तो, ती आणि...

By // No comments:

कुणीतरी मी :

तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील केवळ अक्षरे, की कुणीतरी कुणाला अधोरेखित करण्यासाठी आकलनाच्या प्रतलावरून प्रवास करणारे शब्द, की अर्थाचे आणखी काही आयाम घेऊन येणारे संदर्भ, की आणखी काही? काहीही असो, पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो एवढं नक्की. कुण्या अज्ञाताने कसल्याशा कारणाने कधीकाळी कुठल्यातरी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे ध्यानीमनी नसताना हाती लागतात अन् काळाच्या कोपऱ्यात गाडले गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात आपल्यापर्यंत, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विसावलेले अध्याय नव्याने वाचले जातात अन् आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. जगण्याच्या वाटेवर अशा किती गोष्टी हरवल्या आणि गवसल्या असतील, ते इतिहासाच्या पानात पहुडलेल्या काळाच्या तुकड्यांनाच माहीत. प्रक्तानाने परेलेल्या वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, हरलेले, जिंकलेले, जिंकूनही हरलेले, हरूनही जिंकलेले असे कितीतरी तो आणि ती काळाच्या अफाट विवरात सामावले असतील. काही कायमचे हरवले, काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण सगळ्यांच्या ललाटी नियतीने अनुकूल अभिलेख लेखांकित केलेले नसतात. 

तो आणि ती एकाच पथावरून मार्गस्थ झालेले पथिक की, पात्राच्या मर्यादांचे तीर पकडून समांतर सरकणारा प्रवाह. वाहणे सोबत, पण कधीही एक न होणारे. की प्रवाहात पडल्याने काही काळ सोबत करीत निघालेले, पण उसळत्या लाटेच्या आघाताने विलग होऊन अनामिक दिशेने ढकलले गेलेले. वाहणे होते, पण सामावणे नव्हते. की वावटळीच्या आवर्तात अडकून नुसतेच दिशाहीन भिरभिरत फिरणाऱ्या पानासारखे. यांच्या असण्या-नसण्याला कुणी काही म्हटले, तरी त्याने फार फरक नाही पडत. काळाच्या मनातील गणिते काही वेगळीच असतात. तो त्याच्या मर्जीने सोंगट्या सरकवीत असतो. 

तो आणि ती काही कोणी वेगळे नव्हते अन् अलौकिक वगैरे तर नव्हतेच नव्हते. चारचौघांसारखे आणि चारचौघातले एक. पण शोधलं तर चारचौघांपासून वेगळे. हे वेगळेपणही निकषांच्या पट्ट्या घेऊन पडताळून पाहिलं तर निराळे आणि नाहीच पाहिलं, तर सामान्यांसारखे. समजा घेतलाच जाणीवपूर्वक आणखी थोडा धांडोळा, तर यांचं चारचौघांपासून वेगळं असणं, हीच त्यांच्या वेगळेपणाची ओळख. असं काय वेगळं होतं यांच्यात? 

आता वेगळंच करायचंच आखून घेतलेल्या चौकटींतून, तर तो आणि ती किंवा ती आणि तो जोडी कुठल्याही क्रमसंगतीने जुळवली तरी उत्तर एकच येणारये, मग यांना वेगळं करण्यासाठी एवढी कवायत करण्याची आवश्यकताच काय, असा प्रश्न साहजिकच मनात येईल. यांच्या असण्याला निर्देशित करणाऱ्या अक्षरांच्या कानामात्रावेलांटीला वेगळं म्हणायचं इतकंच. असंही सांगता येईल. अर्थात, असं म्हणणंही अवास्तव नाही. पण तरीही हे वेगळेपण यांना पुन्हा एकाच अक्षावर आणून उभं करणारंच आहे, नाही का? खरंतर दोघांनाही दोन वाटांनी येऊन एकाच वळणावर आणून विसावणारं. 

यांचं सोबतीने जुळणं ठरवून निवडलेला प्रवास होता, निव्वळ योगायोग होता, की नियतीने नियत केलेला मार्ग होता, की निसर्गाने त्याच्या नियमांचे अनुमान काढण्यासाठी केलेल्या प्रयोगाची पात्रे होती ही? यातील नेमकं एकच एक कारण सांगणं अवघड. म्हणून प्रत्येकाने आपआपल्या आस्थेने अर्थाच्या आशयाला अधोरेखित करणं अधिक सयुक्तिक. पण एक मात्र नक्की की, यापैकी नक्कीच काहीतरी होतं. या काहीतरी शब्दात बरंच ‘काही’ सामावलेलं. सरळ रेषेत बघायची सवय असणाऱ्या नजरेला हे दिसणं जरा अवघड. 

सरळसरळ सांगायचं, तर तो आणि ती आपणास एकमेकांसाठीच घडवलं आहे, असं समजण्याचा प्रमाद करीत होते. अनेक जण करतात. यांनीही केला. पण घडणाऱ्या प्रमादाला एक देखणी किनारही होती. वर्तनात संकेतांच्या चौकटीं पार करून प्रवास करू पाहणारे पर्याय होते, पण विचारांत विचलित करणारा संदेह नव्हता. यांच्या नजरेला नितळपण लाभलं होतं, पण पाहणाऱ्यांच्या नजरांना ते मिळालं नव्हतं. म्हणून की काय कुतूहलाची उद्गारचिन्हे अंकित व्हावीत, तिथे संदेहाची प्रश्नचिन्हे अधिक ठळक होत होती.

अडीच अक्षरांची सोबत करीत प्रकटणारा एक आशयघन शब्द - प्रेम. अर्थाचे किती पदर. संदर्भांच्या किती कोमल कळ्या. आशयाच्या किती उत्फुल्ल पाकळ्या. आकलनाचे किती बिंदू. जगण्याचे किती अर्थ या एका शब्दांत सामावलेले आहेत. याच्या संदर्भांच्या पाकळ्या उलगडतात, ते शहाण्यांच्या जगात उगीचच वेडे ठरतात. असं वेड मुळात आतच असायला लागतं. एकदाका ते धमन्यांतून वाहू लागलं की, थांबायला अवधी असतोच कुठे. हा प्रवास मेंदूपासून मनाकडे नाही घडत. याचा आरंभ मनातून होतो आणि अंत मनातच. म्हणूनच की काय भावनांच्या आवेगात अवरुद्ध झालेल्या मनाने घेतलेल्या निर्णयांना चुकण्याचा शाप असावा. 

मनातल्या मनात समीप राहण्याचं प्रत्यंतर प्रेमात पडलेल्यांना प्रत्येक पळी येत असावं. असतं. प्रेमात पडणं कदाचित अपघात असू शकतो. कुणाच्या मते गफलत असू शकते. कुणासाठी समस्या किंवा फार थोड्यांसाठी सुखांचं अंगणभर पसरलेलं चांदणं. काहींना हे सगळं अविचार वगैरे वाटेल. कोणाला काय, आणखी कोणास काय. पण या परगण्यात विहार करणाऱ्यांना एवढा विचार करायला उसंत असतेच कुठे. समजा, असली तरी उमजून घेण्याएवढं शहाणपण मोहर धरलेल्या ऋतूची सोबत करताना उरलेलं असतंच कुठे.

तर, तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहत होते. वाऱ्यासोबत गाणी गात होते. पावसात भिजत होते. फुलांसोबत खेळत होते. पाखरांसोबत उडत होते. फुलपाखरांच्या पंखात रंग भरू पाहत होते. उगवत्या सूर्याच्या कोमल किरणांच्या वर्षावात नाहत होते. चंद्राच्या प्रकाशात मनातलं गुज कथन करीत होते. चांदण्यांच्या सोबत बोलत होते. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचित होते. स्वप्नांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर झोके घेत होते. उगवणारा दिवस आनंदाची पखरण करायचा. संधिप्रकाशाचा हात पकडून आभाळाने मावळतीच्या क्षितिजावर रंगांची केलेली उधळण यांच्या अंतरी आस्थेचे किती किती रंग भरायची. काळोखाची चादर देहावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करायच्या. अलगद पावलांनी धरतीवर चालत येणारा अंधार कधी मनात उगीचच काहूर कोरायचा. मनात दाटून आलेल्या अनामिक अस्वस्थतेने कधी कातरवेळा कातरकंप करायच्या. अर्थात, हे सगळं वेडं असल्याशिवाय घडत नाही. म्हणून ते वेडेच होते. तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी अन् दोघे एकमेकांसाठी.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने मनाच्या गाभाऱ्यात कधी सामावून घेतलं, काहीच आठवत नाही. नेमका आरंभ कुठून आणि कुणाकडून झाला? शोधूनही उत्तरे हाती लागली नाहीत. मग घडलंच कसं हे सगळं? असा कुठला चुकार क्षण होता, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा? अशी कोणती स्पंदने होती, एकच सूर छेडणारी? असे कोणते बोल होते, जे एकच गाणं गात होते? शोधणं अवघड आहे. खरंतर नाही सांगता येणार नेमकं, हे म्हणणं अधिक योग्य. पण कुठल्यातरी गाफील क्षणी हे घडलं अन् त्यांचे प्रत्येक पळ प्रतीक्षेच्या तीरावर संचार करीत राहिले.

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. प्रेमपरगण्यात विहार करायला कसली आलीयेत मर्यादेची वर्तुळे! उमलतं वयचं वादळविजांचं. या स्वप्नाळू वयाच्या आसपास दोघेही. नवथर संवेदनांचे पंख लेऊन अवघं आकाश आपल्याला आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करीत होते. तसं हे वयच झोपाळ्यावाचून झुलायचं. दोघेही झोक्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहत होते. त्यांना खुणावत होतं ते. मनाच्या अथांग विवरात लपलेल्या आकृत्यांचा शोध घेता घेता मनं कधी इकडची तिकडे गेली, कळलंच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं ना! वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना सावकाश सरकणे रुचेल कसे? मनात विसावलेल्या वाटेने दाखवलेलं वळण त्यांनी निवडलं. धावले तिकडे. रमले. जगाच्या गतिप्रगतीच्या खुणांपासून कोसो दूर. भावनांच्या वर्षावात चिंब चिंब भिजत राहिले. किनाऱ्याच्या वाळूवर कोरलेल्या आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचे अर्थ शोधून पाहू लागले. 

तो- देखणेपण नियतीकडून घेऊन आलेला. उजळ वर्ण. वर्णाला साजेसा देह. रेखीव चेहरा. त्यावर प्रसन्नतेची पाखरे सतत विहरत राहणारी. सरळ दिशेने चालत येऊन चेहऱ्यावर विसावलेल्या नाकाने देखणेपणाला अधिक आखीव केलेलं. डोळ्यांच्या डोहात अथांगपण सामावलेलं. उंची आणि देह देखणेपणाची गणिते आधीच करून निसर्गाकडून मागून सोबत आणलेले. देखणेपणाला घडलेला उमदेपणाचा संग. सहजसुंदर बोलण्याची मिळालेली देणगी समोरच्याच्या मनावर आपसूक गारुड करणारी. शब्दांच्या लाघवाने मंत्रमुग्ध होणारी मने परत परत मोहात पडावी असं वागणं. कदाचित काहींना नियतीच सुंदरतेचे साज चढवून इहलोकी पाठवत असावी.

ती- रंगरुपाने डावा कोण अन् उजवा कोण, याची तुलना करण्याचा मोह व्हावा असे दोघेही. पण त्याच्याशी तुलना करताना गौरकांती विशेषण तिच्याबाबत वापरता आले नसते. पण तिच्या सावळेपणातही एक आशयघन अर्थ दडलेला. नितळ अंगकांती शब्द तिच्या सौंदर्याचे परिमाण परिभाषित करायला पर्याप्त होता. वाऱ्याच्या संगतीने स्वैर खेळणारे काळेभोर केस. टपोऱ्या पाणीदार डोळ्यांमध्ये खच्चून भरलेलं खट्याळपण. धनुष्यालाही हेवा वाटावा अशा भुवया निसर्गानेच कोरून ठेवलेल्या. पापण्यांच्या पंखात दडलेली डोळ्यांची पाखरे सतत काहीतरी वेचत असायची. चाफेकळीने लाजून चूर व्हावे असे नाक. उमलत्या वयाची वाट पकडून येणारी बंधने झुगारून अवखळपणाचा झरा झुळझुळ वाहत होता. संमोहनाच्या बिंदूवर नेऊन उभं करणारं निखळ सौंदर्य. सहजतेची परिमाणे परत पारखायला लावणारं. देहाच्या आकृतीला कमनीय बांध्याचा लाभलेला घाट अन् या सगळ्या सरंजामासह जगण्यात सामावलेला बेधडकपणाचा थाट. कुठल्याही प्रसंगाला थेट भिडायचं धाडस. स्व-तंत्राने वर्तने. प्रसंगी काहीसं बेफिकीर असणं आणि तसंच जगणंही. कोण काय म्हणेल, म्हणून कधी काळजी न करण्याएवढा बिनधास्तपणाही.

मुग्ध वयाच्या वाटेने सोबत करीत निघाले दोघेही. मुक्कामाचे ठिकाण माहीत नसूनही चालत राहिले. आमंत्रण देणाऱ्या चोरट्या कटाक्षांपासून झालेला आरंभ आव्हानापर्यंत अन् तेथून आणाभाकांपर्यंत पोहचला कधी दोघांना कळलेच नाही. कधी कळत, कधी नकळत, कधी ठरवून घडणाऱ्या या प्रवासाचा विराम बिंदू काय असेल, त्यांनातरी नेमकं कुठे माहीत होतं? आस्थेचे अनुबंध विणले जात होते. अनामिक हुरहूर, आस, ओढ वगैरे शब्द आपला अंगभूत आशय सोबत घेऊन कोशात लपले. पण नवा आशय, नवे अर्थ दिमतीला घेत यांच्या जीवनकोशात अलगद येऊन सामावले कसे ते ना याला, ना तिला कळलं. ते समजून घ्यायची संधी मिळाली नाही, असं नाही. तिने साद घातली, पण यांना प्रतिसादाचा प्रतिध्वनी नाही होता आलं. वारंवार दस्तक देऊनसुद्धा त्याकडे पाहणे जमलेच नाही. समजून घ्यायची आवश्यकताच वाटली नाही. वाटेलच कशी? संकल्पनांच्या पटावर आपला सारीपाट मांडून खेळणाऱ्यांकडे इतर गोष्टी समजून घ्यायला तसाही अवधी असतोच कुठे? अनामिक स्पंदनांना आस्थेचं कोंदण मिळालं अन् अलगद पावलांनी चालत आलेल्या आपलेपणाने आपला अधिवास एकमेकांच्या अंतरी शोधला.  

तो :
 
‘मनाची मनोगते मेंदूला बहुदा कळत नसावीत. कळली तरी वळत नसतात की काय, माहीत नाही! वळायचा प्रयत्न केला, तरी मन त्याला दाद देईलच असं नाही, हेच खरं.’ कुणीतरी असं काहीतरी सांगायचं, तेव्हा नवल वगैरे वाटायचं या सगळ्याचं. मला तरी कुठे ठाऊक होतं, असं काही माझ्या जगण्याचा भाग होईल एक दिवस म्हणून! प्रघातनीतीचे किनारे पकडून वाहणारा अनेकातला मीही एक. अगदी तंतोतंत मापात वगैरे नसलो, तरी चारचौघांसारखा. माझं वागणं याहून आणखी काय वेगळं असणार? गुंता जगण्याच्या वाटेवरील विकल्पविहीन पर्याय असावा बहुतेक. तसंही प्रत्येकाचे गुंते वेगळेच की! नावे निराळी, समस्या वेगळ्या असल्या म्हणून अर्थ नाही पालटत काही. तसेही जटिल गुंत्यात गुरफटणे कोणाला आवडेल? पण काही गुंतेच इतके लाघवी असतात की, ठरवूनही त्यांचा मोह टाळता येत नाही. भ्रमर कमलपुष्पांच्या मोहात अडकतोच ना! 

खरं सांगायचं तर व्यवस्थेच्या अफाट पसाऱ्यात नजरेत भरण्याएवढ्या अस्तित्वाच्या ठळक खुणा भिंग घेऊन शोधूनही न सापडणारा मी एक. पण कसा कोण जाणे, या पडावावर पोहचलो. नजरेला नजर भिडली. विसावलेल्या क्षितिजावर एक पुसटसा बिंदू कोरला गेला. त्याच्या असंख्य शक्यतामधून एक रेघ ओढली गेली. कळत असेल अथवा नकळत, काही म्हणा, त्याने काही लक्षणीय फरक नाही पडत. पण माझ्या असण्यात फरक पडायला आरंभ झाला, जेव्हा ही रेघ नजरेत सामावण्याएवढी ठळक होत गेली. मोहाच्या मधुर ओढीने वाढत गेली. गुंत्याचे बहुपेडी गोफ विणले जात होते. धांडोळा घेऊनही उत्तरांची उकल करणारा धागा हाती लागत नव्हता. लाटा किनारा कवेत घेऊ पाहत होत्या. कोणत्या चुकार क्षणाने पारध झाली, माहीत नाही. पण घाव थेट काळजावर! तीव्रकोमल संवेदना घेऊन जखम वाहत राहिली. आपला किनारा शोधत राहिली. उसळता दर्या आपलासा वाटू लागला. त्याच्या उसळणाऱ्या लाटा आमंत्रित करीत होत्या. त्याची गाज सुरांचे साज लेऊन सजू लागली.

घरपरिवार, स्नेहीसवंगडी आदि नात्यांचे तीर धरून सरळ वाहणारा प्रवाह अनपेक्षित वळण घेऊन गवसलेल्या उताराच्या दिशेने वळता झाला. खुणावणाऱ्या क्षितिजाचे आकर्षण वाटू लागले. त्यावर देखणेपणाचा साज चढवणारे रंग आपलेसे वाटू लागले. 

खरं सांगू, तिच्या अभिमंत्रित पाशात मन कधी कैद झालं कळलंच नाही! तिचा अटकर बांधा संवेदनांना आमंत्रित करू लागला. तिच्या मुखातून प्रकटणारा प्रत्येक शब्द सुरावटी वाटू लागल्या. तिचं पळभर दिसणंही मोरपीस बनून देहावरून फिरू लागलं. तिलाही याची जाणीव असेल का, म्हणून उगीचच स्वतःच स्वतःला हजार प्रश्न विचारू लागलो अन् उत्तरेही स्वतःच देऊ लागलो. तिच्या एका कटाक्षासाठी मन झुरणी लागायचं. नजरेचा ओझरता स्पर्शही किती आनंददायी वाटायचा. 

सवंगडी सोबत असूनही त्यांच्या सोबत नसणारा मी तिची सोबत करता कधी झालो, कळलंही नाही. कायेने कोलाहलासोबतच असायचो, पण मनाने तिच्याभोवती. मकरंद मिळतो म्हणून मोहात पडलेल्या भ्रमरासारखा भटकायचो तिच्याच आसपास. मित्रांना हे सगळं दिसत नव्हतं, असं नाही. याची जाणीव झाल्यावर उगीचच विकतचं दुखणं घेऊ नको, म्हणून सावध करण्याचे का कमी प्रयत्न केले त्यांनी. सगळं सगळं सांगून पाहिलं. पण इशारा समजून घेण्याएवढे जागेपण असायला लागते ना विचारांत. ते तर कधीच हरवले होते माझ्या चिमूटभर जगण्यातून. त्यांच्या इशाऱ्यांकडे, सांगण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. निमित्त शोधत राहिलो तिला पाहण्याचे, भेटण्याचे. भिरभिरणारी नजर तिलाच तर वेचत असायची. 

अवखळ झऱ्यासारखी वाहत राहायची तीही. वाऱ्याच्या झुळकेसारखी अलगद यायची अन् हलकेच पसार व्हायची. तिच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जाताना पावलं उगीचच मंदावयाची. डोळे शोधत राहायचे तिला इकडेतिकडे. तिला हे कळत नव्हतं का? नाही! सगळंच तिला माहीत होतं. तिनेच तर या वाटेवर चालायला आवतन दिलं होतं. परीक्षा शब्दाचा अर्थ चांगला अवगत होता तिला. अगदी प्रांजळपणे सांगायचं, तर माझ्या सहनशीलतेचा ती ठरवून अंत पाहत होती. तिचे विभ्रम अंतरी अनेक प्रश्न चिन्हांकित करीत होते. तिच्या गल्लीकडून जाण्यासाठी नसलेली निमित्ते शोधली जात. कुठलंही कारण तिथे रेंगाळायला पुरेसं असायचं. तिच्या नजरेचा ओझरता स्पर्शही किती सुखावह वाटायचा. मैत्रिणींसोबत बोलण्याचा बहाणा करून ती बघायची, तेव्हा मन किती सैरभैर व्हायचं. तिच्या चोरट्या कटाक्षाने देहावर उमललेला मोहर मनाचं आसमंत गंधित करायचा. कधी मी दिसलो की, आपल्याकडे कुणी पाहत नाही असं समजून उगीचच कुठल्याशा आडोशाचा आधार घेऊन बघायची. हे मला दिसत नव्हतं, असं नाही. पण मी तुझ्याकडे पाहिलेच नसल्याचे दाखवतांना केवढी कसरत व्हायची तिची. 

