समाधान

By

समाधान

काही गोष्टी निसर्गनिर्मित असतात, काही माणसांनी तयार केलेल्या. निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी स्वाभाविकपणे वाट्यास येत असतात. प्रासंगिकता त्यांचे प्राधान्यक्रम ठरवत असते. काही माणूस स्वतः निर्माण करतो. ती त्याची परिस्थितीजन्य आवश्यकता असते. उदात्त असं काही विचारांत वसाहत करून असेल, तर ते योजनापूर्वक घडवावे लागते. ते काही वाहत्या उताराचे पाणी नसते. सहजपणे मार्गी लागायला. इहतली जगणाऱ्या प्रत्येकाला त्याच्यापुरता इतिहास असतो, तसा भूगोलही. काहींच्या वाट्याला अफाट असतो, काहींचा पसाभर, एवढाच काय तो फरक. अथांग, अफाट, अमर्याद वगैरे केवळ शब्दांचे खेळ, परिमाण दर्शवणारे. त्यांचे परिणाम महत्वाचे. ओंजळभर कर्तृत्वाच्या इतिहासाचे गोडवे गाऊन कोणाला मोठं वगैरे होता येत नसते. इतिहास गोडवे गाण्यासाठीच नसतो, तर परिशीलनासाठीही असतो. तसा अज्ञाताच्या पोकळीत हरवले संचित वेचून आणण्यासाठी प्रेरित करणाराही असतो. प्रेरणांचे पाथेय सोबत घेऊन आपणच आपल्याला पारखून घेत आपल्या वकुबाने आपले परगणे आखून घ्यायला लागतात. त्या आपल्या मर्यादा असतात.

कृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या निर्णयांचा परिपाक असतो. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार असतो पण आत्मा नसतो. सत्प्रेरित विचाराने उचललेली चिमूटभर मातीही स्नेहाचे साकव उभे करू शकते. सुखांचा अवास्तव हव्यास माणूसपणावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. समाधान सापेक्ष संज्ञा असते. पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. अर्थात, हे सगळ्यांनाच अवगत असते किंवा मिळवता येईलच, असे नाही. पण अगत्य सगळ्यांनाच साधते. मोहाचा कणभर त्याग समर्पणाची परिमाणे उभी करतो, फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संस्कृतीने दिलेल्या संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक सुंदर दिसतात. माणसांचा स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं.

रिकाम्या ओंजळी जगण्याची प्रयोजने शिकवतात. आयुष्याच्या अर्थांना आस्थेचा ओंजळभर ओलावा आपलेपण देतो. जगण्याच्या दिशेने निघालेल्या सगळ्याच वाटा काही संपन्नतेचं दान पदरी टाकण्यासाठी येत नसतात. नसल्या म्हणून त्या टाकूनही नाही देता येत. पायाखालची वाट ओळखीच्या चिन्हांना गोंदवून मनाजोगत्या मापांनी आखलेली असणे जवळपास दुर्लभ. असं असलं म्हणून माणसांनी लक्षाच्या दिशेने चालणे काही सोडून दिले नाही. तसेही वाटा चालण्यासाठी असतात. कोणीही अगदी ठरवून वाटेसाठी चालत नसतो. पण डोईवर असणारं आभाळ आश्वस्त करणारं असलं की, पावलांना हुरूप येतो. ध्येय बनून असो अथवा नियती बनून, आयुष्यात आलेल्या वाटांच्या असण्या नसण्याला अधोरेखित करीत चालणे घडते. वाटेवरच्या धुळीत मनी वसतीला असलेली चिन्हे अंकित करून मार्गस्थ होणे संभव-असंभवाच्या शक्यतांचा खेळ असतो. तसंही नियतीने निर्धारित केलेले खेळ इच्छा असो-नसो खेळायलाच लागतात, जय-पराजयाच्या शक्यतांना गृहीत धरून. समृद्धीच्या मार्गाने घडणारा प्रवास कदाचित सुख देईल, पण समाधान संघर्षातूनच गवसते. सुखाला आयुष्य किती असेल, हे काळही सांगू शकत नाही, पण समाधान चिरंजीव असतं. हे संघर्षरत असणारा कोणीही अभिमानाने सांगू शकतो. नाही का?
**

4 comments:

  1. सर खूप छान. संघर्षातून मिळालेलं समाधान चिरकाल लक्षात राहते.

    ReplyDelete
  2. अल्पसंतुष्टता ही सुद्धा एक मानवी स्वभावाची छटाच आहे मात्र ती साध्य करणे एक तपश्चर्याच असते व तिचा मार्ग संघर्षमयच असतो. चिंतन खरोखरच अंतर्मुख करणारे आहे.

    ReplyDelete
  3. Devyani Kulkarni1 July 2018 at 01:09

    खुपच सुंदर, आणि अगदी खरे!!! संघर्षातून गवसलेल्या ज्ञानातूनच जीवनाची खरी ओळख होत असते.

    ReplyDelete