प्रयासाची पावले

By // No comments:

नितळपण अंतरी नांदते असणे सार्वकालिक आवश्यकता आहे. याबाबत किंतु असण्याचं कारण असेल, असं वाटत नाही. वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात. धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी माणसे समाजाची संपत्ती  असतात. असं काहीसं म्हणणं देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतर असतं, हेही खरंय. 

आपलेपणाचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते. निर्व्याज मनाची माणसे इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर नेटक्या विचारांनी वर्तनाऱ्या माणसांनी निवडलेल्या वाटेवरचा प्रवास असतो. तो काही पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसाद नसतो. 

सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे सदिच्छांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते व्यवस्थेचे किनारे पकडून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात निर्मळपण नांदते ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही, त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.

वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्यात काही रोपटी उगवून येतीलही. पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? कोरडेपण वाढत असतांना उरलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो. 

विचारांची विलसिते विकत नाही आणता येत. ती वेचावी लागतात. त्यासाठी माणसे वाचावी लागतात. समजून घ्यावी लागतात. अन्वयार्थ लावावे लागतात. रस्त्याने बघावं तिकडे गर्दी असंख्य प्रश्नचिन्हे घेऊन पळताना दिसते. माणसे झुळझुळ वाहणेच विसरली आहेत. साचलेपणास विस्तार नसतो. त्याच्या कक्षा सीमांकित असतात. विस्ताराचं विश्व संकुचित झालं की, विचारांची क्षितिजे हरवतात. सहजपणाची सांगता झाली की, आपलेपणाचे सेतू कोसळतात. आपणच आपल्यातून निखळत जातो. संकेतांच्या सूत्रातून सुटत जातो. 

शेकडो वर्षे झाली. माणूस काही न काही शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण हव्यास की आस्था, सांगणे अवघड आहे. वाटांवर लागतं काही हाती, सापडतं काही थोडं आपलं असं अन् बरंच काही निसटतंही, म्हणून प्रयासांच्या प्रेरणांनी पूर्णविराम घेतला आहे असं नाही. पावलांना सापडलेल्या वाटांनी कुणी निघतो. कुणी शोधतो नव्या वाटा. कुणी मळलेल्या वाटांना प्राक्तन मानतो. कुणी प्रशस्त पथांची प्रतीक्षा करतो. 

कोणी शब्दांची अस्त्रे-शस्त्रे करतो, कोणी शास्त्राला प्रमाण मानून निरीक्षणे नोंदवतो. कोणी वेदनांच्या कातळावर शिल्पे कोरु पाहतो. कुणी चित्रे रेखाटतो. कोणी आणखी काही. कुणी सेवेच्या साह्याने जग सुंदर करू पाहतायेत. कुणी ज्ञानाच्या पणत्या हाती घेऊन अंधारे कोपरे उजळायला निघालेयेत. कुणी व्यवस्थेला अधिक व्यवस्थित करू पाहतायेत. माणसे काहीना काही तरी करतायेत म्हणून जग बदललं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं बऱ्यापैकी अवघड आहे. तसंही जग कधी सुघड असतं? ते सहज, सुगम असतं तर एवढे गुंते असते का. आयुष्यात अनेक किंतु-परंतु असतात, म्हणून आस्थेची पणती टाकून तिच्या उजेडाला निरोप द्यायचा नसतो. भलेही तिला जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांच्या कपाळी कोरलेल्या अभावाच्या रेषा नाही मिटवून टाकता येत; पण पावलापुरता प्रकाश पेरता येतोच ना! 

जगाच्या जगण्याची आपली रीत असते. रीतिरिवाज नंतर केलेली सोय असते. सोयीचा सोयीस्कर अर्थ शोधता येतो. एकाच्या सोयीचं जग दुसऱ्याला गैरसोयीचं वाटणार नाही असं नाही. जेवढी डोकी तेवढे विचार इहतली नांदते असतात. विचारांना योग्य वाटेने वळते करण्याचा प्रयत्न करावा. नसेल कुणास आवडत तर द्यावं सोडून. सगळ्यांना सगळ्या गोष्टी अवगत असतील असं नाही. आपल्याला काय योग्य वाटतंय, हे महत्त्वाचं. चालत राहावं आपणच आपलं पसाभर प्रकाशाच्या सोबतीने. कारण, परिस्थिती प्रयासाच्या पावलांनी प्रवास करत असते. नाही का?


चंद्रकांत चव्हाण
**