Naati | नाती

By
एप्रिल महिन्यातला एक शनिवार, अर्धाच दिवस शाळा असल्याने घरी जरा लवकरच आलो. म्हणजे शाळेत किंवा मधल्या रिकाम्या वेळात चहाच्या दुकानावर थांबून इकडच्या तिकडच्या विषयावर चकाट्या पिटण्याची कामे नसल्याने (निदान त्या दिवसापुरते तरी) घराच्या उंबऱ्याला पाय लवकर लागले, एवढेच. नाहीतरी शाळेच्या वार्षिक परीक्षा संपल्याने उत्तरपत्रिका तपासताना चकाट्या हाणण्यात, हसण्यात आणि कोट्या करण्यात दिवस कसा आनंदाने निरोप घेतो, ते कळतही नाही. (यालाच म्हणतात सुख!) म्हणूनच की काय असेल, आम्हा शिक्षकांविषयी बरेच जण सहजपणे बोलून जातात, ‘तुमचं काय बुवा, नुसती मज्जा! सुट्या तुमच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. नशीबवान आहात.’ इत्यादी इत्यादी. मजा या शब्दाचा अर्थ अर्थातच सोयिस्कर असाच असतो; पण मजा म्हणजे नेमकं काय असतं? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. (पसंद अपनी अपनी, असे असावे) तर असे मज्जेत दिवस पुढे-पुढे पळतायेत अन् आम्ही त्यांच्यासोबत. (असतं एकेकाचं नशीब, नाही का!)

तर सांगायचा मुद्दा असा की, घरी आलो. विसावलो थोडा निवांत. शेजारीच चिरंजीवांचा मोबाईल, लॅपटॉप, संगणक इत्यादी विज्ञानप्रणीत साधनांसोबत सुखसंवाद चाललेला. शेजारीच दोन पुस्तके इकडे, तीन वह्या तिकडे आणि लेखन साहित्य भलतीकडे, असा पसारा पसरलेला. (स्वच्छता अभियानाचा आमच्यापुरता पराभव!) संगणकाच्या कीबोर्डावर त्याची बोटं आदळतायेत. स्क्रीनवरची दृष्ये झपाट्याने बदलत आहेत. सोबतच मोबाईलवर काय अपडेट्स येतायेत याकडेही लक्ष. यालाच कदाचित अष्टावधानी वगैरे, असं काहीतरी म्हणत असावेत. बसलो त्याच्याशेजारी येऊन थोडा. काय करतायेत चिरंजीव म्हणून विचारले, तर नेहमीचं ठरलेलं उत्तर, ‘प्रोग्रामिंगचं, प्रोजेक्टचं काम चाललं आहे.’ (प्रोग्रामिंग, प्रोजेक्ट नावाचे भारदस्त शब्द ऐकून अंतःकरण कसं भरून येतं, कारण आमच्याकाळी असं काहीच नव्हतं ना! म्हणून.) आता एवढे भारदस्त शब्द अंगावर फेकून मारल्यावर संगणकाशी अपरिचित, अल्पपरिचित माणूस दचकेलच ना! तरीही हिम्मत करून विचारावं पुढचं काहीतरी की, याचं ठरलेलं किंवा आधीच ठरवून घेतलेलं उत्तर, ‘अहो पप्पा, आम्हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आणि तेही संगणकशाखेच्या, यांच्याशिवाय कसे चालेल? हेच तर आमचं शिकणं.’ हो, नाहीच चालणार, म्हणून आपणच आपली समजूत काढावी. नाहीतरी आपलं संगणकाचं ज्ञान म्हणजे त्यांच्यासाठी ज्युनियर केजी वर्गात असण्याएवढंच असतं.

माझं संपादित केलेलं असेल नसेल तेवढे ज्ञान आठवून त्याच्याकडे कुतूहलमिश्रित नजरेने पाहत राहिलो. त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीतील वाटचालीविषयी एक अनामिक आनंद (पापा कहते है बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा! वगैरे प्रकारातलं.) आणि उज्ज्वल भविष्याची एक सुखसंवेदना (ही आपणच आपली तयार करून घ्यावी, कारण अज्ञानातले सुख मोठे असते.) माझ्या मनात. त्याला अर्थात याच्याशी बहुदा देणंघेणं नसावं. तो त्याच्या आभासी जगात पुन्हा लीलया संचार करण्यात रममाण. मला तर भारी कौतुक वाटते, या पिढीतील मुलामुलींचे, केवढी एकाग्रता असते यांच्यात. एकाचवेळी अनेक कामांमध्ये कशी काय यांची ब्रह्मानंदी टाळी लागते कोण जाणे! शेजारी आईबाबा बसले आहेत, त्यांच्याशी बोलावं थोडंसं, असंच इकडचं तिकडचं. सांगावं त्यांना मनातलं काही साठवलेलं. असतील कुठली स्वप्ने डोळ्यात गोठवलेली. असतील भिरभिरत कुठली पाखरे मनात, तर द्यावं त्यांना संवादाचं मुक्त आकाश विहारायला. करावी थोडी चिवचिव अर्थासह अथवा अर्थहीन, संदर्भासह किंवा संदर्भांशिवाय; पण नाहीच हे शक्य, कारण संगणक आणि मोबाईल माझा सखा-सोबती, हे यांच्या जगण्याचं चिरंजीव तत्वज्ञान. स्क्रीनवरचं जग हेच आपलं जग, अशी स्वतःची समजूत करून घेतलेली. व्हर्च्युअल जगात विहार करताना अॅक्च्युअल जगाचा विसर पडत चाललाय, त्यालातरी कोण काय करणार. काळाचा महिमा म्हणून पाहत राहून त्यातच आनंद शोधावा, हेच बरं. शब्दाविना संवादाचं बऱ्याचदा एकमार्गी आणि भावनांचा ओलावा नसणारं शुष्क जग त्यांच्या मनात विज्ञानतंत्रज्ञानानेनिर्मित साधनांनी कधीच तयार केलेलं आहे.

संवाद माणसांची सार्वकालिक गरज; पण तोच हळूहळू हरवत चाललाय की काय, अशी शंका येण्याइतपत बदल माणसांच्या वागण्यात घडून आले आहेत. काही वर्षापूर्वीच्या आमच्या पिढीचं जगणंच समाजाच्या संवादाशी जुळलेलं असायचं. आभासी साधनं सोबतीला नसल्याने माणसांशी अखंड संवाद सुरु असायचा. समवयस्कांतील संवाद कळत न कळत मनांना समाजपरायणतेच्या दिशेने नेत असत. धावणं, पळणं, खेळणं सगळंच कुठल्यातरी संवादांना सोबत घेऊन असायचं. उन्हाळ्यात शेतात फारशी काही कामं नसल्याने दुपारच्या निवांतवेळी घरातील मोठी माणसं सोप्यात, ओट्यावर, अंगणातील झाडाखाली डुलकी घेत पडलेली असायची. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने मस्ती करायला मुक्त अंगण मिळालेलं असायचं. खेळातील गोंधळ शिखरावर पोहचायचा. दंगामस्तीने त्यांची झोपमोड झाली की, पाठीत दोन धपाटे दणकून बसायचे. घातलेल्या गोंधळाचे हे पारितोषिक असायचे. घरात गर्दी होऊन आईला घरकाम करणं अवघड झालं की, हातात झाडू घेऊन मारण्यासाठी पाठीमागे धावणं, नसेल झाडू आसपास, तर खेटर हातात घेऊन फेकून मारणं, यात कोणालाही वावगं वाटत नसायचं. यामुळे कोलाहल फारतर थोडा पुढच्या जागी सरकायचा एवढंच. मार खाऊनही आमचे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. कोलाहलाला सुमारच नसायचा. आपल्यापरीने तोही संवादाच असायचा. त्यात भांडणं, समजावणं, राग येणं, राग आला म्हणून पुन्हा समजावणं सुरु असायचं.

घरं पोराबाळांनी गजबजलेली असायची. काकाची, मामाची, मावशीची, आत्याची सगळीचं भावंड सुटीची एकत्र आलेली असायची. घराला त्यांच्या धिंगाण्याने चैतन्य लाभायचं, घरपण यायचं. संसाराचा हा मांडवभर पसरलेला वेल पाहून आजीच्या डोळ्यांमध्ये अनामिक सुखाची झाक दिसायची. आजोबांच्या सुरकुत्या पडलेल्या हाताचा पाठीवर होणारा स्पर्श संवादांना गहिरा रंग द्यायचा. घरातील मोठी ताई कुठल्या ना कुठल्या कारणाने आईबाबांना सांगेन, म्हणून धमकावत रहायची. पण बाबांचा मार पडल्यावर तिचं समजावणं, मायेने बोलणं वात्सल्याचा पोत घेऊन प्रकाटायचं. वहिनीच्या प्रेमळशब्दांना आणि ममतेने माखलेल्या प्रासादिक सहवासाला सगळ्या प्रेमळ नात्यांचा ओलावा आलेला असायचा. पण दुर्दैवाने नात्यातला हा ओलावा ओसरत चालला आहे. त्यातील ओथंबलेपण आटत चालले आहे. नितळ स्नेहाचे संदर्भ बदलत आहेत. भरलेल्या घरातलं गोकुळ हरवत चाललं आहे.

गावातल्या माणसं-बायांना काका, मामा, मावशी, आत्या बनवून निर्माण केलेली, मानलेली नाती प्रत्यक्षातल्या नात्याहून अधिक काहीतरी असायची. अडीनडीला कोणताही अभिनिवेश न धरता धावून यायची. या नात्यातील स्नेहाची परिभाषा भलेही करता येत नसेल; पण त्यांचा सहवास अनुभवताना नाती काय असतात आणि कशी सांभाळायची असतात, ते समजायचे. नाती कोणतीही असू द्यात, ती रक्ताची असोत, नाहीतर मैत्रीची; त्यांना स्नेहनिर्मित भावनिक ओलाव्याचा स्पर्श असायला लागतो. त्यांचं स्वतःचं अंगभूत मोल असतं. ती लादून कधीच निर्माण करता येत नाहीत. रक्ताची नाती निसर्गदत्त असल्याने भलेही ती निवडता येत नसतील, पण प्रेमाची नाती सहवासातून निर्माण होतात. त्यांचा रंगच वेगळा असतो. कारण त्यात एक जास्तीचा रंग मिसळलेला असतो- अंतरंगाचा. मैत्रीच्या नात्यातील गहिरे रंग असणारा कृष्ण-सुदामा हा शब्द नुसताच मैत्रीवाचक अर्थाचा द्वंद्व समास नसतो. तो मैत्रीची परिभाषा करण्यापुरता सीमित राहत नाही. परिस्थितीचे सारे संदर्भ सोडून मैत्रीच्या धाग्यांनी बांधलेलं, हे नातं संवादाची परिसीमा ठरतं.

नात्यांची अशी घट्ट वीण असणारी उदाहरणे आजही आहेत, नाही असे नाही. त्यांचे रेशीमबंधही तसेच बांधलेले आहेत. पण हे सगळं दुर्मिळ होत चाललं आहे. स्वार्थपूरित जगण्यातील बदलणाऱ्या विचाराने त्यांनाही नवे आयाम दिले आहेत. विज्ञानाने जग सुखी झालं का? या प्रश्नाचं उत्तर काहीही असो; पण काळाने माणसांना बदलांच्या वाटेने वेगळ्या वळणावर आणून उभे केले आहे. जगण्याचे संदर्भ बदललेत, तशा माणसांच्या नात्यातील प्रवासाच्या वाटाही बदलत आहेत. नात्यांचे पीळ सैल होत चालले आहेत. एकीकडे प्रगतीतून नव्यानव्या साधनांशी मैत्री होत आहे, पण निर्व्याज सहवासाचे सहज सुख कळत-नकळत हरवत आहे. नाती जपण्यासाठी केविलवाणी धडपड चालली आहे. दुरावणारी नाती सांभाळण्यासाठी माणसं धडपड करताना आणि ती तुटली म्हणून कासावीस होताना दिसत आहेत. आपापसातला संघर्ष नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतोय. प्रसंगी चार पावले मागे येत नाती सांभाळीत माणसे टिकवून ठेवण्याचा काळ खूपच मागे राहिला आहे. माणसं भौतिक सुखांवर स्वार होऊन पुढे निघून आली आहेत.

अधूनमधून नात्यातील दुराव्यातून घडणाऱ्या अघटित घटनांच्या वार्ता आपण ऐकतो. नात्यांमधील स्नेह अचानक संपून अविचाराने घडणारे वर्तनही पाहतो. पतीपत्नी हे एक तरल नातं. या नात्याचा पोतच वेगळा. मनातील चौकटींच्या बिंदूना प्रेमाने जोडणारे. सहवासातून निर्माण होणारा विश्वास, हा त्याचा पाया; पण कोणत्यातरी अवचितक्षणी त्यात संशय येतो आणि संशयाने या नात्यांच्या चौकटी दुभांगतात. वर्षानुवर्षे एकत्र राहणारी मने दुरावतात. इगो मोठे होत जातात आणि जुळलेली नाती तुटतात. पतीपत्नीच नाही, तर या नात्यांचे हात धरून आलेली दोन घरातील इतर नातीही डहाळीवरून वेगळ्या केलेल्या फुलाप्रमाणे कोमेजून जातात. तर कधी शरीरात रक्त बनून वाहणारं आईबाप नावाचं नातं वैयक्तिक स्वार्थापायी कोणाला ओझं वाटायला लागतं. मग हे थकलेलं ओझं देवाला आणि दैवाला दोष देत कुठल्यातरी वृद्धाश्रमाच्या आश्रयाला जाऊन, डोळ्यातून आसवं ढाळीत विसावतं. तेही नसेल नशिबात, तर वाट्यास आलेला देह विसर्जित करता येत नाही, म्हणून रस्त्यावर हात पसरून याचना करीत वणवण भटकत असते, परिस्थितीच्या धक्क्यांना धडाका देत. समाजात हे चित्र दिसतं तेव्हा सहृदय माणसाचा नाते संकल्पनेवरील विश्वास उडायला लागतो. आईबाप नावाचं नातं धारण करणारं अनुभवाचं अफाट आकाश अशावेळी रितं-रितं वाटायला लागतं. आईबाबांना परमदैवत म्हणणारी आणि श्रावणबाळाची गोष्ट सांगणारी संस्कृती हीच का, म्हणून संवेदनशील मनात संदेह निर्माण होतो. ‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे’ म्हणणारी, प्राणीमात्रांवर प्रेम करून त्यांच्याशी आस्थेचे नाते निर्माण करायला सांगणारी संस्कृती अशावेळी पराभूत होऊन शरणागतासारखी उभी असलेली दिसते. नाती कोणतीही असू द्यात, ती जाणीवपूर्वक जपावी लागतात. त्यांना टिकवण्यासाठी स्वतःचं मोठेपण विसरून समर्पित करायला लागते. समर्पणाशिवाय स्नेहाचा ओलावा निर्माण होत नाही. या ओलाव्याने बहरलेले नात्यांचे झाड कायम हिरवंगार असावं, म्हणून ओलाव्याच्या शोधात त्याची मुळं खोलवर जातील, तेव्हाच परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी संघर्ष करीत टिकून राहील.

4 comments:

  1. khar ahe agadi.... missing my old days of may chi sutti.... ata muana te sangun patat nahi ani ekhadi Arabian nights madhil gosht eikavi tase avishwasane aiktat...

    ReplyDelete
  2. धन्यवाद!
    माणूस कितीही मोठा झाला तरी लहान असतानाच्या आठवणी मनात चिरंजीव असतात.

    ReplyDelete
  3. lahan houn parat ekda shalet basav.........as manala nehmi vatat pn ky karnar...tas kuthe karta yeil na aata..
    kharach tya aathvani kharach chiranjiv aasata....

    ReplyDelete