संदेहाच्या परिघाभोवती

By
नियती, नियंता, निसर्ग वगैरे गोष्टींना काही अंगभूत अर्थ असतो का? समजा असलाच तर त्याचे कंगोरे सगळ्यांना खरंच कळतात का की, केवळ आस्थेचे किनारे धरून सरकणे असते ते. की अनुमानाच्या आधाराने वाहणे? समजा नसलाच काही अर्थ, तर त्या नाकारण्यामागे काही आखीव कारणे असतात का? खरंतर काही गोष्टी शब्दांत नेमक्या नाही कोंडता येत अन् वाक्यात मांडता. त्या जाणीव अन् नेणिवेच्या सीमारेषांवर रेंगाळत असतात. अर्थात, या अन् अशा शब्दांना काही आशयघन अर्थ आहे की नाही, हे स्वीकारणं ज्याच्या-त्याच्या आकलनाचा जेवढा भाग आहे, त्याहून काकणभर अधिक आस्थेचा असतो. नियतीच्या नियंत्रणावर विश्वास आहे, ते नियंत्याच्या अस्तित्वाला आपलं मानतात. नाही ते याचं श्रेय निसर्गाच्या नियत व्यवहाराच्या पदरी पेरतात. याबाबत जवळपास सगळेच आपल्या विचारांच्या वाती पेटवून पावलापुरताका असेना प्रकाश पेरत प्रवासाचे पथ उजळू पाहतात. सभोवती नांदणारे विचार अन् असणारे सगळेच विषय काही कोणी कोरून दिलेले किनारे धरून सरळ पुढे सरकत नसतात. काही संदेहाच्या परिघाभोवतीही भ्रमण करत असतात. काही किंतु, परंतुही त्याच परिघात नांदते असतात.

नियती म्हणा की, नियंता किंवा निसर्ग अथवा आणखी काही. त्यामुळे कृतीत खूप मोठी तफावत तयार होते असंही नाही. कुणी नियती प्रमाण म्हणतात, कुणी नियंता, कुणी निसर्ग. असलाच काय फरक तर आपापल्या बिंदूंवर उभं राहून पाहण्याचा. नियती, दैव वगैरे गोष्टी असण्यावर प्रगाढ श्रद्धा असणारे अगणित आहेत. किंबहुना आहे मानणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. तसं निसर्ग सगळंकाही असल्याचे सांगणारेही संख्येने कमी नाहीत. कुठला तरी कोपरा आपला म्हटला की, त्यासोबत त्याच्या असण्या-नसण्याचे कंगोरेही कळायला हवेत. पण कुठली तरी एकच बाजू आपली म्हटलं की, विस्ताराची वर्तुळे आक्रसत जातात. एकदाका परीघ संकुचित व्हायला लागले की, क्षितिजे धुक्यात हरवतात. कुठल्यातरी अनामिकाच्या हातात आयुष्याचे अर्थ सुपूर्द केले की, मुक्तीचा पथ प्रशस्त होतो असा विचार करणाऱ्यांचं ते भागधेय बनतं. ज्यांना विश्वाचे व्यवहार निसर्गाच्या नियंत्रण कक्षेत विहार करताना दिसतात, ते त्याचा ताल आणि तोल आयुष्य अर्थपूर्ण करण्याचे प्रमाण मानतात. अनामिकाचे अस्तित्व मान्य नाही म्हणणारे अन्य विकल्प पाहतात. 

कोणी कोणत्या गोष्टींना अधोरेखित करावं, हा शेवटी भावनांचा भाग असतो. विचारांना, भूमिकांना दोलायमान करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. साध्यासरळ जगण्याला कधी इकडे, कधी तिकडे भिरकवतात. वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यागत आयुष्य गरगरत राहते. ना दिशा, ना रस्ता, ना मुक्कामाचं ठिकाण. वारा नेईल ती दिशा अन् थांबेल ते ठिकाण. सैरभैर जगण्याला कुठला तरी आधार हवा असतो. कुणाला माणसात तो मिळतो. कुणाला अंतरी अधिवास करून असणाऱ्या अनामिक आकृतीमध्ये आपलेपण सापडतं. कोणाला तो कुठे मिळतो, हे महत्त्वाचं नाही. तो आहे ही भावनाच अधिक सुखावणारी असते, नाही का? 

आयुष्याच्या पटावर पहुडलेल्या वाटेने प्रवास करताना अनपेक्षित व्यवधाने समोर उभी राहतात. ती आहेत म्हणून पळून जाणं हा काही पर्याय असू शकत नाही. आस्थेची पणती पेटवून पावलापुरता प्रकाश पेरत काही माणसे चालत राहतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून वातीला आबाधित अन् तिच्या ज्योतीला सुरक्षित राखण्यासाठी श्रद्धेचा पदर पुढयात ओढून धरतात. काही कोसळतात, काही कोलमडतात. काही उसवतात, काही विखरतात. म्हणून सगळेच उखडतात असं नाही. काही भिडतात परिस्थितीला. समोर येऊन दोन हात करतात संकटांशी, ध्वस्त झालो तरी माघारी न वळण्याची तयारी करून. 

आसपास नांदणाऱ्या परिस्थितीचं सम्यक भान असलं की, नेणिवेच्या कोशात कोंडलेल्या सुरवंटाला आकांक्षांचे पंख येऊ लागतात. जगण्याला वेढून असणाऱ्या जाणिवांच्या परिघाभोवती आपलेपण नांदते असले की, आयुष्याला आनंदाची अभिधाने आकळतात. ती कुठून उसनी नाही आणता येत. कुणाच्या आशीर्वादाने नाही मिळवता येत. नेणिवेकडून जाणिवेकडे होणारा प्रवास आपणच आपल्याला नव्याने गवसणं असतं. आपण कोण, या प्रश्नाच्या उत्तरात माणसाच्या प्रगतीचा प्रवास सामावलेला आहे. तसा त्याच्या श्रद्धांचा इतिहासही. माणूस फार बलदंड प्राणी नाही. निसर्गाने सोबत दिलेल्या मर्यादा घेऊन तो जगतो आहे. निसर्गाच्या अफाटपणासमोर त्याचं अस्तित्व नगण्यच. त्याचं असं यकश्चित असणंच अंतरी श्रद्धा पेरून जात असेल का? 

आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अबाधित राखण्याची सहजवृत्ती प्रत्येक जीव धारण करून असतो. स्व सुरक्षित राखण्यासाठी आयुष्य केवढा आटापिटा करायला लावतं. केवढ्या परीक्षा पुढयात मांडून ठेवलेल्या असतात. निसर्गाने पदरी पेरलेले श्वास टवटवीत राखण्यासाठी केवढी यातायात करतो जीव. वाघाच्या मुखी पडलेल्या हरिणाला क्षणक्षणांनी क्षीण होत जाणाऱ्या अन् देहाचा निरोप घेणाऱ्या श्वासाचं मोल कळतं. वादळाच्या एका आवर्तात हरवण्याचे सगळे संदर्भ साकळलेले असतात. भूकंपाच्या हादऱ्यांनी मातीशी जखडून असलेल्या मुळांची महती कळते. हे आकळणे आपणच आपल्याला पारखून पाहणे असतं, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
**

1 comment: