अंतर

By // No comments:
व्यक्त आणि अव्यक्त यात केवळ एका अक्षराच्या अधिक्याचे अंतर आहे. तसं पाहता अंतरे असतात. काळाच्या कोणत्याही तुकड्यात शोधून पाहिली तरी ती अधिवास करून असतात. कदाचित त्यांचे प्रासंगिक अर्थ वेगळे असू शकतात इतकंच. ती नसली म्हणून खूप काही वेगळं घडतं असं नाही आणि असली म्हणून काही वेगळं प्रत्ययास येतं असंसुद्धा नाही. अंतरे असतातच. ती पार करता येतात त्यांना स्पष्टीकरणे द्यायची आवश्यकता नसते. संदर्भ समजले की, स्पष्टीकरणाचे अर्थ उलगडत जातात. फक्त त्यांची उकल करण्याचं कौशल्य अवगत करण्याइतकं शहाणपण विचारांत वसती करून अन् व्यापकपण अंतरी अधिवास करून नांदते असायला लागते. कधी कधी भूमिका उत्तम असते, हेतू उदात्त असतो, विचार खूप चांगला असतो; पण विस्तारला सीमांकित करणारी एक चौकट आसपास अनवरत नांदती असते. ती परिस्थितीने आखून दिलेली असेल अथवा आपण भोवती कोरून घेतलेली, एवढाच काय तो फरक. परिस्थितीने घातलेले बांध ओलांडता आले अन् भोवती कोरून घेतलेल्या मर्यादा पार करता आल्या की, कृतीचे एकेक अर्थ अवगत होतात. 

विचारांचं सख्य काळाशी असावं, पण सोयरिक भविष्याशी हवी. विचारांना प्रगतीचे प्रवाह धरून पुढे सरकता आलं की, बदलांचे संदर्भ आकळत राहतात. वाहते राहण्यासाठी पुढच्या वळणाकडे सरकत राहावे लागते. विचलित होऊन विकल्प हाती नाही लागत. कार्याप्रती समर्पण सात्विकतेच्या परिभाषा लेखांकित करते. समस्येचे सम्यक आकलन नसेल घडत, तर प्रश्नांकडे पाहण्याचे ठिकाण बदलून पाहावे लागते. बदललेले ठिकाण कोन बदलते अन् बदललेला कोन दृष्टिकोनही बदलवतो. फक्त त्याकडे पाहताना डोळ्यात नितळपण नांदते असावे. विचारांत निर्व्याजपण वसती करून राहावे आणि आचरणात निखळपण असावं. अंतर्यामी आस्थेचा ओलावा असला की, उगवून येण्याचे अर्थ आकळतात अन् बहराच्या व्याख्या उलगडत जातात. एकेक पाकळ्या विलग होऊन कळीचं फुलात रुपांतर व्हावं अन् त्याचा परिमल परिसराच्या प्रांगणाला प्रमुदित करीत राहावा तसं.

समस्यांपासून सुटका करण्यासाठी अंतरावर उभं राहून नाही चालत; त्यांच्या अंतरंगात पोहचावं लागतं. नदीच्या पात्राची खोली अनुभवल्याशिवाय कशी आकळेल? पाण्याचा अंदाज येण्यासाठी पात्रात उडी घ्यावी लागते. नसेल तरंगता येत, तर पेलून धरणारी साधने घेऊन त्याचा अदमास घ्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहून प्रवाहाचे गोडवे गायलेत, म्हणून काही पाणी मधुर होत नसते. त्यात तो गुण अंगभूत असतो. का, किती, केव्हा, कसे? हे प्रश्नही असेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या अथांग पात्रात उडी घ्यावीच लागते. माणसाचं आयुष्यही एक प्रश्नचिन्हच आहे. त्याची उत्तरे मार्गदर्शकाच्या पानात नाही सापडत. परिभाषा करून पुस्तकात नाही सजवून ठेवता येत त्यांना. ती शोधण्यासाठी आयती सूत्रे नसतात आणि खरं हे आहे की, ते काही खूप सरळ नसतात. अनेक वाटा असतात, वळणे असतात त्यांना. त्या अडनिड वाटांशी सख्य साधता आलं अन् वळणांशी संवाद करता आला की, विस्ताराचे अर्थ उलगडत जातात. विस्ताराच्या व्याख्या कळल्या की, चिन्हांची परिभाषा बदलत जाते.
    
कालावधी नावाचं परिमाण परिस्थितीवर परिमाण करणारं असतं का? माहीत नाही, पण असावं कदाचित. ते पराक्रमाच्या परिभाषा करायला पर्याप्त असतं की नाही, हेही खात्रीदायक सांगता नाही येत. त्याचं कमी अधिक असणं प्राप्त परिस्थितीचा परिपाक असतो एवढं मात्र नक्की. अंगीकृत कार्ये समर्पणशील विचारांनी हातावेगळी करता येतात, त्यांना काळाच्या लांबीरुंदीची परिभाषा नाही करायला लागत. त्याच्या चौकटी मापायची परिमाणे नाही शोधायला लागत. 

अंतर्यामी वसतीला असलेलं काही जसं पाहिलं तसं आणि तेव्हढंच हाती लागेलच, असंही नसतं. ते हाती लागण्याची फारशी शक्यता समोर नसतांना शक्यतांवर टिकून राहणं अन् साध्यप्राप्तीच्या प्रवासात अनंत अडचणी असूनही कार्यरत असणं हेच अवघड. पण अशा अवघड वाटांची वळणे ओलांडता येतात, त्यांना आपल्या माणूस असण्याचे अर्थ अधिक चांगल्याप्रकारे अवगत असतात. माणसांनी मानपानाच्या शिड्या आधीच उभ्या करून ठेवलेल्या असतात अन् सन्मानाचे इमले सजवून देखणे करून घेतले असतात, अशा परगण्यात पोहचणाऱ्या वाटा संदेहाच्या परिघाभोवती सतत परिभ्रमण करीत असतात. त्या टाळून पुढच्या वळणाकडे वळता येतं, त्यांना प्रवासाच्या परिभाषा पाठ करायला नाही लागत. तो त्यांच्या परिपाठाचा भाग असतो. प्रयास शब्दाचा अर्थ कोशात शोधण्यापेक्षा पावलांच्या प्रवासात ते शोधत असतात. 

मुक्कामाची ठिकाणे अवगत असली, तरी पर्याप्त ठिकाणी पोहचण्यासाठी वाटा सुयोग्य निवडाव्या लागतात हेही खरेच. त्या प्रत्येकवेळी सुगम असतीलच असंही नाही. त्या सहज असल्या म्हणून यशाची शिखरे लीलया हाती लागतीलच असंसुद्धा नाही. इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवांचा प्रवास निसर्गप्रेरणांचा परिपाक असला, तरी माणूस नावाच्या जिवाच्या प्रवासात याहून अधिक काही असतं. प्रयत्नरत असणाऱ्या पावलांच्या ध्यासप्रेरित प्रवासाची कथा असतो तो. पण याचा अर्थ प्रत्येकवेळी पावले पाकळ्यांची माखलेल्या वाटेने पडतीलच असं नाही. 

परिस्थितीने पदरी पेरलेल्या प्राक्तनाचे एक टोक पकडावे, तर दुसऱ्याचे पीळ सुटतात. उसवलेले धागे सांधावे, तर दुसरे सैल होतात. एक गाठ मोकळी करावी, तर दुसऱ्या निरगाठी गुंफल्या जातात. खरंतर हे आणि असं काहीसं असणं स्वाभाविकच. कारण माणूस शेवटी माणूस या संज्ञेपर्यंतच येऊन थांबतो. यापलीकडे पोहचणे सामान्यांना अवघड असतं. ज्यांना असं काही जमलं ते असामान्य म्हणून ओळखले गेले. अर्थात, ही आपल्या माणूस असण्याची मर्यादा. मर्यादांचे बांध फार कमी लोकांना पार करता येतात. ज्यांना हे जमलं ते महात्मे म्हटले गेले. 

साध्य आणि असाध्य या बिंदूना जोडणारी प्रयत्न नावाची एक रेषा असते. तिचे पीळ, तिची वळणे तेवढी आकळायला हवीत. ती ज्याला समजतात त्याला आनंदाची अभिधाने उसनी नाही आणावी लागत. आपण काय करतो आहोत, हे सांगण्यासाठी ढोल बडवायची आवश्यकता नसते, कारण प्रामाणिक प्रयत्नातून उभ्या असलेल्या कामाचे सुरच निराळे असतात. त्यांना सजवून त्यांचं गाणं तेवढं गुंफता यावं. सत्प्रेरीत हेतू समोर ठेवून साध्याच्या दिशेने प्रवास घडावा. प्रसंगी सायास पडले तरी सहन करावेत. ‘स्व’ पासून सुटता आलं की, सर्वस्वाचे अर्थ आकळतात. कारण ‘स्व’ पासून सुटण्याचा प्रवास वेदनादायी असतो. वेदनांचे वेद त्यासाठी वाचता यायला हवे. आसपास असलेल्या वेदनांचं आकलन घडलं की, आपल्या ओंजळभर दुःखाचे अर्थ आकळतात.

पण, नियतीने करंटेपण कपाळी कोरलं असेल अथवा कोणी आपणहून कोरून घेतलं असेल, तर अन्य कोणी काहीच करू शकत नाही. अभावच भागधेय असेल, तर प्रभाव शब्दाला फारसा अर्थ नाही उरत. उजेडाचा कोरभर कवडसाही आश्वस्त करणारा असतो असं म्हणतात, पण प्रकाशाच्या वाटा नाकारून अंधाराची संगत करीत कोणी निघाला असेल, तर दोष उजेडाचा नसतो. कवडशांना बोल लावून अवतीभवती असणाऱ्या चौकटी नाही उजळून येत. अविचारांच्या संगतीने चालणं नियतीने ललाटी गोंदलं असेल किंवा कोणी त्याचा अंगीकार केला असेल, तर काळही आपला ओंजळभर कोपरा धरून अंधाराच्या कुशीत विसावतो. करंट्याना उजेडाची सूत्रे समजून सांगितली, प्रकाशाच्या परिभाषा विशद करून मांडल्या तरी कोरभर कवडसा काही हाती लागत नाही तो नाहीच. अशावेळी वाटतं, काहींना आत्मघात करायची आस असते हेच खरं. तेच त्यांचं अटळ भागधेय असेल, तर संजीवनीसुद्धा केवळ वनस्पतीची एक मुळी ठरते. ती हाती लागूनही जीवनाचे अर्थ कधीच नाही गवसत...

कुठल्याशा कामात त्रुटी असणे काही लाजिरवाणे नसते. पण विचारांतील वैगुण्ये आणि आचरणातील दोष दुर्लक्षित होणे विश्वासाची उंची कमी करणारे असते. हे असो अथवा ते, निवड आपलीच असते. आपण कोणता विकल्प निवडायचा ही आपल्या प्रगल्भतेची परीक्षा असते. आयुष्यात येणाऱ्या सगळ्याच समस्या आपल्याला समूळ संपवणाऱ्या असतात असं नाही. किंवा आपल्याला त्या समूळ संपवता येतात असंही नाही. संकल्पनेतील साम्राज्ये सुंदर असतात. ते परगणे गोमटे वाटतात. त्या प्रदेशात विहार करावासा वाटतो, पण... हा पणच महत्त्वाचा असतो हे विसरून नाही चालत. कल्पनेने सजवलेल्या साम्राज्याला स्वप्नात संचार करता येईल, पण वास्तवात आकार देता येईलच असं नाही. अर्थात, ज्यांना हे जमलं त्यांना आपण आणि आपला आसपास आकळला, असं म्हटलं तर अतिशयोक्त नाही होणार. अंतरी अधिवास करून असलेल्या संकल्पनांच्या अमूर्त आकृतीला आकार देण्यासाठी कृतीत प्रयोजने कोरावी लागतात. 

समस्या असतात आणि त्या अनवरत नांदत्या असतात. त्यांना टाळून कुणाला आपलं वेगळंपण अद्याप तरी नाही सिद्ध करता आलं. नकारांचे पाढे पाठ करून स्वीकाराचे संदर्भ बदलत नसतात आणि होकाराची सूत्रे स्मृतिगत करून प्रयत्नांच्या परिभाषा लेखांकित होत नसतात. समीकरणांची आयती उत्तरे मिळवून यातायातचे अर्थ बदलत नसतात. अभाव आणि प्रभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा घडत राहतात. आहे त्यांच्यासह आणि नाही त्याच्याशिवाय अभ्युदयाच्या वाटा आपणच आपल्याला शोधायला लागतात. मदत, सहकार्य, मार्गदर्शन या शब्दांना काही अर्थ असतो, नाही असं नाही. पण खरं हे आहे की, सायासप्रयास ज्याचे त्याला करायला लागतात अन् घडणाऱ्या भल्याबुऱ्या परिणामांना सामोरेही ज्याचं त्यालाच जावं लागतं. खरं हेही आहे की, सगळ्याच समस्यांना हलक्याने घेऊनही चालत नाही. कारण, आयुष्यात काही कारणे कारणासह येतात, काही विनाकारण. त्यांचे निराकरण करणे, हेच विचारांचे प्रयोजन असायला लागते. समजा तरीही काही किंतु, पण, परंतु राहिलेच शेष, तर संवादातून त्यांची उत्तरे गवसतील. चर्चा, मते, विचार यांची बेरीज जगण्यात सकारात्मक विचार अन् आयुष्यात आश्वस्तभाव पेरून जाते. तो एक कवडसा असतो तिमिरातून प्रकाशाकडे नेणारा, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

समस्या

By // No comments:
 समस्या असा एक शब्द, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांला. समस्या लहान असतात, मोठ्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. त्यांना टाळायचे, नसतीलच टाळता येत तर त्यापासून पळायचे विकल्प नसतात. म्हणून की काय त्यांच्याभोवती संदेहाची अनेक वर्तुळे कोरलेली असतात. 

आपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. त्या लहान असतात, मोठया असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच. 

समस्या असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, म्हणून प्रयत्न नको सुटायला. पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. थोडी अनुभूती, थोडी सहानुभूती सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपाटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी, तर कधी सुखांशी. 

संवाद आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. त्यांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेवर असला काय. तो असला की, संदेह नाही राहत. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

अंधार

By // No comments:
आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही वास्तवच. हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. धुक्याची चादर ओढून निवांत पहुडलेल्या क्षितिजावर चमकणाऱ्या आकांक्षांच्या नक्षत्रांकडे पाहत माणूस चालत असतो. ती खुडून आणायची आस अंतरी नांदती असते त्याच्या. तेथे पोहोचणाऱ्या वाटा शोध असतो, आपणच आपला घेतलेला. आपल्याला नव्याने समजून घेण्यासाठी वणवण असते ती. परीक्षा असते संयमाची. लपलेल्या असतात अनेक सुप्त कांक्षा तेथे. त्या वैयक्तिक असतील अथवा मनाच्या मखरात मंडित केलेल्या. कुठला तरी नाद अंतरी नांदत असतो. त्याची स्पंदने साद देत राहतात. तो संमोहित करीत राहतो. 

काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींचा परिशीलनाचा तर काहींचा अभिनिवेशाचा. काहींना अस्मितेचे धागे गवसतात त्याच्या अफाट पसाऱ्यातून. काहींना माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. कोणास आणखी काही. पण त्याची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह. काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. कधीकाळी हे  आपल्याकडे असल्याचे सांगताना अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा. 

प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. सूत्रांचा संदर्भ सम्यक जगण्याच्या समीकरणांशी जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र जिथे होता तिथेच राहतो. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आवळले जाणारे आवाज आतच कुठेतरी अडतात. कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव तेव्हाही होता, आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. पण सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. हाही काळाचाच परिपाक असावा का?

- चंद्रकांत चव्हाण
••

सारे प्रवासी

By // No comments:
“बापू, आपलं ऐहिक जगणं पाहणाऱ्याला दिसणं आणि दिसतं तसं असण्यात एवढी तफावत का असेल हो?” कुणाच्या ध्यानीमनी नसताना तात्याने विचारलेल्या प्रश्नाचा आवाज. 

असं काही वाक्य कानी पडेल, याचा अदमास नसल्याने आम्हां सहकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या संवादाला क्षणभर विराम. बोलणं थांबवून सगळे त्याच्या चेहऱ्याकडे प्रश्नांकित नजरेने पाहू लागले. झालं असं की, ऑफ तासिकेला शिक्षकदालनात आम्ही चारपाच जण इकडचं तिकडचं बोलत बसलेलो. थोड्या अंतरावर तात्याही त्याचं शाळेतलं शिल्लक राहिलेलं काही काम करीत बसलेला. त्याचे हात कागदांवर सफाईदारपणे फिरत असले, तरी कान आमच्या बोलण्याकडे असावा. अर्थात आमच्या बडबडीचा विषय खूप गहन आणि तात्विक वगैरे नव्हता. कोरोनाने माणसांच्या मनावर कोरलेल्या ओरखड्यांना समजून घेणं सुरु होतं.

कोणत्याही शाळेत जा, तेथे रिकाम्या तासिकांना हमखास दिसणारं हे चित्र. चर्चेचे विषय, चर्चा करणाऱ्यांची नावं वेगळी असली, स्थळे निराळी असली तरी सगळीकडे असणाऱ्या तऱ्हा एकजात सारख्याच. आम्ही असलो काय अन् आणखी कोणी काय, या चौकटींना कोणी अपवाद वगैरे असतील, तर ते फक्त अपवादापुरते. पण बहुदा नसावेतच. 

काळाच्या बदलत्या सूत्रांबाबत अन् परिस्थितीच्या आवर्तात सापडलेल्या पात्रांबाबत आमचं आपापसात बोलणं सुरु. परिस्थितीने पुढयात पेरून ठेवलेल्या गोष्टी भविष्यात अभिनिवेशरहित जगणं कसं अवघड करीत जाणार आहेत याचा अदमास बोलण्यातून घेत होतो. काहींनी प्राक्तनाच्या पदरी सारी पापं बांधून नैतिकतेचा वगैरे ऱ्हास कसा होतोय अन् मूल्यांचा प्रवास अवनतीचे किनारे धरून झपाट्याने कसा सुरु आहे, याचा अध्याय वाचायला सुरवात केलेली. तर माणसाच्या नालायक वागण्यामुळे ही सगळी अरिष्टे अंगणी आली असल्याचा निवडा करून काहीजण मोकळे. समर्थनाचे सूर आणि विरोधाचे आवाज बऱ्यापैकी टिपेला लागलेले. तात्याच्या बोलण्याने संवादाचे सूर विखंडीत झाले. शब्दांचे साज सूत्रातून सुटले. समर्थनाचा ठेका चुकला. विरोधाच्या पट्ट्या सुरातून निखळल्या. 

विषयाला अल्पविराम देत बोलण्याचा ओघ त्याच्याकडे वळता करून विचारलं, “तुला नेमकं काय म्हणायचंय रे, तात्या?” खरंतर त्याच्या प्रश्नाचं नीटसं आकलन वगैरे न झाल्याने एकदा विचारून खात्री करून घ्यावी म्हणून तसं म्हणालो.

हातातील फाईल, कागद वगैरे साहित्य शेजारी ठेवत त्याने तोच प्रश्न शांतपणे परत एकदा आमच्या पुढ्यात ठेवला. म्हणाला, “बापू, मला माणसांच्या बेगडी असण्याबाबत बोलायचं होतं. तुम्हां लोकांचा सुरु असलेला संवाद हे खरे आहेच आणि तेपण खोटं नाही, अशा सुरात सुरुये. असं बोलू नये असं काही मला म्हणायचं नाही. पण ते काही पर्याप्त आहे असं मलातरी वाटत नाही. हे फारच एकांगी वगैरे होतंय, नाही का? आपण काय करतो माहितीये? समर्थनाची एक बाजू आवडली तर ती घेऊन उभे ठाकतो किंवा नाहीच पटलं तर विरोधाचे आवाज अधोरेखित करीत राहतो. पण माणसांच्या उक्ती आणि कृतीत अंतर आहे, हे आपण माणूस म्हणून कधी मान्य करणार आहोत? तुम्ही लोक दोन वेगळ्या भूमिका घेऊन दोनही बाजूनी मते मांडतायेत. पण याचं मूळ माणसांच्या आत्मकेंद्रित वृत्तीत आहे, असं नाही का वाटत तुम्हांला?” त्याला अपेक्षित असलेला मथितार्थ समजून घेणं थोडं अधिक सुलभ व्हावं म्हणून काही समांतर विधाने केली. काही उदाहरणे घेऊन माणसांच्या वृत्तीप्रवृत्तींबाबत स्पष्टीकरणात्मक नोंदी अधोरेखित केल्या.

तात्याने केलेल्या प्रश्नाचा रोख समजून घेत कोणी काही बोलण्याआधी आबा त्याला चिडवत म्हणाला, “काय रे भो, सध्या तत्वज्ञानना गह्यरा अभ्यास होयेल दिसंस. सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल का काय म्हनतस, त्या समदा मोठा मोठा मान्से पानी भरी राह्यना व्हतात वाटते तुन्हांकडे. साला, कोरोनानी जबरदस्ती देयेल आम्हन्या सुट्ट्या अशाच उडी ग्यात. आनी तू तं पुस्तकसना पानं वाचीसन चिंध्या चिंध्या करी टाक्यात वाटतं.”

त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षाही न करता अण्णाने आपलं घोडं पुढे दामटलं. म्हणाला, “सुट्ट्या सत्कारनी लागेल दिस्ता भो तुह्या, तात्या! नहींतं आम्ही आपले गैबान्यावानी ते व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतच गरगर फिरी राह्यले होतो. हे व्हाट्सअपमधले मॅसेज म्हणजे एक गंमतच अस्ते नही का. आहेराच्या साड्यावानी असतं यायचं. आहेराच्या साड्या रोज वापरता का कोन्ही. आलेल्या तं गह्यऱ्या राहता, पन नेस्याले कोनी काढतं का त्याह्यले? इकडून आली की, देली ढकलून तिकडे. व्हाट्सअपवर आहेर वाटून झाले आनं तो देयाचा कटाया आला की, आहेच फेसबुक. तठी दिसलं कोन्या देखन्या चेहऱ्याचं चित्र की, कर लाईक. कमेंटमंधी मार लववाला बदाम. तेभी करीसन बोर झालं की, काय ते टीव्हीवर रामायण पाहाय, नही तं महाभारत. तठीभी नवं काहीच नही. त्या सिरीयलायमंधी न्याऱ्या न्याऱ्या वृत्तीची मान्से दाखोले अस्ता ना, आपल्या आसपास नजर टाकली तरी तुम्हाले अशे शेकड्याने सापडतीन. पाहून पाहून किती पाहनार. त्याचाबी कटाया यायचा. नुस्त्या टिवल्याबावल्या करी राह्यले होते.”

“तू तेव्हढं काम गह्यरं मस्त करशीन. कोनालेबी इचारलं हे तं अख्खं गाव सांगीन. वाचलं अस्ते चारदोन पुस्तकं तं तुह्यवालं वजन कमी झालं असतं का रे? पण नही नं. बाकी उचापती कऱ्यांयले कोण राहिलं अस्तं मंग.” तात्या त्याला चिडवत म्हणाला. 

“तू काहीबी म्हण भो तात्या, तसंभी आम्हाले वाच्याचं येड कधी नोव्हतं. आमचं वाचनं आभ्यासाच्या पुस्तकाय पुरतं. हे पुस्तकेच आमच्याकरता धर्मग्रंथांइतके पवित्र. तीच आमच्यासाठी गीता, तेच आमचं बायबल आन कुरान पन. आमची भक्ती एवढीच. झालंच जास्ती तं रोजचा पेपर पाह्या पुरतं. आम्ही पडले सायन्सवाले. आनी आता झालो मास्तर तरी मूळची सवय काही जात नही. तुमच्या त्या साहित्यचं अन् आमचं कधी पटलंच नही. देलं कोनी पुस्तक हातात कोंडून तं नावडत्या बायकोबरोबर जबरदस्ती नांदल्यावाणी होतं आम्हाले. तेवढयापुरतं जमलं तं नांदलं. नही तं देली फारकत.”

“ओ अन्ना, तू गप बस न रे भो जरासा! त्याना इशय काय शे आनी तू बोली काय राह्यना? कसाले चड्डी ओढी राह्यना त्यानी. काय म्हननं शे त्यानं, जरासं आयकी तं ले. आयकाले का पयसा पडतस?” थोड्या वेळेआधी तात्याच्या विधानांची फोलपटे काढणारा आबा आपलं आंतरिक ज्ञान प्रकट करीत बोलता झाला. 

“अरे पुरे ना आता! किती चिवट्या सोलतात रे त्याच्या?” तात्याकडे येणाऱ्या शब्दांच्या तीरांना थांबवत ढाल झालो. “खरंय रे तुझं म्हणणं. असणं आणि दिसणं यात फरक करता यायला हवा. खरंतर आपण असतो तसे दिसतो का, याची काळजी माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाने घ्यायला हवी. प्रत्येकाच्या जगण्याचे काही कंगोरे असतात. काही कोपरे असतात. चेहरे असतात तसे मुखवटेही असतात. पण चेहरा लपवण्याची परिस्थिती ओढावली की, मुखवटे सुंदर वाटू लागतात. एकदाका मुखवटे परिधान करून मिरवायची सवय झाली की, हरवलेल्या चेहऱ्याचं स्मरण नाही राहत. बोले तैसा चाले... हे शब्द मुलांना वर्गात शिकवण्यापुरते राहतात किंवा भिंतीवरील सुविचारांपुरते उरतात.”
 
“आता कसं बोलले बापू तुम्ही! त्याचं काय आहे, तुम्ही होते साहित्याचे विद्यार्थी, म्हणजे तसे आजही आहेतच. लिहिणारा आयुष्यभर विद्यार्थीच असतो नाही का? असायला हवं. पण दोन लेख, तीन कविता कुठे छापून आल्या की, आपण प्रथितयश वगैरे साहित्यिक असल्याचं वाटायला लागतं हो लोकांना. खरंतर भास असतात ते. पण यांना सांगेल कोण अन् सांगितलं तरी यांनी मान्य करायला हवं ना! कुठेतरी वाचलेलं आणि थोडं पाठ केलेलं आलटून पालटून बोललं येथे तेथे की, मोटिव्हेशनल का काय म्हणतात, तो वक्ता झाल्याच्या समज होतो काहींचा. अज्ञानातून आलेल्या आत्मविश्वासाने आपण ग्रेट वगैरे असल्याचा अवकाळी साक्षात्कार होऊ लागतो. तो अमरवेलीसाराखा वाढू लागला की, आपला विस्तार होतोय याची प्रचीती येऊ लागते. आपण वाढता वाढता वाढतच चाललोय, हे पाहून हे जीव सुखावतात. मिंधेपणाला मुक्तीपथ मानणारे मोठेपणाच्या झुली पांघरून उगीच मिरवत राहतात. स्वतःची स्वतः मखरे तयार करून मिरवत राहतात. मळवट भरून भक्त जमा करीत आरत्या ओवाळून घेतात. आयुष्यात जो स्वतःशीपण स्पर्धा करू शकला नाही, तो कुठल्यातरी स्पर्धापरीक्षांचा प्रेरणादायी मार्गदर्शक होतो. कोणी पाचपन्नास पुस्तके इकडून-तिकडून गोळा करून आणतो. त्यातल्या मजकुरालाच नवे कपडे चढवून आयुष्यात प्रचंड सकरात्मक  बदल घडवून आणणारे प्रेरणादायी वगैरे पुस्तके लिहितो. खरं म्हणजे कॉपीपेस्ट करत राहतो अन् आपलं पुस्तक कसं जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारं आहे, म्हणून भाजीपाला विकावा तसा गल्लोगल्ली हाळ्या देत राहतो. ओळखीच्या चेहऱ्यांना पकडून इच्छा असो अथवा नसो, त्यांच्या माथी मारत फिरतो. खरंतर नजरेसमोर अन्याय, अनाचार, अत्याचार वगैरे घडत असल्याचं दिसतं असूनही त्याविरोधात उभं राहण्याचीच काय; पण ब्र काढायचीपण हिम्मत होत नाही, ते काय इतरांच्या आयुष्यात प्रेरणा पेरणार आहेत. पुस्तकातल्या शब्दांनी हाच पेटत नसेल, तर समाजातल्या वाटांवर कोणता प्रकाश पेरणार आहे?”

“तात्या, तुला काय म्हणायचं आहे नेमकं? मी केवळ बोलका सुधारक आहे! करत्या सुधारकांचे विचार उसने घेऊन वर्गात तीस-पस्तीस मिनिटे पोपटपंची करणारा. पांढऱ्या कागदाला काळा करून कालपटावर कोरीवकाम केल्याच्या आवेशात मिरवून घेणारा वगैरे वगैरे. समोर बसलेल्या समूहाला आणि वर्गात शिकायला एकत्र आलेल्या निरागस जिवांना संस्कृतीची, संस्कारांची, इतिहासाची असलेली महती आणि नसलेली माहिती विशद करून सांगणारा.” त्याला चिडवण्याच्या हेतूने हसत बोललो.
   
“घ्या, तुम्हीपण घ्या आमची मजा आता! तुम्हीच तेवढे राहिले होते. आधीच हे लोकं गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यात आणखी एकाने तुमची भर.” तात्या वातावरणाला आणखी हलकं करीत बोलला.

अण्णाला बोलण्यासाठी आयती संधी चालून आली. तिचं बोट धरून तो चालत आला. म्हणला, “तात्या, बापूंची गोस्ट कुठी खोटी आहे. आता तूच आमच्या समद्यायले तसं समजी राह्यला असीन तं आम्ही काय करो बुवा? तसेभी आमच्या बाशिंगायचे एकेक मनी गयाले लागले आता. कव्हलोग टिकाव धरतीन ते तरी.”

“ओ अन्ना, तात्यानं म्हननंबी एकदम खरं शे रे भो! तो सांगी राह्यना त्यांनामा काय खोटं शे? आरे, मान्से वागीच राह्यनात तसा. दाखाळानं एक आनी करानं भलतंचं. आरे, जन नी नही तं, निदान मननी तरी राव्हाले जोयजे नं आपलाकडे. पन नही करतत तसं. करावबी नहीत. एकदाका कंबर नं सोडीसन डोकाले गुंडाई लिधं नं मग कसानी लाज, नी कसानी शरम. सगळा बिनलाज्या धंदा शेतस भो!” आसपास आढळणारा वैताग आबाने आपलं म्हणणं मांडताना व्यक्त केला.
  
