Aatmaswar | आत्मस्वर

By
गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर दीपिकाच्या ‘माय चॉइस’ व्हिडीओची चर्चा सुरु आहे. अडीच मिनिटाच्या या व्हिडीओत वादग्रस्त काही आहे की नाही, हे ज्याचे-त्याचे व्यक्तिगत मत आहे. ही ध्वनिचित्रफित पाहून काहींनी त्यावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली. स्त्रीमुक्तीचा आणि सक्षमीकरणाचा आवाज मुखरित केला म्हणून जशी प्रशंशा झाली, तसे प्रतिकूल मते विरोधाचे आवाज घेऊन प्रकटले. भारतीय स्त्रीच्या वर्तनाचे हे वास्तव नसल्याचा निर्वाळा काहींनी दिला, तर काहींनी चित्रफितीतील न आवडणाऱ्या विधानांना विरोध दर्शविला. मतमतांरांचे शब्दबंबाळ ओझे सोबत घेऊन त्यावर चर्चा घडत राहिल्या. अर्थात, अशा विषयावर वैचारिक वादसंवाद उभे राहतील, मतमतांतरे घडतील याची जाणीव प्रदर्शनाआधी संबंधिताना नसेल, असे नाही. समाजात समर्थनाचे सूर असतात, तसे विरोधाचे आवाजसुद्धा असतात. लोकशाही व्यवस्थेचे एक चांगले असते. यात प्रत्येकाला आपापल्यापरीने व्यक्त होता येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हात धरून मनातील भावनांना व्यक्त करीत विचार मांडता येतात.

या निमित्ताने जगण्यातील वैचारिक मोकळेपण सोबत घेत आलेला विचार आस्थेचा आत्मस्वर बनून प्रकटला. परंपरांचा पायबंद पडलेल्या व्यवस्थेत स्वतःचे सुख शोधण्याचा हक्क नियतीने आम्हालाही दिला आहे. बंधनांच्या शृंखलांतून मुक्त होण्याकरिता मदतीच्या कोण्या हाताची आवश्यकता असण्याचे प्रयोजन उरले नसल्याचा निर्वाळा व्हिडिओतील प्रातिनिधिक आवाजातून दिला गेला. हे सगळं पाहून काहींच्या मनात संदेह निर्माण झाले. हा आवाज मुक्तीचा, स्वैरआचरणाचा की विचारातील सैलावलेपणाचा म्हणून प्रश्नांकित चर्चा ऐकायला आल्या. स्त्रीस्वातंत्र्यास अनुकूल असणारे समर्थनाच्या शब्दांना घेऊन उभे राहिले, तर हा वर्तनातील स्वैराचार असून, असं वागणं नैतिकतेच्या कोणत्याच चौकटीत बसू शकत नाही, म्हणून टीकेची झोडही उठली. मतस्वातंत्र्य असणाऱ्या व्यवस्थेत वाद, संवाद, प्रवाद असू शकतात, ते तसे असावेतही. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी आवडतील किंवा आवडाव्यात, असे सहसा घडत नाही. एखाद्या विचारात स्वीकारण्याइतपत चांगले काही असते, तसे नाकारण्यासारखेही काही असू शकते. म्हणून प्रवादांना कायम ठेवून आवडणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टींचे समर्थन, खंडन करण्यात कोणाला संदेह असण्याचं कारण नाही. प्रत्येकाला आपलं मत अभिव्यक्त करता येते. तसेच या चित्रफितीतील विचारांबाबतही असू शकते.

स्त्री संस्कृतीचे रमणीय रूप असते, असे म्हणतात. तिच्या सामर्थ्याचा सगळ्याच संस्कृतींनी मुक्तकंठाने गौरव केल्याचे आपण पाहतो. एकीकडे कर्तृत्वाच्या गाथा गाऊन, तिच्या क्षमतांवर शिक्कामोर्तब करायचे. ‘यत्र नार्यस्तु पूजन्ते’ म्हणायचे, तर दुसऱ्या बाजूला ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ म्हणून वागायचे. स्त्रियांबाबत अशा विचारांनी वागणे घडत असल्याचे पाहतो. ते सरावाचं झालं असल्याने, त्याविषयी कोणाला फार काही वाटतही नाही. पुरुषपणाला अनुकूल असणाऱ्या जगाचा हा चेहरा काही नवा नाही. जगात कोणत्याही भूमीवर स्त्रीविषयक विचार जवळपास सारखेच असल्याचे सामाजशास्त्राच्या परिशीलनाने कळते. पुरुषधार्जिण्या विचारांनी वर्तणाऱ्या जगात पुरुषप्रधानता समाजाच्या अंगवळणी पडलेली असल्याने, नेहमीच स्त्रीला पुरुषांच्या नजरेतून पाहिले जाते. स्त्री असणे हीच एक चौकट सांस्कृतिक प्रवाहाने शेकडोवर्षापासून निर्माण करून घेतली आहे. या चौकटीना भक्कम करण्यासाठी तिच्या स्त्रीसुलभवर्तनाचं कोंदण दिलं गेलं. तिचं त्याग, समर्पणादी गुणांनीमंडित असणे आयुष्य सार्थकी लागणं समजलं गेलं. सेवापरायण असणं कुटुंबासाठी अनिवार्य आवश्यकता ठरवली गेली. मातृत्वाने तिच्या स्त्रीत्वाला पूर्णतेचे नवे आयाम मिळतात, असा समज आजही कायम आहे. या सगळ्यांसोबत तिच्याठायी विनम्रता असणं कुलीन संस्कारांचे द्योतक ठरवलं गेलं. तिने काहीही केलं, तरी तिच्या आयुष्याची सगळी प्रयोजने पुरुषाशी निगडित कशी असतील, याची पद्धतशीर काळजी समाजाचे नीतिनियम तयार करणाऱ्यांनी करून ठेवलेली आहे.

पुरुषीसत्तेतून निर्मित मानसिकतेच्या विरोधात आवाज बुलंद करीत कोण्या लावण्यवतीने माझं मन माझं आहे. माझं शरीरही माझंच असल्याने त्याच्यावर कोणी हक्क सांगू शकत नाही, म्हणून समाजाला प्रश्न विचारला असेल, तर त्यात चिंता करण्यासारखे असे काय आहे? व्यवस्थेत आपलं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी तिने परंपरेच्या चौकटीना ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यात प्रश्नांकित मुद्रेने पाहण्यासारखे काही नाही. माझं अस्तित्व, माझं शरीर माझंच असल्याने, ते सजवायचं की, तसंच असू द्यायचं, कोणास समर्पित व्हायचं अथवा नाही, ही वैयक्तिक निवड असल्याचं तिचं सांगणं आव्हान वाटणारच. समाजाची रचनाच स्त्रीला दुय्यमस्थानी ठेवून झाली असेल, तर प्रतिकाराचे स्वातंत्र्यकांक्षी आवाज वातावरणात किती काळ टिकतील? या आत्ममुक्तीच्या स्वरांचा आवाज क्षीण करण्याची व्यवस्था संस्कृतीने आधीच करून घेतलेली असल्याने, प्रतिकाराचा प्रतिध्वनी फार दूरवर पोहचणे अवघड असते.

शेकडोवर्षापासून परवशतेचे पाश व्यक्तित्वाभोवती जखडले असतील, तेथे मुक्तश्वास वाट्यास येणे अवघड असते. स्त्रीचे वस्तूकरण करून तिच्यावर मालकी सांगणारा विचार परंपरेने रुजवला असल्याने त्याचा पीळ लवकर सैल होणे अवघड आहे. पुरुषाची मालकी सांगणाऱ्या अनेक निशाण्या; आजही स्त्री स्वच्छेने म्हणा किंवा परंपरेने दिल्यात म्हणून मिरवते आहे. गळ्यातील मंगळसूत्र, माथ्यावरील कुंकू, पायातील जोडवे, साखळ्या, हातातील बांगड्या- ज्यांना सौभाग्यालंकार, या गोंडस नावाने मंडित करून ही आभूषणे वापरणे, हीच स्त्री म्हणून जगण्याची सम्यक पद्धत असल्याचे तिच्या मनात रुजवले जात असेल आणि तसेच घडविले जात असेल, तर प्रतिकाराची मूळं रुजण्यासाठी अवकाश मिळतेच किती? बंधने स्वीकारावीत किंवा नाकारावीत, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असे विचारणारे आवाज समाजाचे लक्ष वेधण्यासाठी आवश्यक असतात. पण ही बंधनंच अभिमानाने मिरवण्यात धन्यता मानली जात असेल, तर त्यात प्रतीकात्मकता उरतेच किती? स्त्रियांसाठी विवाहित असण्याची ही ओळखचिन्हे, मग पुरुषांना अशी काही चिन्हे, तो विवाहित असण्याबाबत का नको? असा प्रश्न व्यवस्थेला विचारण्याचे धाडस कोणी केल्यास, तो अधिक्षेप कसा काय ठरू शकतो?

स्त्रियांची बंधमुक्ती ज्या समाजाच्या चौकटीत टीकेचा विषय होतो, तेथे सुधारणांना संधी असतेच किती? विज्ञानतंत्रज्ञानाने जगाचे वर्तनप्रवाह बदलले; पण स्त्री आणि पुरुष यांच्या प्रासंगिक वर्तनातील संगती पूर्णांशाने लागली आहे, असे दिसत नाही. शिक्षणाने ती साक्षर झाली असेल; पण स्वतंत्र झाली काय? तिच्या विचारांचे आकाश विस्तारले. घराबाहेर पडून अर्थार्जनाचे चक्रही ती फिरवू लागली; पण अशा किती स्त्रिया आहेत, ज्या हे सगळं करूनही परंपरेच्या शृंखलांतून मुक्त झाल्या आहेत. ‘माझं घर माझा संसार’ या चौकटीतूनच ती आजही स्वतःचा शोध घेते आहे. ती मुक्त झाली असे वाटत असेल; पण ही मुक्तताच तिला पुन्हापुन्हा त्याच त्या वर्तुळावर आणून उभी करते. परिस्थितीवश काही अपवादांना आपलं सामर्थ्य सिद्ध करायची संधी मिळाली, त्या व्यवस्थेच्या शीर्षस्थानी जाऊन पोहचल्या; पण बहुसंख्य आहेत तेथेच आहेत. त्यांच्या ललाटी अंकित झालेल्या कष्टाच्या गाथा काही सुखात रुपांतरीत होत नाहीत.

स्त्रीचं दिसणं तिच्या असण्याशी नेहमीच जोडलं गेलं आहे. तिचं गौरवर्णांकित असणं, चाफेकळीगत नासिका, कृशकटी इत्यादी, इत्यादी असणं आणि या सगळ्या सौंदर्यखुणांना मिरवणारा सुडौल बांधा असणं, ही जणू अनिवार्यता असते. जेव्हा तिच्या देहाच्या आकारात तिचं स्त्रीपण शोधलं जातं, तेव्हा तिचे स्वतःचे अस्तित्व तिच्यासाठी उरतेच किती? सोबतीच्या कोणातरी पुरुषाच्या नजरेतून ती साकार होत असते. सौंदर्याची परिभाषा समजून तिने वर्तावे, अशीच अपेक्षा असते. चित्रपट, मॉडेलिंगसारख्या क्षेत्रात तर तिच्या अटकर बांध्याशी तिच्या बाईपणाचे सगळे संदर्भ जुळलेले दिसतात. तिथे तिचे असणे महत्त्वाचे नाही, तर दिसणे महत्त्वाचे ठरते. वर-वधूसूचक जाहिरातींमधील वधू आजही गौरवर्णांकित, सुस्वरूप, सुंदर, गृहकृत्यदक्ष अशीच असते. पुरुष गृहकृत्यदक्ष, प्रेमळ, समजूतदार असावा, याची आवश्यकता नसतेच का? नसावी, कारण संस्कृती स्त्रीच्या सौंदर्याची परिभाषा करते, त्याच पट्टीत तिने स्वतःला फिट्ट बसवायचे, दिसायचे आणि वागायचेसुद्धा. मुक्तीचे मोकळे श्वास घेण्यासाठी काही आवाज प्रातिनिधिक स्वरुपात अशा निमित्ताने स्पंदित होत असतील, तर तो परिवर्तनाचा स्वतःपुरता प्रारंभ का ठरू नये? आत्मभान आलेले काही मोजके आवाज फारतर असे म्हणू शकतात; पण बहुसंख्य स्त्रिया परंपरेचे जोखड सोबतीला घेऊन अद्यापही संघर्ष करीत गाव-वस्ती, वाड्या-पाड्यावर झगडत आहेत; कधी दैवाला, तर कधी वाट्यास आलेल्या स्त्रीदेहाला दोष देत. मुक्ततेसाठी व्यवस्थेच्या भक्कम भिंतींवर आघात करीत आहेत. तरीही तिच्या ललाटी लिहिलेले दुय्यमत्त्वाचे अभिलेख आहेत तसेच आहेत.

मला आठवते, आमच्या गावात येणारा मुख्यरस्ता पारासमोरून आहे. पारावर आजही बरीच मंडळी विसावलेली दिसते. तेव्हाही असेच असायचे. शेतातातून किंवा आणखी कोठून असेल, या रस्त्याने गावात येणाऱ्या महिला पायताण हाती घेऊन अनवाणी पायांनी चालत यायच्या. माझी आजी, माझी आई अशाच चालत येताना मी पाहिल्या आहेत. तेव्हा मनात एक प्रश्न यायचा, पुरुष मंडळी हाती पायताण घेऊन काही चालत येत नाहीत, मग महिलांनाच अशी सक्ती का? आईला, आजीला तसे विचारले, तर त्या सांगत, ‘पारावर गावातील नात्यागोत्याची, मोठ्या मानमरातबाची माणसे बसलेली असतात, त्यांच्यासमोर असं उद्धटासारखं कसं चालायचं आणि हीच तर आपली परंपरा आहे.’ खरंतर त्यांना त्याचं वाईट वाटत होतं की नाही, माहीत नाही; पण कदाचित त्यांनी आपली मानसिकताच तशी घडवून घेतली होती. आजही कदाचित कुठे असे घडत असेलही, माहीत नाही. गावात प्रवेशताना लेकीसुना डोक्यावर हातभर पदर घेऊन, दबकत चालताना दिसत असतील, तर याला परिवर्तन वगैरे कसं म्हणावं? याला मोठ्यांचा आदर वगैरे म्हणावं, तर मग मोठ्यांनी त्यांचं मोठेपण थोडं नजरेआड करून का वर्तू नये? पण तसं होणार नाही, कारण पुरुषांनी सर्वत्र असावं स्त्रीने मात्र कुठेच नसावं, हा विचार वागण्यात घट्ट रुजला आहे, तो इतक्या लवकर जाईलच कसा.

या व्हिडीओतील मतांबाबत वादप्रवाद असू शकतात, नव्हे ते असावेतही. शब्दांच्या, विचारांच्या साचेबद्ध चौकटीतून संस्कृती बंदिस्त करता येत नाही. स्वातंत्र्याचा संकोच जितका संस्कृती विकासाला मारक, तेवढाच स्वैराचारही घातक असतो. समाजाचं जगणं निरामय असण्यासाठी नियमांची शृंखला तयार करावी लागते. माणसांचे परस्पर संबंध निकोप असावे लागतात. विचारांच्या पातळीवर हे जेवढे सत्य आहे, तेवढेच अन्य बाबतीतही. विवाहपूर्व, विवाहोत्तर संबंधाबाबत या व्हिडीओतील मत वैयक्तिक बाब झाली. अर्थात, तोही स्वातंत्र्याचा भाग आहे. ज्याला जसं जगायचं असेल, तसं जगण्याचं स्वातंत्र्य त्याला असतंच ना! कोणी काय घ्यावं, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि हे समजण्याइतपत समाज विचार करू शकतो.

एकीकडे समतेच्या वार्ता करीत स्त्री-पुरुष समानतेचे नगारे वाजवायचे; पण एखादे वास्तव असे अचानक समोर आले की, त्यापासून लांब का पळायचे? समाजात सगळंच आलबेल चाललेलं असतं असंही नाही. नजरेआडचं वास्तव वेगळंही असू शकतं. समाजात वागण्याच्या पद्धतीत कालोपघात बदल घडवावे लागतात. बदलांना सर्वसंमतीचा अर्थही असायला लागतो. व्यवस्थेत राहूनच बदल करायचे असतात. व्यवस्था प्रयत्नपूर्वक घडवावी लागते. घडणीचा हा काळ कधीच लहान नसतो. त्याची वाटचाल अव्याहत सुरूच असते. कालपटावरील सादप्रतिसाद, क्रियाप्रतिक्रियांचे संगीत समाजाचे जगण्याचे सूर संपन्न करीत असते. ज्याने-त्याने आपल्या विचारांची एक तार छेडून त्यातून आपला सूर शोधायला हवा. समाज अनेक सुरांनी सजलेली विचारांची मैफल असते. ती कधी रंगते, कधी दुभंगते, तर कधी भंगतेही. असं दुभंगलेपण सांधण्यासाठी नव्या विचारांची, दिशांची आवश्यकता असते. ती विचारातून आणि संवादातून स्थापित करावी लागते, एवढंमात्र नक्की.

0 comments:

Post a Comment