सगळेच कंगोरे कळतात असं नाही

By
विवक्षित विचारांनी घडलेला विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी विचार पेरावे लागतात. नुसते पेरून नाही थांबता येत. त्याला आणखी पुढच्या वळणावर वळतं करावं लागतं. जाणीवपूर्वक जतन करावं लागतं. तो काही कुठला समारोह नसतो, मिरवून घेण्यासाठी केलेला. सरावाने हे घडत गेलं पाहिजे. त्यात सहजता असावी. केवळ उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं म्हणून केलेली कवायत नसावी. विचार रुजवणे म्हणजे काही वृक्षारोपण समारोह नाही. आला पावसाळा की, लावली रोपे. आसपास थोडं सजगपणे पाहिलं तर वृक्षारोपण शब्दाभोवती काळाने कोरलेल्या दृश्य-अदृश्य अर्थाचे कंगोरे कळतील. 

अर्थात ते अथपासून इतिपर्यंत वास्तव असतील असं नाही अन् अवास्तव असतील असंसुद्धा नाही. काही गोष्टींचे सगळेच कंगोरे कळतात असं नाही. वृक्षारोपण हा विषयही याच कक्षेभोवती विहार करणारा. आकलनाच्या मर्यादा अन् कृतीच्या शक्यतांमध्ये तो बऱ्यापैकी गांभीर्य हरवून बसला आहे, असं कुणी म्हणत असेल तर ते फारसं वावगं ठरू नये. रोपं तर लाखोंनी लागत असतील, पण त्यातील जगतात किती? हे न उलगडणारं कोडं आहे. झाडं लावायला फार श्रम नाही, पण जगवण्यासाठी प्रचंड सायास करायला लागतात. प्रतीक्षा करायला लागते त्यांना बहराने डोलताना पाहण्यासाठी. विचारांचंही यापेक्षा वेगळं कुठे आहे. वृक्ष डोळ्यांना दिसतो, विचार कृतीतून कळतात. असला तर एवढाच फरक आहे  त्यांच्यात. मात्र उगवून येणं दोनही ठिकाणी सारखंच. केवळ वृक्षालाच नाही तर विचारांनाही पर्याप्त अवधी द्यावा लागतो, रुजण्यासाठी अन् बहरून येण्यासाठीही. 

समाज कोणताही आणि कोणत्याही परगण्यात वसती करून असुद्या. त्याला जाणीवपूर्वक घडवावा लागतो. त्याला विचारांचे अधिष्ठान द्यावे लागते. नीतिसंमत नीतिसंकेत काळाच्या पटलावर कोरावे लागतात. प्रत्येककाळी अन् प्रत्येकवेळी वर्तनातील कृतीबाबत समाजात एकमत झाले आहे, असे फार कमीवेळा दिसते. कारण एखाद्याला एखादी कृती नैतिक वाटते, ती समोरच्याला कदाचित न-नैतिक वाटू शकते. प्रत्येकजण आपल्या आकलनाच्या परिप्रेक्षात संबंधित घटनेकडे पाहत असतो. म्हणूनच नैतिक कोणते अन् न-नैतिक कोणते, याबाबत समजुतीच्या सीमारेषा तशा धूसरच असतात. त्याभोवती संदेहाचं धुकं दाटलेलं असतं. त्यांच्या धूसर असण्यामुळेच प्रत्येकजण आपापल्यापरीने एखाद्या घटनेचे अर्थ, अन्वयार्थ लाऊन मोकळा होतो. 

अर्थ चपखलपणे लावता येण्यासाठी विचार विचक्षण असणे आवश्यक असतं. अर्थात, आपल्यापरीने अर्थ लावायला कोणीही मोकळे असले, तरी एक गोष्ट उरतेच. ती म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य अन् त्याला असणाऱ्या विस्ताराच्या सीमा अन् विस्ताराचा परीघ सीमांकित करणारी मर्यादांची कुंपणे. स्वातंत्र्य शब्दही संदेहाचे अनेक कंगोरे घेऊन विहार करत असतो. या शब्दाने निर्देशित होणाऱ्या अर्थाच्या परिभाषाही प्रत्येकाच्या अन् प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. त्यात अंगभूत अर्थाच्या सातत्यापेक्षा सोयीचे कंगोरे अधिक असतात. 

विषमतेच्या वाटा विस्तारत जाणे अन् समतेचे पथ आक्रसत जाणे अनेक प्रश्नांचं उगमस्थान असतं, हे कळतच नसेल का कुणाला की इतिहासाचे विस्मरण झालं असेल? माणसात अंतर वाढत जाणे नांदी असते कलहाची. परिस्थितीची दाहकता माणसांना सैरभैर करते. कुणी तुपाशी तर कुणी उपाशी असणे, हा माणसांच्या जगण्याचा अर्थ नाहीच होऊ शकत. परिस्थितीने पोळलेले हात परिवर्तनाचे हत्यार धरताना थरथरत नसतात. ही अस्वस्थता केवळ आक्रंदन नसते. उसवलेल्या मनातील उद्रेक, संताप सात्विकतेच्या परिभाषेत सामावत नसेलही कदाचित. शिष्टसंमत विचारांत अधिष्ठित करता येत नसेल त्याला. पण जगणंच प्रश्न होतं, तेव्हा सज्जनांनी आखून दिलेल्या चाकोऱ्या प्रत्येकवेळी सम्यक उत्तरे देतीलच असे नाही. म्हणून कधीकधी चाकोऱ्यांचं चरित्र तपासून घ्यावं लागतं. 

व्यक्तिगत स्वातंत्र्याला जीवनात काही अंगभूत अर्थ असतात. लोकशाही शासनप्रणाली अंगिकारणाऱ्या प्रदेशात तर त्यांना वादातीत महत्त्व असतं. असले वाद थोडे इकडचे, काही तिकडचे तरी असे विषय सर्वमान्य मार्गाने, सामंजस्याने, चर्चेतून निकाली काढता येतात. त्यासाठी विचारांना विश्वात्मक कल्याणाचे अर्थ अवगत असायला लागतात. नसले तर करून द्यायला लागतात. विश्वात्मक शब्द काही नवा नाही आपल्याकरिता. संत ज्ञानेश्वरांनी सुमारे सातआठशे वर्षापूर्वीच हे पसायदान आपल्या पदरी टाकलं आहे. ते केवळ पाठांतर अन् पारायणासाठी नाही. तर जगणं संकुचित करू पाहणाऱ्या संदर्भांचे परिघ पार करण्यासाठी आहे. 

व्यवस्थेच्या पसाऱ्यात वर्तताना कोणी कुणाला अधोरेखित केलं किंवा नाही केलं, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात काही बदल घडत असतात का? ते पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असं सांगता येईलही. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. मग ते वैयक्तिक असोत की सार्वत्रिक. अंतरीचे वणवे संयमाच्या राखेआड दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखायला लागते. हे व्यापक असणंच माणसांच्या मोठेपणाच्या परिभाषा अधोरेखित करीत असते. त्यांच्या प्रगतीच्या वाटा निर्मितीचे कारण असते, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: