अनुबंध

By
बऱ्याच दिवसापासून गावी गेलो नव्हतो. घरी जाण्याचे प्रसंग बऱ्याचदा आले, नाही असं नाही. पण काही ना काही निमित्त काढून जाणं टळत गेलं. खरंतर टाळत गेलो म्हणणंच अधिक रास्त. का टाळतोय आपण जाणं? अनेकदा या प्रश्नाने मनाची कवाडे किलकिली करून आत डोकावण्याचा प्रयत्नही केला. पण काही गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याचा सराव झाला की, निगरगठ्ठपणा आपोआप आपला होत जातो. असं काही असेल किंवा आणखी काही. या प्रश्नाचं उत्तर नीटसं नाही सांगता येत. मी शहरवासी होणं, हे एक महत्त्वाचं कारण असेल का? असेलही किंवा अगदी असं आणि असंच नसलं, तरी सुखसुविधांचा राबता असला आणि तो आपला वाटू लागला की, जगण्यात सोयीच्या चौकटी तयार होतात. त्या सुरक्षित राहाव्यात म्हणून मर्यादांची कुंपणे टाकली जातात. समर्थनाची शेकडो कारणे कारणाशिवाय तयार होत जातात. सुविधांतली सुखे अंगवळणी पडल्यानं गावी जाऊन उगीच गैरसोय का म्हणून करून घ्यावी, हा स्वार्थपरायण विचारही मनाच्या कोपऱ्यात असावा. जाणं आवश्यकच असलं, तर मावळतीचे रंग क्षितिजाने कवेत घेण्याच्या आत आपण शहराच्या कुशीत असावं असं वाटत असतं. 

गावी जाणं आवश्यक होतं. गेलो. थांबलो. 

पायातले बूट काढून नेहमीप्रमाणे भिरकावले कोपऱ्याच्या कुशीत. देवडीत खाट टाकून विसावलेली आई कौतुकभरल्या नजरेने पाहत म्हणाली, ‘नाही मोडली नं अजूनही घरभर पसारा करायची ही सवय.’ 

तिच्याकडे पाहत नुसता हसलो. जवळ जाऊन बसलो. समोर सगळं लख्ख दिसत असलं तरी तब्बेतबाबत विचारलं. किती यांत्रिकपणे वागत असतो आपण, नाही का? सोपस्कारांना सुंदरतेचे साज चढवतो. नेहमीच्या सवयीने ती म्हणाली, ‘मूठभर जीव. आता किती सांभाळायचा. जायचा तेव्हा जाईल. जाणार आहे तोपर्यंत सोबत करायची एवढंच. मांडवभर पसरलेल्या वेलीला लगडलेली फुले पाहून जीव सुखावतो. आता कोणाकडे काही मागायचं राहिलं नाही. हवं होतं तेव्हा सुखांनी कधी स्वतःहून सोबत केली नाही. ती नव्हती म्हणून तक्रार नाही अन् असती तरी खूप मोठा फरक पडला असता असंही नाही, पण आता समाधानी नाही असंही नाही.’ 

बराच वेळ इकडचं, तिकडचं, महत्त्वाचं, बिनमहत्त्वाचं काही काही बोलत होतो. दरम्यान पोरींनी दोनदा चहा आणून दिला. त्यांनाही माहीत आहे, आग्रह केला तरी काका काही जेवण करणार नाहीत. अर्थात, ही माझी जुनीच सवय. आजीकडून ऐकून बऱ्याच गोष्टी पोरांनी अवगत करून घेतलेल्या. बोलून बोलून किती बोलणार? बोलणं थोडं थांबलं. थोडा वेळ निशब्द शांतता. बोलताना आईकडे पाहत होतो. वार्धक्याच्या खुणा तिच्या देहावर स्पष्ट दिसायला लागलेल्या. चेहऱ्यावरील सुरकुत्यांचं जाळं गडद होऊ लागलेलं. वाढत्या वयाला सोबत घेऊन मावळतीच्या वाटेने वळते झाल्याची कातर जाणीव करून देतंय.

शांततेला विराम देत आईने विचारले ‘कसा आहेस रे, तुझी लेकरं कशी आहेत? सगळं ठीक चाललय ना?’ 

खरंतर मी घरी आल्या आल्या तिचे हे प्रश्न विचारून झाले होते आणि उत्तरं ऐकूनही. पण समाधान झालं नसावं किंवा तिला आणखी काही जाणून, काही समजून घ्यायचं असावं. म्हणालो, ‘हो, सगळं व्यवस्थित आहे आणि मुलंही चांगली आहेत. मी यायला निघालो तेव्हा पोरगं म्हणलं, शक्य असेलतर आजीला काही दिवसासाठी का असेना आपल्याकडे घेऊन ये. फोन करून बोललो. निदान दोनचार दिवसासाठी ये. राहा. पण प्रत्येकवेळी तिची कारणं ठरलेली. आज काय तर पेरणी धरलीय. उद्या तर निंदणी करायचीय. परवा खत द्यायचं. तेरवा काय कापूस वेचायचाय. पुढे हंगामानुसार कामांची यादी वाढतच जाणार. सवड निघेल तशी येईन म्हणते. पण उसंत असतेच कुठे तिला. आणि शेतातली कामं थाबतात कधी?’ 

पोराचं म्हणणं आईला सांगतो. आईच्या चेहऱ्यावरचे भाव पालटतात. सुरकुतलेल्या चेहऱ्यावरच्या रेषांचे किनारे धरून भारावलेपण वाहू लागतं. म्हणते, ‘सगळ्यांना माहिती आहे या वयात काही मी वावरात नाही जावू शकत. दोन्ही पोरं दिवसभर वावरात. त्यांच्या बायकाही. घर सांभाळायला कोणी नको का. पोराढोरांकडे बघायला कुणी हवं ना. दुभत्या गायी-म्हशी गोठ्यात. शाळेत जाणाऱ्या पोरांना सांगून, त्यांच्या मागे लागून करून घ्यावं लागतं चारापाणी वगैरे. ते आमच्या कुणब्यांच्या पाचवीलाच पुजलेलं. आमचा जीव काही म्हटलं तरी गुरावासरांमध्ये गुंतलेला, मग ती दोन पायाची असोत की, चार पायांची. येईन म्हणून सांग पोराला.’ 

‘तू आलीस तरी येथे राहतेच किती दिवस? झाले एक दोन दिवस की पुन्हा तुझं सुरु, घरी परत जायचंय. वावरातली, घरातली कामं खोळंबली असतील. गोठ्यातल्या गुरावासरांना नीट वैरणपाणी झालं असेल का? पोरं सगळं नीट पाहत असतील की नाही. की पारावर चकाट्या पिटत, नाही तर पत्ते कुटत बसली असतील का. आणखी काय काय. सारी काळजी तुलाच. ते आता काही लहान राहिले नाहीत. करू दे ना त्यांचं त्यांना! सांभाळतील सगळं नीट. काही सांगून पाहावं तर तू मान्य करायला तयारच नाही.’ 

मला मध्येच थांबवत म्हणाली, ‘ती लाख सांभाळतील सगळं; पण त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. ते काही तुमच्यासारखे चार पुस्तकं शिकले नाहीत. बरंवाईट ओळखून सगळं व्यवस्थित करून आवरायला. लागली इकडच्या तिकडच्या वाटांना तर... नाहीतरी आता गावात गावपण राहिलं आहे कितीसं असं?’

