अभिनिवेश

By
समाज नावाच्या विस्तीर्ण वर्तुळात विहार करताना माणूस म्हणून प्रत्येकाच्या असण्याचे काही अर्थ असतात. काही पैलू, काही कोपरे असतात अन् काही कंगोरेसुद्धा. त्यातून त्याची प्रतिमा आकारास येत असते. काहीना संकल्पनेप्रमाणे आयुष्याला आकार देता येतो. काहींच्या आकृत्या अर्धवट राहतात. अखंड सायास-प्रयास करूनही हाती काही लागत नाही. एक मोठं शून्य नियतीने कपाळी कोरलेलं असतं. त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा अटळ भागधेयच असतं त्यांचं. ना आयुष्याचे अर्थ हाती लागतात, ना जगण्याचे संदर्भ. संगतीची सूत्रे शोधायला जावं तर विसंगतीच्या वाटांकडे पावले वळती होतात.

आहे ते पर्याप्त मानून जीवनाचा विनम्र शोध घेता आला की, आनंदाचे वाहते ओहळ शोधायला नाही लागत. सोस सोबत असला की, आहे तेही अपर्याप्त वाटतं. आसपास एक अस्वस्थता दाटत राहते. मग सुरू होते कवायत भाग्याचे साचे बदलता यावेत म्हणून. कदाचित आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक दाखवायची हौस असते म्हणून होत असेल असे कदाचित. समजा तसं असेल तर त्यातून असं कोणतं संचित गवसत असेल की, ज्यामुळे त्याच्या आयुष्याचे अर्थ अन् जगण्याचे संदर्भ बदलून जातील? मनाला क्षणभर मिळणाऱ्या बेगडी समाधानाशिवाय यातून हाती फारसं काहीही पडत नाही खरंतर. हे कळत नाही असं नाही. पण वळत नाही हेच खरं. आपल्याकडे नाही ते दाखवण्याच्या खटाटोपात कोण कोणतं टोक गाठेल, हे सांगणं अवघड. 

प्रदर्शनीय भूमिकेतून अभिनिवेश आकाराला येतात अन् आयुष्याचे एकेक अर्थ बदलू लागतात. ते कुठून, कसे जन्माला येतील याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. त्यांचे आयते साचेही नसतात. अभिनिवेश कोणतेही असूद्या, त्यांना विस्तार दिसत असला तरी खोली नसते. खरंतर या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. वैयक्तिक असतील अथवा सामूहिक त्यांना देशप्रदेशाच्या सीमा असतीलच असे नाही. त्यांचा अधिवास सर्वत्र असू शकतो. कधी ते आगंतुकपणे चालत येतात. कधी त्यांना आवतन देऊन बोलावलेलं असतं. त्यांच्या असण्याला समर्थनाचे टॅग लावता येतात. त्यांना विषयाच्या मर्यादा नसतात. ते कोणत्या कारणांनी प्रबळ ठरतील याचे आडाखे नाही बांधता येत. त्यांच्या वैयक्तिक असण्यात माज असतोच, पण सामूहिक असण्याला उन्माद चढतो. वंशीय, धर्मीय अभिनिवेशांनी विश्वात खूप मोठे कलह घडवले आहेत.

माणसाला संघर्ष काही नवे नाहीत. पण प्रत्येकवेळी त्यामागे समर्थनाची नवी प्रयोजने पेरली जातात. हे काही आज घडतंय असंही नाही. जग नावाच्या पसाऱ्यात सामावलेल्या सगळ्याच प्रदेशात यावर खूप मोठं मंथन घडलं आहे. चर्चेच्या माध्यमातून समाज ढवळून निघाला आहे. ब्रुनोला जिवंत जाळलं गेलंय, सॉक्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागला. सॉक्रेटिसला शिष्यांच्या मदतीने पलायनाचे पर्याय उपलब्ध होते, पण त्याने सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्या पथावरून घडणारा प्रवास नाकारला. मी पलायन करणे म्हणजे सत्याचा मार्ग नाकारून स्वार्थासाठी संकुचित होणे असा होतो अन् हे मला मान्य नाही म्हणण्याइतकं प्रगल्भपण त्याच्याकडे होतं.

वाद कुठे नाहीत? वादांना निर्विवादपणे सामोरे जाता यावे. ते विचारांच्या कक्षेत विहार करणारे असावेत. विचारांनी विचारांचे दिवे प्रज्वलित करावेत. त्याच्या प्रकाशात आयुष्य वाचावे. जगणं वेचावे, कृतीत विचार पेरावेत. यासारखा चांगला विचार आणखी कोणता असू शकतो? आपले विचार रास्त असतील, तर कोणीतरी स्वीकारेलच. नसतील कोणाला मान्य, तो नाकारेल. ते स्वीकारावेत असा आग्रह नको अन् नाकारलेत म्हणून आकस नको. 

आयुष्याकडे बघायचे प्रत्येकाचे काही प्रयोजने असतात. काही प्राथमिकता असतात. त्यांची परीक्षा ज्याची त्यानेच घ्यावी. तपासून पाहावं स्वतःच स्वतःला. धांडोळा घ्यावा आपणच आपला. आयुष्याचे अर्थ शोधताना कधीतरी अनपेक्षित काही समोर येतं अन् आपणच आपल्याला खरवडून काढायला भाग पडतं. पृष्ठभागावर साचलेले धुळीचे थर थोडे बाजूला सारता आले की, दृश्य प्रतिमाने अधिक ठळक होतात, नाही का? 

हे असं काही असतंच आसपास. म्हटलं कुणी असं तर वास्तव अन् नाहीच मानायचं ठरवलं तर अवास्तवसुद्धा. स्वीकाराचा ना आग्रह, ना नकाराचे दुःख. ना कोणता उपदेश. ना कोणता सल्ला, ना कसलं मार्गदर्शन. असं काहीसं जगण्यात रुजवता आलं की, आयुष्य फार काही अवघड गणित नाही राहत. पण वास्तव हेही आहे की, सगळीच गणिते सुघड नसतात आणि सगळीच काही अवघड. असली अवघड म्हणून सोडवायची नसतात का? उत्तरांच्या बिंदूवर पोहचण्यासाठी मधल्या पायऱ्या गाळून नाही टाकता येत. हवं असणारं आपलं काही सहजपणे सापडतं, काही सुटतं, काही निसटतं. म्हणून अंतरी अधिवास करून असलेल्या आशेच्या व्याख्या आणि आस्थेचे अर्थ थोडेच बदलतात. तसंही हवं ते आणि आहे ते, सदासर्वकाळ एकाच ठिकाणी मुक्कामाला कसे असेल?
- चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: