विस्ताराची वर्तुळे अन् मर्यादांची कुंपणे

By // No comments:
आपल्या आसपास असंख्य गोष्टी घडत असतात. त्या सगळ्यांचे अन्वय लावता येतातच असं नाही अन् लावता यायलाच हवेत असंही नसतं. काही गोष्टींचे संदर्भ पाहून अर्थ कळतात. काही संदेहाच्या परिघाभोवती भ्रमण करीत राहतात. त्यांच्या बाबत एकच एक विधान ठामपणे करणं जरा अवघडच असतं. इहतली संदेह घेऊन विहार करणाऱ्या गोष्टींची कमतरता कधीच नव्हती अन् नसेलही. शोधल्या तर एकाला चार सापडतील. 

अनेक किंतुपरंतु भोवती घेऊन भ्रमण करणारी गोष्ट म्हणजे माणूस, असं कोणी म्हणत असेल तर अतिशयोक्त ठरू नये. खरंतर माणूस या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून कोणी संदेह हा शब्द सांगितला तर फारसं वावगं ठरू नये. वागण्याच्या पद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे कळतोच असं नाही. माणूस समोर दिसतो, तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची सुतराम शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि  असायलाच हवा, असंही नसतं काही. किंवा माणूसपणाच्या सगळ्या सीमा पार करणारा अन् खूप पराकोटीचा विसंगत वर्तनारा असेलच असंही नाही. 

तसंही सगळीच माणसे माणूस म्हणून जवळपास सारखी वाटतात. असलाच काही फरक शोधायचा तर अगदी नगण्य असेल. पराकोटीची गुणी एखाद टक्का अन् टोकाची अवगुणी एखाद टक्का एवढी संख्या सोडली, तर राहिलेले सगळे संक्रमण रेषेवरून प्रवास करणारे. कोणत्या प्रसंगी,  कोणते अन् कसे विचार प्रबळ असतील त्यावरून यांचा अक्ष थोडा इकडे अथवा किंचित तिकडे कलतो. भ्रमण तर घडतच असतं व्यवस्थेच्या वर्तुळाला धरून.

कोणी माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, आत्मलुब्ध असं तर नसतंच नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित कारणांनी असू शकतं. काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. माणसांशी फटकून राहतो तोही माणूस अन् माणसांच्या मनात राहतो तोही माणूसच असतो. काही आपल्या विस्ताराची वर्तुळे आखून त्याभोवती विहार करण्यात आनंद शोधतात. काहींना परिघापलीकडील वाटांवरून घडणारा प्रवास आपलासा वाटतो इतकेच.

आपल्या आकलनाच्या पलीकडले विश्व प्रयत्न करूनही आपल्याला आकळत नाही अन् त्याचे व्यवहारही त्यातल्या खाचाखोचांसह कळत नाहीत, म्हणून हे आपल्या आनंदासाठी नाही अशी समजूत करून घेतलेली असते काहींनी. जगाच्या आनंदाची अभिधाने आगळीच असतात अन् आपल्या आनंदाची परिमाणे निराळी, असं कुणाला वाटतं. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला माणसांच्या गजबटाला टाळून. 

एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. अर्थात, असे मत तयार करताना आपण इतर बाजूंचा फारसा विचार करत नाहीत. तो अमका-तमका तसाच आहे. त्याला माणसांच्या मतांची अन् मनाची पर्वा नाही. माणूस टाळून माणूस समजू पाहतोय तो. याला काय म्हणावं? कसं शक्य आहे? असं कुणी वागतं का? उगीचच स्वतःला ग्रेट वगैरे प्रकारातला समजतो. माज करण्याइतकं असं काय आहे त्याच्याकडे? परिस्थितीने एवढा पोळला गेला, तरी त्याचा उन्माद काही तसूभरही कमी होत नाही, वगैरे वगैरे.

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या परिघात तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? ज्यास तुम्ही तुसडेपणा म्हणून अधोरेखित करतात, दीडशहाणा असणं म्हणतात, त्याला कुणी सुरक्षित अंतर समजत असेल, तर त्यात वावगं काय आहे? 

सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. मान्य आहे की, माणूस समाजशील, समूहप्रिय वगैरे प्राणी आहे. अवतीभवती विहार करणारे ओळखीचे काही चेहरे, काही अनोळखी आकृत्या त्याच्या सामाजिक जगण्याची आवश्यकता आहे. आसपास कोणी असणं त्याची भावनिक गरज आहे, म्हणून तो हे सगळं काही काळ टाळून जीवनयापन करू शकत नाही का? समजा तो तसा काहीसा असला, तरी समूहातील सगळेच प्राणी समूहाच्या मानसिकतेचे तंतोतंत निर्वहन करतात, असं कुठे आहे? असं नसेल तर सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं, हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का?

- चंद्रकांत चव्हाण
••

एकांत आणि लोकांत

By // 2 comments:
काहींना एकांत प्रिय वाटत असेल, काहींना लोकांत आवडत असेल. कोणाला आणखी काही. कोणाला काय वाटावे, याची काही निर्धारित केलेली नियमावली नसते. कोणाला एकांत भावत असेल, कुणाला लोकांत आपला वाटत असेल, तर निवडीचे स्वातंत्र्य त्याचेच असते, नाही का? त्याच्यापुरती विशिष्ट विचारधारा निवडून तो वर्तत असेल, तर त्यात वाईट ते काय? प्रत्येकाकडे आपलं असं काही असतं अन् ते त्याला सांभाळून ठेवायला आवडत असतं. नसेल कोणाला पदरी पडलेल्या प्रवासाचा पथ पर्याप्त वाटत, तर ते त्याचं स्वातंत्र्य. याचा अर्थ असा नाही की, तुमच्या विचारांची चाके लावून त्याने निर्धारित केलेल्या पथावरून पुढे पळायला हवं. आखून दिलेल्या चाकोऱ्यांना प्रमाण मानून गुमान चालत राहावं. कोणताही किंतु मनाच्या कोपऱ्यात न ठेवता पदरी पडलं ते पर्याप्त मानून प्रमुदित राहायला हवं.

अशी सक्ती करता येते? कसं शक्य आहे ते. कुणी कुणाच्या स्नेहात असावं, हा भाग ज्याच्या त्याच्या निवडीचा अन् कोणाच्या आज्ञा प्रमाण मानव्यात हा भाग आवडीचा. तो काही कोणावर लादता नाही येत. एखाद्याविषयी आतून आपलं असं काही वाटत असेल, तर आस्था दाखवण्यासाठी कवायत नाही करायला लागत. भक्त जमा करता येतात. अनुयायी गोळा करता येतात. त्यांच्या मुखी महतीची स्तोत्रे पेरता येतात, पण महात्म्याचा साक्षात्कार घडवण्यासाठी स्वतःला महानतेच्या परिभाषा अवगत असायला लागतात. महात्म्य काही मागून मिळत नाही की लादून, त्याकरिता आपणच आपल्या उंचीशी स्पर्धा करायला लागते. आपणच आपल्याला वाहता वाहता नितळ करता यायला हवं. आपणच आपल्याला खरवडून काढावं लागतं. भक्तांची गर्दी भलेतर भास निर्माण करू शकेल. अनुयायांचे आवाज आसपास ऐकू येतील, पण आतला आवाज ज्याचा त्यानेच सांभाळायचा असतो. तो काही उसना आणता नाही येत कुठून. 

माणसांच्या गर्दीत राहणारे सगळेच दर्दी अन् गर्दी टाळून आपणच आपल्याला शोधणारे कोलाहलाची सर्दी झालेले असतात असंही नाही. कुणी कुठे राहावं, कसं असावं, कसं नसावं, हा सगळा वैयक्तिक निवडीचा भाग. आपल्याच कोशात रममाण असणं अन् आपणच घालून घेतलेल्या मर्यादांच्या कुंपणाभोवती प्रदक्षिणा करणं, ही माणूसपणाची मर्यादा असेलही. म्हणून ती काही एखाद्याच्या व्यक्तित्वाची पूर्ण व्याख्या नाही होऊ शकत. तसंही माणसांच्या गर्दीत राहून माणूसपण कळतेच असे नाही. माणूस कळायला माणसांची गर्दी हे एकक नाही वापरता येत. परिमाणच लावायचं असेल तर माणूसपणाच्या परिभाषा सर्व कोनातून समजून घ्यायला लागतील. पण हे शतप्रतिशत संभव असणं अवघडच.

गर्दीचा भाग बनून स्वार्थ शोधणाऱ्या बगळ्यांपेक्षा कुठल्यातरी एकांतस्थळी विहरणाऱ्या पाखरांचा पैस अधिक असू शकत नाही का? स्वार्थाच्या परिघाभोवती फेऱ्या करण्यापेक्षा आकाशाला पंखावर घेण्यासाठी केलेल्या प्रदक्षिणाचे मोल अधिक असते, नाही का? प्रत्येकाचा पैस सारखा नसेल हे निर्विवाद. काहींना परीघ पकडता येतात, काहींना त्याच्या विस्ताराच्या परिभाषा आकळतात, तर काहींना त्याभोवतीच्या प्रदक्षिणा कळतात. काय कळावं हे कळतं, त्याला आयुष्याचे ज्ञातअज्ञात कंगोरे कळत जातात. नियतीने म्हणा अथवा परिस्थितीने पदरी पेरलेल्या प्राक्तनाचे प्रत्येक कोपरे सजवता येतात त्यांना अंधाराच्या पटलावर पसरलेल्या चांदण्यांच्या चमकण्याचे एकेक अर्थ अवगत असतात.

तसेही माणसांत राहून विकारांपासून विलग होता येत नसेल, तर आपण अलग होऊन आपल्या वर्तुळात विहार करणे अधिक श्रेयस्कर असते. गर्दीत हरवलेला चेहरा शोधण्यापेक्षा, आहे तो चेहरा आणखी देखणा करणे अधिक चांगले नसते का? आपलीच आपण आरास मांडून मखरात मंडित होण्यापेक्षा आस्थेच्या मुक्त रंगात माखणे अधिक मोहात पाडणारे असते. स्वार्थपुरीत विचारांना सामाजिकतेच्या धाग्यांनी विणलेल्या रंगीबेरंगी झुलींखाली झाकून मिरवत राहण्यापेक्षा, आहे ते आणि आहे तसे असणे अधिक देखणे असते नाही?

तुम्ही कोण? हा प्रश्न महत्त्वाचा नाही. तुम्ही कसे? ते अधिक मोलाचे असते. एखाद्याची किंमत कुणी कशी करावी, याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. असतात ते स्वनिर्मित निष्कर्ष. निष्कर्ष काही माणूस आंतर्बाह्य समजण्याचे प्रमाण नसते. असतं ते केवळ अमूर्त एकक, ज्याला जर-तरचा अध्याहृत अर्थ तेवढा असतो. तसेही सजीवांच्या वर्तनव्यवहारांचे कोणतेच निष्कर्ष अंतिम नसतात. ते परिवर्तनीय असतात. निर्णयाप्रत पोहचण्यासाठी प्रयोग करावे लागतात. काही अनुमान अधोरेखित करावे लागतात. प्रत्येकवेळी ते वेगळे असू शकतात. मग माणूस तरी यास अपवाद कसा? अपवाद आले की, प्रवाद पसरतात. प्रवाद संवादाचे सेतू बनले की, अनुमानांना अर्थ गवसतो. संवादाचे किनारे सुटले की, वितंडवाद उभे राहतात अन् वादाचे प्रवाह दुथडी भरून वाहतात. परिवर्तनप्रिय विचार सौहार्दाच्या गगनात आपलं सदन उभं करतो, हे खरं असलं, तरी परिवर्तनाचा प्रवास म्हणजे काही प्राक्तन नसतं, परिस्थितीने पेरलेला प्रयत्नांचा परिपाक असतो तो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

नाही शोधता येत सगळीच उत्तरे

By // No comments:
तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत वाहतात. झऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळतात. पाखरांसोबत उडतात. फुलपाखरांच्या पंखात रंग भरतात. कोमल किरणांच्या वर्षावात नाहतात. चांदण्यांसोबत बोलत बसतात. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचित, स्वप्नांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर झोके घेत राहतात. त्यांचा उगवणारा दिवस आनंदाची पखरण करतो. काळोखाची चादर देहावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करतात. अंतरी दाटून आलेल्या अनामिक काळजीने कधी कातरवेळा काळीज कोरत राहतात. साद देत राहतात प्रत्येक पळ. असं काही घडण्यासाठी एक वेडेपण जगण्यात विसावलेलं असायला लागतं.

हो, खरंय! हे सगळं वेडं असल्याशिवाय कळत नाही अन् घडतही नाही. असं वेडं सगळ्यांना होता येतंच असं नसतं अन् वेडेपणातलं शहाणपण अवघ्याना आकळतं असंही नाही. या विश्वात विहार करणाऱ्यांची जातकुळीच वेगळी असते. ना तेथे मर्यादांचे बांध बांधता येतात, ना विस्ताराला सीमांकित करणारी कुंपणे घालता येतात. ना वेग अवरुद्ध करणारे गतिरोधक टाकता येतात. म्हणून ते वेडेच...! तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी आणि दोघे एकमेकांसाठी. जगाच्या गणितात कुठलीही उत्तरे नसणारे, पण अंतरी आपलं ओंजळभर देखणं जग उभं करू पाहणारे.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने अंतरी उतरवत मनाच्या गाभाऱ्यात कधी कोंडून ठेवलं... काहीच आठवत नाही... प्रारंभ नेमका कुठून आणि कुणाकडून झाला, हे सांगणही बऱ्याचदा अवघड. असा कोणता क्षण असेल तो, ज्याने ही दोन टोकं सांधली गेली असतील? असं कुठलं बंधन असेल ज्याने हे बांधले गेले असतील? जगात वावरणारे असंख्य चेहरे आसपास असताना हेच नेमके एकमेकांना का दिसावेत? बघून आपण एकमेकांसाठीच आहोत असंच का वाटावं? असा कुठला क्षण होता, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा? अशी कोणती स्पंदने होती, एकच सूर छेडणारी? असे कोणते बोल होते, एकच गीत गाणारे? नाही करता येत काही प्रश्नांसोबत असणाऱ्या किंतुपरंतुंची मीमांसा. नाही शोधता येत त्यांची उत्तरे लाख धांडोळा घेऊनही. नाही सांगता येत सगळ्या गोष्टींमागची कारणे. नाही करता येत विशद सगळ्याच भावनांच्या व्याख्या, हेच खरंय.

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. तसं असतं तर वयाच्या वर्तुळांचा विसर प्रेम परगण्यात विहार करणाऱ्या जिवांना कसा पडला असता? खरं हेच आहे की, प्रेमाला बहुदा बंधने मान्य नसतात कुठलीच. मग ती कशीही असोत. उमलतं वयचं वादळविजांचं. नवथर संवेदनांचे पंख लेऊन आभाळ आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करीत राहायचं. झोपाळ्यावाचून झुलायचं. 

दोघेही स्वप्नांच्या झोक्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहतात. आभाळ त्यांना खुणावतं. वारा धीर देत राहतो. आयुष्याचे कंगोरे समजून घेता घेता मनं कधी बांधली जातात, कळतच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं. वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना संथ वाहणे कसे रुचेल? मनात विसावलेल्या वाटेची वळणं निवडून धावतात तिकडे. रमतात जगाच्या गतिप्रगतीच्या परिभाषांपासून कोसो दूर. भावनांच्या रिमझिम वर्षावात चिंब भिजत राहतात. किनाऱ्याच्या वाळूवर कोरलेल्या आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचा कोलाज शोधत राहतात.

तो आणि ती... एक पूर्ण वर्तुळ. की फक्त एक मात्रा आणि एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित करता येणारी वर्णमालेतील अक्षरे. काहीही म्हणा, त्याने असा कोणता फरक पडणार आहे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विरलेले अध्याय नव्याने वाचले जातात आणि आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. जगण्याच्या वाटेवर आतापर्यंत अशा किती कहाण्या हरवल्या असतील आणि गवसल्याही असतील, माहीत नाही. 

जगण्यात गोमटेपण कोरणारा हा खेळ किती काळापासून काळ खेळतो आहे, ते त्यालाही अवगत नसेल कदाचित. इतिहासाच्या कुशीत विसावलेल्या त्याच्या तुकड्यांनाच ते विचारता येईल. पण त्याला तरी ते सांगता येईल का? माहीत नाही. वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, जिंकलेले आणि हरलेले... असे कितीतरी तो आणि ती काळाच्या अफाट विवरात सामावले. काही कायमचे हरवले. काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण वास्तव हेही आहे की, सगळ्यांच्या ललाटी पुन्हा प्रकाशण्याचे प्राक्तन नियतीने पेरलेलं नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

पापण्याआडचं पाणी

By // No comments:
पापण्याआडचं पाणी टाळता न येणारं वास्तव, बाकी बऱ्याच गोष्टी आयुष्याचे किनारे धरून येतात अन् जातात. त्या प्रासंगिक असू शकतात अथवा आगंतुक बनून आलेल्या. त्यांचं सार्वकालिक असणंही नाकारता येत नसतं. काही बाबतीत कदाचित तात्कालिक घटितांचा तो परिपाक असू शकतो. त्याचं येणं-जाणं हा काही कोणाच्या निवडीचा भाग नसतो. की कोणी आवतन देऊन आणलेला आनंद. परिस्थितीला आहे तसं स्वीकारता आलं अन् पदरी पडलं ते पवित्र करता आलं की, आयुष्याचे एकेक कंगोरे कळू लागतात. आयुष्य कळण्याआधी जगणं समजून घ्यावं लागतं. जगण्याचे संदर्भ सापडतात, त्यांना आयुष्याचे अर्थ आकळतात. ते काही अपोआप नाही गवसत. आयुष्याला असणारी लांबी फार महत्त्वाची नाही. त्याला खोली किती आहे, हे महत्त्वाचं. जगण्याला दिशा असली की, आयुष्याला आशयघन अर्थ लाभतात. अर्थासहित असलेलं आयुष्य एक आनंदयात्रा असतं. 

अर्थात, सगळ्यांना सगळंच कळतं असं नाही. कळतं त्यांना कोणत्या वाटेने वळतं व्हावं, हे सांगावं नाही लागत. वळणांचे हात धरून सोबत करणाऱ्या वाटांचे मनोगते नाही कळत त्यांना वळणांसोबत चालत येणारे विकल्पही समजून नाही घेता येत. नाही पाहता येत अशा प्रवासाचे संदर्भ पडताळून. सगळ्याच गोष्टींना काही प्रासंगिकतेची परिमाणे वापरून मोजता येत नाही. त्याला आणखीही काही मिती असतात. 

सुख, दुःख, हर्ष, वेदनांचा प्रवाह जीवनातून अनवरत वाहत असतो. पापण्यांनी पेलून धरलेलं भावनांचं आभाळ मात्र समजून घ्यायला लागतं. पापण्यांच्या परिघात सामावलेलं ओथंबलेपण डोळ्यातून उतरून मनात वसतीला आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. हे उलगडणं कळीचं फूल व्हावं इतकं सहज अन् उगवतीची वाट धरून सूर्याने चालत येण्याइतकं स्वाभाविक असलं की, आसपासच्या आसमंतात एक गंधाळलेपण भरून राहतं. पण खरं हेही आहे की, स्वाभाविक होणंच अधिक अवघड असतं.

आपलेपण समजून घेता आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. समजून घेताना कळत असतील अथवा नकळत काही प्रमाद घडतात म्हणून अपलेपणाची प्रयोजने नाही बदलत. आयुष्याचे किनारे धरून पुढे सरकणाऱ्या काही वाटा घडलेल्या प्रमादांमुळे कदाचित धूसर दिसतील म्हणून प्रवासाला पूर्णविराम द्यायचा असं नसतं. काही वाटा अवगुंठीत होतील, काही अवघड होतीलही. म्हणून काही चालणं नाही थांबत. 

ज्ञात-अज्ञात चाकोऱ्या समजून घेता आल्या अन् त्यांच्याशी संवाद करता आला की, परिसराशी सख्य साधणे सुगम होते. अंतरी आस्थेचा ओलावा असला की, आसपासचा आसमंत चैतन्य घेऊन उमलत राहतो. उमलण्याची पुढची स्वाभाविक पायरी बहरणे असली, तरी बहरलेले परगणे सांभाळून समृद्ध करायला लागतात. पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला परिपूर्णतेचा परिसस्पर्श घडणे कितीही देखणे वगैरे वाटत असले, तरी ते काही सहजसाध्य नसतं. त्या करिता मोठं होणं म्हणजे काय असतं, हे समजून घ्यायला लागतं. मोठेपणाच्या व्याख्या काही कोणाच्या संमतीचा परिपाक नसतो. तो असण्याचा अन् अनुभवण्याचा प्रवास असतो. 

माहात्म्याची महती सांगून काही कोणाला मोठं होता येत नसतं किंवा एखाद्यावर महात्म्याच्या गोण्या लादून मार्गस्थ केलं म्हणून कोणी मोठं झाल्याचं उदाहरण नाही. मोठेपणाच्या परिभाषा प्रत्येकवेळी वेगळ्या असतात आणि प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. माणसे त्या ठरवतात. त्यांच्या मर्यादाही तेच आखून घेतात आणि निकषांच्या पट्ट्या हाती घेऊन मोजतातही तेच. त्यांचे आयते साचे तयार असतात. तुम्हाला तुमचा आकार त्या साच्यात सामावण्याएवढा करता आला की, तुमच्या प्रवासाला महानतेची लेबले चिटकवताना सोपं होतं. 

आयुष्याच्या वाटेवर चालताना सोबत करणाऱ्या सगळ्याच आकृत्यांना अर्थ असतात असं नाही. कुठलीतरी व्याख्या बनून त्या समोर ठाकतात, पण प्रत्येकवेळी वेगळे आकार धारण करून. त्या आकारांचे अर्थ सम्यकपणे लावता यायला हवे. सगळ्याच आकारांची रेखीव शिल्पे होत नसतात. कधी मनाजोगत्या आकृत्या साकारतात, तर कधी त्यांचे कोपरे दुभंगतात. दुभंग अन् अभंग असण्यातला प्रवास समजून घेता यायला हवा. ज्यांना या सगळ्या प्रवासात अभंग राहता येतं, त्यांचा संग सगळ्यांनाच निःसंग वृत्तीने घडतो का? 

अवघड असतो असा प्रवास. आसपास कायमच धग असते. त्याची दाहकता अनुभवायला लागते सतत. वैशाखाचे अर्थ वाचनातून नाही कळत. वणवा होऊन वाहताना कळतात. मोठेपण मागून नाही मिळत. मिरवून घेण्याची मनीषा असणाऱ्यांना तर नाहीच मोठं होता येत. आयुष्याच्या वाटेवरुन पुढे पळताना आपणास काय करायचं आहे, एवढं कळलं तरी मोठेपणाच्या पाऊलखुणांचा माग काढत वणवण करायची आवश्यकता नाही उरत. मोठेपणाचा परीघ अशी माणसे स्वतः आखतात आणि आवश्यकतेनुरूप विस्तारत नेतात आणि तो कुठे थांबतो हेही जाणतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

ओंजळभर उजेडाच्या संगतीने

By // No comments:
शेकडो वर्षे झाली. माणूस काहीना काही तरी शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण कधी थांबली नाही आणि पुढे कधी थांबणारही नाही. फक्त त्या भटकंतीसोबत असणारे अर्थ तेवढे बदलतील. भटकणं जिवांचं प्राक्तनच आहे. त्याच्या वणवणला अनेक संदर्भ असतात. प्रसंगपरत्वे कारणे बदलली म्हणून पुढे पडत्या पावलांच्या प्रवासाचे अर्थ नाही बदलत. प्रवासामागे उभ्या असणाऱ्या संदर्भांची प्रयोजने बदलली तरी हेतू आबाधित असू शकतात. भटकंती केवळ भाकरीच्या कोरभर तुकड्यासाठीच असते असं नाही. या व्यतिरिक्त अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे असतात त्याच्या ललाटी गोंद्लेल्या प्रवासाला. प्रगतीच्या परिभाषा प्रवासात सामावलेल्या असतात, हे नाकारण्याचे कारण नाही. 

प्रस्थान वाटांवरील प्रवासाला प्रयोजने असतात, पण पुढे पडत्या पावलांना स्वप्ने. स्वप्ने पाहता यायला हवीत अन् पूर्ण करताही यावीत. स्वप्ने करंट्यांनी कमावलेली संपत्ती नसते, तर उदारमनस्क वृत्तीने अनेकांच्या भल्यासाठी उधळून देणाऱ्या वीरांची दौलत असते. चालत्या वाटांशी सख्य साधता आलं अन् पावलांवर विश्वास असला की, लागतं काही मनात असलेलं हाती. सापडतं काही थोडं आपलं असं. खरंतर सापडण्यापेक्षा निसटतंही बरंच काही. म्हणून जगण्यातून प्रयासांनी पूर्णविराम घेतला आहे असा अर्थ होत नाही. प्रयासांच्या परिभाषा बदलल्या म्हणून प्रवासाचे पर्याय संपतात असं नाही. 

प्रत्येकाचा प्रवास वेगळा असला. प्रवासाच्या दिशा निराळ्या असल्या अन् मुक्कामाची ठिकाणे वेगवेगळी असली म्हणून प्रयोजने पालटत नसतात. कुणी शोधतो नव्या वाटा. कुणी मळलेल्या वाटांना प्राक्तन मानतो. कुणी प्रशस्त पथांची प्रतीक्षा करतो. कोणी पावलापुरती वाट शोधत चालत राहतो. कोणी काय काय करावं हा वैयक्तिक विकल्प असला, तरी विस्ताराच्या व्याख्या समजून घेण्यासाठी तेवढा पैस असायला लागतो. पावलापुरती वाट असण्याचे अन् पावलांसाठी वाट निर्माण करण्याचे अर्थ वेगळे आहेत. लाभलेल्या एवढ्याशा आयुष्यात माणूस एवढी सगळी सव्यापसव्य का करत आला आहे? कारण या प्रश्नाचं उत्तर त्याच्या जगणं या संकल्पनेभोवती एकवटलं आहे. जगण्याशी सुख सांधलं गेलं आहे अन् मनाशी समाधान बांधलं गेलंय.

कोणाला समाधान कोठून गवसेल याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. तशी सुनिश्चित परिमाणेही नसतात. सगळ्यांना सगळी कौशल्ये अवगत नसतात. प्रत्येकजण आपल्यापरीने आपला धांडोळा घेत असतो. अभिव्यक्तीची माध्यमे बदलतात फक्त, अर्थ नाही. कोणी शब्दांची अस्त्रे-शस्त्रे करतो, कोणी शास्त्राला प्रमाण मानून निरीक्षणे नोंदवतो. कोणी लेखणीला खड्ग करू पाहतो. कोणी वेदनांच्या कातळावर शिल्पे कोरु पाहतो. कुणी काळाच्या पटलावर चित्रे रेखाटतो. कोणी काही, कोणी आणखी काही करतायेत. 

कितीतरी लोक लिहतायेत, बरेच जण बोलतायत. कुणी करपलेलं जगणं देखणं करू पाहतायेत. कुणी काळाच्या कुशीतून आस्थेचे कवडसे शोधू पाहतायेत. कुणी कुरूपपणाला रूप देऊ पाहतायेत. कुणी आसपास सुंदर करू पाहतायेत. कुणी ज्ञानाच्या पणत्या हाती घेऊन अंधारे कोपरे उजळायला निघालेयेत. कुणी व्यवस्थेला अधिक व्यवस्थित करू पाहतायेत. जगाचा चेहरा देखणा करण्यासाठी आसपासचा अंधार कोरून कोरभर कवडसे शोधतायेत.

माणसे काहीना काही तरी करतायेत, म्हणून जग बदललं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं बऱ्यापैकी अवघड आहे. बदललं असतं तर एवढी वैगुण्ये आसपास नांदती दिसली असती का? तसंही जग कधी सुघड असतं? ते सहज, सुगम असतं तर आयुष्यात एवढे गुंते वाढले असते का? आयुष्यात अनेक किंतु-परंतु असतात, म्हणून अंतरी अधिवास करणारी आस्थेची पणती टाकून अंधाराच्या कुशीत विरघळून जावं का? तिच्या ओंजळभर उजेडाला निरोप द्यायचा का? नाही. असं अधांतरी नाही सोडून देता येत आयुष्याला. भलेही तिला जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांच्या कपाळी कोरलेल्या अभावाच्या रेषा नाही मिटवून टाकता येत; पण पावलापुरता प्रकाश पेरता येतोच ना! 

खरंतर जग बदलावं म्हणून कोणी लिहू, बोलू नये आणि ते बदलतं, या विचारधारेला प्रमाण मानण्याचा प्रमादही करू नये. जगाच्या जगण्याची आपली अंगभूत रीत असते. रीतिरिवाज नंतर केलेली सोय असते. सोयीचा सोयीस्कर अर्थ शोधता येतो. एकाच्या सोयीचं जग दुसऱ्याच्या जगण्याला गैरसोयीचं असणारच नाही असं नाही. जेवढी डोकी तेवढे विचार इहतली नांदते असतात. विश्वाच्या विचारांना विचक्षण विषयांकडे वळते करण्याचा कोणी प्रयास करीत असेल, तर तो त्यांच्या निवडीचा भाग. सगळ्यांना सगळ्या गोष्टी अवगत असतील असे नाही. आपल्याला काय सयुक्तिक वाटतंय, हे महत्त्वाचं. आपल्या मनी असलेल्या ओंजळभर प्रकाशाच्या सोबतीने मांगल्याच्या शोधात चालत राहणे म्हणूनच अधिक श्रेयस्कर असतं, कारण परिस्थिती परिवर्तनाच्या पावलांनी प्रवास करत असते, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

आनंदाची नक्षत्रे

By // No comments:
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२१ अंक बदलून त्याजागी २०२२ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक छोटासा तुकडा, जो मोजण्याच्या सोयीसाठी केला आहे, तो संपेल. क्षणाला लागून आलेल्या पुढच्या क्षणाच्या कुशीतून नव्या क्षणांचे आगमन होईल. तोही पुढच्या क्षणाला जुना होईल. काळ आपल्याच नादात आणखी काही पावले पुढे निघून गेलेला असेल. वर्तमानात त्याला आठवताना फक्त स्मृतिशेष संदर्भ समोर येत राहतील.

भविष्याच्या पटलाआड दडलेल्या आनंदाची नक्षत्रे वेचून आणण्याच्या कांक्षेतून काहींनी संकल्पित सुखाचें साचेही तयार करून घेतलेले असतील. ते हाती लागावेत म्हणून काही आराखडे आखून घेतले असतील. त्यांच्या पूर्तीसाठी शोधली जातील काही आवश्यक कारणे. काही अनावश्यक संदर्भ. घेतला जाईल धांडोळा निमित्तांचा.

माणूस उत्सवप्रिय प्राणी असल्याने सणवार साजरे करण्यासाठी कोणतीतरी निमित्ते शोधतच असतो. तेवढेच आनंदाचे चार कवडसे आयुष्याच्या ‘सेव्हिंग अकाऊंटमध्ये’ असण्याचे समाधान. खरंतर समाधान शब्दही तसा परिपूर्ण नाही. कधीही समाधान न देणारी आयुष्यातील गोष्ट म्हणजे, समाधान. हे माहीत असूनही समाधान नावाचं मृगजळ माणूस शोधतोच आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या समाधानाच्या क्षणांची परिभाषा प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात बदलत राहिली आहे. ते मिळवण्याच्या तऱ्हा आणि साजरे करण्याच्या पद्धतीही पालटत राहिल्या आहेत.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना सांधणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांना माणसाने उत्सवाचे निमित्त दिले. अर्थात, हेही काही नवं राहिलं आहे असं नाही. नव्यावर्षाच्या स्वागताला समोर जावं कसं, याची काहींची नियोजने झाली असतील. प्रत्येकजण आपापल्यापरीने ओंजळभर आनंद शोधत राहील. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंद फेसाळ रात्रीला काहींची बेधुंद पाऊले थिरकतील. कुठे मध्यरात्री बाराच्या ठोक्याला कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंदीतून काही शोधतील नव्या वर्षाचे अर्थ. अर्थात, सगळेच त्याचं असं स्वागत करत असतील, असं नाही. नसतंही तसं. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची लहानशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता मार्गस्थ झालेले असतील.

निमित्ताचे धागे धरून चालत येणारा आनंद साजरा करण्याचं भाग्य साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेलं नसतं. नववर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा कितीतरी माणसं अर्धपोटी- उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी हव्या असणाऱ्या भाकरीचं स्वप्न सोबत घेऊन झोपले असतील. आयुष्यातील सरलेलं वर्ष भाकरीच्या शोधात संपलं. येणारं वर्ष भाकरीच्या विवंचना सोबत घेऊन अंगणात उभे राहू नये याची कामना करत असतील. शेकडो माणसे कुठेतरी डोंगरदऱ्यात, रानावनात जगणं आशयघन करणाऱ्या वाटांचा शोध घेत भटकत असतील. भटके आयुष्य सोबतीला घेऊन कितीतरी जीव व्यवस्थेच्या चौकटीत पोटापुरती भाकर आणि निवाऱ्यापुरतं आखर शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात सुखांच्या सूत्रांचा धांडोळा घेत असतील. शाळेत शिकून जगण्याच्या वाटा हाती देणारी उत्तरे पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून कचऱ्याच्या कुंडीत अनेक लहान लहान हात आयुष्याचे अर्थ शोधत असतील. कळशा, घागरी डोईवर घेऊन ओंजळभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या वाडीवस्तीवरील बायाबापड्या पाण्याचे पाझर शोधत असतील. शिक्षण नावाच्या व्यवस्थेत पास झालेला आणि पदवी हाती घेऊन भटकणारा सुशिक्षित बेरोजगार जगण्याच्या परीक्षेत खरंच आपण नापास आहोत का? या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल.

कालचक्राच्या गतीत अशी कितीतरी आयुष्ये गरागरा फिरत असतील. काळाचे किनारे धरून प्रगतीचे पर्याय पहात पुढे सरकत असतील. परिस्थितीचा पायबंद पडून काही अभाग्यांच्या विस्ताराचे अर्थ हरवले असतील. कितीतरी जीव शक्यतांचा परिघात स्वतःला शोधत असतील. आयुष्याला अर्थ देणाऱ्या संदर्भांचा धांडोळा घेऊनही फारसं काही हाती लागत नसल्याने हताशेच्या प्रतलावरून प्रवास करताना कवडशांची कामना करत असतील.

जाणारं आणि येणारं वर्ष वार, महिन्यांच्या हिशोबाने सारखंच असलं, तरी काहींच्या वाट्याला त्याच्या गणिताचे हिशोबच जुळत नाहीत. काहींसाठी सुखाच्या पायघड्या घालत येतं ते अन् काहींच्या वाट्याला दुःखाच्या ओंजळी घेऊन. असं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं अशक्य नसलं तरी अवघड आहे. कदाचित काही म्हणतील, शेवटी ज्याचं त्याचं प्राक्तन. मग हेच दैव असेल, तर त्यानं माणसा-माणसांमध्ये असा भेद का करावा?

जाणाऱ्या वर्षाला विसंगतीची सगळी वर्तुळे नसतील मिटवता आली कदाचित, निदान येणाऱ्या वर्षात तरी संगतीची सूत्रे सापडावीत. ओंजळभर प्रकाश घेऊन त्याने दारी दस्तक द्यावी. वंचितांच्या, उपेक्षितांच्या, अपेक्षितांच्या अंगणी विसावा घ्यावा. त्यांच्या उसवलेल्या आयुष्यात पसाभर प्रकाश पेरून अंधारलेलं जगणं उजळून टाकावं. अशी कामना करायला काय हरकत असावी? नाहीतरी माणूस प्राणी आशावादी आहेच ना!
- चंद्रकांत चव्हाण
••

काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे

By // No comments:
माणूस नावाचा प्रकार समजून घेणं जरा अवघडच. तो कळतो त्यापेक्षा अधिक कळत नाही हेच खरं. अर्थात यात नवीन ते काहीच नाही. कितीतरी काळापासून तो हेच किनारे धरून वाहतो आहे. ना त्याच्या वाहण्याला प्रतिबंध करणारे बांध बांधता आले, ना प्रवाहाला अडवता आलं, ना अपेक्षित मार्गाने वळवता आलं.

नितळपण अंतरी नांदते राहणे माणसांची सार्वकालिक आवश्यकता आहे, याबाबत कुणाच्या मनात कोणताही किंतु असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. नितळपण जगण्यात विसावलं की, निखळ असण्याचे एकेक पैलू कळत जातात. विश्वात वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात, धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी गुणी माणसे विश्वाची दौलत असतात. हे किंवा असं काहीसं म्हणणं कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं हेही खरंय.

माणूस शक्यतांच्या चौकटीत कोंडता नाही येत. त्याच्या असण्या-नसण्याचे संदर्भ समजून घ्यायला कोणती एकच एक परिमाणे अपुरी असतात. कोण कोणत्या प्रसंगी कसा वागेल हे सांगणं अवघड. कोणी तसा दावा करत वगैरे असेल तर ते केवळ अनुमानाने त्याला शोधण्याचा प्रकार आहे. 

अंतरी आस्थेचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते आयुष्याची. काहींना जाणीवपूर्वक जपता येतं आपलं माणूसपण. माणूसपणाच्या व्याख्या अवगत असतात काहींना. काहींच्या कपाळी नियतीनेच करंटेपण कोरलेलं असेल, तर त्यांना कुठून अवगत व्हावेत आस्थेने ओथंबलेल्या ओंजळभर ओलाव्याचे अर्थ.

स्वार्थाला सर्वस्व समजणाऱ्यांनी केलेली सगळीच कामे काही त्यागासाठी नसतात. भिजलेल्या भावना अंतरी घेऊन आसपास सुंदर करू पाहणारी अन् अभावग्रस्तांचं जगणं देखणं करू पाहणारी माणसे संचित असतं संस्कारांनी निर्मिलेलं. निर्व्याज मनांनी अन् उमद्या हातांनी समाजाचा चेहरा सुंदर करू पाहतात ती. त्यांच्या सौंदर्याच्या व्याख्या कोशातल्या शब्दांत नाही सापडत. त्याचं कामच नव्या व्याख्या परिभाषित करत असतं.

नियतीने घडवलेली अशी माणसे काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे असतात. ती इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर विचक्षण विचारांनी केलेला नांदत्या वाटांवरचा प्रवास असतो. प्रज्ञा अवगुंठित करणारा चमत्कार नसतो तो अथवा पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसादही नसतो. प्रामाणिक प्रयासांची परिभाषा असते ती. प्रत्येक गोष्टीला परीघ असतो, त्याच्या विस्ताराच्या मर्यादा असतात. पण आस्थेभोवती एकवटलेल्या आकांक्षांना अन् त्यांच्या पूर्तीसाठी करायला लागणाऱ्या प्रामाणिक सायासांना सीमा नसते, हेही खरंच.

सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे संस्कारांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते, व्यवस्थेचे किनारे धरून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात अशी नितळ, निर्मळपणाची गुढी उभी करून सद्विचारांचं निशाण फडकवत ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी पर्याप्त समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही. त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.

चांगलीवाईट, भलीबुरी माणसे सर्वकाळी अन् सर्वस्थळी असतात, नाही असे नाही. हा काळा अन् हा पांढरा अशी सरळ सरळ विभागणी नाही करता येत जगाची. या दोहोंच्या संक्रमण बिंदूवर एक ग्रे रंगही असतो त्याकडे आस्थेने पाहता यावं. माणूस चांगला की, वाईट वगैरे गोष्टी परिस्थितीचा परिपाक असेल, तर उत्तरे परिस्थितीच्या परगण्यात शोधावी. माणसांच्या मनात सापडतीलच याची शाश्वती देणं कठीण असतं. मनातच नसतील तर वर्तनात दिसतील तरी कशी. म्हणून आधी परिस्थिती बदलाचे संदर्भ शोधून मन अन् मत परिवर्तनाचे प्रयोग करायला लागतात.

डोळ्यांना वैगुण्येच अधिक का दिसतात. खरंतर चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात. वाईटाकडे लक्ष सहज वळतं. हे कळणं आणि वळणं यातलं योग्य ‘वळण’ म्हणजे माणूस.

वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्याच्या गर्भातून काही रोपटी उगवून आली तर... पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील, तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? आसपासच्या आसमंतात रखरख दाटली असतांना आकंठ भिजवणाऱ्या धारांचा शोध घ्यावा तरी कुठून? कोरडेपण वाढत असतांना राहिलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••