Saturday 17 February 2024

कविता समजून घेताना... भाग: अठरा

नाही रमत जीव या अजस्त्र शहरात

नाही रमत जीव
या अजस्त्र शहरात
इथले रस्ते रस्त्यांना मिळतात
आणि गिळतात देखील...
पसरून आहेत अजस्त्र अजगरासारखे हे रस्ते
स्वतःमधे वाकडे तिकडे गोलगोल
जीवे वाचण्याच्या अट्टाहासाला
हे शहर बर्म्युडा ट्रँगलसारखे
खेचत जाते आतआत
नि नेत असते खोल खोल

सहमत नाही होता आले की,
तोहमत येतेच मग...
त्यापेक्षा वाहत राहावे इथल्या रस्त्यावरून
स्वतःच्या इच्छेला चार गोष्टी समजावत
इच्छा असो वा नसो

विरोध हेच मरण
शरण हेच जीवन
हेच अजस्त्र शहराचे सूत्र

मी मित्राच्या फोरव्हिलरमधून,
लोकलमधून, बसमधून, रिक्षामधून
तर कधी पायीपायी
वाहतो आहे या शहरातून

हे गोलगोल गरगरणे
मला नेईल या शहराच्या मुळाशी
निमुळत्या स्क्रूसारखे

मला खात्री आहे
सहमतीचे स्मित करत
हे शहर
माझे बोट सोडणार आहे
तोपर्यंत
इथे
सहमतीने गरगरायला
पर्याय नाही

कमलाकर आत्माराम देसले
*
माणूस कसा असावा हे सांगता येतं. पण तो कसा असतो, हे अनुभवल्याशिवाय नाही कळत. कोणत्या विचारांनी त्याने वर्तावे याबाबत काही अपेक्षा करता येतात. प्रासंगिक वर्तनावरून त्याच्यासंदर्भात काही अनुमानही बांधता येतात. पण तो आकळतोच असे नाही. विशिष्ट परिभाषा वापरून आयुष्याची प्रयोजने जशी अधोरेखित करता येतात, तश्याच भरल्यापोटी वर्तनाच्या परिभाषा तयार करता येतात. पण हातातोंडाची गाठ सहजी न पडणाऱ्याला विचारा त्याचे आदर्श नेमके कोणते असतात? आदर्शांची परिमाणे शोधायचीच असतील, तर भुकेइतके प्रांजळ उत्तर मिळणे असंभव. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस अख्खं आयुष्य हातावर घेऊन वणवण करीत असतो. कोणी काहीही सांगितले, तरी जगणं भाकरीभोवती बांधलेलं असतं, या वास्तवापासून पलायन करता येत नाही. नाकारताही येत नाही? स्वीकारावे तर पर्याप्त संधी प्राप्त होतीलच असे नाही. आयुष्याचे उन्नत, प्रगत वगैरे प्रयोजने अधोरेखित करून कोणी मांडली, तरी जगण्याचे संदर्भ आणि टिकून राहण्याचे संघर्ष भाकरीजवळ येऊन संपतात, हे कसे नाकारता येईल? आकाशातला चंद्र पाहणाऱ्याला देखणा वगैरे वाटत असला, तरी भाकरीचा चंद्र जगण्याचं वास्तव असतं अन् त्यावर काही प्रेमकविता लिहिता येत नसतात. भाकरी आयुष्याच्या असल्या नसल्या प्रयोजनांचं उत्तर असतं अन् या उत्तराच्या शोधात घडणारी वणवणही.

आयुष्याने जगण्यात अधोरेखित केलेले प्रश्न समजून घायला लागतात. उत्तरांसाठी मार्ग निर्धारित करून विकल्प पडताळून पाहायला लागतात. पोटाला जगणं बांधून कोणी वहिवाटीच्या वाटा निवडून निघतो. कोणी अज्ञात परगण्याकडे नेणाऱ्या मार्गांचे परिशीलन करतो. कोणी मळलेल्या वाटा मोडून चालता होतो. वाटा केवळ वळत्या पावलांना दिशा देण्याचे साधन नसतात, तर जगण्याच्या प्रयोजनांना मोहरलेपण देणाऱ्याही असतात. अज्ञात प्रदेशांना जोडणाऱ्या वाटेवरचा प्रवास माणसांच्या तात्कालिक गरजांचा शोध असतो. अर्थपूर्ण जगण्याची आस मनात अधिवास करून असते. कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपसित हवे असणारे काहीतरी शोधत चालणे घडते. उपजीविकेसाठी देशांतर घडून माणसे ज्ञात-अज्ञात प्रदेशात पोहचतात. आकांक्षेच्या गगनात सुखाचे सदन शोधत राहतात. पण मनी वसतीला असलेल्या क्षितिजांपर्यंत पोहोचणं काही सहजसाध्य नसतं.

आयुष्यात समस्यांची कमतरता कधी नसते? कालानुरूप त्यांची रूपे वेगळी असतात इतकेच. पोटात खड्डा पाडणारी भूक अस्वस्थ वणवण करायला भाग पाडते. जगणं पणाला लावणारा संघर्ष सार्वकालिक सत्य आहे. भाकरीभोवती साकळलेल्या ओंजळभर आकांक्षांचा शोध आयुष्यभर पुरतो. अनेकांची आयुष्ये या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपतात. आजही यात फार सुगमता आली आहे असे नाही. अपेक्षांच्या पावलांनी चालत येणाऱ्या विवंचना संपल्या आहेत असेही नाही. प्रश्न कधी नव्हते? काल होते, आज आहेत आणि उद्या कदाचित तीव्र-कोमल किंवा आणखी काही असतील. मनात सुखांची संकल्पित चित्रे साकारलेली असतात. तेथे पोचण्याच्या मनीषेने सगळेच पळतायेत आपापली गाठोडी घेऊन. भलेही ती स्वेच्छेने डोईवर घेतलेली असतील अथवा परिस्थितीने लादलेली असतील. पळती पावले भटकंती सोबत घेऊन येतात हेही खरेच.

गाव, गावगाडा, आपली माणसे सोडून काही कोणी सहजी स्थलांतर करीत नाही. स्थिर जगण्याचे साधन उपलब्ध असेल, तर मनात संदेह नसतो. भाकरीच्या शोधार्थ वेस ओलांडून जाणं आनंददायी कसं असू शकतं? पायाखालच्या मातीला घट्ट बिलगून असलेली  अस्तित्वाची मुळं सैलावणं वेदनादायीच असतं. मातीचं सत्व आणि स्वत्व घेऊन वाढणारं रोपटं काढून दुसऱ्या जागी रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी होईलच असे नाही. केला तरी ते जोमाने वाढेलच याची शाश्वती नाही देता येत. मातीपासून विलग होण्याची सल घेऊन ही कविता वाहत राहते. आस्थेचा गंध घेऊन मनाच्या आसमंतात विहरत राहते. आशयघन शब्दांचा हात पकडून वाचकासोबत भटकत राहते. आपलं असं काहीतरी मागे टाकून आल्याची रुखरुख घेऊन. समर्पक प्रतिमा कवितेच्या आशयाला उंची प्रदान करतात. सहजपणाचे साज लेवून आलेल्या शब्दांच्या प्रतिध्वनीचे पडसाद मनाच्या प्रतलावरून परावर्तीत होत राहतात. जगण्याचा वाटा कोणाला कुठे आणतील, हे काळालाही अवगत नसते बहुदा. अनेकातील एक वाट उपजीविकेच्या उतारांना धरून शहराच्या दिशेने सरकत राहते अन् थांबते प्रश्नांचे गुंते घेऊन विणलेल्या जाळ्यात. जगण्याची प्रयोजने शोधतांना हरवत जाणाऱ्या आपणच आपल्या असण्याशी आणि त्या असण्याने आलेल्या अर्थांशी जुळवून घेताना होणारी मनाची तगमग कवितेतून ठळक होत राहते. जाणिव करून देते आपल्या अगतिकतेची. आयुष्यात अधिवास करणाऱ्या अपुरेपणाची.

शहर नावाच्या अजस्त्र पसाऱ्यात आपल्या अस्तित्वाचे आयाम शोधतांना आतून तुटणं कोणालाही नाही विसरता येत. येथला झगमगाट डोळ्यांना सुखावणारा असला, तरी मनाला समाधान देणारा असेलच असे नाही. विकास, अभ्युदय वगैरे परिस्थतीसापेक्ष संज्ञांचा अर्थ कोणाला कसा समजावा, हा भाग वेगळा. पण वास्तव हेही आहे की प्रगतीच्या परिभाषा शहराभोवती प्रदक्षिणा करीत आल्या आहेत आणि असतीलही. बेगडी झगमगाटाच्या विश्वात उपरेपण घेऊन नांदणाऱ्या जगातला सामान्य वकुब असणारा माणूस सामावतोच असे नाही. अंगावरून गुळगुळीतपणा पांघरून पडलेले रस्ते गर्दीने भरून वाहत असले, तरी त्यात आपलेपणाचा ओलावा असेलच असे नाही. रस्त्यांच्या दुतर्फा ओसंडून वाहणारी संपन्नता, म्हणजे आयुष्याच्या विकासाचे हमीपत्र नसते. आकाशाला स्पर्श करू पाहण्याची इमारतींमध्ये लागलेली स्पर्धा म्हणजे जगण्याची उंची नसते. महागड्या गाड्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावतांना दिसणे, याचा अर्थ जगण्याच्या प्रगतीने वेग धारण केला आहे असा होत नाही. इकडून तिकडून आलेल्या रस्त्यांनी गळाभेट घेणे, म्हणजे त्यावरून चालणाऱ्या माणसांच्या प्रगतीचे पथ प्रशस्त झाले असा नाही. रस्त्यांच्या संगमठिकाणांनावर थुईथुई नाचणारी कारंजी नेत्रसुखद असतीलही; पण कोरड्या डोळ्यात अनेक प्रश्नचिन्हे घेऊन शहराच्या उदरात साकळलेली सुखे वेचून आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणा प्रगतीचे परिमाण नसते. रस्ते केवळ शहराच्या सीमांना वेढून नसतात. अजगरासारखे पडलेले रस्ते विळखा घालून बसतात अनेकांच्या आकांक्षांना.

बर्म्युडा ट्रँगलमध्ये जहाजे, विमाने हरवली. कदाचित गूढ असं काही असेल या प्रदेशात. त्यामागे असणाऱ्या कारणांची उकल विज्ञानाने केली. आणखी काही हाती लागेलही. पण शहरांच्या कोणत्याही कोनात गेला तरी माणूस हरवतो, स्वतःपासून, आपल्या असण्या-नसण्यापासून, त्याची उकल कोणत्या शास्त्राने करता येईल? शहर नावाच्या वर्तुळात अशी कोणती शक्ती अधिवास करून असते कोणास ठावूक, जी माणसांना आपल्यात ओढून तर घेते; पण बाहेर पडायचे मार्ग अवरुद्ध करते. अभिमन्यूच्या चक्रव्यूहातील प्रवेशात परतीची संधी होती, पण शहराच्या व्यूहातून परतीचे मार्ग धूसर का राहत असतील? शहरात केवळ स्वप्ने हरवतात असे नाही, तर आनंदाचं सदन शोधण्यासाठी वणवण भटकणारी माणसे आकांक्षांचे गगन हरवून बसतात. त्याच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडायचा कितीही प्रयत्न केला, तरी निघता येणं अवघड होऊन जातं. शहरे माणसांच्या कोणत्या अगतिकतेला ओळखून असतात, कोणास माहीत?

समस्याच्या साच्यात अडकलेल्या जगण्याला कसले आलेयेत आकार अन् कसल्या आल्यायेत आकृत्या. विकल्प हरवलेल्यांच्या हाती निवडीचे पर्याय असतातच किती? सहमत व्हा अथवा तोहमतीला सामोरे जा, एवढा एकच पर्याय हाती असेल, तर हतबल होण्याशिवाय उरतेच काय? प्रवाहाच्या विरोधात वाहणे पराक्रमाची परिभाषा असेलही. पण मनगटात बळ असूनही केवळ अगतिकतेमुळे शस्त्र म्यान करावं लागत असेल तर... आल्या गोष्टीना आपलं म्हणावं का? आकांक्षा, अस्मितांना गहाण टाकून जगणं आयुष्याचं संयुक्तिक प्रयोजन नाही होऊ शकत. अगतिकता स्वप्नांना, अस्मितांना संपवते, हे कसे नाकारता येईल?

जगण्याची समाजसंमत सूत्रे असली, तरी शरणागताला कोणत्या सूत्रांच्या निवडीचं स्वतंत्र्य असतं? तुम्ही एकदाका गर्दीचा भाग झालात की, कसला आलायं स्वतंत्र चेहरा? खरंतर तो बिनचेहऱ्याच्या गर्दीत कधीच आपली ओळख भिरकावून आलेला असतो. मागे उरतो केवळ मुखवटा. तो स्वच्छेने स्वीकारलेला असेल अथवा नसेल. त्याला परिधान करून जगणं भागधेय बनलं की, गर्दीत विहरताना आघातांची काळजी करण्यापेक्षा गर्दीचा एक भाग बनण्याची धडपड क्रमप्राप्त होते. अफाट पसाऱ्यात वाहत राहण्याशिवाय मार्ग नसतो. शहरच आपल्याला आत ओढत नेतं. एखाद्या स्क्रू सारखं आत ढकलत राहतं, चौकटीत फिट्ट बसवताना. चौकटी काही अभावग्रस्तांच्या मर्जीने आकारास येत नसतात. प्रभाव असणाऱ्यांच्या आज्ञेने त्या घडतात. अभावात आयुष्याचे अर्थ शोधणाऱ्यांनी चौकटींच्या आकारचं व्हावं अथवा आहे ते पर्याप्त मानून जगण्याच्या वाटा वाहिवाटीच्या म्हणून चालत राहावं, एवढेच विकल्प हाती उरतात. सामावणे आधी, मग विचार करणे चौकटींच्या जगाचा अलिखित नियम असतो. अगतिकांच्या आयुष्याला तसेही विचार करण्याचे स्वातंत्र्य असतेच किती?

अर्थात, या सगळ्यामागे कारणवश सहमती असेल अथवा नसेलही. कारणे काही असली, तरी चेहऱ्यावर स्मित कायम ठेऊन शहराचा एक घटक व्हावं लागतं. सहमतीचं शास्त्र अवगत झालं की, वेदनांचे आवाज हळूहळू हरवतात. हताशा असो की, निराशा शहराच्या हाती एकदाका बोट दिलं की, ते सहजी नाही काढून घेता येत. त्याला पर्यायही नसतो. तसेही आयुष्य काही फुलपाखराचे रंग लेऊन विहार करीत नसते. त्यात संगतीपेक्षा विसंगतीच अधिक असते. उपेक्षा, विवंचना, समस्यांना आयुष्यात कमतरता कधी असते? सुखांचा सोस असणे वेगळे आणि पावलापुरता प्रकाश शोधत अंधारलेल्या कोपऱ्याच्या पदरी उजेडाचं दान टाकणारं चांदणं आणण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, त्याहून वेगळे असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
**

No comments:

Post a Comment