मला कळत होतं, तसं तिलाही. काहीतरी अनामिक, पण मनातून हवं असणारं घडत होतं. एकमेकांपर्यंत पोहचायची वाट सहजी हाती लागत नव्हती. मनात अवकाळी वसंत बहरून आला. अगणित सुमने उत्फुल्लतेची वसने परिधान करून मनाच्या डाहळ्यांवर झुलत होती. वारा सांगावा घेऊन वाहत होता. पानाआड दडलेल्या कोकिळेचे कूजन आपल्यालाच साद घालीत असल्याचे वाटत होते. प्रतिसादाचा प्रतिध्वनी परिसराच्या परिघावरून उगीचच प्रदक्षिणा करीत होता. वारा झुरणी लागल्यासारखा वेडावून धावत होता.

उगवणारा सूर्य उमेदीच्या किरणांची पखरण करीत होता. बोचऱ्या थंडीत भेटीची ऊब शोधली जायची. गवताच्या पात्यांवरून ओघळणारे दवबिंदू हाती पकडून ठेवण्याचा वेडा मोह टाळता येत नव्हता. अगणित जलधारांचे हात पकडून बरसणारं आभाळ मनाचं आसमंत चिंब भिजवून जात होतं. माती तृप्ततेचा गंध घेऊन आसपास गंधित करीत होती. श्रावणातला ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ आमच्या वाटांना घनगर्द करीत होता. तरारल्या पिकांचा गंध गुजगोष्टी करू लागला. पौर्णिमेचे चांदणे देहावरून पखरण करीत होतं. शुष्क उन्हाळाही आठवणींच्या हव्याशा झळा घेऊन येत होता. 

सांजसकाळ जगण्याचे नवे अर्थ शोधत राहिलो. मनात वाढणारं प्रेमाचं रोपटं ऋतूंसोबत बहरत राहिलं, आकाशाशी हितगुज करीत स्वप्ने पाहत. सृष्टीच्या सर्जनाच्या सोहळ्यात मी मुक्त विहार करीत राहिलो. पण पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर शोधून पहावं असं कधी वाटलं नाही. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आमच्या ओलावलेल्या सहवासात सामावलेली असल्याचं वाटत होतं. प्रश्न अन् त्यांची उत्तरे आमची आमच्यापुरती हाती होती. पण नियती आपल्या हाती सूत्रे घेऊन खेळ खेळत होती याचं भान कधी राहिलंच नाही. राहीलच कसं, मनाने विचारांवर कधीच अंमल प्रस्थापित केला होता. आम्हांला विचारांचं सरळपण लाभलं होतं; पण व्यवस्थेला सहसा सरळ चालता येतं नाही, हे सत्य आम्ही सोयीस्करपणे विसरलो होतो. परिणाम व्हायचा तो झालाच...!

ती :

का, कधी, कसे, कशासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी उगीचच शोधत राहिली. शोधण्यासाठी मनाची माती खोल खोल खोदत राहिले. पण एवढं करूनही उत्तरांचा एक तरी विकल्प हाती लागला का? नाही. कारण, विकल्प असतात, पण त्यांना पडताळून पाहावं लागतं याचंही भान असायला लागतं ना! आम्ही मनाने जागे होतोच कुठे. का केलं मी हे असं? अशी कोणती अनामिक आस मला त्याच्याकडे ओढून नेत होती? तो दिसावा म्हणून मन उगीच का झुरणी लागत होतं? आसपास एवढी सगळी माणसे असतांनाही याच्यातच असं काय होतं की, मी त्याच्याकडे ओढत गेली? मनापासून की मनाविरुद्ध? 

आरंभ कदाचित अपघात असेल. पण चूक तर माझीही होती. प्रमाद घडायचा होता. घडला. त्याचे बरेवाईट परिणाम घडणारच होते. त्यासाठी कुणाला दोष देण्यात काय अर्थ आहे? या सगळ्या प्रकाराची अंधुकशीही जाणीव मनाला नसावी का? काय म्हणावे माझ्या अशा वागण्याला? परिणामांना सामोरे जाण्याची तयारी का केली नसेल मी? आज मन उगीच खंतावतंय. स्वतःवर चिडतंय. पण आता चिडून काय उपयोग! मनाला हजार वेळा बजावत होते. नाहीच या रस्त्याने धावायचं म्हणून संकल्प करीत होते. निर्धार करूनही त्याच्याकडे वेड्यागत धावत होते मी. हो, मीच! केवळ मीच कारण याला, म्हणून त्रास करून घेत होते. तो आवडला मला, बस्स! का आवडला? याचं उत्तर माझ्याकडे तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही. बहुदा त्याच्याकडेही! पण काहीतरी खासच असेल ना त्याच्यात, म्हणून मनाला मोहिनी पडली! कुणीतरी गारुड केल्यागत त्याचीच मूर्ती मनाच्या कोऱ्या कातळावर कोरीत राहिली. आकार देणाऱ्या अनेक आघातांनी आखलेल्या या आकृतीच्या रेषा थोडीच मिटता येणार होत्या. नको मिटू देत! नकोच मिटायला! मला याच आकारात आस्थेचे अनुबंध शोधायचे होते. जगण्याचे ऋतू सांभाळून आयुष्याचे सोहळे साजरे करायचे होते.

तुला कदाचित नसेलही याची वार्ता. तसं आपण रोजच एकमेकांना दिसायचो. पण त्या दिसण्यात, पाहण्यात सहजपण होतं. वाढत्या वयाच्या वाटेने देहाला चैतन्याची पालवी फुटली. डाहळ्या शहारून आल्या. अंकुरणारी पालवी स्वप्नांचे अगणित रंग घेऊन सजू लागली. सजण्याचा सोहळा साजरा होत होता. स्नेहाचे साकव त्यावर कधी घातले गेलेत, समजलेच नाही. पावले त्या वाटेने कधी वळती झाली कळलंच नाही. आपणच आखलेल्या पथावरून धावताना धापा टाकत राहिले. वणवण करीत राहिले. आपलेपणाचा ओलावा शोधत राहिले. 

