Shikshak Din | शिक्षक दिन

By
पाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार पडतील. शिक्षकांचे समाजव्यवस्थेतील स्थान आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील योगदान अधोरेखित केले जाईल. संस्कारांचे संवर्धन करणारा, मूल्यव्यवस्था टिकवून ठेवणारा जबाबदार घटक म्हणून तो प्रशंशेस पात्र असल्याचे सांगितले जाईल. त्याच्या कार्याचे कौतुक करताना अध्यापकीय पेशाच्या सामाजिक उत्तरदायित्वाचीही आवर्जून आठवण करून दिली जाईल. शिक्षकी पेशात लक्षणीय कार्य करणाऱ्या आचार्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्शाच्यारूपाने सन्मानित करण्यात येईल. अशा आदर्श अध्यापकांनी उभी केलेली यशाची शिखरे संपादित करण्याची उर्मी अन्यांच्या अंतर्यामी उदित व्हावी म्हणून लहानमोठ्या समारोहातून प्रेरणेच्या ज्योती प्रज्वलित केल्या जातील. आहेत त्याहून मोठ्या यशाची शिखरं उभी रहावीत म्हणून प्रयत्न करू पाहणाऱ्या संवेदनशील मनांना प्रेरित केले जाईल. त्यांच्या हाती प्रेरणेचे पाथेय देऊन मार्गस्थ केले जाईल. काहींच्या वाणीतून गुरु-शिष्य नात्यातील गोडवा गौरवगाथा बनून प्रकटेल. जीवनाला आकार देणाऱ्या अध्यापकांच्या अंतर्यामी जतन करून ठेवलेल्या स्नेहमयी स्मृती काहींच्या लेखणीतून लेखांकित होतील. सगळा दिवस शिक्षक नावाच्या संस्कारकेंद्रांना सन्मानित, गौरवान्वित करण्यात संपेल. कृतज्ञतेचा भाव अंतर्यामी साठवत सूर्य निरोप घेऊन मावळेल. रात्र धरतीवर अवतीर्ण होईल.

क्षितिजाच्या वर्तुळाला पार करीत येणारा दिवस नवी आव्हाने घेऊन उदयाचली येईल. त्याच्या पसरलेल्या प्रकाशाच्या परिघात आपल्या व्यवस्थेचे वास्तव पुन्हा समोर येईल. माणसं ते सरावाने स्वीकारायला शिकल्यामुळे त्याकडे कदाचित फारसे लक्ष दिले जाणार नाही. शिक्षणाला परिवर्तनाचे साधन वगैरे म्हणतात. परिवर्तनाची आयुधे हाती घेऊन साध्याच्या परगण्यात पोहोचण्यासाठी प्रयोग होत राहतील. शिक्षणातून जे साध्य करायचे आहे, त्यापर्यंत आपली शिक्षणव्यवस्था पोहचली आहे का? या प्रश्नांचे उत्तर कदाचित पुन्हा जुनेच पाढे म्हणताना दिसेल. शिक्षणातून परिवर्तन घडणे अपेक्षित असेल, तर शिक्षक त्या परिवर्तनाचा भाष्यकार असावा हेसुद्धा ओघानेच आले. अर्थात परिवर्तनप्रिय विचार प्रबळ आसक्ती बनून अंतकरणात रुजल्याशिवाय बदल घडणं अवघड असतं. परिवर्तनशील समाजच प्रगतीचे नवे आयाम निर्माण करू शकतो. समाजाच्या वृत्तीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षणातही परिवर्तन घडणे म्हणूनच अपेक्षित असते. माणसाचा इहलोकीचा प्रवास ईप्सितप्राप्तीसाठी असल्यास त्याच्या हाती व्यवस्थापरिवर्तनाची साधनं असणं आवश्यक असते. शिक्षण हे परिवर्तनाचे असेच एक अमोघ साधन आहे. माणसाच्या वैचारिक वाटचालीतील संचित आहे.

औपचारिक शिक्षणाच्या परिघात आत्मशोध घेत नावीन्याच्या शोधासाठी निघालेल्या वाटेवर अध्ययनार्थी, अध्यापक आणि अध्यापनात परस्पर संवादाचे सेतू बांधल्याशिवाय व्यवस्थेत अपेक्षित परिवर्तन घडत नसते, हेही वास्तवच. शाळा केवळ सिमेंट, विटा, माती वापरून उभ्या केलेल्या निर्जीव इमारती नसतात. त्यांच्यातून चैतन्याचे झरे विद्यार्थ्यांच्या रूपाने अखंड प्रवाहित होत असतात. हे सळसळते चैतन्य घडविण्याची नैतिक जबाबदारी पालक आणि समाजासोबत शिक्षकाचीही आहे, हे वास्तव कोणीही शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नाकारू शकत नाही. शिक्षक म्हणून या चैतन्यदायी प्रांगणात पहिले पाऊल ठेवताना अध्यापकाच्या अंतर्यामी विद्यार्थी घडविण्याची आंतरिक उर्मी असल्याशिवाय तो अपेक्षित परिवर्तन घडवू शकणार नाही. निराकाराला आकार देऊनच साकारता येते. संस्कारांचे संचित दिमतीला घेऊन आकाराला आलेली व्यक्तित्वेच देशाची प्राक्तनरेखा स्वकर्तृत्वाने लेखांकित करीत असतात. विकसनशील, विकसित किंवा महासत्ता म्हणून एखाद्या देशाला माणसंच घडवीत असतात. शिक्षणातून विधायक विचारांचे पाथेय घेऊन घडलेली माणसं देश नावाची अस्मिता आकारास आणत असतात. अशी कुशल माणसं घडविण्याचं काम शाळा आणि शिक्षक करीत असतात.

समाजात रुजणाऱ्या विधायक विचारांच्या निर्मितीचं आणि माणसाच्या जडण-घडणीचं श्रेय शिक्षणाला द्यायचं असलं, तर स्वातंत्र्य संपादनानंतरच्या सत्तर वर्षात आपल्या शिक्षण व्यवस्थेत काय घडलं, काय बिघडलं अन् काय निसटलं, याचं परिशीलन होणं प्रगतीच्या वाटेवरचा प्रवास समजून घेण्यासाठी आवश्यक ठरते. आपली शिक्षणव्यवस्था प्रयोगशाळा झाल्याचा सूर आजही आपल्या आसपास उमटताना दिसतो. संस्कारसाधनेसाठी शिक्षण नावाचं नंदनवन प्रयत्नपूर्वक उभारावं लागतं. शासन, समाज, शिक्षक आणि शाळा ते घडवत असतात. शाळेतून केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता जीवनशिक्षण मिळावे, अशी अपेक्षा समाजाकडून व्यक्त होत असेल, तर त्यात अवास्तव असे काही नाही. शाळा केवळ परीक्षा घेऊन उत्तीर्ण-अनुतीर्णतेचे ठसे कपाळी अंकित करणारे उद्योगकेंद्रे नसतात. येथे येणारी मुले उत्तीर्ण होण्यासाठीच येत असली अन् उत्तीर्णतेचा मळवट कपाळी असल्याशिवाय चालणार नसले, तरी पुस्तकी ज्ञानातून प्राप्त पदवी म्हणजे सर्वकाही असते, असेही नाही. संपादित केलेली पदवी दिलेल्या परीक्षा, सोडवलेल्या उत्तरपत्रिका, व्यवस्थेने निर्धारित करून दिलेला अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याचं प्रमाण असतो. पण जीवनातील सुख-दुःख, समस्या, संकटे यात उत्तीर्ण होण्याएवढं प्रगल्भ मन क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे मिळणाऱ्या अनुभवातून घडवावं लागतं. ते संवेदनशील संस्कारांतून घडत असतं.

शिक्षक म्हणून आपण या क्षेत्रात प्रवेशित होताना व्यवस्थेच्या परिघाभोवती असणारी संवेदनशीलता सोबत घेऊन आल्याशिवाय शिक्षकीपेशाचे मोल समजणे अवघड आहे. उत्क्रांत मने घडवण्याच्या जबाबदारीचं निर्वहन शिक्षकांना करायचं असल्याने, आधी त्याचं मन उत्क्रांत होणं आवश्यक आहे. आपल्या अंतर्यामी अधिवास करून असणारा आनंद आपण इतरांना तेव्हाच देऊ शकतो, जेव्हा आपल्या मनोविश्वात प्रसन्नतेचे निर्झर अनवरत प्रवाहित असतील. शिक्षकाची ओळख त्याचं निरामय चारित्र्य असतं, तसंच त्याचं परिणामकारक अध्यापनही. त्याच्या अध्यापनातून आसपासच्या आसमंतात आनंदलहर निर्माण होणं आवश्यक आहे. असा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षकाला निर्माण करता यावा. एखादा घटक शिकविताना आधी आपणच तो धडा, ती कविता होणं आवश्यक नाही का? मुलं संस्कारांनी घडविण्याचं समाधान तेव्हाच मिळू शकते, जेव्हा एखादा धडा, कविता आणि त्यातून प्रतीत होणारा अनुभव विद्यार्थ्यांच्या हृदयात जावून विसावतो. त्याचं मन हेच अनुभवांचं सदन होतं. सुंदर शिल्प साकारण्यासाठी कुशल कलाकाराच्या सर्जनशील हाताचा स्पर्श दगडाला घडावा लागतो. संवेदनशील शिल्पकाराला ओबडधोबड दगडातील सौंदर्य तेवढे दिसते. त्यातला अनावश्यक भाग काढून तो ते साकारतो. मुलांच्या अध्ययन प्रवासातील विकल्पांचे अनावश्यक ओझे शिक्षकाला वेळीच काढता आले की, त्यांचं जीवन सौंदर्याची साधना होते. अर्थात, यासाठी शिक्षक म्हणून त्याला लाभलेल्या हाताचा परीसस्पर्श वेळीच घडायला हवा. शिक्षक एक संवेदनशील कलाकार असतो. त्याचं अध्यापन समर्पणशील कलावंताची साधना असते. गायकाला रियाज करून सुरांना धार लावावी लागते. तलवारीला पाणी असल्याशिवाय मोल नसतं. म्यान रत्नजडीत अन् तलवार गंजलेली असेल, तर तिचं मोल शून्य असतं.

परंपरांच्या चौकटी मोडीत काढून परिघाबाहेर पाऊल ठेवल्याशिवाय वेगळे साहस सहसा घडत नाही. मनात ध्येयवेडी स्वप्ने उदित झाल्याशिवाय आकांक्षांची क्षितिजे खुणावत नाहीत आणि नवे परगणेही हाती लागत नाहीत. ज्याला परंपरांचा पायबंद पडला, त्याला नवे रस्ते कसे निर्माण करता येतील? परंपरांच्या चौकटी मोडण्याचा, ओलांडण्याचा प्रयत्न करताना अडचणींचे अनेक अडथळे अनाहूतपणे उभे राहतात. ते असणारच आहेत. पलायनवाद स्वीकारणाऱ्यांच्या जीवनग्रंथात नवे अध्याय कधी लेखांकित होत नसतात. कधी परिस्थिती अनुकूल नसते, तर कधी माणसे प्रतिकूल ठरतात. रस्त्यात अनंत अडचणींचे डोंगर उभे राहतात. कधी शासनाचे, कधी व्यवस्थापनाचे प्रश्न व्यवधाने बनून अनपेक्षितपणे वाटेवर भेटतात. कधी नियम आडवे येतात. कधी कायदे वाकुल्या दाखवितात. एवढं सगळं पार करून पुढे गेलात की, ज्यांच्यासाठी हे सगळं सव्यापसव्य करतो आहोत; तेच पालथे घडे बनतात. अशावेळी करावं काय? म्हणून प्रश्न समोर उभा राहतो. प्रश्नांची उत्तरे शोधूनही हाती लागत नाहीत. प्रश्नांचा गुंता आपला अर्जून करतो. अडचणी अनंत असतात. त्यांना अंत नाही. समस्या कुठे नसतात? सगळीकडेच त्या आहेत. परिस्थिती कोणत्याही बाजूने अनुकूल नसतांना समोर आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्नांनी निर्माण केलेल्या मार्गांवरून निघालेली ध्येयवेडी पाऊले पाहून नियतीही विस्मयचकित होते. अन् ध्येयप्रेरित जगणाऱ्यांचे वेगळेपण कालपटावर अधोरेखित करीत जाते.

शिकण्याचं, शिकविण्याचं व्यवस्थेतील हरवलेपण समोर येते, तेव्हा परिस्थितीची उदासीनता ठळकपणे अधोरेखित होते. आसपास दिसणारे उसवलेपण पाहून आपणास काही करता येणार नाही, असे वाटायला लागते. उदासिनतेचे मळभ मनाच्या आसमंतात दाटून येते. परिस्थितीच्या अंधारात आपण हरवतो. पायाखालच्या वाटा बेईमान होतात. अशा समयी अपेक्षित उत्तरांच्या शोधासाठी केलेली संयत प्रतीक्षा भोवताली दाटून आलेल्या अंधाराचे सावट दूर करते. काळ परिवर्तनशील असतो. तो सतत बदलत असतो. आताही तो बदलाच्या वाटेने नव्या क्षितिजांच्या शोधासाठी निघाला आहे. कालचक्राच्या वेगाशी सुसंगत वर्ततात, तेच संघर्षात टिकतात. शिक्षकालाही कालानुरूप बदलणं अनिवार्य आहे. विज्ञाननिर्मित सुखांनी वेढलेले जग नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून प्रगतीच्या दिशेने प्रचंड वेगाने झेपावत आहे. शिक्षकालाही आपली झेप बदलावी लागेल. ती आणखी पल्लेदार करावी लागेल, तेव्हाच तो मुलांपर्यंत पोहचेल. तो निद्राधीन असेल, तर व्यवस्थेत त्याला आपले अवकाश कसे निर्माण करता येईल? त्याला त्याचा व्यावसायिक सन्मान मिळेलच कसा? परंपरेच्या चौकटीत फारफारतर धडे, कविता, गणिते, सूत्रे, व्याख्या शिकवून शिक्षक होता येईलही; पण विद्यार्थिप्रिय अध्यापक नाही होता येणार. शिक्षक म्हणून मिळणारा आदर चौकटींच्यापलीकडे जाऊन काहीतरी नवीन केल्याशिवाय मिळत नसतो. भोवताल बंदिस्त करणाऱ्या चौकटींचे सीमोल्लंघन केल्याशिवाय आकांक्षांचे नवे आकाश हाती लागत नसते.

शिक्षक नावाच्या शिखराला आदर तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा त्या शिखराची उंची लोकांच्या मनातील उंचीपेक्षा काकणभर अधिक असते. शिक्षकाची अनास्था, उदासिनता, निष्क्रियता त्याच्या पेशातील आदराची सांगता करीत असते. मुलांच्या मनातील शिक्षकांप्रती असणारा आदर उगवत्या सूर्यासारखा स्वाभाविक आणि उमलणाऱ्या फुलाइतका सहज असतो. सहजपण शिक्षकाच्या कर्तृत्वातून गंधित होत असतो. रेडिमेट नोटस् चा आयता रतीब घालणाऱ्या वर्तुळात आणि क्लास नावाच्या समांतर व्यवस्थेत शिक्षकाला स्वतःचा ‘क्लास’ टिकवून ठेवावाच लागेल. तो टिकून राहावा म्हणून आपल्या अध्यापनाचा ‘क्लासही’ वरच्या दर्ज्याचा असावा लागतो. आपुलाच वाद आपणाशी, तसा आपलाच संवाद आपल्याशी घडणे आवश्यक ठरते. स्वकेंद्रितवृत्ती आपल्यातील अंतर्मुखता संपविते. पोरांनी थोर व्हावे, यासाठी थोरांना काहीकाळ पोर व्हावे लागते. एखाद्या विद्यार्थ्याला घडविणे म्हणजे आपल्या अध्यापक पेशाचे यश नाही. यशाची शिखरे लहानमोठी का असेनात; ती चालत्या वाटांवर शिक्षकांना उभी करता यायला हवी. अर्थात असे यश सहजगत्या आपल्या पदरी येणार नाही हे मान्य. माणूस परिस्थितीचा निर्माता नसतो; पण तो परिवर्तनाचा प्रेषित बनू शकतो. मुलांच्या मनात आकांक्षांचं अफाट आभाळ कोरण्यासाठी आपणच आभाळ व्हावं लागतं.

परिस्थितीला व्यवस्थेच्या वर्तुळातून शोधून वेगळं केल्याशिवाय अध्यापकाला आपल्या पेशाची डूब कळत नसते. शाळा नावाच्या व्यवस्थेत आणि अभ्यासक्रमाच्या चौकटीत बंदिस्त करून निर्धारित केलेलं शिक्षण सगळ्यांना देता येईलही. पण संस्कारांचं आणि मूल्यांचं शिक्षण चौकटींच्या सीमांमध्ये बंदिस्त करून कसे देता येईल? व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना संयमित जगण्याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावा लागेल. सार्वकालिक मूल्यांची बिजे विद्यार्थ्यांच्या अंतर्यामी रुजवणं शिक्षकाचं काम आहे. भौतिकसुविधांच्या बेगडी समाधानात सारेच आपापली सुखे शोधत आहेत. आजूबाजूला मृगजळी मोहाचे मायावी पाश अधिक घट्ट होत आहेत. स्वार्थप्रेरित जगण्याच्या झळा माणसांची मने शुष्क करीत आहेत. अंतर्यामी अधिवास करून असलेला आपलेपणाचा ओलावा आटत चालला आहे. आपापसातल्या संवादाची परिभाषा बदलत आहे. तंत्रज्ञानाने त्याला वैश्विकतेचे परिमाण लाभले. विज्ञानतंत्रज्ञानाच्या वाटेने घडणारा संवाद व्हर्च्युअल झाला, तसा माणसाला अॅक्च्युअल जगण्याचा विसर पडत गेला. आभासी जगण्याला सुविधांच्या विश्वात प्रतिष्ठा प्राप्त झाली. फेसबुकने संवाद सुगम होत असेलही; पण त्यात ‘फेस टू फेस’ व्यक्त होण्याचे समाधान कसे गवसेल?

शिक्षणातून संपादित केलेल्या जुजबी ज्ञानावर पोट भरण्याची सोय लावता येते. ती कौशल्ये पुस्तकातील धड्यांमधून मिळतात; पण जीवनासाठी शिक्षण घेताना त्याचे स्त्रोत शोधावे लागतात. या स्त्रोतांच्या शोधाची एक वाट शिक्षकाच्या दिशेने वळणारी असावी. पोटार्थी शिक्षण आणि शिक्षक परिस्थितीत परिवर्तन कसे घडवू शकतील? माणूस उदरभरणासाठी जगतो, हे वास्तव असले तरी त्यापलीकडे काहीतरी त्याला हवं असतं. फक्त उदरभरणाचा विचार करून उचललेली कोणतीही पाऊले नवनिर्माणाची मुळाक्षरे ठरत नसतात. पोटापासून सुरु होणारे प्रश्न पोटापर्यंतच जाऊन संपतात, तेव्हा नवे काही करता येत नाही. पण पोटतिडकीने केलेली विधायक कामे अनेकांच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवू शकतात. आकांक्षांचं व्यापक आभाळ पंखावर घेण्याचं बळ वैनतेयाने घेतलेल्या डौलदार झेपेत नसतं. झेप आधी मनात उमलून यावी लागते, तेव्हा ती पंखातून प्रकटते. आकाश कवेत घेण्यासाठी मनालाही आकाशाएवढं अफाट, अमर्याद व्हावं लागतं. अमोघ कर्तृत्वाचं गगन हे समाधानाचे सदन असते. अशी कर्तृत्वसंपन्न मने विद्यमानकाळाची अनिवार्य आवश्यकता आहे.

माझा आसपास वेगवेगळ्या कारणांनी दुभंगतो आहे. जगण्याचे टाके उसवत आहेत. मीपणाचा परीघ समृद्ध होत आहे. अशा वातावरणात मी अभंग राहणे आवश्यक आहे. क्षणिक सुखांची बरसात करणऱ्या फसव्या मोहापासून अलिप्त राहून विचारांचं आणि संस्कारांचं अभंगपण शिक्षक टिकवू शकतो. याकरिता मनात उगवणारं विकल्पांचे तण वेळीच काढून टाकावे लागेल. ‘गुरुजी’ या शब्दाला आपल्या सांस्कृतिक प्रवाहात लाभलेलं अढळपण टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ‘लघूरुपाला’ व्यापकतेच्या कोंदणात अधिष्ठित करून आकांक्षांचे आकाश आंदण द्यावे लागेल. जगण्याला वैश्विक विचारांचे परिमाण द्यावे लागेल, तेव्हाच त्याला ‘गुरुपण’ येईल. शिक्षक पेशाव्यतिरिक्त अन्य काही पेशांमधील यशापयशाची चर्चा फार थोड्या नफा नुकसानापुरती सीमित असते. त्यांच्या चुकांना दुरुस्तीसाठी कदाचित अवधी मिळू शकतो. ते चुकल्यास फारतर काहींना त्याचा फटका बसेल; पण शिक्षक चुकला तर पिढी बिघडते. पिढी बिघडणे हे दुर्लक्षीण्याजोगे नुकसान नक्कीच नाही.

शिक्षकाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागते. परिस्थती विपरीत असताना मी एकटा काय करू शकतो? असं अनेकदा मनात येईलही; पण असे एकएकटे प्रयत्नही विधायकतेचे एव्हरेस्ट उभे करू शकतात. विधायक कामे करण्यासाठी माणसानं झिजलं तरी चालेल. कारण गंजून जाण्यापेक्षा झिजून जाणे केव्हाही चांगलं. बिंदू-बिंदू जमा होऊन त्याचा सिंधू होतो. कणात असते, ते मणात दिसते. बिंदूत असते, ते सिंधूत दिसते. असे कणाकणाने, थेंबाथेंबाने जमा होणारे कर्तृत्व व्यक्तित्वालाच नाहीतर जगण्यालाही व्यापकपण देते. एखाद्या विशाल वृक्षाची उंची पाहणाऱ्याच्या अनुभवावर अवलंबून नसते. ती स्वयंभू असते. त्याची मुळे आपल्या अस्तित्वाचा ओलावा शोधत जमिनीत खोलवर जातात. धरतीला घट्ट धरून ठेवणाऱ्या मुळांमुळे तो वादळवाऱ्याशी झुंज देत उभा असतो, येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थाना शीतल गारवा देत. अखंड. अविरत. शिक्षकांना असा वृक्ष होता येणार नाही का?

5 comments: