कळणे अन् वळणे

By
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझा एक स्नेही भेटला. मी लिहिलेला कुठलातरी लेख त्याच्या वाचनात आला असावा. त्या संदर्भांचे सूत्रे हाती घेऊन इकडचं-तिकडचं सांगून पार्श्वभूमी तयार करण्याच्या भानगडीत न पडता लेख आवडल्याचं आधीच सांगून औपचारिक सोपस्कारांना विराम देवून मोकळा झाला. पण तेवढ्यावर त्याचं समाधान होतंय कसलं! कदाचित त्याच्या मनात उदित झालेले प्रश्न अस्वस्थपणाच्या रेषा ओढत असतील. गडद होत जाणाऱ्या संदेहाच्या अक्षरांना शक्य तेवढे पुसून मनाची पाटी कोरी करण्याचा प्रयत्न करूनही उत्तरांचा पर्याप्त पर्याय काही हाती लागत नसेल. सगळे पर्याय पाहून पुरे झाले असावेत, म्हणून कुणाला तरी गाठायचं असेलच त्याला. केवळ योगायोगाने मी नेमका गवसलो.

तसंही माध्यमांच्या सुलभीकरणामुळे कुठल्यातरी नियतकालिकात, वर्तमानपत्रात लिहणं सध्या बऱ्यापैकी सामान्य गोष्ट झाली आहे. लिहिणाऱ्या अन् वाचणाऱ्याला त्याविषयी अप्रूप वगैरे वाटण्याचा काळ बराच मागे पडला आहे आणि वाटत असली काही थोडी नवलाई, तरी काळाची धूळ त्यावर साचत जाते, तसे त्यातले संदर्भही सावकाश धूसर होत जातात. आवडो अथवा न आवडो, लेखनकर्त्यास वाईट वाटू नये म्हणून लिहिलेलं छानच झाल्याचं कुणीतरी सांगणंही संकेतप्रिय परिपाठ आहे जणू. हे असं काहीसं म्हणणं अप्रिय असलं, तरी अतिशयोक्त आहे असेही नाही. अर्थात, उद्धृत केलेली अशी विधाने काही सावर्कालिक सत्य वगैरे नसतं. त्याला अर्थाचे अनेक पदर असू शकतात.

लिहिणाराच सापडला म्हटल्यावर त्याच्या मनातल्या बऱ्याच किंतु, परंतुना स्वल्पविराम मिळाला असावा. नमनाला घडाभर तेल वाया न घालवता सरळ मुद्द्याकडे आला अन् प्रश्नांची झड सुरू केली. मध्ये कोणतीच उसंत नाही. विराम नाही. केवळ प्रश्न अन् प्रश्न, प्रश्नांच्या मागे प्रश्न, प्रश्नांच्या पुढे प्रश्न... म्हणाला, "तुम्ही लोक कुठेना कुठे, काही काही लिहत असतात, बोलत असतात. तुमच्या या उद्योगप्रियतेने विश्वाचे विचार लागलीच बदलतील? मुक्कामाच्या ठिकाणी नेणाऱ्या वाटा माणसांना लीलया सापडतील? व्यवस्थेतील वैगुण्ये विराम घेतील? माणूसपणाच्या व्याख्यांना विस्ताराची क्षितिजे गवसतील? मूल्यांना प्रमाण मानून माणसे मांगल्याचा आरत्या ओवाळत राहतील? जी माणसे आतून एक असतात आणि बाहेरून एक दिसतात, त्यांचे मुखवटे उतरतील?” असं आणखी बरंच काही काही....

असा कुठला त्रागा होता, कोण जाणे? त्याच्याकडच्या प्रश्नांचे शेपूट काही गुंडाळलं जात नव्हतं. त्याला थांबवत म्हणालो, "अरे, थांब ना जरा, थोडी उसंत तर घे! आणि मी काही तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता पळून वगैरे जात नाही. तसंही तुझ्या प्रश्नांची उत्तरे काही मला एका दमात नाही देता येणार. माणूस म्हणून ही माझी मर्यादा आहे."

