Sakha-Soyara | सखा-सोयरा

By // 15 comments:
गेल्या आठवड्यात गावी गेलो. म्हणजे आवश्यक होतं म्हणून जाणं घडलं. अन्यथा स्वतःभोवती तयार करून घेतलेल्या शहरी सुखांच्या कोशातून बाहेर पडून गावी जाणं कठीणच. कारण मध्यमवर्गीय मानसिकतेने घडत गेलेल्या आत्मकेंद्रित विचारांची झूल मनावर पांघरून घेतली असल्याने, ती उतरवणे अवघड. कोण उगीच चाकोरीत चालणाऱ्या दैनंदिन क्रमात व्यत्यय आणून गावाकडे जातो? पण कधीकधी कामंच अशी काही निघतात की अनिच्छेने का असेना, शहरी सुखांची पांघरलेली घोंगडी काढून आपल्या अस्तित्वाच्या मुळांशी जुळावंच लागतं. अर्थात याचा अर्थ असाही नसतो की, आपल्या मातीच्या ओलाव्याला आपण विसरलेलो असतो. फक्त सुखासीन जगण्याची सवय करून घेतल्याने गावाकडील गैरसोयीत जाऊन राहावंसं वाटत नाही एवढंच. म्हणूनच एखाददोन दिवसाचंही गावी राहणं जीवावर येतं. पण हेही सत्य आहे की, गैरसोयीपासून कितीही लांब राहण्याचा प्रयत्न केला, तरी गाव मनाच्या मातीत रूजलेलं असतं. वरकरणी गावाचा सहवास कितीही टाळत असलो, तरी मन तेथील निळ्याभोर आभाळात घिरट्या घेत असतं.

अनेकातला एक मीही. उपजीविकेच्या वाटेने गावातून बाहेर पडून शहरात येऊन विसावलो. देहाला आणि मनाला शहरी सुविधांचा सराव झालेला. झालेला म्हणण्यापेक्षा करून घेतलेला. ती सुखं मनाला कायमची बिलगलेली. जीवनाच्या क्रमसंगत मार्गावरून चालताना जीवनयापनाच्या दिशा बदलल्या; मन मात्र हे बदल मानायला बहुदा तयार नसते. ते कोणती ना कोणती निमित्ते शोधून गावच्या आसमंतात विहरत असते.

मुलांच्या शैक्षणिक कामाकरिता काही कागदपत्रांची आवश्यकता असल्याने आणि ते मूळ गावीच मिळणार असल्याने जाणे घडले. शासकीय नियमांचे हे एक चांगले आहे, तुम्ही देशात कुठेही वास्तव्याला असला तरी शेतीच्या, जातीच्या दाखल्यांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मूळगावी जाणे घडते. निदान नियमांच्या निमित्ताने का असेना, गावाकडे जाणाऱ्या वाटेने पावले वळती होतात. आपण गावी जाणं कितीही टाळत असलो, तरी तेथे जाण्यात एक अमोघ आनंद असतो. गावाकडील घर, परिवार, गुरंवासरं, शेतशिवार, तेथील गजबज मनाला अनामिक समाधान देत असते.

माझं गाव- ज्याचं नाव फक्त तेथील रहिवाश्यांना आणि त्यांच्या नातेसंबंध असणाऱ्यांना ठावूक. इतरांना माहीत असण्यासारखं गावाचं कोणतंही लक्षणीय महात्म्य नाही आणि उदंड कर्तृत्वही नाही. म्हणून जाणीवपूर्वक कोणी लक्षात ठेवण्याचं संयुक्तिक प्रयोजनही नाही. सरकार दरबारी एक गाव म्हणून असेलली नोंद हीच काय त्याची सार्वत्रिक ओळख. असे असले तरी त्याच्या सहवासाच्या खुणा मनपटलावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत. तशा त्या प्रत्येकाच्या मनात असतातच. मनाच्या गाभाऱ्यात असणारी आपल्या गावाची ओळख ज्याची त्याला मोठीच वाटत असते, तसंच आम्हालाही. इतरांसाठी नसेलही; पण आमच्यापुरता आमच्या गावाचा इतिहासही मोठा आणि भूगोलही समृद्ध.

तीन-चारशे उंबरे अंगावर घेऊन गाव आपल्याच तोऱ्यात उभे आहे. कधीपासून कोणास माहीत. कोणी त्याला वसवले, त्याचे त्यालाच माहीत. पण काळ्यामातीच्या जमिनीचा कसदारपणा आणि जवळूनच वाहणाऱ्या तापी नदीच्या पाण्याची विपुलता सोबतीला घेऊन गावात नांदणारी माणसं आपापल्या अस्मिता घेऊन स्वतःपुरता का असेना इतिहास घडवत होती, जगाच्या दैनंदिन व्यवहारात त्याचं काहीही योगदान नसलं आणि त्याला तिळमात्र महत्त्व नसलं तरी. पूर्व-पश्चिमबाजूने वाढीसाठी मर्यादांच्या सीमांचा पायबंद पडला आणि दक्षिण दिशेने विस्तारला निसर्गाने पुरेशी जागाच दिली नसल्याने उत्तर बाजूला पाय पसरत गावाने स्वतःला वाढवत ठेवले आहे. नदीच्या खोऱ्यांच्या सोबतीने उभ्या असणाऱ्या विस्तीर्ण टेकडीच्या पसरट अंगावर हसत, खेळत वाढते आहे, शेकडो वर्षापासून.

दक्षिणबाजूने गावाचा विस्तार जेथे थांबतो, त्याच्या अलीकडे दोनतीन घरे सोडून मावळतीकडे घरंगळत नदीच्या रस्त्याला जाऊन मिळणारी पायवाट गाव आणि नदी यांना जोडण्याचं साधन. या वाटेने सरळ खाली उतरून रस्त्याने लागतांना नदीच्या खोऱ्यांच्या परिघातील परीसरादरम्यान पसरलेलं बरचसं सपाट मैदान आहे. गावाच्या दुसऱ्या अंगाने पश्चिमबाजूला कवेत घेत वळसा घेऊन नदीकडे येणारा मोठा रस्ता याच ठिकाणी येऊन मिळतो; पण या रस्त्याचा उपयोग बैलगाड्यांच्या येण्याजाण्यासाठी. माणसे पायवाटेचाच वापर अधिक करीत असायची, अजूनही करतात. ही पायवाट उतरून, बऱ्याचदा घसरून, पावसाळ्यात तर हमखास- डावीकडे एक लहानसे वळण घेत पुढे मोकळ्या जागी जाऊन मिळते, त्या ठिकाणी पहिली भेट होते पिंपळाच्या झाडाशी. तेथून सरळ पुढे काही पावलांच्या अंतरावर उभं आहे वडाचं मोठं जुनं झाड. पलीकडे खोऱ्यात जागा मिळाली तेथे वेडीवाकडी वाढलेली बाभळीची झाडं आणि माळावरील मोकळ्या जागा बघून दूरदूर विखुरलेली निंबाची पाचसहा झाडं. या जागेला लाभलेला हा निसर्गदत्त परीघ. जणू कुशल कलाकाराने कोरलेलं शिल्प. हा परिसर आमच्या मनाची श्रीमंती. आमच्या लहानपणाला कुबेराचं वैभव देणारी दौलत. या जागेने मला, माझ्यासारख्या अनेकांना, आमच्या पिढीला घडवलं. खेळवलं. वाढवलं. आमचं लहानपण सगळ्याबाजूने समृद्ध, संपन्न केलं. जगण्याचं आकाश आणि अवकाश व्यापक केलं. झाडांसोबत परिसरातील मातीत आठवणींची अनेक रोपं अजूनही रुजली आहेत.

थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकोळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो. आठवणीतल्या वाटा आणि परिसर तसाच प्रसन्न, प्रफुल्लीत आणि टवटवीत. पण नजरेच्या वर्तुळात दिसणारा परिसर भग्न उदासपण घेऊन उभा असलेला, कोणीतरी भिरकावून दिलेल्या कचऱ्यासारखा. अंगावर अवकळा घेऊन केविलवाणा उभा असलेला. कुपोषित मुलासारखा, सगळीच रया गेलेला. निंब, बाभळीची झाडं हिरमुसलेल्या चेहऱ्याने पांगलेली. पिंपळ पोरक्या पोरासारखा अवघडून उभा. वड तपस्व्यासारखा ध्यानस्थ बसलेला; पण त्याच्या जगण्यातील श्रीमंती आता हरवली आहे. आपला भूतकाळ आठवीत हरवलेलं चैतन्य शोधत आहे. परिसराने जगण्यातील श्रीमंती शेवटचा डाव खेळून जुगाऱ्यासारखी उधळून दिलेली. सगळीकडे खुरटं गवत वाढलेलं. रानवनस्पतींनी आपापल्या जागा हेरून धरलेल्या. त्या असण्यापेक्षा असण्याचीच अधिक अडचण. त्यांच्या अतिक्रमणाने परिसर आपलं अंगभूत वैभव हरवून बसलेला.

कधीकाळी माणसांच्या राबत्यात रमलेला हा परिसर सळसळते चैतन्य घेऊन नांदायचा. दिवसभर आनंदाचे तराणे गात राहायचा. गावातील लहानमोठी माणसे या ना त्या निमित्ताने येथे येऊन जुळत रहायची. आम्हां मुलांसाठी हे वड आणि पिंपळ परिसरासह आंदणच दिलेले. आपलं पोरगं इतकावेळ कुठे पसार झालं आहे, म्हणून त्याला पाहत, शोधत फिरणाऱ्या आईबापाचा शोध येथेच येऊन संपायचा. पोरगं गावात अन्य कुठे नसलं म्हणजे हमखास येथे हुंदडत असायचं. अंगाखांद्यावर उड्या मारणाऱ्या पोरांना वड प्रेमळ आजोबासारखा मिरवत राहायचा. त्याच्या पारंब्यांच्या जटा पार जमिनीपर्यंत पसरलेल्या; अगदी लहानसं पोरगंही त्या पकडून वर चढायचा. वडाच्या आश्रयाने गावाकडील मातीतले खेळ रंगात यायचे. सकाळ आणि संध्याकाळ विलक्षण चैतन्य घेऊन यायची. परिसराच्या क्षितिजावर उतरून मुलांसोबत आनंदरंगांची मुक्त उधळण करीत राहायची.

सुटीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूरपारंब्यांचा सूर लागलेला असायचा. पोरं माकडांसारखी या फांदीवरून त्या फांदीवर सरसर सरकत रहायची. वडाच्या सानिध्यात विटीदांडूचा खेळ टिपेला पोहचलेला असायचा. सगळा गलका चाललेला. खेळात महारत असणारे मैदानात उतरायचे, लहानग्यांना फारशी संधी नसायची. तेव्हा एकतर त्यांनी आपल्या खेळाची वेगळी चूल मांडायची, नाहीतर वडाच्या फांद्यांवर बसून खेळणाऱ्यांना पाहण्याचा आनंद घेत राहायचा. शाळेत जायची वेळ झाली तरी पावलं काही येथून निघत नसत. पण आईबापाच्या आणि मास्तरच्या माराच्या धाकाने हळूहळू मुलं पांगायाची. शाळेत जाऊन बसायची, मन मात्र वडाच्या अवतीभोवती भटकत राहायचे.

माळावर चरून दुपारच्या निवांत वेळी गावातली गुरंवासरं वडाच्या सावलीत विसावलेली असायची. डोळे मिटून शांतपणे रवंथ करीत बसलेली, जणू एखादा तत्वचिंतक चिंतनसाधना करीत असल्यासारखे. वड त्यांच्यावर ममतेची सावली धरायचा. दुपारची आळसावलेली मरगळ झटकीत सायंकाळी पश्चिमेला उन्हं कलताना परिसर पुन्हा जागा होऊन गजबजायचा, तो थेट चांदणं आकाशात उतरेपर्यंत. चांदण्याच्या शीतल प्रकाशात कबड्डीचा खेळ उशिरापर्यंत सुरु असायचा. धर, पकड, सोडू नको, आउट अशा आरोळ्यांनी निनादत राहायचा.

गावात पाण्यासाठी नळांची सोय नसल्याने नदीवरून पखाली भरून पाणी रेड्याच्या पाठीवरून घरी आणायचे. ज्यांच्याकडे पखालींची सोय नसायची ते घागरी, हंडे भरून पाणी वाहून आणायचे. भरलेल्या घागरी डोक्यावरून उतरवून थोडा विसावा घेण्यासाठी वडाखाली थांबायचे. नदीकडून आणलेल्या पाण्याच्या ओझ्याने थकलेल्या रेड्याचीही पावलं या परिसरात येऊन हमखास मंदावयाची. तो वडाच्या सावलीत थांबायचा. हातातला कासरा सोडून त्याचा मालक; असला हाती वेळ थोडा, तर तेवढ्या वेळात खिशातून पानतंबाखूची चंची काढून वडाच्या पायथ्याशी टेकायचा. नदीवरून पाणी भरायला जाणारी आणि येणारी माणसे वडाच्या बुंध्याशी बसून पानतंबाखूची देवघेव करीत बोलत असायचे. विडी काढून आनंदाचे झुरके मारले जायचे. तेवढ्या वेळात शेती, पीकपाण्याच्या, हंगामाच्या गप्पा रंगायच्या. गावातल्या सासुरवाशिणी पाण्यासाठी, धुणं धुण्यासाठी नदीवर जातांना-येताना डोक्यावरील ओझं उतरवून वडाच्या सावलीत आपल्या माहेरच्या आठवणींची मुळं शोधत राहायच्या. थोडं थांबून एकमेकींचे सुख-दुःख सांगत मन हलकं करून घ्यायच्या. सुना, लेकीबाळी आपल्या सत्यवानाला सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना करीत वटसावित्रीच्या सणाला वडास प्रेमाच्या धाग्यांनी बांधून ठेवीत. त्याच्याकडे मोठ्या भक्तिभावाने आपल्या यजमानासाठी दीर्घ आयुष्य मागत. तोही आस्थेने आपल्या लेकीबाळींचे सौभाग्य सुरक्षित सांभाळण्याची जबाबदारी घ्यायचा. सुताचे ते धागे बरेच दिवस आपल्या देहावर अभिमानाने मिरवत असायचा.

धार्मिक आस्था बाळगणाऱ्या गावातल्या माणसांसाठी वड नेहमीच आस्थेचा विषय असायचा. परिसरात मंडप टाकून पारायणाचा जागर घडायचा. मंत्रजागराने परिसर दुमदुमत राहायचा. धूप-अगरबत्त्यांच्या सरमिसळ गंधाने दरवळत राहायचा. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा जे काही असतील, त्या ग्रंथांच्या वाचनाचे सूर वातावरणात मंगलनाद निर्माण करीत राहायचे. माणसे आस्थेने ऐकत असायची. भागवतातील कथेला रंगत चढलेली असायची. बायाबापड्या वाती वळत मोठ्या भक्तीभावाने कथा ऐकत बसलेल्या. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने वयस्कांच्या थकलेल्या देहात अनामिक ऊर्जा संचारायची. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तेज यायचे. पारायणाच्या मधल्या वेळेत जेवणखाणं करून माणसं परत यायची. फावल्या वेळात गप्पांचे फड रंगायचे. गतकाळाच्या स्मृती जाग्या व्हायच्या. एकत्र जमलेली पोक्त माणसे आठवणीत रमलेली असायची. स्मृतीच्या पोतडीत पडलेल्या आठवणी एकेक करून काढल्या जायच्या. आम्ही मुलं त्यांचं बोलणं कान देऊन ऐकत असयाचो. एकीकडे बहरलेला भक्तीचा मळा, तर दुसरीकडे आठवणींचा रंगलेला सोहळा. भूतकाळाच्या उबदार शालीत झोपलेल्या आठवणींना जाग यायची. स्मृतिकोशातल्या मातीत रूजलेल्या विचारांच्या रोपट्यांना पालवी फुटून चैतन्याचा वसंत बहरत राहायचा.

नदीच्या पात्रापासून वड तसा बराच दूर. पण नदीला मोठा पूर आला की, पाणी परिसरातील खोऱ्यातून उड्या मारत उनाड मुलाप्रमाणे मुक्त उधळत राहायचे. मग गावातली माणसे चौकशी करीत रहायची. पुराचे पाणी कुठपर्यंत आले, म्हणून प्रश्न विचारायचे. वडाजवळ पाणी पोहचले का? पारंब्या पाण्यात कुठपर्यंत बुडाल्या? या प्रश्नांच्या उत्तरांवरून पुराचे प्रमाण ठरवले जायचे. वड ओलांडून पाणी पिंपळापर्यंत पोहचले की, माणसे चिंतीत व्हायची. दक्षिण-पूर्वेच्या अंगाने पुराचे पाणी गावाला धडका देत राहायचे. ते पाहून माणसांना धडकी भरायची. एव्हाना पुराच्या पाण्याने आसपासच्या शेतातील पिकं बुडून संपलेली असायची. पिकं गेली तर जाऊ दे, निदान शेतंतरी वाहून जाऊ नयेत, म्हणून शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागलेला असायचा. पाणी कमी होऊ दे, म्हणून देवाकडे धावा केला जायचा. मग गावातली माणसे पुराच्या पाण्याची पूजा करून नदीची ओटी भरायचे. पाणी कमी होण्याची वाट पाहत असायचे. कधीकाळी महापूर येवून गेल्याचे वयस्कर मंडळी सांगायची. म्हणायचे, ‘तेव्हा सगळा वड पाण्यात बुडाला होता. त्याचा शेंडा तेवढा दिसायचा.’ टेकडीच्या डोक्यावर असणाऱ्या घरांच्या भिंतीपर्यंत पाणी कसे पोहचले, वगैरे वगैरे काही काही सांगत रहायची. जुनीजाणती माणसं म्हणायची, ‘हं! हा काय पूर आहे? आम्ही केवढा मोठ्ठा पूर पाहिला आहे! एवढ्या पाण्याने काही होत नाही!’ म्हणून बाकीच्यांना धीर देत रहायची. त्यांच्या जुन्या गोष्टी ऐकून वड गालातल्या गालात हसत असल्यासारखा वाटायचा.

या वडाशी सगळ्या गावाचं जगणं जुळलेलं. कोणत्यातरी निमित्ताने माणसं वडाच्या कुशीत क्षण-दोनक्षण विसावयाची, जिवंतपणी आणि अखेरच्या यात्रेच्या वेळीसुद्धा. अंत्ययात्रा नदीकडे जातांना गावाला वळसा घालून येणाऱ्या लांबच्या रस्त्याने चालत यायची. खांदेकरी थकलेले असायचे. नदीकडे जातांना वडाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थोडे थांबायचे. वडासोबत वाढलेला देह त्याच्या पायाशी अखेरचा विसावा घ्यायचा. पिठाचा नैवद्य ठेऊन; कुठूनतरी कोणी एक दगड आणायचा, म्हणे तो जीव असतो. तो सोबत घेऊन तिरडी उचलली जायची. चैतन्य विसर्जित झालेला निष्प्राण देह खांद्यावर घेऊन माणसे चालती व्हायची. वड जणू डबडबलेल्या अंतःकरणाने त्याला अखेरचा निरोप द्यायचा. वडाखाली खेळणाऱ्या आम्हा मुलांचं खेळणं अशावेळी थोडं पुढे पांगायचं. ठेवलेल्या नैवेद्याला स्पर्श करायचा कोणाला धीर होत नसायचा. पण नदीकडील माळावर चरण्यासाठी, पाण्यासाठी जाणाऱ्या गुरांवासरांच्या वावराने तो भिरकावला जायचा. क्षणभर दुःखी झालेला वड आणि शेजारचा परिसर दुःख गिळून पूर्वपदावर यायचा. आनंदाचे झुले परत हलायला लागायचे. मुलं खेळण्यात दंग व्हायची. आस्थेचे नवे गीत बनून परिसर पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटायचा.

मुलंमाणसांनाच नाही तर पोपट, कावळे, चिमण्यांच्या संसाराला वडाने आपल्या अंगाखांद्यावर आश्रय दिला. त्यांचे चिमणसंसार त्यावर बहरले. या बहरणाऱ्या संसारातल्या पिलांना पाहण्याचा मोह आम्हा मुलांना पडायचा. वडाच्या ढोलीत पोपटांनी केलेल्या घरात उत्सुकतेने डोकावून पाहिले जायचे. खोप्यातल्या पोपटाच्या पिलांना हाती अलगद धरून बाहेर काढून पाहत राहायचे, त्यांना गोंजारायचे. कावळे मात्र हुशार त्यांची घरं वडाच्या शेंड्यांना धरून असायची. तेथपर्यंत पोहोचायची आमची हिंमत होत नसायची. पक्षांच्या पिलांना उगीचंच त्रास देणारी मुलं एखाद्या जाणत्या माणसाला दिसली की, हमखास रागवायचे. पिलं पुन्हा घरट्यात ठेवली जायची. रोज त्या घरट्यात डोकावून पाहण्याची अनिवार इच्छा असायची. काही बघूनही घ्यायचे. पिलं वाढत राहायची आणि एक दिवस खोपा रिकामा व्हायचा. पिलं आकाशी झेप घेऊन निघून जायची. आम्ही मात्र तेथेच रमलेलो असायचो.

दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ सुरु असायचा. ठरल्यावेळी ऋतू बदलायचा. ऋतुमानानुसार वड आपल्या पानांची वस्त्रे बदलवत राहायचा. उन्हाळ्यात कोरडीठाक पडलेली त्याची अंगकांती पावसाच्या पाण्याने चिंब भिजून सुस्नात लावण्यवतीच्या रूपाशी स्पर्धा करताना दिसायची. हिवाळ्यात माळावर खेळणारी मुलं उड्या मारण्यात थंडी विसरायची. पाण्याला गेलेली माणसे ओली होऊन कुडकुडत नदीवरून हंडे, घागरी घेऊन यायची. शेत राखायला आलेली आणि थंडीने कुडकुडणारी माणसं शेकोटी पेटवून अंग शेकत गप्पा झाडीत बसलेली असायची. त्यांच्या शेजारी अंग शेकीत थोडी टेकायची. खेळात लक्ष नसलेली मुलं कोवळे ऊन अंगावर घेत वडाच्या कडेवर जाऊन बसायची. शाळा चुकवून मास्तराच्या माराच्या धाकाने येथेच लपून बसायची. वडाच्या संगतीने मुलांचं वर्षभर खेळणं, वाढणं सुरु असायचं. हा वड सगळ्या पोरांना आपला वाटायचा. हे आपलेपण परिसराशी जुळलेल्या नात्याच्या धाग्यांची वीण घट्ट करीत राहायचे. आस्थेवाईकपणाचा अनमोल ठेवा घेऊन जीवनऊर्जा घेत कितीतरी पिढ्या आपल्या पंखांनी येथूनच आकांक्षांच्या आकाशात उडल्या, आपलं क्षितिज शोधण्यासाठी. वडपिंपळ अन् तेथला परिसर तसाच मागे ठेवून.

काळ बदलला. विज्ञानतंत्रज्ञानाची साधने हाती घेऊन विद्यमान पिढ्याही बदलत आहेत. त्यांच्या जगण्याची दिशा आणि प्रयोजनेही बदलली. जागतिकीकरणाच्या सुधारणेचे वारे गावापर्यंत पोहचले. सुविधांनी गावात संचार करायला सुरवात केली. गावात, घरात टीव्ही आल्या. मुलं त्याभोवती गर्दी करू लागली. पडद्यावरच्या आभासी रंगीत जगामुळे बाहेरच्या जगाचे रंग फिके वाटू लागले आहेत. मुलं हल्ली मनमुराद खेळत नाहीत. गावमातीतले साधेसेच, पण आनंदाची पखरण करणारे खेळ इतिहासजमा होऊन मोबाईलवरील खेळ आवडू लागले. टचस्क्रीनने स्मार्ट झालेल्या फोनचा स्पर्श त्यांना सुखद वाटतो. रानातला पिकांचा गंध, झाडाफुलापानांचा, मातीचा, नदीच्या पाण्याचा स्पर्श त्यांना सुखावत नाही. मोबाईलच्या माध्यमातून जगाच्या टचमध्ये असणारी पिढी परिसराच्याच टचमध्ये नाही. निसर्गाच्या मुक्त वातावरणाचा स्पर्श त्यांना पुलकित करीत नाही. विज्ञानाने जग हातात सामावण्याएवढे लहान केले; पण सहजपणाने जगण्याचे प्रवाह अवगुंठित होत आहेत. अनेक बाजूंनी माणसं रिती होत आहेत. रितेपणातून आलेले मनाचे कोतेपण वाढत आहे.

गावांगावात थोड्याफार फरकाने असेच घडत आहे. माळावरील मोकळ्या जागेत हुंदडणारी पावलं थांबली, थबकली. त्यांची जागा घेऊन रानगवत, रानवनस्पतींनी आपले पाय परिसरात पसरवले. त्यांच्या पावलांचा पसारा वाढला. त्या पसाऱ्यात परिसराची रया पार हरवली आहे. एक बकाल उदासपण त्यावर पसरलेलं आहे. कधीकाळी माणसांच्या सहवासाने फुललेला परिसर शापित जगणं घेऊन उभा आहे. आपलं गतवैभव परत येईल या आशेवर, कोण्या उद्धारकर्त्या प्रेषिताची वाट पाहत. पण तो येईल का? माहीत नाही. आणि आला तरी फार काही करू शकेल असे वाटत नाही, कारण येथील प्रेत्येक माणूस स्वतःलाच महात्मा समजून वागतो आहे. इतरांचे महात्म्य दुर्लक्षित करून जगणं म्हणजे स्वातंत्र्य असे समीकरण होऊ पाहत आहे. स्वातंत्र्याचा सोयिस्कर अर्थ लावून वागणं घडत आहे. चांगलं, वाईट काहीही ऐकून घ्यायची तयारी नाहीये. मी जसं वागतोय, तेच आणि तेवढंच आदर्शवर्तन असल्याचा समज दृढ होतोय. जगण्यातले साधेपण विसर्जित करून स्वार्थात परमार्थाचे प्रतिबिंब पाहिले जाते, तेव्हा माणसाची प्रतिमा धूसर होत जाते. स्वाभाविक जगणं विसरलेली माणसं मनाने संकुचित होत जातात. माणसे खुजी झाली म्हणजे बदलसुद्धा थिटे होतात, नाही का?