गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायण मामा
ताई,
नवरदेव-नवरीले हायद लावले चाला! अप्पा, मानतानं निवतं शे! जिभाऊ, शेवंतीले
निघा! बापू, टायी लावाले चाला! आबा, तात्याकडनं चुल्हाले निवतं शे! या आणि
अशाच प्रसंगपरत्वे अगदी बारश्यापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांसाठी
निवते देणारा खणखणीत आवाज गल्लीच्या सीमा पार करून निनादत राहायचा काही वेळ
तसाच आसपासच्या आसमंतात. त्या सांगण्यात एक लगबग सामावलेली असायची. आजही
हा आवाज मनात आठवणींच्या रूपाने स्पंदित होतो. स्मृतीच्या गाभाऱ्यातून
निनादत राहतो. या आवाजाचा धनी कालपटाने जीवनग्रंथात अंकित केलेल्या काही
वर्षांची सोबत करून निघून गेला आहे. देहाचे पार्थिव अस्तित्व विसर्जित
झाले. पण गावाला सवय झालेल्या या आवाजाची सय अजूनही तशीच आहे. गावातल्या
लग्नकार्याच्या, कुठल्याशा सण-उत्सवाच्यानिमित्ताने कळत-नकळत त्याच्या...