Kavita | कविता

By // 2 comments:

१. भवताल

भंजाळलेला भवताल, भरकटलेली माणसे
आणि अस्वस्थ वर्तमान
नियतीने निर्धारित केलेलं प्राक्तन की,
स्वतःच आखून घेतलेली वर्तुळं

संस्कृती केवळ एक शब्द नाही
प्रदीर्घ वाटचालीचा इतिहास सामावलेला आहे त्यात
माणसाच्या अस्तित्वाचा
पण तोही आक्रसत चाललाय एकेक पावलांनी

कुठून कुठून वाहत येणारे प्रवाह
अथांग उदरात साठवत राहिला शतकानुशतके
कोरत राहिला अफाट काळाच्या कातळावर लेणी
सजवत राहिला साकोळलेल्या ओंजळभर संचिताला
क्षणपळांची सोबत करीत चिमण्यापावलांनी पळत राहिला
सुंदरतेची परिमाणे शोधत

दिशा बदलली वाऱ्यांनी
अन् पडले मर्यादांचे बांध
कणा कणाने निसटतो आहे हातून वर्तमान
वाहत्या प्रवाहांना पायबंद घातले आहेत
परंपरांनी, कधी प्रसंगांनी तर कधी प्राधान्यक्रमांनी
सगळेच पदर उसवत आहेत एकेक करून

काळाच्या गणिताची सूत्रे राहिली नाहीत
जेवढी वाटतात तेवढी सहज, सुगम
गणिते आधी आखून तयार करता येतात
हवी तशी सूत्रे अन्
मिळवता येतात अपेक्षित उत्तरे
सूत्रांनुसार साच्यात ओतून आकडे

प्रश्न माणसाला नवे नाहीत
काल होते, आज आहेत, उद्याही असतील;
पण त्यांचा चेहरा तेवढा बदलायला हवा
प्रश्नांचे धागे हाती घेऊन हव्या त्या
दिशेने वळवता येतात

खरंतर प्रश्न हासुद्धा नाहीच,
प्रश्न आहे धागे वळवणारे हात
कोणाच्या आज्ञेने चालत आहेत याचा

***

२. प्राक्तनाचे संदर्भ

अस्तित्वाचे प्रश्न आसपास
उत्तरांचे तुकडे साकोळत राहिलो
सुदंर कोलाज करता येईल म्हणून
प्रत्येक चौकटीत शोधत राहिलो आकार
मनात आधीच कोरून घेतलेले
ठरवून घेतलेल्या रंगासहित

सर्जनचे सोहळे सहज नसतात
माहीत असूनही सोयिस्कर दुर्लक्ष करीत गेलो
बहरून येण्याआधी उजाड व्हायचं असतं
याचं भान राहिलंच नाही

ऋतू हलक्या पावलांनी येत राहिले
त्यांच्या सोहळ्याना अनेकदा सामोरा गेलोही
पण त्यांच्यापर्यंत पोहचण्याआधी
परतीला पावलं लागलेली असायची
हाती उरायच्या विसर्जनाच्या देठ खुडलेल्या
निष्प्राण खुणा

स्वप्नाळलेल्या नेत्रात सुखांचे निर्झर
शोधण्याच्या नादात
ओथंबलेल्या पापण्यांची थरथर कळलीच नाही
थेंबाना अडवून धरणारे बांध उभे राहिले नाहीत

नियतीने निर्धारित केलेल्या चौकटींमध्येच
रिता होत राहिलो भरून येण्यासाठी
भरून वाहणे दूरच, पण कधी चारबिंदू
झेलून ओंजळी भरल्या नाहीत

ओंजळीचे रितेपण माझं मीच निवडलेलं
की, परिस्थितीने पदरी पाठवलेलं प्राक्तन
प्राक्तनाचे संदर्भ बदलता येतात
प्रामाणिक प्रयासांनी
पण त्यासाठी ऋतूंनी कूस बदलून अंगणी यावं लागतं
आणि ऋतूंना सामोरे जाण्यासाठी
आपल्या हक्काचं चतकोर अंगण
हाती असायला लागतं
ते आहे आपल्याकडे?

***

३. इतिहास

इतिहास वाहत राहतो परंपरांच्या पात्रातून
उगमापासून संगमापर्यंत काळाचे संदर्भ घेऊन
त्याच्या वाहण्याला स्वतःची दिशा असतेच कुठे
गवसल्या उताराने त्याचं घरंगळत जाणं
तसंही स्वाभाविकच

प्रवाहांच्या स्वाभाविक असण्याला
अर्थाचे अनेक आयाम दिले जातात
संस्कृती, संस्कारांचे अनुबंध शोधून,
मग माथी मिरवत राहतो तो
कधी अहं, कधी अस्मितांचे गाठोडे घेऊन

प्रवाह निर्धारित चौकटीत बद्ध होत जातो
त्याच्या वाहण्याचे अर्थ शोधायचं विसरून
खरंतर इतिहास स्वतः काही करू शकत नाही
त्याच्याकडे सामर्थ्य असतेच कुठे तेवढे
ते चिटकवलं जातं त्याच्या अस्तित्वावर
एखादी लढाई, माघार, पलायन, तह,
जय, पराजयाची लेबले घेऊन

इतिहास ना विजेता, ना पराभूत
दिले जातात त्याला मनाजोगते आकार
त्याच्या एकेक तुकड्यांना साकोळून
माणसे कोरत राहतात कोलाज
शोधत राहतात त्याच्या अथांग पात्रात
आपल्या ओंजळभर अस्मिता

पेटवले जातात पलिते गौरवशाली दिव्यत्वाचे
पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या
परगण्यांना उजळून टाकण्यासाठी
संकुचित होत जातो तो एकेक पावलाने
आक्रसत जाते अवकाश त्याचे
आणि तोही बनतो मेंदूएवढा कालांतराने

मेंदूच्या करामती उभे करतात सोहळे
सजण्या-सजवण्याचे
कालपटावर गोंदवलेल्या क्षणांचे मोल
गोठवले जाते अभिमानाच्या अक्षरांत
अन् त्याग, समर्पण, कर्तृत्त्व मागे पडून उरतात
फक्त कुंपणातल्या अस्मिता
आणि
त्यांचा जयघोष करणारे काही उत्साही आवाज

***

४. प्रतिमा

प्रतिमांचा प्रवास आभासाकडून वास्तवाकडे
की वास्तवाकडून अभिनिवेशाकडे होतोय
अवघड होत चाललंय
सहज सोप्या आकारांना समजून घेणं

मनात साकोळलेल्या सरळमार्गी अपेक्षांना
कोंदणात सजवण्याच्या संधीही
धुकं पांघरून घेत दृष्टीआड जातायेत
उरल्यात थरथरणाऱ्या काही अस्पष्ट रेषा
कोणत्याही बिंदूंना न जुळणाऱ्या

अस्मितांच्या रेषा ओढून
चौकटीत सजू लागले आहेत
आभा हरवलेले रंग, पण
चेहरा हरवलेला माणूस प्रतिमेच्या
कोणत्याही चौकटीत सामावत नाही
कारण माप घेऊन आधीच
बेगडी महात्म्य आखले जाते
प्रतिमांना सीमांकीत चौकोनी विश्वात
सजवण्यासाठी

प्रतिमांचं दैवतीकरण करताना
समर्थनाचे आभासी शब्द फेकून
भक्तीचे साज चढवता येतात
आपल्या मनसुब्यांवर
अन् भक्त जमा झाले की,
जयघोषांचे नाद ताब्यात घेतात आसमंत

***

५. स्वप्नांचे साचे

कसली आलीये मर्दुमकी
या फाटक्या जगण्याला
काल जगणं जेथे होतं आजही तेथेच आहे.
काळ मात्र पायाला चाकं बांधून
सैरभैर पळतो आहे
आस्थेचा ओंजळभर ओलावा आणण्यासाठी

सीमांकीत चौकोनात कोरलेल्या
सुखांच्या संकल्पित आकृत्यांचे
अस्ताव्यस्त तुकडे
हलकेच आत झिरपत जातात
मातीच्या ओढीने
साठवून ठेवण्यासाठी त्यांना
आत अलवार आस असायला लागते.
पण अंतरीचा डोहात अंधाराचं सावट दाटून
आयुष्यच आभा हरवून बसले असेल
तर प्राक्तनाला दोष देऊन काय उपयोग

स्वप्नेच करपून जात असतील
आणि आकांत कोणाला कळत नसेल
तर प्रश्नांशिवाय उरतेच काय हाती
अर्थात, सगळ्याच प्रश्नांची उत्तरे
साचेबद्ध चौकटीत मिळतीलच याची तरी
शाश्वती असतेच कुठे?
नसली म्हणून
स्वप्ने अशीच टाकून देता येत नाहीत
ठरलेल्या ठरवलेल्या सूत्रांनी
उत्तरे गवसतीलच असंही नाही
नसेल काहीच हाती येत तर
स्वप्नांचे साचेच का बदलून घेऊ नयेत?

***