भीषण आहे. दारूण पराभव करणारे आहे. संकटातून सावरण्यासाठी माणसांना उमेदीने उभं करावं लागेल. उभं करण्यासाठी मदतीचे हात पुढे यावे लागतील. शासन काही करेल, या अपेक्षेवर थांबून कसे चालेल? शासन आपल्या स्तरावरून यथास्थित प्रयत्न करेल. विझलेल्या चुली पेटवण्यासाठी इंधन मिळेलही; पण विझलेल्या मनांना प्रदीप्त करण्यासाठी मदतीची फुंकर घालावी लागेल. कोसळलेली घरं, उडालेली छप्परं पुन्हा आपल्या पायावर उभी करण्यासाठी उमेद जागी ठेवावी लागेल. त्याआधी माणसांच्या मनाचा पाया मजबूत करावा लागेल. त्याच्या मनातील उमेदीच्या, आस्थेच्या, आशेच्या अंकुरांना अंकुरित करण्यासाठी जाणीवपूर्वक जोपासना करावी लागेल. शेतकऱ्यांच्या शेतातील हानी मोठीच; पण मनावर झालेल्या आघाताची हानी त्याहून प्रचंड आहे. त्याचं मन येणाऱ्या उद्याची चिंता करणाऱ्या प्रश्नांच्या, समस्यांच्या गुंत्यातून मोकळं झालं, तर आयुष्यात येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्याइतके बळ मिळेल. गारपिटीच्या आघातातून कोलमडलेल्या जिवांना सावरण्यासाठी समाजाने पुढे येणे परिस्थितीची अनिवार्यता आहे. संवेदनशीलता आपल्या संस्कृतीचं लेणं आहे. संवेदनशील माणसांच्या संवेदनांवर समाज सजतो, सावरतो आणि वावरतोही. कोणा एकास फार मोठी मदत करणं अवघड आहे. पण अनेकांची थोडीशी मदतही मोठं काम करू शकते. लोकांचा फार छोटा त्यागही खूप मोठं काम करू शकतो. यावर विश्वास ठेऊन प्रयत्न करायला लागतील. कणाकणाच्या संचयाने मण होतो, थेंबा थेंबाने सागर भरतो. सर्वस्थळी, सर्वकाळी परिस्थिती काही आहे तशीच राहत नसते, ती परिवर्तनशील असते. शेतकरी उभा राहिला, तर त्याच्यासमोरचे सारेच प्रश्न संपतील असे नाही. निदान काही प्रश्न तरी थांबतील.

जगण्यात आलेल्या हताशेतून एखादा संवेदनशील शेतकरी हाय खाऊन जीवनयात्रा संपवतो. त्याच्यापुरत्या प्रश्नांच्या गुंत्यातून तो मोकळा होतही असेल; पण त्याच्या पश्चात कुटुंबियांच्या वाट्याला येणाऱ्या रोजच्या मरणयातनांचे काय? अवकाळी मरणातून कोणतेच प्रश्न कधी संपलेले नाहीत आणि सुटतही नाहीत. त्यातून आणखी दुसरे जटिल प्रश्न निर्माण होतात. अवकाळी मरणयात्रा थांबविण्यासाठी व्यवस्था काय करते आहे, असा प्रश्न बऱ्याचदा समाज विचारतो. समोर उभ्या राहणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही. ती मिळतात का? हाही एक प्रश्नच आहे. संकटाना थांबविण्यासाठी व्यवस्था प्रयत्नशील असूनही, पदरी निराशाच का येत असावी? यामागच्या कारणांचा शोध कुणी, कसा, कुठे घ्यावा? उत्तरे शोधावी कुणी आणि कशी?

स्वातंत्र्य संपादनाच्या सदुसष्ट वर्षात देश बदलला आहे. जगातलं एक प्रभावशाली राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याएवढा. पण देशात राहणाऱ्या साऱ्यांचा प्रभाव वाढला आहे का? ज्याच्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा आहे त्यांनी सर्वत्र असावं; पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही त्यांनी कुठेच नसावं का? शेतातून येणारे उत्पन्न वाढले. हरितक्रांतीने, श्वेतक्रांतीने कृषीक्षेत्राचा कायापालट झाला. अन्नधान्य उत्पादनाबाबत देश स्वयंपूर्ण झाला; पण देशातील किती शेतकरी स्वयंपूर्ण वगैरे झाले? काही थोड्यांच्या जीवनात समृद्धीचा वसंत फुलाला असेल. ते प्रगतीशील वगैरे झाले असतील, फार्महाउसचे मालकही असतील. पण बहुसंख्य- ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडा नावालाच आहे, त्यांनी फार्महाउसची हौस करावी तरी कशी? दोनचार एकर जमिनीच्या तुकड्यावर त्यांनी जगावं कसं? कुटुंबाला जगवावं कसं? शासन शेतकऱ्यांसाठी काही करीत नाही, असे नाही. पण केलेले त्यांच्याकडे पोहचेपर्यंत फार काही उरत नाही, अशी भावना समाजात वाढत आहे. असं चित्र समोर दिसत असेल, तर शेतकऱ्यांच्या अभ्युदायाच्या वाटा उजळून निघतील तरी कशा? स्व. राजीव गांधींनी पैशाला फुटणाऱ्या वाटांबाबत केलेल्या विधानाचा आम्ही गांभीर्याने कधी विचार केला आहे का? विकास वाटेवर पाठविलेल्या पैशाला वाटा, आडवाटा, पायवाटा फुटणार असतील, तर विकास म्हणजे आक्रोडाचे फूल असे कोणास वाटल्यास नवल वाटू नये. कल्याणकारी राज्यात सर्वांचे कल्याण अभिप्रेत असताना फक्त काहींचे कल्याण होणे, हा परिस्थितीचा विपर्यास नव्हे काय?

ग्रामीण परिसरापर्यंत विकासाच्या वाटा पोहचल्या नाहीत, असे नाही. अन्यक्षेत्रातील प्रगतीसोबत शेतीक्षेत्राचीही प्रगती झाली आहे; पण तरीही शेतकरी प्रसन्नतेच्या भावनेतून शेती व्यवसायाकडे का पाहत नाही? आज शेती कसत आहेत, त्यांना जाऊन विचारा, या व्यवसायात तो किती संतुष्ट आहे. यातील बहुतेक शेतीला रामराम ठोकण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसेल. कितीही राबा मातीतलं जीवन मातीमोल असल्याची खंत मनातला सल बनून, त्यांच्या बोलण्यातून प्रकटते. ज्यांच्याकडे खूप शेती आहे, त्यांच्या घरांचे पालटलेले रूप, धान्याच्या पडलेल्या राशी, दूधदुभात्याने भरलेले गोठे, अंगणात उभी असणारी वाहने, हे प्रगतीचं सार्वत्रिक चित्र नाही. कुडाच्या सारवलेल्या भिंती, धुरानं कोंदटलेले छप्पर, दाराशी असणारी चारदोन जित्राबं आणि छतातून गळणाऱ्या पावसाच्या पाण्यासह मनातलं गळणारं अवसान सावरत उभा असणारा विकल चेहराच नजरेसमोर दिसतो. रात्रंदिन उरस्फोड मेहनत करूनही श्रमाचं पुरेसं मोल मिळत नाही, ही त्याची खंत. खिशात खुळखुळणाऱ्या पैशातून आलेल्या प्रासंगिक समृद्धीने ब्रॅन्डेड वस्तूंचा तोरा मिरवणारे एकीकडे, तर दुसरीकडे जगण्याचा कोणता ब्रॅन्ड नसलेलं जगणं. कोंड्याला मांडा आणि निद्रेला धोंडा, असं जगणं सोबत घेऊन परिस्थितीशी धडका देत माणूस उभा आहे. उजाड झालेल्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आशेचे कोणतेही ओअॅसिस दमलेल्या जिवांना दिसू नये का?

जगण्यासाठी भटकंती आणि कर्जासाठी भिक्षांदेही, हे प्रत्येक हंगामाआधी दिसणारं दृश्य. घेतलेलं कर्ज डोक्यावरून उतरवता आले नाही, म्हणून कोणीतरी अवकाळी जीवनसांगतेचा पत्करलेला मार्ग गारपिटीच्या पावसापेक्षा मोठी आपत्ती आहे. पावसाच्या तडाख्यातून माणसं एकवेळ कशीतरी सावरता येतीलही; पण ज्याचं जीवनच निराशेच्या आवर्तात आवरलं गेलं, त्याचं काय? त्यांच्या परिवाराचे काय? हा टोकाचा मरणपथ निवडताना काहीच विचार जाणाऱ्याच्या मनात येत नसतील का? त्याची लेकरंबाळं, त्याची सहचारिणी डोळ्यासमोर दिसत नसेल का? त्याचं मन परिवाराप्रती असणाऱ्या आसक्तीच्या, प्रेमाच्या बंधांनी बद्ध होत नसेल का? जेव्हा जीवनावरील आसक्तीपेक्षा, प्रेमापेक्षा जगण्यासाठी टिकून राहण्याचे प्रश्न अवघड होतात, आसक्तीचे पाश तटातटा तुटतात. उसवलेल्या जगण्याचे सगळे पीळ सैल होतात. जीव तुटतो तो मागे राहणाऱ्यांचा. भोग भोगावे लागतात मागे राहिलेल्यांना. केवळ पंचवीसतीस हजाराच्या कर्जाची धास्ती घेऊन जीवनयात्रा संपवतात. तेव्हा कुठेतरी भोजनावळीच्या हजाराच्या, लाखालाखाच्या पत्रावळी उठत असतात. अशा परिस्थितीला आपण देशाचा समतोल विकास वगैरे झाला, असं म्हणावं काय? काहींच्या वाट्याला सगळंच काही असावं आणि काहींच्या वाट्याला जगण्याइतपत पाशसुद्धा नसावेत का?

