भेटी लागी जीवा

By
काही शब्द असे असतात ज्यांना कागदावर आकार तर देता येतो, पण त्यांना असणाऱ्या अर्थासह अथपासून इतिपर्यंत आचरणात आणता येईलच असं नाही. शब्दांना अक्षरांकित करून मूर्तरूप देता येतं हे खरं. त्यांच्या असण्याची एक बाजू झाली ही. पण त्यांच्या अलीकडील बाजूपेक्षा पलीकडील भागात अधिक काही असतं, हेही वास्तव कसे दुर्लक्षित करता येईल? नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी पाहिल्या जातील असं नाही आणि विचारांच्या कप्प्यात सामावणाऱ्या सगळ्याच बाबी संपूर्ण समजून घेता येतात असं नाही. पुढ्यात पडलेल्या पसाऱ्यात अधिक काही असलं म्हणून त्याकडे आवर्जून लक्ष केंद्रित केलं जाईलच असंही नाही. काही गोष्टी समजून घेण्यासाठी आपणच आपल्याला उमजून घ्यावं लागतं. आशयाचं अथांग आकाश आपल्या अंतरी घेऊन नांदणाऱ्या शब्दांना समजून घेण्यासाठी नुसती सहानुभूती असणं पर्याप्त नाही, तर अनुभूतीचे किनारे धरून वाहावं लागतं. अक्षरे ध्वनीला मूर्त करण्याचं साधन असेल, पण अर्थ देण्यासाठी अनुभूतीच्या वाती अनवरत तेवत्या असायला लागतात. कौशल्य अवगत आहे म्हणून सगळ्याच गोष्टी चिन्हांकित नाही करता येत हेच खरं. 

कोणाच्या भेटीची अंतरी आस लागलेली असते. ती आकृती नजरेस पडावी म्हणून डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले असतात. जीव कासावीस होत असतो. हे केवळ आपलं कुणीतरी आहे. त्यात आपण गुंतलो आहोत म्हणून होत असतं असं नाही. त्याही पलीकडे त्यात काही असतं. ही जी तगमग असते ती तिच्या अंगभूत आशयासह कशी मांडता येईल? थोड्या इकडच्या, थोड्या तिकडच्या काही शब्दांत ती लेखांकित करता येईलही. पण पूर्ण चिमटीत पकडता येईल याची खात्री देणं जरा अवघडच. ती तगमग, कासाविसी अनुभवल्याशिवाय कशी कळेल? भेटीतील हुरहूर अनुभूती असते आपणच आपल्याला समजून घेण्याची. तेथे केवळ सहानुभूती असून भागत नाही. ती आतड्यातूनच उमलून यायला लागते. गोठ्यात असणाऱ्या वासराच्या ओढीने हंबरत घराकडे धावणाऱ्या गायीच्या पावलांमधून ती पळत असते. पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी दूरदेशी गेलेल्या लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईच्या डोळ्यात ती साकळलेली असते. कोण्या मानिनीच्या स्वप्नांतील प्रदेशात ती अधिवास करून असते. कुठेतरी जीव जडलेल्या कोण्या लावण्यवतीच्या नेत्रात ती अधिवास करून असते. अभिसारिका बनून त्याच्या भेटीच्या ओढीने नजरा चुकवत, कोणी पाहत नाही याची काळजी घेत चालणाऱ्या पावलात ती लपलेली असते.  

भेटी केवळ औपचारिक सोहळे नसतात. त्यांच्यामागे अधिष्ठान असते निश्चित विचारांचे. त्या आत्मीय असतात. आपलेपणाच्या ओलाव्याने त्या आषाढ ओथंबलेल्या असतात, तशा वैशाखाचा शुष्क पसारा घेऊन पसरलेल्याही असू शकतात. भेटी आपल्यांच्या असतात. परक्यांच्या असतात. ओळखीच्यांच्या असतात तशा अनोळखीपण असतात. निर्धारित असतात तशा आकस्मिकही असतात. भेटी सहज असतात तशा सहेतूकही असतात. काही ठरलेल्या, काही ठरवलेल्या असतात. काही जीवदान देणाऱ्या असतात. काही जिवावर उठणाऱ्याही असू शकतात. 

