Wednesday, 18 June 2025

संथ वाहणं हरवलंय...

जगण्याचं संथ वाहणं हरवलंय. सगळ्यांनाच पुढे निघायची घाई झालीये. थोडे जरी ढेपाळलो तरी मागे पडू, ही भीती मनात अधिवास करून आहे. स्पर्धेचा कोलाहल एवढा वाढलाय की, वेदनांचा आवाजही कुणापर्यंत पोहचत नाही. जगण्यात उरलाय केवळ वेग. वेगाशी सलगी करत धावणे अनिवार्यता झाली आहे. अर्थात, या साऱ्यास तुम्ही प्रत्यक्ष जबाबदार असायलाच हवं असं नाही. कळत असेल किंवा नकळत ही पुण्याई तुमच्या पदरी जमा होत असते. ती कुठून कशी चालत तुमच्या अंगणी येईल सांगणं अवघड आहे. त्यासाठी तुम्ही आवतन द्यायलाच हवं असं नाही.
 
कधी कधी गोष्टीच अशा घडत जातात की, आपण त्या कोलाहलाचा भाग होऊन जातो. हा कोलाहल कधी आतला असतो, कधी बाहेरचा. खरं हे आहे की या दोहोंना अंतरावर राखता येतं. पण मनात एक अनामिक भीती असते मी मागे तर राहणार नाही ना! आसपासच एवढा अस्वस्थ आहे की, तुम्हांला धावण्याशिवाय अन्य विकल्प नसतो. तेव्हा मनात एक प्रश्न साहजिकच फेर धरून प्रदक्षिणा करू लागतो, माणूस आणखी किती आणि कुठपर्यंत धावणार आहे? खरंतर अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे उपलब्ध असतातच असं नाही अन् असले म्हणून प्रत्येकवेळी पर्याप्त असतीलच असंही नाही. आगंतुकासारखे आलेले असे प्रश्न उत्तरांच्या विकल्पांपर्यंत पोहचतीलच याची शास्वती देणं बऱ्यापैकी अवघड प्रकरण असतं.

चालणं जिवांचं प्राक्तन आहे म्हणा किंवा निसर्गनिर्मित भागधेय. चालल्याशिवाय त्याच्या जगण्याला  वेढून असलेल्या प्रश्नचिन्हांची उत्तरे मिळतील तरी कशी? आयुष्याच्या वाटेवर सोबत करणाऱ्या किंतुंची उत्तरे शोधायची तर पावलांना पुढे नेणाऱ्या वाटांशी सख्य साधायलाच लागतं. येथे पलायनाचे पर्याय उपलब्ध नसतात की पर्यायी व्यवस्था. चालणारी पावले प्रगतीच्या परिभाषा लेखांकित करतात. थांबले की आपलं अवकाश हरवून बसतात. चालण्याच्याही परिभाषा असतात. प्रयोजने असतात. पर्याय असतात. त्यांना पारखून घ्यावं लागतं. असले काही पर्याय पुढ्यात पडलेले म्हणून काही ते सरसकट सगळेच जतन करून ठेवता नाही येत. नाही सांभाळता येत सगळ्याच गोष्टी सगळ्यावेळी. त्यांचे तत्कालीन, दूरगामी संदर्भ तपासून पाहावे लागतात. वाटा सगळ्यांच्या वाट्याला येत असल्या म्हणून काही त्या सरसकट सारख्या नसतात की एका साच्यात तयार झालेल्या. त्यातल्या सगळ्याच मुक्कामाच्या ठिकाणी नेणाऱ्या नसतात. काही वाटा जगणं वाटेने लावतात, तर काही वाटही लावतात.  

काळ, काम आणि वेगाचं गणित समजलं की, सायासांना संदर्भ सापडतात. संदर्भांची सूत्रे सापडली की, पुढ्यात पसरलेली समीकरणे सुगम होतात. क्षणांचे कोपरे कोरत पळणाऱ्या काळाचे अर्थ कळले की, प्रगतीच्या परिभाषा अवगत करून घेण्यासाठी निघालेल्या पावलांना प्रयोजने सापडतात. अज्ञात परगण्यांचा धांडोळा घेण्यासाठी प्रेरित करणाऱ्या विचारांत स्वप्ने सजलेली असतात अन् पुढे पडणाऱ्या पावलात उद्याच्या जगण्याची उत्तरे. आयुष्याला वेढून असलेल्या ज्ञात-अज्ञात प्रश्नांची उत्तरे थबकलेल्या पावलात नाही सापडत. थकलेली असली तरी मुक्कामाची ठिकाणे गाठण्यासाठी पुढे पळू पाहणाऱ्या प्रयासात ती एकवटलेली असतात. पावलांना मातीचा स्पर्श हवासा वाटण्यात प्रगतीच्या परिभाषा सामावल्या आहेत. पुढे पडत्या पावलांना गतीचे गीत गाता यावेच, पण प्रगतीची स्वप्नेही पाहता यावीत. खरंतर प्रगती शब्दही नेहमी किंतु-परंतुच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा आहे. त्याचे परिणाम जवळपास सारखेच, पण परिमाणे कधीच समप्रमाणात नसतात. याचा अर्थ प्रयत्न विसरावेत असा नाही. पर्याप्त पर्याय पुढ्यात पडलेले नसतात, तेव्हा प्रयासांशिवाय उरतेच काय हाती? प्रयास प्रामाणिक असले की, अपयशाच्याही व्याख्या करता येतात.  

माणसाने माणसासारखं वागणं, ही काही त्याला मिळालेली दैवी देणगी वगैरे नाही. ते स्वभावदत्त शहाणपण असतं. शेकडो वर्षाच्या प्रवासातून कमावलेलं संचित आहे ते. निसर्ग काही गोष्टी जिवांना उपजत देत असतो. जनुकांच्या वाटेने ते वाहत आलेलं असतं. निसर्गाला सगळंच सातत्य राखायचं असल्याने त्याने केलेली सोय असते ती. त्यात हस्तक्षेप नसेलही करता येत, पण जगणं सुसह्य व्हावं म्हणून माणसांनी केलेल्या सोयीचे भलेबुरे संदर्भ शोधता येतात. त्यामागे बरेच सायास असतात. कितीतरी वर्षांचा प्रवास सामावलेला असतो त्यात. याचा अर्थ भोवती उभ्या केलेल्या प्रत्येक सुविधेची आयुष्यात अनिवार्यता असेलच असं नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या चौकटीत स्वाभाविकपण सामावलेलं असतं. कृत्रिमतेचे कोश कोरलेले नसतात. कृत्रिमता आली की, सोबत कारागिरी चालत येते. कारागिरी आली की, तडजोडी स्वीकारणंही आलंच. म्हणूनच केलेली प्रत्येक कृती सम्यक आहे म्हणणं अर्धसत्य असतं अन् आकारास येणाऱ्या सगळ्याच आकृत्या अर्थपूर्ण असतीलच हे म्हणणंही.

जगणं देखणं वगैरे करण्यासाठी केलेल्या प्रयासांना प्रगती म्हटलं, तर त्यांच्या परिभाषा पडताळून पाहता यायला हव्यात. प्रगतीची क्षितिजे पाहत घडणारा प्रवास जिवांच्या जगण्यातील चैतन्य असतं. अर्थात, सगळेच प्रवास काही देखणे वगैरे नसतात अन् मुक्कामाची सगळीच ठिकाणे गोमटी. चालणं भागधेय असलं तरी भाग्य घडवावं लागतं. त्यासाठी स्वतःला कोरून घ्यावं लागतं. असलेच काही किंतु तर तपासून घ्यावे लागतात. प्रयत्नांनी प्राप्त केलेल्या परिमाणात दैवाने कोरलेल्या भाग्यरेखा हरवतात, तेव्हा मागे उरतात केवळ प्राक्तन परिवर्तनासाठी केलेल्या कष्टाच्या कथा. त्या वाचता येतात त्यांना भाग्योदयाचे साचे शोधावे नाही लागत.

सुविधा अन् सुखं निर्माण करण्यात कसलं आलंय कौतुक? माणसांना मोठं करणारी व्यवस्था निर्माण करण्यात नवलाई आहे. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला आनंदाचं अभिधान होता यायला हवं. कुणाला तरी मोठं होता यावं म्हणून आपल्याला लहान होता आलं पाहिजे. स्वतःला लहान होताना पाहण्यात आनंद सापडायला हवा. तो एक संस्कार आहे. संस्कारांचा संसार सर्वकाळ सजलेला असला, तरी तो सगळ्यांना समजेलच असं नाही अन् समजला म्हणून त्यातलं सार सापडेलच असंही नाही. संस्कार स्वयंभू असू शकतात, पण स्वयंघोषित कधीच नसतात. त्यांना उभं करण्यामागे समूहाची साधना उभी असते. तो काही दोनचार दिवसात घडणारा प्रवास नसतो. की कुठल्या जादूचे प्रयोग. त्यासाठी कितीतरी पिढ्यांनी काळाचे अंधारे कोपरे कोरलेले असतात. कितीतरी कंगोरे पारखून घेतलेले असतात.

मूठभर महात्म्य सापडलं की, स्वतःभोवती प्रदक्षिणा करणारी माणसं मात्र पदरी पडलेलं शहाणपण स्वयंभू असल्याच्या उगीच वार्ता करीत राहतात. माणुसकीचे अध्याय लेखांकित करणारं मोठेपण मापदंडाच्या मोजपट्ट्यात मावत नाही. महानतेच्या व्याख्येत सामावत नाही. ते कोणी दिलेल्या मान्यतेच्या अधीन नसतं. ना कुठल्या प्रशस्तिपत्रकातल्या अक्षरात कोंडलेलं असतं. ना कुठल्या परिपत्रकाने कार्यान्वित होत असतं. आदर आतून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची स्वाभाविकता आणि उमलत्या फुलाची सहजता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका विचारत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही ओरडून कधी सांगितले नाही. जगाने त्यांचे मोठेपण मान्य केले. ज्ञानेश्वरांच्या प्रज्ञेचा प्रकाश अन् तुकोबांच्या जगण्याचा अवकाश आकळला त्यांना आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी वणवण करायची आवश्यकता नाही.

जगात एकही गोष्ट मागून मिळत नाही. पात्र बनून मिळवावी लागते. ते काही उताराचे किनारे धरून वाहणे नसते की, पुढ्यात पसरलेल्या पात्राचे कोपरे धरून घडणारा प्रवास. त्यासाठी आपणच आपल्याला अनेक कोनातून तपासून पाहायला लागतं. असतील काही खाचखळगे आपल्या असण्यात तर तासून, तपासून बघावे लागतात. रंधा मारून समतल करायला लागतात. धाग्यातून सुटणारे संदर्भ शोधावे लागतात. काट्यांचं काम करणारे काठ कोरावे लागतात. तेव्हा कुठे आकार शब्दाचा अर्थ समजू लागतो. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक आहेत, असतीलही. पण त्यामुळे आयुष्याची उंची वाढते, असे नाही. जगणं खूप समृद्ध वगैरे होतं असंही नाही. संपन्नता येते, ती परिश्रमाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या विधायक कामाने. अमंगलाचा परिहार करून मांगल्याची प्रतिष्ठापना प्रयत्नपूर्वक करावी लागते. म्हणूनच जगणं असावं इष्ट असेल ते करण्यासाठी आणि रास्त असेल तसेच वागण्यासाठी.

कृतीपेक्षा उक्तीलाच बरकत येण्याचे दिवस आहेत सध्या. हे असं करायला हवं. ते तसं नको करायला होतं वगैरे वगैरे बोधामृत पाजण्यातला आनंद अनुभवण्यापेक्षा थोडा सहानुभूतीने विचार केला अन् समानानुभूतीने संदर्भ शोधले तर बऱ्याच किंतु-परंतुची उत्तरे गवसतील. पण असं घडणं सहसा होत नाही. त्यासाठी साहस बांधायला लागतं. आपले साहसाचे प्रयोग सहसा अंतरावरून असतात, नाही का? शब्दांचा पसारा पायलीभर असतो प्रत्येकाकडे. पण त्यातले उपयोगाचे किती, हे कळायलाही शब्दांशी सख्य साधायला लागतं. त्यांचे संदर्भ समजून घ्यायला लागतात. कुणी ऋषीमुनींनी दिलेल्या शापवाणी खऱ्या ठरायच्या म्हणे कधीकाळी! आणि आता शब्दांचा फाफटपसाराच एवढा पसरला की, शब्दांनाच आपण शापित आहोत असं वाटायला लागलं असेल.

बोलण्यातून येणारे-जाणारे सगळेच शब्द काही प्रत्ययकारी नसतात. त्यांचा प्रत्यय येण्यासाठी त्यांचा प्रवास समजून घ्यावा लागतो. त्यांना समजून घेण्याएवढा वकूब यावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. कोण्या मानिनीने आपल्या कुशल हातांनी सुपात खेळणाऱ्या धान्यातून फोलपटे पाखडून अलगद वेगळे करावेत तसे आणि नेमके तेवढेच निवडता यावेत अन् वापरताही यावेत. शब्दांचे बुडबुडे उडवून महात्म्याने मंडित नाही होता येत. माणसातलं महात्म्य आधी समजून घ्यावं लागतं. मोठेपणाचा प्रवास दोनचार दिवसांचा नसतो. त्याला विराम नसतो. स्वतःचं जगणं सगळ्यांना सजवता येतं. पण इतरांचे मोडलेले संसार सजवण्यात सहकार्याचा आश्वस्त हात बनण्यात माणसांचं मोठेपण विसावलेलं असतं. जगण्यात स्वाभिमान सामावलेला असला की, सहकार्याचे संदर्भ अन् सहानुभूतीच्या परिभाषा कोशातून पाहाव्या लागत नाहीत. त्या आयुष्याच्या सगळ्या कोपऱ्यात सामावलेल्या असतात. पण खरं हेही आहे की अस्मिता कुणाच्या तरी दारी गहाण पडल्या की, आपल्या असण्याचे अर्थ अधिक धूसर होत जातात. जगण्यात मिंधेपण सामावले की, माणूस साचतो. त्याचा परीघ विस्ताराच्या परिभाषा विसरतो. विस्तार हरवला की विचार मर्यादित बनतो. आणि भोवती मर्यादांची कुंपणे पडली की, क्षितिजे हरवतात. क्षितिजे हरवली की स्वप्ने वांझोटी होतात, नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••