'Swant Sukhay' | ‘स्वान्त सुखाय.’

By
कॅलेंडरची पानं एकेक करून उलटवली गेली. जानेवारी ते डिसेंबर असं एक आवर्तन पूर्ण झालं. कालगणनेचे एक वर्ष संपून दुसरं नवं वर्ष सुरु झालं. कॅलेंडरच्या पानातल्या चौकटींना पार करीत तेही पूर्ण होईल. तीही पानं उलटली की, परत नवं वर्ष. वर्षे येतील आणि जातील. माणसे आपल्या परीने ती साजरी करतील. प्रत्येकाच्या कल्पकतेने ते साजरे होतीलही. नव्या वर्षासाठी काहीजण कोणतेतरी संकल्प करतील. केलेले संकल्पही नवलाईचे नऊ दिवस संपले की, संपतील. कालचक्र अनवरत फिरत राहील. काळाच्या वर्तुळात फिरताना मी, तुम्ही, आपण सारे आनंदाचे काही लहानमोठे तुकडे जमा करण्यासाठी धावाधाव करीत राहिलो. काही लागले हाती. काही निसटले. काही राहिले. मिळाले नाही ते यावर्षी मिळवायचे म्हणून असेच कोणतेतरी संकल्प करु, त्यातील किती पूर्ण होतील? हे काळालाच माहीत.

हे लिहिण्याचं कारण, मागील दोनतीन वर्षापासून आमचा चिरंजीव सतत सांगत होता “पापा, तुम्ही शिक्षक. वर्गात बोलणं, शिकवणं तुमचं काम. ते तर तुम्ही करतातच. पण ते किती जणांसाठी? दिवसातून फार-फारतर चार-पाचशे मुलामुलींकरिता. तास संपला, तुम्ही वर्गाबाहेर आणि तुमचं बोलणंही. तुमचं बोलणं किती काळ विद्यार्थ्यांच्या मनात राहत असेल. काही तास, दिवस, महिने. बस्स, एवढंच. बरोबर ना!” मुलाच्या या प्रश्नाने माझ्यातील शिक्षक जागा होतो. (कदाचित डिवचल्या जाणाऱ्या) म्हणतो, “म्हणजे? अरे, असे असतेतर इतक्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक म्हणून आवडीने (!) मला स्वीकारले तरी असते का?” “ते ठीक आहे, तुम्ही चांगले शिक्षक आहात. (?) विद्यार्थी तुमचा आवडते शिक्षक म्हणून अभिमानाने वगैरे उल्लेख करतात. मीही तसाच करतो. (पापा म्हणून कसा, ते नाही सांगितले; पण चांगलाच असावा!) मराठी, इतिहास विषय शिकवणारा शिक्षक असाच असतो, (की असावा?) हे मी तुमच्याकडून शिकताना अनुभवले आहे. पण तुम्ही तुमच्या भोवतीच्या परिघालाच जग समजून, त्या भोवती स्वतःच ठरवून घेतलेल्या वेगाने फिरत आहात आणि त्या गतीलाच प्रगती समजत आहात, नाही का?”

मला काही समजले नाही. म्हणलो, “म्हणजे?” “अहो पापा, या परिघाबाहेर आणखीही एक प्रगत अन् व्यापक जग आहे. थोडं त्याकडे तुमचं पाऊल वळवा ना! नाहीतरी तुम्हीच म्हणाला होता ना की, काळाशी जे सख्य साधत नाहीत, जुळवून घेत नाहीत, ते मागे पडतात. शिकणं, शिकवणं म्हणजे चार भिंती आणि त्यावरील छताच्या आतला सीमित संवाद नसतो. तुम्ही हा संवाद नव्या तंत्रज्ञानाने इतरांशीही साधू शकतात.”- चिरंजीव. मला काहीच समजे ना. “म्हणजे, तुला काय म्हणायचे आहे, ते नीट कळू तरी दे!” - मी. “पापा, मी कधीपासून सांगतोय तुम्हाला. तुम्ही शिकवतात चांगलं, बोलतातही छान, फक्त बोलतातच; पण लिहितात कुठे? मग लिहा ना काही तरी. दिसामाजी काही तरी लिहित जावे, हे संत वचनातील शब्द तुम्हीच आम्हाला शिकवले. ते काही नाही, मी तुम्हाला ब्लॉग तयार करून देतो; मग तुम्ही लिहा वेळ असेल तसे, शक्य असेल तितके. लिहताना लेखनाच्या मर्यादा सांभाळून लिहिले म्हणजे पुरे.”

आता मला सारं समजलं. मुलांना आपण वर्गात जे शिकवलं, त्याचं हे पोरगं उपयोजन करतंय. माझंच शिकवणं मला शिकवतोय. “ठीक आहे! चला लिहू या, पण एक शंका. समजा मी लिहिलं, तर ते तुझ्या पिढीला वाचावसं वाटेल? मी काही कोणी लेखक, साहित्यिक नाही लिहायला. आणि मी लिहिलेलं लोकांनी तरी का वाचावं?”- मी. “पापा, लिहिण्यासाठी लेखक, साहित्यिकच असावं लागतं, असं कोण म्हणतंय? कोणत्याही साध्या माणसाच्या मनात आपणही काही लिहावं, असे विचार नाही का येवू शकत? आणि त्यानं लिहलं तर लोकांनी वाचावंच, असं काही नाही. लिहिल्यानंतर तुमचं तुम्हाला समाधान मिळालं, मग पुरे! आणखी कसला विचार का करायचा."- इति चिरंजीव.

अरेच्च्या ! ‘स्वान्त सुखाय’ हे साहित्याच्या लेखनाचं एक प्रयोजन असतं, असं मराठीची पदवी घेताना कधीतरी शिकलो होतो. हे कारटं तर आज आपल्याला हेच सांगतंय. म्हणजे, मराठी विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली मी. आणि संगणक विषयाची पदवी घेणारं, हे पोरगं मला साहित्यलेखनाचं प्रयोजन शिकवतंय. चला, ठीक आहे. करू या प्रयत्न, म्हणून घेतली लेखणी हातात. बघू या, कसं जमतयं! जमेल तसे आणि जमेल तेवढे लिहू या.

येणारी पुढची पिढी मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून जन्माला आलेली असल्याकारणाने तिला लांबचं क्षितिज दिसतं, असं म्हणतात. कदाचित या लांबच्या क्षितिजाला आपण पाहिलं नसलं, तरी तेथपर्यंत नजर पोहोचवण्याची माध्यमे आज आपल्या हाती आहेत. तसंही पुढच्या पिढीला लांबचं क्षितिज दाखवणारा खांदा तर आपलाच ना! विज्ञानतंत्रज्ञानाने मंडित जगात या पिढीला वावरताना, अशा गोष्टीची कदाचित अपूर्वाई नसेलही. या पिढीचं नातं नावीन्याशी आहे. पण आपली पिढी संक्रमणाच्या सीमारेषेवर उभी असल्याने आपलं नातं दोन्ही काळाशी आहे, हे आपलं भाग्य नाही का? कदाचित या पिढीएवढा वेग धारण करून आपणास धावता नाही येणार, पण तंत्रज्ञानाची एक खिडकी उघडून त्यातील गती, प्रगतीचा आपण थोडासा अनुभव घेवू शकतो. नाहीतरी शिकायला वयाचं बंधन असतंच कुठे. आम्ही शिकलो, आज वर्गातून शिकवतो; पण शिकण्याला विराम आहेच कुठे! म्हणतात ना, ‘थांबला तो संपला.’ पण संपेपर्यंत आपण थांबायचंच कशाला? चालत राहू. एकटेच का असेनात. लिहिलेले आवडले काहींना तर आनंदच. नाही आवडले, तर लेखनाचं एक प्रयोजन आहेच ना ‘स्वान्त सुखाय’. 

3 comments:

  1. Great sir.. he shabd vacun vargatle te tas athvle je vatayche ki kadhich sampu nayet...

    ReplyDelete
  2. Sir, hatts off!!! You are great sir.shalet asatana tumhi lecture la astana kasalich athavan yaychi nahi phackt tumache shabadna kade laksha rahaycha, aaj tumcha blog vachala ani june divas athavale.....sir we are waiting for more posts....

    ReplyDelete
  3. WOW...............great sir...........................greatest block in Marathi ever.................really...........u r a great person........................I am proud that u r my class teacher in this year......................

    ReplyDelete