पर्याय

By

कुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात, ही बाब सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही. कारण नियती, दैव, प्राक्तन वगैरे मानणे ज्याच्या त्याच्या निवडीचा भाग. इतरांच्याही विचारात तो असायलाच हवा असं नाही. प्रयत्नांची वाट सोडणे ज्याच्या स्वभावात नसते, त्याला कष्टाच्या परिभाषा समजून नाही सांगायला लागत. समाजात माणूस म्हणून वागणं ही काही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना गती असते, प्रगती नसते.

अन्याय घडत राहणे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्याचा वसंत सरून पानगळ अंगणी विसावणे, हे काही आनंदाचं अभिधान नसतं. वेदनांच्या वाटेने प्रवास घडणे जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी माझ्याभोवती घालून घेतलेल्या कुंपणात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा आणि मिळवलेल्या ज्ञानाचा? स्वतःला मखरात बसवून घेऊन भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे अनेक असू शकतात. पण सत्य हेही आहे की, मखरे फार काळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.

आदर मनातून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. महात्म्याची लेबले लावून कोणी महात्मा नाही होत. गांधीजी होणं सोप्पं नसतं. त्याग, समर्पणाच्या साऱ्या परिभाषा जगण्यात साठवाव्या लागतात त्यासाठी. सॉक्रेटिसच्या ज्ञानाबाबत जगाला संदेह नाही. ज्ञानेश्वरांच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका घेत नाही आणि आम्ही महान वगैरे आहोत, असे त्यांनीही जगाला कधी ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण कुणाला अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा सोस असेल, तर कुणी काही करू शकत नाही. जगात मागून एकही गोष्ट मिळत नाही. त्या योग्यतेचं बनून ती मिळवावी लागते. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक असतीलही, पण त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे होतं का? श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. कधी वाघाच्या भक्षस्थानी पडते, पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला कळते, ते आपल्याला कळू नये हा वर्तनविपर्यास नाही का?

माणूस कोणी वेगळा अन् मोठा नसतो. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या सुरांना गुंफून, त्याची गाणी गात मूठभर स्वप्नांच्या मुक्कामाकडे चालणारा माणूस आदरणीय असू शकतो. माझं जगणं रास्त असेल तेच करण्यासाठी आणि इष्ट असेल तेवढं बोलण्यासाठी आहे असं समजतो, तो माणूस म्हणून मोठाच असतो. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं; पण मान खाली जाते, तिचं काय? जगण्यात मिंधेपण कधीही येऊ नये. कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले स्थान अधिक मोलाचे असते.

असो, माणूस जगतो दोन गोष्टींवर. एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. भीतीचं भय असणारे भविष्याला आकार देऊ शकतीलच असे नाही. 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात, त्यांना मूल्यप्रणित जगण्याची परिमाणे आकळतील कसे? माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची मूल्यांवर प्रीती असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणे. आपल्याला नंदनवने नाही फुलवता येणार; पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, नाही का? आयुष्याचे अर्थ आकळण्यासाठी कधीतरी चौकटींच्या पलीकडे असणारे पर्यायही तपासून बघायला लागतात. चौकटींच्या कोपऱ्यात सामावलेल्या आयुष्यांच्या कोनांची मापे प्रत्येकवेळी जुळतातच असे नाही. आयुष्य पर्यायांचा प्रवास असला, तरी प्रवासाचे पर्याप्त पथ निवडता यायला हवेत. चालण्याला केवळ उत्तरे नसतात. प्रश्न असतात. त्यांच्यासोबत येणारे गुंतेही असतात, तसे गुरफटणेही असतेच. पर्यायांची प्रयोजने पाहून प्रश्नांची प्राथमिकता नाही आकळत. प्राधान्यक्रम आखताना माणूस केंद्रस्थानी असावा लागतो, तेव्हाच पसायदानाचे अर्थ उलगडतात, नाही का?
••

1 comment:

  1. खरंय सर,मोठेपण मागून मिळत नाही.ते कर्माने, चांगल्या कार्याने आपोआप मिळते.

    ReplyDelete