मोहात पाडणारी सुखं दबक्या पावलांनी चालत गावात आलीत. सुखांनी समृद्धी आणली. सोबत सैलावलेपणही. असल्या बेगडी सुखाच्या मृगजळापासून आपण दूर राहिलेलं बरं, असं काहीसं तिचं तिने तयार करून घेतलेलं प्राप्त परिस्थितीबाबत तत्त्वज्ञान. आयुष्यभर साधेपणाशिवाय काहीच न करता आलेल्या तिला काय सांगावं की, जगाचं वगैरे जावूदे, आपल्याला आपलं बरं-वाईट कळलं म्हणजे झालं. असं काही कोणी लागलीच बिघडत वगैरे नसतं. आणि चार पुस्तकं शिकून शहाणपण येतंच असंही नसतं. पण सांगूनही काही उपयोग होणार नसतो. तिने स्वतःची काही मते तयार करून घेतलेली. ती तिच्यासाठी आणि तिच्यापुरती प्रमाण. दारूच्या बाटलीत जगणं शोधणाऱ्या नवऱ्याला आयुष्यभर सांभाळला. निदान उतरणीला लागलेल्या आयुष्यात पोरांकडून हे भोग पुन्हा पदरी पडू नयेत म्हणून असेल. कारणं काही असली आणि ती तसं दाखवत नसली, तरी तिच्या काळजाचे कंप तिलाच माहीत. काळजाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कोंडलेल्या आठवणी सतत कुरतडत असाव्यात. यामुळेच तिचं येणं, थांबणं आणि जाणं यातील अंतर तसं कमीच. मुलं मोठी झाली. त्यांचं ते बघतील, काय करायचं ते. या म्हणण्यावर तिचा विश्वास असला, तरी त्यांच्या पुढयात पहुडलेल्या निसरड्या वाटांवर नसावा. 

गाव, गावची माती आणि गावातील नाती यात तिचा श्वास अडलाय. गावाचं वर्तुळ ओलांडून आली एखाददोन दिवस तरी तिला जास्त नाही थांबवत. येथील सुविधातही अवघडल्यासारखं होतं. गावपण नाही गवसत तिला इकडे. येथील झगमगीत तिची तगमग वाढते. पेंट केलेल्या चकचकीत भिंतीवरून फिरताना तिचा हात अडतो. त्यातही एक बुजरेपण असतं. गावाकडील घराच्या मातीच्या भिंतीवर पोतेरं फिरवताना तिला आपलंपण वाटतं. त्यातील मातीचा गंध आपलासा वाटतो. येथील रूम फ्रेशनरच्या सुगंधाला तिचा मातीचा गंध खूप लांबचा वाटतो. अंगणातील तुळशीला दिवा लावताना, पाणी घालताना भक्तिभाव अंतरी उतरून येतो. कुंपणांच्या लक्ष्मण रेषांनी बंदिस्त केलेल्या कुंड्यांमध्ये श्वास शोधणाऱ्या रोपट्यात तिला फक्त रुजणं दिसतं, जगणं नाही सापडत. 

सुविधांच्या परिभाषा नव्याने अधोरेखित करणारी यंत्रे विज्ञानाचा हात धरून टू रूम किचनमध्ये आली. सोबत सुखाच्या व्याख्याही. पण समाधानच्या परिभाषा काही या साधनांना निर्माण करता आल्या नाहीत. आपलेपणाचे साज लेऊन सजलेले संवादाचे सूर यंत्रांच्या कोलाहलात तिला नाही सापडत. जात्यावरून तिचा हात फिरताना ओठी येणारं गीत गिरणीतून दळण आणताना कधीचच अडलं. पाट्यावरवंट्याचं आपलंपण मिक्सरच्या चक्रात फिरताना हरवलं. रेडिओ, टीव्हीवर भक्तिगीतांनी सजलेले सूर तिच्या कानी पडतात, पण मनी नाही रुजत. रात्रीच्या शांत प्रहरी गावातल्या मंदिरातील भजनांच्या साध्याशा सुरांनी उमलून येणारा भक्तिभावाचा गंध गायनाच्या शास्त्रीय चौकटीत बसवलेल्या सुरांना नाही सापडत. गर्दीत चेहरा हरवलेले सणवार तिला नकोत. मिळून साजरे केलेले साधेसे सोहळेच तिच्या अंतर्यामी रुजले आहेत. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी प्रमुदित परिमल पेरत येणारा वारा, मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने धुळीची वाकळ देहावर पांघरून शेतातून गावाकडे परतणारी बायामाणसं, गुरंवासरं आणि गोठ्यातील वासरांच्या ओढीने हंबरत परतणाऱ्या गायी तिच्या आनंदाचं अभिधान. तिला येथे दिसतील तरी कसे? 

