Gandhkoshi | गंधकोशी

By // 6 comments:
गंधकोषी: भाग दोन

‘पौगंडावस्था वादळी अवस्था असते’, असा एक प्रश्न बीएड, डीएडचा अभ्यास करताना शैक्षणिक मानसशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत हमखास असायचा. तो येणारच म्हणून कितीतरी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी शिक्षक या प्रश्नाच्या उत्तराचे शब्दनशब्द पाठ करून घ्यायचे. यातील बरेच जण उत्तरपत्रिकेत त्या प्रश्नाचं उत्तर लिहून उत्तम गुण मिळवीत उत्तीर्ण झाले असतील. त्यातले काही शिक्षक झाले असतील. पण यातील कितीजण जे शिकले आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत लिहलं, ते शिकवतांना प्रयोगात आणू शकतात? सांगणे अवघड आहे. अशा वयातील मुलांना सांभाळताना शिक्षकाचं सारं कौशल्य पणास लागतं. त्याच्याकडे असलेल्या, नसलेल्या ज्ञानाचा कस लागतो. पण हेही वास्तव अधोरेखित करावयास हवे, यातील किती शिक्षक मुलांच्या वर्तनात परिवर्तन घडवण्याकरिता स्वयंप्रेरणेने आणि स्वयंप्रज्ञेने निर्णय घेण्यास समर्थ आहेत? कधीकाळी ‘छडी लागे छम छम...’ म्हणणारा आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दंडित करायलाच हवं, असं समजणारा समाजच जेव्हा शिक्षणव्यवस्था, शाळा, शिक्षक उदासीन होत चालले आहेत असे म्हणतो, तेव्हा मनासमोर एक प्रश्न उभा राहतो, या साऱ्या घडामोडीत समाजाचे, पालकांचे प्रासंगिक वर्तन किंवा ते व्यक्तीशः काहीच जबाबदार नसतात का? दिवसभरातून मुलं शाळेत किती तास व्यतीत करतात? मोजून पाच-साडेपाच तास. घरी व्यतित होणारा त्यांचा वेळ किती तासांचा असतो? या वेळेत आपली मुलं काय करतात, याचं अवलोकन किती पालकांकडून घडतं? बरं आपण मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांचं उत्तरदायित्त्व मान्य केले, तरी एक प्रश्न उरतोच, शिक्षकांना त्यांच्यातील वर्तन परिवर्तनासाठी अधिकारवाणीने एखादा प्रयोग करून पाहण्याचं स्वातंत्र्य व्यवस्थेत आहेच किती?

काळ बदलला तशा जगण्याच्या पद्धती आणि प्रयोजनेही बदलली आहेत. शिक्षणव्यवस्थाही यास अपवाद नाही. नव्या शैक्षणिक धोरणांनी कुणालाच नापास करायचं नाही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सोबतच मूल शिकत असतांना मागे राहत असेल, तर त्याला प्रवाहात आणताना त्याचा कोणत्याही प्रकारे मनोभंग, तेजोभंग होईल असं काहीच घडता कामा नाही, ही सार्वत्रिक अपेक्षा. खरंतर अपेक्षांच्या अवास्तव ओझ्यामुळे शिक्षकच आज गोंधळलेला आहे. मुलांना काही बोलावं तर काही करता काही व्हायचं याची मनात भीती. न बोलावं तर शिस्तीचे प्रश्न तोंड वासून समोर उभे. काय उपाय शोधावे या विवंचनेत तो गरागरा फिरतो आहे. शासन, शालेय प्रशासन, व्यवस्थापन, पालक, समाज अशा बहुआयामी अपेक्षांच्या वर्तुळात तो स्वतःला शोधतोय. पण हेही मान्य की, मुलांना प्रताडीत करणे, त्यांचा मनोभंग घडणे, तेजोभंग करणे अशा गोष्टी सर्वथा अयोग्यच. असं काही करायची वेळच येऊ नये. विद्यार्थी घडवायचा तर शिक्षकाचा नैतिक वचक मुलांवर असला पाहिजे. तो प्रस्थापित करायचा असेल तर त्याच्या अध्यापनकार्यात असं काही असायला हवं, जे मुलांना आपलं वाटेल. ते असलं तर मुलांबाबत निर्माण होणारे शिस्तीचे बरेच प्रश्न सुटतात. मुलांवर असा नैतिक वचक असणारे शिक्षक समाजात किती संख्येने आहेत, हे सांगणे अवघड आहे. मुलांचं उज्ज्वल भविष्य लेखांकित करण्यासाठी प्रामाणिक प्रयास करणाऱ्यांची व्यवस्थेत काही कमी नाही. पण सांप्रत सगळ्याच बाजूने समाजात स्वार्थपरायण व्यवहार शिरला आहे, तसाच शिक्षणव्यवस्थेतही येऊन तो विसावला आहे. जेथे व्यवहार येतो तेथे डिव्होशन वगैरे शब्द आपलं अर्थाचं अवकाश हरवून बसतात. व्यवस्थेत टिकण्यासाठी येथे जो-तो आपापले सुरक्षित परगणे शोधून त्यांना सांभाळण्यात व्यग्र आहे. ज्यांना परिघाबाहेर जाऊन काही करायची आंतरिक उर्मी आहे; त्यांच्यासोबत चालणाऱ्या पावलांचा अभाव आहे. समाजात गुणवंतांची काही कमी नाही; पण गुणवत्ता ओळखणाऱ्यांची वाणवा असेल आणि सुमार वकुबाची माणसं गुणवत्तेहून श्रेष्ठ ठरत असतील, तर निष्क्रिय कर्मयोगास कर्मकांडाचे रुप येणार, हेही वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही.

पालक, समाज यांचं मुलांच्या जडणघडणीतील योगदान नाकारावे कसे? पालक जसा असतो, समाज जसा दिसतो तसे संस्कार मुलांच्या मनांत रुजत जातात. पालक उपजीविकेच्या वाटांनी दिवसभर बाहेर. मुलं क्लास, कॉलेज, शाळा अशा काही अन्य कारणांनी वाऱ्यावर. सायंकाळी अंधारताना घराचा रस्ता जवळ करायचा. परतले की घरातील आपापल्या कोपऱ्यांना सांभाळून सगळ्यांनी सुटेसुटे बसायचे. आईच्यासमोर टीव्हीवरील सिरियल्स, बाबांचं ऑफिसमधील काम, मुलाचा लॅपटॉपवर सुरु असणारा सुखसंवाद, मुलीच्या हाती स्मार्टफोन विसावलेला. साऱ्यांचीच डोकी वेगवेगळ्या दिशांना आणि तोंडे विज्ञाननिर्मित साधनांत. मनातल्या संवादाला प्रकटायची संधीच नाही. सगळेच स्वतःच्या कोशात गुरफटलेले. कोशातून बाहेर पडण्यासाठी कोणत्यातरी निमित्ताने प्रासंगिक हॉटेलिंग, शॉपिंग घडून परिवार सदस्यांना पारिवारिक सहवासाचं पुण्यसंपादन खात्यावर जमा झाल्याचं आत्मीय समाधान मिळते. असा तात्कालिक कर्मयोग आचरून बाजारातील महागड्या वस्तू मुलांच्या हाती टेकवल्या की, आईबापाला आपण जबाबदार पालक असल्याचं समाधान. मुलांना मित्र-मैत्रिणींमध्ये मिरवण्याचा क्षणिक अभिमान. पण हरवलेल्या संवादाचं काय? मुलांची मने उमलती फुले आहेत. अशी उमलती मने प्रश्न घेऊन बावरलेल्या चेहऱ्याने समोर उभे राहतात, त्यांना काही सांगायचं आहे, मनात लपलेलं काहीतरी विचारायचं आहे; याची जाणीव किती पालकांना असते? किती पालक पारंपरिकतेच्या चौकटींना ओलांडून मुलांना संवादाचं मुक्त आकाश उपलब्ध करून देतात? किती पालक त्यांच्याशी सहज संवाद साधतात? मुलांच्या वाढत्या वयाचेही काही प्रश्न असू शकतात. शोधूनही न सुटणारी काही जीवनकोडी असतात. त्यांची समाधानकारक उत्तरे त्यांना हवी असतात. पण अशा चौकटींबाहेरील प्रश्नांबाबत निषेधाची एक भक्कम आणि अभेद्य चौकट अज्ञानातून आपल्या भोवती माणसांनी उभी केलेली असते. ज्यांच्याविषयी बोलणंसुद्धा संस्कारांचा तेजोभंग ठरतो. अशा काही प्रश्नांविषयी घरांत वार्ता करणंसुद्धा निषिद्धच मानलं गेलं आहे. मुलांची चहूकडून वैचारिक कोंडी होत असेल, तर अशावेळी मनात उदित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ती शोधतील कुठून?

वयाच्या पंधरा-सोळा या सीमेवर उभ्या असणाऱ्या मुलामुलींचं वयच असं अडनिड की, देहात प्रश्नाचं एक घोंगावणारं वादळ शिरलेलं असतं. कृतीत गोंधळाचा धुरळा उठलेला असतो. विचारांच्या आकाशात अविचाराचे मळभ दाटून येतात, अशावेळी प्रयत्न करूनही घरात न मिळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे साहजिकच बाहेर मित्रांमध्ये शोधली जाणार हे नक्की. बरं त्यांच्याकडेही असणारी उत्तरे अशाच अर्धवट ज्ञानवर आधारित आणि कुठूनतरी शोधलेली. या वयात शारीरिक, मानसिक बदल घडवण्याचं काम निसर्ग करीत असतो. त्याला समजून घेणं मुलांना अवघड असतं. येथे पालक, शिक्षक, समाज मुलांचे मित्र का होऊ शकत नाही? मैत्रीचे धागे मुलांच्या हाती सापडत नसतील, तर मनातील वादळांची उत्तरे कोणाच्यातरी सहवासात शोधली जातीलच. प्रासंगिक सहवासातून कोणालातरी कोणीतरी आपलंस वाटायला लागतं. आपल्यासाठी कोणीतरी जीव टाकतो आहे. हा विचारच अशावेळी थ्रिलिंग वाटायला लागतो. यातून नकळत्या वयात एकमेकांच्या संपर्कात आल्याने पुढील अनार्थाच्या गाथा लेखांकित होतात. एखाद्याचा सहवास सतत हवाहवासा वाटू लागतो. उमलत्या वयातील प्रेमाचा अपरिपक्व वसंत बहरायला लागतो. पण अवेळी बहरणारा हा ऋतू जसा येतो तसाच कोमेजून जातो, तेव्हा होणारा आघात पुढील अनेक समस्यांचे माहेरघर होतो. नाजूक वळणावरील प्रवासाची अवघड वळणं घेत धावणारं टीनएजर्सचं भाबडं वय. या वयात मनाचं सांगणं एक असतं, तर बुद्धी दुसरंच काही सांगत असते. वैचारिक द्वंद्वाच्या अडकित्त्यात अडकणारी मुलंमुली स्वतःच एक अवघड प्रश्न होतात. अशा प्रश्नांची उत्तरे योग्यवेळी न शोधल्याने अवघड गणितासारखी कठीण होत जातात.

समोरील प्रश्नांचा गुंता अधिक वाढत जातो. सगळ्याच गोष्टी काही सहज हाती नाही लागत. मनात एक अनामिक दडपण असतं. पण कुणीतरी मनापासून आवडतही असतं. यातून नकळत्या वयातील भावनांचं तुफान उसळून येतं, अविचारातून वागणं घडत जातं आणि त्यातूनच मुलींना चिडवणं, फळ्यावर-बाकावर, प्रसाधनगृहात नावं लिहणं घडतं. मुलींचा आयटम, माल, कंडा, डाव म्हणून मित्रांमध्ये उल्लेख होत राहतो. भाषा ताल, तोल आणि तंत्र सोडायला लागते. वर्गात गॉसिपिंग सुरु होतं. तो किंवा ती येताना दिसला-दिसली की, त्याच्या-तिच्या नावाने मोठ्याने हाका मारणं, तो-ती येतांना दिसले की, मित्र-मैत्रीणीचं एकमेकांना खुणावणं, वर्गात शिकवणं सुरु असताना एकमेकांकडे किंवा एकट्याने चोरटा कटाक्ष टाकणं, प्रार्थनेच्यावेळी ती-तो समोर दिसतील अशा जागी रांगेत उभं राहणं आवडायला लागतं. शाळेचं गॅदरिंग, शिबिरे, सहली यांच्यासाठी वसंतऋतूचं आगमन असतं. टाईमपासमधील दगडूचे संवाद आतून आवडायला लागतात. फँड्रीमधील जब्याचं शालूच्या एका झलकसाठी झुरणी लागणं आपलंच वाटायला लागतं. अशावेळी सुंदर दिसणारं स्वप्नवत जग आणि वास्तवातील जग यांचा संबंध समजावून सांगणार कोणीतरी सोबत असावं लागतं. पण हे सांगणार कोण? आईबापाला रोजच्या धावपळीत बोलायलाच वेळ नाही, शिक्षक मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करण्यात अपयशी होत असल्याने, त्यांचा सहवास टाळणेच मुलं पसंत करतात. समाजात स्वतःहून असं काही समजावून सांगण्याची इच्छाच उरली नाही. कुटुंबे विभक्तपणाचे तुकडे घेऊन वेगळी होत आहेत. बेगडी सुखाच्या हव्यासापायी घरं लहान झालेली असल्याने आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी अशी नावं धारण करून नजरेचे पहारे बनणारे आप्त लक्ष द्यायला आहेत कोठे? छोटे कुटुंब कदाचित सुखी असेलही; पण विभक्त कुटुंबांनी बऱ्याच गोष्टींचं विभक्तीकरण केलं आहे.