आणखीही काही सांगायचं होतं मला, पण तेवढीही संधी न देता शब्दांचे कासरे हाती घेऊन त्याने वाक्यांना आपल्याकडे वळते केलं. म्हणाला, "माहिती आहेत मर्यादा माणसांच्या मलाही. मीही काही वेगळा नाही कुणी, पण माणूस एवढं संकुचित अन् स्वार्थपरायण कसा होऊ शकतो? स्वतःची सुखे अबाधित ठेवण्यासाठी इतरांना समस्यांच्या तोंडी देताना थोडीही विधिनिषेधाची चाड वाटतच नसेल का त्यांना? कुणाचं काही झालं तरी यांना काहीच खंत वाटत नसेलच का?"

या प्रश्नांमध्ये असणारा तिरकस भाव म्हणा अथवा कुठल्याशा कारणांनी त्याच्या अंतरी अधिवासाला आलेली अवस्थता असेल. माहीत नाही, नेमकं काय घडलं ते. पण तो काही वावगं बोलत होता असंही नाही. हे जग आहे तसंच असणार आहे आणि त्यात इंचभरही फरक पडणार नाही, असं कुणी म्हणत असेल तर त्यात वावगं काही नाही. कोणा विचारवंताच्या प्रज्ञेतून प्रसवलेल्या अशा विधानात अतिरंजितपणा आहे असंही नाही. हाही यास अपवाद कसा असेल? कुठल्या कारणांनी त्याचे विचार विचलित झाले त्यालाच माहीत, सांगणं अवघड आहे. पण संदर्भांचं कुठलं तरी सूत्र सुटत होतं एवढं मात्र नक्की. नियतीने पदरी टाकलेल्या वाटांनी मुकाटपणे चालणारा हा माणूस. हाच रस्ता माझ्यासाठी का म्हणून, याने कधी दैवाला दोष दिला नाही आणि मलाच एवढ्या यातायात का घडतात, म्हणून देवाला कधी बोल लावला नाही. मनाने खूप चांगला वगैरे. पण त्याच्या आसपास विहार करणाऱ्यांचे स्वार्थपरायण व्यवहार पाहून माणूसपणाच्या व्याख्यांवरचा याचा विश्वास दोलायमान झाला असावा कदाचित. असा काहीसा विचार तो करत असेल तर त्याचंही काय चुकलं? काहीच नाही. जगण्यातलं सहजपण संपून सवंगपणा सोबत करीत असेल अन् त्या बळावर सत्तेची वसने परिधान करण्याची कांक्षा प्रबळ होत जाते, तेव्हा माणूस आपला वकूब विसरतो. लाथाड्या कोणाला लाखमोलाच्या वाटू लागल्या की, मूल्ये पराभूत झालेली असतात, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नसते.

वर्तनाचे सैलावलेले प्रवाह कुठे नाहीत? सगळीकडेच ते दुथडी भरून वाहातायेत. मिंधेपणाला मानाच्या महावस्त्रांनी मंडित करून मढवलेल्या मोठेपणाची मखरे मांडली जात असतील तर मूल्यांचे अर्थ मागे पडतात. आपणच आपल्या आरत्या ओवाळून घेतल्या जात असतील अन् अशा आक्रसलेल्या आयुष्याला ललामभूत मानणे घडत असेल तर उरतेच काय शिल्लक? एकीकडे मूल्यांच्या मुशीत मढवलेल्या जगण्याला माणूसपणाचे व्यवच्छेदक लक्षण मानणारे, संकेतांचा सन्मान करणारे अन् संस्कारांची साधना करणारे आहोत, हे कंठशोष करून सांगायचे. संस्कृतीचा इतिहास मांडायचा अन् भूगोल खोदून काढायचा. आपल्या अंगभूत सामर्थ्याने महत्ता मिळवलेल्या माणसांच्या कार्याचं, विचारांचं अनुकरण कसे करतो आहोत, हे दाखवायचं अन् दुसरीकडे सारीपटावर सोंगट्या स्वार्थाची सूत्रे वापरून स्वतःकडे सरकवत राहायच्या, या विचारसंगतीला कसं समजून घ्यावं?