गावपण जपताना आपल्या, परक्या माणसातील नाती ती आग्रहाने जपते. रक्त बनून धमन्यातून वाहणारी नाती निवडता नाही येत, पण आपलेपणातून सजलेली नाती सुंदर करता येतात यावर तिचा ठाम विश्वास. नात्याची नावं लेऊन बहरलेलं गोकुळ तिच्या मनाचा आनंददायी विसावा आहे. लेकीबाळी, सुना, नातवंडे, पतवंडे, मुलं सारीसारी तिला जवळ असावीत असं वाटतं. पण नेहमी, नेहमी हे कसं शक्य आहे? नात्यांची वीण घट्ट राहावी म्हणून काहीना काहीतरी निमित्त शोधत राहते. सगळ्यांना एका सूत्रात सांभाळणारे संदर्भ शोधत राहते. कधी सणवाराच्या, तर कधी घरातील मंगलकार्याच्या माध्यमाने साऱ्यांना एकत्र सांधू, बांधू पाहते. मुलंनातवंडपतवंडांचा घरातला गलका पाहताना तिला संसार सार्थकी लागल्याचे वाटते. तिचा हा आनंदही तसा फार काळ टिकणारा नसतो. चार दिवस झाले की, सारे पुन्हा परतीच्या वाटेने निघतात. तशी तिच्या मनाची घालमेल वाढत जाते. तसं जाणवू देत नसली तरी, ते कळतंच. बॅगा भरल्या जातात. त्या भरताना तिचा हात जडावतो. तरीही काय काय कोंबत असते त्यांत. खरंतर यातल्या बऱ्याच गोष्टी इकडेही असतात. कशाला उगीच पाठवते म्हणून चिडतोही. पण बोलण्याकडे दुर्लक्ष करीत माझं लक्ष नाही पाहून हळूच एकेक वस्तूंना पिशवीच्या कुशीत निवारा करून देते.

परतीच्या प्रतीक्षेत अंगणात उभ्या असलेल्या गाडीत एकेक वस्तू आपापली जागा पकडून माणसांसह स्थानापन्न होतात. तोपर्यंत आईही तेथे पोहचते. थकल्या हातांनी खिडकीची काच उगीचच घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करते. निरोप देताना स्वर कातर होतो. आवाजातला कंप लपवण्याचा उगीचच प्रयत्न करीत राहते. डोळ्यांच्या कडा पाणावतात. थरथरता हात नातवंडांच्या पाठीवरून, डोक्यावरून ममतेने फिरत राहतो. थांबून, थांबून ही मुलं अशी किती थांबणार, म्हणून थोड्या वेळाने तीच म्हणते, ‘निघा बाळांनो, सुखानं राहा! अधून-मधून येत राहावं. थकल्या जीवाला तेवढंच बरं वाटतं रे!’ 

सारे निघण्याच्या तयारीत. तरीही तिची पाऊले तेथून नाही निघत. शेवटी न राहवून मी म्हणतो, ‘आणखी किती थांबशील अशी येथे! निघतो आता आम्ही. पोहचलो की, कळवतो.’ 

तिची पाऊले अनिच्छेने अस्वस्थ हालचाल करतात. आमची पाऊले परतीच्या वाटेला लागतात. ती आहे तिथेच उभी. अंतर वाढत जातं. अस्पष्ट होत जाणाऱ्या गोतावळ्याच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे ती पाहत राहते. दिसणाऱ्या प्रतिमा हळूहळू धूसर होत जाऊन दृष्टीआड होतात. गावमातीची गंधभारली धूळ सोबत घेऊन पावले पुढे चालत राहतात अन् पाठीमागे पसरत जाणाऱ्या धुळीच्या पडद्याआड नजर क्षीण झालेल्या डोळ्यात आभाळ उतरून येतं असतं. 

0 comments:

Post a Comment