अर्थात याचा अर्थ असा नाही की, याआधी समाजात असं काहीच घडत नव्हतं. मुलंमुली प्रेमवगैरे काही काही करीतच नव्हती. त्यांना जीवनाविषयी काही माहिती मिळत नव्हती. पौगंडावस्थेतील वयात येत नव्हती. असे काहीही नाही. सगळ्याकाळी सगळंकाही असतं. तेव्हाही ते होतं; पण त्याहून मोठं होतं, समाजाचं मॉरल पोलिसिंग. एक वचक असायचा याचा मुलांवर. हल्ली तेच संपल्यात जमा आहे. कॉलेजात बाईकवर डबलसीट स्वार होऊन सुसाट वेगाने धावणाऱ्या जोड्यांकडे बघा, त्यांच्या बाईकवर एकमेकांसोबत बसण्यात एक इंचाचेही अंतर नसते. चेहऱ्यावर रुमाल लपेटून अंगचटीला येत कुठेतरी जाणारे तो-ती पाहून समाजात वावरणारी उमलती मनेही तसेच काही पुढे जाऊन करायचे ठरवत असतील, तर दोष कशाला आणि कुणाला द्यायचा? मूलभूत अधिकारांचं स्वातंत्र्य घटनादत्त असलं, तरी स्वैराचाराचं वर्तन नसणं संस्कारदत्त अपेक्षा असते, तिचं काय? असे काही चित्रे समोर दिसली म्हणून ते काही समाजाच्या जगण्याचं सार्वत्रिक चित्र नसतं, हे मान्य. पण अशावेळी समाजाची भूमिका निर्णायक असणे आवश्यक ठरते. संस्कारांचे प्रवाह सैल होताना संयमाचे बांध घालून त्यांना नियंत्रित करणारी व्यवस्था समाजाने प्रयत्नपूर्वक निर्माण करायला लागते. जीवनाचे आभाळ सगळ्याबाजूने अंधारून आले आहे. प्रकाशाचा कवडसा निबिड अंधारातील धुक्यात अडला आहे. अविचारांच्या आवर्तात उमलत्या फुलांच्या गंधकोशी अडकत चालल्या आहेत. अग्रेसिव्हनेस वाढत चालला आहे. शाळेत टगेगिरी करणे, मारामाऱ्या करणं, कुणाला तरी इंप्रेस करण्यासाठी हिरोगिरी करणं प्रतिष्ठेचे वाटायला लागले आहे. मुलांचं वागणं बेताल होत आहे. मनावर अविचारांची काजळी दाटत चालली आहे. समाजात विवेकाची दिवाळी साजरी करायची असेल तर संस्कारांची, साद्विचारांची छोटी-छोटी रोपे त्या मनोभूमीत रुजवावी लागतील. प्रत्येक रोपट्याची काळजी घ्यावी लागेल. यासाठी कधी समाज, कधी पालक तर कधी शिक्षकांना कुशल माळ्याची नजर कमावून वाढणाऱ्या झाडांचे जतन, संवर्धन करावे लागेल, कारण प्रत्येक फुलाचा तोंडावळा वेगवेगळा आहे.

या मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. तिचा निचरा होण्यासाठी जागाच परीक्षांना अवास्तव महत्त्व असणाऱ्या काळात पालकांनी आणि शिक्षणव्यवस्थेने शिल्लकच राहू दिली नाही. साऱ्यांनाच पुढे पळायची घाई झाली आहे. शंभर वर्षातले जगणे दहा वर्षात जगून घ्यायचे आहे. इलेक्ट्रॉनिक साधनांनी संपृक्त जगणे संपन्न वाटायला लागले आहे. असे जगणे प्रतिष्ठेचे झाल्याने विज्ञाननिर्मित उपकरणांनी ड्रॉइंगहॉल, स्टडीरूम सजले. टीव्हीच्या आभासी जगात सुखाचे रंग दिसायला लागले. तेथून दिसणारे क्षणिक रंग जीवनाचे खरे रंग वाटायला लागले आहेत. मुलांचं हुंदडणं, खेळणं संपलं. जगण्याचे मोकळे श्वास शाळा, क्लासमध्ये कोंडले गेले आहेत. पुस्तकी ज्ञान म्हणजेच शिक्षण मानणारी मुलं पुस्तकातलं जग मस्तकात न उतरवता गुणांच्या स्पर्धेत अडले. शिक्षणाचा आणि जीवनाचा संबंध उरलाच नाही. सद्विचारापासून जीवन लांबच्या क्षितिजावर उभे आहे. त्या क्षितिजापर्यंत नेण्यासाठी आणि त्यांच्यातील उर्जेला विधायक विचारांच्या मार्गावर वळते करण्यात आईबाप, समाज, शाळा, शिक्षक, शिक्षण अपयशी ठरले असतील तर दोष द्यावा कुणाला? मुलांना, त्यांच्या बेपर्वा वागण्याला, काळाच्या बदलत्या संदर्भांना की, त्याच्या वळत्या झालेल्या प्रवाहांना? याचं उत्तर ज्याचं-त्यानं शोधावं हेच बरे नाही का?
(पूर्ण)

Gandhkoshi | गंधकोशी

By // 5 comments:
गंधकोशी: भाग एक

काही दिवसापूर्वी शाळेतील मुलांसंदर्भात बातम्या- जळगाव जिल्ह्यातील गिरड येथील शाळेत मुलांच्या आपापसातील भांडणात पाचवीच्या मुलाने जीव गमावला. संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या शाळेत सातवीतील मुलांनी सोबत शिकणाऱ्या आपल्याच वर्गातील मुलास मुलींकडे पाहतो, म्हणून बदडून काढले. मारहाणीत त्या मुलाचा मृत्यू झाला. जीवनाचे पैलूच ज्यांना अजून पुरते कळायचे आहेत; त्या मुलांच्या जगात हे काय अतर्क्य घडतंय, म्हणून सारेच अवाक झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर चिंतेची अस्पष्टशी लकेर उमटली. प्रत्येकाने आपापल्यापरीने संबंधित घटनेचे अर्थ शोधले. अन्वयार्थ लावले. संबंधित बातम्या लोकांपर्यंत पोहचल्या. काही संवेदनशील मने क्षणभर अस्वस्थ झाली. हे काय विपरीत घडतेय म्हणून विचार करायला लागले. घडणाऱ्या अशा घटनांचा अन्वयार्थ लावणे जरा अवघडच असते, कारण अशा घटनांशी अर्थाचे अनेक दृश्य-अदृश्य पदर निगडित असतात. परिसरात चोऱ्या, मारामाऱ्या यासारख्या काही घटना घडत असतात. आसपास असे काही घडले की, संवेदना हरवलेला समाज रोजच्या जगण्याच्या व्यापात निष्क्रिय मतांनी निर्मित प्रतिक्रियांची लेबले त्या-त्या घटनांवर चिटकवून व्यक्त होतो. अन्यायाची कोणाला चीड नाही आणि मूल्यांची चाड राहिली नाही, म्हणून समाजाला दोष देतो, क्षणभर हळहळतो. माणसाचं सर्वच स्तरावरून कसं नैतिक अधःपतन घडत आहे, याची खंत व्यक्त करतो आणि आपल्या दैनंदिन व्यापात विरघळून जातो. पुढेही काही अप्रिय घटना घडत राहतात. त्या टाळता येणे संभव असले, तरी बऱ्याचदा टळत नाहीत. त्यांचे क्षणिक, तात्कालिक, भावनिक पडसाद उमटतात. कोणालातरी दोष द्यायचा अन् अशा घटनांची जबाबदारी कुठेतरी निर्धारित करायची म्हणून संस्कार, नैतिकता, मूल्ये, संवेदनशीलता अशा काही धाग्यांनी घटनांच्या परिणामांना बांधून समाज मोकळा होतो. व्यवस्थेचा कोणावरच वचक राहिला नाही म्हणीत क्षणभर हताश, निराश होतो. घडणाऱ्या घटनांबाबत त्रागा करूनही फारसे काही हाती येत नाही. अर्थात घडणाऱ्या अशा घटना हे काही समाजाचं सार्वकालिक दर्शन नसतं. समाजात त्या घडतच असतात, या वास्तवास दुर्लक्षित कसे करता येईल.

घडलेल्या या घटनाही तशा दुर्दैवीच. त्याहून आणखी दुर्दैव हे की, या घटनांत बळी जाणाऱ्या आणि घेणाऱ्या मुलांचे वय अवघे तेरा-चौदा वर्षे एवढेच. ज्या वयात खेळावं, बागडावं, हसावं, रडावं त्या वयात अचानक असं काय घडलं की, मुलांचा संयम ढळावा? अशी अनपेक्षित आक्रमकता यांच्यात कुठून येते आहे? या घटनांकडे अपघात म्हणून कदाचित पाहता येईलही; पण अपवाद म्हणून पाहणे म्हणजे आपणच करून घेतलेली आपली वैचारिक वंचना तर नाही ना? पाश्चात्य देशात वर्गात हल्ले घडण्याच्या घटनांमध्ये काही नावीन्य नसेलही; पण ज्या देशात संस्कारांची गंगोत्री संयमाच्या तटांना धरून प्रवाहित आहे, त्या देशात एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत उमलत्या मनांमध्ये क्षोभ उफाळून यावा, हे न समजणारं आहे. या घटनांचं उत्तरदायित्व नेमकं कोणाचं? समाज, पालक, शिक्षक, शिक्षणव्यवस्थेचं की सगळ्यांचं? कोणाकडे बोट दाखवायचं, तर कोणासही दोष देता येईल. या घटनांमागील कारणं शोधली, तर आपल्या हाती काय लागते? हाती शून्यच येणार असेल, तर अशा विचारांना आत्मवंचनेशिवाय आणखी काही म्हणता येईल, असे वाटत नाही. अशा काही घटना घडल्यानंतर समाज व्यथित होतो. क्षणभर हळहळतो, खळबळून जागा होतो आणि विचार करतो. भविष्यात असे अघटित घडू नये म्हणून काहीतरी करावयास हवे, या जाणिवेतून काही उपाय सुचवले जातात. जुन्या पिढीतील माणसं आमच्याकाळी असं काही नव्हतं, म्हणून आपल्या मतांचे शिक्के संबंधित घटनांवर ठोकून मोकळे होतात. उगीच एखाद्या घटनेने थेट सगळ्यांनाच एका मापात मोजण्याचे पाप का करतात, म्हणून नव्या पिढीचे प्रतिनिधी व्यवस्थेला प्रश्न विचारतात. मतमतांतारांचा प्रचंड धुरळा उठतो. प्रत्येकाला आपण आणि आपलीच मते योग्य असल्याचा साक्षात्कार होतो. घटनांचे अन्वेषण बाजूला पडते. मूळ मुद्दा तसाच शिल्लक राहतो आणि इतर गौण गोष्टींकडेच लक्ष केंद्रित होते. मुलांचं वर्तन पाहून आपल्या सामाजिक जगण्याचं वास्तव कळत नकळत समोर येते. स्वैरपणाला स्वातंत्र्य समजणाऱ्या मुलांकडून मर्यादांचे सीमोल्लंघन घडत आहे. मुलांच्या बेताल वागण्याने पालक हेलपाटलेले आहेत, हताश झाले आहेत. आपलीच मुलं आपल्या हाताबाहेर निघून गेली, म्हणून चिंतीत झाले आहेत.

काळाचा महिमा अगाध असतो. त्याचा प्रवास घडताना तो आपल्या सोबत जशी संपन्नता आणतो, तशा समस्याही घेऊन येतो. आल्याच समस्या तर त्यांची उत्तरे शोधावी लागतात. त्यासाठी वेळ देऊन काही प्रासंगिक प्रयोग करायला लागतात. पण सांप्रत समाजात जगण्याचे प्रश्नच एवढे जटील झाले आहेत की, त्यांची सर्वसमावेशक उत्तरे सहज हाती लागणं अवघड होत आहे. माणसांच्या कालच्या आणि आजच्या जगण्यात प्रचंड अंतराय निर्माण झालं आहे. कधीकाळी आला दिवस दारिद्र्यात कंठणाऱ्यांनाही संस्कारांनीमंडित जगण्याची श्रीमंती फार मोलाची वाटत असे. पण वर्तमानाने लोकांचं जगणं बदलवलं. जागतिकीकरणाच्या उसळणाऱ्या लाटांवर स्वार होऊन अनेकांचं जगणं आर्थिक आघाड्यांवर संपन्न झालं. भक्कम आर्थिक स्त्रोतांनी हाती चार पैसे खुळखुळायला लागले. आवश्यक गरजा भागवून उरलेला पैसा भौतिकसुखांच्या वाटेने वळून भोगवादाच्या दिशेने पळतो आहे. सोबतीला विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित सुखाचं व्हर्च्युअल जग उभं राहिलं आहे. या जगाने अॅक्च्युअल जगाचा विसर पाडण्याएवढी साधनं माणसांच्या दारात आणून उभी केली आहेत. नैतिक मूल्यांना प्रमाण मानून जीवनयापन करण्याच्या पद्धतीत या साधनांनी बदल घडवून आणलाय. सुखप्राप्तीची गणिते श्रमाच्या सूत्रांनी सोडवण्याऐवजी संक्षिप्त पायऱ्यानी सोडवण्याचे फॉर्मुले शोधण्याच्या पद्धतींना प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. विनासायास सुख संपादित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कवायतींचा हा परिपाक आहे.

लॅपटॉप, मोबाईल, प्लेस्टेशन, गेमिंग संस्कृती विज्ञानतंत्रज्ञानाच्या शिड्या सोबत घेऊन माणसांच्या जगण्यात प्रवेशित झाली आहे. काळाच्या वाहत्या प्रवाहात मोबाईलच नाहीतर मुलंही स्मार्ट झाली आहेत. टचस्क्रीनच्या चार-पाच इंचाच्या पडद्यावर जगाचे हवे तसे, हवे तेव्हा, हवे ते रंग दिसायला लागले. या आभासी जगण्याचं व्यसन नव्या पिढ्यांना लागत आहे. एकवेळ आवश्यक गरजांची पूर्तता नसेल होत तरी चालेल; पण फेसबुक, व्हाटस् अॅप हाती असलेच पाहिजे, अशी मानसिकता प्रबळ होत आहे. भावनांना विचलित करून मनाला दोलायमान करणाऱ्या हजारो वेबसाईटस् दिवसाचे चोवीस तास दिमतीला आहेत. या वाटांनी घडणारा प्रवास वेगाने आणि सुगम व्हावा म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्क हाती लागले आहे. आईबापाला आपलं मूल स्मार्टफोन वापरताना पाहून स्मार्ट झाल्याचा आनंद होतोय. ते आणखी स्मार्ट व्हावं म्हणून ऐपत नसतानाही नेक्स्ट जनरेशनचे महागडे मोबाईल त्यांच्या हाती दिले जात आहेत. पण मुलांकडून त्याचा उपयोग कसा केला जातोय आणि काय होतोय, हे पाहण्याएवढे तंत्रज्ञान बहुसंख्य पालकांना अवगत नाही अन् असलेच तर त्याकडे पाहण्यासाठी हाती तेवढा वेळही नाही. गेल्या काही वर्षात कधी नव्हे एवढी सुशिक्षितांची संख्या वाढून घरात कमावते हात वाढले. कमावत्या हातांना समृद्धीचे दान देत लक्ष्मी घरी आली आणि बऱ्यापैकी विसावलीही आहे. आम्ही लहान असताना हे असं काही आम्हाला घेता आलं नाही, करता आलं नाही; याचा सल पालकांच्या मनात असल्याने मुलांना काहीच कमी पडू द्यायचे नाही, या विचारातून ही आभासी सुखं पालक घरात आणत आहेत. हाती लागणाऱ्या अशा सुखांमध्ये ऑनलाईन असणाऱ्या पिढीची जगण्याची लाईनच चुकतेय, याचं भान उरलं नाही.

चेहऱ्यावरच्या सूक्ष्म रेषाच काय; पण वाऱ्याने उडणारा डोक्यावरील एखादा केसही स्पष्ट दिसेल याची शाश्वती देणाऱ्या एलइडी, एचडी, प्लाझ्मा टीव्हीच्या पडद्यांनी जगातील सगळे रंग साकोळून बैठकीच्या खोलीपर्यंत आणून ठेवले आहेत. स्क्रीनवरील सप्तरंगांनी मंडित मालिका, चित्रपट मनाच्या कप्प्यांना साचेबंद चौकटीत आणून उभे करीत आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या प्रणयी जोड्या, त्यांचे प्रणयाराधन, भौतिक सुखांनी संपन्न जगणं, लाखालाखाच्या महागड्या गाड्या, प्रशस्त बंगले. कोणाचीही नजर विस्मयाने फिरावी असं जगणं आणि असंच किंग साईज लक्झरीयस जगणं म्हणजेच खरं सुख, असा समज पाहणाऱ्यांच्या मनात दृढ होत चालला आहे. टीव्हीच्या पडद्यावरील मालिकेतील पात्रांची परस्परातील नाती, नात्यांतील संबंधांचं चित्रीकरण आणि समाजात दिसणारं वास्तव यांची कोणतीही चिकित्सा न करता तेथे दिसणाऱ्या काल्पनिक जगालाच वास्तव समजण्याचा प्रमाद उमलत्या मनांकडून घडतो. पडद्यावरील जोड्या प्रेम करताना दिसतात. तसेच, तेच आणि तेव्हढंच प्रेम उमलत्या वयातील मुलामुलींना खरं जगणं वाटायला लागते. पडद्यावरील प्रणयाराधन अडनिड वयातील मनाला संमोहित करतंय. समाजात, परिसरात जे काही बरंवाईट दिसतं, त्याची प्रतिबिंबे मुलांच्या उमलत्या मनांवर उमटत असतात. मनांवर उमटलेल्या अशा काही प्रतिमातून संस्कृती त्यागात नसून भोगात आहे, असा समज नकळत वाढत जातो. धूम्रपान, मद्यपान आरोग्यास हानिकारक असल्याच्या सूचना पडद्यावर कितीही ठळक अक्षरांनी लिहिल्या जात असल्या तरी त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करून; साध्या सुगंधी सुपारीच्या तुकड्यापासून प्रारंभ झालेला व्यसनांचा प्रवास केव्हा सिगारेट, घुटका, मद्यपानापर्यंत पोहचतो, ते कळतही नाही. व्यसनांना अनामिक प्रतिष्ठा प्राप्त होते. मद्यपान करणे हा इव्हेंटचा भाग बनतो. पिण्याला सोशलड्रिंकच्या नावाखाली प्रतिष्ठा प्राप्त होणे, हा प्रवास नैतिक उंची वाढवणारा नक्कीच नाही.

एककाळ असा होता की, जगण्याशी निगडित बऱ्याच गोष्टींची माहिती होण्यासाठी वयाची वीसएक वर्षे तरी उजळायला लागायची. हल्ली विज्ञाननिर्मित साधनांमुळे अशी माहिती वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षीच मुलांच्या हाती लागते आहे. पाचवी-सहावीच्या मुलामुलींच्या मनात भावनिक गुंत्याची जाळी विणली जात असल्याच्या वार्ता कानी येतात. हे ऐकणे अवघड वाटत असले, तरी वास्तव असेच काही दिसते आहे. अशी काही प्रकरणे घडतात, ती समोर येतात तेव्हा माणसे अवाक होतात. आपला वाढदिवस साजरा करताना कुणीतरी तीन-चार वर्षाचे मूल प्रपोज स्टाईलने मुलीच्या हाती फूल देतो आणि तीही तितक्याच नजाकतीने त्या फुलाचा स्वीकार करते. पाहणाऱ्यांना त्यांच्या निरागसतेचे कौतुक वाटते; पण त्यांच्या मनांवर, विचारांवर अशा कृतीचे काही चिन्हे, ठसे जेथून अंकित झाले त्याचं काय? तेरा-चौदा वर्षाची मुलंमुली फ्रेडशिप, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असणं स्टेटस सिम्बॉल समजायला लागतात. स्वतःला मेड फॉर इच अदर समजू लागतात. ज्या वयात स्वतःचीच नीट ओळख अजून व्हायची आहे; त्या वयात एकदुसऱ्यासाठी झुरणी लागायचं, हा कोणता जीवनयोग आहे? कालांतराने अशा वर्तनाची विफलता समोर येते. प्रखर वास्तव बनून काही प्रश्न समोर उभे ठाकतात. आकर्षणातून  निर्माण झालेल्या अशा तात्कालिक आणि तकलादू नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो. संयमाचे बांध फुटतात अन् ब्रेकअप घडते. वाटा वेगळ्या होतात. मने सैरभैर होत जातात. त्यातून आलेली विमनस्कता विचारांना अवरुद्ध करते. अविचाराने वागणे घडते अन् अविचाराची सोबत करीत वैगुण्ये आणि व्यसनाधिनता जीवनात प्रवेशित होते.
(क्रमशः)

Gun Aani Gunvatta | गुण आणि गुणवत्ता

By // No comments:
गुण आणि गुणवत्ता: दोन
 
परीक्षातंत्राला आत्मसात करून गुणांचं मोठ्ठं भांडार आपल्या खात्यावर जमा करण्याचा छंद असणाऱ्या जवळपास सगळ्या ‘मार्क्स’वाद्यांनी डॉक्टर, इंजिनियर व्हायची स्वप्ने जणूकाही लहानपणापासून आपल्या मनावर गोंदून ठेवलेली असतात. कौतुकसोहळ्याच्या निमित्ताने या गुणवंतांना वर्तमानपत्रात मनोगते व्यक्त करण्याची संधी अनायासे प्राप्त होते. बरं येथे विचारले जाणारे प्रश्नही जवळपास दरवर्षी तेच किंवा तशाच स्वरूपाचे असतात आणि उत्तरेही जणूकाही मागचीच पाठ करून ठेवल्यासारखी. यांचं रोज बारा-तेरा तास अभ्यास करणं, टीव्ही वगैरे न पाहणं, शिक्षकांचं, आईबापाचं यांना सतत मार्गदर्शन असणं आणि सोबत अनेक पुस्तके दिमतीला असल्याचे हे सांगतात. हे पाहून तर आमच्यासारख्या हंगामी अभ्यास करणाऱ्या पिढ्यांना गरगरायला होते. बरं यातील सगळ्याच गुणवंताना डॉक्टर, इंजिनियर नाहीतर सी.ए.असंच काहीतरी व्हायचे असते. आणखी काही व्हावेसे का वाटत नसावे कोणास ठाऊक? समाजाला अन्य पेशा स्वीकारून जगणाऱ्यांची आता आवश्यकताच उरलेली नाही जणू. या सगळ्या गुणवंतांना घडवणारा कोणीतरी मास्तरच असतो; पण यातला एकही विद्यार्थी मला शिक्षक व्हावंसं वाटतं, असं चुकुनही सांगत नाही. ज्यांना कुठेच काही संधी मिळाली नाही, ते मास्तर बनतात आणि गुणवत्ता यादीत नसलेले हे गुणवान पुढचे ‘गुण’वान घडवतात. याला कोणता काव्यगत न्याय म्हणावे?

स्पर्धेच्या धावत्या जगात धावण्याची ताकद अंगी असायला लागते. ही ताकद गुणपत्रिकेतील गुणांनी कशी मिळेल? त्याकरिता अंगभूत धाडस असायला लागते. जीवघेण्या स्पर्धेत काही कोवळे जीव अक्षम ठरतात, परिस्थितीशी धडाका देत टिकून राहण्याचे बळ उरत नाही, स्वतःवरचा विश्वास उडायला लागतो, तेव्हा हे गुण किती मदतीला येतात? प्रसंगी मिळवलेल्या गुणांना टिकवून ठेवण्याचाच ताण अधिक असतो. हे सगळं सहन करण्यापलीकडे गेले की स्वतःचं अस्तित्व विसर्जित करण्यापर्यंत अविचाराचं वागणं घडतं. थोडा धीर धरून टिकणारे कोमेजून जातात, तेव्हा त्यांची होणारी दयनीय स्थिती आणि समाजाच्या जगण्याची कीव करावीशी वाटते. त्याहून जास्त कणव येते त्यांच्या पालकांची. का म्हणून मुलांच्या मानगुटीवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादत असतील? यांना विद्यार्थीदशेत करता आले नाही, ते आपल्या अपत्यांनी करावे, असं वाटत असतं का? यांना मुलांच्या भविष्याची खरंच काळजी असते की, शेजारच्या कोणातरी हुशार असणाऱ्यांशी तुलना करून आमचंही मूल काही कमी नाही, हे दाखवायचे असते. की आपले इगो कुरवाळायचे असतात, माहीत नाही.

शिक्षणातून ज्ञानसंवर्धन व्हावे, ही अपेक्षा असते. पण हल्ली अशा गुणवानांमधून किती गुणवंत ज्ञानसंपादन करून स्वतःला सक्षम करून घेणारे आहेत? नुसत्या माहितीच्या गोण्या भरणे म्हणजे शिक्षण नाही. शिक्षणाचा संबंध ज्ञानाशी आणि ज्ञानाचं नातं जगण्याशी असतं. असावं. हे नातंचं हल्ली उसवत चाललं आहे. मागच्यावर्षी वर्गात काय शिकलात, ते यावर्षी आठवत नाही. आमचे शिकणे आणि ज्ञानसंपादन करणे त्या वर्षापुरते. वर्ग बदलला की, केलेला अभ्यासही विसरतो आणि ते शिकवणारा मास्तरसुद्धा. असा निष्क्रिय कर्मयोग आचरणे म्हणजे शिक्षण का? मुळात आपल्या शिक्षणपद्धतीत आणि परीक्षापद्धतीत काही वैगुण्ये आहेत. ज्याची स्मरणशक्ती तीव्र तो या व्यवस्थेत प्रज्ञावान ठरतो. या प्रज्ञेला पैलू पाडणारी सध्या बऱ्यापैकी बरकत आणि प्रतिष्ठा असणारी क्लास नावाची व्यवस्था आहेच दिमतीला. येथे काही पैसे पेरून स्मरणशक्तीला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासाच्या सरावाचे अनेक प्रयोग करून विद्यार्थ्याच्या जीवनाचा कर्मयोग साधला जातो. परीक्षेत नेमाक्यावेळी नेमके आठवून तंत्रबद्धरित्या पाठ केलेली आणि घोटून, तासून, तपासून घेतलेली उत्तरे लिहिणे म्हणजे गुणवान का? यातील किती विद्यार्थी कोणीतरी निर्माण केलेली, ठरवलेली चाकोरी नाकारून वेगळी उत्तरे लिहितात? जवळ-जवळ सारखीच उत्तरे, कारण पाठांतर उत्तम. उत्तराबाबत संशोधन केल्यास कळेल बहुतेक साऱ्यांच्या मदतीला पाठांतरासाठी कोणतेतरी मार्गदर्शक पुस्तक आणि तंत्रसाध्यतेसाठी मार्गदर्शन करणारे कोणीतरी तज्ज्ञ धावून आलेले असतात.

समजा एखाद्या विद्यार्थ्याने चाकोरीतला रस्ता नाकारून काही वेगळे लिहिले असेल, तर परीक्षक त्याला आणि त्याच्या लिहिलेल्या उत्तरला किती स्वीकारतात? ज्यांच्या मार्गदर्शनात उत्तरपत्रिका तपासण्याचे काम चाललेले असते, त्या मॉडरेटर्ससाठी बोर्डाने दिलेली नमुना उत्तरपत्रिका धर्मग्रंथांइतकी पवित्र असते. त्यात जे दिले असेल तेच आणि तेवढेच अंतिम सत्य आहे. त्याच्याबाहेर काहीही नाही, हा अढळ विश्वास. आधीच बाजारात परीक्षातंत्रावर आधारित पुस्तकांची वानवा नसल्याने, हे तंत्र अवगत असणारे अनेक अभ्यासू मार्गदर्शन करून गुणवान कसे बनतात, हे शिकवतात. परीक्षेच्या काळात तर अशा दिशादर्शक कृतिसत्रांचे, शिबिरांचे पिक आलेले असते. या सगळ्या सव्यापसव्यातून अपेक्षित तंत्र आत्मसात करणारे ‘गुण’वान ठरतात. उत्तरपत्रिका तपासण्याआधी परीक्षकांना सूचना वजा मार्गदर्शन केले जाते. त्यात एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते की, मुलांनी मागणी केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी दिली जाणार आहे. उत्तरपत्रिका काळजीपूर्वक तपासा. या काळजीपूर्वकचा एक अर्थ असा होतो, मागितल्या गेल्याच उत्तरपत्रिका माहितीच्या अधिकारात तर कोण कशाला ‘आ बैल मुझे मार’ करतो, त्यापेक्षा दिले चारदोन मार्क्स अधिक, तर त्यानी आपल्याला असा काय फरक पडतो. कमी गुण दिले म्हणून त्यांचा गुन्हेगार बनण्यापेक्षा जास्त गुण देऊन कर्ण बनणे केव्हाही चांगले ना!

हे कमी की काय म्हणून अंतर्गत गुणांची शिदोरी आधीच सोबत बांधून दिलेली असते. हे गुण पाहिले की वाटते सगळेच विद्यार्थी सगळ्याच विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनात एकदम गुणवत्ताधारक झाले आहेत. या अंतर्गत गुणांची गुणपत्रकातील सूज उतरवून निकाल पाहिला की, कळेल गुणवत्ता कोणत्या अप्सरेचे नाव आहे आणि काय आहे. बोर्डाच्या परीक्षेत ऐंशी गुणांपैकी दहा-अकरा गुण मिळवणारे इकडे अंतर्गत परीक्षेत वीसपैकी एकोणवीस-वीस गुण मिळवतात, याला कोणते सामायिक समीकरण समजावे? शाळेची प्रगती दहावीच्या गुणांशी जोडून ठरवली जात असेल आणि तोच यशाचा निकष ठरत असेल, तर या निकषास पात्र ठरण्यासाठी प्रयोग आणि प्रयोगांना योगसाधना समजणारेही ओघानेच येतात. प्रत्येकाला आपल्या शाळेचा निकाल अधिक कसा लावता येईल याचाच ध्यास लागलेला. अशा ध्यासपूर्तीसाठी अनेक सर्जनशील विचार जागे होतात. आपले कौशल्य पणास लावून निकाल नावाची अवघड तपस्या साध्य केली जाते. कॉपीमुक्त अभियान कार्यान्वित केले जाते, तरीही बोर्डाच्या दप्तरी असे काही महाभाग आपल्या अलौकिक प्रयोगांच्या अचाट साहसामुळे सुवर्णाक्षरांनी नोंदवले जातात. कारवाई केली जाते. तरीही पुढच्या वर्षी पहिले पाढे पंचावन्न हे ठरलेलेच.

एक दहावी-बारावीच्या निकालाभोवती आमची सगळी शिक्षणव्यवस्था फिरते आहे. खरे गुणवान या व्यवस्थेत टिकून राहतात, हेही सत्य नाकारून चालत नाही; पण त्याच वेळी आपल्या उच्चशिक्षणाचा आलेख अद्यापही सतरा-अठरा टक्क्याच्यापेक्षा अधिक वाढताना का दिसत नाही? असे म्हणतात की, पदवीचा टिळा ललाटी लागलेल्यांपैकी फक्त पंचवीस-सव्वीस टक्केच इंजिनियर ज्ञानसंपादन करून खऱ्या अर्थाने पदवीस पात्र ठरतात. बाकीच्यांकडे पदवी आहे पण कौशल्ये नाहीत. मग अशा गुणवानांना गुणवान कसे म्हणावे? जी गोष्ट इंजिनियरिंगची तिच थोड्याफार फरकाने अन्य शाखांची आणि तशीच मास्तरांचीसुद्धा. येथेही टीईटीचे निकाल शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेल्या आपल्या ज्ञानाचे पितळ उघडे पाडतात. जर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल. शिक्षणाचा सांधा भाकरी, चाकरी आणि छोकरी यांच्याशी जुळवला जात असेल, तर शिक्षणात ज्ञानलालसा उरतेच किती? शिक्षणातून या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड सुरु होते. हा शुष्क कर्मयोग शिक्षणाला नव्या उंचीवर नाही नेऊ शकत. येथे सुमार उंचीचे खुरटी झाडे वाढतात. पर्णसंभाराने बहरलेले स्वयंभू वृक्ष अपवादानेच दिसतात.

समाजात सगळीकडेच गुणांचे पूजन होत असेल आणि त्यानंतर पुढची बाब म्हणून गुणवत्ता पाहिली जात असेल, तर साहजिकच गुणांचे अवडंबर माजणारच. गुणसंख्येला महत्त्व मिळून वागणे घडताना, गुण कसे मिळवायचे हेच पाहिले जाईल, कारण माणसाचा स्वभावाच मुळी कमीतकमी सायासप्रयासांनी अपेक्षित गोष्टी मिळवू पाहणारा आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात गुणपत्रकावरील गुणांनी प्रवेश ठरत असतील, तर गुणपत्रक अधिक देखणे करण्याकडेच बहुतेकांचा कल असणे उघड आहे. अशावेळी सामान्य माणसांनी गुणवत्तेची कोणती अपेक्षा करावी? ज्यांना आपले गुणपत्रक गुणांनी रंगवता येते, ते या तंत्रसाध्य जगात यशस्वी म्हणून गणले जातात. ही मानसिकताच मुळात चुकीची असूनही, त्यात कोणीच वावगं वाटून घ्यायला तयार नसल्याचे दिसते. काही दिवसापूर्वी निकालांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी हेल्प लाईन सुरु केलेल्या कोणा एका मानसोपचार तज्ज्ञांचा अनुभव वर्तमानपत्रात छापून आला होता. दहावीला मुलीने ९२ टक्केच गुण मिळवले म्हणून तिचे डॉक्टर आईबाप प्रचंड रागावले होते. त्यांच्या मते तिने यापेक्षा अधिक गुण मिळवायला हवे होते. ते न मिळाल्याने, समाजात त्यांना मान खाली करायला लागली. आता एवढे गुण मिळवूनही यांना कमीच वाटत असतील तर उपचारांची खरी गरज कोणाला आहे?

समाजात वावरताना एक दृष्टिक्षेप टाकून पाहिल्यास मुलांच्या गुणांची चिंता कोणाला अधिक आहे हे सहज कळेल. एखाद्या शेतकरी, मजूर आईबापाने असा आग्रह केल्याचे मलातरी दिसले नाही. निदान आमच्यावेळी असे काही घडत नव्हते. आता यांच्याकडेही गुणांबाबत असे काही घडत असेल, तर काही अपवाद जरूर असू शकतात. नाहीतरी अपवाद सगळीकडे असतात. प्रस्थापित, सुशिक्षित समूहातही ते असतात. बहुदा शिकून स्थिर झालेले अन् स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांचे जग गुणांबाबत अधिक आग्रही (की दुराग्रही?) होत असल्याचे दिसते. हा अवास्तव आग्रह कशासाठी? याचे कारण उज्ज्वल वगैरे भविष्य असल्याचे लटके समर्थन केले जाते. असे असेल तर केवळ गुणांनीच भविष्य उज्ज्वल होते, याचे काही प्रमाण आहे का? हा वैचारिक भ्रम कशासाठी? जगाच्या इतिहासात डोकावून पाहिले की, दिसते गुणांच्या मोजपट्ट्यात मोजताना कधीही जे मोठे नव्हते, त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर पराक्रमाची शिखरे उभी केली. शिकणे महत्त्वाचे आहे, पण त्याहून महत्त्वाचे असते काय शिकावे. काय, कोणते आणि कसे शिकावे यांच्या निवडीचे स्वातंत्र्य मुलांनाच असायला हवे. उगीच आपल्या इच्छा मुलांवर लादण्यात कोणतेही शहाणपण सामावले नाही. मुलं आपली आहेत. आपलं अस्तित्व आहेत; पण याचा अर्थ असा नाही, ते आपली स्थावरजंगम मालमत्ता आहेत आणि एखाद्या वस्तूसारखे त्यांचेही मोल लावता येते. असे कोणाला वाटत असेल तर आधी आपणच आपणास प्रश्न विचारून पहा, आपल्या आईबापानी आपणास असे घडवले असते तर...!

प्रश्न गुणांचा की गुणवत्तेचा, हे वेळीच समजणे महत्त्वाचे असते. गुण महत्त्वाचेच; पण गुणवत्ता त्याहून अधिक मोलाची असते, कारण गुणवत्तेशिवाय गुणांचं खरं मोल कळत नाही. गुणांच्या बेरजा करण्यापेक्षा गुणवत्तेची आराधना करणे माणसाच्या चैतन्यशीलतेचे द्योतक असते. गुण कमी मिळाले म्हणून हताश, निराश होताना हेही स्मरणात असावे की, गुणपत्रकात अंक बनून मुद्रित झालेल्या गुणांनी सगळ्याच गोष्टी काही साध्य होत नाहीत. अंकांचा देह धारण करून अवतीर्ण झालेले गुण काळाच्या प्रवासात विसरले जातात; पण गुणवत्ता एक अशी गोष्ट आहे, जी कालोपघात टिकून असते आणि तिचे स्मरण समाजाला सातत्याने असते. म्हणून शेवटी निवड आपलीच आपणास करायची आहे, आपणास गुण हवेत की गुणवत्ता!
(पूर्ण)