Palak | पालक

By // No comments:
माझ्या शाळेतील एका विद्यार्थ्याच्या पालकाचा फोन आला. म्हणाले, “सर, आमचा चिरंजीव आम्ही सांगितलेलं काहीही ऐकत नाही हो! त्याला जरा तुमच्या पद्धतीने समजावून सांगा ना काही, दहावीचं वर्ष आहे त्याचं, तो असाच वागत राहिला तर कसं होईल त्याचं? आम्हाला तर काहीही सूचत नाहीये, काय करावं म्हणजे याला काही कळेल. आपल्याच तंत्राने वागतो. जरा काही सांगितलं की याचा नन्नाचा पाढा सुरु. बरे, एवढं करून तो थांबेल तर शपथ, मनातला सारा राग आदळ-आपट करून कशावरतरी काढणे नित्याचेच झाले आहे. थोडं कठोर होऊन काही बोललो की, याचं आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करणं सुरु. एकदा तर घर सोडून जायचीच धमकी दिली. आम्ही अवाक होऊन नुसतेच त्याच्याकडे पाहत राहिलो. एक शब्द सुचेना काय बोलावे, आमचं बोलणंच खुंटलं. केवळ हताशपणे त्याच्याकडे पाहण्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाहीत. खूप चिंता वाटते हो त्याची! सर, तुम्हीच काहीतरी करा ना! झाला काही उपयोग तर ठीक, नाहीतर आलिया भोगाशी म्हणत पदरी पडले ते पवित्र करावेच लागेल, जग बाबा तुझ्या मर्जीप्रमाणे!” हे सगळं सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. स्वर चिंता बनून थरथरायला लागले. त्यांच्याशी बोललो थोडं. समजावलं. बघतो काय करायचं ते, म्हणून आश्वस्त केलं. फोन ठेवला.

असे प्रसंग शिक्षकीपेशात काम करणाऱ्यांसाठी नवीन नाहीत. अधून-मधून पालकांकडून आपल्या पाल्यांविषयी अशा तक्रारी होतच असतात. त्यावर यथासंभव, यथासमय मार्ग काढण्याचा, उपाय शोधण्याचा प्रयत्न शिक्षक करीत असतात. तक्रारी नव्या नसल्या तरी परीक्षा- त्यातही दहावी, बारावीतील वर्गाच्या असल्या की, यांचं प्रमाण अधिक होतं. परीक्षा कोणतीही असू द्या; परीक्षा म्हटल्या की, पालक जरा जास्तच जागरूक होतात. त्यातही बोर्डाच्या परीक्षांभोवती एक अनावश्यक वलय समाजात निर्माण झालेलं असल्याने त्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणं, हेच आपल्या मुलाच्या जगण्याचं सार्थक वगैरे असल्याचे वाटायला लागते आणि अपेक्षांचे भले मोठे गाठोडे त्याच्या डोक्यावर चढविले जाते. त्याची आवड-निवड, क्षमता या गोष्टींना पद्धतशीर फाटा दिला जातो. त्यांच्यासमोर प्रेमळ पित्याऐवजी बाप नावाचा ‘रिंगमास्तर’ उभा राहतो. अपेक्षांच्या फटक्यांनी तो परीक्षा नावाच्या पिंजऱ्यात गरगर फिरवत त्यांच्याकडून कसरती करून घेतो. या कसरती कधीकधी क्षमतेच्या पलीकडे होतात आणि परिणाम समोर येतो, बंडखोरी. विरोधाचे सूर तीव्र व्हायला लागतात आणि एक दिवस या जाचक बंधनांना झुगारून देत आपलं स्वत्व शोधण्यासाठी पावले बंडाच्या वाटेने चालती होतात. आपले इगो गोंजारत राहिल्याने नात्यातले रेशीमबंध ताणले जातात. प्रेमाचे पीळ सैलावतात. कधी हे धागे तुटतात.

पालक आणि मुलं यांचं वर्तन कसं असावं, याविषयी मतभिन्नता असू शकते. काही प्रवाद असू शकतात. दोन पिढ्यांमधील विचारांचे अंतर वर्तनात विसंगती निर्माण करते. यालाच कोणी जनरेशन गॅप वगैरे म्हणतात. वागण्याच्या भिन्न पद्धती; स्वतःच ठरवून घेतलेल्या दिशा बदलायला तयार नसतात. आपल्याच विचाराने जगण्याच्या पद्धतींना वास्तव समजलं गेल्याने वैचारिक अंतर वाढतच जाते. दोघेही आपापल्या मतांवर ठाम असल्याचा हा परिपाक असतो. एका बाजूने नियंत्रणाचे ताणलेले दोर, तर दुसरीकडे बंधमुक्त होण्याची स्वाभाविक ओढ. यातून नात्यातील संवाद हरवत जाऊन संशयाचे धुके निर्माण होते. दुरावा वाढत जातो. खटके उडायला लागतात.

पालक, मग तो कोणताही असो; आपल्या अपत्याच्या उज्ज्वल भविष्याबाबत चिंतीत असतो. तेवढ्या प्रमाणात त्याच्या जडण-घडणविषयी चिंतन घडत असते का? मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी जागरूक असू नये, असेही नाही. यासंदर्भात सजग असणे वेगळे आणि संवेदनशील असणे आणखी त्याहून वेगळे. आपल्या अपत्यांना आपली संपदा समजण्याचा प्रमाद पालकांकडून घडतो, तेव्हा समोरील प्रश्नांची उत्तरे अधिक जटील होत असतात. अशावेळी पालकांनी मुलांना थोडं समजून घ्यायला काय हरकत असावी? माणसाच्या जीवनक्रमातील वाढीची किशोरावस्था मुळात वादळी अवस्था. स्वाभाविकच पौगंडावस्थेतील मुलांचं एक वेगळं भावविश्व या अडनिड्या वयात तयार होतं. या वयात देहात एक उर्जस्वल, सळसळते चैतन्य निसर्गतः निर्माण होत असते. या चैतन्याच्या खळाळत्या प्रवाहांना विधायक दिशेने वळते करणे आवश्यक असते. सकारात्मक विचारांचे पाथेय सोबतीला घेऊन वळत्या केलेल्या वाटांनी व्यक्तित्वाचा विकास सहज, सोपा वगैरे होत असतो.

वयाचा हा कालावधी मुलांच्या आयुष्यात आत्मप्रतिमा घडण्याचा, घडविण्याचा काळ असल्याचे मानसशास्त्र सांगते. या वयातील मुलांसमोर कोणतेतरी विधायक उद्दिष्ट असणे आवश्यक आहे. जीवनात जे काही चांगले आहे ते मिळवण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील, याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. म्हणूनच कोणत्यातरी ध्येयप्रेरित विचारांची सोबत करीत त्याच्या मनाला स्वप्नांकित करणे महत्वाचे ठरते. त्याचा जीवनप्रवास निश्चित उद्दिष्टांकडे नेण्यासाठी काही लहानमोठ्या स्वप्नांची पेरणी मनात करावी लागते. ती तेथे जाणीवपूर्वक रुजवावी लागतात. जोपासावी लागतात. जीवनाची अखंड सोबत करणारा यश-अपयश नावाचा खेळ खेळण्यासाठी त्याला तयार करावे लागते. यशापयश जीवनाचा एक पैलू आहे, हे समजून द्यावे लागते.

आयुष्यात सदासर्वदा यशाच्या गंगेचा प्रवाहच वाहत राहील असे नाही, हे समजून सांगताना यशासाठी प्रयत्न करणं आणि ते सहज मिळत नाही, म्हणून निराश न होणं त्याला शिकवावे लागते. ‘यश’ नावाचा शब्द बोलायला, लिहायला बऱ्यापैकी लहान वाटत असला, तरी तो सहज आवाक्यात येणारा नाही. यशाची व्याख्या, परिमाणेही प्रत्येकाची वेगवेगळी असतात. आत्मविश्वास, अभिव्यक्ती, महत्वाकांक्षा, निर्णयक्षमता या साऱ्यांचा उत्कट आविष्कार म्हणजे यशसंपादन असते. सुखाचा शोध घेणं माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. सुखाच्या शोधात विश्वातील सारीच माणसं फिरत असतात. त्यात काही गैरही नाही. पण तरीही एक प्रश्न शिल्लक उरतोच, सुख म्हणजे काय असतं? आपली परिस्थिती कशी आहे यावर सुख अवलंबून नसते, तर परिस्थितीकडे आपण बघतो कसे, यावर असते. नाहीतरी विश्वात अशी कोणती गोष्ट आहे, जी सहज आपल्या हाती लागते?

स्पर्धेच्या वर्तमान जगात सारेच धावाधाव करत असताना आपण पाहतो. याचा अर्थ आपणही तसेच धावत सुटावे, असा नाही आणि स्पर्धेतून दूर राहावे असंही नाही. याकरिता समाजात वर्तत असताना योग्य काय, अयोग्य काय हे कळणे महत्वाचे आहे. पण बऱ्याचदा स्वतःच्या इगोसाठी मुलांना त्यांच्याकडील क्षमता दुर्लक्षित करून आवश्यक-अनावश्यक स्पर्धेत धावण्यासाठी उभे केले जाते. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जातात. दुर्दैवाने त्या पूर्ण करण्यास एखादं मूल असमर्थ ठरलं की मठ्ठ, दगड, भोपळा, बावळट अशी प्रशस्तिपत्रे त्याच्या हाती देण्याचा प्रमाद पालकांकडून वैयक्तिक आकांक्षेतून घडतो. यातून पुढचे प्रॉब्लेम सुरु होतात.

अभ्यासात हुशार असलेल्या शेजारच्या कुणा पिंकी, पिंटूशी तुलना सुरु होते. ‘तो किंवा ती आयआयटीसाठी तयारी करतोय, तुला निदान इंजीनियरिंग तरी जमलंच पाहिजे. नसता आम्हाला शेजाऱ्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. समाज, नातेवाईक काय म्हणतील?’ या आणि अशाप्रकारच्या विचारांची प्रवचने झडत राहतात. ही सक्ती कशासाठी? अवाजवी अपेक्षांपेक्षा पालकांनी आपलं वर्तन थोडं ओलाव्याचं, आपुलकीचं का ठेऊ नये? मुलांना समजूतदारपणाने सजलेल्या विचारांचे मुक्त आकाश देणारे स्वातंत्र्य देण्याएवढी व्यापकता, कल्पकता पालकांच्या विचारांत, वर्तनात असायला हवी. अमृतघट आपल्याच घरी भरलेले असताना इतर ठिकाणी वणवण फिरण्यात कोणते शहाणपण सामावले आहे? बंधनांनाच संस्कार समजून त्यातच बंदिस्त करू पाहणाऱ्या वातावरणात बालपण रम्य वगैरे वाटण्याऐवजी नकोसे वाटत असेल, तर मुलांचे काय चुकले?

आपण काय करू शकतो, याची ओळख मुलांना पालकांनीच करून द्यायला हवी. त्यांच्याकडील अंगभूत क्षमतांना पाहून त्याच्या शैक्षणिक वाटचालीविषयी निर्णय घ्यायला हवा. पोरगं बऱ्यापैकी चुणचुणीत असतं. अभ्यासातही त्याला चांगलीच गती असते. त्याच्या गतीला पाहून पालकांना भविष्यातील त्याच्यासह आपल्याही प्रगतीचे स्वप्ने दिसायला लागतात. मनात घर करून वसतीला असलेला अहं सुखावतो आणि यातून लक्ष्याच्या मागे धावण्याच्या शर्यतीचा खेळ सुरु होतो. पालकांना भविष्यातील आयआयटी, आयआयएम नामक प्रतिष्ठित वाटा डोळ्यासमोर दिसायला लागतात. ह्या आणि अशा अन्य काही सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या वाटांनी चालणेच तुझ्या जीवनाचे प्राप्तव्य आहे, अन्य क्षेत्रात कोणतंही उज्ज्वल भविष्य नाहीच, सारा अंधारच आहे. मळलेल्या वाटांनी चालून सुख कधी चालून तुझ्या दारी येणार नाही. जर ते अपेक्षेप्रमाणे मिळणार नसेल तर तिकडे का जावे, म्हणून त्याच्या माथी हे चुकलेलं तत्वज्ञान हाणले जाते. जगण्याचे हेच सुयोग्य शास्त्र असल्याचे शिकविले जाते.

कोणतीही कारणं न सांगता मुलांच्या डोक्यावर वजनदार आकांक्षांचं गाठोडं दिलं जातं. त्यांची पूर्तता व्हावी म्हणून प्रसंगी आपल्याकडील साऱ्या आर्थिकक्षमता पणाला लावून झापडबंद खेळ खेळला जातो. मुलांनी कितीही सांगितले; तुम्ही सांगत असलेल्या वाटेने चालण्यात मला कोणतेही स्वारस्य नाही, मला कला शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, साहित्याचा अभ्यास करायचा आहे. पण याचा काहीही परिणाम आपण निवडलेला पर्यायच योग्य आहे, असे मानणाऱ्या पालकांच्या मतपरिवर्तनात होत नाही. कोणाला क्रीडांगणावर आपलं जगणं शोधायचं असतं, कोणाला अभिनय करून स्वतःच्या क्षमतांचा शोध घ्यायचा असतो, कोणाला चित्रे काढायची असतात; तरीही काही उपयोग होण्याची शक्यता नसतेच. ‘नाही, तुझं काय ते मला सांगू नकोस, हे भिकेचे डोहाळे कधीपासून लागले तुला? काही अक्कल वापरायला शिक! ते काही नाही, मला वाटते म्हणून हे करायलाच हवे.’ पालकांच्या अशा वागण्यातून मुलांची आवड काय आहे, त्याच्याकडे क्षमता किती आणि कोणत्या आहेत; याकडे सोयिस्कर दुर्लक्ष होते.

खरंतर जन्मलेल्या प्रत्येक जिवाकडे निसर्गाने काही अंगभूत क्षमता दिलेल्या असतात. हत्तीकडे प्रचंड ताकद असते, म्हणून काही त्या ताकदीच्या बळावर तो आपला परिसर उध्वस्त करीत नाही. वाघाला तीक्ष्ण नखे निसर्गाने दिली आहेत, ते काही गवत कापण्यासाठी नाही. मोर दिसतो सुंदर, नाचतोही चांगला; पण त्याच्या पदन्यासाच्या पद्धतीत कोणतेही परिवर्तन हजारो वर्षापासून आजपर्यंत घडले नाही. कावळे, चिमण्यांनी आपल्या घरांचं डिझाईन काही बदलेलं नाही. माणसाने प्रगतीचे नवेनवे आयाम निर्माण केले. त्याच्या घराच्या इंटेरियर पासून ते जीवन जगण्याच्या डिझाईनपर्यंत सारंसारं काही बदलून घेतलं आहे, कारण त्याच्याकडे असणारी बुद्धी आणि त्यातून निर्मित विचारांची शक्ती. आपण जगतो कशासाठी, हा प्रश्न माणसांनाच पडतो. प्राण्यांना अवकाशयाने आकाशात नेण्याची स्वप्ने येत नाहीत. त्यांच्या गरजा शरीरधर्माशी निगडित असतात. माणसांच्या गरजा शरीरधर्माशी जेवढ्या निगडित असतात, त्यापेक्षा मनाशी अधिक संबधित असतात. संवेदनशील मनाला प्रश्न विचारून आपण निवडलेल्या मार्गाचे माणसाने मनःपूर्वक मनन करायला काय हरकत असावी?

माणूस जगतो कशासाठी? सांगणे अवघड आहे. त्याची कारणंही अनेक असू शकतात. प्रत्येकाची वेगळी असतात. कोणाही पालकाला हा प्रश्न विचारून पाहिला, तर त्याचं उत्तर बहुदा पोराबाळासाठी, असं हमखास येतेच येते. मग असे असेल तर निसर्गातील इतर जीवही जगतच असतात की. त्यांचंही वंशसातत्य ते टिकवून ठेवतातच. उन्हाळ्यात पिवळे पडलेले गवतही पावसाच्या पहिल्या शिडकाव्याने हिरवे होते. तेही आपली जीवसाखळी पुढे नेतच असते. मुंगीसारखा छोटासा जीवही वारुळात वाढणाऱ्या पिढीसाठी अन्न साठवतो. मधमाशी कणाकणाने मध जमा करते, ते तिच्या परिवारासाठीच. मग माणसांचं वेगळेपण असे काय? त्याच्या जगण्यात निश्चित असा विचार असतो. कोणतीतरी नवी दिशा असते. पण जीवनातील हे नावीन्य दुर्लक्षित होते, तेव्हा जगण्याच्या दिशाच बदलतात. स्वतःसाठी घर बांधताना सिमेंट, वाळू, विटा कोणत्या वापराव्यात याची काळजी घेतली जाते. अगदी भिंतीना दिल्या जाणाऱ्या रंगांच्या शेड्स कोणत्या असाव्यात याचेही काटेकोरपणे नियोजन केले जाते. एवढं सूक्ष्म नियोजन करणारी माणसे मनालाही त्याचे अंगभूत रंग असतात, त्याच्याही काही शेड्स असतात, हे कसे काय विसरतात?

प्रतिष्ठेच्या प्रतिमा तयार करून त्यांच्या गरजा बनवून घेतल्या जातात, तेव्हा त्याभोवती आवर्तने घडत राहतात. गरजांच्या मूलभूत असण्यावर लक्ष केंद्रित होते; पण मनातील मूलभूत प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात आणि जीवनातील निरामय आनंदाला माणसं पारखी होतात. आरोग्य ठीक राहावे म्हणून कुठलंतरी टॉनिक घेतले जाते. मन ठीक राहावे म्हणून आपुलकीचे, आस्थेचे टॉनिक घ्यायला हवे, ते न घेता तसेच राहते. माणसांच्या मनाचंही आरोग्य असतं, हे लक्षात येतच नाही. मनाला घडवण्यासाठी आणि जीवनाला परिणत करण्यासाठी काही मूल्यांचा अंगिकार करून ती जगण्यात रुजवणे आवश्यक असते. हे रुजणे, वाढणे किती जणांच्या आयुष्यात सातत्याने घडते? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. मूल्यांचा अंगिकार घडणे व्यक्तिसापेक्ष संज्ञा आहे. प्रत्येकाला वाटते, आम्ही समाजाने आखून दिलेल्या चौकटींचे कधी उल्लंघन केलं नाही, आमचं वर्तन नीतिसंमत आहे. याच मार्गाने आम्ही घडलो आहोत. आम्हांला आमच्या पालकांनी त्यांच्या तंत्राने घडविले. प्रसंगी चार धपाटे घातले, म्हणून आम्ही काही त्यांच्या विरोधात बंड केले नाही. सोबत असणारा समाजच मॉरल पोलिसिंग करून आमचं सामाजिक जगणं घडवत होता. तुमच्या मानसशास्त्राला काय सांगायचं ते सांगू द्या, सगळेच प्रश्न काही मानसशास्त्रातील व्याख्यांनी सुटत नाहीत. तेथे अनुभवाचेच शास्त्र असायला लागते. वागलो मुलांशी थोडे कठोर तर बिघडले कुठे?

संस्कार अविरत चालणारी प्रक्रिया आहे. ते कुठून आणि कसे व्हावेत, याचे निश्चित नियम सांगता येत नाहीत. तरीही त्याची सुरवात कुटुंबापासून होते, असे म्हणू या. बऱ्याचदा आपण ऐकतो की, आई हे संस्कारांचं विद्यापीठ आहे, मग याच न्यायाने बापाला या विद्यापीठाचा कुलगुरू का म्हणू नये? घर सांभाळण्याची जबाबदारी आईची असेल, तर येथील गुणवत्तेचे संवर्धन करणारे निर्णय बापानेच घेणे गरजेचे नाही का? पण बहुदा निर्णय घेण्याऐवजी लादलेच जातात. एखादी गोष्ट लादून यशाचा सोपान चढता येत नाही. लादून मिळालेल्या कोणत्याही यशाचा उत्सव साजरा करता येत नाही. समोर मंदिर असेल तर हात सहज जोडले जातात, ते कुठेही नाही जुळत. हात जुळण्यासाठी अंतःकरणात श्रद्धा असायला लागते. संस्कारांचेही असेच काहीसे असते. ते लादून येतील कसे?

परिस्थिती, परिवार, समाज, शिक्षक ही आणखी काही संस्कारांची उगमस्थाने आहेत. येथून आयुष्याच्या उन्नयनाचे काही मार्ग गवसतात. शिक्षित असणं आणि सुसंस्कारित असणं या भिन्न गोष्टी आहेत. संस्कारातून घडून तसंच वागणं व्हावं, यासाठी जीवनाला जाणीवपूर्वक आकार द्यावा लागतो. संस्कारांचे धडे काही आणि वागणे काही असेल, तर जीवनाला घडणे अवघड होत जाते. कोणतीही परिस्थितीशरण अगतिकता व्यक्तित्वाला नव्या उंचीवर नेऊ शकत नाही. याची जाणीव पालक म्हणून असणे अगत्याचे असते. मूल घराचं वैभव असतं; तेवढंच देशाचं, समाजाचंही संचित असतं, हे संचित समाजात जेवढं साकारते त्यापेक्षा अधिक कुटुंबात आकार घेत असते. याकरिता व्यक्तित्वविकसनात बाधा ठरणारा जगण्यातील अनावश्यक भाग काढून टाकावा लागतो. संत्र्याची झाडं लावून सीताफळे येण्याची वाट पाहणे, हा शुद्ध वेडाचार ठरतो. समर्पण, सेवा, संवेदना, साहचर्य, सामंजस्य यासाऱ्या सामुग्रींचं उगमस्थान कुटुंबच असतं, मात्र त्यासाठी तेथे स्वातंत्र्याचा वारा सतत वाहत राहणे गरजेचे असते. इतरांची मने समजून घेणारी संवेदनशील मने येथून घडवावी लागतात.

विद्यमान पिढीच्या जगण्यात कालप्रणित ज्ञानतंत्रज्ञानातून आलेली व्यवधाने वाढत चालली आहेत. व्हर्च्युअल जग त्यांच्या हाती आहे. व्हर्च्युअल जगाशी कनेक्ट होताना अॅक्च्युअल जगाचा विसर या पिढीला पडतोय. आभासात रमणारी ही मने संवेदनशीलता हरवत चालली आहेत. फेसबुकवर कुठल्यातरी फालतू पोस्ट करणाऱ्या आणि त्यांना लाईक करणाऱ्या मुलांच्या संवेदनांचा प्रवास कुठे आणि कोणत्या दिशेला चालला आहे? स्वतःच्या सेल्फी काढून फेसबुकवर टाकून कुणीतरी लाईक करण्याची आणि कुठल्याशा थिल्लर कॉमेंटची वाट पाहणाऱ्यासमोर उत्तुंग आदर्शच नाहीत का?

वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्याची प्रतिज्ञा करणारे शिवबा, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांचे कर्तृत्व माहीत असूनही सोयिस्करपणे विस्मरणात चालले आहे. स्पर्धेच्या आवर्तात धावणाऱ्या पिढीच्या संवेदना बोथट होत आहेत. दुसऱ्याच्या दुःखाने भरून आलेले डोळे म्हणजे संस्कृती, असं म्हणतात. आमचे डोळे संवेदनशीलताच विसरत आहेत. आपल्या संस्कृतीने केलेल्या संस्कारांचे पाझर अवरुद्ध होत आहेत. सेवा, सहकार्य, सहानुभूती, शालीनता, शांती या मूल्यांना दुर्लक्षित करून संकुचित स्वार्थाच्या साध्यासाठी सैरभैर होणारी मुलं संस्कारांनी घडवणं पालकांसमोरील मोठी समस्या आहे. पैसा नावाच्या परिघाभोवती पळापळ करणारे पालक मुलांना आपली संपत्ती समजत असतील आणि त्यांना पॉकेटमनी दिले, म्हणजे सगळी सुखे मिळतात असे वाटत असेल तर, त्या चैतन्यदायी उर्जेच्या सळसळत्या प्रवाहांना स्वतःचे अस्तित्व उरतेच किती?

आपल्या आजूबाजूला अशीही काही माणसं आहेत, ज्यांनी यशाची आपल्यापुरती लहानमोठी व्याख्या करून घेतली आहे. ते मिळवण्यासाठी कस्तुरीमृगासारखे त्यामागे धावत आहेत. मुलांनाही नकळत हाच विकार जडत चालला आहे. गुणपत्रकावरील गुणांचे आकडे म्हणजेच गुणवत्ता आहे, असे समजणारे हे चैतन्य जगण्यातील गुणवत्ता हरवून बसले आहे. एकेका गुणासाठी जीवघेणी स्पर्धा. यासाठी काहीही करण्याची मानसिकता प्रबळ होत जाते. सारे विधिनिषेध पायतळी तुडविले जातात. अपयश पदरी पडणे म्हणजे जीवनाचे वैराण वाळवंट होणे, असे समजून वागणे घडत आहे. दुर्दैवाने अपयश आले की, सुंदर जीवनाच्या सांगतेचे अध्याय; ज्याला जीवन म्हणजे काय, हेच अजून नीट कळले नाही त्यांच्याकडून लेखांकित होत आहेत. बेभान धावण्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आजूबाजूला एक सुंदर जग आहे. त्यात सूर्योदय आहे, सूर्यास्त आहे. कूस बदलणारे ऋतू आहेत. निसर्गाचे निरनिराळे निरामय आविष्कार आहेत, याचेही भान उरलेले नाही. हव्यासापायी कोणत्यातरी बेगडी यशाच्या काटेरी पथावरून धावत आहेत. त्यांच्या अशा धावण्याने पावलाखालची वाटच नाही, तर जगण्याची दिशाही हरवत चालली आहे.

कुटुंब नावाची संस्था विस्कळीत होत आहे. पैसा जगण्याचे साधन न राहता साध्य बनत आहे. बँकमधील अकाऊंटवर शिल्लक वाढताना पाहण्यात आनंद मिळतोय. त्यात आणखी काही अंकांची भर घालण्यासाठी धडपड चालली आहे. कुटुंबाचा कणा प्रेम, सहवास, साहचर्य असते, या गुणांनी विणलेला गोफ सैल होतो आहे. प्रेमापासून वंचित आणि अपेक्षांच्या ओझ्याने दमछाक झालेली मने वैफल्यग्रस्त होत आहेत. क्षणाच्या अविचारातून जीवनाच्या मैफलीचे सूर सुटत चालले आहेत. स्पर्धेच्या वाटेने धावणारे जगण्यातून काय गमावत आहेत, याचीही जाणीव राहिली नाही. हातात स्मार्टफोन आहे. पाठीवरील सॅकमध्ये लॅपटॉप लटकतो आहे. घराच्या भिंतीवरील टीव्हीच्या व्हर्च्युअल जगात आसक्तीच्या रंगांची अखंड उधळण सुरु आहे. भौतिक सुखांची लालसा वाढत आहे. भोगवादाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. या आभासी विश्वाला रमणीय समजून माणसं त्यात वावरत आहेत; पण वास्तवापासून विपरीत दिशेने दूरवर चालली आहेत. हे दुरावलेपण सांधण्यासाठी थ्री जी, फोर जी कनेक्टीव्हिटीपेक्षा आपल्या जगण्यात जाण आणि भान निर्माण करून संवेदनांशी कनेक्ट करणारा विचार आणणे महत्वाचे आहे. कारण एखाद्या गोष्टीबाबत नुसती सहानुभूती असून उपयोगाची नसते, त्यासाठी अनुभूतीही असायला लागते.

Manasa Manasa | माणसा माणसा

By // No comments:
‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ कवयित्री बहिणाबाईनी आपल्या कवितेतून हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. कारण ज्याला हा प्रश्न विचारला त्याला ‘माणूसपण’ म्हणजे काय, हे पूर्णतः कळलेले आहे असे म्हणवत नाही. कळले असते तर माणूसपणाची आठवण करून द्यायची आवश्यकताच राहिली नसती. माणूस दिसतो इतका सहज, साधा, सोपा नसतोच. त्याच्याकडे सामाजिक संस्कारांची श्रीमंती किती, हे समजून घेण्यासाठी कोणत्यातरी निकषांच्या मोजपट्ट्या वापरून तो मोजता येत नाही. समजून घेण्याचा प्रयत्न केला, तरी तो पूर्णतः समजून घेता येईलच असे नाही. माणूस निसर्गाची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे, असे म्हणताना कितीही चांगले वाटत असले, तरी तो तसा असेलच याची खात्री देणे अवघड आहे. म्हणूनच कदाचित माणसाला ओळखताना काहीतरी निसटतेच. त्याला समजून घेताना वर्तनाची संगती नीटशी न लागल्यानेच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, असे म्हणून या प्रश्नाला त्याच्या तदानुषंगिक वर्तनव्यवहारावर सोडून दिले जाते. तसेही माणसे जशी दिसतात तशीच असली पाहिजेत, असेही काही नसते. म्हणूनच तो कसा असेल, हे सांगणे अवघड असते. 

माणूस ओळखण्यात काहीतरी त्रुटी राहतातच. त्या स्वीकारून वर्तनाचे व्यवहार ठरवावे लागतात, करावे लागतात. माणूस कसा असावा, कसा नसावा अशा काही चौकटी तयार करून त्याच्या जगण्याला नियंत्रित करण्याचे प्रयत्न घडत राहिले आहेत. त्यातून माणूसपणाची सर्वमान्य नसेल; पण सुलभ व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला. समाजमान्य विचारांच्या चौकटींत काही माणसे स्वतःला घडवत असतात, काही माणूस म्हणून घडवले जातात. काही चौकटींमध्ये चपखल बसू शकत नाहीत. त्यांचं जगणं त्यांच्यापुरती शोधयात्रा ठरते. विधायक वाटांची निर्मिती करून वर्तणारे समाजात वेगळे ठरतात. मळलेल्या वाटांनी प्रवास नाकारणाऱ्यांना नवी क्षितिजे खुणावत असतात. परंपरांचे बंदिस्त वर्तुळ त्यांच्या विचारांना मान्य नसते. समाजमान्य चौकटींच्या व्याख्येत स्वारस्य नसते, त्यांच्या वर्तनसंगतीवर विशिष्ट मतांचे लेबले लावली जातात. गर्दीत वेगळेपण जपणारे वेडे ठरतात. मी कोण? हा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण होतो त्यांना जगावे कसे, हे प्रश्न सहसा पडत नाहीत. मळलेल्या वाटांनी चालत जाणाऱ्यांना मुक्कामाचे कोणतेही नवे प्रदेश शोधता येत नाहीत. समाजनिर्मित विचारच ग्राह्य आहेत, असे समजून चालणाऱ्यांच्या जगण्यावर समाज आपल्या मान्यतेची मोहोर अंकित करीत असतो. माणसांसाठी समाजच सारं काही असतो, असे मानणाऱ्यांना व्यवस्थाच आपल्या साच्याच्या आकारानुसार घडवीत असते. व्यवस्थेचे घटक होऊन ते जगतात.

समाजनिर्मित विचारांच्या मार्गावरून चालताना मर्यादांचे उल्लंघन माणसांकडून घडू नये म्हणून देव, धर्म, वंश, पंथ अशा चौकटी उभ्या केल्या जातात. मर्यादांचे बांध घालून माणसाच्या जगण्याला संयमित, नियंत्रित केले जाते. चौकटींना स्वेच्छेने स्वीकारणारे जगण्याचे प्रयोजन समाजनिर्मित बंधानांच्या वर्तुळात शोधू लागतात. देव, धर्म त्याच्या जगण्याचे आधार ठरतात. वैयक्तिक समाधान मिळवण्यापुरते हे सीमित असेल तर काही प्रश्न नसतो. पण आधार जेव्हा विशिष्ट अभिनिवेश धारण करून प्रकटतात, तेव्हा प्रश्नांचा गुंता अधिक वाढत जातो. देवधर्मादी गोष्टींना वैयक्तिक मर्यादांची कुंपणे असतील, तर कोणाची काही हरकत असण्याचा प्रश्न नसतो. पण कोणत्यातरी निमित्ताने इतरांवर थोपवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ते माणूसपणाच्या अफाट आभाळाला बाधित करतात. कोणत्यातरी विशिष्ट वर्तुळातील विचार अंगिकरून घडत जाणारी जीवनप्रणालीच वास्तव असल्याचे वाटायला लागते. प्रगतीचे पंख लेऊन विहार करणाऱ्या विचारांना परिस्थितीचा पायबंद घातला जातो. टोकाचा एकेरी विचार आपला वाटायला लागतो. एकांगी विचारांनी वर्तताना पहिला बळी जातो, तो सहिष्णुतेचा.

माणसांच्या शेकडो वर्षाच्या वाटचालीच्या मार्गावरील आश्वस्त करणारा विसावा म्हणजे चिंतनातून, अनुभवाच्या संकलनातून त्याने संपादित केलेले सकारात्मक विचार. असा विचार करणारी माणसं उमेदेपणाने मान्य करतात की, आपल्या मतापेक्षा आणखी काही इतर मते असतात. त्यांनाही काही अर्थ असतो. आपण जसे आहोत तसे इतरही समूह, विचारधारा इहतली आहेत. त्यांचेही काही विचार असू शकतात. जीवनविषयक काही प्रणाल्या असू शकतात. मतप्रवाह असू शकतात. काही जीवनश्रद्धा असतात. हे वेगळेपण मान्य असणाऱ्यांकडून भिन्न विचारधारांच्या एकत्रीकरणातून विधायक प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. या प्रवाहाने नीतिमत्तेच्या तीरांना धरून वाहत राहावे. समाजमान्य नैतिकतेच्या परिभाषेत आपलं अवकाश शोधावं अन् सद्विचारांचा जागर घडत राहावा. समाजाची अशी अपेक्षा असते. विधायक अपेक्षांना केंद्रस्थानी ठेऊन जगणे म्हणजे माणूसपण, असा विचार दृढ होत जातो. विचारांचं व्यापकपण सोबत घेऊन जगणारी माणसं ‘खरं ते माझं’ म्हणत घडत असतात, वाढत असतात. त्यांच्या असण्याने जगण्याला अक्षय आशय प्राप्त होतो. व्यापकपणाचे लेणे घेऊन येणाऱ्या विचारांना वैयक्तिक स्वार्थातून संकुचितपणाचे कुंपण घातले जाते, तेव्हा ‘माझं तेच खरं’ असे म्हणणारा विचार रुजत जातो, वाढत जातो. इहतली प्रेमाचे परगणे बहरत जाण्याऐवजी विद्वेषाचे वणवेच वाढत जातात.

‘कळते पण वळत नाही’, ही केवळ भाषिक प्रवाहाला समृद्ध करणारी अक्षररचना राहायला नको. जसे कळते, तसेच वळण जगण्याला दिल्यास परिसरात प्रसन्नतेचा परिमल निर्माण होतो. स्वार्थाची आरती करणाऱ्या जगात सहजपणाचा गंध हरवतो. जे आपल्याकडचे नाहीत, आपल्या मतांशी सहमत नाहीत, ते कुठेच असण्याच्या पात्रतेचे नाहीत, असा विचार प्रबळ होत जाणे मूल्यप्रेरित विचारांवरचा आघात असतो. विरोधाला विचारांनी नाही, तर शस्त्रांची संपवण्याची मानसिकता दृढ होत आहे. जीवनाच्या आकाशात अविचारांचे मळभ दाटत आहे. कोणतातरी विशिष्ट देव, धर्म, वंश हाच जगण्याचा सम्यक मार्ग आहे, अन्य मार्गांनी वर्तणे, ते विचार आचरणात आणणे अयोग्यच, असा संकुचित विचार वाढतो आहे. विद्वेषाचे वणवे निर्माण करणारे हात पुढे येत आहेत. आपली विचारधारा हीच जगण्याची सर्वश्रेष्ठ प्रणाली आहे, असे वाटू लागल्यावर इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होणे अटळ ठरते. संकुचित विचार नाकरणाऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी निसंकोचपणे शस्त्रे हाती धरली जातात. माणसं किड्यामुंग्यांसारखी संपवली जातात.

आपल्या विचारांनाच श्रद्धा समजणारी माणसं विवेक हरवून बसतात. त्याच्या दृष्टीने आपणच खरे आहोत आणि आपली विचारप्रणालीच वास्तव जीवनपद्धती आहे. आपली जीवनपद्धतीच श्रेष्ठ आहे असे वाटायला लागल्यावर वर्तनात विसंगत उन्माद वाढत जातो. उन्मादी हात माणसांचेच असले, तरी ते आपल्या विचारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याना संपवण्यासाठीच असतात, असे वाटायला लागते. पाशवी हात पेशावरच्या शाळेतच उगारले जातात असे नाही, तर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य धारण करून जीवनपद्धतीतील विसंगतीवर भाष्य करू पाहणाऱ्या, जगण्यातील व्यंग चित्रित करणाऱ्या जीवनचरित्रांनाही रक्तरंजित करीत असतात. शिक्षणाच्या वाटेने शतका-शतकांचा वैचारिक अंधार दूर करू पाहणाऱ्या मानिनीचा देह संपवण्यासाठी हाती शस्त्र धारण करून उभे राहतात. कोणत्यातरी रस्त्यावर बॉम्ब बनून निरपराध्यांच्या जीवनाचा संहार घडवीत असतात. अविवेकी विचारांना देशकालपरिस्थितीच्या कोणत्याही सीमा अवरुद्ध नाही करू शकत. अविचारांने वर्तणारे कोणत्याही देशप्रदेशांच्या सीमांवर सहज दिसतील. त्याकरिता एखाद्या विशिष्ट परगण्यात जाऊन शोधण्याची आवश्यकता नाही.

विज्ञानतंत्रज्ञानाने मंडित जगाचा प्रवास कसा असावा? या प्रश्नाचे उत्तर माणसांना एव्हाना मिळायला हवे होते. पण विज्ञानतंत्रज्ञानाचा जीवनातील वापरच हल्ली प्रश्नांकित होत चालला आहे. विज्ञानांतून माणसाच्या जगात भौतिक सुखांची निर्मिती करू पाहणारे आहेत. तसे विनाशाचे वणवे निर्माण करणारे अविचारीसुद्धा आहेत. ‘माणसाचे हात उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नसतात.’ हा विचार पुस्तकांत बंदिस्त होत चालला आहे. माणसाने सन्मानाने जगावे. इतरांनाही तसेच जगू द्यावे, हा विचार मूल्यांच्या पाठापुरता सीमित राहिला आहे. अन्याय, अत्याचार, उपेक्षा वाईट असतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अन्याय घडू नये. कुठे घडत असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी अविचारांचा संग स्वीकारणे योग्य आहे का? आपण जे करतोय, ते योग्य आहे का? हा प्रश्न अशा विचारांनी वर्तणाऱ्याच्या मनात उदित होत नसेल का? मान्य करू या, तुमच्यावर व्यवस्थेकडून अन्याय घडला असेल. त्याच्या निराकरणासाठी आहेत ना अन्य न्यायसंमत मार्ग. त्या मार्गाने तो मिळवून पहा. कदाचित त्यासाठी उशीर होईल, पण फलित चिरंतन असेल. अन्यायाला वाचा फोडण्याचा मार्ग निरपराध्यांच्या जगात त्याहून भीषण अन्याय घडवून आणणे, असा असू शकत नाही.

जगाच्या इतिहासाची पानं उलटून पाहिली तर रक्ताळलेल्या पावलांचे अनेक ठसे आजही दिसतील. स्वयंघोषित अस्मितांच्या संवर्धनाच्या निमित्ताने त्या-त्यावेळी संघर्ष घडले. अशा संघर्षातून रक्तलांछित अध्याय लेखांकित होताना कोणत्या तत्वांची निर्मिती घडत होती? जगण्याचे कोणते तत्वज्ञान मांडले जात होते? याचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. वैयक्तिक स्वार्थ, टोकाच्या महत्त्वाकांक्षांनी घडलेल्या संघर्षातून जगातील लाखो निरपराध्यांच्या जीवनाचा अध्याय संपवला. जगात झालेल्या महायुद्धांनी जेवढी जीवित, वित्तहानी घडली नसेल, तेवढी देवधर्मवंशाच्या नावाने घडल्याचे इतिहासाच्या परिशीलनातून दिसेल. विश्वातील कोणताही धर्म, त्याचं तत्वज्ञान हिंसेचे समर्थन कधीच करीत नाही. अवघं विश्व एकाच चैतन्याचा आविष्कार असल्याचे मानले जाते. तरीही माणसे असं का वर्ततात? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड होत आहे. माणुसकीधर्मच महान असल्याचे दाखले जागोजागी उपलब्ध असूनही, संकुचित मनाची मूठभर स्वार्थांध माणसे हा कोणता खेळ खेळत आहेत? त्यांना कोणत्या तत्वांची प्रतिष्ठापना करायची आहे? देवधर्म ही आचरणाची, मानण्याची पद्धत असेल, तर ती जितकी सार्वत्रिक आहे, तितकीच वैयक्तिकही. स्वार्थाच्या परिघात वर्तणाऱ्यांकडून आपण अंगिकारलेल्या विचारांनाच तत्वांचे अधिष्ठान समजण्याचा प्रमाद घडतो आहे. देवधर्म जगण्यासाठी आवश्यक आहेत की नाही, हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा, निवडीचा भाग झाला. मतभिन्नतेचा विषय असू शकतो. जगण्यासाठी तो आवश्यक आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्याचं त्यानेच शोधायला हवे. ज्याची जशी श्रद्धा, तसे त्याचे वर्तन असावे. इतरांनीही त्याच मार्गाचे अनुसरण करावे. तसेच त्याचे वागणेही घडावे, अशी अपेक्षा करण्यात माणूसपणाचे कोणते शहाणपण सामावले आहे?

माणूस देवधर्माशिवाय एकवेळ जगू शकेल, पण त्याच्या जगण्याचा धर्म शांततेशिवाय अर्थहीन असेल. अशा जगण्याला काही अर्थ असेल का? देवधर्म शब्दांचा आहे त्याशिवाय संयम, सौहार्द, सहिष्णूता, सहजीवन, सहअस्तित्व असा एक व्यापक अर्थ असायला काय हरकत असावी? काहीच नाही; पण देशप्रदेशाचे स्वार्थ साधताना आपापली पोळी भाजणाऱ्यांना हे समजून सांगणे अवघड आहे. माणसांच्या जगण्याचे प्रश्न काय कमी आहेत. त्यावर अद्याप सर्वसमावेशक उत्तर माणूस शोधू शकला नाही. तर देवधर्म नावाची व्याप्ती तपासताना कोणती उत्तरे त्याला मिळणार आहेत. जगण्याच्या अनेक प्रश्नांची वादळे समोर असताना एकांगी विचाराना प्रतिष्ठा प्राप्त होणे हा दुर्दैविलास आहे.

जगात अशी लाखो माणसे आहेत, ज्यांना जगण्यासाठी हातावर पोट घेऊन आला दिवस कसातरी ढकलावा लागतो. धड दोन घासही त्याच्या मुखी सन्मानाने आमची व्यवस्था देऊ शकत नसेल, तर माणूसपणाचे मखर तयार करून का मिरवून घ्यावे? विज्ञाननिर्मित समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरण्याऐवजी अज्ञानाचा अंधार अधिक गडद होत आहे. अंधश्रद्धा आहेत, अनारोग्य आहे. अनेक प्रकारच्या विसंगती जगण्यात आहेत. ही दूरिते माणसाला का दिसत नाहीत? की दिसूनही सोयिस्कर दुर्लक्ष करायची सवय करून घेतली आहे. समाजातील मूठभर माणसांच्या जीवनशैलीतील घडलेला बदल, म्हणजे समृद्धी नाही. संपन्नतेचे पथ सर्वत्र निर्माण होणे आवश्यक आहे. जगातील दुःख, दैन्य, दास्य संपवणे ही मोठी समस्या समोर असताना त्याकडे दुर्लक्ष होणं, हा काही विज्ञानविचारांनी निर्मित जगाचा चेहरा नाही.

माणूस नावाचा प्रवास संकुचिततेकडून सर्वंकषतेकडे घडणे आवश्यक असते. पर्याप्त समाधान प्राप्तीसाठी विश्वातील सारीच माणसं धडपड करीत असतात. वाटचालीचा प्रवास अधिक व्यापक उद्दिष्टांकडे असावा लागतो. कोणतीही एककेंद्री व्यवस्था जगण्याचे विस्तीर्ण आभाळ माणसाला देऊ शकत नाही. म्हणूनच राजेशाही, हुकूमशाही विचारांकडून लोकशाही विचारांकडे वाहणारा प्रवाह माणसांना अपेक्षित असतो. ‘बहुजन हिताय’ विचारांच्या दिशेने जाणारा मार्गच जीवनाचे शाश्वत दर्शन आहे. विषम विचारांनी वर्तणारे जग जीवनयात्रेतील आनंद नसतो. जगाची सार्वकालिक आवश्यकता शाश्वत शांतता हीच आहे. माणसाने माणसाला माणसासारखे वागवणे, हा सहअस्तित्वावर श्रद्धा असणाऱ्या जगाचा क्रमविकासातील कल्याणाचा मार्ग आहे.

दहशतवाद, आतंकवाद, युद्धे ही काही माणसाची गरज नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ विचारांनी वागणे घडत राहणे आवश्यक आहे. विचार कोणताही असो, तो एकांगी असून चालत नाही. टोकाच्या विचारातून विधायक परिवर्तन घडून येण्याची शक्यता कमीच असते. विचारांना धार जरूर असावी, त्यांची तलवार होऊ नये. टोकाच्या विचारांनी जगाचे कल्याण घडले आहे, असे कधीच ऐकिवात नाही. अशा विचारांनी वर्तणारी माणसं आश्वस्त करणारं कोणतंही नवं जग निर्माण करू शकत नाहीत. समजा त्यांच्या मनासारख्या जगाचं चित्र त्यांनी तयार केलं, तरी त्यात असणाऱ्या आकृत्यांना कोणत्या रंगांनी रंगवणार आहेत? माणूस नावाचं चित्र नितळ रंगांनीच रंगवावं लागतं. हे रंग स्नेह, सौहार्द, समर्पण, सहअस्तित्वाचे असायला लागतात. या रंगाशिवाय तयार केलेले चित्र कितीही देखणे वगैरे असले, तरी त्याला जिवंतपणाचा स्पर्श नसतो. ज्यात चैतन्य नाही, त्या जगाचे स्वामित्व संपादन करून कोणी महान वगैरे झाल्याचा इतिहासात कोणताही दाखला असल्याचे पुरावे नाहीत. विचारांचा जिवंतपणा संपला, की माणसांच्या जगण्यातील चैतन्य हरवते. चैतन्य हरवलेल्या जगात माणसांचं जगणं घडतं का? या प्रश्नाचे उत्तर ज्याने-त्यानेच शोधलेले बरे, नाही का?

Beasar? | बेअसर?

By // No comments:
‘अॅन्युअल स्टेटस् ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ अर्थात ‘असर’, हा ‘प्रथम’ या संस्थेचा राज्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीविषयी भाष्य करणारा अहवाल १३ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित झाला. प्रकाशनानंतर प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी अहवालातून हाती आलेल्या काही निष्कर्षाना समोर ठेवत विचारमंथन घडले. यानिमित्ताने शिक्षणव्यवस्थेविषयी चर्चा, वाद, प्रतिवाद, खंडन, मंडन घडत राहिले. घडणाऱ्या चर्चांमधून अहवाल लोकमनावर असर करीत राहिला. अहवालाचे विमोचन झाल्यावर राज्याची शिक्षणपद्धती, शिक्षणातील गती आणि प्रगतीबाबत चिंता अन् चिंतन घडत राहिले. इलेक्ट्रॉनिक मीडियातून घडणाऱ्या चर्चा याची देही याची डोळा दिसल्या. प्रिंट मीडियातून तज्ज्ञांची मते अक्षरांची सोबत करीत मुद्रित झाले. पालकांनी आपापसातल्या चर्चेतून आपल्या मनातील शिक्षणविषयक अनुकूल-प्रतिकूल मतांना वाट मोकळी करून दिली. मतमतांतरांचा धुराळा उडत राहिला. या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे, आपल्या महाराष्ट्र देशी शिक्षणगंगेचा प्रवाह अवरुद्ध होत चालला आहे. शिक्षण सोपे झाले, त्यातून माहितीचे साठे वाढत चालले आहेत; पण शिकणे मात्र हरवत आहे. असं हरवलेपण सोबतीला घेऊन विश्वातील कोणत्याही राष्ट्राचा सर्वंकष विकासाचा आलेख वर्धिष्णू राहूच शकत नाही. ज्या देशाला महासत्ता होण्याची स्वप्ने येत आहेत, त्या देशाच्या शिक्षणातील संपन्नतेची स्वप्ने भंग होण्याचीच ही लक्षणे आहेत. असेच घडणार असेल, तर महासत्ता होणं आपल्यासाठी खूपच पुढचं पाऊल झाले.

असरचा अहवाल काही पहिल्यांदाच येतोय असे नाही. गेल्या नऊ-दहा वर्षापासून कार्यरत असणारी ही संस्था आपल्या शिक्षणव्यवस्थेविषयी सर्वेक्षण करून, काही निरीक्षणे नोंदवून हाती आलेले निष्कर्ष मांडीत असते. याआधीही मांडले, तसे आताही. त्यातल्या काही अंकांची इकडे-तिकडे झालेली थोडीशी स्थलांतरे वगळली, तर आकड्यांचा खेळ तोच आणि तसाच पुन्हा एकदा. पाचवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे वाचनदेखील करता येत नाही. आठवीत शिकणाऱ्यांना धड भागाकार येत नाही. त्यांचे प्रमाण ६७.१ टक्के एवढे आहे. ७७.२ टक्के विद्यार्थी इंग्रजीचे साधे-साधे शब्द वाचताना अडतात. दिलेले शब्द ज्यांना वाचता आले, त्यांना पूर्ण वाक्य काही वाचताच आले नाहीत. हे आणि असे बरेच काही. आपल्या शिक्षणाच्या प्रगतीविषयीचे असे चित्र अहवालाने दाखविल्यावर बघणाऱ्यांच्या मनात प्रश्नांची चिन्हे मोठ्या अक्षरात उमटायला लागली. हे जे काही निष्कर्ष हाती येत आहेत, ते निष्कर्ष म्हणजे विज्ञानतंत्रज्ञानाने मंडित जगात सक्षमपणे वावरता येण्याचे लक्षण नाही. प्रगतीचे नवे आयाम धारण करणाऱ्या जगात टिकण्याची ही लक्षणे नव्हेत, हे असेच चालणार असेल, तर आपले शिक्षण पुढच्या पिढ्यांना अंधारवाटेने नेऊन ठेवणार आहे. म्हणूनच या व्यवस्थेत काम करणाऱ्या संबंधिताना प्रगती-अधोगतीबाबत प्रश्न विचारायलाच हवेत. जे कोणी या व्यवस्थेचे घटक असतील त्यांना आपापल्या जबाबदारीतून असे कसे मुक्त होऊन पलायनवाद स्वीकारता येईल, वगैरे वगैरे. मनातले प्रश्न अनेक आवाज सोबत घेऊन प्रकटले.

शिक्षणक्षेत्रात बऱ्यापैकी बेदिली वाढत चालली आहे, अशा मताप्रत काही पोहचले. यासाठी जबाबदार कोण? कोणीतरी असेलच ना, म्हणून शासन, शिक्षण संस्था, शिक्षण, शाळा, शिक्षक, पालक अशा एक ना अनेक विकल्पात अनेकांना अनेक मते प्रदर्शित करायला यानिमित्ताने संधी प्राप्त झाली. प्रत्येकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ शोधीत आपल्या पद्धतीने मते व्यक्त केली. हे करताना आपल्याकडे असणाऱ्या अनुभवांना जमेस धरून एखाद्या घटकाकडे उत्तरदायित्व द्यावे म्हणून त्याकडे अंगुलीनिर्देश केला. कोणी शाळा, कोणी शिक्षक, कोणी शासन, तर कोणी शिक्षणपद्धतीलाच जबाबदार धरून त्यातील उणीवा दाखवायला आरंभ केला. याचा अर्थ मतप्रदर्शित करणाऱ्यांनी तसे करू नये, असे समजण्याचे काही कारण नाही. एखाद्या विचाराला आणखीही दुसरी एक बाजू असू शकते, याचाही विचार होणे अपेक्षित आहे. प्रसारमाध्यमे अतिवेगवान झालेली असल्याकारणाने अशा गोष्टी समाजाला जरा लवकर कळतात. त्यावरील चर्चाही वेगात घडतात. अशा चर्चेतून अधिकचे बोलणेही ओघाने आलेच. माणसं आता बोलायला लागली आहेत. आपली मते मांडू लागली आहेत, हे चांगलेच. व्यवस्थेतील न्यून अधोरेखित केल्याशिवाय वर्तनातील विसंगती दूर करता येत नाही. पण तरीही या साऱ्या गदारोळात एक विचार मनात येतोच, त्याची संगती लावायची कशी? या साऱ्याचे खापर कोणावर तरी फुटणार हे नक्की, मग ते नेमके कोणाच्या माथ्यावर फोडायचे?

हे विचारांचं मोहळ समोर उभे राहिल्यावर एखाद्या वस्तुस्थितीसंदर्भात तात्काळ कोणतातरी निष्कर्ष काढून मोकळे होणे तितकेसे संयुक्तिक नाही. शिक्षणव्यवस्थेतील गुणवत्तेविषयी प्रश्न असतील, तर या प्रश्नांची उत्तरे शोधताना इतर बाजूंना तपासून पाहणेही आवश्यक ठरते. शाळांमध्ये शिकणारे एवढे सगळे विद्यार्थी शिक्षणातील आवश्यक कौशल्ये संपादित करण्यास अपात्र असतील, तर मग हेच विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात, तेव्हा बोर्डाच्या परीक्षेतील उत्तीर्णांच्या निकालाचे एकूण आकडे सत्तर-ऐंशी टक्क्यांपर्यंत कसे काय असतात? आठवीपर्यंत काहीही न येणाऱ्या चाळीस-पंचेचाळीस टक्के विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण असे अचानक सत्तर-ऐंशी टक्के कसे काय होत असते? काहीही न येणारे हेच विद्यार्थी नववीनंतर अशी कोणती प्रगती करतात की, ज्यांचा परीक्षेचा निकाल समाधानकारक या संज्ञेस पात्र ठरतो. या वर्गात येऊन त्यांच्यातले शहाणपण अनपेक्षितपणे कसे काय जागे होते? अर्थात याबाबत म्हणणारे म्हणतील अहो, त्याचं काय सांगतात, ही आपल्या परीक्षापद्धतीची कमाल आहे ना! अंतर्गत गुणांचे भरघोस दान पदरी ओतल्यानंतर आणखी काय घडणार आहे, अशा सत्पात्री दानामुळे त्यांचे गुण वाढले. पण शैक्षणिक गुणवत्तेचं खोबरं होतंय, त्याचं काय? हे म्हणणे एका सीमित अर्थाने मान्य केले, तरी त्यानी असा कितीसा फरक उत्तीर्ण होणाऱ्यांच्या टक्केवारीत पडणार आहे, हेही वास्तव तपासून पाहायला काय हरकत असावी? अगदी सररास नकारात्मक विचारांची मोहर एखाद्या गोष्टीवर अंकित करायची का?

अहवालातील निष्कर्ष एकजात सगळेच्या सगळे वास्तवाचा ठाव घेणारे आहेत आणि हे जे शिक्षणाविषयक चित्र समोर आले आहे, ते आणि तेच प्रमाण आहे, असे म्हणणे कितीसे योग्य आहे? समजा तसे असेल तर काही प्रश्न यासंदर्भात समोर उभे राहतात. एखाद्या गोष्टीबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कुठल्याही संशोधनाविषयी तर ते जास्तच आवश्यक असते. व्यवस्थेचा तो एक भाग झाला. असरच्या अहवालाबाबत कोण्या एका शिक्षकाने त्याच्या मनात आलेल्या प्रश्नाविषयी लिहिले ते म्हणतात, ‘अहवालाची सर्वेक्षणपद्धत कशी होती? सर्वेक्षण करणारे कोण होते? सर्वेक्षण कोणत्या आणि किती शाळांमध्ये करण्यात आले? निष्कर्षांची विश्वासाहर्ता प्रमाण मानावी कशी?’ असे बरेच काही. अर्थात हे प्रश्न काही त्यांच्याच मनात आले असतील असे नाही. आणखीही काही अशी माणसं असतील, ज्यांच्या मनात असेच किंवा यातील काही प्रश्न यानिमित्ताने मनात उदित झाले असतील.

असे असेल तर या पद्धतीतून हाती येणाऱ्या निष्कर्षाना पूर्णपणे प्रमाण मानणे जरा घाईचे होत नाही का? सर्वेक्षणपद्धत खूप चांगली वगैरे असल्याचे आपण मानतो, हे मान्य. पण हे सर्वेक्षण एकूण संख्येच्या किमान दहा टक्के संख्येपर्यंत होणे असावे, असे शिक्षणशास्त्र शिकवतांना सांगतात. निर्धारित संख्येच्या सर्वेक्षणामुळे हाती येणारे निष्कर्ष अधिकार वाणीने मांडता येऊ शकतात, म्हणून असेल कदाचित हे म्हणणं. अर्थात सर्वेक्षण घटकाची संख्या किती असावी, हा संबंधितांचा अनुभवाचा भाग झाला. महाराष्ट्रात पहिली ते आठवीच्या सुमारे एक लाख सहा हजार शाळा आहेत. यातील किती शाळा सर्वेक्षणासाठी या संस्थेने निवडल्या तर हजारभरसुद्धा नाहीत. त्यांनी निवडलेल्या शाळा, नमुना निवड आणि सर्वेक्षणाची त्यांची पद्धत वगैरे शास्त्रोक्त आहे, हे तात्त्विकदृष्ट्या मान्य करू या; पण हे मान्य करूनही या निष्कर्षाना सर्वसमावेशक म्हणणे थोडे धाडसाचे ठरत नाही का? ‘शितावरून भाताची परीक्षा’, ही म्हण भाषिक व्यवहारात बरी वाटत असली, तरी अशा ठिकाणी तिचा हाच अर्थ घेणे संयुक्तिक आहे, हे म्हणणे अतीच वाटते. एखाद्या समस्येसंदर्भात व्यापक सर्वेक्षण होणार असल्यास प्रमाणबद्धता येते, पण अफाट सागराच्या पाण्यातून ओंजळभर पाणी उचलून समुद्र माझ्या हातात सामावण्याएवढा आहे म्हणणे, हा विचार तर्कसंगत ठरतो का?

कोणाला तरी दोष द्यायचाच म्हणून काहींनी व्यवस्थेला, शिक्षणपद्धतीला, शासनाला जबाबदार धरले, तसे काहींनी शिक्षक नावाच्या घटकाला केंद्रस्थानी ठेऊन मते मांडली. या सगळ्या अधःपतनास केवळ तोच कारण असल्याचे आपले मत बिनधास्त मांडून ते मोकळे झाले. क्षणभर यांच्या समाधानासाठी हेही मान्य करूयात. याचा अर्थ सगळेच शिक्षक बेजबाबदार असतात का? चारदोन असे वर्तणारे असतीलही कुणी कोठे; पण बहुसंख्य शिक्षक आपल्या पेशाशी प्रामाणिक आहेत, हे सत्य नाकारून पुढे जाता येणार नाही. शिक्षक पिढी घडवितो, पिढी बिघडवण्याचे काम नाही करत. यातले चारदोन कोणत्यातरी व्यवस्थेच्या दावणीला बांधले गेले असतील. काहींनी आपल्या अस्मिता कुणाच्या चरणी समर्पित केल्या असतील, म्हणून सगळ्यांनीच आपल्या अस्मितांचे विसर्जन केले आहे असे नाही. या अपवादांना वगळून व्यवस्थेकडे पाहिले, तर शिक्षणक्षेत्रात दिसणारे चित्र आपण समजतो इतके नकारात्मक कधी नव्हते आणि आजही नाही.

चांगुलपण समाजातून अजूनही संपलेले नाही. शिक्षकही याच समाजव्यवस्थेचा घटक आहे. खरंतर आज व्यवस्थेत शिक्षकाची आणि कामगाराची स्थिती फार वेगळी आहे, असे म्हणवत नाही. गुरांच्या गणतीपासून ते माणसांच्या शिरगणतीपर्यंत पारदर्शी काम करणारा हक्काचा माणूस म्हणजे मास्तर. व्यवस्थेने कुठेही जुंपले तरी याला कोणाचे मन नाही मोडवत. नेमून दिलेली कामं तो प्रामाणिकपणे पार पाडणारच. आम्हांला शाळेत राहून शिकवू द्या म्हणणारा शिक्षक वेगवेगळी शिक्षण-प्रशिक्षणे करीत राहतो. व्यवस्थेने नेमून दिलेली तदनुषंगिक कामे मुकाटपणे करीत असतो. ही सगळी कामे निर्धारित वेळेत पार पाडण्याच्या निमित्ताने भटकत राहतो. तो असे भटक्यांचे जीवन जगत असेल, तर त्याने शाळेत उपस्थित रहावे कसे आणि विद्यार्थ्यांना शिकवावे केव्हा? पोषण आहाराच्या खिचडीपासून बांधकामापर्यंत, गणवेशाच्या कपड्यांपासून गुणवत्तासंवर्धनाच्या उपक्रमांपर्यंत, हा जीव वेगवेगळे पाणवठे शोधत असेल तर त्याच्याकडून शैक्षणिक गुणवत्तेच्या कोणत्या अपेक्षा समाजाचा घटक म्हणून आपण करणार आहेत?

गुणवत्तेच्याबाबतीत सरकारी शाळा आणि खाजगी शाळा अशी तुलना नेहमीच होतच असते. सरकारी शाळा ह्या सरकारीच असतात, अशी वाक्ये अनेकदा आपण ऐकतो. या शाळांच्या प्रगतीची मोजणीही विशिष्ट विचारांच्या कोनात पाहूनच होत असते. त्यांना असे मोजणे ही नकारात्मक विचारांची एक बाजू झाली. अद्यापही आपल्या शाळा सर्वसुविधायुक्त होत नसतील, आधुनिक काळाने निर्माण केलेलं देखणेपण त्यांच्या चेहऱ्यावर आलेले नसेल, तर तो दोष कुणाचा? पण याच शाळांतील अशाही काही शाळा आहेत, ज्या सरकारी असूनही आय. एस. ओ. मानांकन मिळवत आहेत. हा सकारात्मक पैलू आमच्या व्यवस्थेला दिसू नये का? खाजगी शाळांचे प्रमाण अठरा टक्क्यावरून एकतीस टक्क्यापर्यंत गेल्याचे म्हणतात. याचा अर्थ यातील सगळ्याच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे नक्की, असा होतो का? याची काही गॅरंटी असते का?

खाजगी संस्थांची संस्थाने होत असतील आणि तेथले अध्वर्यू संस्थानिकांच्या इतमामात वर्तत असतील, तर दिसणारा परिणाम कोणत्या दिशेने जाणार आहे, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. शासनाच्या विनाअनुदानित धोरणाने शिक्षणसम्राटांच्या संख्येत वाढ होत आहे. या संस्थानांमध्ये सेवेत असणारा सेवकवर्गही शेवटी व्यवस्थेचीच निर्मिती आहे. डी. एड., बी. एड.ची वाढलेली कुरणे भविष्यातील कोणत्या दर्ज्याचे शिक्षक निर्माण करतात, यावर थोडे लक्ष असायला नको का? येथील दर्जेदार (?) शिक्षण संपादित करून व्यवस्थेत शिरण्यासाठी लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन तो रांगेत उभा असेल आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या दर्ज्यापेक्षा वजनाला अधिक महत्त्व येणार असेल, तर कोणत्या गुणवत्तेची अपेक्षा आपण करणार आहोत?

शिक्षणातून शासन निवृत्तिपंथे जाऊ इच्छित आहे, असे मत असणाऱ्यांची संख्या हल्ली वाढत आहे. गुणवत्तेच्या नावाने नवनवे सकारात्मक प्रयोग शिक्षणात होणार असतील, तर कोणाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. शिक्षणविषयक धोरणात्मक निर्णय घेताना शासन कोणत्या तत्वांना अवलंबत आहे, यासाठी समाज निश्चितपणे शासनाला जबाबदार धरेल, हे सांगायला नकोच. शिक्षणाला कोणत्या विशिष्ट विचारांच्या रंगांनी मंडित नाही करता येत. शिक्षण शिक्षणच राहू द्यावे लागते. म्हणून त्याला त्याचे स्वातंत्र्य द्या, असे म्हणणारेही समाजात अनेक आहेत. शैक्षणिक मूल्यमापन करण्यासाठी कधीकाळी वर्षातून चारचार परीक्षा घेतल्या जायच्या. कधी परीक्षाच घ्यायच्या नाही. आता पुन्हा परीक्षा घ्याव्यात का? म्हणून वातावरण निर्मिती, ही धोरणात्मकता नेमक्या कोणत्या दिशने चालली आहे, हे समजणे अवघड आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेचा प्रवास नेमका कोठे चालला आहे, कसा चालला आहे यासारखे प्रश्न साहजिकच लोकांच्या मनात उभे राहणारच आहेत. शिक्षणाची वाटचाल प्रसंगानुरूप इकडे-तिकडे घडत असेल तर ‘शिंगरू मेलं हेलपाट्यानं’ असंच काहीसं आपल्या शिक्षणाचं होतंय का?

मूल्यमापन सर्वंकष असलं काय आणि सातत्यपूर्ण असलं काय, त्याला स्थिर व्हायला निदान काही अवधी तर मिळायला हवा. शिकणारे आणि शिकवणाऱ्याचेही काही प्रमाण असावे. शाळेत केवळ भौतिकसुविधा उपलब्ध करून दिल्यात म्हणून काही गुणवत्तेचे संवर्धन होत नाही, यासाठी शासनाची धोरणेही गुणवत्ता धारण करून व्यवस्थेला गुणवान करणारी असायला हवीत. केवळ पुस्तके आणि पुस्तकातील धडे बदलून गुणवत्तेत कायापालट घडून येत नसतो. सत्रांत परीक्षा येईपर्यंत मुलांच्या हाती पुस्तके येत नसल्याच्या वार्ता अधूनमधून आपण ऐकत असतो. याचा गुणवत्तेशी काहीच संबंध नसेल का? बरे ही पुस्तके शिक्षकांच्या हाती पडल्यावर किती शिक्षकांना यातील सगळेच धडे मनापासून आवडतात? हे सांगणे अवघड आहे. शिक्षकालाच ते आवडत नसतील, तर कोणत्या वैचारिक प्रगल्भतेने विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे शिकवणार आहेत. याचा अर्थ सगळंच पुस्तक वाईट असतं, असं म्हणायचं नाही. पण त्यातील काही धडे शिकवतांना कुणीतरी हा धडा शिकवण्याची शिक्षा आपल्याला दिल्याचा भास उगीच अंतर्यामी उदित होतो. शिक्षकांबाबत असं घडणार असेल, तर मुलांविषयी बोलायलाच नको.

आपल्या बऱ्याच शाळांमध्ये अजूनही पिण्याचे पुरेसे आणि स्वच्छ पाणीही मिळत नसेल, प्रसाधनगृहाची आवश्यक सुविधाही नसेल, धड वर्गखोल्या नसतील तेथे विद्यार्थ्यांनी टिकायचे कसे, हे एक मोठे कोडे ठरते. हे कमी की काय म्हणून आमची समाजरचनाच अशी आहे की, काहींना ती सगळंच देते आणि काहींना हातावरचं पोट. पोटाची खळगी भरायचे प्रश्न पुस्तकांतील धड्यांपेक्षा मोठे होतात, तेव्हा शाळा आणि शाळेतून मिळणारे शिक्षण दुय्यमच ठरते. आजही खेड्यापाड्यात निंदणी, कापणी, कापूस वेचणीच्या हंगामात शाळा ओस पडलेल्या असतात. शाळेत मिळणाऱ्या खिचडीपेक्षा शेतात राबून हाती येणारे शे-दीडशे रुपये घरासाठी अधिक मोलाचे असतात. जेथे जगण्याच्या गणिताचे आकडेच सुटत नसतील, तेथे पुस्तकातील गणिताचे आकडे काय जमणार आहेत.

समस्या अनेक असू शकतात आणि आहेतही. आपल्या देशात प्रश्नांची वाणवा कधीच नव्हती, ती आजही नाहीये. प्रश्नांचं रूप-स्वरूप तेवढं बदलेलं आहे. रोजच्या जगण्यातील प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटलेली माणसे तो गुंता सोडवण्यात बेजार होत आहेत. जे प्रश्नांच्या गुंत्यातून सुटले ते सगळेच विकासाच्या शिखरावर पोहचलेत आणि प्रतिष्ठेच्या सिंहासनावर आरूढ झालेत असेही नाही. उच्चशिक्षण मिळवणाऱ्यांमधून सुमारे वीस-पंचवीस टक्के मुलेच अभ्यासातील विशिष्ट कौशल्य संपादित करण्यालायक असतात, असे सांगितले जाते. उरलेले बाकीचे बेरोजगारीचा टिळा ललाटी लावून परिस्थितीच्या परिघाभोवती वणवण भटकत असतात. या साऱ्यांच्या गुणवत्तेचे काय? याला जबाबदार कोण? आपली व्यवस्था, आपला अभ्यासक्रम की, आणखी काही? कधीकाळी नालंदा, तक्षशीलासारख्या विद्यापीठांचा वैभवशाली वारसा असणारी शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा विखंडीत झाली आहे. देशात आजच्या स्थितीत सुमारे पाच-सहाशे विद्यापीठे आहेत, यातील किती विद्यापीठे जागतिक क्रमवारीत पहिल्या शे-दोनशे क्रमांकामध्ये आहेत? आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून संपादित ज्ञानाने जागतिकस्तरावर अशी किती मुलभूत संशोधने नजीकच्या काळात घडली आहेत, ज्यांनी परिवर्तनाची वगैरे मुहूर्तमेढ रोवली आहे? सगळे प्रश्न आणि प्रश्नच.

कधीकाळी आपल्या देशात गणित, खगोलशास्त्रसारख्या विषयांत भरीव योगदान देत घडलेले संशोधन आज पुन्हा का घडत नाही? आपल्याकडे हेही होते आणि तेही होते म्हणून इतिहास झालेल्या क्षणांच्या स्वप्नांत रमण्यापेक्षा वर्तमानात आपल्याकडे जे काही हाती नाही, ते भविष्यात मिळवण्यासाठी चारदोन तेजाळलेली स्वप्ने आमच्या नेत्रात असायला नकोत का? कोणताही देश राजसत्ता, ज्ञानसत्ता आणि अर्थसत्तेने मोठा होत असतो. राजसत्ता आणि अर्थसत्तेला नवे आयाम ज्ञानसत्तेतूनच मिळत असतात. ज्ञानातून माणूस घडतो आणि असा घडलेला माणूसच देश नावाचं शिल्प आपल्या कौशल्याने आकारास आणत असतो. आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, असं या भूमीत वास्तव्य करणाऱ्यांना वाटत असेल, तर आमची ज्ञानसत्ता ‘असरदार’ असणे आवश्यक आहे. असे ज्ञान आमच्याकडे असेल तरच आम्ही विश्वाच्या व्यवहारात देशाला ‘प्रथम’ स्थानांकडे नेणारे पथ निर्माण करू शकतो, नाही का?

Varsh | वर्ष

By // 3 comments:
आपल्या स्मृतींच्या पाऊलखुणा मागे ठेवीत वर्ष संपलं. खरंतर संपलं असं प्रघातनीतीच्या परिघात वर्तताना म्हणायचे असते. काळ आपला पुढेपुढे चालतच असतो. त्याच्या स्मृती आपला एक गाभारा शोधून भूतकाळाची वसने परिधान करीत इतिहासाच्या पानात विसावतात एवढेच. बाकी सगळं निसर्गनियमानुसार चालणारे ते चालतेच. दिवस, महिने, वर्ष संपली असे म्हणणे काळाचा छोटासा तुकडा करून मोजण्यासाठी एक परिमाण असते, बाकी काही नाही. दिवस, सप्ताह, महिने, वर्षाच्या गतीने कॅलेंडरच्या चौकटींना ओलांडीत काळ पुढे सरकत राहतो. घडणाऱ्या या प्रवासात काही प्रिय, काही अप्रिय स्मृती तो अंकित करून जातो. जाणारे वर्ष आणि येणारे वर्ष यांना सांधणारा तीनशे पासष्ट दिवसांच्या काळाचा तुकडा एक ‘वर्ष’ बनून आपला मिरवत राहतो. माणसे असे तुकडे सांधत, बांधत, आवरत आणि सावरत राहतात. यातील काही तुकड्यांना एकत्र करून आयुष्याला मढवितात. वाट्याला आलेल्या तुकड्यांची नक्षी कोरून जगण्याला सजवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मनाजोगते रंग त्यात भरतात. त्यातल्या रंगांनी काहींचे आयुष्य सजते; पण साऱ्यांनाच हे रंगकाम जमेल असे नाही. साऱ्यांच्याच आयुष्यांचे कॅनव्हास सुखद रंगांनी सजतात असेही नाही. माणूस मात्र आपले इंद्रधनुष्य शोधण्याचा प्रयत्न करीत असतो.

जगणं संपन्न व्हावं, असं साऱ्यांनाच मनापासून वाटत असते. मनात उदित होणारे ते सुखस्वप्न असते; पण मनात उमलणाऱ्या साऱ्याच इच्छा-आकांक्षाना पूर्तीचे सौभाग्य लाभते असेही नाही. तरीही आज नसेल, पण उद्या पूर्वेकडील क्षितिजाला उजळीत येणारा सूर्य आपल्या प्रकाशाने माझ्यासाठी भाग्योदयाचे नवे साचे भरेल, ही अपेक्षा मनातून असतेच असते. कोणत्यातरी अपेक्षांना सोबत करीत माणूस जगत असतो. त्यांच्या पूर्तीच्या क्षणांची अनवरत प्रतीक्षा करीत असतो. प्रतीक्षेच्या लांबलेल्या क्षणांना सांभाळीत आस्थापूर्वक जीवनयापन करीत असतो. आल्यागेल्या क्षणांचा सोहळा करून नवी उमेद मनात बांधून घेत असतो. जाणाऱ्या काळाचे आणि येणाऱ्या काळाचे क्षण साजिवंत करीत असतो. माणूस मुळात उत्सवप्रिय असल्याने आनंद साजरा करण्यासाठी काहीना काही निमित्ते शोधीत असतो. जी काही निमित्ते त्याने निर्माण केली आहेत, त्यातील नववर्षाचं आगमन त्याच्या अपेक्षांकित मनाचा पळभर विसावा आहे. आनंद साजरा करणं ही स्वाभाविक वृत्ती सार्वत्रिक असली तरी, आनंद साजरा करण्याचे आविष्कार भिन्न असू शकतात. त्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. देशकालपरिस्थितीपरत्वे त्यात काही बदल घडतात; पण ते प्रासंगिक प्रकटीकरण असते.

२०१४ला निरोप देऊन २०१५चं आपल्यापैकी अनेकांनी आनंदित अंतःकरणाने स्वागत केले असेल. काहींनी आणखी काही केले असेल-नसेल माहीत नाही; पण येणारे वर्ष बऱ्याचदा काहीतरी प्रासंगिक वाद, प्रवाद आणि वादविवाद सोबतीला घेऊन अवतीर्ण होत असते. परंपरांना प्राधान्य देणारे काही आवाज ही आपली परंपरा नाही म्हणून पारंपरिक विरोध दर्शवितात. तर काही ग्लोबल आवाज आपण विश्वाचे नागरिक असल्याने संकुचितपणाच्या परिघात कशाला बंदिस्त व्हावे, म्हणून आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा उद्घोष करताना दिसतात. दोन्ही प्रवाहांचे माणूस म्हणून जगणे एकच; पण विचारांमध्ये प्रवाद वेगळे. असे असले तरी या विचारधारांमध्ये एक घटक कायम असतो, तो म्हणजे आनंद साजरा करण्याच्या पद्धतीला आपापल्या विचारांतून होणारा प्रासंगिक विरोध. यातून कधी प्रतिगामी, तर कधी पुरोगामी अशी नावे धारण करणारा विचारांचा संघर्ष सुरु होतो. जो तो आपापल्या विचारांचे अभिनिवेश धारण करून वर्ततो. या विरोधामागे असा कोणता निश्चित विचार असतो, हे सांगणे जरा अवघडच असते. अशी कोणती रीत असते ज्यामुळे उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत परिवर्तन वगैरे घडेल? मतभिन्नतेतून अमुक एक सण हा ‘क्ष’चा असतो आणि अमुक एक ‘ज्ञ’चा असतो, असे विभाजन का घडत राहते? याचे उत्तर सापडणे एक अवघड काम ठरते.

सण कोणत्या सांस्कृतिक पात्रातून प्रवाहित होत आला यांस महत्त्व देण्यापेक्षा, उत्सवांमुळे माणसांच्या जगण्याचे, विचारांचे परगणे समृद्ध होत असतात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर ते परगणे समृद्ध होत असतील, जगण्याचे सहिष्णू तत्वज्ञान त्यातून निर्माण होत असेल, तर तो सण-उत्सव पाश्चात्य असला काय किंवा पौर्वात्य असला काय, त्यानी असा काय फरक पडणार आहे? खरंतर पूर्वरंग आणि पश्चिमरंग एकत्र येऊन सहिष्णुतेचा एक नवा सांस्कृतिक रंग आपापल्या सांस्कृतिक प्रवाहांना येण्यात काय हरकत असावी? पण अशाकाही क्षणांच्यावेळीच माणसांचे अभिनिवेश साचेबद्धरित्या अनपेक्षितपणे जागे का होतात, हे कळत नाही. या अभिनिवेशांच्याऐवजी आमच्यातलं माणूसपण संवेदनशीलता धारण करून प्रकट का होऊ नये? कोणताही सण, उत्सव मुळात वाईट नसतोच. तो तसा आपण समजतो किंवा तसे ठरवून मोकळे होतो. ठरावीक सणांना ठरावीक गोष्टींची लेबले चिटकवली जाणार असतील, तर त्या उत्सवांमधील आनंद हरवणार हे नक्की. माणसाने उत्सव साजरे करण्याचा असंमत पद्धतीविषयी नकारात्मक राहिले तर समजू शकतो; पण एखाद्या सण, उत्सवांविषयी सरसकट नकारात्मक विचारातून वर्तने ही वर्तनप्रवाहांची सुयोग्य रीत असते का?

नववर्षाच्या स्वागत समारोहाला प्रत्येकाने आपापल्यापरीने रंग भरण्याचा प्रयत्न केला असेल. काहींनी त्यातून थोडं सैलावलेलेपण शोधले असेल, तर काहींनी स्त्रैण स्वातंत्र्य पाहिले असेल. काहींनी त्याला संयमाचे बांध घालून साजरे केले असेल. काहींनी स्वैराचारालाच स्वातंत्र्य समजण्याचा प्रमाद केला असेल. अर्थात सगळीकडे हे आणि असेच घडते, असेही नाही. गेल्या काही काळापासून आपल्या देशप्रदेशात पाश्चात्य संस्कृतीचं अनावश्यक आक्रमण होत असल्याची तक्रार आपल्या आसपास अधून-मधून ऐकण्यात येत असते. अशावेळी घाईघाईने पाश्चात्यिकरणाचा सोयीस्करपणे अर्थ लाऊन आम्ही मोकळे होत असतो. वर्तनातला स्त्रैणपणा, बेफिकीरवृत्ती आपल्या सांकृतिक परिघात कदाचित प्रबल होतही असेल. संयमित वागण्याविषयी आपल्या संस्कृतीने घालून दिलेल्या सीमारेषांचे काही ठिकाणी उल्लंघन घडत आहे. हे म्हणणं एका मर्यादित अर्थाने वास्तवही आहे. आनंद साजरा करण्याच्या निमित्ताने अनाहूतपणे येणाऱ्या अंमलाखाली संस्कृतीने दिलेल्या संस्कारांचा कोणताही अंमल न मानणारी तरुणाई रस्त्यावर झिंगताना दिसत असेल अन् हे पाहून या मुलांचे आणि सोबतच देशाचं भविष्य काही उज्ज्वल नाही, असे कोणास वाटत असेल तर त्यात काही अतिशयोक्तीही नाही; पण हा काही सार्वत्रिक नियम होऊ शकत नाही, कारण नीतिसंमत मार्गाने आणि सुसंगत मार्गाने वर्तनारीही याच देशाची तरुणाई आहे.

नेहमीप्रमाणे याहीवर्षी ठरलेल्या साच्यातल्या बातम्या वर्तमानपत्रातून आलेल्या कदाचित आपण वाचल्या असतील. मद्यपींचा धिंगाणा, त्यांच्या बेताल वर्तनाचा परिसरात होणारा त्रास, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडलेले अपघात, पार्टीतील बेधुंद वर्तनाने कोणातरी मानिनीची झालेली मानखंडना- बातम्या जवळजवळ त्याच, फक्त नावे नवीन. प्रतीवर्षी अशा घटना घडूनही कोणी विचारच करीत नसावेत, असे वाटण्याइतपत स्वैर वागणे घडते. स्वतःचीही काळजी न घेणारी ही पिढी दुसऱ्याच्या जीवाची काय पर्वा करणार आहे, असे वाटण्यापर्यंत वर्तन सैलावते. अशी पिढी व्यवस्थापरिवर्तनाचे कोणते नवे आयाम उभे करणार आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत असल्यास त्यात नवल नाही. देशाचं मोठेपण लोकांच्या वर्तनातून प्रतिबिंबित होत असते, असे म्हणतात. हे म्हणणं काही विसंगत नाही. अर्थात देशातील सारीच तरुणाई या मोजपट्टीने मोजता येत नाही. उडदामाजी काळे गोरे, हा न्याय येथे लावावा लागतोच.

सांप्रत पार्टीकल्चर झपाट्याने वाढत चालले आहे, हे सत्य नाकारणे अवघड होत चालले आहे. पार्टीसाठी कोणतेही क्षुल्लक निमित्त हल्ली पुरेसे ठरते. रेव्हपार्टीसारख्या गोष्टीतून तरुणाईचा धिंगाणा ओसंडून वाहत असतो. अशा उत्साहात सगळ्याच नाहीत, पण आपलं व्यक्तिगत स्वातंत्र्य जपणाऱ्या मानिनीही आनंदाने सहभागी होतात. मुलांपेक्षा आपण काकणभरही कमी नाहीत, हे दाखविण्याच्या स्पर्धेत काही तरुणी सहभागी होत आनंदाच्या सीमारेषा पार करणारा उत्सव साजरा करीत असतील, तर नैतिकतेचे नियम करताना हा पुरुष आणि ही स्त्री हा भाग शिल्लक उरतोच किती आणि कुठे? अशा स्वैर आचरणाला आपण काय म्हणाल? या वर्तनाला नैतिक अधःपतन म्हणण्याशिवाय आणखी कोणत्या नावांनी संबोधित करता येईल?

जागतिकीकरणाने ज्याकाही बऱ्यावाईट गोष्टी केल्या असतील त्या असोत, मात्र श्रीमंत, नवश्रीमंतवर्गाच्या सांपत्तिक कोशात घसघशीत वाढ केली आहे. खिशात खुळखुळणाऱ्या पैशातून भौतिक सुखांची लालसा निर्माण करणारे अनेक मृगजळी आभास समोर उभे केले आहेत. क्षणिक सुखांच्या संमोहनात अडकत आहेत. मोहपाशाला माणसे स्वर्गसुख समजायला लागली आहेत. अशावेळी सांकृतिक संदर्भांचे, मूल्यांचे अवनतीकरण झपाट्याने होत असल्याचे रडगाणे गाऊन काय घडणार आहे? सर्वत्र अविचारांचा अंधार दाटून आलेला असेल, तर पावलापुरत्या प्रकाशाची अपेक्षातरी करावी कशी आणि कोठून? ययातीचं जगणं कदाचित एक पौराणिक संदर्भ असेल; पण ज्यांच्याकडे सहज प्राप्त होणारे पैसा नावाचे सामर्थ्य आहे, ज्यांचे खिसे भरलेले आहेत ते ययातीच्या देहसोहळ्यांना लाजवतील, असे उत्तान सोहळे साजरे करताना विद्यमानकाळी लहानमोठ्या गावखेड्याशहरातून सहज दृष्टीस पडत आहेत.

मद्य, मदिराक्षी यांच्या विभ्रमांपासून स्वतःला जाणीवपूर्वक सुरक्षित ठेवण्याचा विचार इतिहास बनला आहे. देशात कदाचित मंदिरांपेक्षा मदिरालयांची संख्या नजीकच्या काळात अधिक झाली तर नवल वाटायला नको, असा काळ समीप येत चालला आहे. पावसाळ्यात जागोजागी उगवणाऱ्या भूछत्रांप्रमाणे रस्त्यारस्त्यांवर ढाबे, बार नामक एक संस्कृती वेगवेगळी नावे धारण करून अवतीर्ण होत आहे. येथे येऊन रमणाऱ्या रसिक भक्तांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढतच चालली आहे. सामाजिकपातळीवर मद्यप्राशन त्याज्य मानले जाण्याचे दिवस भूतकाळ झाला आहे. मद्याने भरलेले चषक ‘सोशलड्रिंक’ नाव धारण करून सोसलं जाणार नाही इतके तुडुंब भरत चालले आहेत. स्वातंत्र्याची व्याख्या जो तो आपापल्यापरीने सवडीने आणि आवडीने करतोय. अशा वर्तनातून स्वैराचार वाढत जाऊन नैतिकतेचे अधःपतन घडणार आहे, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही.

जुन्यावर्षाला निरोप देताना आणि नवीनवर्षाचे स्वागत करताना काही अपेक्षा असतात. हाती असलेल्या वर्तमानात काही कारणवश मनातील अपेक्षांची पूर्तता झाली नसेल, तर निदान त्या पुढे पूर्ण व्हाव्यात, हा विचार त्यामागे असतो. गेल्यावर्षाच्या दिवसांच्या चौकटींमध्ये जगताना माझ्या हातून कोणते क्षण पाऱ्यासारखे निसटले. काय घडले आणि काय घडायचे, करायचे राहिले याचे सिंहावलोकन घडणं यानिमित्ताने अपेक्षित आहे. नवीनवर्षाचे नवे संकल्प सोबतीला घेऊन वाट चालायची आहे. मागच्या वर्षात राहिलेले काही यावर्षातील हाती येणाऱ्या दिवसांत पूर्ण करायचे आहे, याची जाणीव आपणाला असायला नको का? काहीतरी करायचे राहिलेले आहे, ते शोधताना विद्यमान वर्षातला क्षणनक्षण सत्कारणी लागावा, असं किती जणांना मनापासून वाटत असते, माहीत नाही; पण आपल्यातील अपूर्ण जे ते पर्याप्त मात्रेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहण्यात शहाणपण सामावले असताना माणसं उत्सवातील क्षणिक आनंद शोधतात; पण तेथूनच उदित होणाऱ्या शाश्वत आनंदाकडे कळत-नकळत दुर्लक्ष घडते, याला काय म्हणावं?

दोन पिढ्यांच्या विचारांत अंतर असते हे मान्य; पण त्यांच्यात विसंगती असेल तर संवाद घडूच शकत नाही. जुनी पिढी त्यांच्याकाळी वाट्यास आलेल्या अभावग्रस्त जीवनाला, तेव्हा केलेल्या कष्टाला सतत अधोरेखित करीत असते. विपरीत परिस्थितीतून आपण आपल्या अभ्युदयाचा पथ कसा शोधला, याचे वस्तुपाठ नव्यापिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत असते. पण जुन्या पिढीची ही परायणे अशीच सुरु असतात, असे नव्यापिढीचे जुन्यापिढीविषयी मत जवळजवळ सार्वत्रिक पातळीवर आढळते. नव्यापिढीला या स्थिती परिस्थितीविषयी काही देणे घेणे नाही. तुमच्या वेळेस तशी परिस्थिती असल्याने तुम्ही तसे वागलात. घडलात. आमच्याकाळी असे काही नाही, मग आम्ही मिळणाऱ्या सुखसुविधांपासून वंचित का राहावे? असा त्यांचा सरळसरळ प्रश्न असतो. अभावात जगणे हा काही अपराध नाही; पण परिस्थिती सर्व बाजूंनी अनुकूल असताना स्त्रैण जगणे हा अपराध असू शकत नाही का? आनंदाची प्राप्ती गुन्हा नाही. तो जेथून मिळत असेल तेथून जरूर मिळवावा. मग तो तुकड्यातुकड्यांनी का मिळेना; पण तो नीतिसंमत मार्गाने संपादित करता येत नसेल, तर तो अपराध असतो.

एकाचएक ठिकाणी वसती करून सुख चिरकाल राहत नसते, याची जाणीव सार्वजनिक आणि वैयक्तिकरित्या वर्तताना व्यक्तिगत स्वातंत्र्य अपेक्षिणाऱ्याना नसावी का? जाणारे कोणतेही वर्ष काही सगळीकडेच आनंदाची पखरण करीत निरोप घेत नाही. आपल्या उदरात अनेक बऱ्यावाईट घटना-घटिते सामावून घेत ते निरोप घेते. त्यातील चांगल्याचे स्मरण जरूर असावे; पण वाईटाचे चिंतन करायला नको का? समाजात सुखं सार्वकालिक नसतात. बऱ्याचदा संकटांचेच अधिक्य असल्याचे दिसत असते. त्यांना धीरोदात्तपणे सामोरे जात माणसांचे जगण्याचे व्यवहार सुरु असतात. आयुष्यात उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसांसाठी माणसे आज ऊर्जा शोधत असतात. आशेच्या आणि आस्थेच्या क्षणांना सोबत घेऊन नियतीने निर्माण केलेले पथ; जे आपल्या वाट्याला आलेले आहेत ते आक्रमित असतात. कधीतरी अनपेक्षितपणे त्यांच्या जीवनाच्या शांत डोहात काही लाटा निर्माण होतात. त्या कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटे घेऊन येतात. तरीही संकटांशी संघर्ष करीत पुढेच चालत राहावे लागते, कारण जो थांबतो तो संपतो.

यावर्षाचा आनंद आपापल्यापरीने साजरा केला गेला. तसे करण्यात गैर काहीही नाही. आनंदाची कारंजी मनात थुईथुई नाचत असताना आपल्या समाजात अनेक अभावग्रस्त आहेत आणि ते संघर्ष करीत जगत आहेत, याचे भान आपल्या मनात अंशमात्र असेल का? ओसंडून उतू जाणाऱ्या आनंदात तेही वाहून गेले असेल, की दुर्लक्षिले गेले असेल. तसे असले तर अभावग्रस्तांच्या जीवनातील अंधारे कोपरे उजळण्यासाठी आपण काय केले, हा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला का? खरंतर जाणाऱ्या वर्षाने अनेक आघात आपल्या सार्वजनिक, वैयक्तिक जीवनावर, जगण्यावर केलेले असतात. अनपेक्षितपणे आलेल्या नैसर्गिक आपत्तीनी माणसांचे जगणे उध्वस्त केलेले असेल. तर्कविसंगत विचारांना नैतिकतेचे अधिष्ठान समजून तो विचार रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमुळे अनेक निरपराध्याना असह्य यातनांना सामोरे जावे लागले असेल किंवा असेच काहीतरी घडले असेल. याचा विचार आपल्याच सुखात रममाण असणाऱ्यांनी केला असेल का? आपत्ती, संकटे आपल्यापासून दूरवर दिसत असलीतरी, ती कधीही आपल्या जगण्यातही प्रवेशित होऊ शकतील, याची जाणीव आनंदोत्सव साजरा करताना माणसांच्या अंतर्यामी असायला काय हरकत असावी?

आनंद जरूर साजरा व्हावा; पण तो साजरा होताना सामाजिक दूरितांचेही भान समाजाचा एक घटक म्हणून आपणास असायला हवे. सारेच प्रश्न काही केवळ देशासमोरील समस्यांचे नसतात. कधीतरी ते वैयक्तिकही असू शकतात. अर्थाचे-अनर्थाचे आणखी काही पदर त्यांना असू शकतात. कदाचित त्या समस्या आपल्याही असू शकतात. समाजात दैन्य, दास्य, दारिद्र्य, वंचना, उपेक्षा, अन्याय आहे. त्याने सामन्यांचे जगणे दुष्कर केले आहे. माणसं विकल होत आहेत. विज्ञाननिर्मित विचारांच्या जगात अज्ञान साठत चालले आहे. अंधश्रद्धांचे जाळे विणलेच जात आहे. गरिबी, बेरोजगारीचं जिणे समोर असताना नवे काही घडण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. गुन्हेगारांना नवनवे मार्ग सापडत आहेत. गुन्हेगारीला बरकत येणं सामाजिक स्वास्थ्य संतुलित नसल्याचं द्योतक ठरते आहे.

अर्थात, माणसासमोरील सगळेच प्रश्न जटील असतील किंवा असले पाहिजेत असे नाही. आपल्या समोरील काही प्रश्न कधीकधी अगदी साधेसेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी फार वणवणही करायला लागत नाही. फक्त आपले लक्ष त्या बाजूने जाणीवपूर्वक वळते करायला लागते. प्रश्न कोणतेही असोत, त्याविषयी मनात आस्था असावी लागते. आस्थेतून निर्मित सकारात्मक विचार विपरीत परिस्थितीतही परिवर्तन घडवू शकतात. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बदलणाऱ्या वाटा निवडाव्या लागतात. प्रश्नांनी निर्माण केलेल्या परिस्थितीला भिडावे लागते. तेव्हाच बदलांचा प्रकाश परिसरात पडून पसरतो. ज्याला बदलांचे भान आहे, त्याच्यासाठी खरा आनंदोत्सव परिवर्तनात साठलेला असतो. तो जितका नववर्षाच्या स्वागत समारंभात असतो, त्यापेक्षा काकणभर अधिक परिवर्तनासाठी पुढे येणाऱ्या पावलांच्या आवाजात असतो. नाही का?

Prem, Love, Ishq Vagaire | प्रेम, लव्ह, इश्क वगैरे

By // No comments:
किस ऑफ लव्ह, स्पिक फॉर लव्ह, लव्ह जिहाद या आणी अशा प्रकारचा आशय व्यक्त करणाऱ्या शब्दांनी तयार झालेल्या वाक्यांचा टीआरपी सध्या बऱ्यापैकी वाढलेला आहे. भाषिक प्रवाहात कधी कोणत्या शब्दांना महत्त्व येईल, हे भाषाविदही ठामपणे सांगू शकतील की, नाही शंकाच आहे. असे शब्द अर्थाच्या नव्यानव्या छटा धारण करून भाषेच्या प्रांगणात अवतीर्ण होतात. तेथून भाषिक प्रवाहात प्रवाहित होतात आणि व्यवहारात सामावून जातात. त्यांना त्यांचा स्वतःचा अर्थ असतो, तसे अर्थांचे, संदर्भांचे अन्य काही स्पष्ट, काही अस्पष्ट पदर असतात. यातून प्रकटणारा आशय शोधण्याचा प्रासंगिक प्रयत्न होत असतो. या शोधप्रवासात प्रत्येकाचे आकलन वेगवेगळी मनोभूमिका धारण करून प्रकटत असते. आपल्या आकलनाच्या परिघात त्यातून काही अर्थ शोधले जातात. काही घेतले जातात. लागला नीट संदर्भ तर त्या शब्दांना एक मोहरलेपण येते. चुकला संदर्भांचा धागा तर अनेक अर्थ-अनर्थ कळतनकळत अवघड वळणे घेत पुढे जातात. कधी त्या शब्दांतील मूळ आशय अव्यक्त राहतो आणि अभिनिवेशाचा आवेशच अधिक प्रबळ होत जातो.

या शब्दांच्या बाबतही असेच काहीसं झालेलं आपण नजीकच्या काळात वाचले असेल, ऐकले असेल, काहींनी कदाचित पाहिलेही असेल. केरळमधील कोझिकोडे शहरात घडलेल्या एका घटनेचं निमित्त कारण ठरलं. तेथील कुठल्यातरी कॅफेच्या पार्किंग एरियातली घटना. येथल्या पार्किंग झोनमध्ये एकमेकांच्या मिठीत सामावलेल्या जोडप्याचे छायाचित्रण करून कुठल्यातरी वाहिनीने प्रक्षेपित केले. अन् ते प्रसारित झाल्यावर पाहणाऱ्या काहींनी आपापल्यापरीने संबंधित घटनेचे अर्थ शोधले. अर्थाच्या प्रतिमा मनात तयार केल्या आणि सामाजिक संस्कारांच्या चौकटींचे उल्लंघन घडले किंवा घडत आहे, असे समजून कॅफेची मोडतोड केली. चौकटींना प्रमाण मानणाऱ्यांच्या मनातील राग आक्रमक रूप धारण करून प्रकटला. खरंतर असं काही पहिल्यांदाच घडत नव्हतं. अशा काही घटना घडलेल्या होत्याच. सार्वजनिक ठिकाणाचे हे प्रेमाराधन अनिष्ट असल्याचे सांगत काही बंधने घालण्याचा प्रयत्न झाला होता. तरुणाईला हे बंधने सहन होणे शक्यच नव्हते. त्याच्या मनात या घटनांविषयी राग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धुमसत होताच. मनातील कोपऱ्यात संयमाच्या राखेखाली आतापर्यंत झाकून ठेवलेली ठिणगी या घटनेचा वारा लागून भडकली. क्षोभाची ज्वाला बनून प्रकटली. विरोधाची धार तीव्र होत जाऊन प्रतिकाराने आंदोलनाचे रूप धारण केले. हा विरोध ‘किस ऑफ लव्ह’ नाव धारण करून प्रकटला. उभा राहिला एक संघर्ष नैतिक म्हणजे काय आणि अनैतिक म्हणजे काय यातला. या द्वंद्वाला आणखी काही धुमारे फुटले. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित साधने हाती घेऊन संघर्षाच्या मशाली प्रज्वलित झाल्या. गाव, प्रदेशाच्या सीमा ओलांडून अस्मितांचा जागर करायला प्रारंभ केला.

बरीच भवतीनभवती झाली. काही रोधाचे, काही अवरोधाचे, काही विरोधाचे, काही प्रतिकाराचे शब्द प्रहार बनून प्रकटले. एकीकडे घटनादत्त स्वातंत्र्याचा उद्घोष करीत आम्ही आमच्या मनाचे मालक आहोत, आम्हाला अवरुद्ध करण्याचे तुम्हाला प्रयोजनच काय? असे म्हणणारे आवाज, तर दुसरीकडे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. संयमाच्या चौकटीत वर्तायला शिका, असे सांगणारे आवाज बुलंद होत गेले. दोन परस्पर भिन्न प्रवाह प्रचंड वेगाने एकमेकांवर आदळले. त्याच्या आदळण्याचा परिणाम म्हणून संघर्षाच्या ठिणग्या उडणारच होत्या, त्या उडाल्याच. वेगवान प्रसार माध्यमांमुळे हा वणवा अगदी लांब लांबपर्यंत पोहचला. या संघर्षात प्रत्येकाने आपापल्या वर्तनाच्या परिघात स्वतःला तपासून पाहिले असते तर कलहाचे प्रश्न निर्माण झाले असते का?

प्रत्येककाळी, प्रत्येकवेळी वर्तनातील कृतीबाबत समाजात एकमत झाले आहे, असे फार कमीवेळा दिसते, कारण एखाद्याला एखादी कृती नैतिक वाटते; ती समोरच्याला कदाचित अनैतिक वाटू शकते. जो-तो आपल्या आकलनाच्या परिप्रेक्षात संबंधित घटनेकडे पाहत असतो. म्हणूनच नैतिक घटना कोणती आणि अनैतिक घटना कोणती, याबाबत समजुतीच्या सीमारेषा धूसरच असतात. त्या धूसर असल्यामुळेच प्रत्येकजण आपापल्यापरीने एखाद्या घटनेचा अर्थ, अन्वयार्थ लाऊन मोकळा होतो. अर्थात प्रत्येकजण आपल्यापरीने अर्थ लावायला मोकळा असला, तरी एक गोष्ट मागे उरतेच; ती म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य. व्यक्तिगत स्वातंत्र्याला जीवनात काहीच अर्थ नाही का? आपण लोकशाही शासनप्रणाली अंगिकारली आहे तर वादाचे विषय सर्वमान्य मार्गाने, चर्चेच्या रूपाने निकाली काढता येऊ शकत नाहीत का?

‘प्रेम’ हा शब्द सार्वकालिक वादाचा विषय राहिला आहे. याशब्दाभोवती कोमल, तलम, भावस्पर्शी भावनांचे वलय आहे, तेवढेच संशयाचे धुकेही दाटले आहे. खरंतर प्रेम ही भावना उदात्त आहे. अडीच अक्षरांमध्ये माणसांच्या माया, ममता, वात्सल्याचे प्रवाह सामावले आहेत. तेवढेच अविचाराने घडणाऱ्या कृतीने प्रेम भावनेला अवनत करणारे वासना, विकार, विकृतीचे धागेही जुळले आहेत. हेच कारण प्रेम नावाच्या भावनेकडे अनुदारदृष्ट्या बघायला कारण ठरते. रोमिओ-ज्यूलियट, लैला-मजनू शिरी-फरहाद या प्रेम परगण्यातील चिरंजीव जोड्यांच्या असीम प्रेमाचं कौतुक करायचं. त्यांचं प्रेम कसं विशुद्ध, सात्विक, एकनिष्ठ होतं म्हणून त्या प्रेमाचे गोडवे गात राहायचं आणि आपल्या आसपास असं कुणी एकमेकांसाठी जीव टाकणारं दिसलं की हे काय प्रेम आहे; हा तर देहाच्या विकारांचा सोहळा आहे, म्हणून संकुचित विचारांनी त्याकडे बघायचे. या वर्तनाला कोणत्या संज्ञेने संबोधित करावे, हा एक यक्षप्रश्न आहे.

प्रेम शाश्वत भावना असेल, तर त्यातल्या भावविभोर नात्यांना यथासांग प्रकटायला संधी देणे उचित नाही का? इहतलावरील सजीवांच्या प्रजातींचे वंशसातत्य टिकवून ठेवणं निसर्गाचं काम आहे. निसर्ग त्याचं काम त्याच्या नियमांनी करीत असतो. विशिष्ट वयात भिन्न लिंगीय आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. आकर्षणातून विपरीत वर्तन घडू नये, यासाठी माणसांची नीतिनियमांच्या चौकटी निर्माण केल्या. काही अघटित घडू नये म्हणून वर्तनप्रवाहांना संयमाचे बांध घातले. समाजाने त्यास मान्यता दिली. मिळालेल्या मान्यतेने कायद्याचे कवच निर्माण झाले. कायदे आले म्हणजे सगळंच आलबेल असतं असं नाही. त्याच्यातूनही फटी शोधल्या जातात. पळवाटा निर्माण होतात. नैसर्गिक प्रेरणेने कोणीतरी दोघं परस्परांकडे आकर्षित होतात, तेव्हा साहजिकच सुरक्षित आडोसा शोधतात. ती सहज प्रवृत्ती आहे. समाज, कायदा यासारखी काही नियंत्रण केंद्रे समोर असतात, म्हणून यापासून शक्य तितक्या दूर राहण्याचा प्रयत्न होत असतो. आडोशाला बहरणारा प्रणय नजरेआड असल्याने काही संघर्ष घडत नाही. आडोशाला नाकारून किंवा सुरक्षित कोपरे आसपास नसल्याने म्हणा, हे नजरेआडचे प्रणयाराधन नाकारून कोणी जरा धीटपणे सिनेमागृहात, उपहारगृहात, नदीकिनारी, सागरकिनारी, उद्यानात एकमेकांच्या समीप आले की, एकदमच असं काय घडतं की, पाहणाऱ्याच्या विचारांची दिशाच अचानक बदलते.

‘त्याने प्रेम केले तिने प्रेम केले, करू दे की, त्यात तुमचे काय गेले?’ असा प्रश्न कवी पाडगावकरांनी आपल्या कवितेतून कधीच आपल्या व्यवस्थेला विचारून ठेवला आहे. अर्थात याबाबत म्हणणारे म्हणतील, ‘अहो कवितेचं काय घेऊन बसतात. कविता आणि समाज यात काही अंतर आहे की नाही? संस्कृती, संस्कार नावाचा काही प्रकार असतो की नाही.’ खरंतर मला एक प्रश्नाचं उत्तर अद्याप नीटसे कळले नाही. संस्कृती, समाज नावाच्या व्यवस्था माणसानेच निर्माण केल्या असतील, तर आपल्या विचारांचा, आचारांचा, कृतींचा केंद्रबिंदू माणूस का असू नये? राधाकृष्णाच्या प्रेमाला मान्यता असावी. नलदमयंतीचे प्रेम स्वीकारावे, बाजीराव मस्तानीच्या असीम प्रेमाचे गोडवे गायचे; मग एकमेकांच्या अनिवार ओढीने समीप आलेल्या माणसांच्या प्रेमात असं काय घडतं की, त्यांच्यासमोर विरोधाच्या भिंती उभ्या केल्या जात असतील. निरपेक्ष प्रेम चराचरावर स्नेह करायला शिकवतं. जात, धर्म, वंश यांच्या पलीकडील माणूसपण शोधून माणुसकीच्या गाथा ते लेखांकित करीत असते. जगात प्रेम ही एकच अशी उदात्त गोष्ट आहे, जिला कोणतीही जात, धर्म, वंश नाही. तेथे एकच धर्म असतो, तो म्हणजे प्रेम. संस्कृती, संस्कार सारे प्रेमात सामावले जाऊ शकते. प्रेमभावना देशप्रदेशाचे कुंपणे मानीत नाही. कोणतेही अंतरे मोजत नाही. ते उमलत्या मुग्ध वयातलं असो की, आणखी कोणत्या. त्यात त्याचं अंगभूत माधुर्य असतं.

प्रेमाची परिभाषा कोणत्या शब्दांत करता येईल? नाही सांगता येत. परिभाषेच्या पसाऱ्यात प्रेमभाव बंदिस्त होऊन पतन पावणार असेल, तर ते प्रेम कसे असू शकते? निर्व्याज, निरपेक्ष प्रेमाला बंधनांच्या कुंपणात का उभं करावं? जातीधर्माच्या भिंती त्याच्यासमोर का बांधाव्यात? प्रेम काही ठरवून घडणारी कृती नाही. त्यासाठी दोघांच्या मनाच्या तारा छेडल्या जाणे आवश्यक आहे. प्रेमात पडताना जातधर्म या गोष्टी काही पाहिल्या जात नाहीत. तेथे दोघांनी एकत्र येणे घडते. एकीकडे प्रेमाविषयी वाटणारे अनामिक आकर्षण, तर दुसरीकडे प्रेमाकडे बघण्याच्या संकुचित विचारांमुळे विरोध होत राहतो. इगो उभे राहतात. हे इगो जपताना घडणाऱ्या अनेक असंबद्ध गोष्टीमुळे प्रेमाचा वसंतऋतू अवेळी करपून जातो. विरोध आणि लब्धप्रतिष्ठित अभिनिवेशातून घडणाऱ्या ऑनरकिलिंग सारख्या घटना, बेदम मारहाण, प्रसंगी कोणीतरी हकनाक जीवाला मुकणे अशा घटना घडत जातात. प्रेमाला होणारा प्रखर विरोध, दुसऱ्या बाजूला प्रेमातील तरल जगण्याचं वाटणारं अप्रूप. यातून प्रश्न आणखी जटील बनत जातात. मनाच्या जुळलेल्या तारा झंकारत राहिल्याने त्यांचे सूर मनात अस्वस्थ तगमग उभी करतात. एकमेकांशी सरळसरळ संपर्क करता येत नाही, म्हणून सुरु होतो लपाछपीचा खेळ. या खेळातली दमछाक पलायनाला प्रेरित करते. बरं एवढं करूनही प्रश्न सुटत नाहीत. गुंता अधिकच वाढत जातो. काहीतरी उलटसुलट घडते. शोधून सापडले हाती की अपहरण, विनयभंग, बलात्काराचे आरोप प्रेम करणाऱ्यांवर लावले जातात. दबाव वाढत जातो. क्षणात होत्याचे नव्हते होते. एवढं घडूनही काही झाले यशस्वी, तर पुढे नात्यातला हा गोडवा टिकेल का? या प्रश्नाचं भलंमोठं प्रश्नचिन्ह समोर उभं असतं.

समाजात वावरताना मनात असणाऱ्या अनामिक दडपणातून, भीतीतून प्रेमींचा नजरेआडचा खेळ सुरु होतो. ‘घरात जागा नसते हल्ली त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण, ते थोडेच बसणार आहेत घोकत पाणिनीचे व्याकरण.’ पाडगावकरांच्या कवितेच्या या ओळी आपल्यासमोर कोणते वास्तव मांडतात. समोर असंच घडणार असेल, तर कोणाला आणि कोणत्या परिस्थितीला जबाबदार धरणार? अशावेळी एकांत नसेल तर लोकांत असला तरी चालेलच ना! प्रेमपाशात बंदिस्त झालेले कोणीतरी तो किंवा कोणीतरी ती कोणत्यातरी कोपऱ्यावर आपलं नाव कोरतीलच.

सांप्रतकाळी जग खूप स्मार्ट झाले आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर सुखंसंवाद वाढू लागला आहे. टचस्क्रीनवरून नात्यांना मोहरलेपणाचा टच मिळतो आहे. कधीकाळी मुलंमुली चारचौघांत समोरासमोर यायला धजत नसत. सारं कसं दुरून डोंगर साजरे असल्यासारखे. आम्ही कॉलेजात शिकत असताना कुण्या वर्गमैत्रिणीने राहिलेले काहीतरी लिहिण्यासाठी वही मागितली तरी आमचे आकांक्षांचे विमान दिवसभर अंतराळी विहार करायचे. दुसऱ्या दिवशी वही परत हाती येताना ‘दादा, ही घे तुझी वही.’ हे वाक्य ऐकले की, तितक्याच वेगाने जमिनीवर यायचे. काळ कोणताही असू द्या, मनात उमलणारा प्रेमभाव कायम असतो. या सत्याला आपण का नाकारावे. समाजाचं मॉरल पोलिसिंग तेव्हाही होतं आणि आताही आहेच. पण त्यातून मॉरल संपते आणि फक्त पोलिसिंग उरते, तेव्हा प्रश्नांचा गुंता वाढत जातो. तो सोडवण्यासाठी गुंतलेले धागे हलक्या हाताने उलगडायला लागतात.

प्रेमाला आणि ते करणाऱ्यांना विरोध असणारे म्हणतील की, प्रेम ही काही सार्वजनिक ठिकाणी करायची गोष्ट नाही. तुम्हाला करायचेच असेल, तर तुमच्या मालकीचा एकदा कोपरा तयार करा. हा भारत आहे, अमेरिका नाही. असलं काही करायला. काय करावं याचं जसं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तसंच आम्हालाही काय पाहावे, काय पाहू नये याचं स्वातंत्र्य आहे. आपला कायदा विदित करतो की, सार्वजनिक ठिकाणी अश्लाघ्य, अश्लीलवर्तन अपराध आहे. समाजाचे वर्तनप्रवाह बदलत आहेत, समाजात वर्तनाचा मोकळेपणा येत आहे. मेट्रोसिटीमध्येच काय, पण लहानमोठ्या शहरातूनही हातात हात घालून अंगचटीला येत फिरणारी जोडपी सहज दिसतात. ते रोजचं बघणं असल्याने लोकांना त्याचं काही विशेष वाटत नाही. बिनधास्त वर्तणारी जोडपी आता काही कुतूहलाचा वगैरे विषय राहिली नाहीत.

एरवी सगळीकडे गर्दी असल्याने आहे कुठे निवांत जागा प्रेमाचे चार क्षण व्यतित करायला. मग प्रेमाचा आविष्कार अशारीतीने प्रकटणारच. तरुण-तरुणी आहेत. एकत्र शिकत आहेत. एकेठिकाणी जॉब करीत आहेत. सहवासातून अनुरक्त होतायेत. त्यातून काहींचे प्रेम अंकुरित होत बहरत जाते. याचा अर्थ सगळेच असं काही करतात, असेही नाही. निसर्ग एकत्र आणण्याची काही प्रयोजने निर्माण करीतच असतो. जवळ येणारे, आणणारे वास्तव लांबून का होईना, मान्य करायला काय हरकत आहे? त्यांच्या सहवासातून नवे नाते निर्माण होणार असेल आणि ते कायम टिकणारे असेल, तर समाजसंमत नियमांच्या चौकटीत त्याला प्रतिष्ठा का मिळू नये? एखाददोन अनुभव वाईट असला म्हणून सगळंच वाईट, असं म्हणून कसं चालेल? समाज नावाची संस्था बदलाचे वारे सहज स्वीकारणार नाही. यासाठी काळाला आणखी काही पाऊले पुढे चालायला लागेल. तोपर्यंत प्रेमकहाणीत असं काहीतरी घटित-अघटित घडत राहील का? माहीत नाही, पण या प्रश्नाचं उत्तर ज्यानं त्यानं आपापल्यापरीने शोधणंच योग्य राहील.

Shahanpan Dega Deva | शहाणपण देगा देवा

By // No comments:
काही दिवसापूर्वी व्हॉटसअॅपवरून एक मॅसेज फिरत होता, ‘भारतात शाळेतून फर्स्टक्लास गुण मिळवणारे डॉक्टर, इंजिनियर होतात. सेकंडक्लासमध्ये पास होणारे एमबीएला प्रवेश घेतात, अॅडमिनिस्ट्रेटर बनतात आणि फर्स्टक्लासवाल्यांना हँडल करतात. थर्डक्लासमध्ये पास होणाऱ्यांना कुठेच प्रवेश मिळत नाही, म्हणून राजकारणात येतात आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात. फेल झालेले अंडरवर्ल्डमध्ये घुसतात अन् वरच्या तिघांना कंट्रोल करतात. ज्यांनी कधी शाळेचे तोंडपण पाहिले नसते ते साधू, स्वामी, बनतात आणि वरचे सगळे त्यांच्या पाया पडतात.’ खरंतर हा संदेश तयार करणाऱ्याच्या निरीक्षणशक्तीचे कौतुक करावे की, आपल्या देशातील लोकांची मानसिकता ओळखून वर्तनातील विसंगतीवर नेमका आघात केला म्हणून दुःखी व्हावे की, हे असेच चालायचे म्हणून समोर दिसते आहे, त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करावे? समजणे जरा अवघड आहे. ते काही असो, या मॅसेजचा शेवट मात्र अचूक टिपला गेला आहे. कदाचित आपणापैकी काहींना हा मॅसेज आला असेल. काहींनी वाचला असेल. वाचून कोणालातरी फॉरवर्ड केला असेल किंवा डिलीट केला असेल. काहीही केले असले तरी परिस्थितीजन्य वास्तव नाकारून पुढे जाता येत नाही. आपण त्यावर विचार केला काय, न केला काय, म्हणून परिस्थिती थोडीच बदलणार आहे.

असा अनुभव कोणाला आला असेल, नसेल माहित नाही. असेल तर कसा, सांगणे अवघड आहे. संवेदनांना जाणवणाऱ्या या वास्तवावर किती जणांनी विचार केला असेल, हेही सांगणं तसं कठीण आहे. पण बहुदा कोणत्याही घटनेचा फारशा गांभीर्याने विचार करायची आम्हांला सवयच नसल्याने याचाही विचार झालाच नसावा, कारण अशा घटनांचा थोड्याशा गांभीर्याने विचार झाला असता, तर माणसे परत त्याच वर्तुळापाशी येऊन थांबली नसती. विज्ञानाचे दीप हाती घेऊन पावलापुरता प्रकाश शोधीत जीवनातील अज्ञानाला दूर करू पाहणारी संवेदनशील माणसं समाजात सर्वकाळी असतात. अशा घटनांविषयी ते सात्विक संताप व्यक्त करतात. हे काय चाललंय, म्हणून संयमित विरोध प्रदर्शित करतात. अशा विचारांनी वर्तणाऱ्यांची संख्या दुर्दैवाने कमीच असते. अज्ञानाच्या अंधारात आत्मतेज शोधू पाहणाऱ्यांच्या जगात सुधारणावादी आवाज क्षीण होत जातात. आंधळा उन्माद धारण करून वावरणाऱ्या वातावरणात विरतात. शहाणपण अशावेळी अंग चोरून कुठेतरी दूर कोपऱ्यात उभे असते. कोण्यातरी बुवाबाबांच्या अफाट लीला प्रकट होतात. त्या कशा घडल्या याची साग्रसंगीत वर्णने प्रिंट मीडियातून छापली जातात, इलेक्ट्रॉनिक मीडियातून दाखवली जातात. पण हे पाहूनही झापडबंद डोळे समोर दिसणारे वास्तव मान्य करायला तयार नसतात. अमक्या बाबांवर आमची आस्था आहे, असे घडेलच कसे? बाबांच्या आशीर्वादाने आमचं अगदी मस्त चाललंय. त्यांच्याकडून असं अघटित घडूच शकत नाही. या महान संत, महात्म्याला उगीच बदनाम करण्याचे, हे षड्यंत्र आहे. आमच्या श्रद्धास्थानाला आम्ही असे सहजी बदनाम होऊ देणार नाहीत. भलेतर आमचं काहीही होवो, आम्ही उभे राहू आणि कुणी बलप्रयोग करणार असेल तर आम्हीही रस्त्यावर येऊ.

असे प्रसंग घडणे आपल्या देशाला काही नवीन नाही. अधूनमधून येणाऱ्या अशा वार्तांनी मीडियाचा टीआरपी वाढतो. घडलेल्या घटनेवर चर्चेचे कार्यक्रम घेतले जातात. येथेही समर्थक आणि विरोधक विचारधारांचे सामने रंगतात. प्रत्येकजण आपणच कसे योग्य आहोत, हे पटवून देण्यासाठी आपापल्या पातळीवर समर्थन करीत असतात. पाहणारे, ऐकणारे ज्याला जे घ्यायचे आहे, ते घेतो. अर्धाएक तासात चर्चा संपते. चर्चांचा समाजमनावर किती परिणाम होतो कुणास ठाऊक? लक्षणीयरीत्या झाला असता तर पुनःपुन्हा त्यांचे आयोजन करावे लागले नसते. चर्चांमधून विचारांचा जागर घडूनही अंधश्रद्ध माणसं डोळ्यांवर बांधलेल्या अंधआस्थेच्या पट्ट्या सोडायला तयार नसतात. विज्ञानाच्या वाटेने प्रकाशाचा शोध घेत एखादे पाऊल चालते झाले आहे. चालत्या पावलांनी डोळ्यांवर बांधलेल्या आंधळ्याभक्तीच्या पट्ट्या नाकारून फेकल्या. सकारात्मक विचारांची ऊर्जा सोबतीला घेऊन माणसांचे वर्तनव्यवहार घडत आहेत. आपल्या समाजाचे असे चित्र सर्वत्र दिसते का? बहुदा नसावे, कारण तसे घडते तर साध्याभोळ्या भक्तांच्या फसवणुकीच्या घटना वारंवार घडल्याच नसत्या.

प्रबोधनयुगाचा प्रारंभ घडून काही शतके उलटली. निष्कर्ष, अनुमान आणि सत्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या विचारांना सोबत घेऊन प्रगतीच्या शिखराकडे जाऊ पाहणाऱ्या माणसांच्या अथक प्रयत्नातून विज्ञानाचे दीप उजळले. पण त्याचा प्रकाश अद्यापही काही उंबऱ्यांपर्यंत पोहचलाच नाही. देशाच्या वर्धिष्णू सामर्थ्याच्या, अस्मिताजागराच्या वार्ता करायच्या आणि दुसरीकडे अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटांवरून चालत जाऊन कुणातरी बुवाबाबाच्या आश्रमाचा रस्ता धरायचा. त्याच्या चरणी लीन होऊन, आपले दुःख सांगून मुक्तीचा मार्ग शोधायचा, याला काय म्हणावं? अशा वर्तनाला श्रद्धा म्हणणार असाल, तर अंधश्रद्धा कोणाला म्हणाल? श्रद्धा सार्वकालिक असते. ती असावी याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण अंधश्रद्धेची जळमटे समोर दिसत असूनही माणसं स्वतःहून त्यात अडकत जातात, तेव्हा विज्ञान मूक बनते. अवघं जगणंच बंदिस्त करणाऱ्या बंधनांना माणसे आशीर्वाद समजतात. असे असेल तर अद्यापही आपण अज्ञानाच्या अंधाऱ्या जंगलातून बाहेर आलेलोच नाहीत, असे म्हणणेच जास्त संयुक्तिक ठरेल. वैज्ञानिकांनी अथक प्रयत्नांनी अवकाशयाने चंद्र, मंगळापर्यंत यशस्वीरीत्या पोहचवली. पण दुर्दैव हे की, अंधश्रद्धाळू माणसांच्या मनापर्यंत विज्ञान पोहचू शकले नाही. आपल्या विनाशाचे पथ आपणच निवडून माणसं मार्ग आक्रमित असतील, तर दोष द्यावा कुणाला? अविचाराने घडणाऱ्या वर्तनाला की, अंधश्रद्धेलाच श्रद्धा समजून वागणाऱ्या मानसिकतेला.

ज्या देशाच्या मातीला विविध धर्माच्या तत्वज्ञानाच्या उन्नत परंपरांचा, विचारधारांचा समृद्ध वारसा आहे. कर्मयोग आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ हजारो वर्षे सोबत करीत आहेत, तेथे अंधश्रद्धा, कर्मकांड रुजतातच कसे? हे न उलगडणारे कोडे आहे. श्रद्धेच्या नावाखाली घडणाऱ्या कर्मकांडात फक्त दीन, दुबळे, वंचित, उपेक्षित, अशिक्षित, गरीबच सहभागी असतात असे नाही. गरीबश्रीमंत असा भेदभाव येथे नसतोच. असते ती आंधळ्या अनुकरणाची समानता, त्या समानतेचा केंद्रबिंदू असतो कुणीतरी स्वयंघोषित बुवाबाबा आणि त्याचे दांभिक आशीर्वाद. व्यवस्थेतील कोणतातरी कारभार चालवण्यासाठी नियुक्त केलेला जनप्रतिनिधीही आपला कार्यभार मुहूर्त पाहून स्वीकारत असेल, तेथे नवीन काही घडण्याची अपेक्षा करावी तरी कशी? विज्ञानतंत्रज्ञान शिकून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर उच्चपदस्थ झालेला कोणी एखादा अधिकारी-पदाधिकारी काही लाख किमतीच्या मोटारीत बसून आश्रमाच्या वाटेने पळत असेल, लेकरांपासून चित्रपटांपर्यंत नामकरण करण्यासाठी अक्षरांच्या संख्येची, अंकांची आकडेमोड केली जात असेल, तेथे जगण्याचे गणित हरते. सुशिक्षितांच्या, प्रतिष्ठितांच्या सुखासीन जगात असे घडत असेल, तर अशिक्षित सर्वसामान्यांना दोष देऊन काही उपयोग आहे का?

समाजातील ज्या वर्गाने आपल्या आचरणातून वर्तनाच्या तर्कशुद्ध आचरणपद्धतींचा आदर्श वस्तुपाठ घालून द्यावा, तेच अंधश्रद्धेच्या वाटेने निघत असतील, तर विज्ञानप्रणित विचारधारा अंगिकारून विरोध करणाऱ्यांच्या विरोधाची धार उरतेच किती? अज्ञानांत सुख शोधणाऱ्यांच्या जगात विरोधाचं अस्त्र घेऊन उभ्या ठाकणाऱ्यांना महत्त्व उरतेच किती? साधेपणा हेच जीवनाचे सौंदर्य मानणारे अनेक संत, महंत झाले. आपापल्या काळी सुधारणावादी विचारांच्या मशाली हाती घेऊन त्यांनी समाजजीवनातील अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटा उजळल्या. त्या निरासक्त संत, महंतांच्या देहावसानानंतर त्यांच्या कर्मयोगाच्या गाथा अंगिकारायच्याऐवजी त्यांनाच देवत्व प्रदान करून माणसे मोकळी झाली. मूर्ती तयार करून त्यांची प्रतिष्ठापना केली. त्यांचं कार्य हेच बावनकशी सोनं समजून त्यांनी दाखविलेल्या वाटेने चालत कर्मयोग आचरणात आणण्याऐवजी लोकोत्तर महात्म्यांच्या मूर्तींना सोन्याने मढविण्याची भक्तांमध्ये अहमहमिका लागली असेल, तर तेथे वास्तवाचा वस्तुनिष्ठपणे विचार करतोच कोण?

सामाजिकस्तरावर अज्ञानातून एक प्रकारचे वैचारिक मांद्य आले आहे. भोंदूगिरी करणाऱ्या बाबाबुवांना चालून आलेली ती आयतीच संधी असते. लोकमानस मुळातच सश्रद्ध असते. श्रद्धावंतांच्या प्रवाहाला आपल्याकडील थोड्याशा वाक्चातुर्याने वळते करण्याचे कसब अशा काही दांभिकांना बऱ्यापैकी अवगत असल्याने साधीभोळी, श्रद्धाशील माणसं सहज भुलतात. बहुतेक ढोंगी बुवाबाबांचे जीवनचरित्र तपासून पाहा, त्यात सद्विचारांचे बहरलेले मळे आढळतात का? दांभिकता ज्यांच्या जगण्यात खच्चून भरली आहे, तो जगाची दुःखे काय दूर करणार आहे, याचंही जरा भान माणसांना नसावं का? बुवाबाबांच्या भजनी लागलेलं लोकमानस हा विचार का करीत नसावं? नाहीतरी सांप्रतकाळी दांभिकता जीवनाच्या सर्वच क्षेत्राला व्यापून काकणभर शिल्लक उरलेली आहे. सत्याची चाड अन् असत्याची चीड दिवसेंदिवस कमीकमी होत चालली आहे.

निर्लेप, निर्मोही, निर्लोभीवृत्ती, उच्चध्येयवाद, उदारमनस्कता या गुणांनी बहरलेले परगणे उजाड होत चालले आहेत. श्रेष्ठ संतत्त्व हा शब्द शब्दकोशापुरातच उरला आहे की काय, असं म्हणण्याइतपत संदेह वातावरणात भरला आहे. नानांविध मुखवटे धारण करणारे साध्याभोळ्या माणसांना फसवण्यासाठी तत्पर आहेत. आध्यात्मिकतेची वसने परिधान करून लुच्चे, लफंगे जटा वाढवून, कफनी धारण करून उजळमाथ्याने समाजात वावरत आहेत. समाज आंधळ्या विचाराने निर्मित आस्थेतून त्यांना प्रतिष्ठा देत आहे. सहज घडणाऱ्या शिकारीसाठी जाळी अंथरून ते सावज हेरत असतात. परिस्थितीवश विकल झालेली माणसं विनासायास यांच्या हाती सापडतात. एकदा का ही सापडली की, यांचे मेंदू पद्धतशीर धुतले जातात. वॉश केलेले मेंदू स्वतःहून डोळ्यांवर आंधळेपणाच्या पट्ट्या बांधून घेतात. डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीने फक्त समोरील उजेड हरवतो, पण अंधश्रद्धेच्या बांधलेल्या झापडबंद पट्ट्यांनी विचारविश्वात अंधार होतो. अविचाराच्या अंधारात हरवलेल्यांचा प्रवास शोषणाच्या दिशेने सुरु होतो. पुढचं सारं आयुष्य शोषणाच्या वेदनादायी गाथांनी लिहिले जाते. शोषकांच्या अफाट लीला पाहून कोणाही संवेदनशील माणसांच्या कंठाशी प्राण यावा अशी स्थिती दिसते.

संत तुकाराम महाराजांनी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी अशा ढोंगबाजी विरोधात संघर्षाच्या मशाली पेटवून दांभिक, दुर्जनवृत्तीवर कठोर प्रहार केले. दंभ, अनीती, कपट, भ्रष्टआचरण असेल तेथे परमेश्वराचे अधिष्ठान कसे असेल? हा प्रश्न समाजाला विचारला. आपल्या शब्दांचीच अस्त्रे, शस्त्रे करून सद्विचारांचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजातील दंभावर कोरडे ओढताना सांगितले, ‘तुका म्हणे सोंग। दावी बाहेरील रंग। तुका म्हणे हाणोनि। त्यांचे फोडा तोंड॥’ एवढा ओजस्वी विचार सांगणारा अभंग लिहूनही आमच्या समाजातील अंधश्रद्धा अशीच अभंग राहणार असेल, तर तुकाराम महाराजांनाच इहलोकी पुन्हा अवतार धारण करून स्वार्थाची वसने परिधान करणाऱ्यांच्या कफन्या टराटरा फाडाव्या लागतील. लोकांच्या मनातील अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्यासाठी सावधगिरीचा इशारा करूनही काहीच कसे घडत नाही, हे एक नवल आहे.

‘तीर्थी धोंडापाणी। देव रोकडा सज्जनी ॥’ म्हणणाऱ्या तुकोबांचे शब्द आमच्यापर्यंत पोहचलेच नाहीत का? माझे काय होईल, कसे होईल? याची माणसाच्या मनात सतत भीती असते. कधीतरी कळतनकळत हातून एखादा छोटामोठा प्रमाद घडतो. घडलेल्या चुकीच्या वर्तनाचा सल मनात घर करून असतो. प्रमादाचे परिमार्जन करता यावे, त्यातून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात. मुक्तीचे मार्ग मिळवून मोक्षमार्गप्राप्तीची कामना माणसे करीत राहतात. मुक्तीपथ समोर दिसत नाही. संसारातील रोजच्या चक्रात गरगर फिरताना जेरीस आलेली माणसं दुःखांची अखंडित मालिका सोबत घेऊन जगतात. एक दुःखातून मुक्त व्हावे, तर दुसरे संकट समोर उभे. मन सैरभैर झालेले. समाधान, शांती मिळण्यासाठी जावे कुठे, हे सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न, समस्या भोंदू बुवाबाबांचे भक्कम भांडवल होतात. समस्या सोबत घेऊन जगणाऱ्या लोकांची परिस्थितीशरण मानसिकता यांच्या धंद्याला बरकत देणारी ठरते. वैयक्तिक समस्या सोबत घेऊन मठात, आश्रमात जाणारी माणसं यांचे सहज सावज ठरतात.

‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। साधू तोचि ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥’ हे तुकोबांनी आम्हाला सांगून तीन-साडेतीनशे वर्षे झाली. तरीही अंधश्रद्धाळूंच्या वर्तनात फारसे बदल घडतांना दिसत नाहीत. साधू कोण? संत, महंत कोण? हेही आम्हांस कळत नसेल, तर या इतके दुर्दैव आणखी काय असू शकते? श्रद्धाशील मनांनी इतकंही आंधळं असू नये, ज्यामुळे आपली अस्मिता, आपले सर्वस्व लुबाळले जाईल. स्वतःला ईश्वराचा अवतार समजणारे बुवाबाबा अध्यात्माच्या वाटेने लोकांना भूलवतात, झुलवतात. हे महान संत, महात्मे आहेत, तर यांना संपत्तीचा सोस कशापायी आहे? समाजातले दैन्य, दुःख, दारिद्र्य यांना दिसत नाही का? यांच्या निवासाच्या पंचतारांकित सुविधा, आश्रमासाठीच्या शेकडो एकर जमिनी, त्यावर उभारलेले अद्ययावत सुविधांनीमंडित सुखालये पाहून कोणाचीही मती गुंग व्हावी. सुखांची अनवरत बरसात करणाऱ्या येथील सुविधा पाहिल्यावर आपण खरंच दारिद्रयाशी लढणाऱ्या देशात राहतो आहोत का, असा संभ्रम पडावा. आंधळेभक्त आणि भोवतीने वावरणारा झापडबंद शिष्यगण बुवाबाबांच्या प्रासादतुल्य वास्तूंचं संरक्षक कवच बनून उभा राहतो. सुंदर ललनांचा सहवास भोंदूगिरी करणाऱ्यांच्या अवतारपथावरील मोक्षमार्ग असतो. यांचे महाल रंगमहाल बनतात. अशा काही दांभिकांच्या विकृत वर्तनाने शोषणाच्या बळी ठरलेल्या अनेक महिला आयुष्यातून उठतात.

अडलेल्या, नडलेल्या प्रजेला अगतिकतेतून मुक्तीचा काहीतरी मार्ग हवा असतो. यासाठी कुण्यातरी बुवाबाबांचा आश्रय ते शोधतात. भक्तांच्या आंधळ्या भक्तीचा फायदा घेऊन बुवाबाबा निष्क्रिय प्रारब्धवाद प्रबळ करीत राहतात. वैगुण्यांचा विरोध करण्याऐवजी त्यांचा विशेष विकास साधण्यालाच दुर्दैवाने अंधश्रद्ध भक्तांकडून सारासार विवेक विसरून प्राधान्य दिले जाते. अविवेकाने मनात एवढे ठाण मांडले असते की, कोणताही नवा विचार या आसमंतात प्रवेशित होऊच शकत नाही. आपण कोणाचे समर्थन करीत आहोत, याचा जराही विवेक नसणाऱ्या आणि अंधारवाटेने चालणाऱ्या शिष्यांची मांदियाळी यांच्यासाठी रस्त्यावर उतरते. सारासार विचारही नाकारणाऱ्यांच्या अंगात विसंगत उन्माद चढतो. अशावेळी व्यवस्थेने काय करावे? हे वैचारिक अधःपतन पाहून तुकोबांचेच शब्द आठवतात ते म्हणतात, ‘ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनी म्हणती साधू। अंगी लावूनिया राख। डोळे झाकूनि करिती पाप ॥’

श्रद्धांच्या नावाखाली लोकांची मनेच गोठली असतील, गोठवली जात असतील, अज्ञानाची आरास मांडली असेल, तर अज्ञानाच्या अंधारात विचार सहजरित्या बंदिस्त होतात. असत्याला लोकप्रियता लाभते. स्वार्थपरायण वृत्तीने वर्तणाऱ्यांच्या जगात सामान्य माणूस देवाशिवाय, प्रार्थनांशिवाय जगू शकत नाही का? असे जगणे वैयक्तिकरित्या संभव नसल्यास प्रार्थना, पूजा स्वतःपुरत्या सीमित ठेवता येणार नाहीत का? लोकपरलोक, पुनर्जन्म या गोष्टी सत्य किती, काल्पनिक किती याचा उहापोह न करता, याविषयी काहीही जाणून न घेता निष्क्रिय प्रारब्धवाद प्रबळ होत असेल, तर यापेक्षा आणखी विपरीत, विसंगत काय घडू शकते? वास्तव काय, अवास्तव काय? याचा विचार विज्ञानप्रणित जगात जीवनयापन करणारी माणसे विज्ञाननिर्मित भौतिकसुखांच्या सहवासात जगत असूनही करीत नसतील, तर अशा वर्तनविसंगतीतील दोष कुठे शोधावा? दोषावर उपाय आणावा कुठून? हे देवालाच माहीत, म्हणून सारंकाही देवाच्या अधीन करून देणार असू, तर त्याच देवाला उपाय विचारायला लागतील. डोळस श्रद्धेतून निर्मित विचारांनी देवाचं अस्तित्व आपण माणसे मानणार असू, तर त्या देवाकडे सगळ्यांसाठी एकच मागणे मागावेसे वाटते, ‘शहाणपण देगा देवा...!’

Shraddha | श्रद्धा

By // No comments:
माणूस एक श्रद्धाशील जीव आहे. आपला इहलोकीचा प्रवास सुखावह व्हावा, ही अपेक्षा त्याच्या मनात कायमच असते. या आस्थेतून अनेक श्रद्धा त्याच्या अंतर्यामी उदित होतात. श्रद्धेतून मिळवलेल्या पावलापुरत्या प्रकाशात तो जीवनाची वाट शोधीत असतो. जीवनाविषयी, जीवनाशी निगडित श्रद्धा जोपासत त्याची इहलोकीची यात्रा अनवरत सुरु आहे. आदिम अवस्थेतील सुविधांचा अभाव असणाऱ्या जगण्यापासून, तर आजच्या सुविधांनीमंडित जगण्यापर्यंत त्याला सोबत करणाऱ्या श्रद्धा आणि त्यातून निर्मित विचारधारा हेच प्रगतीचे गमक आहे, असे समजून तो आपले परगणे निर्माण करीत आहे. त्या प्रदेशांपर्यंत पोहचण्याचे पथ तयार करीत आहे. आपल्यापुरत्या अभ्युदयाच्या संकल्पना तयार करून जीवनाची वाट चालतो आहे.

जन्माला आलेल्या साऱ्या जिवांची जगण्याची धडपड ही नैसर्गिक, स्वाभाविक, सहज प्रवृत्ती आहे. माणसाव्यतिरिक्त असंख्य जीवजातीचं सहस्रावधी वर्षापासून पृथ्वीवर वास्तव्य आहे. आपापल्या परिघात निसर्गनिर्मित प्रेरणा सोबत घेऊन ते जगत आहेत. त्यांच्या जगण्याचे आविष्कार वैयक्तिक जीवनधारणेव्यतिरिक्त सहसा आविष्कृत होताना दिसत नाहीत. त्यांच्या गरजा शरीरधर्मापुरत्या सीमित असतात; पण माणसांचे जगणे इतके संकुचित कधीच नसते. नवनिर्माणाची सहज भावना त्याला नवनव्या परगण्यांकडे आकर्षित करीत असते. या आकर्षणातून नानाविध रंग धारण करून त्याचे जीवन आविष्कृत होत असते. त्याच्या जगण्याचे पदर नानाविध रंग धारण करतात. हे रंग कधी नजरेत भरण्याइतके गडद असतात, तर कधी परिस्थितीवश धूसर होत जातात. कधी प्रतिकूलतेचे मळभ दाटून आल्याने क्षणभर नाहीसे होतात, तर कधी परिस्थितीच्या आवर्तात सापडून नूर हरवून बसतात. माणसांची जिगीषा नवे आयाम निर्माण करीत ईप्सित साध्य करण्यासाठी अंतर्यामी असणाऱ्या श्रद्धेच्या बळावर मार्गक्रमण करीत पुढे जात आहे. सुखदायक जीवनाविषयी असलेल्या आस्थेमुळे परिस्थितीने मोडलेला डाव पुन्हापुन्हा मांडून नव्याने खेळाचे पट तो अंथरत जातो.

आस्था, श्रद्धा हे शब्दच असे आहेत की, ज्यांच्यात विपरीत स्थितीतही टिकून राहण्यासाठी आशेचा पुसटसा का असेना, एक किरण दिसतो. त्या वाटेने प्रवास करीत माणूस आपल्या श्रद्धास्थळांपर्यंत पोहचतो. पुढे उभ्या ठाकलेल्या अनेक आपत्ती, संकटांशी दोन हात करीत राहतो. संघर्ष माणसाचा निसर्गदत्त स्वभाव आहे. त्याच्या इहलोकीच्या लाखो वर्षाच्या प्रवासाचे संचित आहे. त्याच्याठायी असणाऱ्या संघर्षशीलतेमुळेच तो सर्वश्रेष्ठ सजीव ठरला आहे. जीवनाच्या आदिम अवस्थेत जगताना भाकरीचा धड एक तुकडा मिळवायची अक्कल नसणाऱ्या आदिमानवापासून सांप्रतकाळी प्रगतीचे नवनवे आयाम प्रस्थापित करणाऱ्या माणसापर्यंतच्या प्रवासाचे यश त्याच्या संघर्षशील वृत्तीत समावलेले आहे.

निसर्गाच्या अफाट ताकदीचा प्रत्यय घेत, प्रसंगी त्याच्याशी धडका देत तो इहतली टिकून राहिला आहे. या मागचं कारण त्याची जीवनावर असणारी श्रद्धा हेच आहे. कधीकाळी महाकाय प्राण्यांचा अधिवास असणारी पृथ्वी आज माणसाच्या सामर्थ्याने निर्मित नव्या क्षितिजांना सोबत घेऊन उभी आहे. कधीकाळी आपल्या अस्तित्वाने सारं आसमंत दणाणून टाकणारे काही महाकाय प्राणी आज पृथ्वीवर अस्तित्वात नाहीत. कधीच नामशेष झाले आहेत. माणूस टिकून आहे, कारण त्याच्यातील संघर्षशील वृत्ती. निसर्गात संघर्ष करतात तेच टिकतात, हे सार्वकालिक सत्य आहे. याबाबत निसर्ग कधीच पक्षपात करीत नाही. श्रेष्ठ तेच आणि तेवढंच टिकतं. उत्क्रांतीच्या सिद्धांतातील क्रमविकासात श्रेष्ठत्वाकडचाच प्रवास अपेक्षित आहे. वानराचा नर आणि नराचा नारायण होणे निसर्गाला अभिप्रेत असतं.

माणसाच्या जगण्याचा श्रद्धाशील प्रवास सोपा कधीच नव्हता, आजही तसा नाहीच. त्याच्या जगण्याचे, असण्याचे त्यावेळचे प्रश्न वेगळे होते. आजचे प्रश्न निराळे आहेत एवढेच. कालोपघात त्यांची तीव्रता कधीही कमी झाली नाही. निसर्गाशी, परिस्थितीशी झगडणारा माणूस व्यक्ती, कुटुंब, समूह, समाज असा संघटीत होत गेला. संघटीत होताना समान इच्छाआकांक्षांचे एकत्रीकरण घडून आपापले परगणे तयार झाले. स्वामित्वाची, मालकीची भावना उदित झाली. आपले अधिराज्य अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष घडले. संघर्ष कोणताही असो, तो सुगम कधीच नसतो. अस्तित्व टिकून राहावे म्हणून वेगवेगळे अभिनिवेश माणसाने धारण केले. कलह घडले. अवघे जीवितच पणाला लागले. अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी प्रसंगी रक्तपात घडला. सततच्या संघर्षात टिकून राहण्याच्या मानसिकतेतून मनात काही श्रद्धा निर्माण झाल्या. श्रद्धांना मूर्तरूप देताना प्रतीके प्रकटली. प्रतीकांच्या मूर्ती घडल्या. मूर्तींना देवत्व प्रदान केलं गेलं. त्यातून आपला कोणीतरी तारणहार, रक्षणकर्ता आहे अशी भावना मनात निर्माण झाली. त्यालाच देव, देवता या संज्ञांनी मुखरित केले गेले. हे करताना श्रद्धांचं सार्वत्रिकीकरण होऊन देव, मंदिरे, तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. काही समान, काही वैयक्तिक इच्छाआकांक्षा असणारी माणसं श्रद्धाशील अंतकरणाने त्यांच्यासमोर नतमस्तक झाली.

श्रद्धाशील मनांनी जगण्याला सुखकर करण्याच्या आसक्तीतून दैवाला, देवाला सुख निर्मितीचं श्रेय दिलं. देव नावाचं अस्तित्व मानून आपल्या श्रद्धांनी पूजले. पूजणारे आस्तिक ठरले. निसर्गाच्या नियमांनी विश्वाचे व्यवहार नियंत्रित होतात. निसर्ग कुणाच्या आज्ञेने वर्तत नाही. त्याचे नियम ठरलेले आहेत. तेथे कुणाचा हस्तक्षेप, नियंत्रण वगैरे असं काहीही नसतं म्हणणारे नास्तिक म्हणून ओळखले गेले. जगात आस्तिक, नास्तिक विचारधारांमधील वैचारिक भेद कायमच वास्तव्य करून आहे. हे सारं आहे की, नाही या निर्णयाप्रत पोहचता आले नाही, ते अज्ञेयवादी राहिले. प्रत्येकाचे प्रकटीकरणाचे मार्ग भिन्न आहेत. पण या साऱ्यांमध्ये एक गोष्ट समान होती आणि आहे, ती म्हणजे प्रत्येकाची जीवनावरची, विचारांवरची श्रद्धा. आपापल्या विचारांवर असणारी यांची श्रद्धा खोटी आहे, असे म्हणता येईल का? नाहीच, कारण जीवनयापनाचे पथ वेगवेगळे असले, तरी प्रत्येकाचं जगण्याचं प्रयोजन उन्नत, सुखासीन आयुष्य वाट्याला यावं हेच आहे. अशा जगण्याचे श्रेय कोणी देवाला देतात, कोणी निसर्गाला देतात एवढेच. त्यालाच कोणी श्रद्धा असे नाव देतात, कोणी निसर्ग नियमांनी हे सारं घडतं आहे, असं म्हणतात इतकेच.

देव आहे की नाही, हा वादाचा विषय आहे किंवा असू शकतो. तो असला म्हणून काही फरक पडतो असे नाही आणि नसला म्हणून काही वेगळे घडते, घडेल असेही नाही. विश्वाचा व्यवहार आपल्या नियत मार्गाने सुरु आहे. कालचक्र आपल्या गतीने चालले आहे. ते काही उलट दिशेने फिरवता येत नाही. माणसांना जीवनयापनासाठी प्रयत्नपूर्वक काहीतरी करावं लागतं. जगण्याची सर्वसंमत प्रयोजने शोधावी लागतात. नीतिसंमत मार्गाने वर्तावे लागते. उभं राहण्यासाठी कशाचातरी आधार हवा असतो. तो आधार त्याच्याकडून काढून घेतल्यास कोसळतो. श्रद्धेचंही तसंच आहे. श्रद्धा जीवनातून काढून घेतली तर माणूस कोसळेल. म्हणूनच श्रद्धेच्या बळावर एकलव्य श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकतो. नाहीतरी जगण्यासाठी आपण जे काही करतो ते जीवनावर श्रद्धा असते म्हणूनच ना! निसर्ग त्याच्या नियमांनी बद्ध असला, तरी त्या नियमांवर आपली श्रद्धा असतेच. श्रद्धा टाळून काही करता येईल, असे वाटत नाही. बाळ आईच्या कुशीत शांतपणे निद्रिस्त झालेले असते, कारण त्याची आईवर असणारी श्रद्धा. हीच गोष्ट त्याला निश्चिंत करीत असते.

जगण्याचे प्रश्न सतत बदलत असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. माणसांचं कालचं सीमित जग आज व्यापक झालं आहे. नव्या समस्या निर्माण होत आहेत. अनेक नवे प्रश्न समोर उभे आहेत. प्रश्नांचे संदर्भ बदललेले आहेत. ते सामाजिक, आर्थिक, राजकीय आहेत तसेच वैयक्तिकही आहेत. पद आणि पैसा यातून येणारा मुजोरपणा दिसतो, तशी परिस्थितीवश विकलताही नजरेस पडते. विकलता माणसाला अधिक श्रद्धाशील बनवते. कुठलातरी आधार शोधते. शोध घेणारी मने कोणत्यातरी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विसावतात. कोण्यातरी बुवा, बाबांच्या आश्रयाला जाऊन थांबतात. अशावेळी डोळसभक्तीचा विचार मागे पडतो. गतानुगतिक मार्गाने वागणे घडत राहते. पीडित मने थाऱ्यावर नसल्याने सैरभैर होऊन पाचोळ्याप्रमाणे भरकटत राहतात. पैशाच्या बळावर सारी सुखं विकत घेता येतात, अशा मानसिकतेत जगणाऱ्यांना याची दाहकता जाणवत नसेल कदाचित. त्यांच्या मनातील अस्वस्थता, अशांतातही श्रद्धा धारण करून प्रकटत असते. तीर्थक्षेत्री जाऊन लाखालाखांच्या दागिन्यांनी त्यांच्याकडून देवाला मढविले जाते. त्यांच्या दानाला प्रसिद्धी मिळते. श्रद्धेतून निर्मित समाधान त्यांच्या अंगणी प्रकटते. कृतकृत्य झाल्याचा आनंद अंतर्यामी फुलतो. दूरवर कुठेतरी भुकेने विव्हळणारी, तळमळणारी अनेक माणसं परिस्थितीशी धडका देऊनही उपेक्षित राहतात. वाट्याला येणाऱ्या विपरीत परिस्थितीशी सामना करीत थकतात. हताशेतून जीवनात आलेल्या किंकर्तव्यमूढतेतून मुक्तीचे मार्ग देवाच्या दारी शोधतात. पदर पसरून ओंजळभर सुख मागतात.

माणसांच्या मनातील श्रद्धा कशी असेल, याचे गणित सूत्रबद्ध रीतीने मांडता येणे अशक्य आहे. श्रद्धाशील मनांचे वेगवेगळे आविष्कार अवतीभोवती प्रकटताना अनेकदा दिसतात. नवससायास करून देव, दैवतांना प्रसन्न करणारी, अनवाणी पायांनी कुठल्यातरी तीर्थक्षेत्री धावणारी, आत्मक्लेशांनी संतुष्ट होणारी माणसं पाहिली म्हणजे अज्ञान आणि विज्ञान शब्दाचा अर्थ उलगडायला लागतो. तीर्थस्थळी असणाऱ्या नद्यांना गतकाळाचे वैभव आता राहिले नाही. तरीही त्यांनाच गंगा समजून वाहणाऱ्या प्रदूषित पाण्यात डुबक्या मारणाऱ्यासमोर विज्ञान हतबुद्ध होते. कधीकाळी पाण्याने तुडुंब भरून नद्या बारमाही वाहत होत्या, तेव्हा कदाचित त्या पाण्यात स्नान करणे संयुक्तिक असेल, पुण्यसंपादनाचा त्यांच्यापुरता तो एक मार्ग असेल; पण या वाहत्या गंगांच्या आज गटारगंगा झाल्या आहेत. असे असूनही माणसं त्याच आस्थेने अजूनही पाण्यात डुबक्या मारीत असतील, तर याला काय म्हणावे?

नद्यांच्या शुद्धीकरणाकरिता आपण काही उपाय करायचे सोडून केवळ स्नानाने पुण्य संपादन करण्यासाठी डोळ्यांनी दिसणाऱ्या, पण श्रद्धेला न दिसणाऱ्या प्रदूषित पाण्यात भारावलेल्या अंतकरणाने स्नान करत असतील, तर ही कोणती डोळस श्रद्धा म्हणावी? हे सगळं म्हणजे ज्याची-त्याची श्रद्धा, असे म्हणून दुर्लाक्षित करण्यासारखे आहे का? जशी त्यांची श्रद्धा तसे वागणे घडेल, असे म्हणून प्रश्न सुटतील का? देवालयाच्या गाभाऱ्यात मानसिक शांतीच्या शोधासाठी जावे, तर तेथेही वाट्याला वणवणच यावी. देवाचा शोध राहतो बाजूलाच. असुविधांचाच त्रास अधिक अशी वेळ येते. हे पाहून क्षणभर आपणच आपला विचार करतो, काय म्हणून गर्दीत आलो असेल? येणारे शेकडो भाविक देवाच्या चरणी चार क्षणांसाठी लीन होतात; पण जेवढा वेळ धावत्या दर्शनात मिळतो तेवढ्या वेळात मनातील भक्तीभाव खरंच तृप्त होत असेल का?

जगण्याच्या संघर्षात पाचोळ्याप्रमाणे गरागरा फिरणारी, रोजच्या व्यापात भोळवंडून निघालेली माणसं शांततेच्या शोधार्थ बाहेर पडतात. पण जावं तेथे गर्दी. आजूबाजूला असणारा माणसांच्या स्वार्थपरायण जगण्याचा बाजार. या बाजारातील बेगडी व्यवहार, श्रद्धेच्या, भक्तीच्या नावाखाली वाढलेली बजबजपुरी. माणसांच्या भोळ्या श्रद्धांचा घेतला जाणारा पद्धतशीर फायदा, हे सारं भक्तांची देव, दैवतांवर असीम श्रद्धा असूनही का बदलत नाहीत? शेकडो वर्षापासून आमच्या संत, महंतांनी कर्मयोग हाच जीवनयोग असल्याचे सांगून ठेवले आहे. असे असूनही आमच्या मानसिकतेत थोडेतरी परिवर्तन व्हायला नको का? आपल्या नियत कर्मालाच लोक परमेश्वर का समजत नसतील? ‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’, हा उपदेश फक्त गाडगेबाबांपुरताच का सीमित राहत असेल? ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणणाऱ्या सावता महाराजांना जे उमगले ते आपण किती अंगिकारले? संतांची जगण्याची ही सोपी रीत आपण आणखी अवघड करून ठेवली आहे. या अवघड जगण्यालाच श्रद्धा म्हणून वर्तणे, हा आमच्या वर्तनप्रवाहाचा विपर्यास नव्हे का?

आधुनिक संत, महंत, बुवांचे प्रवचन कीर्तनाचे ओसंडून वाहणारे मंडप पाहिले की आश्चर्य वाटते. श्रद्धाशील भक्तांची गंगा दुथडी भरून अनवरत वाहत असते. दुसरीकडे विचारवंतांच्या व्याख्यानांचे विचारमंच रिते रिते दिसतात. विचारजागरातून माणसांना काहीच गवसत नसेल का? माणसाकडे विज्ञाननिर्मित सुखं खूप आलीत. समृद्धीच्या गंगेचे पात्रही भरून वाहते आहे; पण मनातील प्रसन्नतेचे प्रवाह आटत चालले आहेत. व्यापकपणाचे आकाश संकुचित होत चालले आहे. आपलेपणाच्या सीमा आक्रसत चालल्या आहेत. अतृप्त, अशांत, सैरभैर मने शांततेच्या शोधार्थ वणवण भटकत आहेत. कोणातरी बुवा, बाबांच्या आश्रयार्थ जाऊन त्याच्या चरणी लीन होत आहेत. मंदिरांमध्ये जाणाऱ्या भक्तांच्या रांगा वाढत आहेत. तेथे तासंतास प्रतीक्षा करूनही फारसे काही हाती लागत असेल असे वाटत नाही, कारण तसे असते तर समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. दैन्य, दास्य, दारिद्र्य राहिलेच नसते.

आसपास अन्याय, अत्याचार घडतोच आहे. नैतिकतेचे अधःपतन होतच आहे. मूल्यप्रणित आणि मूल्यप्रेरित विचारांनी जीवनातून काढता पाय घेतला आहे. आसक्तीच्या परिघात माणसाचा स्वार्थपरायण आत्मशोध सुरु आहे. असे चित्र आसपासच्या आसमंतात असेल, तर मूल्यांच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्या क्षितिजावरील दैवताला श्रद्धाशील अंतकरणाने शरण जाऊन साकडे घालावे? कोणत्या क्षेत्री पदर पसरून उभे राहावे? कोणत्या देवाला ओंजळभर चांगूलपण मागावे? ईश्वर अरत्र, परत्र, सर्वत्र असल्याची श्रद्धा मनीमानसी असते. असे असेल तर आपल्या मनालाच देव्हारा करून त्यात मांगल्याची कामना करणाऱ्या विचारांची प्रतिष्ठापना करायला काय हरकत आहे? ‘नसे राउळी वा मंदिरी, जेथे राबतात हात तेथे असतो हरी’ असे म्हणतात. कर्मयोगात देव असेल, तर कर्मालाच आपले दैवत करून श्रद्धाशील अंतकरणाने त्याचीच पूजा आपण का बांधू नये?