Sairat : Akalan Ani Anvay | सैराट: आकलन आणि अन्वय

By // 12 comments:
 
चित्रपट समाजमनाचा आरसा असतो, असे म्हणतात. आरशात आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते, पण हेही सत्य की, समोर जे असेल आणि जसे असेल तसेच आरसा दाखवेल. त्यावर अविवेकाची काजळी पसरली असेल, तर विचारांची प्रतिमा सुस्पष्ट दिसेल तरी कशी? समाजात दिसतं, घडतं ते दाखवायचा प्रयत्न चित्रपट करतो. समजा ते काल्पनिक असेलही, पण भविष्यात असे काही घडण्याची शक्यता नाहीच, असे आपण म्हणू शकतो का? समाजाकडे हे समजण्याइतकी प्रगल्भता नसावी का? विचार करण्याचं दान नियतीने साऱ्यांच्या ओटीत ओतले असेल, तर संदेहाचे प्रश्नच का उरावेत? भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचा ल.सा.वि. काढणे अवघड आहे, हे माहीत असणारी माणसे अपरिपक्व विचारांनी वर्तने असंभव. देशात जातीयता, धार्मिकता, भेदाभेदाच्या पलीकडे विचार करणारे आहेत, तसे विशिष्ट विचारांच्या वर्तुळात वर्तणारेही आहेत.....
 
चित्रपट आणि क्रिकेट या दोन गोष्टी भारताच्या लोकजीवनात धर्माइतक्या एकरूप झाल्या आहेत. या विषयांबाबत माहीत नसणारा भारतीय एकतर वेडा असेल किंवा सर्वसंग परित्याग करून आपल्याच चिंतनाच्या परिघात वर्तणारा विरक्त तरी असेल. या विषयांवर आपापल्या वकुबाने मत व्यक्त करणारे सर्वकाळी, सर्वस्थळी आहेत. समर्थनाचे सुरम्य सूर सजवणारे आहेत, तसे नकाराच्या वर्तुळात मतांच्या रेषा ओढणारेही आहेत. गुणगान करणारे आहेत, तसे यांना संदेहाच्या सुळक्यावर चढवून गुंत्यात गुंफणारे आहेत. या दोन गोष्टींबाबत एक बाब सामायिक आहे, ती म्हणजे या विषयांचे ज्ञान असणारे जेवढ्या आत्मविश्वासाने व्यक्त होतात, तितक्याच अभिनिवेशाने काहीही माहीत नसणारे आत्मविश्वासपूर्वक प्रकट होतात. आपल्याकडे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाविषयी वाद होणे जणू आवश्यक बाब झाली आहे, असे वाटण्याइतपत सांप्रत मतमतांतराचा धुरळा उडत राहतो. क्रिकेटचा प्रत्येक सामना आपण जिंकलाच पाहिजे, अशी मानसिकता प्रबळ होत आहे. पराजयाला खेळ म्हणून न स्वीकारता पराभवाची सारी सूत्रे सामनानिश्चितीत शोधून समाधान पावणारेही आहेत. कधीकाळी सिनेमा आणि क्रिकेट मनोरंजनाची माध्यमे होती, आज ती वादाची स्थळे झाली आहेत. चित्रपट प्रदर्शनाआधी कुठूनतरी कसल्यातरी उडत्या वार्ता येतात आणि माथी भडकून विरोधाचे आवाज बुलंद होऊन स्वैरसंचार करतात. हे सगळं करण्यामागे नेमके कारण काय, हे शोधून पाहण्याची कोणाला आवश्यकता वाटत नसते. आपण या गर्दीत सामील का होतो, या प्रश्नाचे उत्तर किती जणांना माहीत असते? माहीत नाही; पण आपल्या अशा वर्तनाला सामुहिक वेडेपणाचा आचार म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही. हे सगळं ऐकून, पाहून मनात प्रश्न येतो, भारतीय माणसे संवेदनशील आहेत, सहिष्णू आहेत, हे म्हणणे वास्तव आहे की, शब्दांच्या बुडबुड्यांमुळे वाऱ्यावर उडणारा केवळ आभास आहे.

लोकशाही व्यवस्थेने जगाला जे काय दिले असेल ते असो, पण भारतीयांना प्रगल्भ मन द्यायला आपली लोकशाही व्यवस्था अजूनही थिटी पडत आहे, असे वाटण्याइतपत वर्तमानाचे विपरीत प्रत्यंतर येत आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा लोकशाहीतील शब्द संकुचित होत आहे, असे कोणी म्हणत असेल आणि तसे कोणास वाटत असेल, तर त्यात वावगे काही नाही. परमत सहिष्णुता लोकशाहीच्या यशाचे निःसंदेह परिमाण असते. पण या परिमाणाला परिमित पसंतीच्या परिघात बंदिस्त करण्याचा कळत-नकळत प्रमाद घडतो आहे. माझ्याइतकाच इतरांनाही व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्याला तो सन्मानपूर्वक प्रदान केला पाहिजे, याचं जणू विस्मरण होत आहे की काय असेच वाटते. चित्रपट आणि वाद हे अलीकडील काळाचं अविभाज्य अंग झालंय. कोणत्याही वादाशिवाय नैसर्गिक जन्म घेणारे चित्रपट अपवाद ठरायला लागले आहेत. प्रत्येकवेळी सिझेरियन करूनच त्यांचा जन्म होतो आहे. कधी कुणाच्या, कुठल्या कारणाने भावना दुखावल्या जातील, हे दुखावलेल्या मनांनाही सांगता येणार नाही. सांगणं तर दूरच, पण या दुखावलेल्या भावनांमागील उत्तर सापडणं त्याहून अवघड झालंय. आपल्या स्मृतीची अलीकडील काही पाने उलटून पाहिली, तरी असे वाद आणि वादांचे कारण ठरलेले चित्रपट आपल्या हाती सहज लागतील. सोबतच अशा वादात उड्या घेणारे विचारही सापडतील. कारण नसता कलहप्रिय वाटेने निघालेले हे एकतर समर्थक असतात, नाहीतर विरोधक.

अशाच काहीशा समर्थनाच्या आणि विरोधाच्या वर्तुळांत बंदिस्त झालेला अलीकडचा मराठी चित्रपट सैराट. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून महाराष्ट्रात जणूकाही सैराटचे समर्थक आणि विरोधक अशा दोनच विचारांची माणसे वास्तव्यास असतात की काय, असे वाटण्याइतपत समाजमन ढवळून निघाले. सैराटचं कौतुक करणारे होते, तसे विशिष्ट अभिनिवेशाने निर्मित नकाराच्या आपल्या मतांवर, विचारांवर ठाम असणारे विरोधकही होते. असे असूनही आतापर्यंत मराठी चित्रपटांना साध्य झाले नाही, ते या चित्रपटाने केले. कमालीची लोकप्रियता लाभलेल्या सैराटने शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळवले. मराठी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची सगळी गणिते उलटवून टाकणारा हा पहिलाच चित्रपट. एकीकडे कौतुकाचा होणारा अनवरत वर्षाव, तर दुसरीकडे विरोधाचा तीव्र सूर. अशा दोन भिन्न तिरांना धरून तो वाहत राहिला, तरीही यास वारेमाप यश मिळाले. यामागे कारणे काय असतील ती असोत; पण हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात अनुकूल-प्रतिकूल विचारांची वलये निर्माण करीत राहिला. तरुणाईने डोक्यावर घेतलेला. प्रौढांच्या कौतुकास पात्र ठरलेला. वयस्कांनी पसंतीची मोहोर अंकित केलेला आणि समीक्षकांच्या विचारांत दखलपात्र ठरलेल्या या चित्रपटाने यशाचे सारे आयाम संपादित केले. आणि या सगळ्या घटकांना एकत्र आणून दखल घेण्यास बाध्य केले, ते नागराज मंजुळेने.

नागराज मंजुळे एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून एव्हाना सर्वांना परिचित आहेत. चित्रपटाच्या चाकोरीतील चौकटींची परिमाणे अवगत असणारा आणि समजणारा हा दिग्दर्शक. व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना माणसाच्या जगण्याचा वाटा अडवणारी वैगुण्य शोधून त्यावर भाष्य करणारा दिग्दर्शक म्हणून मंजुळे कौतुकास पात्र ठरले असतील, तर तो त्यांच्या संवेदनशील विचारांचा परिपाक आहे. एकीकडे जातीपातीच्या टोकदार काट्यांना घेऊन चित्रपट करणारा दिग्दर्शक म्हणून जसा टीकेचा धनी झाला. तसा समाजवास्तव संवेदनशील मनाने अधोरेखित करणारा म्हणून प्रशंसेस पात्रही ठरला आहे. कौतुक आणि टीका या परस्पर भिन्न टोकांवर प्रवास करणाऱ्या या दिग्दर्शकाला जे सांगायचे होते, ते त्याने आपल्या चित्रपटातून सांगितले आहे. खरंतर सांगणं ही त्यांची खासियत आहे आणि वेगळेपणसुद्धा. फँड्रीसारखा चित्रपट तयार करून जातव्यवस्थेचे प्रखर वास्तव त्यांनी अधोरेखित केले. विज्ञानतंत्रज्ञानयुगाच्या कुणी कितीही वार्ता करीत असले, तरी जात काही आपल्या सामाजिक विचारातून जात नाही, हे वास्तव आहे. नेमका हाच विचार त्यांनी मांडला. जातव्यवस्थेने केलेल्या अन्यायाने त्रस्त जब्याने फेकलेला दगड व्यवस्थेवरचा आघात होता. मनातला लाव्हा उसळ्या घेताना त्याचा स्फोट दगड भिरकावण्यात झाला. या दगडाने जातीच्या चिरेबंदी वाड्याच्या भिंती किती तुटल्या-फुटल्या, हा वादाचा विषय असू शकतो. पण वास्तव असेही असू शकते, हे अमान्य करता येत नाही.

चौकटीतील चाकोऱ्या मोडून ज्यांना मर्यादांची वर्तुळे पार करता येतात, ते आपला नवा परिघ निर्माण करतात. सैराटने नेमके हेच केले आहे. व्यावसायिकतेची परिमाणे या चित्रपटाला असतीलही; पण त्यांना बाधा न समजता त्याचाच आधार घेऊन परिस्थितीवर भाष्य करण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. आपले आसपास, उसवत चालेलं सामाजिक भान आणि पारंपरिक मोठेपणाच्या बेगडी जगण्याला हा चित्रपट धक्का देतो. मनात साठलेला कोलाहल उसळ्या मारायला लागतो, तेव्हा कंप होतोच. हे हादरे सहन करून ज्यांना उभं राहता येतं, ते परिवर्तनाच्या दिशेने नव्या वळणाचा शोध घेत, नवे परगणे निर्माण करतात. सैराटने नवा परगणा शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा शेवट धक्कातंत्राचा वापर करणारा असतो. सैराटमधील शेवट म्यूट होतो आणि माणसे अवाक होतात. सुरवातीचा दीड तास झिंगाट होऊन बुंगाट नाचणारी. शिट्या वाजवणारी, आरोळ्या मारणारी माणसे हीच का? असा प्रश्न चित्रपटाच्या उत्तरार्धात मनाला पडतो. एक मूकपण घेऊन माणसे चित्रपट पाहत राहतात. कथानकासोबत सरकत राहतात. पूर्वार्धात प्रसन्नतेचा परिमल घेऊन बहरणाऱ्या प्रेमाची उत्तरार्धात होणारी वाताहत पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहतात. आणि शेवट अस्वस्थतेचे शिखर गाठतो. एक शब्दही न बोलता चित्रपटगृहातून बाहेर पडलेली माणसे मी पाहिली आहेत. एक अस्वस्थ बेचैनी सोबत घेऊन कुठल्यातरी विचारांच्या तंद्रीत घरी येतात. स्वतःला प्रश्न विचारीत राहतात. चित्रपटाचा शेवट असा नको होता करायला म्हणून हळहळत राहतात. पण वास्तव हेही आहे की, हे विचारांचं असह्यपण हळूहळू निवळत जाते. भावनांच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांच्या धडका कमी होत जातात. सारंकाही सावकाश पूर्वपदावर येतं आणि व्यवस्थेने निर्मिलेल्या चौकटींमध्ये परत येऊन प्रेक्षक विसावतो. आहेत त्या गोष्टी घडत राहणार आहेत, म्हणून स्वतःला सांगत राहतो. माझ्या एकट्याने परिस्थिती परिवर्तनाचा प्रयोग घडणे असंभव असल्याची खात्री असल्याने चाललं आहे, ते मुकाट्याने स्वीकारतो. हे आपलं सामाजिक न्यून आहे. हे अमान्य करण्यात काही हशील नाही.

मला वाटतं अलीकडील काळातील सर्वाधिक चर्चेतला हा चित्रपट. चित्रपट प्रादेशिकच, पण राष्ट्रीयस्तरावरील माध्यमांनी दखल घेण्याइतपत मोठा. त्याचे हे मोठेपण चर्चेच्या अनुकूल-प्रतिकूल आवाजाच्या सुरावटींनी सजत राहिले. कदाचित असे एकही ठिकाण नसेल, जेथे सैराट हा विषय नसेल. काही दिवसापूर्वी सैराटच्या वेगळेपणावर आम्हा मित्रांमध्ये बोलणं सुरु होतं. सरळ सरळ दोन गटात विभागणी झालेली. एक समर्थनाचा सूर, तर दुसरा विरोधाचा बुलंद आवाज. तसेही मी सिनेमे पाहणे कधीच विसरलो आहे. गेल्या आठ-दहा वर्षात पहिल्यांदाच माझ्याबाबतीत असे घडले की, सात वेळा हा सिनेमा थिएटरला जाऊन पाहिला. कॉलेजमध्ये शिकत असताना एखादा चित्रपट आवडायचा म्हणून चार-पाच वेळा पाहणे घडायचे. अर्थात तो का आवडतो, याला काही संयुक्तिक कारणही नसायचे. कदाचित तो वैयक्तिक बावळटपणाचा भाग होता. त्यात काही कळण्यापेक्षा टाईमपास हे एक कारण असायचे. वाढत्या वयानुसार जाणिवांच्या कक्षा रुंदावतात, हेपण सत्यच आहे. असे चित्रपट जे कधीकाळी आम्ही आवडीने पाहत असू, ते आज आमच्यासाठी थट्टेचा विषय झाले आहेत.

काही अपवाद वगळले, तर चित्रपट ही गोष्ट मेंदू घरी ठेऊन चित्रपटगृहात बघायला जाण्याची गोष्ट आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे. बऱ्याच चित्रपटांबाबत हल्ली असे वाटते. कदाचित या मताबाबत बरेच जण असहमत असतील किंवा काही सहमतसुद्धा असू शकतील. मत काहीही असले तरी, कोणाच्याही मतांचा अनादर करायचा नाहीये. पण सैराटबाबत माझ्याकडून असे घडले नाही. मेंदू सोबत घेऊन हा चित्रपट प्रत्येकवेळी नव्याने पाहत राहिलो. कोणी याला बावळटपणा असेही म्हणेल. अर्थात त्यांना तसं म्हणण्याचा अधिकारही आहेच. हा चित्रपट कोणाला तद्दन गल्लाभरू वाटला. कोणी अप्रतिम म्हणून वाखाणला. कोणी व्यावसायिकतेच्या चौकटींमध्ये बसवलेला चांगला चित्रपट म्हटले. कोण काय म्हणतो, त्याचा विचार न करता परत-परत पाहत राहिलो. त्यातून काहीतरी शोधत राहिलो. काहीतरी सापडत राहिले. आनंद घेत राहिलो. ही सगळी पुण्याई संपादित करून चित्रपटातील तपशील, बारकावे, संवाद, संगीत, अभिनय, ग्रामीण वास्तव, समाजवास्तव असे बरेच काही-काही निवडत, वेचत राहिलो. या गोष्टींविषयी माझ्या आकलनाच्या परिघाला समजून घेत मित्रपरिवारात घडणाऱ्या चर्चेत अधिकारवाणीने बोलत राहिलो.

सैराटच्या कौतुकाचे माझे पाढे ऐकून माझे दोन-तीन स्नेही नकाराचे सूर घेऊन आम्हां मित्रांमध्ये सैराटविषयी होणाऱ्या चर्चेत प्रत्येकवेळी तावातावाने व्यक्त होत राहिले. त्यात चांगले काय आहे, यापेक्षा चित्रपटच वाईट कसा आहे, ते अभिनिवेशाने दाखवू लागले. मी प्रत्येकवेळी त्यांच्या मतांना छेद देत राहिलो. एकवेळ तर अशी आली की, त्यांच्या बोलण्यात संवादाऐवजी उपहासाचा आवाज अधिक आक्रमक होऊ लागला. अर्थात, मुद्दे संपलेत की, आपलेच म्हणणे कसे रास्त आहे, हे सांगतांना समर्थनाचे असे गडद रंग विधानांना चढतात. काही दिवस हाच विषय आमच्या संवादाच्या परिघात परिवलन करीत होता. विषय थांबायचं नाव काही घेत नव्हता. रोज नवा मुद्दा आणि त्यांचे प्रत्येकाने आपापल्या मतांनी केलेलं खंडन-मंडन असा सिलसिला सुरु राहिला. मी माझ्या मतांवर ठाम आणि ते त्यांच्या विचारांवर कायम. शेवटी एक दिवस त्यांना म्हणालो, ‘ऐकीव, वाचीव माहिती दिमतीला घेऊन मतमतांतरे घडवीत वाद करण्यापेक्षा निदान एकदा तरी थिएटरला जाऊन हा चित्रपट पहा, मग काय ते ठरवा. नसेल तुम्हाला आवडत, तरी वादावर मुद्देसूद बोलण्यासाठी पहा. मग व्यक्त व्हा!’

सैराटविषयी बोलतांना कदाचित त्यांची काही पूर्वग्रहदूषित मते असतील, ठरवून घेतलेल्या मर्यादा असतील, स्वतःच्या वर्तनाची जीवनविषयक काही तत्वे असतील, विचारांचा सीमांकित परिघ असेल किंवा आणखी काही तत्सम कारणे असू शकतील. ती असू नयेत असे नाही; पण कोणत्यातरी विषयाची एक बाजू घेऊन आपण व्यक्त होतो, तेव्हा त्याची आपल्याला न दिसणारी दुसरी बाजूही असते, याची किमान जाणीव अंतर्यामी असावी, अशी अपेक्षा चर्चेच्या वर्तुळात वर्तताना नेहमीच असते. आणि अशी अपेक्षा करण्यात अवस्ताव काही नाही. खरंतर हे समजण्याइतपत सक्षम असणाऱ्यांच्या विचारविश्वात हे घडत होते. सुशिक्षितांच्या विचारांत एवढे एकांगीपण असेल, तर अन्यांचा विचार करावयास नकोच.

आता अगदी अलीकडे त्या स्नेह्याने हा चित्रपट पाहिला आणि त्याचे मत यू टर्न घेत एकशे ऐंशी अंशाच्या कोनात बदलले. आपलं मत सार्वजनिक करतांना तोही तेच म्हणू लागला, जे एवढे दिवस मी त्यांना सांगत होतो. खरंतर आपल्या आसपास अशी कितीतरी उदाहरणे असतील. जे मतांच्या दोलायमान पुलावरून प्रवास करीत असतील. नेमकी अशीच काहीतरी कारणे असतात, एखाद्या गोष्टीविषयी वादाला रस्ता मिळायला. मत परिवर्तनशील असते, हे मान्य. पण परिवर्तनाला परिपक्वतेचा परीसस्पर्श असणे परिस्थितीसापेक्ष प्रमाण असते. माझ्या या स्नेह्याचं मत परिवर्तनाचं श्रेय कुणाचं? जेवढे त्याच्या समायोजनक्षम विचारांचे आहे, त्याहून अधिक मंजुळेंच्या संवेदनशील विचारातून प्रकटलेल्या कलाकृतीचे आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

चित्रपटांचा समाजमनावर परिणाम होतो का? असेल तर किती? हा परिस्थितीसापेक्ष प्रश्न आहे. मान्य करू या, होत असेलही. तर तो तसा सार्वत्रिक असतो का? चार-दोन संवेदनशील मनाचे धनी वगळले, तर जवळपास होत नाही, हेच खरंय. कुठल्यातरी वर्तमानपत्रात छापून आलेल्या आणि घरून पळून गेलेल्या प्रेमींच्या बातम्या व्हॉटसअपवरील माझ्या एक मित्राने मला फॉरवर्ड केल्या. त्या बातम्यांमध्ये हे सगळं सैराटच्या प्रभावामुळे होत असल्याचं म्हटलं होतं. त्याने लगेच दुसरा मॅसेज पाठवला आणि म्हणाला, “आत्ता बोला सर, तुम्ही सैराटचं एवढं कौतुक का करीत आहात? अशा बातम्या येणार असतील, तर यालाच आपण चित्रपटाचं यश वगैरे असं म्हणायचं का?”

अशा गोष्टींना किती महत्त्व द्यावं याबाबत सुशिक्षितांमध्ये एवढा संदेह असेल, तर अशिक्षितांच्याबाबत न बोललेलं बरं. मी त्याला उत्तर पाठवलं, “बाबारे! हा सगळा बादरायण संबंध आहे. अनेक धार्मिक चित्रपट पाहून कोणी संत झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. श्यामची आई चित्रपट पाहून कोणी श्याम झाल्याचे निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. चित्रपटाचा प्रभाव असतो, पण फार थोडा. कदाचित प्रासंगिकच अधिक. उगीच बातमीमूल्य म्हणून कोणी काही लिहिलं असेल, तर त्याला किती महत्व द्यायचं, हे आपलं आपणास ठरवावं लागतं. कृष्ण आणि रुक्मिणी विवाह काय होता? शंकर-पार्वतीची पुराणकथा तुम्ही ऐकता की नाही? सुभद्रेला अर्जुनाने सोबत नेले, हे मान्य करतात की नाही? नल-दमयंती, लैला-मजनू, बाजीराव-मस्तानी या प्रेमकथा काय महाराष्ट्रात कोणाला माहीत नाहीत काय? कोणाला पाहून कोणी बिघडत नसतो आणि सुधरतही नसतो. त्याला मनापासून काही करायचेच नसेल, तर सुधरवणारे आणि बिघडवणारे चित्रपट आहेत तरी कोण? माझ्या अडनिड वयात मी ‘एक दुजे के लिये’, ‘कयामत से कयामत तक’ आणि यासारखे काही चित्रपट पाच-सहा वेळा पाहिले. आवडायचे. वाटायचे असे असू शकते का? पण नाही. वास्तवात असे काही नसते, हेही कळायचे की. सैराटआधी का कोणी प्रेम करत नव्हते? प्रेमात पडलेले जीव पळून जातच नव्हते का? मग असे असेल, तर त्याला जबादार कोण? प्रेम सार्वकालिक भावना आहे. ज्यांना समजली, ते माणूस म्हणून यशस्वी झाले. नाही समजले, ते राहिले त्याच चौकटीत. आपण एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो, त्यावर ते अवलंबून असते. या सगळ्या गोष्टीतून काहीतरी वाद उकरून काढणारे आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचे काम करतात. आपल्या संकुचित विचारांच्या इमारती भक्कम करू पाहतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांना हे कळण्याइतपत शहाणपण असायला नको का?”

चित्रपट समाजमनाचा आरसा असतो, असे म्हणतात. आरशात आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते, पण हेही सत्य की, समोर जे असेल आणि जसे असेल तसेच आरसा दाखवेल. त्यावर अविवेकाची काजळी पसरली असेल, तर विचारांची प्रतिमा सुस्पष्ट दिसेल तरी कशी? कलाकार समाजात दिसतं, घडतं ते दाखवायचा प्रयत्न करतो. समजा ते काल्पनिक असेलही, पण भविष्यात असे काही घडण्याची शक्यता नाहीच, असे आपण म्हणू शकतो का? समाजाकडे हे समजण्याइतकी प्रगल्भता नसावी का? विचार करण्याचं दान नियतीने साऱ्यांच्या ओटीत ओतले असेल, तर संदेहाचे प्रश्नच का उरावेत? भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचा ल.सा.वि. काढणे अवघड आहे, हे माहीत असणारी माणसे अपरिपक्व विचारांनी वर्तने असंभव. देशात जातीयता, धार्मिकता, भेदाभेदाच्या पलीकडे विचार करणारे आहेत, तसे विशिष्ट विचारांच्या वर्तुळात वर्तणारेही आहेत. जातीयतेच्या बेगडी चौकटींमध्ये आत्मशोध घेणारी माणसेही आहेतच. जातीसाठी माती खावी म्हणणारेसुद्धा आहेत. धर्माच्या नावानं घडणारा धिंगाणा लोकांना बऱ्यापैकी परिचयाचा झाला आहे.

एकीकडे संविधानातून संपादित केलेल्या विचारांनी समतेचे सहजपणाने स्वागत करायचे आणि त्याच समाजाने जातींच्या तटबंदी भक्कम करायच्या. ही वर्तनातील विसंगती नाही का? जात विरहित समाजनिर्मितीचा उद्घोष करायचा आणि जातीपातीतच व्यवहार घडतील कसे, ते बघायचं, हे उघडं गुपित आहे. सैराटने खरंतर या जातीव्यवस्थेला धक्का दिला. कदाचित काहींना हे पचवणं अवघड गेलंही असेल, पण वास्तव काही विसरता येत नाही आणि नाकारताही येत नाही. नायक खालच्या जातीचा आणि नायिका उच्चकुलिन असणं सहजी पचनी पडणारं नसतंच. कारण स्त्रीविषयक बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच पुरुषी मानसिकतेचा राहिला आहे. चित्रपट काल्पनिक असतो, हे माहीत असूनही अशा प्रतिक्रिया प्रकटत असतील, तर याला कारण अद्यापही आमच्या मानसिकतेचे परगणे आहेत तसेच आहेत, हे असेल का? जातीयअभिनिवेशातून निर्मित अहं जोपासत आपल्या जगण्याची जात हीच ताकद आहे, असे मानणाऱ्या समाजातील मूर्खपणाच्या चौकटींना आर्ची-परशा सर्व ताकदीनिशी धडका देत राहतात. पण कुटुंब, गाव आणि समाजाची जात हीच ओळख त्यांच्या मार्गावर बुलंद बुरुज बनून उभी राहते.

व्यवस्थेच्या बुरुजांना ध्वस्त करताना अजूनही परिवर्तनप्रिय विचारांनी वर्तणाऱ्यांची ताकद कमी पडते आहे. सत्ता हाती असली की, मनावर संरजामी माज चढतो. पद, पैसा, प्रतिष्ठा एका हाती एकवटल्या की, व्यवस्था आपल्या तंत्राने वाकवता येते, हा समज दृढमूल होतो आणि हाच माज एखाद्या प्रिन्सला वर्गात मास्तराच्या थोबाडीत मारण्याइतपत बेदरकार बनवतो. बेमुर्वत बनवतो. अशा बेताल वागणाऱ्यांच्या वैचारिक विश्वातून सामान्य माणूस कधीच हद्दपार झालेला असतो. माणसापेक्षा आपले वैयक्तिक अहं त्यांना मोठे वाटतात. स्वातंत्र्योत्तरकाळात माणूस हीच एकमेव जात असेल, अशी अपेक्षा होती. पण ते एक स्वप्नंच राहिलं. आणि आतातर ते लक्ष खूप पुढे गेलं आहे. प्रिन्सच्या वर्तनाचे समर्थन करणारी मानसिकता आहे, तोपर्यंत उन्मत्त मनातल्या माजाला परंपरेने दिलेली स्नेहनिर्मित नाती दुय्यम वाटतीलच. सत्तेच्या झापडबंद पट्ट्या डोळ्यांवर बांधल्या असतील, तर फक्त उन्माद मोठा होतो. धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती म्हणून अंधार त्याचं प्राक्तन होतं. या अंधाराच्या भीतीतून पुत्रप्रेमापोटी तो विकल होत गेला; पण गांधारीने डोळे असून उजेड नाकारला आणि अंधाराची सोबत केली. पण तिलाही पुत्रप्रेमाचा मोह टाळता आला नाही. पुढचे संघर्ष टाळता आले असते. पण स्वार्थाची पट्टी डोळ्यांवर बांधली असेल, तर योग्य-अयोग्य समजणे अवघड होते. समाजानेही जातीयतेच्या स्वार्थाच्या अशाच पट्ट्या आपल्या भोवती बांधून घेतल्या आहेत का? असे झापडबंद चालत राहणे पुढच्या अनिष्ठाचे सूचन असते.

एकीकडे देश बदलत असल्याच्या वार्ता करायच्या; समतेवर, प्रगतीवर, काळाच्या बदलत्या परिमाणांवर मोठी मोठी भाषणे झोडायची आणि दुसरीकडे आपापले स्वार्थाचे परगणे पद्धतशीर परिपुष्ट करायचे. इभ्रतीचे स्वयंघोषित निकष निर्माण करून त्यांना सांभाळायचे. जातीपातीची कुंपणे बांधून स्वार्थकेंद्रित विचारांना आपलं समजायचं, हे वास्तव आहे. महाराष्ट्राला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे, म्हणून गोडवे गायचे आणि जातीयतेमुळे घडणाऱ्या अन्यायाविषयी व्यक्त होतांना निर्जीव व्हायचे. हा कोणता पुरोगामीपणा म्हणायचा? आर्ची-परशाच्या माध्यमातून सैराटने जातीपातींचे अंतर विसरून संवादाचा साकव सांधण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न केला आहे, असे म्हटले तर काय हरकत आहे? चित्रपटातील त्यांचे प्रेम कायद्याच्या परिभाषेत सज्ञान आहे. पण समाज अशाबाबतीत सुज्ञ कधी असतो? आर्चीच्या रूपाने डॅशिंग पोरगी व्यवस्थेच्या भिंतीना ध्वस्त करण्यासाठी उभी राहते. प्रसंगी सगळ्या सुखांचा त्याग करून भावनेच्या वादळावर स्वार होऊन धावते. पुढच्या वाटेवर टक्केटोणपे सहन करीत आपल्या प्रेमाची सोबत करीत राहते. कोसळते. हतबुद्ध होते. सावरते. उभी राहते. स्वप्ने पाहते. परिस्थितीशी दोन हात करते. आता सगळं नीट होईल म्हणून नव्या स्वप्नांची रांगोळी मनात रेखाटत राहते. अशा अनेक आर्ची आजही आहेत आपल्या समाजात, फक्त त्या अपयशी ठरतात एवढेच. आर्ची धीट आहे. ती बुलेट पळवते. ट्रॅक्टर चालवते. स्त्री म्हणून समाजाने आखून दिलेल्या परंपरेच्या वर्तुळाभोवती फिरणारी नाहीये. तिचं धीट असणं एकवेळ मान्य केलं जातं, पण स्वतःच्या जोडीदाराच्या निवडीबाबत निर्णय घेतांना जातीयतेच्या भिंती अहं बनून अडथळे होतात.

आपल्याकडील चित्रपटांमध्ये हिरो मार कधीच खात नाही. त्याने हाती घेतलेला दगड नुसता भिरकावला तरी दोनचार जण संपतात. गोळ्यांच्या अखंड वर्षावात त्याला साधं खरचटतदेखील नाही. हे बावळटपण आपण कितीतरी वर्षांपासून पाहत आहोत. आणि त्याला टाळ्याही वाजवत आहोत, पण सैराटमधील परशा वास्तवाच्या वाटेवर उभा आहे. त्याला साथ देणारे मित्र साधेच आणि सामान्यच आहेत. त्यांच्याकडे कोणतीही उन्मादक ताकद नाही. पण मित्रासाठी जीव टाकणं, प्रसंगी संकटाला आपल्या अंगावर घेण्याइतकं दृढपण त्यांच्याकडे आहे. त्यांचं वागणं उत्कट आहे. मैत्रीसाठी मनातल्या मनात तुटणं आहे. सपनीच्या मैत्रीचा सहवास, आनीची अबोल; पण मुग्ध सोबत आर्चीला आहे. आर्ची-परशाचं प्रेम पंचतारांकित कृत्रिमपणाच्या बेगडी चौकटीत गळ्यात गळे घालून फुलत नाही. ते गाव-शिवारात उमलणारं, वाढणारं आहे. गावमातीचा गंध घेऊन वाहणारं आहे. प्रसंगी परिस्थितीचे आघात सहन करून एकमेकांचा शोध घेणारं आहे. नवी स्वप्ने मनात कोरून आकांक्षांच्या क्षितिजावर नवा प्रकाश निर्माण करू पाहत आहे. पण परिस्थितीचा अविचारी अंधार त्यांचे गळे चिरतो. गाफीलक्षणी गाठून त्यांना संपवलं जातं. मनातील आशा, डोळ्यातील स्वप्ने, उद्याची उमेद सारंसारं काही एका क्षणी संपतं आणि रक्ताचे प्रवाह बनून वाहतं. सत्तेचा माज हरकतो, जातीयतेचा उन्माद बेभान होतो. प्रेम जिंकते; पण प्रेमी हरतात. त्यांना आपल्या स्वप्नांचे महाल उभे करण्यात यशही येते. पण दुर्दैवाने ते सुख क्षणिक ठरते. धावणाऱ्या प्रेमींचा माग काढत मृत्यू दारी येऊन उभा ठाकतो. जातीयअभिनिवेशाच्या वणव्यात एका उमलत्या आकांक्षेचा अंत होतो.

प्रेम परगण्याच्या वाटेने आपल्या आकांक्षांचं क्षितिज शोधू पाहणाऱ्यांवर असे किती आघात व्यवस्था करणार आहे कुणास ठाऊक? असे किती रूधिराभिषेक प्रेमाच्या वेदीवर घडणार आहेत, हे नियतीलाच माहीत. नियतीने ललाटी लेखांकित केलेल्या रेषांचे प्राक्तन प्रयत्नांनी बदलता येते असे म्हणतात; पण जात नावाचे वास्तव आम्हाला अद्यापही का बदलता येत नसावे? जात नावाचे अहं आहेत, तोपर्यंत रक्तलांच्छित अध्याय प्रेमग्रंथांच्या पानावर लिहिले जाणारच आहेत. आकाशसारख्या निष्पाप, निरागस पावलांचे रक्ताळलेले ठसे काळाच्या पटलावर उमटणार असतील, तर उत्क्रांतीच्या वाटेवरील सगळ्यात प्रगत जीव म्हणून माणूस उभा आहे, असे म्हणण्यात कोणते शहाणपण आहे? एकमेकांच्या सोबतीने निघालेल्यांच्या मनी विलसणाऱ्या स्वप्नांची रांगोळी अर्धवट राहणारचं आहे का? चित्रपटाचं समीक्षण नाही करत, पण शेवटचा दोनतीन मिनिटांचा सीन कोणत्याही संवेदनशील मनांमध्ये अस्वस्थता निर्माण करतो. सप्तरंगी स्वप्नांच्या प्रदेशात विहार करणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणतो. उदासपणाची काजळी चेहऱ्यांवर पसरत जाते. मनात कालवाकालव होते. आपण काय पाहत आहोत, हे सांगण्याइतपतही शब्द प्रकटत नाहीत. डबडबलेले डोळे मूक आक्रंदन करीत राहतात. चित्रपटगृहातून बाहेर पडणारी जडावलेली पावले सोबत भकासपण घेऊन घरचा रस्ता धरतात. पण हेही सत्य आहे की, दुसऱ्याच्या दुःखाने डबडबलेले डोळे संस्कृती जिवंत असल्याची खूण आहे. आवश्यकता आहे डोळ्यातले हे पाणी जतन करून ठेवण्याची.

Vaari | वारी

By // 19 comments:
 
गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने न चुकता वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. तेथे जावून नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास?...
 
वैशाखाच्या वणव्याने आसमंत होरपळून निघत असतं. सृष्टीतील साऱ्या जिवांची काहिली सुरु असते. सगळ्यांना नकोसा असणारा उन्हाळा ऐन उमेदीत असतो. चैत्र, वैशाख, जेष्ठाच्या पावलांनी चालत आलेल्या उन्हाच्या काहिलीत सगळेच कावून गेलेले असतात. त्रस्त करणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे पाऊस घेऊन येणार असतो. मनात काही आडाखे बांधलेले असतात. डोळ्यात काही स्वप्ने असतात. ती पूर्ण करण्याचा सांगावा घेऊन आषाढाचे आगमन होते. पश्चिम क्षितिजावरून एक गंधगार संवेदना सोबत घेऊन वारा उनाड मुलासारखा उधळत अंगणी येतो. त्याच्यामागे धावत येणाऱ्या पावसाचं धरतीवर आगमन होतं. मनात साठलेला पाऊस आकाशातून बरसत राहतो. डोंगरकड्यावरून उड्या मारत मुक्तपणे हुंदडतो. शेतशिवारात येऊन साठतो. उताराच्या वाटेने पळत राहतो. वेडीवाकडी वळणे घेऊन वाहतो. झाडाफुलापानावरून निथळत राहतो.

शेतशिवारातून कामांची एकच धांदल उडते. उद्याच्या भविष्याची बिजे धरतीच्या कुशीत पावसाच्या साक्षीने पेरली जातात. सगळ्यांनाच घाई झालेली. पेरणीची वेळ साधण्यासाठी सगळीच जमवाजमव चाललेली. तुंबलेली कामं एकेक करून हातावेगळी होऊ लागतात. दिवसाचे प्रहर अपुरे पडायला लागतात. कामाच्या धबडग्यात आषाढ मध्यावर येतो तशी वारकऱ्यांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची आस जागू लागते. डोळे पंढरपुराकडे लागलेले; पण कामांचा रगाडा काही संपायचे नाव घेत नाही. दूर क्षितिजाकडून येणाऱ्या रस्त्यावरून माणसांच्या आकृत्यांचे काही ठिपके दिसू लागतात. कपाळी गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळा आणि मुखी विठ्ठल नामाचा सोहळा घेऊन भक्तांचा मेळा पंढरपूरच्या वाटेने सरकत राहतो. मनातील भक्तीभाव उसळी घेतो आणि आणखी एक ठिपका त्या मेळ्यात सामावून जातो.

वारकरी आणि विठ्ठलाचे वर्षानुवर्षाचे एकरूप झालेलं नातं. वारी मराठी मुलुखाचा भावभक्तीसोहळा आहे. मराठी मातीचं सांस्कृतिक संचित आहे. भक्तीचा सहजोद्गार बनून अनेक वर्षांपासून भक्तांची मांदियाळी वारीच्या वाटेने चालते आहे. या वाटेने चालणाऱ्या सगळ्या माणसांची जातकुळी एकच, ती म्हणजे विठ्ठल. पांडुरंग त्यांच्या मनाचा विसावा. त्यांच्या आयुष्याचा उर्जास्त्रोत. तो त्याच्या विचारातच नाहीतर जगण्यात सामावून एकरूप झालेला.

वारीच्या वाटेने चालणारी माणसे कुणी तालेवार नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या झुली परिधान करून कुणी वारीला निघालेला नसतो. काळ्यामातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा येथला साधाभोळा माणूस ऊनवारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंतःकरणाने विठ्ठल भेटीला नेणाऱ्या रस्त्याने चालत राहतो. प्रवासात मिळेल तो घास-तुकडा खातो. सांज समयी आहे तेथे मुक्कामाला थांबतो. दिली कुणी ओसरी देह टेकवायला, तर तेथेच अंग टाकतो. नाहीच काही असले तर गावातल्या मंदिराचा ओटाही त्याला विश्रांतीसाठी पुरेसा असतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहचलेला. सोयीनुसार त्याच्या सुखांची परिभाषा कधीच नाही बदलली. विठ्ठल हेच त्याचे खरे सुख.

काळ बदलला तशी माणसांच्या जगण्याची प्रयोजनेही बदलली. भौतिक सुखांनी माणसांच्या जगात आपला अधिवास निर्माण केला. पण वारी अजूनही तशीच आहे, आपलं साधेपण मिरवणारी. विज्ञाननिर्मित साधने हाती आल्याने कदाचित तिच्यात काळानुरूप सुगमता आली असेलही; पण परंपरेने वाहत येणारे सहजपण आजही तिच्यात कायम आहे.

मनाला ओढ लावणारं वारीत असं काय असावं? माणसं कशाचीही तमा न करता अनवाणी पायांनी वारीच्या वाटेने का धावत राहतात? त्यांच्यात हे सगळं कुठून येत असेल? वारीत एकवटलेली माणसं पाहून हे प्रश्न मनात उगीच भिरभिरायला लागतात. विज्ञानप्रणित निकषांना प्रमाण मानून यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करून फार काही हाती लागण्याची शक्यता नसते. भक्तांच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावकल्लोळातून शोधून पाहिले की, ही कोडी उलगडत जातात. ही सगळी श्रद्धावंत माणसं वारीच्या वाटेने वावरताना मनातला अहं गावाची वेस ओलांडतानाच मागे टाकून येतात आणि माणूस म्हणून एक होतात. हे एकरूप होणं त्यांच्या श्रद्धेचं फलित असेल का?

वारी साऱ्यांना आपल्यात सामावून घेते. तुम्ही राव-रंक कुणीही असा, तुमच्याकडील सत्तेची वस्त्रे विसरून वारीत विरून जात असाल, तर सगळ्यांनाच माउलीरूप होता येते. कोणत्याही भेदभावाच्या अतित असणारी वारी माणसांच्या विचारांचा परिघ विस्तारत नेते. मनात निर्माण झालेलं मीपणाचं बेट या वारीत पार वितळून जातं. मागे उरतं निखळ माणूसपण. चार दिशांनी येणारी चार माणसं, चार दुःखं दिमतीला घेऊन आलेली असतात. कुणाचं शेतच पिकलं नाही. कुणाचा बैल ऐन पेरणीच्या हंगामात गेला. कुणाचं शेत कर्जापोटी गहाण टाकलेलं, तर कुणाच्या लेकीचं नांदणं पणाला लागलेलं. नाना तऱ्हेची दुःखं सोबत घेऊन भक्त पांडुरंगाला भेटायला आलेला असतो. वारीसोबत वावरतांना अनोळखी मने संवाद साधतात. संवादाचे साकव उभे करून आपलेपणाचा प्रवास घडत राहतो. आपली, त्यांची सुख-दुःखे एकमेकांना सांगितली जातात. ऐकली जातात. मनात लपवलेले दुःखाचे कढ वाटून हलके होत जातात. जगात केवळ मलाच दुःखे, वेदना, समस्या नाहीत. ही जाणीव होऊन जगण्याचं बळ वाढत जातं. माणसाला आपल्यातलं आणि माणसातलं माणूसपण कळत जातं आणि जगण्याची प्रयोजने अधिक गडद होत जातात.

विठ्ठल सर्वसामान्यांचा समन्वयवादी देव आहे. माणसांचं रोजचं अवघड जगणं सुघड करणारा. रोजच्या नव्या मरणाला सामोरे जाणाऱ्या माणसांच्या मनात जगण्याचं स्वप्न पेरणारा. खरंतर दुःखाला ना नाश, ना अंत. माणसं कधी ती स्वतःहून ओढवून घेतात, कधी दुःखंच आपल्या पावलांनी चालून येतात. या साऱ्या कलहात संसाराचा सागर सहिसलामत पार करून पैलतीर गाठणं अवघड असल्याची भक्तांची समजूत झालेली. भवसागर कमरेएवढ्या पाण्याइतकाच तर आहे, तो पार कर, पैलतीर नक्कीच गाठशील, असेच काहीतरी कमरेवर हात ठेऊन खचलेल्या जिवांना विठ्ठल सूचित करीत असावा. विठ्ठल महाराष्ट्राचा सामाजिक देव. ना त्याच्या हातात कोणती आयुधे, ना कोणती अस्त्रे-शस्त्रे. भक्ताला तो हेच सांगत असावा की, तुझं नितळ, निर्मळ मन हेच जग जिंकण्याचं आयुध आहे, ते सांभाळलं की पुरे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकलंस तरी खूप झालं.

श्रद्धाशील अंत:करणातून निर्मित आस्थेने भक्तीचे शिखर गाठणारे आहेत, तसे भक्तांच्या भोळेपणाचा वापर करून स्वार्थ साधणाऱ्यांचीही जगात कमी नाही. ते कालच होते असे नाही, तर आजही आहेत. अनेकांचे अनेक देव-दैवतं असतात. माणसं त्यांच्या कृपाकटाक्षासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत धावाधाव करीत राहतात. कुणी मंत्रतंत्र जागराने ईप्सित साध्य करू पाहतात. कुणी व्रतवैकल्य, जपतप, अनुष्ठानांच्या माध्यमातून सुखाचा सहवास शोधू पाहतात. या साऱ्या धडपडीने सुखं आपल्या अंगणी वास्तव्यास येतात का? हा साधासा प्रश्न भावनांच्या अवेगावर स्वार झालेल्या भक्ताकडून विचारायचा राहूनच जातो. प्राप्त परिस्थितीचे परिशीलन न करता तो सुखाच्या मृगजळामागे धावत राहतो.

वंचित, उपेक्षित, अव्हेरलेल्या जिवांचा जगण्याचा एकमेव आधार श्रद्धा असते. त्यांच्या श्रद्धाशील विचारांचा फायदा घेणारे स्वार्थपरायण माणसे जगात अनेक आहेत. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित युगात ही स्थिती असेल, तर पाच-सहाशे वर्षापूर्वी समाजाचं चित्र काय असेल? अडले-नडलेले जीव सारासार विवेक हरवून बसतात. विवेक हरवलेली माणसे विचार विसरतात. कृती त्यांच्यासाठी दूरचा परगणा ठरते. विवेकी मार्गाने वर्तणाऱ्या कोण्या द्रष्ट्याची नजर समाजातील दुरितांकडे पडणे अशावेळी आवश्यक असते. संतांनी विवेक जागराचे काम केले. नाडल्या जाणाऱ्या समाजाकडे आणि अज्ञाननिर्मित श्रद्धांकडे ही विवेकी माणसं डोळसपणे पाहत होती. लोकांना त्यांच्या दुःखाचे कारण विशद करून सांगत होती. संतांनी विवेक विसरलेल्यांच्या मनात विचाराची बिजे रुजवली. विवंचनेत जगणाऱ्या भक्ताला विवेकी भक्तीमार्गाने नेऊन स्वतःची ओळख मिळवून दिली. सामाजिकस्तरावर स्वतःची कोणतीही ओळख नसणाऱ्यांना विठ्ठलाच्या रूपाने आधार गवसला. भागवतभक्तीच्या भगव्या पताका मुक्तीचे निशाण बनून फडकल्या. येथील मातीचा गंध लेऊन वाहणारा विचार एकवटला. साऱ्यांच्या अंतर्यामी समतेचा एकच सूर उदित झाला. एकत्र आलेली पावले चालत राहिली पंढरपूरच्या वाटेने, मनात श्रद्धेचा अलोट कल्लोळ घेऊन.

संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भक्तीच्या पायावर भागवतधर्माची इमारत उभी राहिली. संत तुकारामांनी तिच्यावर कळस चढवला. भागवतसंप्रदायाची ही सगळी व्यवस्था उभी आहे श्रद्धेच्या पायावर. जगण्याची साधीसोपी रीत संतानी सामान्यांच्या हाती दिली. जातीयतेचे प्राबल्य असलेला तो काळ. विषमता पराकोटीला पोहोचलेली. माणसातील माणूसपण नाकारणाऱ्या मानसिकता प्रबळ झालेल्या. या विपरीत विचारांच्या वर्तुळांना ओलांडून अठरापगड जातीजमातीची माणसे भागवतधर्माचे निशाण हाती घेऊन एकत्र आली. सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी समाजात समताधारीत विचार रुजावा म्हणून सामाजिकक्रांतीचं रणशिंग फुंकलं. संत तुकारामांनी सामान्यांच्या आयुष्यात सन्मानाने जगण्याचा विचार दिला. समतावादी विचारांची गुढी उभारणाऱ्या संतांच्या मांदियाळीने माणसातल्या माणूसपणाला साद घातली. माणसं स्वतःच स्वतःचा शोध घेऊ लागली. जाग्या झालेल्या विचारांचे वारे मनामनातून वाहू लागले.

समाजातील मूठभर मान्यवरांनी निर्माण केलेल्या प्रतिष्ठेच्या परिघाबाहेर आपलं ओंजळभर अस्तित्व सांभाळून जगणाऱ्या माणसांच्या मनात बदललेल्या विचारांचे पडसाद उमटू लागले. भक्तिमार्गाने आत्मसन्मान शोधू पाहणाऱ्या माणसांची पावले पंढरपूरच्या वाटेने वळती झाली. या वाटा समतेच्या दिशेने आणि समन्वयाचा मार्गाने चालत राहिल्या. तत्कालीन समाजाचा परिवेशच सीमांकित होता. त्यात परिवर्तन घडवून आणणे एक अवघड काम होते. दिवा पेटवून रात्रीचा अंधार थोडातरी कमी करता येतो. पण विचारसृष्टीला लागलेलं ग्रहण सुटण्यासाठी परिस्थितीत परिवलन घडून येणे आवश्यक असते. समाज संकुचित विचारांच्या वर्तुळातून पुढे सरकणे आवश्यक होते. सामान्यांच्या विचारकक्षेत असणारा अंधार दूर करण्यासाठी संतांनी सद्विचारांचे पलिते प्रदीप्त करून पावलापुरता प्रकाश निर्माण केला. संतांच्या लेखणी-वाणीतून अभंगसाहित्य प्रकटले. त्याचे पडसाद समाजजीवनावर प्रतिबिंबित होऊ लागले.

भागवत संप्रदाय वर्धिष्णू होण्यामागे महत्त्वाचे कारण त्यात असणारी सर्वसमावेशकता आहे, असे म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत विसोबा, संत नरहरी, संत सावता, संत सेना, संत चोखामेळा अशी कितीतरी नावे पूर्वसुकृताच्या पुण्याईची, सामाजिक मान्यतेची कोणतीही लेबले सोबत नसताना भक्तीचा प्रवाह बनून लोकगंगेच्या पात्रातून वाहत राहिली. समाजमनाला आकार देत राहिली. कोणत्याही समाजाला शासकापेक्षा शांतता आणि समावेशकता कोणत्याही काळी अधिक महत्त्वाची वाटते. परकीय सत्ताधिशांच्या आक्रमणांनी, त्यांच्या सत्ताकाळांनी देशाचे नुकसान केले असेल-नसेल, त्यापेक्षा अधिक नुकसान विषमतेने कधीकाळी केले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. संघर्ष राजकीय असेल तर शत्रू समोर असतो आणि माहीतही असतो. पण समतेच्या संघर्षात स्वतःशीच लढायचे असते. मनात घर करून वास्तव्यास असणाऱ्या वैगुण्यांशी दोन हात करायचे असतात. संतांचा सगळा संघर्ष समतेच्या जागरासाठी होता. संतांनी सर्वसामान्य माणसाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. वंचनेच्या वर्तुळात बंदिस्त असणाऱ्या समाजाला मी कोण आहे? हे विचारण्याएवढं त्यांनी मोठं केलं. हाती शस्त्रे घेऊन लढणे हा काही अन्यायविरोधात एल्गार ठरत नाही. कधीकधी लेखणीसुद्धा खड्ग बनत असते. संतांच्या लेखणीने नेमके हेच काम केलं आहे. त्यांच्या प्रतिभेतून निर्मित अभंगसाहित्य संघर्षात टिकून राहण्याचं अभंगपण देत होते. किंकर्तव्यमूढ झालेल्या लोकांच्या विचारात प्राण फुंकत होते. सामान्यांसाठी तो स्वजाणिवेचा सहजोद्गार होता.

विठ्ठल सर्वसामान्यांचा हाकेला धावून जाणारा. पुंडलिकासाठी विटेवर वाट पाहत तिष्ठत राहणारा. भक्तांच्या भेटीची ओढ खरंतर त्यालाच अधिक. तो साऱ्यांचाच आहे. तो सापडावा म्हणून सायासप्रयास करायची आवश्यकताच नाही, हे सांगतांना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ, त्याच्या गळा माळ असो नसो.’ भक्ताची भगवंत भेटीसाठी असणारी पात्रतासुद्धा हीच. त्याला भेटायचं तर कुठल्या सोवळ्या-ओवळ्याची वस्त्रे गणवेश म्हणून परिधान करून जाण्याची आवश्यकता नाही. हृदयातून उमलून येणारा आणि ओठातून प्रकटणारा प्रत्येक शब्द गीत होतो. त्यासाठी शास्त्रीय संगीताचा क्लास लावायची गरज नसते. हातात टाळ असला तर उत्तमच, नसला तर टाळ्याही चालतात. म्हणूनच संत जनाबाई ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ म्हणाल्या असाव्यात. संत सावता माळी कधी विठ्ठलाच्या दर्शनाला धावले नाहीत. त्यांना त्यांचा विठ्ठल कांदामुळाभाजीत दिसत होता. संत सेना महाराजांना आपल्या रोजच्या व्यवसायात आणि जगण्यात सापडत होता. संत नरहरींना विठ्ठल नामाचा व्यवहार कळला होता. म्हणूनच की काय पांडुरंगालाही भक्तांचा लळा होता.

भक्तांची कामे करण्यात कोणतेही कमीपण विठ्ठलास कधी वाटले नाही. तो संत जनाबाईंच्या सोबत दळण दळत होता. संत गोरोबांच्या घरी मडकी घडवण्यासाठी चिखल तुडवण्यात त्याला आनंद मिळत होता. संत चोखोबांच्या सोबत मेलेली गुरे ओढत होता. संत रोहिदासांना चांमडं रंगवून देत होता. संत कबीरांचे शेले विणीत असे. म्हणूनच की काय समाजातील साऱ्यांना तो आपला आणि आपल्यातील एक वाटत असे. विठ्ठलाने भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचे व्रत कधी टाकले नाही. या सगळ्या गोष्टी कदाचित विज्ञानयुगात कपोलकल्पित वाटतील. विज्ञानाच्या परिभाषेत असंभव वगैरे वाटतील, हे खरंय. पण विज्ञानाचा प्रदेश जेथे संपतो तेथून श्रद्धेचा परगणा सुरु होतो, हे वास्तवही नजरेआड करून चालत नाही. भक्त कोणत्याही युगात वास्तव्य करणारे असोत, त्याच्या जगण्याचे सारे व्यवहार श्रद्धापूर्वक अंतःकरणातून उदित झालेल्या भक्तिभावाने सुरु होतात आणि इच्छित दैवताच्या दर्शनात विसर्जित होतात. महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या श्रद्धा विठ्ठल चरणी समर्पित आहेत. श्रद्धेत डोळसपणा असेल तर अशा भक्तीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. वास्तवाच्या वाटेवर प्रवास करताना श्रद्धाशील अंतःकरण कोणतातरी आधार शोधत असते. त्यांच्या जगण्याला आश्वस्त करणारा आधार विठ्ठल होत असल्यास संदेह निर्माण होण्याचे कारण नाही. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ हे संत नामदेवांचे म्हणणेही अशा भूमिकेत खरेच ठरते. विठ्ठलभक्तीचे साध्यही ज्ञानदीप प्रज्ज्वलित करणे हेच आहे. भक्तीतून भावनांचा जागर करीत माणसांच्या विचारांच्या कक्षा विस्तारत नेणे हेच संतांच्या साहित्याचे, प्रबोधनाचे उद्दिष्ट होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासून वारीचा प्रघात असल्याचे म्हटले जाते. जे काय असेल ते असो; पण गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने न चुकता वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. तेथे जावून नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास? कदाचित आपल्या पाठीशी पांडुरंग उभा आहे आणि तो आपणास जगायला प्रयोजने देतो, असे त्यांना वाटत असेल का? कारणे काहीही असोत, आषाढ मासाचा प्रारंभ झाला की, आजही मराठी माणसाचे मन पंढरपुराकडे धाव घेते एवढं मात्र नक्की. विठ्ठलभक्तीचं हे बीज जणू काही त्याच्या रक्तातच पेरून आलेलं असतं. परिस्थितीच्या अवकाशात ते वाढत जातं. दिसामासाने वाढणाऱ्या भक्तीच्या या रोपट्याला आलेलं फळ म्हणजे विठ्ठल, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.