Nav-varsh | नववर्ष

By
२०१३ हा अंक बदलून त्याजागी २०१४ अंक कलेंडरच्या पानांवर अंकित होईल. कालचक्राचा एक छोटासा तुकडा, जो मोजण्याच्या सोयीसाठी आपण केला आहे. तो संपेल. पुढच्या क्षणाला लागून आलेल्या क्षणाच्या संधिप्रकाशात नववर्षाचे आगमन होईल. वर्तमानात त्याला आठवताना फक्त स्मृतिशेष आठवणी निघत राहतील. पुढचा येणारा क्षण जो भविष्य असेल, त्याविषयी आम्ही काही विचार करू का? केला आहे का? विचारलं तर बघू, पुढचं पुढे! कदाचित अशीच मानसिकता माझ्यासह आपल्यापैकी बऱ्याच जणांची असेल.

माणूस मुळात उत्सवप्रिय प्राणी असल्याने, तो सणवार साजरे करण्यासाठी कोणतीतरी निमित्ते शोधतो, ठरवतो. तेवढेच आनंदाचे चार क्षण आयुष्याच्या ‘सेव्हिंग अकाऊंटमध्ये’ जमा खात्यावर असण्याचे समाधान. कधीही समाधान न देणारी आयुष्यातील गोष्ट म्हणजे, समाधान! हे माहीत असूनही असे क्षण तो शोधत असतो. मानसिक समाधान नावाचं मृगजळ माणूस जन्माला आला तेव्हापासून शोधतोच आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या समाधानाच्या क्षणांची परिभाषा प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात बदलत राहिली आहे. ते मिळवण्याच्या आणि साजरे करण्याच्या तऱ्हाही बदलतच आहेत.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना जोडणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांना माणसाने उत्सवाचे निमित्त दिले. नव्यावर्षाच्या स्वागताला समोर जावं कसं, याची नियोजने झाली असतील. जो तो आपापल्यापरीने आनंद मिळवीलही. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंध फेसाळ रात्रीला काहींची बेधुंध पाऊले थिरकतील. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. मध्यानरात्री नवा सूर्य उगवल्याचा आनंद माणसांच्या मनात प्रकाशित होईल. गारठलेल्या थंड वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंधीत नवं वर्ष येईल आणि पुढे जाईल. अर्थात, सगळेच नववर्षाचं असं स्वागत करत असतील, असं नाही. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची छोटीशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठीही निघतील.

हा आनंद साजरा करण्याचं भाग्य इहतलावरील साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केले नसेल. नववर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा हजारो माणसं अर्धपोटी- उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी हव्या असणाऱ्या भाकरीच्या शोधात झोपले असतील. आयुष्यातील सरलेलं वर्ष भाकरीच्या शोधात संपले. येणारे वर्ष कदाचित भाकरीच्या विवंचना सोबत घेऊन अंगणात येईल. शेकडो आदिवासी डोंगरदऱ्यात, रानावनात जगण्याचा शोध घेत भटकत असतील. भटके विमुक्त आपापली पालं घेऊन व्यवस्थेच्या चौकटीत पोटापुरती भाकर आणि निवाऱ्यापुरतं आखर शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात जगण्याच्या उद्याची सुखं शोधत असेल. हक्काच्या शिक्षणाचा कायदा असूनही शाळेत शिकून जगण्याची कोणतीही स्वप्न पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून कचऱ्याच्या कुंडीत जगण्याचे वास्तव लहान, लहान हात शोधत असतील. खूप पाणीपाऊस असूनही डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन वणवण फिरणाऱ्या वाडीवस्तीवरील बायाबापड्या त्यांच्या दारी जलगंगा येईल कधी, या विवंचनेत पाण्याचा पाझर शोधत असतील. शिक्षण नावाच्या व्यवस्थेत पास झालेला आणि हाती पदवी घेऊन भटकणारा सुशिक्षित बेरोजगार जगण्याच्या परीक्षेत खरंच आपण नापास आहोत का? या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल. कालचक्राच्या गतीत अशी कितीतरी आयुष्ये गरागरा फिरत असतील. जी आपल्या नजरेस आली नसतील. गेल्यावर्षात ती फिरत होती. येणाऱ्या वर्षातही अशीच फिरत राहतील का?

जाणारं आणि येणारं वर्ष वार, महिन्यांच्या हिशोबाने सारखंच असलं, तरी काहींच्या वाट्याला त्याच्या गणिताचे हिशोबच जुळत नाहीत. काहींसाठी सुखाचं आणि काहींच्या वाट्याला दुःखाचं, असं का यावं? कदाचित काही म्हणतील, शेवटी ज्याचं त्याचं दैव. मग हेच दैव असेल, तर त्यानं माणसा-माणसांमध्ये असा भेद का करावा? जाणाऱ्या वर्षाला भेदाच्या भिंती पाडता नाही आल्या, निदान येणाऱ्या वर्षाने तरी ह्या भिंती उध्वस्त कराव्यात. जागतिकीकरणाने जग जवळ आल्याचे आपण म्हणतो; पण अगतीकीकरण झालेल्यांच्या आयुष्याचे काय? आस्थेचा, आशेचा प्रकाश घेऊन येणाऱ्या वर्षाने वंचितांच्या, उपेक्षितांच्या दारी यावे. त्यांच्या उसवलेल्या आयुष्यात प्रगतीचा, परिवर्तनाचा प्रकाश निर्माण करून अंधारलेलं जगणं उजळून टाकावं. अशी अपेक्षा करायला काय हरकत असावी? नाहीतरी माणूस प्राणी आशावादी आहेच ना! 

1 comment:

  1. superb sir........fabules.................I am always impressed ......................when I read ur status...................happy new year for all poor peoples in whole india........

    ReplyDelete