माणसाच्या जीवनात प्रश्न कालही होते. आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. मात्र प्रश्नाचं रूप पालटलं आहे. देशाचं दरडोई उत्पन्न वाढलं, पण दरडोई संवेदनशीलता कमी होत आहे. मला काय त्याचं, हा संकुचित विचार जगण्याचा संपन्न विचार असू शकत नाही. खिशात खुळखुळणारा पैसा आणि त्याच्या आवाजाने वेडावणारे मन, म्हणजे सगळंच काही असत नाही. बंगला, गाडी, माडी यातच सौख्य सामावलं असेल, तर भारत माझा देश आहे. सारे भारतीय बांधव आहेत, ही प्रतिज्ञा शाळेत शिकण्यापुरती आणि अर्थाशिवाय पाठांतरापुरतीच उरते. पुस्तकातलं जेव्हा मस्तकात उतरतं तेव्हाच जगणं संपन्न होतं. स्वतःभोवती सुखाचे वर्तुळ आखून त्यातल्या वलयांकित प्रगतीलाच विकास समजणं, वसुधैव कुटुंबकम् या विचारधारेशी प्रतारणा नाही का? दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होणारी माणसं आपल्या आसपास नाहीत, असे नाही. शेकड्याने आहेत, पण त्यांच्या संवेदनांनी कितीही प्रयत्न केला, तरी आजूबाजूच्या वेदना कमी होऊन-होऊन किती कमी होणार आहेत? कमी करता याव्यात, म्हणून साऱ्यांनी थोडंतरी संवेदनशील होणं आवशक नाही का?

एखाद्या गोष्टीविषयी नुसती सहानुभूती असून चालत नाही. तिची अनुभूतीही असावी लागते. अनुभूतीशिवाय सहानुभूती विफल असते. माझा चौफेर विकास जरूर व्हावा. पण थोडा का असेना इतरांसाठीही तो असावा, असा विचार करून वर्तने हीच जगण्याची खरी श्रीमंती आहे. अशा जगण्याचे संस्कार कोणत्याही संस्कृतीचं संचित असतं. अशा संचिताची आपल्या देशात कमी नाही. आवश्यकता आहे, परिघाबाहेरच्या उपेक्षित जगाला आपल्यात सामावून घेण्याची. आपले वर्तुळ आणखी मोठे करण्याची. ज्यात माझ्यासह इतरांचं जगही सहज सामावेल एवढं. नसेल कोणी करीत तर मी तसे करीन, असं म्हणणाऱ्या उमद्या मनाची. गरज आहे समाजपरायण विचारांना अंगीकृत कार्य म्हणून स्वीकारण्याची. उदात्त विचारांना कृतिरूप देण्याची. आपल्या जगण्याचं वर्तुळ आणखी व्यापक करण्याची. कारण विश्वाच्या वर्तुळातून माणूस वजा केला तर मागे काय उरेल? या प्रश्नाचं उत्तरही एक मोठं वर्तुळ हेच असेल. प्रत्येक माणसाला हे ठाऊक आहे. उत्तर शोधण्याच्या पायऱ्या प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या, तरी अंतिमतः भोवतालच्या वर्तुळाला विश्वरूप देणारा एकच एक घटक विद्यमानकाळी विश्वात आहे, तो म्हणजे माणूस. माणसाइतकं विश्वात काहीही सुंदर नाही आणि त्याच्याकडे असणाऱ्या संवेदनांतून प्रकटलेल्या माणुसकीहून रमणीय काहीही नाही.

0 comments:

Post a Comment