Aavartan | आवर्तन

By // 4 comments:
आणखी एक आवर्तन:
कालगणनेच्या चौकटी निर्देशित करणाऱ्या कॅलेंडरची काही पाने उलटली. एक आवर्तन पूर्ण झाले. स्वतःभोवती आखून घेतलेल्या लहान-मोठ्या चौकटीत जगलेल्या क्षणांच्या काही स्मृतिशेष रेषा मनःपटलावर रेखाटल्या गेल्या. काळाच्या प्रवाहात कितीतरी गोष्टी घडतात आणि बिघडतातही. त्याच्या परिणामांचे प्रासंगिक ठसे परिस्थितीवर अंकित होतात. काळाची पालखी पुढे निघते. माणसं सोबत चालत राहतात. त्याला कुणासाठी थांबण्याचे काही कारण नसते. सोबत कुणी असले काय आणि नसले काय, काही फरक पडत नसतो. काळाच्या पटावर माणसाचं अस्तित्व तसंही नगण्यच आहे. काळाचे विस्तीर्ण वर्तुळ आणि त्यातून आपल्या वाट्यास आलेली काही वर्षे यांना जोडणाऱ्या रेषेला आयुष्य असे म्हटले, तर त्या दोन बिंदूना सांधणारी रेषा काळाचा एक लहानसा तुकडा असते. त्यातही नियतीने कोणाच्या ललाटी तो किती लेखांकित केला आहे, हे सांगणं अवघड. म्हणूनच मनात कोणतीतरी नवी उमेद घेऊन आयुष्यात आलेली वर्षे साजरी करण्यासाठी कुठली ना कुठलीतरी निमित्ते माणसं शोधत असतात. आनंदाचा एक कवडसा आपल्या अंगणी आणण्याकरिता धावाधाव करीत असतात.

काळ बदलला तसे माणसांचे जगणेही बदलले आहे. बदल कधी ऐच्छिक नसतात. प्रवाहासोबत ते घडत असतात. कधीकाळी खूप मोठे वाटणारे जग आज मोबाईलच्या स्क्रीनवर सामावण्याएवढे लहान झाले आहे. गतिमान साधनांनी जगाचे संपर्कसूत्र एका क्लिकवर जुळण्याइतके सहज, सुगम केले आहे. अन्य सांस्कृतिक प्रवाहांशी घडलेल्या परिचयातून काही नवे विकल्प हाती लागले आहेत. नववर्षाच्या स्वागताची आतिथ्यशीलता त्यातील एक. नव्या वर्षाचे निमित्त करून आनंद साजरा करण्याची ही पाश्चात्य रीत देशप्रदेशाच्या सीमा पार करीत स्थानिक प्रवाहात येऊन सामावली आहे. प्रादेशिक प्रवाहाशी तिचा संगम घडणं संयुक्तिक आहे की नाही, हा मतभेदाचा विषय असू शकतो. पण आनंद साजरा करणाऱ्यांना निमित्त हवे असते, मग ते काहीही असो.

माझा एक मित्र आहे. नववर्षाच्या आगमनाप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या प्रासंगिक जल्लोषाबाबत नाराजीनेच मत व्यक्त करीत असतो. म्हणतो, ‘ही पाश्चात्य संस्कारांची बांडगुळे येऊन आपल्या संस्कृतीच्या विशाल वृक्षावर जगली आहेत. आपल्याकडे अशा गोष्टींची आवश्यकताच काय? आनंद साजराच करायचा, तर निमित्त शोधायचेच कशाला? आणि शोधायचीच असतील, तर आपल्याकडे काय त्यांची कमी आहे?’ अर्थात त्याच्या विचारांच्या वर्तुळात हे म्हणणे ठीक असेलही. आनंदप्राप्तीला कसला आला देश आणि कसल्या आल्यात संदर्भांच्या सीमा. तो सहजपणे साजरा करता आला म्हणजे झाले. तसेही आनंद साजरा करताना त्यातील नितळपण जपणे आपल्याच हाती असते ना! सरत्या वर्षाला निरोप देतांना सुटणारा संयम योग्य नाही, हे मान्य. वर्ष साजरंच करायचं तर बेताल, बेमुर्वत धिंगाणा करायची आवश्यकताच काय? असेही वाटणे स्वाभाविक आहे.

त्याचा आणखी एक आक्षेप याप्रसंगी घडणाऱ्या मद्यप्राशनाला आहे. म्हणतो, ‘अशावेळी आपलं राज्य महाराष्ट्र न राहता मद्यराष्ट्र होतं. अंधाराला उजळून टाकणाऱ्या असंख्य झगमगत्या दिव्यांच्या साक्षीने आनंदप्राप्तीच्या नावाखाली सामाजिक मर्यादांचे बांध सोडून हा पूर दुथडी भरून वाहत असतो. त्यास काही नियंत्रण असायला नको का?’ त्याची मते कदाचित काहींना आवडणार नाहीत, पण त्यात काहीच तथ्य नाही, असेही नाही. अर्थात हे काही आपल्या समाजाचे सार्वत्रिक चित्र नाही. उत्साहाच्या उधानाला विधायक दिशेने वळते करणारे विचारही येथे आहेत. आपला आनंद कोणी कसा साजरा करावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकास आपल्यापरीने जगण्याचे स्वातंत्र्य आहे. पण जबाबदारीचे यथोचित निर्वहन करण्याची अपेक्षाही असतेच की. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही.

याहीवर्षी नेहमीप्रमाणे नववर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा केला जाईल. तो साजरा करतांना सामाजिक मर्यादांचे भान जपले जात आहे का? असा प्रश्न समोर येतो, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपल्या वर्तनातूनच शोधायला लागते. आनंद साजरे करताना मर्यादांची जाणीव किती जणांच्या मनात असेल, हे सांगणे अवघड आहे. सुखाचे सोहळे साजरे करण्याचे मनसुबे मनात घेऊन माणसे अज्ञात परगण्याच्या शोधात निघतात. प्रासंगिक सुखाचा परीस हाती लागतोही, पण त्या नादात परिस्थितीने पुढ्यात मांडलेले वास्तव विसरतात. काळाने आखून दिलेल्या रेषेवर चालताना नियतीने आयुष्याला दिलेलं एक वर्ष कमी झालं, याचं दुःख वाटण्याऐवजी माणूस गेलेल्या वर्षाला निरोप देतांना आनंद साजरा करतो, हेपण एक नवलच वाटते. खरंतर आयुष्यातून कमी झालेल्या एका वर्षाचे परिशीलन घडायला हवे. गेलेल्या वर्षात काय मिळवले आणि काय मिळवायचे राहिले, याचा शोध प्रांजळपणे घ्यायला हवा. पण असं कितीजणांना वाटत असतं, कोणास माहीत. काही असतील असेही, जे चिंतनाच्या वाटेने हातून निसटलेल्या काळाची गणिते जुळवत आयुष्यातल्या आनंदाची बेरीज-वजाबाकी करीत असतील.

वर्षे केवळ व्यक्तीच्या आयुष्यातूनच कमी होत नसतात, तर व्यवस्थेच्या वर्तुळातूनही अलगद निसटत असतात. व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणताना प्रत्येक बदलाला माणूसपणाच्या निर्णायक कसोट्यांवर घासून-पुसून स्वीकारणे आवश्यक असते. जगणं आनंदी करण्यासाठी निरामय विचारांची निरांजने प्रज्वलित करायला लागतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून सुरक्षित सांभाळावीही लागतात. आजचे परिवर्तन उद्याचा आनंद असतो. सुख आपल्या अंगणी आणायचे, तर दुरितांचे तिमिर संपणे आवश्यक असते. वैगुण्यांचा नाश करण्यासाठी सद्विचारांचे संकल्प सोडायला लागतात. प्रासंगिक औचित्य पाहून ते करावे लागतात. नववर्षाचे संकल्प नव्याची नवलाई म्हणून नऊ दिवस सांभाळून पुन्हा पहिल्या वाटेला लागणारे अनेक संकल्पप्रिय माणसे आपण पाहतो. संकल्पसिद्धीसाठी संयम, सत्व आणि स्वत्व अंतर्यामी असायला लागते, तेव्हाच अपेक्षापूर्तीची इच्छित फळे हाती लागतात.

मागचं वर्ष खूप भरभराटीचे गेलं, असं कुठल्याही वर्षाबाबत कोणी कधीच म्हटल्याचे निदान मला स्मरत नाही. आसमानी, सुलतानी संकटे घेऊन वर्षे येतात आणि व्यवस्थेवर ओरखडे कोरून जातात. हे वर्षसुद्धा असंच काहीसं संपल्याचं आपण अनुभवतो आहोत. पावसाने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीने शेतीचा कणा मोडला. पावसाशी बांधलं गेलेलं कृषीकारण उध्वस्त झालं आणि अर्थकारणाला आचके यायला लागले. मातीशी बांधल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या जीवनाचा खेळखोळंबा झाला. नियतीच्या खेळाने अनेक अभाग्यांच्या जीवनाचा खेळ संपवला. कारुण्याची ही काळी किनार नववर्षाचा आनंद साजरा करताना स्मरणात असायला नको का? नव्यावर्षाच्या स्वागताला पायघड्या घालताना मनात संवेदनांचा एक कोपरा जागा असावा.

प्रतिष्ठितांच्या, प्रस्थापितांच्या जगातील पंचतारांकित सेलिब्रेशनच्या प्रचंड झगमगाटात कुठेतरी दूर पहाडाच्या पायथ्याशी अंधारा कोपरा सोबतीला घेऊन पडलेल्या वाडी-वस्तीवर जगणाऱ्यांची वंचना विस्मरणात जाणे विचारांचा विपर्यास आहे. डोंगरदऱ्यांच्या सांदेकपारीत राहणाऱ्या आदिवासींच्या अभावग्रस्त जगण्याला विसरणे सामाजिक अपराध आहे. स्वातंत्र्यसंपादनाला अडुसष्ट वर्षे होऊनही ज्यांच्या जगण्यात आनंदाचं वर्ष अद्याप आलंच नाही त्यांचं काय? त्यांची अस्वस्थ वणवण स्वार्थाची झापडबंदपट्टी डोळ्यावर बांधून आनंदाच्या उन्मादात झुलणाऱ्या मनांना कळणार आहे का? धनिकांच्या घरात नांदणाऱ्या लक्ष्मीला वंचितांच्या वेदनांनी व्यथित होणं घडेल का? प्रगतीच्या पंखांवर स्वार झालेल्या मूठभरांचा उन्मादी जल्लोष म्हणजे विकास. प्रगतीचा असा अर्थ होत नाही. समस्यांच्या निबिड अंधारात चेहरा हरवलेल्या माणसांचे उध्वस्त जगणे न दिसणे ही विसंगती आहे. आनंद साजरा करायचा, तर आसपासचं आसमंतही आनंदलहरींनी भरून यायला लागतं. एकीकडे जगण्याचे सगळेच सूर लागणे आणि दुसरीकडे जीवनाचं गाणं बेसूर होणं म्हणजे आनंद नसतो.

जग अनेक कलहांनी फाटले आहे. अविचाराने उसवले आहे. त्याला टाके घालण्याचा संकल्प नव्यावर्षात घडणार आहे का? जात, धर्म, पंथ नावाचे अभिनिवेश माणसातलं माणूसपण विसरण्यास कारण ठरत आहेत. ते संपवण्याचा विचार यानिमित्ताने घडणार आहे का? विचारवंतांच्या विचारांचा, बुद्धीमंतांच्या प्रज्ञेचा प्रकाश आपल्यात सामावून घेण्याएवढं शहाणपण आम्हाला यायला काय हरकत आहे? माणसाचा माणूस म्हणून यथोचित सन्मान घडण्याची सहिष्णू मानसिकता जागी राहावी. न रूचणाऱ्या मतांनाही स्वीकारण्याइतके सहजपण आमच्यात यावे. माणसांच्या जगात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नको. मनभेदामुळे कलह विकोपास जाऊन माणूसच नको वाटणे, हा अविचार आहे. अविवेकी कृत्यांनी काजळलेलं जग विवेकी विचारधारांना प्रमाण मानून जगणाऱ्यांसाठी कधीच नसतं. ही जाणीव अंतर्यामी जागी राहावी.

माझं म्हणणं कदाचित वांझोटा आदर्शवाद आहे, असे काहींना वाटेल. नववर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना आपल्या विचारांत संवेदनांची किमान एक लहानशी पणती पावलापुरता प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रज्वलित असावी. तिचा प्रकाश मनाच्या आसमंतात असावा. विसंगतीने विटलेले, अविवेकाने विसकटलेले आणि अविचाराने फाटलेले जग कसे जगते आहे, हे कळण्याइतपत संवेदना विचारांच्या वर्तुळात जिवंत असणे माणूस म्हणून आवश्यक आहे. जगात अज्ञान, अन्याय, अत्याचार, आतंक, उपासमार, विस्थापन, दैन्य, दास्य, वंचना, उपेक्षा अशी अनेक दुरिते असताना मी काहीही करू शकत नाही, ही खंत अंतर्यामी असली तरी खूप आहे. निष्क्रिय आदर्शवादाने जगाच्या परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल घडवता नाही येत. कोरड्या कर्मयोगात कुणाचे मंगल करण्याचे बळ नसते. कोणा एकट्याला हे शक्यही नाही. माझ्या अंगणी येणाऱ्या आनंदाच्या प्रकाशाचा एक कवडसा वंचितांच्या अंधाऱ्या जगात मला नेता यावा. तिमिराच्या सानिध्यात स्वतःला शोधण्याची धडपड करूनही हाती काही न लागल्याने विकल झालेल्या असहाय झोपडीपर्यंत ओंजळभर उजेड नेण्याइतके माझ्या विचारांना विशाल होता यावे. प्रश्न केवळ आनंदाचा नाहीये. संवेदनांचाही आहे. अविचाराने विसकटलेले जग नको असेल, तर अविवेकाचे जळमटे चढलेल्या विचारांना मूळापासून तपासून पाहावे लागेल. गरज भासल्यास त्यात बदल करावे लागतील. बदलांचा प्रारंभ स्वतःपासून करायला लागेल. परिवर्तन सांगणे सोपे आहे, घडवून आणणे कठीण आणि आचरणात आणणे त्याहून अवघड असते. पण मनात सत्यान्वेषी विचारांचा संचार असेल, तर ते घडणं अशक्यही नाही. कदाचित यासाठी काळाला आणखी काही पावलं पुढे चालायला लागेल. म्हणतात ना, चालणाऱ्याचे भाग्य चालते. भाग्योदयाचे साचे घडवावे लागतील. येणाऱ्या नव्यावर्षात ते तयार व्हावेत. अशी आशा आपण सगळ्यांना करायला काय हरकत आहे. कारण माणूस आशावादी असतो आणि कोणतीतरी स्वप्ने डोळ्यात घेऊन जगत असतो.