“थांबा रे थोडं! साला, संधी सापडली की, एकजात सगळे तयारच रिंगणात घ्यायला. आणि मी तर काय तुमच्यासाठी बकराच. सापडला की हलाल करायला. अरे, कापायचं तर निदान सुरी तरी प्रेमाने चालवा रे! ते जाऊद्या तिकडे. नंतर बोलतो या विषयावर. घेतो तुम्हांला सवडीने आखाड्यात. बापू, भाषा तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचं साधन झालेलं. खरंतर मी बघतोय भाकरीसाठी चाकरी करत असल्याचं तुम्ही सांगतात. हे तर सगळेच करतात, पण पत्करलेल्या चाकरीचा कधी व्यवसाय नाही होऊ दिला. ना कधी धंदा केला. तुमच्यासाठी तो पेशा. तुम्हीच म्हणतात ना, पेशाविषयी आपलंपण अंतरी नांदतं असलं की, पैशाचं मोल नगण्य होतं. व्यवसाय आला की, नफ्याची गणिते प्रिय वाटू लागतात. धंदा झाला की विधिनिषेध नाही उरत. केवळ आपलं सुख तेवढं दिसतं. पण पेशामध्ये नैतिकतेच्या मर्यादा येतात आणि त्याच तुम्हांला मोठं करतात. केवढं समर्पक आहेना, हे म्हणणं. ना तुम्हांला तुमच्या ज्ञानाचा माज, ना मिळवलेल्या यशाचा उन्माद. या सगळ्याला ‘माझं ओंजळभर विश्व’ म्हणतात तुम्ही. तुम्हीच तर सांगितलंय, ओंजळी अर्ध्य देताना अधिक देखण्या होतात म्हणून. आम्ही का पाहत नाहीत हे. कुठे काही चुकत असेल, न्याय होत नसेल तर ठाम भूमिका घेऊन उपेक्षितांच्या बाजूला उभं राहतात. चुकणारा आपला असो की, परका तेवढ्याच आवेशाने प्रतिवाद करतात, कोणाचाही मुलाहिजा न राखता. तुम्हांला हे जमत असेल, तर इतरांना का नाही? का म्हणून बोटचेपी भूमिका घ्यायची? बाता सगळ्या जगाच्या करायच्या आणि आपण काही करायची वेळ आली की सफाईदारपणे निसटायचं, ही कुठली तत्वं म्हणायची? तुम्हीच म्हणतात ना नेहमी की, जग श्रीमंतांच्या पैशांनी नाही समृद्ध झालं. ते फाटक्या माणसांच्या प्रयत्नांनी चाललं आहे म्हणून.” तात्या आपलं मत मांडता झाला.

“तात्या, खरंय तुझं म्हणणं. सामान्य माणसेच विश्वाचे नियंते आहेत. माणसांनीच निर्माण केलेल्या देव, धर्म, नियंता वगैरे गोष्टी म्हटलं तर मानसिक समाधानासाठी शोधलेली प्रतीके. अंतरी अधिवास करून असणाऱ्या अमूर्त आस्थांना अधिष्ठित करण्यासाठी. विकारांना विचारांतून विलग करण्यासाठी. समजाचं वागणं संयमित असावं, म्हणून केलेली सोय म्हणा हवं तर. संस्कृती, संस्कार वगैरे गोष्टी सामाजिकवर्तन सभ्यतेच्या संकेतांना धरून वाहते राहावे, म्हणून केलेले प्रामाणिक प्रयत्न. एकीकडे देवाधर्माच्या गोष्टी करायच्या अन् सापडली संधी की, लोकांच्या माना मोडायच्या. अशीही माणसे असतातच की आपल्या आसपास. देव, दैव, प्रार्थनास्थळे असली म्हणून माणूस सभ्यतेचे सारे संस्कार घेऊन वागेलच याची शाश्वती देवालाही नाही देता येत. कशाला हवं असं दुटप्पी वागणं. खरंतर देवाला देव्हाऱ्यात अन् धर्माला मनात ठेवता आलं की, आयुष्य खूप देखणं वगैरे होतं. पण माणसे मानसिक समाधान देणाऱ्या गोष्टी समोर आणतात आणि आपल्या स्वार्थाचे मार्ग प्रशस्त करून घेतात. मी केवढा श्रद्धाशील अन् धार्मिकवृत्तीचा आहे, म्हणून ढोल बडवत राहतात. पण मनातून विकार काही निरोप घेत नाहीत. अशा भोंदूगिरी करणाऱ्यांचा राग येतो खूप. खरं सांगू का, माझ्याकडे आहे काय उन्माद करण्यासारखं? आज आणि आता जो पळ पदरी पडला आहे, तो आणि तेवढाच. उद्या कोण काय, कुठे असेल कसं सांगावं. मिळालाय क्षण तर तो सुंदर का करू नये? आहे वेळ तर आयुष्य का सजवू नये? ज्याच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं, तो नागड्या भूमिका घ्यायला घाबरत नाही, असंही म्हणतात लोक. अशा विचारांच्या धन्यांची फिकीर करायची कशाला? भलेही माझा खिसा रिकामा असेल, त्याची मी कधी चिंता केली नाही आणि करणारही नाही. पण माझे विचार कोते व्हायला लागले की, अस्वस्थ होतो. मान्य की, मी कोणी दार्शनिक नाही, महात्मा नाही. पण दार्शनिकांच्या विचारांना अन् महात्म्यांच्या कृतींना कोरभर का असेना कोपरा देऊन आपल्या आयुष्याचा भाग तर करू शकतो ना. नाही मला अख्खं आभाळ पंखावर घेता येणार. माझ्या पंखांमध्ये तेवढी ताकद नाही. माझा वकूब नसेलही तितका, पण समोर दिसणाऱ्या अफाट पसाऱ्यातलं एखादं क्षितिज शोधण्याएवढी भरारी तर घेऊ शकतो की नाही. जगाचा संसार सुंदर होईल तेव्हा होईल, पण कुणाचा तरी आज देखणा करता येत असेल तर तो का करू नये?” माझ्या मतांचे चिटोरे संवादाच्या पाटीवर मी पद्धतशीर चिटकवले. 

“हेच, नेमकं हेच म्हणायचं आहे मला! अशी काहीशी भूमिका घेऊन जगता येण्यात काय अवघड आहे? पण नाही. स्वार्थ अडवा येतो ना प्रत्येकवेळी. ठीक आहे. प्रत्येक जीव थोडाबहुत स्वार्थ सोबत घेऊन जगत असतो. पण त्याचा सोस नको ना व्हायला. कुठेतरी थांबायला हवं की नको. पण मृगजळाची मोहिनी पडली की, माणूसपण, माणुसकी विस्मरणाच्या डोहात ढकलली जाते.” तात्याने विषय स्पष्ट करून मांडला. बाकीची मंडळी आता मूक साक्षीदार झालेली. त्यांची श्रवणभक्ती भक्तिभावाने सुरु.

“तात्या, एक सांगू का? प्रतिमा असतात आसपासच्या आसमंताला अनेक आयामात निर्देशित करणाऱ्या. आकलनाच्या अनेक शक्यता गर्भात घेऊन ज्ञात-अज्ञात अर्थांना प्रसवणाऱ्या. काही अर्थांच्या गूढ अंधारात अधिवास करून असतात, काही अगम्यपणाच्या प्रस्तराआड दडलेल्या. अज्ञाताच्या अंधारात दडलेले कवडसे वेचून आणण्यासाठी आधी अंतरीचे पलिते प्रज्वलित करावे लागतात. लख्ख प्रकाशाची कामना करून वाटा उजळून नाही निघत. पावलापुरता प्रकाश पेरणाऱ्या पणत्या प्रदीप्त कराव्या लागतात. आसपास साकळलेला अंधार उपसून वेगळा करावा लागतो. अंधाराच्या राशी उपसून वेगळ्या करण्यासाठी सहकार्याचे हात शोधावे लागतात. आसपास भरून राहिलेल्या निबिड अंधारात एकटेपणाशिवाय काहीही नसेल अन् कंठशोष करूनही प्रतिसादाचे प्रतिध्वनी परत येत नसतील, तर प्रयासांच्या परिभाषावरचा विश्वास कसा प्रवर्तित होईल?” कोणत्या तरी तंद्रीत बोलून गेलो.

“ओ बापू, लोकांना समजेल अशा भाषेत सांगा हो काही. अरे काहीच पचनी पडत नाहीये हे. शब्दकोश सोबत घेऊन बसायला लागेल की काय. साला, ही सगळी वाक्ये ऐकून मी खरंच मराठी शिकलो आहे का, म्हणून माझाच मला संशय यायला लागला आहे. मला वाटतं एकदा माझ्या मास्तरांना विचारून घ्यावं की, आमच्यावेळी असं मराठी शिकवायला अभ्यासात नव्हतं का म्हणून.” तात्या थट्टेने म्हणाला.

“आहेत का पण ते आता इहलोकी. की वर अप्सरांच्या संगतीने अध्यापन सुरु आहे त्यांचे...? असो, जरा जास्तीच तत्वज्ञानपर आणि आकलनपार बोललो. पण खरं सांगायचं तर संकटांनी, दुःखांनी माणसे कोसळताना सावरणारे स्तंभ उभे करावे लागतात. सहकार्याचे साकव घालून तोल सांभाळावा लागतो. आसमानी आघातातून उभं करतांना सहृदय हात पुढे येतात. पण सुलतानी सोट्यांच्या फटक्यांनी पदर फाटत असेल तर... आयुष्याचं वस्त्र विणताना मनाजोगते टाके टाकून कशिदा कोरता आला की, त्याला देखणेपण लाभतं. पण पदरावराच्या नक्षीला बांधून ठेवणारा धागा ओढून काठ उसवत असेल तर... उसवणाऱ्या धाग्यांना गाठी टाकून तुकडे जोडावे लागतात परत परत.” - मी

“व्वा, क्या बात! कितलं मस्त आनी नामी बोलनात आते तुम्हीन बापू. आसं आनी इतलंभी करता उनं मानूसले तरी गह्यरं व्हयनं नही का” आबाचा पसंतीचा प्रतिसाद.
 
“खरंय आबा. पुढयात पहुडलेल्या चौकटींच्या तुकड्यांना समजून घेत रिकाम्या रकान्यात आस्थेचे रंग भरता येतात, त्यांना छटांचे अन्वयार्थ नाही शोधावे लागत. प्रत्येक तुकड्याच्या कहाण्या वेगळ्या असतात. काही अध्याहृत अर्थ असतात, आयाम असतात. काही प्रमाण असतात, काही परिमाणे. त्यांचे अर्थ अवगत करण्याइतका संवेदनांचा विस्तार झाला की, पर्याप्त पर्याय पदरी पडतात. विश्वाचा विस्तार असेल तेवढा असो, आपले परीघ विस्तारता येतात, त्यांना शक्यतांसोबत असणारी सूत्रे समजत जातात. आकलनाचा पैस वाढवणाऱ्या प्रत्येक चौकटी आयुष्याच्या विस्ताराच्या परिभाषा नव्याने अधोरेखित करतात. फक्त त्यांच्याकडे डोळसपणे बघता यायला हवं. समजून घेता यावं की, प्रत्येक प्रतिबिंबासही विस्ताराचे बांध असतात. आकलनाच्या सीमा असतात. परीघ असतात, भ्रमणाच्या कक्षा निर्धारित करणारे. तरीही असतात त्यात शक्यतांचे काही कंगोरे दडलेले. कवडसे असतातच आसपास आपणच आपणास शोधत निघालेल्या वाटेवर आश्वस्त करणारे. मनात आकार अंकुरित होतात, ते केवळ आकृत्यांचे कोलाज नसतात. तो शोध असतो अंतरी अधिवास करणाऱ्या स्वप्नांचा.”

सगळे शांतपणे ऐकतायेत. काय बोलतोय हा माणूस, म्हणून वाक्यांचे अर्थ मनातल्या मनात जुळवत समजू पाहत होते. काही कळणारं अन् न कळणारंसुद्धा. माझं बोलणं थांबलं तरी कोणी काही म्हणालं नाही. स्तब्ध शांतता काही वेळासाठी. तिला छेद देत तात्याच पुढे म्हणाला, “बोला बापू तुम्ही. खरंतर तुमचं बोलणं बऱ्याचदा कळत नसलं, तरी ऐकावसं वाटतं एवढं मात्र नक्की. काहीतरी आतून उमलून आलेलं असतं त्यात.”

“तसं नाहीरे तात्या! जित्याची खोड... म्हणतात ना, तसंच काहीसं. माझा स्वभावदोष म्हणा हवं तर याला. असो, ते फारसं महत्त्वाचं नाही. पण आपण जसे बाहेरून दिसतो, तसे आतूनही असले की आयुष्य खूप सोप्पं वगैरे होतं. ज्यांना चांगुलपणाचा परिमल परिसराच्या प्रांगणात पसरवता येतो, त्यांना प्रमुदित जगण्याचे अर्थ शोधावे नाही लागत. त्यांच्या कोरभर कृतीतून प्रसवणारे प्रकाशाचे कवडसे आसपास समृद्ध करीत राहतात. ते प्रतिरूप असतं सत्प्रेरित विचारांचं. शोध असतो प्रतिरुपाचा. प्रतिष्ठापना असते मूल्यांची. प्रचिती असते नैतिकतेच्या अधिष्ठानाची. प्रतीक असतं सद्विचारांनी प्रेरित भावनांचं. प्रतिबिंब सर्जन असते प्रतिभूत आकारांना जन्म देणारे. आपण त्याला हुबेहूब वगैरे असे काहीसे नाव देतो. शेवटी नावही प्रतिबिंबच. कारण ती ओळख असते कोणत्यातरी आकाराची. आकार चिरकाल असतीलच, याची हमी काळालाही नाही देता येत हेही वास्तवच.”

“भारीच हो बापू एकदम. आम्हाले खरंतर तुमच्या या बोलन्याचा हेवा वाटतो गह्यरा. आनी एक सांगू का, मत्सर का काय म्हंता, ते भी! सालं, आपल्याले असं बोल्याले काहून जमत नसीन, म्हनून आपलीच आपल्याले लाज वाटते.” अण्णाने मन मोकळं केलं.
 
विषय आणखीही विस्ताराच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहिला असता, पण तास संपल्याची घंटा वाजली. चर्चेच्या सुरांनी सजलेली मैफल मोडली. आपल्या तासिकांना पुढच्या वर्गावर जाण्यासाठी एकेक करून सगळेच निघाले. नंतरचाही तास ऑफ असल्याने आहे तेथेच बसून राहिलो. शिक्षकदालनात नव्या आवाजांचा गलका सुरु. मी मात्र तसाच मख्खपणे बसलेलो. मनात तोच विषय भुंगा बनून गुणगुण करीत राहिला. राहून राहून वाटत होतं की, माणसांचं जगणं सहज, सोप्पं का नसतं. की तो स्वतःच अवघड करून घेतो? 

माणसाचे ऐहिक आयुष्य बिंब असेल, तर त्याचं तसंच आतूनही असणं प्रतिबिंब म्हणायला काय हरकत असावी? चित्रकाराच्या मनातील आकृत्यांचे प्रतिबिंब कॅन्व्हासवर रंगरेषांनी प्रकटते. गायकाच्या सुरातून ते प्रतिध्वनीत होते. समाजसेवकाच्या सेवेतून प्रवाहित असते. धनवंताच्या ऐश्वर्यात चमकते. दारिद्र्याच्या दशावतारात कोमेजते. दैन्य, दास्यात अडते, तेव्हा भेसूर दिसते. अन्यायाच्या प्रांगणात भीषण होते. प्रयत्नांचा परगण्यात प्रफुल्लित होते. आस्थेच्या प्रदेशात देखणे दिसते. लावण्यखणीच्या चेहऱ्यात सजून सुंदर होते. कुरुपतेत ते कोणत्यातरी कोपऱ्यात काया आकसून बसते. वंचनेत विकल होऊन असते. आनंदात उधानते. दुःखात कोसळते. अनुभवाच्या कोंदणात प्रगल्भ होते. पण खरं हेही आहे की, प्रतिमानच प्रतिबिंब बनते तेव्हा मनी विलसणाऱ्या विचारांचा चेहरा अधिक देखणा होतो. देखणेपणाची परिभाषा परिपूर्णतेत असते आणि परिपूर्ण प्रकाशाचे चांदणे विवेकाचे प्रतिबिंब बनते. खरंतर प्रतिबिंबही खेळच आभासी आकृत्यांचा. अपेक्षांच्या झोक्यावर झुलत राहणं त्याचं अटळ प्राक्तन असतं. ज्या कधी स्थिर नसतात. स्थिर असतात, ते मनात कोरलेले आणि विचारात गोंदलेले आकार. तो कोलाज सांभाळता येतो, त्यांना आयुष्याचे अन्वयार्थ आकळले असण्याच्या शक्यता अधिक असतात, नाही का?

-चंद्रकांत चव्हाण
● 

मोहर

By // No comments:
संकटे कधी एकेकट्याने नाही येत. सगळा लवाजमा गोळा करून मुक्कामालाच येण्याच्या तयारीने ती निघालेली असतात की काय, माहीत नाही. पण त्याचं येणं कुणालाच नको असतं. ती काही कोणाला कळवून नाही येत. तसा निरोप नसतो त्यांनी पाठवलेला. दारावर दस्तक दिली की कळतं, आपल्या पुढयात कोणता पसारा मांडून ठेवला आहे त्यांनी. प्राप्त परिस्थितीला अन् पुढयात पडलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प असतो तरी कोणता? भिडता येतं त्यांच्याशी ते लढत राहतात. आपापली अस्त्रेशस्त्रे घेऊन कधी एकट्याने, कधी आणखी कोणासह. संकटांतून सहीसलामत सुटण्याची आयती सूत्रे नसतात. संघर्षात अविचल राहण्याची समीकरणे सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही कोसळतात. काही कोलमडतात. अर्थात, हा त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक. काही कोसळूनही उभे राहतात. कापून केवळ खोड शिल्लक राहिलेल्या झाडाला नव्याने कोंब यावेत तसे उगवून येतात. 

आपत्ती, संकटे सार्वकालिक नसतात. सत्व पाहणाऱ्या संकटांतून मुक्तीचा मार्ग मिळवणाऱ्याचं कौतुक वगैरे होणंही परिपाठच. संकट समयी एखाद्याला सहजपणे सल्ला दिला जातो. सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक संदर्भाला सामाजिकतेची वसने चढवून सुशोभित केलं जातं. उमेदीचे उसने शब्द पेरले जातात. कुणी आश्वस्त करणारी अभिवचने देऊन जातो. कुणी कुठून मिळवलेलं तत्त्वज्ञानपर प्रवचन ऐकवतो. कुणी भूतकाळाच्या कुशीत पहुडलेल्या प्रिय-अप्रिय आठवणींना नव्याने रंग भरतो. समूह म्हणून जगताना संकटकाळी माणूस एकटा पडू नये, ही भावना जवळपास सगळ्यांच्याच अंतरी नांदती असते. या सगळ्या गोष्टींना सहज सहकार्याचे कंगोरे अन् स्वाभाविक सौहार्दाचे कोपरे असतात. अर्थात, हे वास्तवही अलाहिदा नाही करता येत.

द्यायचंच असेल तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत आयुष्यात कणभर सुखासाठी पर्वताएवढे दुःख झेलावे लागते म्हणून सांगतो. कुणी संत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय तर जगात वेदनेच्या वाटेने चालणारा तू काही एकटा आणि एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आपल्या आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.

हे सगळं मिथ्या आहे, असं कोणी म्हणणार नाही. चालते करण्यासाठी आधी पायांवर उभं करणारे अनुभव सांगण्यात वावगं काहीही नाही. पण सगळ्यांनाच असं काही करणं साध्य होतंच असं नाही. दुःखाचा रंग सगळीकडे सारखा असला, तरी त्याच्या छटा वेगळ्या असतात. परिमाणे अन् परिणाम निराळे असतात. दुःखाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येकासाठी निराळी असते. या वास्तवाला वळसा घालून उत्तरे नाही शोधता येत. विस्तवाचा दाह काय असतो, हे चटका अनुभवलेल्यालाच ठाऊक असतं, नाही का? बाकीचे केवळ तर्क, अनुमान आणि असलेच तर अनुषंगिक अनुभव. तरीही प्रत्येक जण प्रबोधनकार असल्याच्या आविर्भावात आपल्या अनुभवांचे गाठोडे उपसत असतो.

हे सगळं सांगण्याचं कारण, आई आणि नंतर बाबांच्या आजारामुळे गेल्या काही दिवसात कशा आणि कोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं. हे सांगणारा संदेश एका स्नेह्याने आमच्या व्हाटसअॅप समूहावर पाठवला. परिस्थितीने प्रखर पेच समोर उभा केलेला. जगण्याच्या सगळ्याच चौकटी विस्कळीत झालेल्या. अवतीभवती कोणीतरी खच्चून अंधार भरून ठेवलाय. तो अधिकच निबिड होतोय. आशेचा पुसटसाही कवडसा कुठून दिसत नाही. मेंदू विचार करणेच विसरला की काय. एक हताशा जगण्याला वेढून बसलेली. काय करावे काही सुचेना. अगदी कोसळण्याच्या बिंदूवर नेणारी परिस्थिती वगैरे वगैरे. मित्र ऐनवेळी मदतीला धावून आले. कशाचीही तमा न करता पळत राहिले सोबतीने. त्यांच्या ऋणातून कसं उतराई होता येईल, म्हणून कृतज्ञ अंतकरणाने मनातले भाव शब्दांकित केलेले. 

अर्थात, समाज माध्यमांवर सतत घडतं ते येथेही. मॅसेजची अक्षरे स्क्रीनवर साकार झाल्या झाल्या सहवेदनेचे सूर सजायला लागले. ओथंबलेपण घेऊन अक्षरे अंकित होऊ लागली. सहानुभूतीची एक लाट सरकली की, दुसरी तिचा माग काढत येतेय. संवेदनांच्या सरीवर सरी बरसतायेत. सांत्वनाच्या सहृदयी भावनेने शब्द मोहरून आलेले. मॅसेज वाचून कुणी तक्रार करतो आहे, आम्हांला का नाही कळवलं म्हणून. कुणी सांगतो आहे अरे, अशावेळी त्याने तरी काय करावं? कुणी म्हणतो आहे, बरं की मित्र सोबत होते. कुणी दैवाला दोष दिला. कुणी देवाला बोल लावला. आणखी कुणी काय, कुणी काय. प्रतिसादाचा परिमल व्हाटसअॅपच्या प्रांगणात पसरतोय. थोडी काळजी, थोडी चिंता, बरीचशी चीड, विखंडित विमनस्कता, अगणित अगतिकता... भावनांचा एकच कल्लोळ. शक्य असेल तसा प्रत्येकजण व्यक्त होतोय. आपल्याकडून प्रतिसाद नाहीच दिला गेला, तर माणुसकी वगैरे प्रकार नसलेला म्हणून अधोरेखित होण्याच्या अनामिक भीतीपोटी येतील तशी अक्षरे खरवडली जातायेत. व्यक्त होणाऱ्यांचा हा प्रमाद नाही. माणूस असल्याच्या मर्यादा आहेत. अशावेळी ज्या स्वाभाविक प्रतिक्रिया यायला हव्यात, त्या आणि तशाच येतायेत. सगळेच भावनांचे किनारे धरून वाहतायेत.   
 
माणूस समूहप्रिय असल्याचं आपण म्हणतो. तो आहेच. संदेह असण्याचं कारण नाही. पण सांप्रत स्थितीकडे पाहिलं तर त्याच्या समूहनिष्ठेवर प्रश्नचिन्ह अंकित करण्याइतपत संदेह विचारात वसती करून आहे, हेही दुर्लक्षित नाही करता येत. आपापली कोटरे अन् त्यातले कोपरे प्रिय असण्याच्या काळात अपेक्षा तरी कसल्या अन् कोणत्या कराव्यात? संपर्काची साधने संवादाला सक्षम बनवतायेत, पण माणसे संकुचित होत आहेत. सहज जुळणाऱ्या स्नेहाचे सूर जगण्यातून सुटतायेत त्याचं काय? आयुष्याला वेढून असलेल्या प्रश्नाची सम्यक उत्तरे शोधूनही सापडत नाहीयेत माणसांना.  

सामान्य माणसांच्या जगण्याच्या काही व्याख्या असतात, तसे आयुष्याचे अर्थ शोधणारी गणितेही. ती फार गहन, किचकट वगैरे असतात असं नाही. पण प्रत्येकवेळी अचूक उत्तर देणारी सूत्रे त्याला सापडतातच असंसुद्धा नाही. बऱ्याचदा त्याचं विश्व त्याच्या विचारांपासून सुरु होतं आणि त्याच्या असण्यात संपतं. त्याच्या पुरतं तरी हे वास्तव असतं. काळाच्या कुठल्यातरी तुकड्यात असण्याला ओंजळभर चौकट मिळते. पण त्यांचे अन्वयार्थ लागतीलच असं नाही. काळ अफाट आहे. अथांग आहे. त्याच्या तळात डोकावण्याचा प्रयत्न माणूस शतकांपासून करतोय, पण तो तसूभरही कळला आहे की, नाही कोण जाणे? माणसांच्या या मर्यादाच. विस्ताराचे बांध असूनही अमर्याद आकांक्षाच्या आभाळात तो विहार करतोय. जगणं सीमांकित वर्तुळात मर्यादित होतंय. हे कळत नाही असं नाही, पण वळत नाही, हेच दुर्लक्षित वास्तव. माणूस इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवातला प्रज्ञावान वगैरे असल्याचा अहं केवळ वल्गना ठरवू पाहणारा हा काळ. गती-प्रगतीच्या परिभाषा प्रचंड वेगाने बदलत आहेत. जगावर हुकुमत गाजवण्याची तंत्रे अवगत झाली. पण स्वतःच सूत्रातून सुटण्याच्या टोकावर माणूस लटकला आहे. आपण सगळं काही असल्याचा साक्षात्कार केवळ आभास ठरू पाहतोय.
 
आपल्यातला मी वगळून आसपासचा अदमास घेत राहतात त्यांना सभोवतालातले सूर समजावून नाही सांगायला लागतं. मनातले अहं उंबरठ्याबाहेर ठेवता आले की, आयुष्य समजून घेण्यास सुलभ पडते. संयम राखणाऱ्यांना मर्यादांचे अर्थ अवगत असतात. पण एकदाका अंतरी अहं रुजले की, त्यांचा विस्तार अमरवेलीसाराखा सहज होत राहतो. कुठलाही आधार त्याला पुरतो. यशाची शिखरे सर करताना पायथा दुर्लक्षित झाला की, कोसळण्याचा अदमास नाही घेता येत. आकांक्षांच्या गगनात विहार करताना अहंविहिन राहणं आपण अवगत केलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर हीच तुमच्यातल्या तुम्ही असण्याची जमा बाजू. असलेलं नसलेलं महात्म्य कथन करून काही कोणाला महंत नाही होतं येत. अतिशयोक्तीच्या शिड्यांवरून शिखरांना हात लावू पाहणाऱ्यांना पायांना असणाऱ्या आधाराचं नातं जमिनीशी असत याचं भान असायला हवं. 

तुम्ही पदाने कोणत्या उंचीवर आहात. पैशाने केवढ्या योग्यतेचे आहात आणि वयाने किती आहात याला फारसं महत्त्व नसतं. पद, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्य असतंच किती? तुमच्याकडे असेपर्यंत. तुम्ही थकला, चुकला की, या सर्वांपासून हुकालात एवढं नक्की. समजा वय हीच एकमेव पात्रता असली सुज्ञपणाची, तर शंभरी पार करणारे अगाध, अलौकिक वगैरे ज्ञानाचे धनी आयला हवे. पण तसं नसतं. वयापेक्षा सोय समजणं अधिक महत्त्वाचं. अनुभवाने समृद्ध होत राहण्याला प्रगती, वाढ, विकास वगैरे सारख्या शब्दांचं कोंदण देता येतं. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून मोठं होता येतं असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग. पण ते तर अज्ञान. सर्वज्ञ हा एक नितांत सुंदर शब्द. सर्वज्ञ संज्ञेस सर्वथैव पात्र असलेला असा कोणी जीव इहतली अधिवास करून असल्याचा दावा कोणताच जीव करत नाही. या शब्दाच्या अर्थाचा प्रवास कधीच पूर्णत्वाकडे प्रवास करत नाही. त्याला अपूर्णतेचा अभिशाप आहे आणि वरदानही. शाप यासाठी की, या शब्दात अनुस्यूत असलेले अर्थ समारोपाच्या बिंदूंवर पोहचवणारा काळालाही जन्मास घालता नाही आला. वरदान आहे, कारण प्रयासांच्या परिभाषा अवगत असणारे पूर्णत्वाचा धांडोळा घेत राहतात. वेचलेल्या ओंजळभर समिधा समर्पित करून प्रयोजनांना पूर्णत्त्वाच्या कोंदणात कोंडण्यासाठी झटत असतात.  

खरंतर माणसांचं आयुष्यच मर्यादांच्या कुंपणांनी सीमांकित. मर्यादांचे बांध असले म्हणून पलीकडे दिसणारा किनारा आपला करण्याची उमेद टाकून नाही देता येत. पैलतीरी पसरलेला प्रसन्नतेचा परिमल माणसाला सतत संमोहित करत आला आहे. हे संमोहनच अज्ञात परागण्यांचा धांडोळा घेण्यास उद्युक्त करते. आपलं असं काही शोधण्याच्या प्रयासांना प्रशस्तिपत्राची आवश्यकता नसते. व्यवस्थेच्या वर्तुळात विहार करताना गतीचं ज्ञान आणि प्रगतीच्या परिघांच भान अगत्यपूर्वक सांभाळावं लागतं. 

आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचंच, पण प्रत्येकवेळी तसंच पदरी पडेल असं नाही. खरंतर आपण आपल्याला अवगत असलेल्या सूत्रांचा उपयोग करीत जगण्याची समीकरणे सोडवावीत. नितळ, निर्मळ, निखळ वगैरे राहण्याचा प्रयास करावा. तुम्ही कसे जगतात, याची काळजी नाही करायची. करायचीच तर समाज करेल. त्यांना ठरवू द्या, भलंबुरं काय ते. बऱ्यावाईटाच्या व्याख्या तुमच्या तुम्ही तयार करून सत्प्रेरीत विचारांच्या वातींनी उजळलेल्या ज्योती सांभाळणाऱ्या पणत्या हाती घेऊन चालत राहावं. आवश्यकता असलीच आणि रास्त असलं तर अपेक्षांच्या अनुषंगाने बदलत राहावं. अवास्तव कांक्षा आणि अपेक्षाही अपायकारकच. पाण्यासारखं असावं आपलं असणं. आयुष्याचे किनारे धरून वाहताना संगमाकडे सरकता यावं. प्रमादाची वळणे वाटेवर भेटलीच तर वळसा घालून वेळीच वेगळी करता यायला हवीत.

समूहभावना सामान्य गोष्ट, आपण माणूस असण्यातली. खरंतर आयुष्य नावाचा अध्याय समृद्ध करणारी. समूहात विहार करताना अनेकांच्या आपल्याकडून किमान काहीतरी अपेक्षा असतात. त्या नसाव्यात असं काही कोणी सांगत नाही. विरोध वगैरे प्रकार असतो. त्यामागे प्रासंगिकतेची प्रयोजने असू शकतात. असलाच तर प्रत्येकवेळी तो प्रखर असेलच असं नाही आणि प्रत्ययकारी असेलच याचीही शाश्वती नसते. बहुदा काही गोष्टी मनानेच मान्य केलेल्या असतात. अपेक्षांचं एक असतं. त्यांना अस्तित्व असतं; पण आकार नसतो. त्याचा कोलाज ज्याचा त्याने करायचा असतो. चांगल्या, वाईट अशा कोणत्याही कप्प्यात त्यांना कोंडता येतं. कधी सोयीने, तर कधी सवडीने टॅगही लावता येतात त्यावर. कोणी कोणता टॅग लावावा, हे लावणाऱ्याने ठरवायचं. 

माणूस कुठेही असला तरी काळाचा लहानमोठा तुकडा सोबत घेऊन असतो. प्रत्येक तुकड्यात काही कहाण्या दडलेल्या असतात. त्याच्या कृष्णधवल छटांचे अर्थ तेवढे शोधता यायला हवे. स्मृतीच्या पडद्याआड दडलेल्या तुकड्यांचे अन्वयार्थ लावण्याएवढं सुज्ञपण आपल्याकडे असायला हवं. आयुष्य काही एखाददोन दिवसात आकाराला आलेली आकृती नसते. जगण्याला आलेला मोहर अनुभवण्यासाठी ऋतूंचे सोहळे समजून घ्यायला लागतात. पानगळ अनुभवल्याशिवाय बहरण्याचे अर्थ कसे आकळतील. सायासांची समीकरणे समजून घेता  आली की, प्रयासांच्या परिभाषा अधोरेखित होतात. संदर्भांचे धागे पकडून जगण्याला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करता यायला हवा. आयुष्याला वेढून असलेल्या गणितांना सोडवण्याची सूत्रे सापडली की, संकल्पनांनी साकारलेल्या चित्रात मनाजोगते रंग भरता येतात. आसपास अंधार गडद होत असलेल्या काळात आस्था कायम ठेवणाऱ्या किमान काही कवडशांना चिरंजीव करता यावं. आकांक्षा, अपेक्षा, श्रद्धा वगैरे शब्दांनी अधोरेखित केल्या जाणाऱ्या गोष्टी काही नव्या नाहीत. सगळं जुनंच, पण त्याला वेढून असलेली आस्थेची वर्तुळे तेवढी नव्याने समजून घेता यावीत. त्याचं असणं ठळक असावं म्हणून रेषांचे किनारे नेमकेपणाने गिरवता यावेत. 

सहानुभूतीचे चार शब्द सांडून संवेदना प्रकट करता येतीलही. पण संकटकाळी सोबत असतो, त्याचं नाव माणूस अन् सभोवती कोरलेल्या मर्यादांच्या रेषा विधायक हेतूंसाठी पार करता येतात ती माणुसकी. आसपास अनेक माणसांचा सतत राबता असतो, पण त्यांत माणसे किती असतात? असते ती केवळ गर्दी, स्वतःचा चेहरा नसलेली. खरंतर माणूस शब्दाची पर्याप्त परिभाषा तयार झाली नाही. आहे त्यातूनही काहीतरी सुटतं. नाही त्यात आणखी भर होत राहते. सापडलंच काही, तर काहीतरी निसटतंच. मुखवटे मिरवण्याच्या काळात निखळ माणूस मिळवणं अवघड आहे. चिमूटभर स्वार्थासाठी संवेदनांना सोडून पळणारे अनेक. पण सभोवती विहार करणाऱ्या वेदना पाहून वितळणारे फार कमी. सहवेदनेच्या मार्गावरून प्रवास करणारे तर मोजकेच. सहानुभूतीची वानवा नाही. अनुभूतीचे किनारे कोरडेठाक पडलेले. 

संकटांचा सामना करताना विकल झालेले जीव देव, दैवाला दोष देत आला दिवस ढकलत राहतात. नशीब, भाग्य, प्राक्तन वगैरे शब्दांचे अर्थ काही असोत. तो ज्याच्या त्याच्या आस्थेचा भाग. आपलेपणाचा ओलावा अंतरी नांदता ठेवणारे ओथंबलेपण शब्दाचा अर्थ असतात. स्वतःकडे देण्यासारखं काही नसलं, तरी सहकार्याचे साकव टाकून वाटा जागत्या ठेवतात. संवेदनांचे किनारे धरून सोबत वाहत राहतात. 'भाग्य' शब्दाची हीच न कळलेली परिभाषा असते. 

आपत्ती संकटे समोर येतात. अशावेळी माणसातलं माणूसपण अधिक ठळक वगैरे होतं असतं. खूप चांगली गोष्ट. पण सहानुभूतीच्या पलीकडे माणूस पोहचतो का? कदाचित या विधानात काही अपूर्णता असेलही. काळजी घे, गाफील, राहू नको वगैरे सारख्या चावून चावून चोथा झालेल्या शब्दांव्यातिरिक्त वेदनेच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्यांच्या पदरी आपण पेरतो तरी काय? कुणी म्हणेल की, दोनचार शुष्क शब्दांशिवाय सामान्य माणसाकडे असतं तरी दुसरं काय देण्यासारखं? समजा असलं काही करण्याजोगतं, तरी आधी माझ्यातला स्वार्थ पलायनाचे पथ आसपास आहेत का, हे शोधत असतो. कशाला उगीच झेंगट मागे लावून घ्यायचं, म्हणून शक्य तेवढं मागे राहण्याचा पर्याय शोधत राहतो. म्हणतात ना, पर दुःख शीतल. जखमांची ठसठस सांगून कशी कळेल? अनुभूतीशिवाय वेदनांचे अर्थ कसे आकळतील? जखमेवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित नाही होत. सहानुभूतीने केवळ वांझोटा आशावाद पेरता येतो. माणूस जगवण्यासाठी ओलावा नांदता ठेवावा लागतो. 

माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असतात, हे मान्य करण्यात कशाला हवा संदेह. अर्थात, हे शंभरातल्या नव्याण्णव माणसांबाबत असं म्हणता येईल. मी या नव्याण्णवातला एक. कारण राहिलेल्या एकातला एक मला नाही होता येत, या वास्तवाला विस्मरणातल्या कोपऱ्यात ढकलून नामानिराळे नाही होता येत. खरं हेही आहे की, माणूस म्हटला, म्हणजे त्याच्या असं असण्यातही नवलाई नसते. बांधिलकी सोबत बंध असले की, अनुबंधाची परिमाणे नव्याने तयार होतात. त्यांना किनार असते स्नेहाची. स्नेहच संवाद झाला की, संवेदनांना मोहर धरतो. माणसे माणूसपणाच्या मर्यादांनी भलेही सीमांकित असतील, पण त्याने सत्प्रेरीत प्रेरणेतून केलेलं काम परिमाण असतं त्याला समजून घ्यायचं. नितळपणाला कोणत्याच कुंपणात नाही कोंडता येत, हेच खरं. कृतिशील कार्य वगैरे काय म्हणतात ते हेच. काळ अन् वेळ यामध्ये असणाऱ्या अंतरात कर्म प्रवास करत असतं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय प्रवासात सोबत असलं की, कृती कर्तव्याच्या कोंदणात सजते. कृतीची प्रयोजनेच तुमच्या पदरी पुण्याई पेरणारा पर्याप्त पर्याय होत असतात. जगण्याला प्रामाणिकपणाचा अन् विचारांना निरामयतेचा गंध असला की, आसपास प्रमुदित होतोच होतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

भान

By // No comments:
माणूसपणाच्या मर्यादा माहीत असतात, त्यांना महात्म्याच्या व्याख्या नाही शिकवाव्या लागत. मर्यादांचं भान हीच त्यांची महती असते. आपण करत असलेल्या अथवा कराव्या लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही विचारांच्या वर्तुळात नाही शोधता येत. कधीतरी त्यांना भावनांच्या चौकटीतही तपासून पाहावं. तर्कनिष्ठ विचार जगण्याची अनिवार्यता असेल, तर भावना आयुष्याची आवश्यकता असते. प्रत्येकवेळी तर्काच्या तिरांनी पुढे सरकण्याऐवजी कधीतरी भावनांच्या प्रतलावरूनही वाहता यावं. 

मान्य आहे, तर्क ज्यांचं तीर्थ असतं, त्यांच्या आयुष्यात तीर्थे शोधण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या सत्प्रेरीत कृतीच तीर्थक्षेत्रे असतात. सद्विचारांची वात विचारांत तेवती असेल, तर तेच मंदिर अन् तेच तीर्थक्षेत्र असतं. पाण्याला तीर्थरूप होता येतं, कारण त्यात कुणीतरी नितळ भक्तीचा भाव ओतलेला असतो. त्यातला भक्तिभाव वगळला तर उरतं केवळ ओंजळभर अस्तित्व, ज्याला केवळ पाणीच म्हटलं जातं. पाणी महत्त्वाचंच, पण त्याहून अधिक महत्त्वाचा असतो तो भाव. अंतरी आस्थेचे दीप तेवते असले की, आयुष्यातले अंधारे कोपरे उजळून निघतात. उजेडाची कामना करत माणसाचा प्रवास अनवरत सुरू असतो. वाटा परिचयाच्या असणं हा भाग तसा गौण. कदाचित दैवाने टाकलेल्या अनुकूल दानाचा भाग. कुण्या एखाद्या अभाग्याला जगण्याचा अर्थ विचारला तर आपल्या आयुष्याचे अन्वयार्थ शोधण्यासाठी वणवण नाही करायला लागत.

तुमच्याकडे सुखांचा राबता असणं माणूसपणाची परिभाषा नसते. अभावात प्रभाव निर्माण करता येतो, त्याचा मोलभाव नाही करता येत. अंतरीच्या भावाने त्यांकडे पाहता यायला हवं. तुमच्याकडे असणाऱ्या साधनसंपत्तीने तुम्ही काही काळ चमकालही. पण झगमग आयुष्यात कायम अधिवास करून असेलच असं नाही. काजव्यांचं चमकणं देखणं असूनही त्यांना अंधाराचा नाश नाही करता येत. पण अंधाराच्या पटलावर आपल्या अस्तित्वाची एक रेषा नक्कीच अधोरेखित करता येते. आसपास अगणित प्रकाशपुंज दिमाखात मिरवतात म्हणून काजव्याने प्रकाशापासून पलायन करावं का? अंधाराच्या ललाटी प्रकाशाची प्राक्तनरेखा कोरण्याच्या कामापासून विलग करून घ्यावं का? नाही, अजिबात नाही. त्याला त्याच्या मर्यादा आकळल्या तरी पुरे. पणतीला उजेडाच्या परिभाषा अवगत असतात अन् आपल्या मर्यादाही माहीत असतात, म्हणून तर ती सभोवार पसरलेल्या काजळीतला कोरभर अंधार पिऊन ओंजळभर कोपरा उजळत राहतेच ना! स्वैर विहार करणाऱ्या झगमगाटमध्ये कुणाची तरी तगमग दुर्लक्षित होणं विपर्यास असतो. 

काही गोष्टी कुणाला बऱ्या वाटतात म्हणून आपणही तशाच कराव्या का? कुणाच्या कांक्षा आपल्या समजून अंगीकार करावा असं कुठे असतं? जगाला आपल्या जगण्यात जागा असावी; पण त्याचा कोलाहल होऊ नये इतकीच ती असावी. जगावं स्वतःला लागतं. जग एक तर मार्गदर्शन करतं किंवा तुमच्या मर्यादा मांडतं. कधी कुणी कुणाच्या कर्तृत्त्वाला कोरतं. कोरणारा हात कलाकाराचा असेल तर सुंदर शिल्प साकारतं अन्यथा केवळ टवके निघतात. तसंही ढलपे काढणारेच अधिक असतात आपल्या आसपास. जग तुमच्या जगण्याचं साधन असावं. साध्य आपणच निवडायचं. ते निवडण्याची कला जगातील भल्याबुऱ्या वृत्तीप्रवृत्तीकडून शिकून घ्यावी. समोर दिसणारी धवल बाजू पाहून जगाचे व्यवहार गोमटे आहेत, असं म्हणणं अज्ञानच. पलीकडील अंधारात अपरिचित असं काही असू शकतं. अंधारात हरवलेला अज्ञात आवाज ऐकता यायला हवा. प्रत्येक परंतुत एक प्रश्नांकित कोपरा असतो. त्याच्या विस्ताराच्या रेषा समजल्या की, आयुष्याचे अर्थ गवसत जातात. 

आयुष्याच्या पटावर परिस्थितीने पेरलेल्या वाटांनी प्रत्येकाला चालायला लागतं. त्या कशा असतील हे सांगणं इतकं सहज नाही. सुगम असण्यापेक्षा अवघडच अधिक वाट्यास येतील. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या पथावर पहुडलेल्या काही वाटा खुणावतील. काही खुलवतील. काही भुलवतील, तर काही झुलवतीलही. त्या प्रत्येकांचे अर्थ शोधण्याएवढं प्रगल्भपण प्राप्त करता यावं. साद देणारी सगळीच वळणे विसावा होत नसतात अन् सोबत करणाऱ्या सगळ्याच वाटा देखण्या नसतात. पायासमोर पसरलेल्या प्रत्येक चाकोऱ्या मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत नेणाऱ्या असतातच असंही नाही, हेही तेवढंच खरं. 

काही वाटा दिसतात देखण्या, पण आपण समजतो इतक्याही सहजसाध्य नसतात. निदान सामान्यांच्या आयुष्यात तरी नाही. असंख्य अडनिड वळणे असतील. संयमाची परीक्षा घेणारे सुळके समोर दिसतील. आपण शून्य असल्याची जाणीव करून देणाऱ्या दऱ्या असतील. परिस्थितीने पथावर पेरलेले अगणित काटे दिसतील. म्हणून पावलांना एका जागी थांबवून नाही ठेवता येत. निवडलेला पथ अन् वेचलेल्या वाटा वाचता आल्या की, विचारांचं विश्व समृद्ध होतं. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या वाटा कशा असाव्यात, हे कदाचित सीमित अर्थाने ठरवता येईलही. निवडीचे काही विकल्प हाती असले, तरी ते सम्यक असतीलच असंही नाही. म्हणून आपल्याला चालणं टाकून नाही देता येत. लक्ष ठरलेले असतील अथवा नसतील, चालायचं तर सगळ्यांनाच असतं. त्यासाठी चालताना फक्त नजरेत क्षितिजे अन् विचारात आभाळ उतरून यायला हवं, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

अवतीभवती

By // No comments:
आसपास निनादणाऱ्या सगळ्याच स्पंदनांना सुरांचा साज चढवून नाही सजवता येत. नाही सापडत कधी त्यांचा ताल. प्रयत्न करूनही नसेल सापडत एखादा सूर, तर आपण आपलंच गाणं शोधून बघायला काय हरकत असते. जगाकडे बघण्याच्या आणि लोकांची मने सांभाळण्याच्या नादात आपल्याला काय वाटतं, हे विसरावं का माणसाने? नाही! कधी कधी चौकटींच्या बाहेर अन् चाकोऱ्यांच्या पलीकडे असणंही देखणं असतं, नाही का? 

'मी' म्हणून काही असतं आपल्या प्रत्येकाकडे. आपलं 'मी'पण आकळतं, त्यांना 'आपण' शब्दाच्या आशयाशी अवगत नाही करायला लागत. ज्यांचा 'मी' 'आपण'मध्ये विसर्जित झालेला असतो, त्यांना विरघळूनही उरण्यातले अर्थ अवगत असतात. दुधात पडलेल्या साखरेचं दृश्य अस्तित्व संपतं, पण तिच्यातलं माधुर्य दुधाच्या पदरी गोडवा पेरून जातं. माणसाला असंच माधुर्य मागे ठेऊन विरघळून जाता येणं अवघड आहे का? असेलही कदाचित. पण अशक्य नक्कीच नाही. आपल्या प्रत्येकाच्या अंतरी काही अहं अधिवास करून असतात. त्यापासून विभक्त होण्यासाठी विरक्तीची वसने परिधान करून विजनवासाच्या वाटा धरूनच चालावं लागतं असं काही नाही. विचारांना विकारांपासून वेगळं करता आलं तरी खूप असतं यासाठी. आपल्यातला 'अहं'वाला 'मी' नाही, तर आपली पर्याप्त ओळख करून देणारा 'मी' अवश्य सांभाळता यावा माणसाला.

सगळ्याच गोष्टी काही सहेतुक करायच्या नसतात. हेतूसाध्य असतील त्या कराव्यातच; पण काही निर्हेतुक गोष्टीही कधी कधी आनंददायी असू शकतात, त्याही करून पहाव्यात. काही गोष्टी अशाही असतात, ज्यांची प्रयोजने शोधण्याच्या भानगडीत पडू नये. त्या कराव्याशा वाटल्या म्हणून कराव्यात असंही नाही. पण त्या केल्याने प्रसन्नतेचा परिमल मनाचं प्रांगण प्रमुदित करीत असेल, तर तो गंध अंतरी का कोंडून घेऊ नये? प्रत्येक कृतीत किंतु अन् हरेक कामात परंतु शोधायचा नसतो, तर त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यात कृतार्थता कोरायची असते. असेल काही गोमटे मार्गावर तर वळावे त्या वाटेने. वेचावेत पळ लहानमोठ्या आनंदाचे अन् वाचावीत वाटेवरची वेडीवाकडी वळणे. झालंच शक्य तर घ्यावा त्यावर क्षणभर विसावा, नव्याने बहरून येण्यासाठी.

प्रत्येकाच्या अंतरी आनंदाचा कंद असतो. आस्थेचा ओंजळभर ओलावा त्याला अंकुरित करतो. जपावेत जिवापाड ते कोवळे कोंब. वेड्यागत बहरून येण्यासाठी स्वप्ने पेरावी पानांच्या हरएक हिरव्या रेषेत. मोहरून येण्यासाठी त्याला ऋतूंच्या मोहात पडता यावं. धरतीच्या कुशीत विसावलेल्या बिजाने पावसाच्या पहिल्या सरींसोबत कोंब धरून जागं व्हावं. देहावर पांघरून घेतलेल्या मातीचा पदर दूर सारत क्षितिजाच्या टोकावर विहरणाऱ्या रंगभरल्या किनारकडे हलकेच डोकावून पाहावं अन् आपणच आपल्याला नव्याने गवसावं. वाहत्या वाऱ्याशी सख्य करावं. प्रकाशाशी खेळावं. पाण्यासोबत हसावं. आकाशाशी गुज करावं अन् दिसामासांनी मोठं होताना एकदिवस आपणच आभाळ व्हावं. तसं वाढत राहावं आपणच आपल्या नादात. ना आनंदाचं उधाण, ना अभावाची क्षिती. उगीच कशाला खंत करावी पायाखाली पडलेल्या पसाऱ्याची, माथ्यावर खुणावणारं विशाल आभाळ असतांना. अफाट आभाळ माथ्यावर दिसतं म्हणून पायाखालची माती दुर्लक्षित होऊ नये. हेही लक्षात असू द्यावं की, उंचीची सोयरिक पायथ्याशी अन् विस्ताराचं नातं मुळांशी असतं. मुळं मातीला बिलगून असली की, उन्मळायची भीती नसते.   

नितळपण घेऊन वाहणारा परिमल प्रयोजनांच्या पसाऱ्यात हरवतो. तो जपता यावा. त्याकरिता प्रयोजनांची प्राथमिकता समजण्याएवढं जाणतेपण आपल्याकडे असावं. जगण्याचा गंध सापडला आहे, त्याला बहरलेल्या ताटव्याची कसली आलीये नवलाई. आयुष्यात विसावणाऱ्या प्रत्येक पळाला प्रमुदित करता आलं की, परिस्थितीच्या परिभाषा पाकळ्यांसारख्या उलगडत जातात. अमर्याद सुखांच्या कामनेपेक्षा परिमित समाधानासमोर सुखांची सगळीच प्रयोजने दुय्यम ठरतात. सुख अंगणी खेळतं राहावं म्हणून विचारांत समाधान अखंड नांदते असायला लागते. 

अथांगपण अंतरी अधिवास करून असले अन् विचारांत संवेदना वसती करून असल्या की, पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरे सारखी तात्कालिक सुखे केवळ टॅग म्हणून उरतात. त्यांना केवळ दिसणं असतं, पण पाहणं नसतं. दुःखात दडलेलं सौंदर्य पाहण्यासाठी नजरकडे नजाकत असायला लागते अन् वंचनेत सामावलेलं विकलपण समजून घेण्यासाठी विचारांत डूब. चमकत्या सुखांच्या तुकड्यांना लेबले लावून किंमत करता येते. पण विचारात नितळपण अन् कृतीत साधेपण घेऊन धावणाऱ्या आयुष्याचं मोल करणं अवघड असतं. आयुष्याच्या पटावर पसरलेल्या सगळ्याच सोंगट्या काही अनुकूल दान पदरी नाही टाकून जात. कधी कधी फासे उलटे पडतात. होत्याचं नव्हतं होतं क्षणात. नांदत्या चौकटी विसकटणारा हा एक क्षण समजून घेता येतो, त्याला कसली आलीये मोठेपणाची मिरासदारी. त्याचं मोठेपण त्या क्षणांना गोमटे करण्यात असतं. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••