छत्रपती शिवाजी महाराज अन् अफजलखानाच्या भेटीत अर्थाचे अनेक पदर होते. ती केवळ महाराष्ट्राचा इतिहास पुढच्या वाटेकडे वळता करणारी घटना नव्हती. महाराजांच्या आग्रा भेटीस अनेक आयाम होते. कृष्ण सुदामाची भेट मित्रप्रेमाची परिभाषा होती. हनुमानाने लंकेच्या दिशेने घेतलेली झेप केवळ सीतेचा शोध घेण्यासाठी नव्हती. नळराजाने हंसाला दमयंतीकडे पाठवण्यात भेटीचे तरल अर्थ सामावले होते. मेघदूतातल्या यक्षाच्या अंतरी असलेल्या अधीरतेत प्रेमाराधनाचे कोमल पदर कोरलेले आहेत. 

भेटी माणसांना काही नव्या नाहीत. पण प्रत्येक भेटीत नवेपण असतं. फक्त त्याची कारणे नव्याने समजून घेता यायला हवीत. ती वैयक्तिक असतील. सामाजिक असतील किंवा आणखी काही. प्रत्येक कारणामागे काही अर्थ असतात. त्यांची अर्थपूर्णता आस्थापूर्वक पाहता आली की, त्यांच्या असण्याचे एकेक पदर कळत जातात. राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला रुतबा असतो. नेत्यांच्या भेटींना वलय असतं. त्या प्रतिनिधित्व करतात आपापल्या देशाचं. त्या प्रातिनिधिक असल्या तरी त्यात अनेक प्रयोजने पेरलेली असतात. अशा भेटीत सहयोग, सहकार्य, स्नेहाचे अर्थ एकवटलेले असतात. काही भेटी किंतु-परंतुची उत्तरे शोधतात. काही किंतु निर्माण करतात. 
     
भेटी सगळ्याच सार्थ असतात असं नाही. काही आत्मीय ओढ घेऊन येतात. काही टाळाव्याशा वाटतात. काही परत परत घडाव्याशा वाटतात. बऱ्याच दिवसांनी भेटणारा कोणी स्नेही संवादातून आस्थेचे कोपरे कोरत आपुलकीचे अध्याय अक्षरांकित करतो, तेव्हा काळालाही मोहोर धरतो. सासरी नांदणारी लेक भेटीला येते म्हणून परिवार तिच्या पायरवांकडे डोळे लावून असतो. तिच्या भेटीत अंतरीचा कल्लोळ आपलेपण घेऊन वाहत राहतो. तिच्या संसारातील नांदत्या सुखाच्या वार्ता कथन करून सांगते, तेव्हा भेटीचा प्रत्येक पळ समाधान बनून अंतरी साठत राहतो. भेट कोणतीही असो, ती लौकिक अर्थाने भेटच असली तरी तिच्या आत आशयाचे अनेक आयाम असतात.

पैलतीरावर लागलेले डोळे कुणाच्यातरी भेटीसाठी आठवणींनी वृद्धाश्रमात झरत राहतात. त्या झरणाऱ्या पाण्यात काळजातले किती कल्लोळ सामावलेले असतात. काळ चाकं लावून पळत राहतो पुढे. त्याच्या पळत्या वाटेवर भेटीची आस अंतरी घेऊन आयुष्याचे शुष्क ऋतू कूस बदलण्याची वाट पाहत राहतात. भेटी कशाही असूदेत, त्यात वियोग असेल, संयोग असेल अथवा योगायोग, साठत जातात त्या स्मृतीच्या कोशात. साचत जातात दिनमहिनेवर्षे बनत. काळ जसा सरकत जातो पुढे पुढे तशी साचत जाते त्यावर विस्मृतीची धूळ. कधीतरी कुठलीशी झुळूक येते अन् उडते. त्या थराखाली साचलेल्या स्मृती हलक्याच जागे होतात, डोकावून पाहतात आसपास अन् साद घालू लागतात. साचलेलं असं संचित कधी कधी अनपेक्षित भेटीला येतं आठवणींचं आभाळ घेऊन. हे आभाळ ज्यांना आकाळलं त्यांना आस्थेचे अर्थ नाही शोधायला लागत, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: