Gaav | गाव

By // 7 comments:
गाव: आठवणींच्या वर्तुळातील 

शाळेत सोबत शिकणारा सवंगडी परवा अचानक भेटला. काहीतरी कामानिमित्ताने जळगावात आला होता. बऱ्याच दिवसांनी भेट घडली. रस्त्याच्या कडेनेच थांबून लागला बोलायला. रस्त्यावर उभं राहून बोलणं प्रशस्त वाटेना. म्हणून म्हणालो, “अरे, असं रस्त्यावर थांबून आपण काय बोलत उभे आहोत. घरी चल, बोलू निवांत.” मला पुढे बोलायची उसंत न देता म्हणाला, “नाही, तेवढा वेळा नाही. कामं खोळंबली आहेत. बघू नंतर कधी.” त्याच्या आर्जवी नकाराने माझ्या अपेक्षेला पूर्णविराम मिळाला. तेथून चहाच्या टपरीवर गेलो. चहा मागवला. चहा घेताना म्हणाला, “अशात कधी गावाकडे गेला होतास का?” त्याच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात न आल्याने आश्चर्यचकित मुद्रेने पाहत राहिलो थोडा वेळ तसाच. म्हणालो, “हो, पण का रे! काही विशेष घडलं का गावाकडे?” म्हणाला, “नाही, विशेष असं काही नाही; पण हल्ली आपलं गाव किती बदललंय नाही! गावाचं गावपण उरलं नाही. आपल्या वेळचं अख्खं गाव हरवलंय असं वाटतंय. अगदी एखादा दिवस मोठ्या मुश्किलीने थांबावसं वाटतं. सगळा आपलेपणाच संपलाय. जो-तो आपापल्या कोशात दडून बसला आहे. माणसं आता पहिल्यासारखी राहिली नाहीत.” त्याला काय वाटले कोणास ठावूक पण बोलत होता, आपलं काहीतरी हातून निसटल्याची खंत घेऊन. चहा घेईपर्यंत काय काय सांगत होता. एकेक गोष्टी आठवत होता. मला बसस्थानकावर सोड म्हणून सांगितले. निघालो तिकडे. गाडी निघायच्या तयारीत. घाईतच गाडीत बसला आणि निघाला.

घरी आलो. पण ‘गाव बदललं, गावपण संपलं.’ हे त्याचं म्हणणं काहीकेल्या मनातून निघत नव्हतं. एका सीमित अर्थाने ते खरंही होतं. काळाचे संदर्भ बदलतात, तशा इतर काही गोष्टीही ओघाने बदलत जातात. बदल निसर्गाचा सहजभाव असल्याने ते टाळताही येत नसतात. प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही. मग आमचं गावही यास कसे अपवाद असेल! पण गाव बदललं, म्हणजे नेमका काय बदल झाला म्हणायचा त्यात. गावाचा चेहरा-मोहरा, जगणं, वागणं, सणवार, रूढीपरंपरा, माणसे असं सगळंच किंवा थोडंफार काळानुरूप बदललं. हा बदल टाळता न येणारा. मात्र घडणाऱ्या बदलात चेहरा हरवलेलं गाव त्यास नको होते. आमच्या पिढीने जगलेलं गाव अद्यापही त्याच्या मनात रुजलेलं. गावाचं निर्व्याज, साधंस जगणं स्मृतीत जपलं आहे, तेच आणि तसेच त्यास हवे आहे. हे सगळं आठवणींच्या कोंदणात ठीक आहे; पण वास्तवात असेच कसे असेल? वास्तव आणि स्वप्ने यात बरंच अंतर असतं. स्वप्नं कितीही सुंदर असली, तरी ती खरी होतीलच याची कोणाला खात्री देता येते का?

खरंतर माझ्याही मनात गावाची प्रतिमा काहीशी अशीच आहे आणि अद्यापही तशीच जपून ठेवली आहे. काळाचा पडदा दूर करून पाहताना तीस-चाळीस वर्षापूर्वीचे गाव आजही स्मृतींच्या गाभाऱ्यात नंदादीपाचा मंद प्रकाश बनून मनाचं आसमंत उजळत आहे. तिच गजबज, तोच आपलेपणा सोबतीला घेऊन. एकेक आठवणी अनमोल ठेवा आहेत. आजच्या बदललेल्या गावाशी तुलना करताना गावाचं त्यावेळचं साधसं जगणं रमणीय वाटतं. सगळ्या देखाव्यांपासून, चमकधमकपासून कोसो दूर असणारं; पण आपलेपणाचा ओलावा घेऊन नांदणारं. सात्विक जगण्याला संस्कार समजणारं. साधेपणाचा साज लेवून नटलेलं. कोणतेही अभिनिवेश धारण न करता साधंसरळ जगणं, हीच गावाची ओळख. जगण्याच्या दैनंदिन व्यवहारात गुंतलेलं, पण कोणताही गुंता न करता जगणारं गाव आपल्या संथ लयीत चालत राहायचं. कोणाला कसली घाई नाही आणि पुढे निघायची मनात आसक्तीही नाही. लहानमोठ्या कुरबुरी, हेवेदावे असतील; पण मोठ्या कलहांपासून चार हात लांबच असायचं. शेतशिवारात प्रामाणिक कष्ट करायचं. निढळाच्या घामाने कमावलेल्या भाजीभाकरीची गोडी अनुभवत जगायचं. तूपसाखरेचा मोह मनाला पडला, तरी अशा मृगजळापासून सुरक्षित अंतरावर राहायचं. कोणत्यातरी सणवाराच्या निमित्ताने मुखी पडणारा गोडधोडाचा घास मनाच्या प्रसन्नतेची परिसीमा असायचा. ‘मन करारे प्रसन्न...’ या संतवचनावर विश्वास ठेवून वर्तणारे आणि आपल्या ओटीत पडलेले चिमणसुख वरदान समजून सुखाने नांदणारे. कधीकाळी बहुतेक गावे अशीच असायचीही, साधी तरीही सुंदर. अशी गावं गावपणाचा परिघ समृद्ध करीत होती.

काही दिवसापूर्वी गावी जाणं घडलं. एव्हाना गावी जावं तेव्हा प्रत्येक फेरीत काहीना काही बदल झालेले दिसतात. आताही ते दिसले, पण या बदलांना आपलेपणाचा स्पर्श नसल्याचे का कोण जाणे उगीचंच वाटत राहते. गावात प्रवेशताना वाटेवरचा कचरा नेहमीप्रमाणे स्वागताला सज्ज. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उकिरड्यांनी आपापली आसनं धारण केलेली. गटारीच्या पाण्याच्या मुक्त संचाराने त्यांना घडणारा अभिषेक. पाण्याऐवजी गटारी कचऱ्याने तुडुंब भरलेल्या. हे चित्र काही अद्याप बदलायला तयार नाही. स्वच्छता अभियानाने येथे शरणांगती पत्करलेली. हे सगळं पाहून मनास वाटत होते, गावात कोणालाच अशा अस्वच्छतेची खंत वाटत नसेल का? आरोग्याच्या प्रश्नांविषयी कोणी काहीच ऐकले नसेल का? की ही आमच्या सार्वजनिक वर्तनाची सुधारित आवृत्ती आहे?

रस्त्याने चालत पुढे येतो. शासकीय सुविधांमुळे गावातील मातीचे रस्ते इतिहासात जमा होऊन त्यांचं कॉंक्रिटीकरण झालं; पण त्यांच्या नशिबी असणारे दुर्दैवाचे भोग काही संपले नाहीत. दर दहाबारा पावलांवर उखडलेले. तुंबलेलं पाणी दारासमोरून वाहत नाही म्हणून कोणीतरी मध्येच कुदळचे घाव घालून जखमी केलेले रस्ते अंगावर नागमोडी नाल्यांचे गोंदण करून पहुडलेले. घरात पाण्याचा नळ घेतला म्हणून त्यासाठी केलेल्या खड्ड्यांचे सौभाग्य ललाटी मिरवणारे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या घरांचे चेहरे मात्र देखणे झालेले. पूर्वीची धाब्याची, मातीची घरं जाऊन सिमेंट, विटांची पक्की घरं तयार झाली. कुणाची कृपा, कुणाच्या आशीर्वादाची अक्षरे माथ्यावर मिरवणारी. परिसरातल्या निष्काळजीपणात घरांची स्वच्छता ठळकपणे नजरेत भरत होती. येथेही आपपरभाव अधोरेखित केला जातच होता. वैयक्तिक चेहरा सुंदर; पण सार्वजनिक चेहरा कुरूपपणाकडे वळणारा.

थोडं पुढे येऊन मंदिरापाशी थांबलो. त्याचाही कायापालट झालेला आहे. आस्थेचा, भक्तीचा टिळा ललाटी लेऊन वर्षानुवर्ष उभं असणारं लहानसं मंदिर आता इतिहास जमा झालं. त्याचं साधेपणातील सौंदर्य संपलं. लोकांनी सढळ हातानी केलेल्या मदतीने आधुनिक देखणा लूक घेऊन सुंदर झालं. गाभाऱ्यातल्या देवालाही समृद्धी आली. त्याचंही स्टेटस सुधारलं. पण माणसं आपलं सार्वजनिक वर्तनाचं स्टेटस का बदलू शकली नसतील? या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी मला सापडत नाहीये. मंदिराच्या भव्यपणात त्याच्या आसपासचा मोकळा परिसरही बंदिस्त झाला आणि तेथल्या मोकळ्या जागी खेळणारी पावलं थबकली. कधीकाळी गावातील मुलांच्या खेळण्याने गजबजलेला हा परिसर आज सुनासुना वाटत होता. आमच्या लहानपणातील खेळत्या पावलांना मन उगीचंच तेथे शोधत राहिले. गावाच्या मध्यावर असणारं हे मंदिर गावातल्या धार्मिक आस्थेचे केंद्र. कुणाघरी शुभकार्य असली की, पहिला कौल येथेच लावला जायचा. सुगीच्या दिवसात शेतात येणारे पहिले कणीस आधी देवाच्या पायाशी वाहिले जायचे. नित्यनेमाने देवाचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरवात करणारे सगळ्या ऋतूत येथे दिसायचे. रात्रीच्या प्रहरी भजनांचा भक्तीरस मिणमिणत्या दिवट्यांच्या प्रकाशात सुरांचे रंग भरायचा. पूजापाठ, पोथ्या-पुराणांचे वाचन, सप्ताह, भंडारा असे काही ना काही वर्षभर सुरु असायचे. परिसर नेहमीच माणसांच्या राबत्याने जागा असायचा. गावाचं जगणं देवाच्या आशीर्वादाने चाललेलं असायचं. त्यातही एक प्रामाणिक श्रद्धा असायची. मंदिर जेवढा आस्थेचा विषय होता तेवढाच उर्जेचाही. मंदिराच्या मोकळ्या जागी खेळणाऱ्या मुलांचा गलका वाढून भांडणं लागली की, कोणीतरी हमखास रागावणार. पण त्यात रागापेक्षा प्रेमच जास्त असायचं. प्रगतीच्या वाटेने आलेल्या बदलांनी हक्काने रागावणंही संपलं. रागावणारेही निसर्गनियमांच्या शिड्या धरून चालते झाले. आहेत काही, ते खूप थकलेले, आपली अखेर शोधणारे.

मंदिराकडे पाहत उभा होतो. मंदिराच्या ओट्यावर माणसांचं हल्लीही थांबणं असतं. गावातील काही जण तेथे बसलेले. त्यातील एकाने विचारले, “काय सर, काय बघतोय मंदिराकडे असं? पहिल्यांदा पाहतोस का?” मंदिराच्या आजूबाजूने पाहत त्यांना म्हणालो, “नाही, पहिल्यांदा वगैरे पाहत नाही. पण हे मंदिर, हा परिसर कसा नीटनेटका ठेवलाय तुम्ही लोकांनी. मग गावात येतानाचे रस्ते, परिसर असे का? कोणालाच काही करावेसे का वाटत नाही, याचा विचार करतोय.” माझ्याकडे पाहत त्यातला एक जण म्हणाला, “सर, तुझं म्हणणं ठीक आहे, पण हे सगळं करेल कोण? येथे कोणालाही सांगून पाहा, एकच उत्तर मिळेल, तू तुझं पाहा ना! आता सांग, अशानं काय होणार आहे. येथे प्रत्येक जण स्वतःला मोठा समजतो. कधीकाळी ठीक होतं, कुणी जुणंजाणतं माणूस बोललं की ऐकून तरी घेत होतो. आता काही कुणाला तशी गरज उरली नाही.” त्याचं म्हणणं ऐकून खंत व्यक्त करीत बोललो, “म्हणजे, असं कसं! आरोग्याचे प्रश्न काय एकट्याची गरज असते का? गावातील स्वच्छतेचा प्रश्न सार्वजनिक आहे, तो सर्वांनी सोडवायचा.” मी माझं मत मांडलं, पण मत कितीही चांगले असले तरी त्याचा उपयोग नाही, असाच सगळ्यांचा सूर होता.

असं का होत असावं? या प्रश्नांचा भुंगा काही केल्या पिच्छा सोडायला तयार नव्हता. मला वाटतं अशा का नावाच्या प्रश्नांचं उत्तर आपल्या मानसिकतेत दडलंय. जगण्यातील साधेपणाला तिलांजली दिली जाते, तेव्हा बेगडी जगणंच देखणं वाटायला लागतं. अशा जगण्या-वागण्याला माणसं आपलं म्हणायला लागली आहेत. जगण्याची परिमाणं बदलवून माणसं स्वतःला तसे सेट करून घेत आहेत. आपलं सुख आणि आपण या सीमित वर्तुळाला जीवनाचा परिघ करून वागणं घडत असेल तर त्यास कोण काय करेल? सगळ्याच व्यवहाराच्या परिभाषा बदलत आहेत. पैशाला माणसापेक्षा अधिक मोल आले आहे. श्रीमंतीची व्याख्याही बदलून ज्याच्याकडे पैसा अधिक तो लोकप्रिय ठरतो आहे. पूर्वी दारासमोर उभ्या असलेल्या बैलगाड्या आणि बैलजोड्या गावातील आसामी ठरवीत असायच्या. दारासमोरून बैलगाड्या जाऊन ट्रॅक्टर, मोटारसायकली उभ्या राहिल्या. गावात पैसाही बऱ्यापैकी आला. जागतिकीकरणाच्या वाटेने जगण्याच्या दिशा समृद्ध केल्या; पण माणसांची मने मात्र संपन्न होण्याऐवजी संकुचित होत गेली. विज्ञाननिर्मित सुखसाधनं आपणाकडे असावीत, म्हणून अहमहमिका सुरु झाली. आमच्या लहानपणी रेडिओ श्रीमंतीचा निकष असायचा. आज स्मार्टफोन, संगणक, एलइडी टीव्ही वगैरे साधनं असलेली घरं प्रतिष्ठाप्राप्त ठरली आहेत. घरांचा चेहरा सुंदर झाला; पण माणसांचा विरूप होत आहे. आस्था, आपुलकी शब्दांतला ओलावा आटत चालला आहे. पैशाने माणसांचा ताल, तोल आणि तंत्र बदलवलं.

गावागावात राजकारण शिरलं आणि माणसांच्या जगण्याचे रंग पालटले. पूर्वी जत्रेच्या निमित्ताने गावातून तमाशाचे फड रंगायचे. आता राजकारणाने गटतट उभे करून शहकाटशहाचे खेळ रंगू लागले आहेत. कोणत्यातरी निवडणुकीच्या निमित्ताने मने कलुषित होतात. भावकीत दोन गट-तट तयार होणं आता कोणी मनाला नाही लावून घेत. त्याहीपुढे मजल गाठून एकाच घरात दोन भाऊ, दोन पक्षांचे कार्यकर्ते बनतात आणि एकमेकाला पाण्यात पाहतात. कोणत्यातरी संघटनांच्या, पक्षांच्या पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणे जागोजागी उगवलेल्या पाट्या गावात प्रवेशताना हार्दिक स्वागत करू लागल्या आहेत. कोण्यातरी दादा, भाऊ, आप्पाचा वाढदिवस पोस्टर बनून भिंतीवर नाहीतर झाडाच्या फांदीवर लटकतो आहे. कधीकाळी आपलेपणाच्या संवादाने हितगुज करणारा गावाचा पार पोरका वाटायला लागला आहे. शेतात जाण्याचा कंटाळा केला म्हणून पारावरच बापाच्या हाताचा मार खाणारी पोरं आता गावात राहिली नाहीत. आहेत ती स्मार्टफोनच्या मोहजालात गुंतली आहेत. गावातल्या निवडणुका आखाडे बनल्या. विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकाही आमदार, खासदारांच्या निवडणुकांसारख्या लढवल्या जात आहेत.

ग्रामीण जीवनाची आयडेंटीटी असणारे गुरावासरांनी भरलेले गोठे. त्यांची गजबज कुठल्या कुठे पळाली. गोठ्यात बांधलेल्या बैलजोड्या मालकाची आर्थिक क्षमता प्रदर्शित करायच्या. आज बैलांचीच फारशी गरज उरली नाही, तेथे गोठ्यातील इतर जनावरांना कोण सांभाळतो. गावात एकवेळ दूध मिळणार नाही, पण कोणत्याही ब्रान्डची कोल्ड्रिंक्स सहज मिळतात. रस्त्याने प्रवास करणाऱ्या पांथस्थांसाठी पूर्वी पाणपोया असायच्या. आता परमिटरूम, बियरबार नामक तीर्थस्थळे दाटीवाटीने उभी राहिली आहेत. ओठावर मिसरूडही न फुटलेल्यांची पावलं तिकडे वळत आहेत. पूर्वी गावात मद्यपान करणारा कोणी असला की, रस्त्याने लपतछपत घरी येवून गुपचूप पडायचा. व्यसन करणाऱ्यासही मोठ्यांचा धाक वाटायचा. हल्ली बऱ्याच गावात हातभट्टीच्या कौशल्याला बरकत आलेली दिसते. विदेशी पेयाच्या प्रेमात असणाऱ्यांसाठी हाकेच्या अंतरावर सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकांची सोय झाली आहे.

गावात लाईट येऊन बरेच दिवस उलटले. दिव्यांचा लख्ख प्रकाश रस्त्यावर ओसंडून वाहतो. चिमण्या, कंदील अडगळीत गेले. लोडशेडिंगपासून मुक्तीसाठी इन्व्हर्टर, बॅटऱ्या आल्या. पणत्यांनी कधीच जीव सोडला आहे. दिवाळीच्या उजेडापुरता त्यांचा सहवास उरला. पूर्वी ग्रामपंचायतीचा शिपाई गावातील रस्त्यावरचे खुटकंदील रॉकेल भरून रोज पेटवून जायचा. आता स्ट्रीटलाईटने त्याचीही अवश्यकता उरली नाही. जात्यावर दळण दळण्याचा, नदीवरून घागरी, हंडे भरून पाणी आणण्याचा प्रश्नच लाईटने संपवला. सकाळच्या प्रहरी ऐकू येणाऱ्या जात्यावरच्या ओव्या मुक्या झाल्या. दही घुसळण्याचे आवाज विजेच्या प्रकाशात हरवले. गोठ्यात गायी-म्हशीच नसल्याने दूधदुभते नाही आणि आहे तेथे ते बाजारात जात असल्याने घरातल्या शिंक्यांवर ठेवलेलं दही, दूध, लोणी आता शोधूनही दिसत नाही. असलेच काही शिल्लक ते फ्रीजमध्ये जाऊन कुडकुडत बसलेय. नसेल तेथे कोणत्यातरी डेअरीतून येऊन तेपण गावात मिळायला लागले आहे. दूधदुभते शब्दातला संपन्न आशय संपून तो गरजेपुरते असा झाला आहे.

शेतीचे आधुनिक तंत्र आणि यंत्र शेतकऱ्याच्या सोबतीला आल्याने शेतातल्या कामांची लगीनघाई संपली आहे. एखाद्याकडे हंगामाच्या दिवसात बैलजोडीची, काम करणाऱ्यांची अडचण असली तर मदतीला जाण्याचे उदारपण उरले नाही. शेतीशी निगडित असणारा एक श्रमजीवी वर्ग कधीकाळी गावातच सुखनैव नांदत होता, त्यांचं जगणं यांत्रिकीकरणाने उजाड होत गेलं. शेतकऱ्याकडे वर्षभराच्या कामाचा मोबदला हक्काने घेणाऱ्या अलुतेदार-बलुतेदारांच्या जगण्याच्या वाटा सैरभैर झाल्या. लोहाराचा भाता वेल्डिंगच्या दुकानांनी विस्थापित केला. कुंभाराचा आवा स्टीलभांड्यांच्या आवाजात आणि फिल्टर पाण्याच्या जाहिरातीत कधीच हरवला. सुतारनेट नेट लावूनही उभं राहण्याच्या परिस्थितीत उरलं नाही. पेरणीच्या दिवसातल्या औजारं तयार करताना तेथे घडणारा संवादही संपला. सोबत आपलेपणही. भांड्यांना कल्हई करणारा, बुडे लावणारा चुकूनही दिसत नाही. सकाळ जागवत येणारा वासुदेव, भविष्य सांगणारे, रोमडी लावणारे, अस्वल, नंदीबैल घेऊन येणारे, माकडवाले, कसरतीचे खेळ करणारे, सुयाबिब्बे विकायला येणाऱ्या बाया यातलं हल्ली कोणी दिसतंच नाही.

शेतीकामाला यंत्रे आल्याने ना मळणी राहिली, ना उपणणी. खळे तयार करायची गरजच संपली. सगळे कसे वेगात होऊ लागले; पण या वेगानेच माणसांच्या जगण्याचा आवेग संपवला. सणावाराला घडणारे संस्कृतीचे दर्शनही बदललं. त्यातही आधुनिकतेने बेगडी झगमग आली. कळत नकळत सगळ्याच गोष्टींचे सीमोल्लंघन घडत आहे. दसऱ्याला दिल्या जाणाऱ्या आपट्याच्या पानांतला स्नेह संपला. दिवाळीचा प्रकाश विजेच्या दिव्यांनी सजायला लागला आहे. उकिरड्यावरसुद्धा आस्थेने लागणाऱ्या पणत्यांतील आपलेपणाचा स्नेह हरवला. संक्रांतीचा गोडवा कमी झाला. पोळा, होळी, अक्षयतृतीया, नागपंचमी यासारखे सण आपलं ग्रामीण साजाचं अस्तित्व हरवून बसले आहेत. एक सोपस्कार म्हणूनच उरले आहेत. प्रत्येक गावाचं ग्रामदैवत असायचं त्या निमित्ताने भरणाऱ्या जत्रा माणसांच्या आस्थेचा आणि संवेदनशीलतेचा उत्कर्षबिंदू असायचा. मॉलच्या गर्दीत जत्रेतली माणसं हरवली आहेत. बर्गर, पिझ्झाची चव घेणाऱ्या पिढीला जत्रेतल्या गुळाच्या जिलेबीची आणि गोडशेवची चव कशी कळेल. काळाच्या ओघात खाद्यसंस्कृतीही बदलली. मोसमानुसार येणाऱ्या रानभाज्या, खाद्यपदार्थ भूतकाळ झाले आहेत. 
    
तमाशा, कीर्तन, आख्यान आधुनिक काळात लोककला म्हणून अभ्यासाचे विषय झाले आहेत. ढोलकीच्या आवाजाने बेधुंद होऊन भिरकावले जाणारे फेटे आता कोणी वापरत नाही. टीव्हीच्या रंगीत दुनियेने माणसांची मने आकर्षित केली. मुलांचं सायंकाळी गल्ल्यांमध्ये हुंदडणं टीव्हीवरील कार्टून्सनी थांबवलं. माणसे शेतातून परत आल्यावर ओसरीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करायला विसरली. काहीही रियल नसणाऱ्या टीव्ही सिरियल्समध्ये गुंतली आणि तेथेच हरवली आहेत. आमच्याकाळी सायंकाळी मुलांचा खेळण्याचा धिंगाणा अंधाराच्या संगतीने सुरु असायचा. आई जेवणाला बोलावून थकायची; पण खेळणं काही थांबत नसायचे. माणसे गल्लीत खाटा टाकून गप्पा करीत बसायची. पाऊसझडीच्या दिवसात ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात शेतशिवार, गुरंवासरं, हंगाम असं काही काही बोलत असायची. एखाद्याच्या शेताला फटका बसायचा, अशावेळी कोणीतरी धीर द्यायचे. त्याच्या मनाला उभारी यायची. एक आस्था जगायची. बोलण्याने मने हलकी होत जायची. नकळत स्नेह वाढायचा. त्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज नसायची. आज हे सगळं थांबलं आहे. एक उदासपण परिसरावर पसरलेलं आहे. असं किती आणि काय काय आम्ही या बदलांमध्ये हरवलंय कोणास ठावूक.

आपलेपणाचा ओलावा हल्ली सगळीकडेच वरचेवर कापरासारखा उडत चालला आहे, असे उगीचच वाटायला लागले आहे. आपलेपणाभोवती कोणतीतरी अदृश्य चौकट उभी राहते आहे. या चौकटीने आतले एक आणि बाहेरचे एक अशा दोन जगात विभागणी केलीय. आपलेपणाच्या ओलाव्यातून पाझरणारा माणुसकीचा झरा आटत चालला आहे. चौकटींबाहेरील जग माणसांना सैरभैर करते आहे. आपलं काहीतरी शोधण्यासाठी माणसे वेड्यासारखी धावत आहेत. धावताना हेलपाटत आहेत. धावून धाप लागत आहे, तरी आभासी सुखांमागे मनाचा वारू मुक्त उधळतोय, तोंडाला फेस येईपर्यंत. आपण असे का धावत आहोत? आपणास काय हवे? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याची गरजच उरली नसल्यासारखे. अर्थात याला काही अपवाद जरूर आहेत; पण अपवाद म्हणजे काही नियम नसतो. कालाय तस्मै नमः म्हणतात. काळाची गती जाणून प्रगती करतो तो टिकतो बाकी संपतात, हे मान्य. पण काळ अनंत, अगाध असला तरी त्याच्या उदरातून निर्माण होणारा स्नेह, सात्विकता, संस्कार, सौंदर्य हे संस्कृतीचं संचित असतं. संस्कृतीने हाती दिलेलं हे पाथेय सोबत घेऊन जगण्यात प्रकटणारा साधेपणा हीच माणसांची खरी दौलत असते. माणसांच्या जगण्यात बदलांची गती असावी, प्रगतीही असावी; पण शेकडो वर्षाच्या मंथनातून हाती लागलेल्या मूल्यांचं मोल देऊन नाही.
***