वाऱ्याच्या संगतीने उडत आलेल्या बीजाने मातीत मुळं रुजवावी, तसं तुझं असणं माझ्या मनात, देहात रुजत गेलं. ओंजळभर ओलावा शोधत मुळं मातीला घट्ट बिलगावी तसा तू माझ्या असण्याला घट्ट वेढून राहिला. तुला हे सगळं कळलं, तेव्हा तू किती खुलून आला होतास अन् मी किती मोहरून! पुसटशा स्पर्शाने देहातून वीज सळसळून धावली. तुझ्या त्या थरथरत्या पहिल्या स्पर्शाने केलेली किमया मनातून कधीच मिटवता आली नाही. सगळं काही मार्गी लागूनही आज इतक्या वर्षानंतरही मी हे सगळं का विसरू शकत नसेल? 

तुझ्या सहवासासाठी आसुसलेली मी...! आणि तू... तू नेहमीच अंतर राखून राहिलास. खरंतर तुझ्या गात्रांची थरथर मला जाणवत नव्हती, असं नाही. तुझ्या मनाची स्पंदने टिपण्याइतकी मी संवेदनशील नक्कीच होते. संमोहन शब्दाचा अर्थ मला कळत नव्हता का? की तुलाच तो अधिक समजला होता? बंधनांच्या चौकटी पार करून बाहेर पडण्याइतपत मी बेधडक होते का? की सारासार विचार करायचं विसरले होते? की मनाची मनोगते माझ्या भाववेड्या मनाला कळत नव्हती, म्हणून अविचाराने कृती घडत होत्या? 

माझ्या अशा वागण्याचा तेव्हा तू कोणता अर्थ लावलास, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. आज तू याला काय समजतो? तुलाच माहीत! पण मनांचा प्रवास जर सोबतीने घडत होता, तर मी मला एकटीला का म्हणून अपराधी मानावं? मनाच्या मातीतून उगवलेल्या रोपट्यांना मर्यादांच्या कुंपणाने तू बंदिस्त करू पाहत होता. जाणवणाऱ्या, पण न दिसणाऱ्या चौकटी तू  रेषा ओढून आखून घेतल्या अन् त्यांना ओलांडण्यासाठी बाहेर पडणारे एक पाऊल कधी उचलले नाहीस. ही तुझ्या संस्कारांची आणि माझ्या मर्यादांची सीमा असेल कदाचित. 

तू भेटत राहिलास. तुलाही ते आवडायचेच की! माझ्यासाठी तुला कासावीस होतांना पाहिले नाही, असे तुला वाटते का? तसं असेल तर तो तुझा गोड गैरसमज. या सगळ्यासाठी मी जितकी जबादार असल्याचे दिसते, तेवढंच तुझंही असणं नाही का? तू भेटत राहिलास. भेटण्यासाठी कधी मी हट्टाने तुला बाध्य करीत राहिली. तुझ्या खऱ्याखोट्या नकाराने भांडत राहिली. त्रागा करीत राहिली. तरीही तू शांतच असायचा. कसं जमलं तुला हे सगळं? तुझी घालमेल दाखवत नसला, तरी जाणवत होतीच. तुझ्या स्पर्शाची भाषा कळत होती. पण मन मानायला तयार होतंच कुठे? 

वाहणाऱ्या वाऱ्याच्या झोक्यावर झुलणाऱ्या माझ्या केशसंभारात तू हरवत होतास. शेजारी लगटून बसताना कोसळण्याच्या कड्यावर उभा राहून सावरत होतास स्वतःला. हिरवाई घेऊन पळणाऱ्या पाउलवाटेने चालताना कायकाय विचार करीत होतास. शेतात भराला आलेल्या पिकांचा गंध वेडावलेपण देहात उतरवत होता. क्षितिजावर कमान धरणाऱ्या इंद्रधनुष्यातल्या रंगाना जगण्यात सामावू पाहत होतास. रात्रीच्या अंधारात हसणाऱ्या चांदण्यांच्या ठिपक्यांना जोडत तू स्वप्नांच्या चौकटी आखत होतास. त्या आकारात मनातल्या संकल्पित आकृत्या साकारत होतास. अन् मी वेडावल्यागत तुझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहत होते. गाणाऱ्या पक्षांना माझ्या मनीचे गुज कथन करीत होते.

तुझ्या सहवासाची कोणतीच संधी सोडायला मी तयार नव्हते. नुसत्या डोळ्यांवर नाही... मनावर नाही... तर विचारांवरसुद्धा तुझ्या प्रेमाची पट्टी ठरवून घट्ट बांधून घेतली होती. तुझं तरी याहून काय वेगळं होतं रे! तुझ्याशिवाय मला काहीही बघायचं नव्हतं. तुझ्याशिवाय काहीच दिसत नव्हतं मला. मान्य! पण तू... तुला तरी दुसरं काही दिसत होतं का? हे सगळं खरं असलं, तरी जगाला सगळं दिसत होतं. किती दिवस तू मला, मी तुला अन् आपण जगाला एकमेकांपासून लपवणार होतो? घडायचं ते घडलंच. प्रेम नावाच्या अध्यायाचा अंत अटळ असतो. मग तो कसाही असो. तो घडणार होता. घडला. पण एवढ्या लवकर निर्णायकी येईल, असं नव्हतं वाटत. आणि घडला म्हणून कोसळून जायला मी अन् तू काही एवढे अविचाराने वागणारे नव्हतो. आयुष्य डावावर लाऊन जगणंच उधळायला निघालेलो नव्हतो. टोकावर उभं राहून कडेलोट करून घेण्याएवढे व्यवहारशून्यही नव्हतो. परिस्थितीला स्वीकारण्याइतकं म्हणा की, कोरभर का असेनात, पण आयुष्याचे अर्थ समजण्याइतकं शहाणपण दोघांत होतं. 

वाईट वाटलं. तगमग झाली. अस्वस्थपणही सोबतीला राहिलं. पण म्हणून विरोध केला असता तर काय घडलं असतं? ते काळालाच माहीत! आपल्या पावलांनी चालत आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचे आनंदपर्यवसायी शेवट फार कमी असतात. त्यासाठी नियतीकडून अभिलेख कपाळी कोरून आणावे लागतात. सुखांनी बहरलेल्या ताटव्यात नेण्यास नियती तयार नव्हती. अनेकांच्या कथेचा अंत झाला, तसा आपल्या कथेचाही. तेव्हा वाटलं आपलं काहीतरी आपल्याकडून निसटल्याचं, हरवल्याचं. त्या वेदना जखमा करीत राहिल्या. वाहत राहिल्या तशाच. पण काळ खूप गमतीदार असतो नाही का? बऱ्याच गोष्टी विसरायला लावतो तो माणसांना. म्हणून आज काही वाईट वगैरे वाटत नाही. मग कुणी म्हणेल, हा सगळा खटाटोप केलाच का तुम्ही? याचा अंत अटळ होता, तर या गुंत्यात गुरफटलातच का? की निसर्गदत्त आकर्षणाचा भागच अधिक असल्याने अशा अंताची खंत नाही वाटली तुम्हाला? यांना काय माहीत, निसर्गाच्या सगळ्या नियमांना पुरून उरलोच ना आपण. मोहाचे अनेक क्षण टाळले. त्याच्या अनेक उर्मी परतवून लावल्या, अगदी निर्धारपूर्वक. त्यांना भिक न घालण्याइतका संयम सोबत होता म्हणूनच ना! आज इतक्या वर्षानंतरही प्रतारणा, फसवणूक या शब्दांना आपल्या जगण्यात निदान याबाबत तरी जागाच नाही. याचा अभिमान वाटावा असंच जगलो. हेही आपल्या सहवासातून हाती आलेलं शहाणपणच, नाही का? 

तो आणि ती :

उमलत्या वयाच्या प्रेमाचं पदरी दान पडत असावं का? ते सगळ्यांच्या वाट्यास येते की नाही, माहीत नाही. पण आपल्या आयुष्यात आलं. जगण्यात सामावलं. निदान याबाबत आपण नशीबवान म्हणायला हरकत नाही. खरंतर आपण एकमेकांकडे आकर्षिले गेलो, ते वय प्रेम वगैरे समजायचं होतंच कुठे. कदाचित निसर्गाचंच प्रयोजन असेल. पण निसर्गाच्या नियमांपेक्षा नीतीच्या चौकटींचे भक्कम बुरुज भोवती बांधले असल्याने असेल का? सांगता नाही येणार नेमकं. निसरड्या वाटांवरून चालताना घसरून पडायचे अनेक क्षण होते, पण नाही घसरलो. हे आपण दोघांशिवाय कुणाला अधिक चांगलं ठाऊक आहे? जगाची नजर कोणत्या कोनातून तुमच्याकडे बघते, यावर आपलं नियंत्रण असतंच कुठे? त्यांनी समजायचं अन् सोयिस्कर अर्थ लावायचे, ही रीतच आहे. 

कितीतरी किंतु मनाच्या दलदलीत अधिवास करून आहेत, त्यांच्याकडून नितळपण घेऊन वाहण्याची अपेक्षा करावी कशी? काय नाही केलं त्यांनी आपल्यात अंतराय आणण्यासाठी. घर, घराणे, कुल, जात, परिस्थिती किती किती भिंती... ध्वस्त करायचा प्रयत्न करून टवकाही न उडणाऱ्या. शेवटी व्हायचं तेच अन् तेवढंच झालं. हताश, गलितगात्र. झालं ते योग्य की, अयोग्य हा भाग अलाहिदा. आपल्या सुखांची सूत्रे आणि वेदनांची गोत्रे वेगळी होतीच कुठे! आरंभी अधिक अवघड होतं हे सगळं पार पडायला. तू किती सहजपणे सगळं विस्मृतीच्या कोशात टाकून दिलंस हे. म्हणतात ना, पुरुष ठाम असतात. कठोर वगैरे असतात. पण मला वाटतं सगळेच कसे असू शकतील तसे? तू त्यावेळी केलं ते योग्यच वाटतं या पडावावर उभं राहून. काळाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांना कोरून पाहताना तूच योग्य होती असं वाटतंय. तुझ्या जागी मी असतो, तर एवढा पटकन निर्णय घेतला असता का? माहीत नाही. कदाचित नाहीच!
...

खरं सांगू का, प्रेमपरगण्याकडे प्रवासाचं पहिलं पाऊल मीच तुझ्या दिशेने टाकलं ना! पुढे पडत्या पावलांस गवसलेली वाट मुक्कामाच्या बिंदूवर पोहचेल की, नाही याची अंशमात्र तमा नव्हती. केवळ तू आणि मी एवढंच मला दिसत होतं. परिणाम काय असतील, याची काळजी करायला अवधीच कुठे होता अधीर मनाला. झाकून ठेवलं म्हणून कोंबडं आरवायचं थोडंच राहतं! काय नाही सोसलं केवळ तू अन् तूच मला हवा होतास म्हणून? मैत्रिणींच्या नजरा, कुणा कुणाचे सूचक टोमणे, नातेवाईकांचे नाके मुरडणे, घरच्यांचा असहकार, प्रसंगी टोकाची भांडणे, अवतीभवती सतत असणारे सक्त पहारे. आणखी किती अन् काय काय. संशयी नजरांच्या पहाऱ्यात बंदिवान असूनही डोळे तुलाच तर शोधत राहिले. तुला बघून साऱ्या वेदनांचे गाणे व्हायचे. आपलं ओअॅसिस हाती लागल्याचा आनंद व्हायचा. आनंदाचं झाड मनाच्या अंगणी वाढवताना वेदना विसरत होते. विरोधाचे वाहणारे वारे बदलतील दिशा एक दिवस, सावकाश का होईना, पण संपेल हे सगळं या वेड्या आशेने.

घडू नये ते घडणार होते. नियतीचे ते अभिलेख होते. तुला साधं खरचटलं, तरी जीव तुटणारी मी. माझं काय, मी सहन करीतच होते. पण तुझ्याबाबत वेडावाकडा विचार स्वप्नांतही करू शकत नव्हते. भलतंसलतं काही घडलं असतं तर... नुसत्या विचाराने काळीज कंप करायचं. म्हणूनच तुला बघणं, भेटणं निग्रहाने टाळत गेले, असंभव असूनही! तुझ्या मनात तेव्हा काय अन् कोणते विचार आले असतील, तुलाच माहीत. मला तू विसरावं म्हणून प्रयत्न करीत होते. तू विचलित झालास. वेडेपण करीत राहिलास. पण तुझ्या वेडेपणात टोकाचा अविचार करण्याची शक्यता नव्हती, हे माझ्याशिवाय कोणाला आणखी चांगलं माहीत असणार होतं? या उसळत्या लाटांना बांध घालणं आवश्यक होतं. 

शेवटी मीच पर्याय निवडला. विसरणं...! हो, विसरणंच! खूप अवघड होतं. पण आपलं असणाऱ्यासाठी असंभवही नव्हतं. विसरले...! हो, ठरवूनच अगदी जाणीवपूर्वक! जुळणाऱ्या बंधांना बांध घातले. निदान मनात सजवून ठेवण्याकरिता तरी ते गरजेचं होतं. एक सांगू! ते तुझ्या अन् माझ्याही भल्याचंच होतं. कारण, जुळणारच नव्हतं, त्या नात्याला उगीचच कुठूनतरी उसनवार आणलेली लेबलं लावून नावे देण्यात काडीचाही अर्थ नव्हता. असला तरी समाजसंमत संकेतांच्या चौकटीच्या कुंपणांना तो मान्य होणार नव्हता. जगणं नियतीचं देणं असेल, मन मारून जगणं शाप असेलही; पण मनात बसल्या माणसासाठी मनाला समजावून जगणं वरदान असतं, एवढंमात्र नक्की. मग कोणी काय समजायचं ते समजोत. अगदी तूसुद्धा...!

आणि आपण सगळेच :

काळ चालतच आहे. त्याला थांबवणं कोणास शक्य झालंय? त्याची संगत करीत सारेच सरकत असतात. ऋतू येतात अन् जातात. निसर्ग बहरतो. फुलतो अन् उजडतोही. जुनी पाने डाहळ्यांचा निरोप घेतात. नवी अंकुरित होतात. अंगाखांद्यावर खेळत वाढलेली पाने एकेक करून निरोप घेताना फांद्या हिरमुसतात. पण हेही काही कायम नसतं.

आसपास नव्याने सजू लागतो. काळाने कूस बदलली की बहार येतो. काही दिवसांनी तोही ओसरतो. ती त्याची नियती नसते, तर नियतमार्ग असतो. दाटून आलेलं आभाळ निथळत राहतं. ढगांच्या ओंजळी रित्या झाल्या की, आकाश मुक्त होतं. त्याचा विस्तीर्ण पट नितळ रंगांनी नटू लागतो. तोही सोहळा संपतो. दोनचार चुकार मेघ कुठूनतरी चालत येतात अन् हरवलेलं काहीतरी शोधत उगीचच इकडे-तिकडे भटकत राहतात. अवघं आकाश कवेत घेऊ पाहणाऱ्या पंखांनी विहार करीत कुठून कुठून येऊन मिळत जातात. दुरावत राहतात. वाऱ्याच्या पदर पकडून खेळत राहतात. सावकाश सरकत राहतात. गहिरे होत जातात अन् बरसण्याची प्रतीक्षा करीत राहतात. 

किंवा आणखी कोणीही :

पात्र बदलतात. थोडे इकडे-तिकडे कलते झाले, तरी घटना प्रसंग जवळपास तेच अन् तसेच असतात. पण कहाणी मात्र बहुदा तीच असते. भटकत भटकत कधीतरी अनोळखी वळणाचा हात पकडून ती चालत येते. अनामिक आस्थेचे अनुबंध घेऊन बहरत राहते, फुलत राहते, काळाच्या कातळावर अंकित होते अन् नियतीने पदरी पेरलेले पडाव पार करून परिस्थितीने पुढ्यात पसरलेल्या प्रतलावरून वाहत राहते...
चंद्रकांत चव्हाण

••