मूल्यप्रणित जगण्याला प्रमाण मानणारी माणसे माणूसपणाची पर्याप्त परिभाषा असते. सद्विचारांच्या संकेतांना पायी तुडवताना काडीमात्रही खंत कुणास वाटत नसेल, तर अशी माणसे माणूसकुलाचे वैभव कसे असू शकतील? तिकडे ध्रुवांवरचा बर्फ वेगाने वितळतो आहे, म्हणून काळजीने काळजाचे कोपरे कंपित होत असल्याचे अन् विश्व विनाशाच्या वाटेने वळते होत असल्याचे सांगायचे. पण इकडे माणसांची मने त्याहीपेक्षा अधिक वेगाने गोठत आहेत, त्याच्या कुणी वार्ता करतच नाही. विवक्षित वाटा विसरणाऱ्या अशा विचारधारेला नीतिसंकेतांच्या कोणत्या कक्षेत अधिष्ठित करता येईल? मला काय त्याचं, असं वाटणं आता नवलाईचं नाही राहिलं. कोरडेपण जगण्याला वेढून असेल, तर ओलाव्याचं अप्रूप उरतंच किती? कोडगेपण विचारांचे सगळेच कोपरे धरून बसले असेल, तर बंधमुक्त करणाऱ्या कोऱ्या वाटा गवसणे अवघडच. गोष्टी विश्वाच्या कल्याणाच्या करायच्या अन् प्रगतीच्या परगण्याकडे पळणाऱ्या वाटा आपल्या दाराकडून वळत्या करायच्या, याला कोणाचं कल्याण म्हणायचं? माणूस गोष्टी विश्व उजळण्याच्या करतोय; पण विचारविश्वात अंधारच दाटला असेल, तर कोणत्या क्षितिजाकडून कवडशांचं दान मागावं?

निष्ठा शब्दाचा कोशातला अर्थ केवळ अक्षरांपुरता उरला आहे की काय, कोणास ठाऊक? पण सुमारांच्या चरणी अस्मिता समर्पित करण्याची चढाओढ लागावी, यापेक्षा विचारांचे अधिक अध:पतन कोणते असू शकते? मूल्ये मोठी की माणूस, हा भाग थोडा वेगळा ठेवूयात. मूल्यप्रणित वर्तनाला प्रमाण मानणारी माणसे मोठीच असतात, याबाबत निदान माझ्या मनात तरी संदेह नाही. पण सांप्रतकाळी मोठेपणाच्या परिभाषांचे अर्थ परिमित झाले आहेत. मूठभर महात्म्य मिरवणाऱ्या कुण्या स्वयंघोषित सत्ताधीशाच्या कृपाकटाक्षासाठी धडपडणारा कळप पाहिला की, माणूस असण्याचे अर्थ नव्याने शोधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतीत होते. तत्त्वांसाठी समर्पितभावाने वर्तनारी माणसे केवळ इतिहासाच्या पानापुरती उरली आहेत की काय एवढा संदेह निर्माण व्हावा, अशी परिस्थिती आसपास असणे माणूसपण पराभूत होण्याचे सुतोवाच असते, नाही का? 

सांगण्यासाठी आदर्श अवघ्या विश्वाचे; पण प्रत्यक्ष आचरणात आणायची वेळ आली की, मुखवटे परिधान करून कसलेल्या अभिनेत्याने केलेल्या अभिनयापेक्षा अधिक सुंदर अभिनय करायचा. कुणीतरी भिरकावलेले चारदोन तुकडे वेचायचे अन् त्याला प्रसाद मानून त्याच्या प्रासादाभोवती प्रदक्षिणा करीत भक्तिभाव प्रकट करीत राहायचा. अशा अवनत अस्तित्वाला आदर्शांच्या कोणत्या आकारात कोंबता येईल? स्वतःभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना संकेतांचे संदर्भ अन् स्वातंत्र्याची क्षितिजे कशी आकळतील? बंधनांना बांधिलकी मानणाऱ्या मूढांना स्वातंत्र्याचे अर्थ अवगत असणं अवघड असतं. स्वातंत्र्याचे संदर्भ मुक्तीच्या मार्गात असतात. शृंखला खळाखळा तुटण्यात असतात. हे एकदा आकळले की, स्वातंत्र्याच्या परिभाषा नव्याने नाही कराव्या लागत. सुमारांची सद्दी सुरू झाली की, स्वत्व अन् सत्त्व परिस्थिती परिवर्तनाच्या अपेक्षेने सत्याच्या वाटेकडे पाहण्याशिवाय आणखी काय करू शकतात? माझ्या स्नेह्याने मला विचारलेल्या प्रश्नांचे प्रयोजन यापेक्षा वेगळे कुठे होते? सगळीकडून अंधारून आलेलं असतांना उजेडाचा कवडसाही आशादायी वाटतो, नाही का?

धावण्याच्या स्पर्धा आयुष्याचे अनिवार्य अंग असण्याच्या काळात असाही फारसा वेळ आहे कुणाकडे? थ्रीजी-फोरजीच्या युगात अन् कॉपीपेस्टफॉरवर्डच्या जगात प्रत्येकाला पुढच्या रकान्यात अक्षरे, चित्रे, चित्रफिती, ध्वनिफिती असं काहीना काही कोरायचंय. रोज मिळणाऱ्या एक-दीड जीबी डाटाने माणसे आंतरजालाचे धागे घेऊन स्वतःच विणलेल्या जाळ्यात कोळ्यासारखे प्रदक्षिणा करतायेत. मूठभर वर्तुळाला विश्व समजण्याचा प्रमाद करीत आहेत. संवेदना करप्ट होत आहेत. विचार करपत आहेत. चिंतनाच्या वाटेने वळते होण्यास माणसाजवळ वेळ नाही आणि असला तर त्यात स्वारस्य नाही. संवेदना जाग्या असणाऱ्या कोणी ओरडून सांगितलं की, हा सगळा प्रकार मर्यादांच्या कुंपणात असणे मानवकुलाची आवश्यकता आहे. पण आसपास कोलाहलाच एवढा आहे की, गलक्यात असे आवाज काही कानी पडत नाहीत. संवेदनांचा संसार संकुचित झालेल्या जगात सभोवती सुखांचा संभार घेऊन सजण्याची स्वप्ने पाहणाऱ्या डोळ्यांना समस्या, उपेक्षा, वंचना दिसतील कशा? मन मारून जगणं अगतिकता असेलही. पण मनाभोवती भिंती उभ्या केल्या असतील अन् विचारांच्या विश्वात खंदक कोरून घेतले असतील, तर आसपास असणाऱ्या असहाय आवाजांना अर्थ उरतोच किती? आतला आवाज साद देत असूनही प्रतिसाद देता येत नाही, ते अगतिकांच्या आयुष्याचे अर्थ कसे समजून घेतील?

फारसे काही करू शकत नाहीत, ते शब्दांचे साकव उभे करून विश्वाचे वर्तनव्यवहार मार्गी लावू पाहतात. असा एक प्रवाद समोर येतो. आकांक्षांच्या झुल्यावर झुलणारी स्वप्नाळू माणसे यापेक्षा आणखी काय करू शकतात, असं कोणाला वाटून जातं. कोणी याला वांझोटा आशावाद वगैरे असं काहीसं म्हणतो. कोणाला काय वाटावं, कोणी काय म्हणावं, याचं स्वातंत्र्य असतंच की सगळ्यांना. म्हणून कोणी कोपायचं कारण नाही. आसपास अंधार अधिक गडद होत असताना पणतीचा पसाभर प्रकाश परिस्थितीच्या पदरी आमूलाग्र परिवर्तनाचे दान पेरू शकत नसेलही; पण आपल्या ओंजळभर उजेडाने कोपऱ्यातल्या अंधाराशी संघर्ष करू शकतो. हे काय कमी असते. कदाचित येवढ्याने आशेचे कवडसे तर कायम राहतील ना! उत्तरे शोधणारे चेहरे त्या मिणमिणत्या प्रकाशात सापडतीलच असे नाही; पण आपली सावली सोबत असल्याचे समाधान अंतरी असेल ना! स्वार्थाने कुरूप झालेल्या चेहऱ्यांना प्रकाश असाही पेलवत नाही. मुखवटे घेऊन विहार करणाऱ्यांना सत्प्रेरीत प्रेरणांचा प्रसाद परवडत नाही, म्हणून आसपास झगमग उभी करून व्यवधानांकडे लक्ष वेधले जावू नये याची काळजी घेत अंधाराचाही उत्सव करत असतात. झगमगाटाला पाहून दिपणारे डोळे विचारांपासून विचलित होतात, वाटा विसरतात अन् हेच नेमकं हवं असतं कृत्रिम प्रकाशाचे लख्ख दिवे उभे करणाऱ्यांना. ढोंगीपणा ज्यांच्या जगण्यात खच्चून भरला आहे, त्यांना कसली आलीयेत विधिनिषेधाची वलये? त्यांचं वर्तुळ त्यांच्यापासून सुरू होतं अन् स्वार्थाला सन्मान समजणाऱ्या दुसऱ्या वर्तुळात विसर्जित होतं.

यशप्राप्तीची आयती सूत्रे आयुष्यात नसतात, कृतीतून ती गवसतात. कर्तेपणाचा त्याग करता आला की, सहजपणाचे एकेक अर्थ सापडतात. विचारांत सम्यक कृतीची प्रयोजने पेरता येतात, त्यांना मर्यादांची वर्तुळे सीमांकित नाही करू शकत. विचारांना अभिनिवेशांनी विलेपित केलं की, जगण्यातून सहजपण संपतं. बेगडी चमक प्रिय वाटायला लागली की, प्रतिष्ठेच्या परिभाषाही बदलतात. साध्याशा कृतीचे अन्वयार्थ हरवतात, तेव्हा समर्पणशील वर्तनाची व्याख्या संकुचित होते. स्वनामधन्यतेची लेबले चिटकवून घेतली की, 'निरपेक्ष' शब्दाचा अंगभूत आशय हरवतो अन् तो केवळ कोशापुरता उरतो. सहजपणाला स्वयंघोषित प्रतिष्ठेचे टॅग लागले की नितळ, निखळ, निर्व्याज जगण्याचं मूल्य सीमांकित होतं. माणसाकडे असणारं मन त्याची श्रीमंती आहे अन् त्याच्या असण्यात अधिवास करणारी माणुसकी मानवकुलाची दौलत आहे, याचा विसर पडला की, जगणं रुक्ष अन् आयुष्य ओसाड होत असतं.

अर्थात, हे कुणाला कळतच नाही असं नाही. पण वळणं होत नाही. कळण्यातले अन् वळण्यातले अंतर आकळले अन् त्यांचे अर्थ अवगत झाले की, माणसांच्या असण्याला आणखी कोणत्या मखरांत मंडित करण्याची आवश्यकता नाही राहत. सौंदर्याचा संभार सांभाळणारा मोर पिसारा फुलवून आपल्या वैभवाचं प्रदर्शन नाही मांडत. आनंदाची अभिव्यक्ती असते ती. अंतरी निनादणाऱ्या स्पंदनांना भरलेल्या आभाळाच्या साक्षीने दिलेला प्रतिसाद असतो तो. त्यात कुठलेच अभिनिवेश नसतात. ते उमलणं स्वभाविकपणाचे साज लेवून येतं. ती काही कवायत नसते. असलंच काही त्यात तर सहजपण सामावलेलं असतं. माणसांना असं सहज जगता नाही का येणार? माहीत नाही. पण त्याला मोर अन् त्याच्या मनाला मोरपीस बनता आलं की, आपल्या असण्याचे कितीतरी सूर सहजपणाचे साज लेवून सजतील. जगण्याचे सूर सापडले की, कोलाहालातल्या कर्कशपणातही गाणं शोधता येईल, नाही का?
••

3 comments:

  1. सर खूप छान. आजच्या परिस्थितीचे यथार्थ वर्णन. खरचं हे सारं माणसाला कळतंय पण वळत नाही

    ReplyDelete
  2. सरजी, प्रत्येक डोकं असलेल्या व त्याचा वापर करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या अंतरंगात आपल्या स्नेह्यांप्रमाणेच एक शंकासुर दडलेला असतो. अशा प्रत्येक शंकासुराच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण आपल्या अनुभवसिद्ध लेखणीने जो प्रयत्न केला आहे तो खरोखरच स्तुत्य आहे यात शंकाच नाही.

    परंतु जेथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार, मिंधेपण हे प्रामाणिक कार्य आणि लाचारी ही एकनिष्ठता ठरते अशा जगाकडून गुणवत्तेची अपेक्षा करणे निश्चितच अतिशयोक्ती ठरेल.

    वास्तवतेला जेव्हा शब्दांचे कोंदण लाभते तेव्हाच असे परखड लेख निर्माण होत असतात. आपणाकडून अशाच साहित्यसेवेची अपेक्षा करतो. धन्यवाद !

    संजय पिले

    ReplyDelete