प्रतीक्षा

By // 1 comment:
पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते, हे भौगोलिक सत्य आहे. पण ती पैशाभोवती फिरते हे आर्थिक सत्य आहे. हे कितीही खरं असलं तरीही आणखी एक सत्य सरावाने असेल अथवा अजाणतेपणाने आपल्याकडून दुर्लक्षित होत असतं, ते म्हणजे विश्वाचे व्यवहार व्यवस्थेने भोवती कोरून दिलेल्या परिघाभोवती भ्रमण करीत असतात अन् माणसे या साऱ्याभोवती. 

माणसांचं जगणं देखणं असावं अन् असणं अर्थपूर्ण. ही अपेक्षा काही नवी नाही. परंपरेचे किनारे धरून तीही जगण्यासोबत वाहतच आहे. आपल्या अवतारकार्याचे अर्थ किमान ओंजळभर तरी आपल्याला अवगत असावेत. अभ्युदयाची आस सगळ्यांच्या अंतरी अधिवास करून असतेच. जगण्याला उंची अन् आयुष्याला लांबी देता यावी म्हणून माणसे काहीनाकाही करत असतात. पर्याय शोधून आपल्या असण्याला अर्थपूर्ण करू पाहतात. या सव्यापसाव्यात सापडतात कधी मुक्कामाच्या ठिकाणी नेणारे रस्ते. कधी निसटतात वाटा चालत्या पावलांच्या स्पर्शातून अन् सोबत करत राहते एक अस्वस्थ वणवण. 

सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळत नसतात, हे सांगणं कितीही खरं असलं, तरी माणसांचा काही मिळवण्यासाठी सुरु असणारा शोध काही थांबत नाही. खरंतर कधी तो थांबला नव्हता अन् थांबेल असंही नाही. पदरी पडलेल्या प्रवासात तो शोधत राहतो प्रत्येक पर्याय. कधी लागतात हाती काही विकल्प. कधी निसटतात पाऱ्यासारखे अलगद. पण वास्तव हेही आहे की, सगळेच पर्याय पर्याप्त नसतात अन् वास्तव तर हेही आहे की, सुखांच्या ललाटी समाधानाचं गोंदण सतत नसतं. त्यात कायमच काहीतरी कमतरता नांदत असते. तिच्या पूर्तीसाठी शोधले जातात काही इकडचे थोडे तिकडचे पर्याय. अर्थात, तेही प्रत्येवेळी पुरेसे असतीलच असं नाही. 

विकल्प संपले की, मागे उरते केवळ हताशपण अन् शक्याशक्यतांचा आवश्यक अनावश्यक गुंता. काही सुटलेली कोडी, काही सापडलेले संदर्भ, काही निसटलेले निर्णय अन् रित्या ओंजळी. बऱ्याचदा अशा प्रसंगांना कळत असेल अथवा नकळत किंवा सक्तीने म्हणा की, स्वच्छेने सामोरे जाणे घडते. पण खरं हेही आहे की, हताशेचे पळ काही कायमसाठी पथारी पसरून पुढ्यात पडलेले नसतात. ते चालते झाले की, निवळलेल्या आभाळासारखं सगळं काही नितळ होतं. पुन्हा नव्याने आभाळ निळाई पांघरून गात राहतं. झडून जाणे असेल, तर बहरून येणेही असतेच नाही का? विवंचना शब्दाचा अर्थ कळला की, विनंतीच्या परिभाषा समजावून सांगाव्या नाही लागत. 

मुळात आयुष्यच संघर्षाचे सूत्र असते. संघर्ष वैयक्तिक असतो, तसा सामूहिकही असतो. समूहाच्या स्तरावर घडतो, तेव्हा मान-अपमान, एखाद्याला दिले जाणारे महत्त्व, एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे या गोष्टींना फारसे अर्थ नाही उरत. ती प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा परिस्थितीने पदरी पेटलेले प्राक्तन. कदाचित त्यावेळेची ती गरजही असू शकते. पण हेही दुर्लक्षित करता नाही येत की, प्रासंगिकतेचे अर्थही परिस्थितीनुरूप बदलू शकतात. परिवर्तनशील विचारांना परिभ्रमण घडणे क्रमप्राप्त असते. ज्यांना काळाचे पडदे सारून भविष्यातील अंधार-उजेडाचे रंग वाचता येतात, त्यांना अंधाराच्या व्याख्या अन् उजेडाच्या परिभाषा समजावून नाही सांगायला लागत.

तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या प्रार्थना ज्यांना अवगत असतात, त्यांना पणत्यांचं मोल माहीत असतं. याचा अर्थ केवळ प्रार्थनेत परिवर्तनाचे पर्याय सामावलेले असतात असे नाही. बदल घडण्यासाठी पर्याप्त प्रयत्न प्रधान कारण असते. असेल माझा हरी... म्हणून कोणी वर्तत असेल, तर हरीही त्याला पाहून हरी हरी केल्यावाचून राहणार नाही. हरी हरेक चिंतांचे हरण करीत असेल, नसेलही. पण स्वप्रयत्नाने परिस्थिती परिवर्तनाचे अक्ष फिरवणाऱ्यांकडे पाहून मनातून हरकत असेल. प्रयत्नांस कोणी परमेश्वर मानतो, कोणी परमेश्वरालाच प्रयत्न. पण प्रामाणिक प्रयास ज्यांचे परमेश्वर बनतात, त्यांच्या घरी देव्हाऱ्यात नाही, पण मनात भगवंत आपलं घर अवश्य बांधतो.

काम कोणतेही असो, निवड स्वतः स्वीकारलेला पर्याय असतो. यशप्राप्तीचा आनंद त्याचा असतो, तसे प्रमादही त्याचेच असतात. पराजयाच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या की, पलायनाचे पर्याय स्वीकारणे कितपत सयुक्तिक असते? अस्मितांचे अर्थ ज्ञात असूनही अनभिज्ञ असल्याचे कोणी अशावेळी प्रदर्शित करत असेल अन् भविष्यातली अधिक गहिरी संकटे आपली नाहीतच, असं कोणास वाटत असेल, तर ती आपणच आपणाशी केलेली प्रतारणा नाही का ठरत? 

अर्थात, कोणास काय वाटावे, काय नाही, हे समजण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असते. स्वातंत्र्य आबाधित असण्यासाठी अस्मितांना आस्थेचे आयाम अवगत असायला लागतात. स्व तंत्राने जीवनयापन करायचे किंवा कसे, हे काही कुणी त्रयस्थ ठरवत नसते. ते स्वतःलाच निर्धारित करावे लागते. समजा कुणी नियंत्रणाचे सूत्रे हाती घेऊन स्वातंत्र्याचा संकोच करत असेल, तर मुक्तीसाठी स्वतःच विकल्प शोधावे लागतात. तपासून पाहावे लागतात. असतील त्यातले काही योग्य तर आणावेत आचरणात, नसतील रास्त तर वळावं नव्या वाटेने. कारण सगळेच पर्याय काही उत्तरे नाही होऊ शकत अन् समजा लागलीच काही उत्तरे हाती, तर त्यातील सगळीच सम्यक असतात असंही नाही. अशावेळी सद्सद विवेक जागता ठेवून विचारांना योग्य वाटेने वळतं करावं लागतं.

सारासारविचार नावाचा शब्द केवळ कोशाची पृष्ठसंख्या वाढवण्यासाठी नसतो. आचरणात आणण्यासाठीही असतो. विचार वेचावे लागतात. त्याआधी वाचावे लागतात. आचरणात आणण्यासाठी काही कंगोरे कोरून अन् काही कोपरे तपासून पहावे लागतात. त्यांना नैतिकतेचं कोंदण द्यावं लागतं. सुविचारांनी सगळं जग सत्वर नाही बदलत. याबाबत संदेह नाही. असं असतं तर आसपास अनेक किंतू विहार करत राहिले नसते अन् समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. पण याचंही विस्मरण व्हायला नको की, सदासर्वकाळ अवतीभवती अंधार नांदता नसतो. विचार पेरले की, एक दिवस ते उगवून येतील ही आशा असतेच, नाही का? परिवर्तनाचे पथ प्रत्येकाला निर्माण नाही करता आले, तरी ऋतूंच्या बदलांची प्रतीक्षा करता येतेच ना?
- चंद्रकांत चव्हाण 
••

गुंता असतोच आसपास

By // No comments:
आयुष्याचे प्रवाह काही सरळ रेषेत वाहत नसतात. की त्याचे ठरलेले उतारही नसतात, मिळाली दिशा की तिकडून वाहायला. ना आखून दिलेली वळणे असतात. असं असलं तरी त्याला आकार मात्र देता येतो. त्याकरिता परिस्थितीच्या कातळावर आकृती कोरता यायला हवी. तिचे संकल्पित आकार अंतरी अधिवास करून असायला लागतात. पुढे पडत्या पावलांना मुक्कामाची ठिकाणे अवगत असायला लागतात. त्याची केवळ माहिती असणं पुरेसं नसतं, तर त्या परगण्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पथांचं पावलांशी सख्य असायला लागतं. प्रवासातल्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्या, हे ठरवताना काही पाहिलेलं, काही साहिलेलं, काही अनुभवलेलं सोबत घेऊन चालणं घडतं. निवडीला पर्याय असले, तरी हे किंवा ते हा गुंता असतोच. बहुदा तोच अनेक प्रश्नचिन्हे सभोवती उभे करीत असतो.

अर्थात गुंते कुठे नसतात? अगदी साध्यासरळ वाटेने निघालेली पावलेही पथसंभ्रमित होऊ शकतात. गुंते केवळ विचारांना विचलित करणारे नसतात, तर आयुष्यही विस्कळीत करणारे असतात. जगण्याभोवती मर्यादांची कुंपणे उभे करणाऱ्या जटिल गुंत्यांबाबत मते आहेत, मतांतरे आहेत, वाद प्रतिवाद आहेत. ते काही आजच उद्भवले आहेत असं नाही. त्यांची संगत समाज नावाची संकल्पना जन्मास आल्यापासून आहेच. विचारभिन्नतेतून येणारे तात्विक वाद नसावेत, असं नाही. त्यावर चर्चा, चिंतन, मंथन घडणे विचारांच्या सुस्पष्टतेसाठी आवश्यकच. संवेदना शाबूत असल्याचे ते प्रमाण असते, कुणाला पर्याप्त वगैरे वाटत नसले तरीही. सगळे गुंते सोडवता येतात सहजपणे. पण विचारांचा गुंता वाढला की, विस्ताराची वर्तुळे सीमांकित होत जातात.

आयुष्याचे अर्थ समजून घेण्यासाठी आपणच आपला धांडोळा घ्यावा लागतो. खोदावं लागतं आपणच आपल्याला, आस्थेचा ओलावा हाती लागत नाही तोपर्यंत. जगण्याला वेढून असणारे एकेक थर खरवडून काढायला लागतात. संशोधनाच्या अनुषंगाने उत्खनन करणे अभ्यासकांचे काम. सामान्यांचा या विषयाबाबतचा वकुब पाहताना एक नेहमीच जाणवते, त्यांची मते त्यांच्या आकलनाच्या मर्यादांनी अधोरेखित झालेली असतात. बऱ्याचदा त्यात संभ्रमच अधिक असल्याचं दिसतं. अर्थात, त्यांच्याकरिता हा विषय एक तर भक्तीचा असतो अथवा अपार प्रीतीचा. विषय काही असला म्हणून तो काही लगेचच आयुष्याच्या वर्तुळात अधिष्ठित होत नाही. किंवा जगण्याचे प्रवाह तात्काळ दिशा बदलून घेत नाही. फारतर आस्थेचे, भक्तीचे तीर धरून वाहत राहतो किंवा दुर्लक्षाच्या वाटेने वळतो एवढेच. 

जगण्याचेही ऋतू असतात? असावेत. सर्वकाळ सुखांचा राबता काही कोणाच्या आयुष्यात अधिवास करून नसतो. हा सावल्यांचा खेळ असतोच सुरू सतत. फरक असलाच तर त्यांच्या कारणांत असतो. ती प्रत्येकाची आणि प्रत्येकासाठी वेगळी असतात. आनंदतीर्थे सगळ्यांच्या अंतरी कोरलेले असतात. त्याची शिल्पे साकारतातच असं नाही. कधी ओबडधोबड दगडालाही शेंदूर फासून देवत्व मिळतं. याचा अर्थ त्यात सगळंच सामावलेलं असतं असं नाही. कुणीतरी त्यात देवत्व शोधतो. कुठल्या तरी आकाराला साकार करून त्यात आपल्या आस्था शोधत राहतो. 

आयुष्याचेही थोड्याफार फरकाने असेच नाही का? अर्थात शेंदूर काही सहज लागत नाही आणि लागला म्हणून आपलं असणं देखणं होतंच असंही नाही. शेंदराचेही रंग असतात, काही छटा असतात. काही कमानी असतात, काही कोपरे आणि काही कंगोरे. काही या रंगापासून अंतराय राखून असतात. काहींनी स्वतःच लावून घेतलेला असतो. शेंदूर लागल्याने जगणं आनंदी होतंच असं नाही. आनंदाचा लेप आयुष्यावर लावता यायला हवा. 

सुखांचा अखंड वर्षाव आयुष्यात कधी होत असतो? आयुष्यात उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे…’ लिहिणं जमून आलं असेल का? रामदासांना ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे…’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का? पानगळ ज्यांना समजून घेता येते, त्यांना बहरण्याचे अर्थ उलगडतात, हेच खरं. वसंतातल्या बहराचे अर्थ समजून घेण्यासाठी शिशिरातली पानगळ अनुभवावी लागते.

सुखांची काही सुनिश्चित सूत्रे असतात? असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली. ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. त्यांचे काही आयते साचे नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. कुणाला आणखी कशात. पण समाधान? ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं? सुखाची परिभाषा सतत बदलत असते. समाधानाची व्याख्या विस्तारत असते. तिला विराम नाही. ऋतू अंगणी येतात. जातात. साद देत राहतात. त्याचे सूर कळले की, जगणं गाणं बनतं. हे सहज साकार होतं असं नाही. त्यासाठी आपणच आपल्याला नव्याने तपासून पहावे लागते. नाही का? 
चंद्रकांत चव्हाण 
••

व्यवधाने

By // No comments:
जगावेगळी जिद्द, अनुपम संघर्ष, अथक प्रयास, असीम साहस, अतुलनीय धैर्य वगैरे कौतुकाचे शब्द अमर्याद इच्छाशक्तीपुढे थिटे असतात, याबाबत संदेह असण्याचं सयुक्तिक कारण नाही. कुणी दुर्दम्य आशावाद वगैरे असं काही म्हणतात, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आपलं स्वत्व अन् सत्व आबाधित ठेवण्याची आस अधोरेखित करत असतात. सायास-प्रयास शब्द माणसांना नवे नाहीत. ते आहेत म्हणून आयुष्य समृद्ध करणाऱ्या धडपडीला काही अर्थ आहे.

जगणं कुरूप करणारी अनेक व्यवधाने आसपास नांदती असतात. शोधली तर फार प्रयास नाही करायला लागत. नजरेचा कोन थोडा इकडेतिकडे कलता केला तरी ती दिसतील. मुबलक सापडतील. अर्थात, ती असली म्हणून आयुष्य देखणं करणाऱ्या गोष्टी नाहीतच असं नाही. त्या आहेत. आणि अनेक आहेत. फक्त त्या बघण्याइतकी नजर आपल्याकडे असायला हवी. नसली तर कमावता यायला हवी. असतात अगणित गोमट्या गोष्टी आसपास फक्त वाचाव्या अन् वेचाव्या लागतात इतकंच. त्या हाती लागण्याची काही आयती सूत्रे नसतात. ती शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करावी लागतात. सापडली की संवर्धित करून ठेवाव्या लागतात.

धडपड किती असावी, याला प्रसंगनिर्मित मर्यादांचे बांध असू शकतात. पण ध्येयप्रेरित माणसे या साऱ्यांची तमा न करता लक्ष्याच्या दिशेने मार्गस्थ होतात तोच क्षण खरा. बाकी क्षणाला लागून क्षण येतो अन् पुढच्या क्षणी भूतकाळाच्या कुशीत जाऊन विसावतो. फक्त विसावण्याआधी तो वेचता यायला हवा. अर्थात, सगळ्यांनाच हे कौशल्य अवगत असतं असं नाही. सगळ्यांना सगळं यावं असंही नसतं. प्रगतीच्या पथावरून प्रवास सगळ्यांनाच करता येतो. त्याकरिता परिवर्तनाचे पडसाद वाचण्याइतकी नजर अन् बदलाचे संदर्भ वेचण्याइतकं विचारांनी विचक्षण असणं आवश्यक असतं. 

विचार सगळेच करतात, पण त्यांना खोली किती जणांना देता येते? मनात आकारास आलेल्या विचारास कृतीच्या वाटेने वळते करणे सगळ्यांच जमतं असं नाही. याचा अर्थ सामान्यांनी असाधारण असं काही न करता साधारण मार्गाने चालत राहावं असा नाही होत. एखाद्या यंत्रातला लहानसा स्क्रू विचलित झाला तरी यंत्राची धडधड थांबवू शकतो. आकाराने तो नगण्य असला तरी अस्तित्वाने तसा असेलच असं नाही.

कधी कळत, कधी नकळत काही हाती लागतंही. असं काही फार सायासाशिवाय मिळालं की, कुणी त्यावर दैव, नशीब वगैरे लेबले चिटकवून कर्तृत्त्वाचे अनामिक धनी निर्माण करतो. असं कुणी काही नियतीच्या हाती सोडून देत असेल, तर तो स्वप्ने वेचून आणण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा अधिक्षेप नाही का ठरत? क्षणभर मान्य करूया, नशीब वगैरे सारखा काही भाग असू शकतो. मग केलेल्या प्रयत्नांचं काय? उपसलेल्या कष्टाचं काय? परिश्रमांच्या ललाटी प्राक्तनाचं गोंदणच करायचं म्हटलं, तर प्रयासांना अर्थ उरतोच किती? अशावेळी कुणी प्रयत्ने वाळूचे कण... वगैरे म्हणत असेल तर त्याला कितीसा अर्थ उरतो. माणसांचा इतिहास प्रयत्नांच्या वाटेने प्रवास करणारा आहे, याचं विस्मरण होणं कर्तृत्वाशी प्रतारणा नाही का होत? कुणी नियतीचा परिपाक अन् प्राक्तनाचा प्रसाद म्हणून प्रयत्नांच्या ललाटी दुय्यमत्वाचे अभिलेख लेखांकित करत असेल, तर त्याचे पडसाद भूगोलावर पडतात एवढं नक्की.

साध्य आणि साधने यात एक अनामिक अनुबंध असतो. तो समजला की, साधनशुचिता शब्दाचा अर्थ उलगडतो. अर्थात, अर्थाचे बोध घडण्यासाठी अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचे पदर उलगडता यायला हवेत. त्याआधी भावनांच्या प्रतलावरून पुढे प्रवास करता यायला हवा. लक्ष समोर दिसत असेल आणि ते संपादित करायची अंतरी आस असेल, तर तिथं पोहचण्यासाठी पावलं स्वतःलाच उचलावी लागतात. तो काही सहज घडून येणारा प्रवास नसतो. त्यासाठी आपणच आपल्या अंतरंगात डोकावून बघायला लागतं. तेथे नितळपण नांदते राखायला लागते. 

अंतर्यामी कोरलेल्या क्षितिजापर्यंत पोहचण्याचा प्रवास मनाच्या आज्ञेने घडतो. त्यासाठी पुढे पडणाऱ्या पावलांना विचारांचे अधिष्ठान असायला लागते. मनातलं चांदणं अंधाराच्या सोबतीपासून सुरक्षित राखायला लागतं. तेव्हा चालण्याचा अर्थ समजतो. सुरक्षेची वसने परिधान करून निघालेल्यांच्या मार्गात कसलं आलंय साहस! 

साहसाचे अर्थ शब्दांच्या कोशात पाहून कळत नसतात. ते कृतीत कोरावे लागतात. पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली प्रत्ययास नाही येत. तीरावर उभं राहून नदीचं सौंदर्य डोळ्यांना दिसेल. मनाला मोहित करेल. पण त्याचं अथांग असणं कसं आकळेल? प्रशस्त मार्गांवरून पळणाऱ्या पावलांना चालण्याचा आनंद मिळेलही, पण नव्या वाटा निर्मितीचं श्रेय त्यांच्या असण्याला कसे देता येईल? मळलेले मार्ग टाळून नव्या वाटा तयार करण्याचं वेड आतूनच उमलून यावं लागतं, हेच खरं असं म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरू नये, नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

वेदनांची मुळाक्षरे

By // No comments:
आयुष्य आणि त्याला वेढून असणाऱ्या वेदनांचे अर्थ शोधताना स्वतःस खरवडून काढता यायला हवं. अर्थात, हे सगळ्यांना साध्य होतच असं नाही. ज्यांना संभव आहे त्यांच्यासाठीही ते आपण समजतो इतकं सहज, सुगम, सुघड नसतं. वेदना कुठलीही असो, तिचे अर्थ अनुभवल्याशिवाय कसे आकळतील? त्यांची ठसठस टोचल्याशिवाय समजत नसते. जखम झाल्याशिवाय घावांची खोली कळत नाही. 

सुखांची संकल्पित शिल्पे मनःपटलावर कोरता येतात, पण त्याच्या आकृत्या साकारणे सहजपणाने पदरी पडणारे समाधान नसते. सुखांचे परगणे स्वतःच तयार करायला लागतात. त्याच्या विस्ताराच्या सीमा कोरून घ्याव्या लागतात. त्यातही काही न्यून राहतेच. सुखाच्या अनवरत वर्षावाचा संग घडणं अवघडच. सुख शब्दाचा अर्थ समजण्यासाठी नजर कमवायला लागते. प्राप्त परिस्थितीकडे समत्वदर्शी दृष्टीने बघण्यासाठी नजर गवसली की, सुखांचे अर्थ नव्याने उलगडतात. त्यांच्या व्याख्या शोधण्यासाठी अन्य क्षितिजांच्या आश्रयाला जावं नाही लागत. 

आयुष्यात अधिवासास आलेले सुख-दुःखाचे लहान मोठे कण वेचता आले की, अंगणी समाधानाच्या एकेक चांदण्या उमलत राहतात. फक्त मनातला चंद्र प्रकाशत राहायला हवा. हे एकदा जमलं की, आयुष्यातील सुखांचे अर्थ अन् त्यांना असणारे अनेक ज्ञातअज्ञात कंगोरे कळतात. चांदण्याच्या कवेत सामावलेल्या प्रकाशाचे संदर्भ समजले की, समाधानाच्या परिभाषाही अधोरेखित होत राहतात. 

आनंदाच्या परिभाषा सहजपणे काळपटावर अंकित नाही करता येत. आनंद अंतरी नांदता असला की, चैतन्य चेहऱ्यावर विलसते. आयुष्यातून वाहते. जगण्यातून गवसते. ते काही उताराचे हात धरून वाहत नसते. सीमांकित असल्या तरी, आनंदाच्या संकल्पना त्यासाठी अवगत असायला लागतात. अर्थात, हेही खरंय की, कोणाला आनंद कशात, कुठे आणि कसा गवसेल हे सांगणं बऱ्यापैकी अवघड. कुण्या एकाचा आनंद दुसऱ्याच्या वेदनेची व्याख्या असू शकतो. असं असलं, तरी आनंदाची काही अभिधाने असतात. ते अवगत करून घेतले की, आयुष्याला वेढून असणाऱ्या एकेक पैलूंचे अर्थ समजू लागतात.

वेदनांची मुळाक्षरे जगण्याला आकार देत राहतात. आपणच आपल्याला नव्याने समजून घेताना आयुष्याचे एकेक पदर उलगडत राहतात. काही सुटलेलं, काही निसटलेलं, काही सापडलेलं असं सगळंच जमा करीत राहतो माणूस कुठून कुठून. अंतरी वेडी आस बांधून पळत राहतो अखेरपर्यंत. सुखांनी भरलेले घट दारी रचता यावेत म्हणून संचित वगैरे अशी काही नावे देऊन पांघरत राहतो परंपरेच्या भरजरी शाली. त्यांचं भरजरी असणं धाग्यातून उसवत असलं, तरी पुन्हा पुन्हा सांधण्याचा प्रयत्न करीत असतो. टाके घालून कोपरे जोडण्याचा प्रयत्न करीत राहतो. विस्कटलेल्या धाग्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत मनातल्या श्रद्धांना देव्हारे उपलब्ध करून देत असतो. 

मन अन् भावनांच्या विश्वात विहार करताना विचारांशी सख्य सहजपणे साधता यावं. समाधानाच्या व्याख्या समजून घेता आल्या अन् सुखांचे अर्थ त्यांच्या कंगोऱ्यासह कळले की, आपणच आपल्याला नव्याने सापडतो. संवेदनांचे तीर धरून वाहताना माणूस आयुष्याचे किनारे कोरत राहतो नव्याने. चालत राहतो अपेक्षांचं गाठोडं डोक्यावर घेऊन. सुख-दुःखाचं पाथेय घेऊन भटकत राहतो समाधानाच्या चार चांदण्या वेचण्याच्या मिषाने. मनात विचारांची वादळे सैरभैर वाहत राहतात. भावनांच्या लाटा आदळत राहतात आयुष्याच्या किनाऱ्यांवर. प्रत्येक पळ एक अनुभूती बनून सामावतो जगण्यात. हे विखरत जाणंच जगण्याला नवे आयाम देत असतं.

काही गोष्टी संस्कृतीचे संचित असतं. आहे ते सगळेच सुंदर असतं अन् एकजात सगळंच वाईट वगैरे असतं, असं नाही. बरं अन् वाईट या बिंदूना सांधणाऱ्या संक्रमणरेषेवर असणारा विकल्प असतो तो. आहे ते अन् पदरी पडलं ते सगळंच समाजमनाचे तीर धरून वाहत येतं असंही नाही. मनावर चढलेली पुटे धुवायला थोडा अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. 

माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. वाहत्या वाटेवर वळणे असतात. वळणे ओलांडून वेग नाही धारण करता येत अथवा त्यांना वळसा घालूनही नाही पळता येत पुढे. वेगाला आवर घालण्यासाठी बांध घालावे लागतात. सुरवातीस त्यांची उंची मोठी नसते. ती सावकाश वाढवावी लागते. कारण रूढी जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच.

बदल घडतात. कधी घडून येतात. कधी घडवावे लागतात. बदल ही एकच गोष्ट अशी आहे, जी बदलवता नाही येत. संक्रमणाचं स्वप्नं पाहणाऱ्या डोळ्यांना सहकार्याच्या चिमूटभर मातीचंही मोल माहीत असतं. सहकार्याला कशाचीही उपमा देता नाही येत, फक्त त्याचे उपमेय अन् उपमान आपल्याला होता यायला हवं. पण आहे ते विसरून, मिळालं ते नाकारून कशाशी तरी तुलना करण्याचा मोह अनावर झाला की, आयुष्याचे अन्वयार्थ अधिक अवघड होतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

अभिनिवेश

By // 1 comment:
समाज नावाच्या विस्तीर्ण वर्तुळात विहार करताना माणूस म्हणून प्रत्येकाच्या असण्याचे काही अर्थ असतात. काही पैलू, काही कोपरे असतात अन् काही कंगोरेसुद्धा. त्यातून त्याची प्रतिमा आकारास येत असते. काहीना संकल्पनेप्रमाणे आयुष्याला आकार देता येतो. काहींच्या आकृत्या अर्धवट राहतात. अखंड सायास-प्रयास करूनही हाती काही लागत नाही. एक मोठं शून्य नियतीने कपाळी कोरलेलं असतं. त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा अटळ भागधेयच असतं त्यांचं. ना आयुष्याचे अर्थ हाती लागतात, ना जगण्याचे संदर्भ. संगतीची सूत्रे शोधायला जावं तर विसंगतीच्या वाटांकडे पावले वळती होतात.

आहे ते पर्याप्त मानून जीवनाचा विनम्र शोध घेता आला की, आनंदाचे वाहते ओहळ शोधायला नाही लागत. सोस सोबत असला की, आहे तेही अपर्याप्त वाटतं. आसपास एक अस्वस्थता दाटत राहते. मग सुरू होते कवायत भाग्याचे साचे बदलता यावेत म्हणून. कदाचित आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक दाखवायची हौस असते म्हणून होत असेल असे कदाचित. समजा तसं असेल तर त्यातून असं कोणतं संचित गवसत असेल की, ज्यामुळे त्याच्या आयुष्याचे अर्थ अन् जगण्याचे संदर्भ बदलून जातील? मनाला क्षणभर मिळणाऱ्या बेगडी समाधानाशिवाय यातून हाती फारसं काहीही पडत नाही खरंतर. हे कळत नाही असं नाही. पण वळत नाही हेच खरं. आपल्याकडे नाही ते दाखवण्याच्या खटाटोपात कोण कोणतं टोक गाठेल, हे सांगणं अवघड. 

प्रदर्शनीय भूमिकेतून अभिनिवेश आकाराला येतात अन् आयुष्याचे एकेक अर्थ बदलू लागतात. ते कुठून, कसे जन्माला येतील याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. त्यांचे आयते साचेही नसतात. अभिनिवेश कोणतेही असूद्या, त्यांना विस्तार दिसत असला तरी खोली नसते. खरंतर या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. वैयक्तिक असतील अथवा सामूहिक त्यांना देशप्रदेशाच्या सीमा असतीलच असे नाही. त्यांचा अधिवास सर्वत्र असू शकतो. कधी ते आगंतुकपणे चालत येतात. कधी त्यांना आवतन देऊन बोलावलेलं असतं. त्यांच्या असण्याला समर्थनाचे टॅग लावता येतात. त्यांना विषयाच्या मर्यादा नसतात. ते कोणत्या कारणांनी प्रबळ ठरतील याचे आडाखे नाही बांधता येत. त्यांच्या वैयक्तिक असण्यात माज असतोच, पण सामूहिक असण्याला उन्माद चढतो. वंशीय, धर्मीय अभिनिवेशांनी विश्वात खूप मोठे कलह घडवले आहेत.

माणसाला संघर्ष काही नवे नाहीत. पण प्रत्येकवेळी त्यामागे समर्थनाची नवी प्रयोजने पेरली जातात. हे काही आज घडतंय असंही नाही. जग नावाच्या पसाऱ्यात सामावलेल्या सगळ्याच प्रदेशात यावर खूप मोठं मंथन घडलं आहे. चर्चेच्या माध्यमातून समाज ढवळून निघाला आहे. ब्रुनोला जिवंत जाळलं गेलंय, सॉक्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागला. सॉक्रेटिसला शिष्यांच्या मदतीने पलायनाचे पर्याय उपलब्ध होते, पण त्याने सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्या पथावरून घडणारा प्रवास नाकारला. मी पलायन करणे म्हणजे सत्याचा मार्ग नाकारून स्वार्थासाठी संकुचित होणे असा होतो अन् हे मला मान्य नाही म्हणण्याइतकं प्रगल्भपण त्याच्याकडे होतं.

वाद कुठे नाहीत? वादांना निर्विवादपणे सामोरे जाता यावे. ते विचारांच्या कक्षेत विहार करणारे असावेत. विचारांनी विचारांचे दिवे प्रज्वलित करावेत. त्याच्या प्रकाशात आयुष्य वाचावे. जगणं वेचावे, कृतीत विचार पेरावेत. यासारखा चांगला विचार आणखी कोणता असू शकतो? आपले विचार रास्त असतील, तर कोणीतरी स्वीकारेलच. नसतील कोणाला मान्य, तो नाकारेल. ते स्वीकारावेत असा आग्रह नको अन् नाकारलेत म्हणून आकस नको. 

आयुष्याकडे बघायचे प्रत्येकाचे काही प्रयोजने असतात. काही प्राथमिकता असतात. त्यांची परीक्षा ज्याची त्यानेच घ्यावी. तपासून पाहावं स्वतःच स्वतःला. धांडोळा घ्यावा आपणच आपला. आयुष्याचे अर्थ शोधताना कधीतरी अनपेक्षित काही समोर येतं अन् आपणच आपल्याला खरवडून काढायला भाग पडतं. पृष्ठभागावर साचलेले धुळीचे थर थोडे बाजूला सारता आले की, दृश्य प्रतिमाने अधिक ठळक होतात, नाही का? 

हे असं काही असतंच आसपास. म्हटलं कुणी असं तर वास्तव अन् नाहीच मानायचं ठरवलं तर अवास्तवसुद्धा. स्वीकाराचा ना आग्रह, ना नकाराचे दुःख. ना कोणता उपदेश. ना कोणता सल्ला, ना कसलं मार्गदर्शन. असं काहीसं जगण्यात रुजवता आलं की, आयुष्य फार काही अवघड गणित नाही राहत. पण वास्तव हेही आहे की, सगळीच गणिते सुघड नसतात आणि सगळीच काही अवघड. असली अवघड म्हणून सोडवायची नसतात का? उत्तरांच्या बिंदूवर पोहचण्यासाठी मधल्या पायऱ्या गाळून नाही टाकता येत. हवं असणारं आपलं काही सहजपणे सापडतं, काही सुटतं, काही निसटतं. म्हणून अंतरी अधिवास करून असलेल्या आशेच्या व्याख्या आणि आस्थेचे अर्थ थोडेच बदलतात. तसंही हवं ते आणि आहे ते, सदासर्वकाळ एकाच ठिकाणी मुक्कामाला कसे असेल?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रतिवादाच्या परिभाषा

By // No comments:
विश्वाचे व्यवहार कोणत्या एकाच एक गोष्टीवर सुरु आहेत? उत्तर फक्त एकच पर्यायात यायला हवं आणि तेही कोणत्याही किंतुशिवाय. असा काहीसा प्रश्न तुम्हांला कुणी विचारला तर एकतर तुम्ही त्याच्या ठीकठाक असण्याची खातरजमा कराल किंवा मनातल्या मनात त्याच्या मेंदूचं माप घ्याल. 

अर्थात, असं काहीसं वाटणंही स्वाभाविकच. विचारणाऱ्यास तत्काळ वेड्यात काढण्याची अनायासे चालून आलेली संधी काहीजण अजिबात वाया जाऊ देणार नाहीत. काही सहानुभूतीच्या ओंजळी भरून पाहतील. पण खरं हे आहे की, कोणती तरी एकच एक गोष्ट व्यवहार सुरळीत करण्यासाठी कारण असते असं नाही आणि ते संभव सुद्धा नाही. 

व्यवस्था नावाचं वर्तुळ व्यापक असतं. त्यात अनेक शक्यता नांदत्या असतात. वेगवेगळे विकल्प विहार करत असतात अन् त्यासोबत विचारही वाहते असतात. जगणं समृद्ध करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना विवक्षित वाटेने वळवण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये अन् विचारांना विशिष्ट मार्गाने वळते करण्याचा वकूब असतो भावनांमध्ये. विचारांना शुष्कपणाचा शाप आहे. पण भावनांना ओलाव्याचा स्पर्श लाभलेला असतो. 

विचार अन् भावना सतत एकत्र नांदत्या असतीलच असं नाही. भावनांचं सख्य मांगल्याशी असतं अन् विचारांचा स्नेह सौंदर्याशी असतो. सुंदरतेला सहजतेचा स्पर्श झाला की ते खुलतं. विचारांना नितळपण घेऊन वाहता आलं की, शुद्धतेच्या सहाणेवर घासून नाही पाहावे लागत. भावनांना निकषांच्या चौकटीत नाही तपासून पाहावं लागत. संवेदना हेच त्यांचं सदन असतं. ओंजळभर ओलावा घेऊन भावनांना वाहता आलं अन् वाहता वाहता शुद्ध होता आलं की, निखळ निर्व्याज असण्याचे एकेक अर्थ आकळत जातात. परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत त्याची परिणामकारकता. सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. नितळ नजरेला निखळ दिसतं. मोजता येतं ते मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त झालेलं असतं. विस्तारला मर्यादांचे बांध पडले की, सहजतेचे सूर सुटतात अन् मागे उरतो केवळ कल्लोळ. आवाज तर असतो, पण त्यातला आनंद हरवलेला. 

अफाट, अथांग, अमर्याद असण्याचे अर्थ केवळ कोशात असून उपयोग नसतो. त्यांना आयुष्यात आणता आलं की, जगण्याचे संदर्भ बदलतात अन् अतिशयोक्तीचे किनारे धरून ते पुढे सरकू लागले की, अर्थ हरवतात. विचारांच्या वाटेने वळत्या झालेल्या पावलांना विस्ताराच्या परिभाषा पाठ असतात. त्या अवगत करण्यासाठी कवायत करण्याची आवश्यकता नसते. विस्ताराचे स्वप्न डोळ्यात घेऊन आपणच क्षितिज होऊ पाहणाऱ्या वर्तुळाभोवती मर्यादांची कुंपणे कोरता आली, तरी सगळीच वर्तुळे काही सीमांकित नाही करता येत. विचार हे असं एक वर्तुळ आहे, ज्याचा परीघ परिभाषेभोवती प्रदक्षिणा नाही करत. त्याचं भ्रमण नव्या व्याख्या लेखांकित करतं. विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्याला संगतीचे अर्थ अवगत असतात अन् वैगुण्यांसोबत विसावलेले विसंगतीचे विश्वही. 

वैचारिक चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडणे. उगीच आगपाखड करून एखाद्याच्या माथी खापर फोडणे, फार अवघड असतं असं नाही. पण याचा अर्थ आपणही अर्धाच विचार करतो आहोत, असा नाही का होत? विचारांचा प्रतिवाद विचारांनी होणे, हे आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे परिमाण असते अन् आपल्या प्रज्ञेचा परिणत असण्याचा परिपाक. प्रवाद असतात, वादही असतात, वितंडवादही करता येतो; पण आसपास संवादही नांदता असतो, नाही का? विचारांमध्ये भिन्नता अवश्य असावी. वादही असावेत, पण ते विसंगतीला आवतन देणारे नसावेत अन् प्रवादाचे प्रवाह बनू नयेत. 

प्रतिवादाच्या परिभाषा पर्याप्त परीघ घेऊन प्रदक्षिणा न करता स्वतःभोवती परिवलन करीत असतील, तर विचारांना त्यांचं आभाळ गवसेल कसं? वाद-संवाद, खंडन-मंडन निकोपपणे करता येणे अवघड नसते. फक्त नजरेला थोडं दूरचं क्षितिज बघता यायला हवं. मुद्द्यांना मुद्देसूद मार्गाने मांडता येणे, नेता येणे संतुलितपणाचे व्यवच्छेदक लक्षण असते. केवळ आणि केवळ माझीच मते ग्राह्य आणि संग्राह्य असं नसतं. मीपणाच्या वर्तुळातून बाहेर पडता आलं की, विचारांचा विस्तार समजतो. पण विस्ताराच्या व्याख्या विस्मरणात गेल्या की, उजेडाचे कवडसे अंधाराच्या गर्तेत हरवतात. 

प्रश्न कुठून कसे निर्माण व्हावेत, याच्या काही सुनिश्चित व्याख्या नसतात. ते का निर्माण झालेत, याची उत्तरे असतीलच असेही नाही. कुठल्याशा अभिनिवेशातून निर्मित प्रश्न विचारांचे परीघ सीमांकित करतात. प्रदक्षिणा असतात त्या संकुचित वर्तुळांभोवती घडणाऱ्या. खरंतर प्रवादांचाही प्रतिवाद करता येतो. फक्त वादप्रवादांच्या पाठीमागे असणाऱ्या विचारांची वलये तेवढी समजून घेता यावीत. विचार परिवर्तनीय असतात. वाहत्या विचारांना नितळपण लाभते. पाणी साचले की कुजते. विचार तुंबले की दूषित होतात, म्हणून त्यांचं वाहत राहणं महत्त्वाचं. विचारांची वर्तुळे विस्तारत जातात तसे अभिनिवेशाचे अर्थ आकळत जातात. विचार विस्ताराचे विश्व विसरतात, तेव्हा अभिनिवेशाना अनकालीय अर्थ प्राप्त होतात. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

सुखांचे पिंजरे

By // 1 comment:
दुःख आणि संकटांना काही कोणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणत नाही. आपल्या पावलांनी ती चालत येतात. त्यांनी यावं की नाही, हेही काही कोणाला ठरवता नाही येत. म्हणजे मर्यादित अर्थाने दुःखापासून अंतर राखता येत असलं अन् सुखांशी सलगी करता येत असली, तरी कधी परिस्थितीच अशी काही वळण घेते की, मानलेल्या मातब्बरांनाही मात देते. खरंतर दुःखाचं येणं कोणालाच नको असतं. दुःख माझ्या पदरी पडूदे म्हणून सांगणारी कुंती एखादीच. बाकी सगळे सुखांचे पिंजरे शोधणारे. मनाजोगत्या आकारात आयुष्य मापता नाही आलं की, कुणाच्या तरी पदरी आपल्या अपयशाचं माप टाकता यावं म्हणून अनेक मार्ग शोधले जातात. माझ्याच वाट्याला हे भोग का येतात म्हणून माणूस प्रत्येकवेळी परिस्थितीच्या कपाळी आपल्या नाकर्तेपणाचे चिटोरे चिटकवत असतो. 

पुढ्यात पडलेल्या प्रसंगांचं दायित्व नेमकं कोणाकडे कलतं करावं? परिस्थिती की प्राक्तन? नाहीच निर्णय घेता येत. खरंतर कोणाकडे ते वळते करायची आवश्यकता नसतेच. केवळ आपण आपल्या मर्यादा मान्य केल्या तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हाती लागू शकतात. पण स्वतःला मोठं मानण्याच्या नादात आपलं अपयश अमान्य करण्याचे अमाप प्रयत्न आपण करत असतो. दुःखाच्या कथा रंगवून सांगत असतो. वेदनांना सहानुभूतीचा संग घडवून देखणं करण्याची कोणतीच संधी दडवत नाहीत. सुखाचें निसटते स्पर्श जगणं वगैरे सजवू शकत होते, पण ते फारकाळ अंगणी नांदते राहिलेच नाहीत म्हणून नशीब वगैरे नावाची बेटं नव्याने उभी करतो. खरंतर दुःख कुणाच्या ललाटी लिहलं नाही आणि सुखाचा चतकोर तुकडा सापडला नाही, असा माणूस सापडायचा आहे. सुखाचा शोध सहजवृत्ती असली तरी दुःखाचा संगही स्वाभाविक आहे. फक्त प्रत्येकाच्या दुःखाची प्रत वेगळी अन् सुखाचा पोत निराळा असतो.

आयुष्य, जीवन, जगणं वगैरे शब्द देखणे वाटत असले तरी ते काही सरळ रेषेत चालत नाही. सरळ रेषा फक्त मनात असतात. जगण्यात नसतात. वास्तवात अनेक वळसे घेत धावत राहतात त्या इकडेतिकडे. सैरभैर वासराचे पाय वाट दिसेल तिकडे वळतात. त्याला वाटा कळतात, पण परिस्थितीने पकड मजबूत केल्याने गांगरून वाटेवरील ओळखीच्या खुणा विसरून धावत राहतं. असंच काहीसं आयुष्याचे अर्थ शोधताना होतं. सगळंच नसेल, पण बरंच काही हाती असून ते शोधण्यासाठी उगीच वणवण सुरू असते.

जगण्यात असलं काय अथवा वागण्यात असलं काय, करंटेपण आहे तेच अन् तसंच असतं. त्याच्या वेगळ्या व्याख्या नाही करता येत. ठिकाण बदललं म्हणून अर्थ नाही बदलत त्याचे. करंट्यांनी स्वतःच्या कर्माने कपाळी कोरून घेतलेले अभावाचे अभिलेख ना नियतीला बदलता येत, ना नियंत्याला मिटवता. ना नशिबाला नव्याने लिहता येत, ना संधीचे सूर पकडून त्यांना जगण्यावर साज चढवता येत. स्वतःच अंधाराकडे चालणं स्वीकारलं असेल कोणी, तर त्याला पर्याय नसतात. समजा दिले कोणी संधीचे कणभर कवडसे वेचून त्यांच्या हाती, म्हणून नव्या वळणाशी सख्य साधता येतंच असंही नाही. तेवढं ओझं पेलायला हातच समर्थ नसतील तर... अशावेळी कोणी काहीही केलं तर काहीतरी सकारात्मक होण्याची संभावना उरतेच किती? समर्थ खांदेच ओझं पेलायला सक्षम असतात. हे खरं असलं तरी जगण्यात विसावलेली सकारात्मकता अनेक अवघड गोष्टींना आवाक्यात आणते हेही खरं.

आयुष्याच्या सोबत चालत येणाऱ्या अंधाराचे अर्थच कळत नसतील कोणाला, तर उजेडाचा व्याख्या समजावून सांगण्यात कसलं आलंय शहाणपण. पणतीच्या प्रकाशाच्या परिभाषा सांगून पुण्य पदरी पडणं कसं शक्य आहे? त्यासाठी वात पेटवून आस्थेला साद घालता यायला हवी. श्रद्धा डोळस असल्या की, भक्तीचे अर्थ शोधता येतात. ते सापडले की त्यांचे अन्वय तेवढे लावता यायला हवेत. दगडातून नको असणारा भाग काढून मूर्ती घडवता येते हे खरंय. अनावश्यक भार काढून दगडाला आकार देता येईलही, पण देव कसा साकार करता येईल. देव घडवण्यासाठी त्यात भाव ओतावा लागतो. नुसत्या दगडाला देवपण देण्यात काहीच हाती लागत नसतं. दगडाला शेंदूर लावून पूजा केल्याने त्याचं असणं देखणं नाही करता येत. त्यावर रंगांचा लेप लावता येईलही. पण अंतरंगी असणाऱ्या आकृतीचं काय? 

कोरडेपण कोणत्याही कृतीला प्रतिसाद नाही देऊ शकत. ओंजळभर ओलावा रुजण्याच्या संधी देतो, मुळांना त्याला प्रतिसाद देता आला की, उगवून येण्याचे संदर्भ नाही शोधायला लागत. संधीचा अव्हेर करणाऱ्यांना हे कळणं असंभव. अंधार हेच प्राक्तन असेल, तर प्रकाशाची सगळी प्रयोजने अशावेळी पोरकी होतात. प्रवास कोणताही असो तो कधीही सहज, सुगम नसतो. तो तसा असता तर भटक्यांच्या भटकंतीचे गोडवे कोणी गायले नसते. वैयक्तिक असलं म्हणून आयुष्याचंही गणित वेगळं कुठं असतं. आपल्याकडे काहीतरी असावं ही आस अंतरी अधिवास करून असल्याने माणसांची पावले सतत पळत राहिली आहेत. सुखांची आस नसती तर अज्ञात परगण्यात पाऊल ठेवणाऱ्यांच्या पाऊलखुणाचा माग काढत माणसे नव्या वाटांनी वळती झाली नसती. अनभिज्ञ वाटा अन् अनोळखी वळणांशी सख्य साधत देशांतर करायला कुणी धजलं नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••