Avakali | अवकाळी...

By // No comments:
हिवाळ्यातील गारव्याला निरोप देत ऋतू सावकाश कूस बदलतो. वातावरणातला हवाहवासा गारवा जाऊन मार्च महिना येतो, तो सूर्याच्या तापदायक किरणांना सोबत घेऊनच. बोचऱ्या थंडीने निरोप घेतलेला असतो. जगाचे दैनंदिन व्यवहार नियत मार्गाने सरू असतात. उन्हाच्या तीव्रतेवरून यंदाचा उन्हाळा कसा असेल, याचे काही आडाखे बांधले जातात. खरीपाचा हंगाम कधीच आवरून झालेला असतो. रब्बीची स्वप्ने परिपक्व होऊन एकत्र साकोळण्याचा समय समीप आलेला असतो. समृद्धीचे माप पदरी टाकण्यासाठी लक्ष्मी शेतकऱ्याच्या घराकडे निघालेली असते. बारोमास राबणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे तिच्या आगमनाकडे लागलेले असतात. निदान वर्षभर जगण्याएवढी संपन्नता घरी येत असल्याचा आनंद मनात जागा झालेला असतो. स्वप्ने मातीच्या कुशीत रुजवण्यासाठी घेतलेले कष्ट फळाला येण्याची खात्री असते. पतपेढ्यांचे, सावकाराचे कर्ज उतरवून उरलेच चार पैसे गाठीला अधिक, तर मुलामुलींचं लग्न उरकून घ्यायचं असतं. नसेल हे जमत तर चार खणांच्या घराचं थोडं का होईना, रूप पालटता आले तर घ्यावे पालटून असा विचार मनात घर करीत असतो. कारभारणीसोबत संसाराच्या सुखवार्ता करण्यात कारभारी विसावलेला असतो. मनातील स्वप्नांचे रंग आस्थेच्या क्षणांना घनगर्द करीत असतात. अंतरंगातून उमलणाऱ्या भावनांना संवेदनेचा मोहर यायला लागतो. स्वप्नांमध्ये रममाण होऊन जगण्याची उमेद माणूस बांधत असतो. आणि... एक दिवस सारं होत्याचं नव्हतं होतं. हातातोंडाशी आलेला घास दैवाच्या खेळाने विखरून जातो.

मनात साकोळलेली इंद्रधनुष्यी स्वप्ने करपतात. नियतीच्या एका फटक्यानं सारी राखरांगोळी होते. मागे उरतात खिन्न, उदास अस्वस्थतेचे भग्न अवशेष. स्वप्नांचा असा अचानक चुराडा होताना जगण्याला काळाची नजर लागते. जीवनाचे सारे रंग क्षणात पालटतात. मागे उरतो परिस्थितीच्या हताशेचा भयाण अंधार. जीवनाला व्यापून टाकणारा, तरीही थोडासा मागे उरणारा. हरवलेली स्वप्ने, विखुरलेले जीवन घेऊन अंधारवाटेने चालायचे असते. आशेच्या किरणाच्या शोधात. हाती आलेल्या कवडशाच्या साक्षीने लख्ख प्रकाश शोधायचा असतो. पावलापुरत्या उजळलेल्या वाटेने चालत येणारी स्वप्ने मनपटलावर गोंदवून पुन्हा काळ्याआईच्या कुशीत रुजवायची असतात. आसपास दैवाने केलेल्या पराभवाच्या खुणा दिसत असतात. त्यांचा मागोवा घेत चालणे प्राक्तन बनते. उसवलेल्या जगण्याला टाके घालण्यासाठी तो उभा राहतो. दैवाला आणि देवालाही आव्हान देत.

सन्मानाने जगण्यासाठी झगडणाऱ्या साऱ्यांनाच नियतीने नेमून दिलेल्या परीक्षेला सामोरे जावेच लागते. या परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतील, असेही नाही. नाही उत्तीर्ण होता येत काहींना दुर्दैवाने. सत्व पाहणाऱ्या प्रवासात थकतात ते हरतात. हरले म्हणून थांबतात अन् थांबलेले परिस्थितीच्या आघाताने विखंडित होऊन संपवून घेतात. संपणाऱ्यांप्रती हळहळ व्यक्त करणारे चार शब्द ऐकायला येतात. नियतीच्या क्रूर आघातातून जीवनाची अवकाळी सांगता झाल्याने समाजमनातून राग व्यक्त होतो. धुमसणारा असंतोषाचा वणवा कालौपघात कमी होत जाऊन स्वभावानुरूप विस्मरणात जातो. नव्हे विसरावाच लागतो, कारण संघर्ष केल्याविन जीवनयात्रेची सफल सांगता कुणालाच करता येत नसते. नियतीने दिलेले दान पदरी घेऊन जगण्याचा शोध घेण्यासाठी माणसं मुकाटपणे चालतात. मनाचीच समजूत घालतात. आजचा दिन आयुष्याला मातीमोल करून गेला; पण निदान येणारा उद्याचा दिवस तरी जीवनात सफलतेचे रंग भरणारा असेल.

नानाविध रंगानी धरतीला नटवून मोहरलेपण देणाऱ्या वसंताचे आगमन निसर्गातील सर्जनाचा साक्षात्कार असतो. धरती सर्वांगाने फुलून येण्याचा खरंतर हा ऋतू. अनंत रंगानी नटून धरतीने साजशृंगार करण्याआधीच अवकाळी पावसाने आणि गारपिटीने सप्तरंगी छटांना अवकळा आणून रंगाचा बेरंग केला. मागे उरला निराशेचा उदास, भकास विसकटलेला रंग. मार्च महिना गारपिटीचे दुर्दैवी दान सोबत घेऊन आला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. वैभवाने झुलणारी, डुलणारी शेतं उध्वस्ततेची अवकळा घेऊन विखुरली. भग्न अवशेष सांभाळीत उभ्या असलेल्या वास्तुसारखी उदास दिसायला लागली. रात्रंदिन राबून, उधार उसनवार घेऊन, कर्ज काढून फुलवलेले मळे, शेतं उजाड झाली. पिकं गारांनी झोडपून काढली. लाखमोलाचं धन घेऊन उभ्या असणाऱ्या धरतीच्या देहावरील रया पार लयाला गेली.

राजाने छळले, नवऱ्याने मारले, पावसाने झोडपले, तर दाद कुणाकडे मागायची असं म्हटलं जातं. नवऱ्याने मारले तर कायद्याने प्रश्न सुटू शकतो. राजा, राजपाट कालौघात संपले आहेत. त्याऐवजी शासन नावाची व्यवस्था माणसांनी उभी केली. ती चुकत असेलतर लोकमताच्या रेट्याने तीही बदलता येते. पण पावसानं झोडपलं तर दाद मागायची कुठे? अस्मानी संकटांचा दावा कुठल्या न्यायालयात दाखल करायचा? नशिबाला दोष देणं, हा एकच पर्याय परिस्थितीने विकलांग केलेल्यांच्या हाती उरतो. पण हाच एक उपाय आपल्या हाती असतो का? की शासनव्यवस्थेकडे मदतीकरिता पाहणे हाही एक उपाय असतो.

गारपीट माणसांना तशी काही नवीन नाही. या आधीही अस्मानी संकटे शेतकऱ्याने अंगभूतबळावर, आंतरिक इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर परतवून लावली आहेत. संकटांनी तो कोलमडला असेल; पण कोसळला मात्र कधीच नव्हता. गारपिटीने मात्र त्याला भुईसपाट केला. पुन्हा उठून उभं राहण्याइतकंही त्राण त्याच्याठायी राहू दिले नाही. गेल्या चाळीसपन्नास वर्षात माझ्या पिढीने एवढी गारपीट पाहिल्याचे, निदान मला तरी आठवत नाही. कुटुंबासोबत शेती कसताना माझ्या शेतकरी घराला कधीही एवढी हताशा आल्याचे दिसले नाही. संकटे आली नाहीत, असे नाही. संकटांशी दोन हात करीत माणसं पुन्हा नव्या जिगीषेने उभी राहिली आहेत. आस्थेचा कणा ताठ ठेऊन जगण्याचा आणि जीवनाचा नम्र शोध घेत राहिले आहेत.

काही दिवसापूर्वी गावी फोन करून आईला गारपिटीच्या संदर्भात विचारले. ती म्हणाली, “सारं होत्याचं नव्हतं झालं रे बाबा! उजाड शेतं आणि उध्वस्त पिकं तेवढी हाती शिल्लक राहिली आहेत. काय करावं, काही कळत नाही? माणसानं खावं काय आणि जगावं कसं? माणसं एकवेळ सावरतील कशीतरी; पण मुक्या जित्राबांचेही पार हालहाल केले या गारपिटीने. कुण्या जन्माचे भोग बघायला लावले दैवाने कोण जाणे?” आईच्या शब्दातील वेदना मनाला अस्वस्थ करीत होती. स्वतःला सावरत म्हणाली, “माझं नशीब त्यातल्या त्यात बरं म्हणावं लागेल. पोरं थोडं का होईना पोटापुरती कमावती आहेत. मिळतील चार घास खायला. खातील कोंड्याचा मांडा करून. पण बाकीच्यांचं काय? ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांनी करावं काय? हातातोंडाशी आलेला घास देवानं असा हिरावून घ्यावा. त्यांनी कुणाचं काय बिघडवलं होतं?” शेतीशी असणाऱ्या पिढ्यानपिढ्यांच्या नात्यावरच आघात झाल्याचं दुःख आईच्या शब्दातून प्रकटत होते. निराश, हताश बोलण्यातून अवकाळी उध्वस्त झालेल्यांच्या ललाटी नियतीने लेखांकित केलेल्या असाहय दुःखाची ठसठसणारी वेदना जखम बनून शब्दातून वाहत होती. व्यक्तीच दुःख हेच समष्टीचं दुःख असतं, असं मानणारं मन हळहळणाऱ्या शब्दांतून व्यक्त होत होते.

बाकीच्यांचं काय? हा केवळ एक प्रश्न नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधणं इतकं सोपंही नाही. संकट अस्मानी असलं, ते कोणाच्या हाती नसलं, तरी ते भीषण आहे. दारूण पराभव करणारे आहे. संकटातून सावरण्यासाठी माणसांना उमेदीने उभं करावं लागेल. उभं करण्यासाठी मदतीचे हात पुढे यावे लागतील. शासन काही करेल, या अपेक्षेवर थांबून कसे चालेल? शासन आपल्या स्तरावरून यथास्थित प्रयत्न करेल. विझलेल्या चुली पेटवण्यासाठी इंधन मिळेलही; पण विझलेल्या मनांना प्रदीप्त करण्यासाठी मदतीची फुंकर घालावी लागेल. कोसळलेली घरं, उडालेली छप्परं पुन्हा आपल्या पायावर उभी करण्यासाठी उमेद जागी ठेवावी लागेल. त्याआधी माणसांच्या मनाचा पाया मजबूत करावा लागेल. त्याच्या मनातील उमेदीच्या, आस्थेच्या, आशेच्या अंकुरांना अंकुरित करण्यासाठी जाणीवपूर्वक जोपासना करावी लागेल. शेतकऱ्यांच्या शेतातील हानी मोठीच; पण मनावर झालेल्या आघाताची हानी त्याहून प्रचंड आहे. त्याचं मन येणाऱ्या उद्याची चिंता करणाऱ्या प्रश्नांच्या, समस्यांच्या गुंत्यातून मोकळं झालं, तर आयुष्यात येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्याइतके बळ मिळेल. गारपिटीच्या आघातातून कोलमडलेल्या जिवांना सावरण्यासाठी समाजाने पुढे येणे परिस्थितीची अनिवार्यता आहे. संवेदनशीलता आपल्या संस्कृतीचं लेणं आहे. संवेदनशील माणसांच्या संवेदनांवर समाज सजतो, सावरतो आणि वावरतोही. कोणा एकास फार मोठी मदत करणं अवघड आहे. पण अनेकांची थोडीशी मदतही मोठं काम करू शकते. लोकांचा फार छोटा त्यागही खूप मोठं काम करू शकतो. यावर विश्वास ठेऊन प्रयत्न करायला लागतील. कणाकणाच्या संचयाने मण होतो, थेंबा थेंबाने सागर भरतो. सर्वस्थळी, सर्वकाळी परिस्थिती काही आहे तशीच राहत नसते, ती परिवर्तनशील असते. शेतकरी उभा राहिला, तर त्याच्यासमोरचे सारेच प्रश्न संपतील असे नाही. निदान काही प्रश्न तरी थांबतील.

जगण्यात आलेल्या हताशेतून एखादा संवेदनशील शेतकरी हाय खाऊन जीवनयात्रा संपवतो. त्याच्यापुरत्या प्रश्नांच्या गुंत्यातून तो मोकळा होतही असेल; पण त्याच्या पश्चात कुटुंबियांच्या वाट्याला येणाऱ्या रोजच्या मरणयातनांचे काय? अवकाळी मरणातून कोणतेच प्रश्न कधी संपलेले नाहीत आणि सुटतही नाहीत. त्यातून आणखी दुसरे जटिल प्रश्न निर्माण होतात. अवकाळी मरणयात्रा थांबविण्यासाठी व्यवस्था काय करते आहे, असा प्रश्न बऱ्याचदा समाज विचारतो. समोर उभ्या राहणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही. ती मिळतात का? हाही एक प्रश्नच आहे. संकटाना थांबविण्यासाठी व्यवस्था प्रयत्नशील असूनही, पदरी निराशाच का येत असावी? यामागच्या कारणांचा शोध कुणी, कसा, कुठे घ्यावा? उत्तरे शोधावी कुणी आणि कशी?

स्वातंत्र्य संपादनाच्या सदुसष्ट वर्षात देश बदलला आहे. जगातलं एक प्रभावशाली राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याएवढा. पण देशात राहणाऱ्या साऱ्यांचा प्रभाव वाढला आहे का? ज्याच्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा आहे त्यांनी सर्वत्र असावं; पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही त्यांनी कुठेच नसावं का? शेतातून येणारे उत्पन्न वाढले. हरितक्रांतीने, श्वेतक्रांतीने कृषीक्षेत्राचा कायापालट झाला. अन्नधान्य उत्पादनाबाबत देश स्वयंपूर्ण झाला; पण देशातील किती शेतकरी स्वयंपूर्ण वगैरे झाले? काही थोड्यांच्या जीवनात समृद्धीचा वसंत फुलाला असेल. ते प्रगतीशील वगैरे झाले असतील, फार्महाउसचे मालकही असतील. पण बहुसंख्य- ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडा नावालाच आहे, त्यांनी फार्महाउसची हौस करावी तरी कशी? दोनचार एकर जमिनीच्या तुकड्यावर त्यांनी जगावं कसं? कुटुंबाला जगवावं कसं? शासन शेतकऱ्यांसाठी काही करीत नाही, असे नाही. पण केलेले त्यांच्याकडे पोहचेपर्यंत फार काही उरत नाही, अशी भावना समाजात वाढत आहे. असं चित्र समोर दिसत असेल, तर शेतकऱ्यांच्या अभ्युदायाच्या वाटा उजळून निघतील तरी कशा? स्व. राजीव गांधींनी पैशाला फुटणाऱ्या वाटांबाबत केलेल्या विधानाचा आम्ही गांभीर्याने कधी विचार केला आहे का? विकास वाटेवर पाठविलेल्या पैशाला वाटा, आडवाटा, पायवाटा फुटणार असतील, तर विकास म्हणजे आक्रोडाचे फूल असे कोणास वाटल्यास नवल वाटू नये. कल्याणकारी राज्यात सर्वांचे कल्याण अभिप्रेत असताना फक्त काहींचे कल्याण होणे, हा परिस्थितीचा विपर्यास नव्हे काय?

ग्रामीण परिसरापर्यंत विकासाच्या वाटा पोहचल्या नाहीत, असे नाही. अन्यक्षेत्रातील प्रगतीसोबत शेतीक्षेत्राचीही प्रगती झाली आहे; पण तरीही शेतकरी प्रसन्नतेच्या भावनेतून शेती व्यवसायाकडे का पाहत नाही? आज शेती कसत आहेत, त्यांना जाऊन विचारा, या व्यवसायात तो किती संतुष्ट आहे. यातील बहुतेक शेतीला रामराम ठोकण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसेल. कितीही राबा मातीतलं जीवन मातीमोल असल्याची खंत मनातला सल बनून, त्यांच्या बोलण्यातून प्रकटते. ज्यांच्याकडे खूप शेती आहे, त्यांच्या घरांचे पालटलेले रूप, धान्याच्या पडलेल्या राशी, दूधदुभात्याने भरलेले गोठे, अंगणात उभी असणारी वाहने, हे प्रगतीचं सार्वत्रिक चित्र नाही. कुडाच्या सारवलेल्या भिंती, धुरानं कोंदटलेले छप्पर, दाराशी असणारी चारदोन जित्राबं आणि छतातून गळणाऱ्या पावसाच्या पाण्यासह मनातलं गळणारं अवसान सावरत उभा असणारा विकल चेहराच नजरेसमोर दिसतो. रात्रंदिन उरस्फोड मेहनत करूनही श्रमाचं पुरेसं मोल मिळत नाही, ही त्याची खंत. खिशात खुळखुळणाऱ्या पैशातून आलेल्या प्रासंगिक समृद्धीने ब्रॅन्डेड वस्तूंचा तोरा मिरवणारे एकीकडे, तर दुसरीकडे जगण्याचा कोणता ब्रॅन्ड नसलेलं जगणं. कोंड्याला मांडा आणि निद्रेला धोंडा, असं जगणं सोबत घेऊन परिस्थितीशी धडका देत माणूस उभा आहे. उजाड झालेल्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आशेचे कोणतेही ओअॅसिस दमलेल्या जिवांना दिसू नये का?

जगण्यासाठी भटकंती आणि कर्जासाठी भिक्षांदेही, हे प्रत्येक हंगामाआधी दिसणारं दृश्य. घेतलेलं कर्ज डोक्यावरून उतरवता आले नाही, म्हणून कोणीतरी अवकाळी जीवनसांगतेचा पत्करलेला मार्ग गारपिटीच्या पावसापेक्षा मोठी आपत्ती आहे. पावसाच्या तडाख्यातून माणसं एकवेळ कशीतरी सावरता येतीलही; पण ज्याचं जीवनच निराशेच्या आवर्तात आवरलं गेलं, त्याचं काय? त्यांच्या परिवाराचे काय? हा टोकाचा मरणपथ निवडताना काहीच विचार जाणाऱ्याच्या मनात येत नसतील का? त्याची लेकरंबाळं, त्याची सहचारिणी डोळ्यासमोर दिसत नसेल का? त्याचं मन परिवाराप्रती असणाऱ्या आसक्तीच्या, प्रेमाच्या बंधांनी बद्ध होत नसेल का? जेव्हा जीवनावरील आसक्तीपेक्षा, प्रेमापेक्षा जगण्यासाठी टिकून राहण्याचे प्रश्न अवघड होतात, आसक्तीचे पाश तटातटा तुटतात. उसवलेल्या जगण्याचे सगळे पीळ सैल होतात. जीव तुटतो तो मागे राहणाऱ्यांचा. भोग भोगावे लागतात मागे राहिलेल्यांना. केवळ पंचवीसतीस हजाराच्या कर्जाची धास्ती घेऊन जीवनयात्रा संपवतात. तेव्हा कुठेतरी भोजनावळीच्या हजाराच्या, लाखालाखाच्या पत्रावळी उठत असतात. अशा परिस्थितीला आपण देशाचा समतोल विकास वगैरे झाला, असं म्हणावं काय? काहींच्या वाट्याला सगळंच काही असावं आणि काहींच्या वाट्याला जगण्याइतपत पाशसुद्धा नसावेत का?

माणसाच्या जीवनात प्रश्न कालही होते. आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. मात्र प्रश्नाचं रूप पालटलं आहे. देशाचं दरडोई उत्पन्न वाढलं, पण दरडोई संवेदनशीलता कमी होत आहे. मला काय त्याचं, हा संकुचित विचार जगण्याचा संपन्न विचार असू शकत नाही. खिशात खुळखुळणारा पैसा आणि त्याच्या आवाजाने वेडावणारे मन, म्हणजे सगळंच काही असत नाही. बंगला, गाडी, माडी यातच सौख्य सामावलं असेल, तर भारत माझा देश आहे. सारे भारतीय बांधव आहेत, ही प्रतिज्ञा शाळेत शिकण्यापुरती आणि अर्थाशिवाय पाठांतरापुरतीच उरते. पुस्तकातलं जेव्हा मस्तकात उतरतं तेव्हाच जगणं संपन्न होतं. स्वतःभोवती सुखाचे वर्तुळ आखून त्यातल्या वलयांकित प्रगतीलाच विकास समजणं, वसुधैव कुटुंबकम् या विचारधारेशी प्रतारणा नाही का? दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होणारी माणसं आपल्या आसपास नाहीत, असे नाही. शेकड्याने आहेत, पण त्यांच्या संवेदनांनी कितीही प्रयत्न केला, तरी आजूबाजूच्या वेदना कमी होऊन-होऊन किती कमी होणार आहेत? कमी करता याव्यात, म्हणून साऱ्यांनी थोडंतरी संवेदनशील होणं आवशक नाही का?

एखाद्या गोष्टीविषयी नुसती सहानुभूती असून चालत नाही. तिची अनुभूतीही असावी लागते. अनुभूतीशिवाय सहानुभूती विफल असते. माझा चौफेर विकास जरूर व्हावा. पण थोडा का असेना इतरांसाठीही तो असावा, असा विचार करून वर्तने हीच जगण्याची खरी श्रीमंती आहे. अशा जगण्याचे संस्कार कोणत्याही संस्कृतीचं संचित असतं. अशा संचिताची आपल्या देशात कमी नाही. आवश्यकता आहे, परिघाबाहेरच्या उपेक्षित जगाला आपल्यात सामावून घेण्याची. आपले वर्तुळ आणखी मोठे करण्याची. ज्यात माझ्यासह इतरांचं जगही सहज सामावेल एवढं. नसेल कोणी करीत तर मी तसे करीन, असं म्हणणाऱ्या उमद्या मनाची. गरज आहे समाजपरायण विचारांना अंगीकृत कार्य म्हणून स्वीकारण्याची. उदात्त विचारांना कृतिरूप देण्याची. आपल्या जगण्याचं वर्तुळ आणखी व्यापक करण्याची. कारण विश्वाच्या वर्तुळातून माणूस वजा केला तर मागे काय उरेल? या प्रश्नाचं उत्तरही एक मोठं वर्तुळ हेच असेल. प्रत्येक माणसाला हे ठाऊक आहे. उत्तर शोधण्याच्या पायऱ्या प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या, तरी अंतिमतः भोवतालच्या वर्तुळाला विश्वरूप देणारा एकच एक घटक विद्यमानकाळी विश्वात आहे, तो म्हणजे माणूस. माणसाइतकं विश्वात काहीही सुंदर नाही आणि त्याच्याकडे असणाऱ्या संवेदनांतून प्रकटलेल्या माणुसकीहून रमणीय काहीही नाही.

Guruji | गुरुजी...

By // 2 comments:
गुरुजी तुम्ही सुद्धा!

आठ आणि नऊ मार्चच्या वर्तमानपत्रात बातम्या- शिक्षकांनीच मांडला जुगाराचा डाव. तरुण शिक्षिकेने पळविले नववीत शिकणाऱ्या प्रियकराला. चौऱ्याण्णव टक्के शिक्षक टीईटी परीक्षा नापास. उत्तरपत्रिका मासकॉपी केल्यामुळे सील. अर्थात या बातम्यांचा एकमेकांशी संबंध काय? असा प्रश्न आपल्या मनात उदित होणं तसं स्वाभाविक. उगीच काहीतरी बादरायण संबंध जोडला जातोय, असं आपल्यापैकी काहींना वाटण्याची शक्यता आहे. तसं म्हटलं तर संबंध आहे, म्हटलं तर नाहीही. कारण या सगळया बातम्यांमध्ये एक घटक कॉमन आहे, तो म्हणजे ‘शिक्षक.’ आता तुम्ही म्हणाल, मग काय झालं एवढं यात, माणसं शिक्षक असत नाहीत का? नाही, तसं काही नाही! पण बातम्यांचे विषय वाचल्यानंतर, त्यातील आशय नीट समजल्यावर एक कळते की, समाज अशा बातम्या वाचून काय म्हणत असेल? शिक्षकांविषयी, शिक्षकपेशाविषयी कोणता विचार करीत असेल? याचं उत्तर मिळणं बातम्यातील आशयावरून अवघड आहे, असं नाही. ‘गुरुजी तुम्ही सुद्धा...!’ अशी भावना समाजाच्या अंतर्यामी निर्माण होत असेल का? कदाचित हो! कदाचित नाहीही!

सांगायचा मुद्दा हा की, तीन चार दिवसापूर्वी आम्ही काही शिक्षक शिक्षकदालनात ऑफ तासिकेला थोडे विसावलो होतो. त्या दिवसाचे वर्तमानपत्र हाती घेऊन संबंधित बातमी वाचीत एक शिक्षक आपलं मत व्यक्त करीत म्हणाले- खरंतर बातमी त्यांनी आधीच वाचली होती. “सर, आतापर्यंत मुलांमुलींमधील वाटणाऱ्या स्वाभाविक आकर्षणाने निर्माण होणाऱ्या गुंत्यांची, प्रश्नांची उत्तरे आपण शोधीत होतो. त्यांना चारित्र्य, प्रतिष्ठा, मान, सन्मान वगैरे मूल्यांच्याबाबत उपदेशांचे डोस देऊन घडवीत होतो. आता तर कहरच झाला हो! शिक्षिकाच मुलास- जो तिचा विद्यार्थी आहे, त्यास सोबत घेऊन पलायन करायला लागली.” त्यांचं म्हणणं पूर्ण व्हायच्या आत दुसरे एक शिक्षक बोलते झाले, “अहो सर, तेही स्वाभाविक आकर्षणच आहे ना हो!” “हो, स्वाभाविकच आहे; पण निदान त्यांच्या वयाचा, त्यांच्यातील नात्याचा, आपल्या व्यवसायाचा विचार तरी करायचा की नाही, या बयेने? या कृतीने निर्माण होणाऱ्या प्रश्नांची, होणाऱ्या परिणामांची तमा बाळगायची की नाही? उठले. निघाले. आणि पळाले. अहो, हा शुद्ध अविचार आणि नैतिक अधःपतनाचा कळस झाला!” पहिले शिक्षक मनातील राग व्यवस्थेवर काढू लागले. चर्चेला विषय मिळाला. शिक्षक दालनात बसलेले सगळेच शिक्षक आपापल्या आकलनानुसार शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, समाज, नैतिकता; असे काहीसे विषय घेऊन प्रबोधनात्मक विचार मांडू लागले. 

एक शिक्षक- जे एवढ्या वेळेपर्यंत सुरु असलेली चर्चा ऐकत होते; ते म्हणाले, “अहो, आपल्या ज्ञानाची टक्केवारी जेमतेम पाचसहा टक्के असल्यावर, नैतिकता शंभर टक्के कशी असेल?” अर्थात त्यांचे विधान टीईटीच्या निकालाच्या बातमीचा संदर्भ घेऊन असल्याने, त्यातही त्या निकालावर कदाचित त्यांचा राग असावा. कदाचित आणखी काही कारणे, प्रयोजनेही असू शकतील. “टीईटीच्या निकालांवर  शिक्षकाची नैतिक गुणवत्ता कशी काय मोजता सर तुम्ही?” म्हणून काही प्रश्नांचे बाण एकदम चहूबाजूने त्यांच्या अंगावर यायला लागले. बिचारे, त्यांचा सामना करता करता पुरते घायाळ! “गुण आणि गुणवत्ता कशी काय सिद्ध कराल? गुणांसाठी प्रश्नांच्या पट्ट्या तुम्ही लावाल; पण कमी गुण असणारे माणसं गुणवान नाहीत काहो, सर!” एका शिक्षकांनी सरळसरळ त्यांनाच प्रश्न विचारला. मत मतांतरांचा गलबला आता चांगलाच वाढत चाललेला. प्रत्येकाची मते वेगळी, प्रश्न वेगळे, विचार वेगळे, विचारधारा वेगळी. एकेक मते चर्चेत समोर येत होती. त्यावरील क्रिया प्रतिक्रियांनी माहोल चांगलाच रंगत चालला होता. पण एकाबाबतीत ही सारी शिक्षक मंडळी चर्चेच्या शेवटी एकमत झाली, ती म्हणजे वैयक्तिक स्वार्थापायी काही ठिकाणी शिक्षणव्यवस्था प्रश्नचिन्हांच्या संगतीत आणि अविचारांच्या पंगतीत बसली आहे.

वर्तमानपत्रातून अशा बातम्या एकामागे एक येणं आणि त्या बातम्यांचा केंद्रबिंदू शिक्षण, शिक्षक असणं हा योगायोग की, चर्चेतील म्हणण्याप्रमाणे खरंच शिक्षकांच्या नैतिकतेचा टक्का घसरतोय? शिक्षकाच्या नैतिकतेचा टक्का घसरतो आहे, असं म्हणणं ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अनुभवाचा भाग झाला. क्षणभर गृहीत धरूया, तो घसरला असेलही; पण समाजात सगळचं काही वाईट घडत आहे, असे नाही. या बातम्या येणं अपघात समजू या! पण हेही सत्य आहे की, अपघात म्हणून सगळेच प्रश्न काही सुटत नसतात. परिसरात वाळवी वाढली तर तिचा योग्यवेळी बंदोबस्त करावा लागतो. नाहीतर तिच्या अस्तित्वाने सुंदर परिसरही जीर्ण होऊन कुचकामी ठरतो. नंतर ना त्याचं मोल, ना अस्तित्व. शेवटी सगळे प्रश्न अस्तित्वासाठीच तर असतात. माणूस असो, वा वस्तू त्यांचं अस्तित्व जाणीवपूर्वक टिकवावं लागतं. जगण्याला नैतिकतेचे अधिष्ठान देऊन विवेकशील विचारांनी जीवनाचं प्रांगण समृद्ध करावं लागतं. यासाठी विचारांची गंगा विवेकाच्या पात्रातून प्रवाहित ठेवावी लागते. समर्पणशील विचारांची गंगा शिक्षण नावाच्या शिखरावरून उगम पावते. विचार बनून वाहणाऱ्या प्रवाहाला विधायक दिशेने वळते करावे लागते. प्रवाहासोबत काही स्वप्ने पेरायला लागतात. प्रवाहाने प्रथम पात्राशिवाय वाहावे, वाहता-वाहता त्याचे त्याने पात्र तयार करावे आणि पात्रालाच सरितेचे पावित्र्य यावे, म्हणून प्रवाह वाहते ठेवायला लागतात. विवेकशील विचारांचे सिंचन करीत आजूबाजूच्या आसमंताला समृद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न घडणे अपेक्षित असते. 

राजकारणी, राजकारण यांच्याबाबत नकारात्मक विचारांचे सूर लोकमनातून ऐकायला येत असतात. या विचारधारेत शिक्षण नावाच्या एका प्रवाहाचा संगम होत चालला आहे. सचिंत भावनेतून समाजाने यावर बोलणे, खरंतर चिंतनीय बाब आहे. जे दिले जाते. ज्याच्यातून घडवले जाते. जे कधीच पूर्ण होत नाही आणि संपतही नाही, ते म्हणजे शिक्षण. म्हणूनच अद्यापही आपला समाज शिक्षक आणि शिक्षणाविषयी आस्था बाळगून आहे. जगाचं जर काही बरं-वाईट व्हायचं असेल, तर ते समाजाने अंगिकारलेल्या विचारातूनच होईल. म्हणूनच विधायक विचारांचे बीज शिक्षणातून रुजवता येईल, या अपेक्षेवर समाजाचा ठाम विश्वास आहे. शिक्षक सतशील विचारांचे संवर्धन करणारा समाजातील महत्वाचा घटक आहे. म्हणून इतरांपेक्षा त्याच्यावरील जबाबदारीही अधिक आहे. या श्रद्धेतून, भावनेतून समाज शिक्षक आणि शिक्षणक्षेत्राकडे पाहतो.

सांप्रतकाळी समाजव्यवस्थेतील बरीच क्षेत्रे संदेहाच्या परिघात पाहिली जात आहेत. ती एक वेळ प्रदूषित झाली तरी चालतील; मात्र शिक्षणक्षेत्र कलंकरहित असावे अशी अपेक्षा समाज व्यक्त करीत असेल, तर त्यात वावगं असं काय आहे? ज्या संस्कृतीत मातृ-पितृ देवोभव नंतर गुरूलाच देवतास्वरूपात पाहिले जाते. ज्या देशात ब्रह्म, विष्णू, महेशाच्याठायी गुरु शोधला जातो, त्यादेशात गुरूला लघूरूप येणं परिस्थितीचा विपर्यास आहे. गुरूच्या कृपाशीर्वादाने जीवन सफल झाल्याच्या, जीवन घडल्याच्या कहाण्या ज्या देशातील माणसे लहानपणापासून ऐकत, वाचत, लिहित, शिकत आले तेथील काही माणसं नैतिकपातळीवर अधःपतन का करून घेत असतील? यामागची कारणं नेमकी काय असतील? नैतिक अधःपतन ही तशी व्यक्तीनिष्ठ संज्ञा. समाजातील चार माणसं वाईट असली, वाईट वागली; म्हणून सगळा समाजच काही तसा होत नाही. तरीही समाजात चुकणाऱ्या माणसांकडे आणि चुकणाऱ्या शिक्षकाकडे वेगळ्या विचाराने पाहिले जाते. एक डॉक्टर चुकला तर एका रुग्णाचा जीव जातो. एक इंजिनियर चुकल्यास पन्नास-शंभर माणसं जीवास मुकतील; पण एक शिक्षक चुकला तर सगळीच्या सगळी पिढी बरबाद होते, असं म्हणतात. यात तथ्यही आहे. माणसांच्या समाजात पूजा आदर्शांचीच होते. उंची कळसाची मोजली जाते. पायथ्याची नाही. मोठा हो! चांगला माणूस बन! असे म्हणीत समाजातील जेष्ठांचा आशीर्वादाचा हात डोक्यावर विसवतो. अवगुणी हो! चोर, लुटारू हो! म्हणून नाही. कारण समाजाला आपल्यासाठी आदर्श नागरिकच हवे असतात. म्हणूनच आदर्शांची घडण करणारे हातही तेवढेच आदर्श असावे लागतात. अशा हातांना साथ देताना समाज कधीही मागे सरत नाही. पद, प्रतिष्ठा, पैसा काही माणसांकडे चिरकाल टिकत नाही. पण प्रयासाने मिळवलेलं चारित्र्य स्वतःहून कधीच सरत नाही. मग जी गोष्ट उरत नाही तिचा मोह टाळून, जे कधी सरत नाही त्याच्यासाठी आपण का झुरत नाहीत?

माणूस कोणताही असू द्या, मोहाचा फक्त एक क्षण- जो त्याला आकर्षित करीत असतो, विचार करण्यापासून परावृत्त करीत असतो, तोच टाळता आला तर...! मोहाचा तो क्षण टाळणारा जीवनसंगरात दिग्विजयी ठरतो. विश्वातील सारे जयपराजय त्याच्यासमोर क्षूद्र ठरतात. पण नेमकं हेच न करता आल्याने माणसं स्वविनाशाची गाथा लेखांकित करणाऱ्या वाटेने चालतात. आज देश परिवर्तनाच्या पथावरून विकासाकडे प्रचंड वेगाने वाटचाल करतो आहे. माणसांच्या पारंपरिक जगण्याचे संदर्भ बदलत आहेत. सुखाच्या दिशेने ते प्रवाहित होत आहेत. वेगवेगळ्या मार्गांनी वाहत येणाऱ्या समृद्धीने, साधेपणाने जगण्यातील बऱ्याच गोष्टी बदलून टाकल्या. मी आणि माझं सुख या गोष्टी जीवनात तत्त्वांपेक्षा महत्वाच्या ठरू लागल्या आहेत. कधीकाळी समाजात पैशापेक्षा चारित्र्याने माणूस ओळखला जायचा. संपन्न चारित्र्य पैशापेक्षा मोठे समजले जायचे. अशी चारित्र्यसंपन्न माणसे समाजासाठी मूल्यसंवर्धनाचे वस्तुपाठ असत. आता पैसाच मोठा झाला असल्याने माणूस छोटा झाला आहे. वर्गात तासाला शिकवताना पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे शिकविणे भौगोलिक सत्य असेल; पण पृथ्वी पैशाभोवती फिरते आहे, हे आर्थिक सत्य आहे. 

‘जोडोनियां धन उत्तम वेव्हारे। उदास विचारें वेच करी॥’ हा संत तुकाराम महाराजांचा विचार वर्गात शिकवण्यापुरताच उरला आहे. शिकविण्यासाठी मूल्ये एक आणि वागताना दुसरीच, असा वर्तनविपर्यास का होत चालला आहे? ज्यांची चरित्रे वाचून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, असे चरित्राचे महामेरू आपल्या आसपास कितीसे आहेत? ज्यांच्या पायाला मनःपूर्वक स्पर्श करावा, असे पाय किती शिल्लक राहिले आहेत? अशा आदरणीय पावलांचा शोध घ्यावा, तर तीही मातीने माखली आहेत. मातीशी अस्तित्वाची घट्ट नाळ असणारी आपली मुळं खिळखिळी होत चालली आहेत. मग ‘मातीशी इमान राखणं’ हा वाक्प्रचार परीक्षेतील एक गुण मिळवण्यापुरता उरला असेल तर करावे काय?

भूक लागलेली असताना खाणे ही प्रकृती आहे. स्वतःकडील अर्ध्या भाकारीतून चतकोर कोण्या उपाशी जीवाला देणे संकृती आहे; स्वतःकडील भाकरी आबाधित राखून, इतरांकडील ओढून घेणं ही विकृती आहे. हे विकृतीचे तण वेळीच उपटून काढणे आवश्यक आहे. माणसांनी भौतिक सुखसुविधा मिळवू नयेत, असे नाही. ते जरूर मिळवायचे; पण नीतिसंमत मार्गावरून. खरं जीवन त्यागात आहे, भोगात नाही. पैसा गरजेकरिता असावा, बेराजेकरिता नसावा. माणसं आपल्या गरजा बेराजांशी जोडायला लागतात, तेव्हा माणसांपेक्षा पैसा खूपच मोठा वाटायला लागतो.

शाळा, शिक्षक, शिक्षण, व्यवस्थेने निर्माण केलेली सुंदर जीवनकाव्ये आहेत. या कवितांनी जगण्याला संपन्नता येत असते; पण कवितेत व्यवहार आला की, तिचा आत्मा हरवतो. जेव्हा आत्मा स्वार्थाच्या चौकटीत गहाण ठेवला जातो, तेव्हा माणसं लहान-सहान कामांना महान समजायला लागतात. कधीकाळी शाळा जीवनशिक्षणाचे मंदिरे म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या जागी शिक्षणाची पंचतारांकित संकुले उभी राहिली आहेत. या संकुलांमध्ये आपापल्या कुलांना इतमामाने सामावून घेण्याची व्यवस्थाही झाली आहे. वेगवेगळ्या सम्राटांच्या नामावलीत शिक्षणसम्राट उपाधीनेमंडित काही नव्या सम्राटांचा वर्ग अस्तित्वात येऊन स्थानापन्न झाला आहे. या सम्राटांच्या अधिपत्याखाली गुणवत्ता, विद्वत्ता मांडलिक झाली. हे मांडलिक व्यक्तीपूजेच्या आरत्या, पोवाडे गायला लागले आहेत. गुणवत्ता, विद्वत्ता सम्राटांच्या बटिक झाल्या. राजा, राज्य, राज्याभिषेक, राजसिंहासन हे शब्द कधीच कालपटावरून संपले. पण नव्या संस्थानिकांचा वर्ग आणि त्यांची संस्थाने उदयाचली येऊ लागली आहेत. संस्थानांच्या सेवेत रममाण असणाऱ्यांच्या वाटेला मधुर फळे यायला लागली आहेत. तत्त्व, तत्त्वनिष्ठा शब्दांचा अर्थ कोशात बंदिस्त झाला. कोणातरी आदरणीय महात्म्याच्या कृपाकटाक्षाकरिता, मर्जीसंपादनाकरिता स्पर्धा सुरु झाली. तत्त्वनिष्ठ माणसं मांडलिकांच्या जगात वेडी ठरली. जगाचा इतिहास ध्येयनिष्ठ वेड्यांची ध्यासकथा आहे, असे म्हणतात. आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात. कोणतेतरी वेड धारण केल्याशिवाय इतिहास घडत नाही. ते काही वाहत्या उताराचे पाणी नाही. तो योजकतेने परिश्रमपूर्वक घडवावा लागतो. पण सारंच बिघडले असेल तर कोणत्या क्षितिजाला इमानी सूर्याचे दान मागावे.

शिक्षणासाठी चांगल्या गुरूच्या शोधात वणवण भटकणारे एकलव्य पूर्वीच होते, असे नाही. ते आजही आहेत. उत्तम शिष्य घडविणारे आचार्य जसे काल होते, तसे आजही आहेत; पण तेही व्यवस्थेच्या दावणीला बांधले गेले आहेत. एकलव्याला निदान प्रतिमेत गुरु दिसले. त्याबळावर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. आजच्या एकलव्यांनी अशा गुरूची प्रतिमा उभी करून विद्यासंपादन करण्याचा प्रयास केला तर त्याच्या पदरी निराशाच येईल. कारण प्रतिमेतील भक्तीभावच संपला आहे. उरला आहे फक्त आकार आणि या आकाराने काही साकार होणं तसं अवघडच आहे. व्यवस्थेतील त्यातल्या त्यात शिक्षकाच्या प्रामाणिकपणाबाबतीत बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आजही सकारात्मक असतात. शिक्षक इतका कधीच वाईट नसतो, असेही म्हटले जाते.

चंद्रावरच्या डागांमुळे चांदणे काही काळवंडून जात नाही. कापूर जळून मागे सुगंधाशिवाय काही उरत नाही. सहाणेवर घासून चंदन झिजतो; त्याचं अस्तित्व गंध बनून मागे उरते. संस्कारांचा गंध मागे ठेऊन झिजणारी अनेक चंदनाची झाडे आजही आपल्या आसपास असतील. कदाचित ती आपल्याला दिसत नसतील ऐवढेच. देशाचा इतिहास अशा अनेक झिजणाऱ्या नावांनी गंधित झाला आहे. जी माणसं पेशाने शिक्षक होती; पण त्यांचा पिंड समाजशिक्षकाचा होता. समाज नेहमी अशा शिक्षकांची कदर करातो, हेही तितकेच खरे आहे. चंद्रसूर्यालाही ग्रहणाने ग्रासले जाते; पण त्यावरचा अंधार संपून प्रकाशाने जमीन न्हाऊन निघतेच ना! नियम असतात तसे नियमांना अपवादही असतात. काहींबाबत नीतिसंमत मार्गाने वर्तन घडले नसेल, म्हणून नीतिमत्ताच संपण्याच्या मार्गावर आहे, असे विधान करणे आततायीपणाचे ठरेल. जगाचे व्यवहार सुखाचा पांढरा आणि दुःखाचा काळा, या दोनच रंगात विभागता येत नाहीत. या दोन्ही रंगांच्या मिश्रणाने जो एक ग्रे रंग तयार होतो, तोच जीवनाचा खरा रंग आहे. या रंगातून जगण्याचे अनेक रंग तयार करता येतात. त्यात अंतरंगाचा आणखी एक रंग ओतला की, ते अनेक रंगानी उमलून येतं.

विद्यार्थ्यांना शिकविण्यातून जीवनाचे पाठ देण्याऐवजी, संसाराचे पाट लावण्याचा प्रमाद कोणा लावण्यवतीकडून भावनेच्या, आवेगाच्या भरात घडत असेल तर तो तिच्या वयाचा, तिच्या अनियंत्रित भावनांचा दोष आहे. दोष आहे तिच्यापुरत्या मोहरलेल्या मोहाच्या त्या क्षणांचा- जे तिला टाळताच आले नाहीत. प्रेम ही कितीही उन्नत, उदात्त भावना असली तरी ती संस्कृतीच्या, संस्कारांच्या कोंदणातच सुंदर दिसते. विवेकाच्या चौकटींचं उल्लंघन तिच्याकडून घडणं, हे तिचं अपयश आहे. पण तिने स्वीकारलेल्या शिक्षकी पेशाचेही आहे, असं म्हणणे कितीसे संयुक्तिक आहे? आजूबाजूला दिसणाऱ्या चंगळवादाने प्रलोभनाला विकारांच्या वाटेने वळते केले आहे. सुखांची प्राप्ती हे जीवनाचे प्राप्तव्य ठरले आहे. भौतिक गरजांच्या पूर्तीसाठी माझ्याकडे अधिक पैसा असावा. आणि तो खटपट न करता झटपट मिळवता यावा, या हव्यासातून कुणी जुगाराचा डाव मांडला आणि तो व्यावसायिक जीवनावरच उलटला. मासकॉपी हा विकार तसा काही आपल्या अनुभवात नवा नाही. या आधीही अशा वार्ता अधूनमधून आपल्या कानी असायच्या. पण तो जडण्याची कारणेही तितकीच जुनी आहेत. शाळांची गुणवत्ता, प्रतिष्ठा जेव्हा निकालाच्या मोजपट्ट्यांमध्ये मोजली जाते, तेव्हा आपली उंची वाढविण्यासाठी अविचारांचे मुखवटे चेहऱ्यावर चढविले जातात. हे मुखवटे चढवून गुणवत्तेच्या, प्रतिष्ठेच्या बेगडी चमचमाटात आसपासचा अंधार विस्मृतीत जातो. असा अंधार हद्दपार करण्यासाठी करावे लागणारे प्रामाणिक कष्ट विस्मरणात जातात. अविवेकी विचारातून नवा खेळ सुरु होतो आणि या खेळात अनेक जीव जायबंदी होतात.

शिक्षकाकडील ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या बळावर त्याने निर्माण केलेले नवे आयाम समाजकेंद्रित असतील, तर पिढ्या घडतात. घडलेल्या पिढ्या देशाचे, समाजाचे संचित असतात. आज आपल्या देशाला डॉलर, पौंड, युरोपेक्षा संस्कार संवर्धनाची अवश्यकता अधिक आहे. ते घडविण्याचे काम करणाऱ्या समर्पणशील, समाजपरायण गुरुजींची गरज अधिक आहे, असे वाटण्याइतके परिस्थितीत परिवर्तन घडले आहे. समर्पणशील गुरुजी तयार करण्यासाठी व्यवस्थेला काही निकषांचा विचार करावा लागतो, त्यांचा अवलंब करावा लागतो, हेही सत्य आहे. परीक्षेतील गुणांच्या मोजपट्ट्यांनी शिक्षकाचे ज्ञान फार तर मोजता येईल; पण अध्यापन त्यापलीकडील कौशल्य आहे. अध्यापकाने संपादित केलेल्या ज्ञानाचा अध्यापनासाठी केलेला उपयोग प्रगल्भ अध्यापनाची अनिवार्यता आहे. ज्ञानाशिवाय विज्ञान शक्य नाही. विज्ञानाशिवाय अज्ञान दूर होणार नाही. चौऱ्याण्णव टक्के गुरुजी टीईटी परीक्षेत नापास झाले असतीलही, म्हणून ते सगळेच अज्ञानी आहेत, त्यांच्याकडे गुणवत्ताच नाही, हे म्हणणे थोडे घाईचे नाही का होणार? जर दोष द्यायचाच असेल, तर तो त्यांना घडविणाऱ्यांनाही थोडा का असेना द्यावा लागेल की नाही. परिस्थिती इतकी कधीच वाईट नसते, जितकी आपण समजत असतो किंवा तसा समज करून घेतलेला असतो. आजूबाजूला अंधारच असेल म्हणून तो काही कायम नसतो. त्याला पार करीत क्षितिजावर येणारा उद्याच्या सूर्य आशेची काही किरणे सोबत घेऊन येतो. त्याच्या प्रकाशात अंधारलेल्या वाटा उजळून निघतात. उजळलेल्या वाटांनी अपेक्षांचे, आशेचे नवे परगणे शोधण्यासाठी परिवर्तनशील पाऊले आस्थेने चालतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यात असतो, आशेचा आणखी एक नवा सूर्य.

या सर्व बातम्यांबाबत चर्चेतील सगळ्यांनी आपापल्या विचारांच्या परिघात मते मांडली. ती सर्वच एकांगी होती, अर्धवट होती, विशिष्ट विचारधारांनी प्रेरित होती किंवा परिपूर्ण होती, असेही नाही. मतमतांतरे जरूर होती. कारण मत प्रदर्शित करणारे शेवटी समाजाचे, समाजातील कोणत्यातरी विचारांचे आणि विचारधारांचे प्रतिनिधित्व करतात. समाजाच्या अपेक्षाच त्यांचे विचार बनून प्रकटल्या, तर त्यात वावगं काहीच नाही. समाजाची मतेही अशीच आहेत किंवा असायला हवीत, असेही काही नाही. परिपक्व विचारांचा समाज निर्माण होण्यासाठी स्वतःचं मत असणं आवश्यक असते. मतमतांतरांनी घडणाऱ्या मंथनाने विचार तयार होतो. विचारांनी विवेक घडतो आणि विवेकी समाज समृद्ध देश घडवतो, हे तेवढेच सत्य आहे. जेवढे चर्चेतील प्रत्येकाचे मत. 

Dhulvad | धूळवड

By // 3 comments:
वसंताच्या अगमनासरशी सर्जनाच्या नानाविध छटा धारण करून सृष्टी रंगाची मुक्त उधळण करीत असते. चैतन्याचा प्रसन्न गंध वाऱ्यासोबत विहरत असतो. झाडापानाफुलांवरून गंधभारीत रंग ओसंडून वाहताना परिसराला मोहरलेपण आलेले असते. सृष्टीतील सारे रंग साकोळून समष्टीत सहज सामावून गेलेले असतात. रंगांच्या सरमिसळीने धरतीचे देखणे लावण्य सुंदरतेचा साज लेऊन नटते. रंगभरल्या संवेदनांचीं सोबत करीत माणसे रंगांच्या दुनियेत रमतात. आनंदविभोर क्षणांना चैतन्याचा परीसस्पर्श लाभतो. परिस्थितीच्या परिघाभोवती फिरणाऱ्या बेरंग जगण्याच्या चौकटीत रंगांना भरण्यासाठी माणसे आस्थेने चालत राहतात. नियतीने ललाटी लेखलेल्या अभिलेखांना आनंदरंगी रंगवण्याची आस साऱ्यांच्याच अंतर्यामी अधिवास करून असते.

दिसामासाच्या वाटेवर पावलं टाकीत काळाची वारी क्षण-पळांची पालखी घेऊन चाललेली असते. माणसं तिला सोबत करीत चालतात. थकली, भागली की विसावतात. जीवनाला नवे आयाम देणाऱ्या रंगांचा शोध घेत राहतात. वर्षनुवर्षे हे चक्र चालते आहे. आणि धावत्या काळासोबत आपलं असं काही मिळवण्यासाठीची माणसाची शोधयात्राही. मनात असणारं काही लागतं हाती, काही निसटतं. याहीवर्षी ते असेच चार पावले पुढे सरकले, आनंदाचा एक छोटंसं आभाळ शोधण्यासाठी. पण अवकाळी पावसानं होत्याचे नव्हते केले. उजाड आसमंतात माणसं आस्थेचे रंग शोधू लागले. हरविलेल्या आभाळातून आशेचे इंद्रधनुष्य पाहू लागले. लागले काही ज्यांच्या हाती ते रंगांच्या दुनियेत हरवले. आसपासच्या परिस्थितीचे भान विसरले अन् बेभान होऊन आनंदरंगी रंगले.

याचा अर्थ माणसांनी उत्सव साजरा करूच नये, असा अजिबात नाही. असं म्हणायचंही नाही. पण रंगांच्या उत्सवाला साजरे करताना आपल्या आसपास कोठेतरी बेरंग होतो आहे, याचीही थोडीशी जाणीव अंतर्यामी असायला नको का? आनंद शोधताना ताल अन् तंत्र विचलित होत असेल, तर समाजातून शंकेचे सूर प्रकटतातच. आजूबाजूच्या आसमंतात विवंचनेचा, काळजीचा उदास रंग गडद होऊन माणसं विकल होत आहेत. दुसरीकडे आपल्याच तालात झिंगणाऱ्यांना याची काहीच जाणीव नसेल, असे तरी कसे म्हणता येईल? रंगोत्सव साजरा करावा की, करू नये याबाबत दुमत असण्याचे काही कारण नाही. पण साजरा कसा करावा, याबाबत विचारांमध्ये भिन्नता असू शकते. साधेपणानेच साजरा व्हावा म्हणून कुठे आग्रह धरला गेला असेल. कुठे मर्यादांच्या चौकटींचे उल्लंघन करीत साजरा झाला असेल. ते पाहून संवेदनशील मने खंतावलीही असतील. कदाचित काहींना याबाबत काहीच घेणे-देणे नसेल, माहीत नाही.

झाले असे की, रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही काही शिक्षक शाळेच्या मधल्या सुटीत चहाच्या दुकानावर थांबलो होतो. नेहमीच्या गप्पा आजही सुरु होत्या. आमच्या क्लर्क भाऊसाहेबांनी आमचं बोलणं मध्येच थांबवलं आणि आम्हां शिक्षकांना उद्देशून म्हणाले, “मास्तर, तुम्ही केलेल्या संस्कारांची लक्तरे पाहा, कशी टांगली गेली आहेत!” त्यांचं म्हणणं नीट न समजल्याने आमच्यातील एक शिक्षक त्यांना म्हणाले, “अहो, भाऊसाहेब तुम्हाला म्हणायचंय तरी काय? संस्कारांची लक्तरे काय? तारांना टांगली आहेत काय? अहो, असं कोड्यात काय बोलता, जरा कळेल असं बोला की राव!” विजेच्या तारांकडे झोकदार अंगुलीनिर्देश करीत ते म्हणाले, “ते पाहा, तुम्ही मुलांवर केलेले संस्कार कसे तारांवर उलटे लटकले आहेत!” साऱ्यांच्या नजरा विजेच्या तारांकडे वळल्या. समोर दिसणारे दृश्य पाहून आश्चर्यदग्ध स्वरात दोनतीन आवाज एकत्र, “अहो, हे काय?”

आता साऱ्यांना उलगडा झाला, त्यांच्या उपरोधिक बोलण्याचा. समोरील प्रकार पाहून व्यथित सुरात एक शिक्षक मनातील वेदना व्यक्त करू लागले. म्हणाले, “सर, काय म्हणावं हो याला? सण साजरा करीत आहात आनंदाने करा, काही कुणाचं म्हणणं नाही; पण आनंद साजरा करायची ही कोणती तऱ्हा? कोणती नवी रीत ही? रंग खेळताना कपडे रंगणारच; पण ते खराब झाले म्हणून फेकायचेच असतील, तर योग्य ठिकाणी फेका. असे विजेच्या तारांवर फेकून लोंबकळत ठेवणे, हा कोणता नवा जगतविख्यात शोध?” “सर, या शोधकर्त्याला सार्वजनिक सभ्यतेचे नोबेल देऊन गौरवान्वित करायला हवं.” दुसरे एक शिक्षक तो प्रकार पाहून उपरोधिक भावनेतून मनातील राग काढते झाले. त्यांच्या विधानाची बाजू धरून तिसरे शिक्षक बोलते झाले. “काय म्हणावं या पोरांना? सर, यांना संस्कार देताना आपण खरंच अपुरे पडलो आहोत. ही पोरं आपल्या शाळेची असती आणि मला दिसती, तर चांगलं चोपूनच काढलं असतं त्यांना.” त्याचं थोडं भावविवश, थोडं रागाने केलेलं बोलणं थांबवत आणखी एक शिक्षक म्हणाले, “कमी वगैरे काही नाही सर! ना आपण कमी पडलो, ना आपले संस्कार. दोष द्यायचाच असेल तर पालथ्या घड्यांना द्या! ते पालथेच राहणार असतील, तर तुम्ही तरी काय करणार आहात? आणि संस्कार वगैरे देणं, घडवणं ही काही फक्त एकट्या शिक्षकाचीच जबाबदारी आहे का? समाजाची नाही का? ते राहू द्या बाजूला. अपत्यांच्या भविष्यावर ज्याचं म्हातारपण अवलंबून आहे, ते त्यांचे जन्मदाते- त्यांनी नको का त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्यायला?”

“अहो, हल्ली येवढा वेळ आहेच कुठे पालकांना मुलांकडे बघायला. त्यांना आस आहे घरात संपन्नता चहुबाजूने यावी आणि नांदती राहावी याची. सुखसुविधांनीमंडित उच्चभ्रू जीवन जगण्याची. सुविधांनीयुक्त जगण्यासाठी हाती खुळखुळणाऱ्या पैशाचा आवाजही असावा लागतो. तो काही सहजी येत नाही. त्याला आणण्यासाठी यातायात, धावाधाव करावी लागते. पैशामागे सुख आणि सुखामागे माणूस धाप लागेपर्यंत धावतोय. पालक राबराब राबतात आणि मुलं आपला आब राखून जगणंच विसरतात. आहे कुणाचं लक्ष त्यांच्याकडे? साऱ्यांचे लक्ष पैसा कसा येईल, याकडे असल्यावर आणखी काय होणार आहे दुसरे?” आणखी एक शिक्षक त्यांच्या मताचे समर्थन करू लागले. त्यांच्या विचाराचा धागा पकडत पहिल्या शिक्षकाने अशा वागण्याचं कारण चंगळवादीवृत्तीत शोधले. म्हणाले, “कोणत्याही गरजांची पूर्तता करणारा ‘पॉकेटमनी’ विनासायास यांच्या हाती लागत असेल, तर हे कशाला कुणाचा विचार करतायेत? आणि ऐकातायेत कुणाच्या बापाचं! अहो, जे आपल्या बापाचेही ऐकत नसतील, त्यांना कुणाचाही बाप वठणीवर आणू शकत नाही. सहज मिळणारा पैसा माणसाला अविचारी कसा बनवतो. याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण आणखी कोणते असू शकते का? पाहा शोधून तुम्ही?” त्यांच्या मनातला राग आता चांगला जाणवायला लागला. मत, मते आणि मतांतरे- धुळवडीने उडवलेल्या रंगाइतकेच, आज येथेही.

हे चर्चेचे गुऱ्हाळ लवकर थांबणार नाही, याचा अंदाज घेऊन एक शिक्षक- ज्यांना चांगलेच ठाऊक आहे, मास्तर लोक चर्चेत लागले, म्हणजे चर्चेचे काय होते ते. म्हणाले, “अहो, तुम्ही कितीही चर्चा केल्यात, कितीही बोललात, कितीही मते मांडली, म्हणून परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? आणि पडायचाच असता, तर हे दृश्य तुम्हाला दिसले असते का? तुम्ही मंडळी फक्त शिक्षकच आहात. कोणी युगपुरुष वगैरे नाहीत. कालचक्राला कलाटणी द्यायला! त्यापेक्षा जे दिसतंय त्याचा तुमची इच्छा असो, नसो स्वीकार करा आणि कालाय तस्मै नमः म्हणा आणि चला परत वर्गात संस्कारांची नवी लक्तरे शिवायला.” उद्वेगजनक सात्विक संताप व्यक्त करीत त्यांनी परिस्थिती बदलणं अवघड असल्याची जाणीव करून दिली. शाळेची मधली सुटी संपण्याची वेळ झाली. तो विषय संपला.

तसं पाहता ही घटना म्हणावी, तर साधी आणि अवघडसुद्धा. कधीकधी लहान गोष्टीतूनही माणूस कळत जातो. कोणताही सणउत्सव साजरा करणे वाईट नसते, वाईट असते ती साजरा करण्याची चुकलेली पद्धत. समाजसंमत, संकेतसंमत वर्तनाच्या चौकटीत ते साजरे होत असतील, तर तो आनंदोत्सव असतो. पण कोणाची तरी, कोणती तरी चुकीची कृती म्हणजे सगळेच तसे असतात असे नाही. सणउत्सव साजरे होताना थोडसं आजूबाजूचं भान असलं तर प्रश्न निर्माण होण्याऐवजी त्यातून उर्जाच माणसांच्या जीवनात संक्रमित होत असते. सण साजरे करताना स्वतःचीही एक शिस्त असावी लागते. आपल्या वर्तनाने दुसऱ्यास त्रास न होणे म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याला स्वैराचाराचे वसने चढविली जातात, तेव्हा अशी विक्षिप्त दृश्ये समोर प्रकटतात. माणसांचे वर्तनप्रवाह नियंत्रित करण्यासाठी कायदा तयार होतो. कायद्याचा आदर करून वागताना सार्वजनिक वर्तन नीतिसंमत असते, तेव्हा त्याला समाजाची मान्यता असते. समाजात असं वर्तणाऱ्याना सन्मान मिळतो. पण अंगात स्वैराचार संचारत असेल आणि कायदा दुर्लक्षित करण्यात कोणास फार मोठे ‘थ्रील’ वाटत असेल, तर अशावेळी कायद्याने करावे तरी काय? दुचाकीवरून तीनतीन चारचार सीट बसून झिंग आल्यागत सुसाट गाड्या हाकणे, ही काही संस्कारांची श्रीमंती नाही. आजूबाजूच्या परिस्थितीची कोणतीच जाणीव न ठेवता डीजेच्या बेसुमार आवाजावर बेताल थिरकणारी अस्थिर पावलं, ही काही जगण्याची सुयोग्य रीत नव्हे. जगणं तेव्हाच श्रीमंत असतं जेव्हा त्याला संस्कारांच्या कोंदणात अधिष्ठित केलेलं असतं. काही असे वागले असतील, तर वर्तनातील प्रासंगिक स्वैराचार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं, हा वर्तन विपर्यास नव्हे काय? चुका घडतात. चुकामधून शिकताना आलेलं शहाणपण माणूस घडविते. शहाणपण येण्यासाठी त्याला शिकवावे लागते. पण शिकून न शिकल्यासारखे आचरण कोणाकडून घडत असेल तर याला कोणी काहीच करू शकत नाही.

देशाच्या प्रगतीची फक्त एक आणि एकच उमेद कोणती ते सांगा? असा प्रश्न मला कोणी विचारला, तर क्षणाचाही विलंब न करता माझे उत्तर असेल, तरुणाई. तरुणाईच्या सळसळत्या उर्जेला सकारात्मक मार्गाने वळते केले, तर पराक्रमाचे नवे आयाम उभे राहतील. देशाचं भाग्य उजळवून टाकण्याचं अवघड कार्य सुघड करण्याची शक्ती तरुणाईत असते. देशाला भविष्यात कोणी महान वगैरे करणार असेल, तर तो तरुणवर्गच. अशाप्रकारची मते अभ्यासू विचारवंत अनेकदा आग्रहाने मांडतात आणि ते वास्तवही आहे. पण तरुणाईचा वर्तनाविष्कार रस्त्यावरून उच्छृंखलपणे वाहत असेल, तर हाती येणाऱ्या उत्तरांच्या आधी आणखी काही नवे प्रश्न उभे राहतात. अर्थात दोनचार मुलं असं वागले म्हणून सारीच तरुणाई बेपर्वा आहे. त्यांच्यासमोर जगण्याचे आदर्शच नाहीत, हे म्हणणंही तर्कसंगत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला दुसरीही एक बाजू असतेच. ती पाहून तपासून घेतली, तर दिसणारं चित्र सुस्पष्ट होत जाते.

आमच्या आपापसातील बोलण्याच्या ओघात एक शिक्षक म्हणाले होते, “यांना शेतातील कुंधा खणायला न्या, तेव्हा कळेल कष्टाचं जीणं काय असतं ते.” तरुणाईचा बेफामपणा पाहून वाईट वाटलं, म्हणून आत्मीय तळमळीने त्यांनी हे विधान केले. हे एक सामाजिक वास्तव आहे. या उर्जेला सकारात्मक मार्गाने  वळते करण्यात अपयश आल्यास, असे किंबहुना आणखीही उथळ वर्तनाविष्कार बघणं अटळ आहे. सकारात्मक विचाराच्या रुजवणुकीसाठी उन्नत, उदात्त आदर्श उभे करावे लागतात. पुस्तकातली आदर्श चरित्रे वास्तव जीवनातून दिसायला हवेत. याचा अर्थ आमच्यासमोर आदर्शच नाहीत, असा नाही. ते आहेत, किंबहुना जगात नसतील एवढे आदर्श माणसे या भूमीत जन्माला आले आहेत. त्यांची जीवनाभिमुख कार्यप्रणाली आजही चरित्रचिंतनाच्या वाटेने आम्हांस सोबत करीत आहे. आपणही त्यांच्याप्रमाणे वागावे, तसे व्हावे. असे विचार चुकलेल्यांच्या मनातून निर्माण होणे आवशक आहे. मनात विधायक विचार उदित होतील, तेव्हाच जणात प्रकटतील. याकरिता आपल्या मूल्यांची आणि मूल्यव्यवस्थेचीही उंची वाढवावी लागेल. नैतिकतेची परिमाणं अधिक सात्विक आणि जीवनाभिमुख करावी लागतील. केवळ भौतिक सोयीसुविधांनी संपन्न असलेले जीवन जगणं हे माणूस जन्माचं प्राप्तव्य असू शकत नाही. नैतिकतेच्या, आदर्शाच्या गंधाने जगण्यास गंधित करणे म्हणजे माणूसपण.

मानवेतर प्राण्यांच्या गरजा देहधर्मापुरत्या, जगण्यापुरत्या सीमित असतात. माणसांच्या गरजा संस्कारांचे संवर्धन करून आदर्श जीवनाचे वस्तुपाठ उभे करणाऱ्या असतात. माझ्या आजूबाजूला परिस्थितीने निर्माण केलेल्या समस्यांशी संघर्ष करीत माणसं कसेबसे जीवन जगत आहेत. एकवेळ का होईना पण हातातोंडाची गाठ पडावी, म्हणून ढोर मेहनत करूनही अर्धपोटी, उपाशीपोटी निजत आहेत. आणि मी माझ्याच मस्तीत जगत असेल, तर असं जगणं परिस्थितीशी प्रतारणा करणारं आहे. इतरांच्या वेदना संवेदनशील काळजाला घरं करतात, तेव्हाच माणुसकीचे झरे जीवनात पाझरतात. दैवाने मला सारंकाही दिलं म्हणून बेपर्वा, बेफिकीर जगून स्वतःला वेगळे समजणे विपर्यास आहे. स्वतःसोबत आसपासच्या व्यथा, वेदनांची जाणीव असणारी माणसंच देशाची खरी संपत्ती असतात. पद, पैसा आज आहे उद्या नाही. ते कायम असतीलच याची खात्रीही नाही. मात्र सहवेदनेतून घडलेलं आणि संवेदनाशील विचारांनी प्रगल्भ झालेलं मन, ही कायम टिकणारी संपत्ती आहे. सहानुभूतीपूर्वक दुसऱ्याचा विचार करणे, हीच जीवनाची आणि जगण्याचीही श्रीमंती आहे. तोच खरा जीवनयोग आहे. काहींनी तुपाशी तर काहींनी उपाशी असणं, हा माणसांच्या जगाचा न्याय नसावा. अंधार आहे तेथे आस्थेची, स्नेहाची एक पणती लावण्याएवढे उमदेपण प्रत्येकाकडे असते. गरज असते, आतल्या त्या उमदेपणाला स्मरून पणती पेटवण्यासाठी पुढे येणाऱ्या हातांची. पेटवलेली पणती विझू नये म्हणून आस्थेचा पदर आडवा धरण्याची.

Strijanma | स्त्रीजन्मा...

By // 1 comment:
स्त्रीजन्मा तुझी ही कहाणी...

बाईचा जन्म नको घालू शिरीहरी,
रातन् दिस पुरुषाची ताबेदारी.
लोकगीताच्या या ओळी कुठेतरी वाचल्याचे आठवतेय. पुरुषांच्या जगात जगताना परंपरेने दिलेल्या चौकटीत जीवनयापन करताना आलेल्या दाहक अनुभवातून बाईच्या जन्माची वेदना कोण्यातरी विव्हवळणाऱ्या वेदानांकित मनाने व्यक्त केली आहे. जग नियतीने निर्माण केले; पण पुरुषाने त्यावर स्वामित्व संपादन केले. साहजिकच पुरुषाच्या सत्तेवर आणि मत्तेवर चालणाऱ्या जगात बाई म्हणून जगण्यात वाट्याला येणाऱ्या मनातील व्यथा, वेदनांना हे गीत मुखरित करते. जन्माने मिळालेल्या स्त्रीदेहाला पुरुषीसत्तेच्या महाकाय भिंतीनी बंदिस्त केले. या भिंतीना उध्वस्त करण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा एक चिराही ढासळू शकला नाही. सर्व पर्याय संपले, म्हणून परंपरेने दिलेले पराधीन जीवन, हेच प्राक्तन नियतीने आपल्या ललाटी लेखांकित केले आहे, असे समजून स्त्री नियतीने आखून दिलेल्या वाटेने निमूटपणे चालते आहे. स्त्रीदेह धारण करून इहलोकी प्रायश्चित्त घेण्यासाठी नियतीने आपणास पाठविले आहे. हा देह जगवताना पुरुषाचे आश्रित होऊन जगणं हाच एक मार्ग असून, त्या मार्गाने वर्तने हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. या विचाराने वागते आहे. समाजाने स्त्री म्हणून जगताना ठरवून दिलेल्या वर्तनाच्या चौकटी हेच आपले भागधेय असून, नियतीलाही ते आता बदलता येत नाही, म्हणून निमूटपणे कोणातरी पुरुषाची अंकित होऊन जगणे क्रमप्राप्त आहे, असे समजून जगत आहे. या परिस्थितीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करूनही नशीब बदलता येणार नाही, म्हणून देवालाच का सांगू नये, “बाबारे! नको हा स्त्री जन्म.” असे वाटून मनातील वेदना शब्द बनून प्रकटली असावी. माणसाला सांगून काही उपयोग नव्हताच, कारण तो पुरुष असल्याचा अहं त्याला, हे करू देणं शक्य नव्हतं. त्याच्या विचारांना परंपरांचा पायबंद पडला असल्याने गुलामगिरीच्या शृंखला विखंडित करणं कर्मकठीण कार्य होतं. मग श्रीहरिलाच का विनवू नये? पुरे आता हा वेदनादायी स्त्रीदेहासह इहलोकीचा प्रवास. या विचारातून हे गीत लिहले असेल का?

समाजातील पुरुषसत्ताक जीवनपद्धतीची दाहकता कदाचित कोण्या अभागी स्त्रीच्या वाट्याला आली असावी. पुरुषी मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करूनही परिस्थितीत पळभरही परिवर्तन होणं अशक्य असल्याने, मनी आलेल्या हताशेतून कोणा पीडितेच्या मनातला सल लोकगीताच्या गंगेत दुःख होऊन प्रवाहित झाला. हा प्रवाह असाच पुढे अनेक वर्षे चालत राहिला. पण वाहता वाहता पाणी जसे शुद्ध होते तसा तो शुद्ध होऊ शकला नाही. त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याने कोण्या अभागी ललनेची व्यथा या गीतात कथा बनून प्रकटली असावी. वर्षामागे वर्षे सरत गेली; पण ना तिला समजून घेणारा कोणी सहृदय पुरुष भेटला असावा. ना तिच्या जीवनात आनंदाचा कवडसा अवतीर्ण झाला असावा. अखेर ज्याने हे भागधेय लेखांकित केले त्यालाच का म्हणून माझ्या मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग विचारू नये, या भावनेतून प्रकटलेलं हे दुःख असावे. स्त्रीमनाच्या वेदना घेऊन, हे गीत कोण्यातरी ललनेच्या ओठांवर आले असावे. आजच्या काळाशी तुलना करून पाहताना अशा अनुभवांची आर्तता कमी झाली आहे, असे ठामपणे कोणाला म्हणता येईल असे वाटत नाही.

हे गीत प्रथम कधी प्रकटले,  माहीत नाही.  पण यातील वेदनेचे सूर आजही आपल्या आसपास ऐकू येणं, हा परिस्थितीचा विपर्यास नाही का? कालपटलावर प्रगतीच्या पावलांचे काही ठळक ठसे आम्ही अंकित केले. पण विचारांनी किती पावलं पुढे सरकलो? माणूस परिस्थितीचा निर्माता नाही होऊ शकत; पण परिस्थितीत परिवर्तन करणारा प्रेषित जरूर होऊ शकतो. विज्ञानतंत्रज्ञानातील शोधांनी बदललेल्या जगाने आणि माणसाने केलेल्या प्रचंड प्रगतीने, हे सिद्धही केले आहे. विश्वातील अनेक अज्ञात परगण्यांचा शोध घेऊन माणसाने त्यांना मौलिक अस्तित्व प्रदान केले आहे. पण जिच्या अस्तित्वाने त्याच्या जीवनात स्वर्ग अवतीर्ण होऊ शकतो, तिला मात्र तो सोयिस्कर विसरला.  नारी, ललना,  कामिनी,  सौदामिनी अशा वेगवेगळ्या गोंडस नावांच्या देव्हाऱ्यात तिला अधिष्ठित केले. ‘यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता’ म्हणून तिच्या सामर्थ्याला देवतेच्या पातळीवर नेऊन तिचा देव्हारा कायम केला. त्या देव्हाऱ्याला सजवले. ‘तुज भयचकित होऊन नमावे रमणी’ असे म्हणून तिच्या साहसाला आदरयुक्त भयाचे रूप देऊन शक्तीच्या रुपात पाहिले. ‘न मातुः परम दैवतम्’ म्हणीत तिला देवतास्वरूप लेखून पूजनीय केले. त्याचवेळी दुसऱ्याबाजूने ‘न स्त्री स्वातन्त्र्यम् अर्हति’ म्हणून बंधनांच्या शृंखलांनी पाशबद्धही केलं. बंधनांचे पाश अधिकाधिक करकचून घट्ट करताना; ती परवश कशी राहील,  याची काळजी तो घेत राहिला. जीवनाच्या कोणत्याही स्थितीत ती असली, तरी तिला पिता, पती, पुत्र या पुरुषी नात्यांनी बद्ध करून पुरुषाशिवाय तुझ्या जीवनाला गतीच नाही अन् त्यावाचून प्रगतीही नाही, हा विचार तिच्या मनात रुजवत नेला.

मातृत्वाला मान असावा; पण स्त्रीत्वाचा सन्मान नसावा, हा अविचार माणसांच्या जगात का असावा? असा प्रश्न मनात निर्माण होतो. कारुण्यमूर्ती, वात्सल्यमूर्ती म्हणून स्त्रीकडे पाहताना तिच्याठायी असणाऱ्या ममतेचा गौरव समाज करत राहिला आहे. वंश सातत्यात तिची भूमिका अनन्यसाधारण असल्याने प्रत्येक मातेचा सन्मान संस्कृतीत होत आला आहे; पण त्याचवेळी स्त्री म्हणून बऱ्याच जणींच्या वाटेला अवहेलनाच येत राहिली. माता म्हणून तिचा प्रवास कितीही सुंदर असला, तरी तिच्यातील मातृत्व वजा केल्यावर मागे उरणारं तिचं स्त्रीत्व नेहमीच दुय्यम राहिलं. हे दुय्यमत्त्व अधोरेखित करणारे कुंकू, मंगळसूत्र तिच्या सौभाग्याशी जुळवले गेले. यांच्याशिवाय विवाहित स्त्रीला पूर्णत्व नाही, हे तिच्या मनावर प्रतिबिंबित करून, तिला कायम आपल्या अंकित करण्याची व्यवस्था पुरुषसत्तेने करून ठेवली. वटसावित्री पतीच्या जीविताची हमी ठरविली. अहेवपणी आलेलं मरण स्त्रीला जीवनसांगतेची इतिकर्तव्यता वाटू लागलं. पत्नीने सौभाग्यालंकार धारण करून, पतीशी प्रतारणा घडणार नाही, याची हमी म्हणून अभिमानाने मिरवायचे. लग्नानंतर स्वतःचे नावही बदलायचे. जिथे स्वतःच अस्तित्वच विसर्जित करून पतीच्या अस्तित्वाशी निगडित ठेवायचे, तेथे नावाचं काय? व्रतवैकल्ये, सणवारांमध्ये स्वअस्मिता शोधताना तेथेसुद्धा पतीच्या अस्तित्वाच्या खुणा शोधायच्या आणि निवडायच्याही. पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला दिलेली ही देणगी आहे. पतिप्रेमाचं, पतिप्रियतेचे दान पदरी घेताना स्वतःला ती पणाला लावत होती, तर कधी लावलीही जात होती. दुःशासनाचे हात द्रौपदीच्या पदराला पोहचले, त्यामागे पुरुषी अहं होताच; पण पुरुषी अहंमधून येणारी पुरुषी अगतिकताही होती. अग्निपरीक्षा फक्त सीतेनेच द्यायची आणि स्वतःला सिद्धही तिनेच करायचे, कारण आजूबाजूला प्रश्न विचारणारे आवाज पुरुषी मानसिकतेचे द्योतक होते. द्रौपदी, सीता ही नावे काही असामान्य नव्हती. या नावाभोवती सत्ता, सामर्थ्य यांचं वलय असूनही पुरुषी मानसिकतेमुळे केवळ स्त्री म्हणून त्यांना या अमोघ दिव्यास सामोरे जावे लागले.

सांप्रतकाळी स्त्रीविषयक विचारांमध्ये मोकळेपण, व्यापकपण आले असेलही; पण सर्वार्थाने ती पाशमुक्त झाली आहे का? पुरुषसत्ताक विचारधारेच्या बंधनातून मुक्त झाली आहे का? स्त्रियांपुढील समस्यांचे पीळ सैल झाले आहेत का? या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने अद्यापही नकारार्थीच मिळते. कौटुंबिक कलह, अत्याचार, हुंडा, स्त्रीत्वावर होणारे आघात इ. साऱ्या समस्यांचे मूळ स्त्रीला मिळालेल्या समाजातील गौण स्थानामध्ये आहे. कधीकाळी स्वयंप्रतिष्ठाप्राप्त असणारे स्त्री हे नाव मातृसत्ताक कुटुंबपद्धतीत स्त्रीत्वाचा मानबिंदू होता. सर्जनशक्तीचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या स्त्रीच्या जिज्ञासापूर्ण निरीक्षणातून माणसांना स्थिर जीवन जगण्यास कारण ठरणाऱ्या शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. साहजिकच त्यांचं सामाजिक महत्व व्यवस्थेत वृद्धिंगत झाले. पण मालमत्तेवरच्या मालकी हक्काचा प्रश्न पुरुषाने मसलपॉवरने आपल्याला बाजूने अनुकूल राहील असाच सोडविला. एवढेच नाहीतर स्त्रीवरच तो आपली मालकी सांगू लागला. त्याच्याकडील सामर्थ्यामुळे तो प्रबळ होत गेला. पुरुषी अहंकारातून त्याने अधिकारप्राप्ती केली. आणि आपल्या वाटचालीत प्रतिस्पर्धी, दावेदार नको म्हणून स्त्रीला कर्मकांड, रूढीपरंपरा आणि रीतिरिवाजांमध्ये पद्धतशीर गुंतवले. प्रतिष्ठेच्या स्वनिर्मित संकल्पनांना संस्कारांचे गोड रूप दिले. संस्कारातून संस्कृती उभी केली अन् संस्कृतीरक्षणाची जबाबदारी स्त्रीला देऊन घराचा उंबरठा, ही तिच्या कर्तृत्वाची कमाल मर्यादा ठरवली. चूल आणि मूल, हेच तिचे कार्यक्षेत्र सीमित करून तिची वाढ थांबवली. तिला लांबचं दिसणारे क्षितिज आपल्या बळावर पायतळी घ्यायचे काही संयुक्तिक कारण नाही, घर आणि संसार हेच तुझे कार्यक्षेत्र आणि तीर्थक्षेत्र आहे हे मनात रुजवून तिच्या आकांक्षाना बंदिस्त केले. तिलाही मन आहे, भावना आहेत, विचार आहे; हा विचारही त्याच्या मनात तेव्हा आला नसावा का? की योजनापूर्वक स्वतःसाठी सुरक्षित पर्याय म्हणून या गोष्टी त्याने शोधल्या असाव्यात?

परंपरांच्या वाटेने मिळालेल्या विचारांनी घडलेल्या आणि घडणाऱ्या माणसाला वंशाला दिवाच असावा असे वाटणे स्वाभाविक होते, कारण त्याला पुरुषच श्रेष्ठ असतो, या विचारांनी घडविले गेले होते. पुत्राशिवाय त्याच्या कुळास, त्याच्या जीवनास अर्थ नाही आणि परिपूर्णताही नाही हा विचार प्रबळ ठरत होता. म्हणून वंशदीप निर्माण करणारी स्त्री समाजासाठी आस्थाविषय ठरली. तिला आशीर्वाद देतानाही ‘पुत्रवती हो’ म्हणूनच दिला गेला. जातोय(?) ‘पुत्रिवती हो’ म्हणून का नाही? पुत्र-पुत्री जन्माला येणं खरंतर स्त्रीच्या हाती नाही, हे वैद्यकशास्त्राने, विज्ञानाने सिद्ध करून दाखविले आहे. तरीही पुरुषी मानसिकता हे वैज्ञानिक सत्य स्वीकारायला अद्यापही तयार नाही. अशा विसंगत विचारांनी घडणाऱ्या वर्तनाला विज्ञानयुगातील अज्ञान नाही, तर आणखी काय म्हणावे? माणूस पुरुष म्हणून कसाही असला, तरी पती हा परमेश्वर मानून, त्याच्या सेवेत स्त्रीने सारे आयुष्य वेचावे. ही कुठली अपेक्षा? एवढं असूनही विज्ञानाने केलेली प्रगतीच मुलींच्या जन्मावर उठली आहे. जन्माआधीच तिला संपवण्याचे उद्योग सुलभ होऊ लागले आहेत. पुत्रलालसेच्या विक्षिप्त व्याधीने पीडित माणसं स्त्रीभ्रूणाची हत्या करून वंशाचा दिवा शोधू लागली. पण जिच्याशिवाय वंशसातत्यच संभव नाही आणि ती नसेल तर वंश कसा चालेल? याचाही जरा विचार अविचारी माणसांनी करू नये का? अशा मानसिकतेपायी हजारो पणत्या प्रकाशित होण्याआधीच विझत असतील, तर माणूस म्हणून हीच प्रगती आम्ही केली का? एवढं घडूनही एखादी पणती तिच्या बळकट नशिबाने प्रकाशली, तरी जन्मापासून वेदनादायी प्रवास नशीब म्हणून तिच्या सोबतीला आहेच. ती आईबाबांना नकोशी म्हणून तिचं नावच ‘नकुशा’. अशा अभागी नकुशांचा शापित जीवनप्रवास कुण्या जन्माची झाडाझडती असतो कुणास ठाऊक?

पुरुषी मानसिकता असणाऱ्या जगात स्त्रीच्या कर्तृत्वातील, सामर्थ्यातील सुंदरता शोधण्याऐवजी पुरुषाची नजर तिच्या देहात सौंदर्य शोधते. गौरवर्णांकित, नितळ अंगकांती असणारी नारी सौंदर्याची व्याख्या ठरते. अशा संकुचित विचारातून ‘स्त्रीचे सौंदर्य म्हणजे तिचे सामर्थ्य, तर पुरुषांचे सामर्थ्य म्हणजे त्याचे सौंदर्य’ यासारखे विचार जन्माला येताना, स्त्रीने तिचे सामर्थ्य आपल्या सौंदर्यात शोधावे अन् त्या सौंदर्याने पुरुषांना रिझवावे, हेच समाजाला सूचित करायचे असेल का? अपेक्षित असेल का? हे अपेक्षिताना ती नेहमी ‘बार्बीडॉल’ म्हणूनच दिसावी, या विचारांतून तिला पाहिले जाते. मनाचं सौंदर्य देहाच्या सौंदर्यापेक्षा चिरकाल टिकणारे असते, हे विसरून कुण्या अभिनेत्रीच्या झीरो फिगरचेही प्रचंड कौतुक केले जाते. टीव्हीवरील स्त्रियांच्या साड्यांचंही नवल वाटतं. चवळीची शेंग म्हणून तिच्या अटकर, सळसळीत बांध्यात तिचं स्त्रीत्व उभं केलं जातं.

जागतिकीकरणाच्या बदलत्या प्रवाहांनी काही जणांच्या आयुष्यात भौतिक सुख-सुविधांची रेलचेल झाली. त्यातून मिळणाऱ्या सुखांनी भोगलालसाही वाढत चालली आहे. अशा भोगवादी विचारधारेतून स्त्रीला पाहताना आमच्या मूल्यांनी, संस्कारांनी, संस्कृतीने दिलेला परस्त्री माता, भगिनीसमान, या उदात्त विचारला तिलांजली कधी दिली गेली, ते आमचं आम्हाला तरी कळलंतरी का? भोगवादी मानसिकतेतून कुणा निर्भयाच्या जीवनावरच आघात होतो. वखवखलेल्या दानवीवृत्ती प्रबल होऊन स्त्रीमधील माता, भगिनी, कन्या, मैत्रीण या नात्यांना विसरून केवळ मादीरुपात पाहू लागतात. पशूंच्या जगात कधी अत्याचार झाल्याचे ऐकिवात नाही. ते कधी अत्याचार करीतही नाहीत. पण प्रगत माणसांच्या जगात स्त्रीवर ती केवळ मादी म्हणून अत्याचार होत असतील, अत्याचारांनी तिच्या देहाबरोबर मनाचेही शकले होत असतील, तर माणूस हा विश्वातील सर्वात परिणत बुद्धिमत्ता असणारा प्राणी आहे, हे आपण म्हणावे तरी कसे? अविवेकी अन्याय समाजात घडतो, तेव्हा या विकृतीच्या विरोधात सत्प्रेरित, कृतिशील हात संघटीत होतात, हे खरे आहे. पेटत्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात मनातील साठलेल्या आक्रोशातून आपल्या मूल्याधारित संस्कृतीतील संस्कार शोधले जातात. पण एवढे पुरेसे नसते. अन्यायाविरोधात प्रकटणारा सत्प्रेरित आक्रोश वणवा व्हायला हवा. त्याचा दावानल व्हावा. आणि त्याच्या दाहकतेत दानवांचा अस्त व्हावा; पण असं फारसं घडताना दिसतं का? दुर्दैवाने नाही. अत्याचाराच्या अन्यायग्रस्त कहाण्यांचा अस्त का होत नाही? अत्याचाराच्या वार्ता येण्याचे का थांबत नाही?

परिस्थितीच्या आवर्तात उध्वस्त झालेली शहरे, गावे, गावगाडा अन् त्यातून वाट्याला येणाऱ्या  जीवनातून, भणंग आयुष्यातून विद्वेषाचे वणवे परिसरात पसरत असताना गाव-शहर कुठेही असो, स्त्री सुरक्षित नाही. कधी जातीय, कधी धर्मीय विद्वेषातून घरातल्या संपत्तीसह स्त्रियांची अस्मिता, चारित्र्य लुटले जात असेल, त्यांच्या अब्रूचे धिंडवडे अजूनही निघत असतील, तर आम्ही प्रगत वैगैरे असल्याच्या वार्ता का कराव्यात? स्वतःला प्रगत तरी कसे म्हणवून घ्यावे? माणसांच्या प्रगतीची व्याख्या नेमकी कोणत्या निकषांवर करावी? याचा अर्थ असा नाही की, सर्वत्र अंधाराचं साम्राज्य आहे. अत्याचार होतो आहे. अत्याचार करणारी मानसिकता धारण करून जगणारे एक टक्काही विकृत समाजात नसतील; पण नव्याण्णव टक्के सतशील माणसे विकृती आणि विकृतांच्या विरोधात संघटित होऊन, विकृत विचार धारण करून जगणाऱ्यांचा एक टक्का अद्यापपर्यंत का संपवू शकले नाहीत, हे सत्य नाकारून चालणार नाही. सतप्रेरित विचाराने वर्तणारी माणसे व्यवस्थेला प्रश्न का विचारत नसतील? महात्मा फुलेंच्या शाळेत मिळालेल्या शिक्षणातून स्वअस्मितेचा शोध घेत तत्कालीन समाजाला, परिस्थितीला जाब विचारणाऱ्या मुक्ता साळवे, स्त्रीपुरुषांच्या जगण्यातील विरोधाभासी तफावत, स्त्रियांचे व्यवस्थेतील स्थान नेमके कोणते, याचा विचार करून नरापासून नारायणापर्यंत प्रश्न विचारण्याचे धाडस दाखविणाऱ्या ताराबाई शिंदेचे परखड विचार आमच्या देशातल्या किती स्त्रियांनी अंगिकारले आहेत?

कडूविंद्रावण डोंगरी त्याचा राहावा,
पुरुषाचा कावा, मला येडीला काय ठावा?
कावळ्यानं कोट केलं, बाभुलवनामंदी
पुरुषाला माया थोडी, नारी उमज मनामंदी.
या लोकगीतातून स्त्री मनातील पुरुषाविषयी भावना आविष्कृत झाल्या आहेत. पिढ्यानपिढ्याच्या अनुभवातून प्रकटलेला हा सूर स्त्रीच्या अंतरंगाने जाणलेल्या, लेखलेल्या, जोखलेल्या, पाहिलेल्या, साहिलेल्या, राहिलेल्या पुरुषीवृत्तीचा अन् त्या वृत्तीपायी तिच्या वाट्याला येणाऱ्या करुण कर्मकथेचा अध्याय आहे. असे असेलतर वर्षानुवर्ष स्त्रीला येणारा हा अनुभव विद्यमान काळी किती बदलला आहे? असेल तर किती? नसेल तर का नाही? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला नकोत का? अर्थात सगळीकडे सगळचं वाईट घडतंय, असंही म्हणणं नाही. कालची स्त्री आज खूपच बदलली आहे, तिच्या भोवतालचं जगही बरंच बदलेलं आहे. हे सत्य नाकारून कसे चालेल. पण ती सगळीच अन् सगळीकडेच बदललेली आहे का? ती आज बैलगाडीपासून आगगाडीपर्यंत, आगगाडीपासून अवकाशयानापर्यंत लीलया संचार करीत आहे. पुरुषी अधिसत्ता असणारी कितीतरी क्षेत्रे तिने संपादित केली आहेत. प्रगतीचा हा पल्ला गाठताना शरीराने आणि मनानेही ती कुठेच कमी नाही. हे तिने सिद्ध केले आहे. तरीही अद्याप पुरुषी विचारात ती अबलाच आहे. स्वकर्तृत्वाने सबला झाली. पण स्त्री म्हणून तिचं स्थान व्यवस्थेत नेमके आहे कुठे?

वर्षाच्या कालगणनेत मार्च महिन्यातील आठ तारीख जगात ‘महिला दिन’ म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरा केला जाईल. स्त्री सामर्थ्याचे पोवाडे गायिले जातील. प्रसार माध्यमातून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान, गुणवान महिलांच्या कार्याचे, कौतुकाचे गुणगान परत-परत ऐकवले जाईल. ते करू नये, असे नाही. पण गुणवत्तेच्या आणि यशाच्या निकषांच्या कोणत्याही चौकटीत सामावल्या नाहीत, आसपासच्या कोणत्याही झगमगाटात कधीच कोणाला दिसल्या नाहीत. पण आपापली आस्थेची एक मिणमिणती पणती हाती घेऊन आपल्या चंद्रमौळी घराचा कोपरा उजळवून टाकण्यासाठी धडपड करीत आहेत. पुरुषांच्या जगात स्वतःचं आशादायी जग उभं करून, परिस्थितीच्या वादळवाऱ्यात आपल्या अस्तित्वाची मूळं  घट्ट रुजवून संकटांचं आकाश डोक्यावर घेत असतील. कोणत्यातरी रानावनात पदर कमरेला खोचून जगण्याचे बळ शोधत असतील. काडीकचरा वेचून त्यातून स्वतःचे जीवन वेचत असतील. वणवण भटकंतीचे भिरभिरणारे जीवन सोबत घेऊन रानोमाळ आपल्या मुक्तीदिनाच्या शोधात असतील. अवहेलना सहन करूनही येणारा उद्याचा सूर्य आपल्या जीवनात मुक्तीचा प्रकाश आणेल, म्हणून आजच्या अंधाराशी दोन हात करीत असतील. कदाचित त्यांच्या कामाची दखल घेण्याचे कोणाच्या गावीही नसेल. त्यांची दखल वर्षाच्या कोणत्या दिनी घ्यावी? त्या कर्तृत्ववान यशस्विनींना जागतिक महिला दिवस म्हणजे काय? हेही कदाचित माहीत नसेल. यशस्वी म्हणून सुशिक्षितांच्या जगाला त्या परिचित नाहीत. म्हणून त्याचं यश कुठेही लेखांकित झाले नाही. लेखांकित झाले नाही म्हणून कोणी कधीच वाचलेही नाही. त्यांच्या संघर्षमय जगण्यातून निर्माण झालेली जीवनाविषयी आस्था हीच त्यांची कर्मगाथा आहे. त्यांची छोटीशी जीवनगाथा यशोगाथा बनून प्रेरणा देत आहे. नशिबाने दिलेल्या नकारातही जगताना जीवनाबाबत होकार निर्मिणाऱ्या महिलांचं मुक्तीपथावरील उमटलेलं छोटंसं पाऊल आस्थेचे ठसे उमटवत पाऊलापुरती वाट तयार करतील. त्या पाऊलखुणा पाहत मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठी निघालेली अनेक आशादायी पाऊले कदाचित काळालाही समजली नसतील. पण माणसाने कधीच न लिहिलेली मुक्तीगाथा लेखांकित करीत असतील.

Marathi | मराठी

By // 2 comments:
२७ फेब्रुवारी, कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस; हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून आम्ही महाराष्ट्रीयांनी साजरा केला. याच दिवशी वर्तमानपत्रातून एक बातमी वाचली. ‘अभिजाततेच्या उंबरठ्यावर मराठी.’ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आवश्यक निकषांची पूर्तता करून; महाराष्ट्रात मराठीचं अस्तित्व सुमारे दोन-अडीच हजार वर्षापासून असल्याचे पुरावे शोधले. कोणत्याही महाराष्ट्रीय माणसाला आनंद, अभिमान वाटावा, अशी ही बातमी. पण मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला, भाषेचं अस्तित्व पुरातन आहे, असे सिद्ध झाले म्हणून लगेचच आपली भाषा भविष्यात आणखी सर्वांगाने बहरेल, दशदिशांना वाढेल, तिची घौडदौड प्रचंड गतीने होईल, असं समजणे केवळ स्वप्नाळूपणा आहे. बदल घडतील, नाही असे नाही; पण त्यासाठी वेळ द्यावा लागेल. आपण तो वेळ भाषा सर्वांगाने बहरावी म्हणून सत्कारणी लावणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे.

प्रश्नांची उत्तरे काही असोत; पण आज मराठीभाषा महाराष्ट्रातच मरणासन्न अवस्थेत उभी आहे. तिला तिचं स्वतःचं असं अस्तित्व कितीसं राहिलं आहे? असे प्रश्न आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण भाषेबाबत ऐकत असतो. हे ऐकलेलं, बोललेलं आपण खरं मानावं की, आपला भ्रम आहे असं समजून, हे म्हणणं दुर्लक्षित करावं? खरंतर भाषेबाबत प्रत्येक पिढीतला हा काळजीयुक्त सूर आहे. या नकाराच्या सुरावटीना गाणे समजून आपणही तेच गात राहावं का? तिच्या प्रगतीच्या वाटा उजळून निघाव्यात, म्हणून आपापल्या प्रयत्नांची एक लहानशी पणती हाती घेऊन उभं राहणं आपल्या वकुबाप्रमाणे शक्य नाही का?

काळ बदलत असतो. बदल निसर्गाचा सहजभाव आहे. बदलांना आपण थांबवू शकत नाहीत. बदलत्या काळाशी सख्य साधतात, तेच प्रवाहात टिकतात. जे स्वतः बदलून प्रगतीच्या कालोचित पाऊलखुणा शोधत गती धारण करतात, तेच अभ्युदयाचे नवे आयाम उभे करतात. व्यक्तीच्या बाबतीत हे जेवढे सत्य; तेवढेच भाषा, संस्कार, संस्कृतीबाबतही. मराठी मुमूर्षू भाषा झाली आहे, हे विधान मराठीची आजची स्थिती तपासून पाहिली तर भावनिक वाटते ऐवढेच. मराठी भाषा मरणासन्न मार्गावर असती, तर एवढे दोन-अडीच हजार वर्ष अनेक आक्रमणे, आघात घेत टिकली तरी असती का? कोणतीही भाषा टिकवणं जेवढं ती भाषा बोलणाऱ्यांच्या हाती असतं, तेवढंच भाषा वाढवणंही. भाषा संपन्न होण्यासाठी, वाढ होण्यासाठी, ती व्यवहारभाषा होणंही आवश्यक असते अन् यासाठी भाषा बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, वापरणाऱ्या लोकांमध्ये तिच्याविषयी आस्था असणंही आवश्यक असते.

स्वभाषेला कमी लेखून, अन्य भाषेच्या थोरवीचे पोवाडे गात, त्या भाषा कशा प्रगत वगैरे आहेत, म्हणून आपल्या भाषेबाबत उगीच चिंता व्यक्त करीत राहणे कितपत संयुक्तिक आहे? अन्य भाषांमध्ये ज्ञानाचे केवढे मोठे संचित आहे, असे म्हणून कोणतीही भाषा संपन्न वगैरे होत नसते. स्वभाषेला दुय्यम मानून तिच्याबाबत चिंतायुक्त सुरांनी बोलण्यापेक्षा; विश्वातील भाषांमधून परिणत ज्ञान आमच्या भाषेत आणण्यासाठी आपण काय केले आहे, करतो आहोत याचा विचार होणे आवश्यक आहे. कधीकाळी ब्रिटनमधील अभिजनवर्ग फ्रेंच भाषा बोलणे प्रतिष्ठेचे मानून इंग्रजीला फारसं महत्व देत नव्हता. पण आज इंग्रजीचा चौफेर उधळलेला वारू तुफान वेगाने धावताना दिसतो आहे. इंग्रजांनी हा चमत्कार काही एकदोन दिवसात केला नाही. इंग्रजी जागतिक परिमाणात सामावली, कारण अन्य भाषांमधील संकल्पना, शब्द, विचार त्यांनी आत्मसात केले, म्हणूनच ना! बदलाचे वारे त्यांनी आपल्या अंगणी येऊ दिले नसते, तर त्यांना हे शक्य तरी झाले असते का? जे कधीकाळी इंग्रजीला जमले, ते मराठीने विद्यमानकाळी का करू नये? जागतिकीकरणात आम्ही अगतीकरणाच्या गाथा का वाचीत बसावे? आमच्या भाषेला आम्हीच समृद्ध करू शकतो, असा विश्वास अंतर्यामी असल्याशिवाय भाषेच्या प्रगतीचे नवे पथ निर्माण करता येत नाहीत.

काही वर्षापूर्वी कवी कुसुमाग्रजांनी मराठीच्या स्थितीविषयी भाष्य करताना ‘डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर लक्तरे, अशा वेशात मराठी मंत्रालयाच्या दारात उभी आहे.’ असे म्हटले होते. त्याचं हे विधान मराठीची विकलांग अवस्था अधोरेखित करणारे होते. मराठीच्या या अवस्थेत आज बदल झाला आहे का? असल्यास किती? या प्रश्नाचं उत्तर शोधणं तसं अवघडच. पण मराठी जगली आहे. नव्हे, आज सुमारे अकरा कोटी लोकांची ती भाषा आहे. भाषा बोलणाऱ्यांच्या संखेनुसार शोधलंच तिचं अस्तित्व, तर जगात पहिल्या दहाबारा क्रमाकांमध्ये आहे. असे असूनही तिच्या विकासगामी, वर्धिष्णू वाटचालीवर मर्यादा येत आहेत. यास आम्ही मराठी माणसंच कारण आहोत का?

विश्वातील ज्ञानची कवाडे आपल्याला उघडून पाहता यावीत, संपर्कसाधता यावा, संवाद घडावा, म्हणून जगाशी संवाद घडवू शकणारी इंग्रजी आत्मसात करणे आवश्यकच; पण हे ज्ञान फक्त इंग्रजी भाषेतून आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं तरच शक्य होतं, मराठीतून हे घडणं अवघड आहे, असं मानणं आमची मानसिक अंधश्रद्धा आहे. शिक्षणात इंग्रजी माध्यम आल्याने आपण प्रचंड प्रगतीचे धनी होऊ, आपलं व्यक्तित्व सर्वांगाने बहरेल; या आम्ही करून घेतलेल्या समजाला म्हणायचे तरी काय? माझ्या गावातल्या ज्या मातीचं सत्व आणि स्वत्व घेऊन मी वाढलो, शिकलो, त्या शिक्षणाची भाषा आणि माध्यम मराठीच होते. मराठी शिक्षणाने मला, माझ्यासारख्या अनेकांना घडवलं. मायबोलीने दिलेले आत्मविश्वासाचे पाथेय सोबत घेऊन स्वतःला घडवलं. सन्मानाने जगण्यास पात्र बनलो, ते मातृभाषेतून मिळालेल्या संस्कारांमुळेच.

आडवळणी असणाऱ्या एखाद्या लहानशा गावातही हल्ली शिक्षणविषयक आस्था जाणवण्याइतपत ठळक झाली आहे. शिक्षणाचं महत्त्व अडाणी आईबापालाही बऱ्यापैकी कळायला लागले आहे. मुलांना शिकवून भविष्यात सुखाचे चार क्षण आपल्या अंगणी आणता येतील, अशी आशा त्यांच्या मनात उदित झाली आहे. आपली मुलं शिकावीत म्हणून परिस्थितीशी धडका देत, सीमित का असेनात; पण ते प्रयत्न करतायेत. पुरेशा शैक्षणिक सुविधा नाही देता आल्या, तरी गावागावात शाळा उभ्या राहत आहेत. इंग्रजी माध्यमाचे मळवट ललाटी लेखून पब्लिकस्कूलपासून लोकलस्कूलपर्यंतच्या चकचकीत बसेस पोरांना शाळेत आणण्यासाठी आणि परत घरी सोडण्यासाठी गावातून फिरत आहेत. गावी गेलो असताना माझ्याही गावात असंच काहीसं बदललेलं शैक्षणिक पर्यावरण दिसलं. हे पाहून खरंतर कुतूहल वाटलं आणि आनंदही. म्हटलं चला, आपल्या गावातील पोरं काहीतरी वेगळ्या वाटेने आणि वेगळे शिक्षण घेत आहेत. आमच्या मानाने आताची पिढी नशीबवान आहे. टाय-बूटसह गणवेश परिधान करून शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांकडे शेतात कामासाठी निघालेले आईबाबा कौतुकाने पाहत असल्याचे दिसले. मुलं शाळेत पाठ करून घेतलेली गाणी इंग्रजीतून बोलू लागली. आईबाबांना मॉम-डॅड म्हणायला लागली. त्याचं बोलणं ऐकून आईबाप हरकून गेले आहेत. मुलांकडे पाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान त्यांना वाटते आहे. निदान त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तरी तसे जाणवते.

मुलांचं उज्ज्वल (?) भविष्य घडविण्यासाठी शेतात राबणारे त्यांचे आईबाबा अशा स्कूलची काही हजारात आकडा असणारी फी द्यायला लागले. मात्र मोफत शिक्षण देणाऱ्या सरकारच्या शाळा विद्यार्थी पटसंख्या जुळवताना हैराण झाल्या आहेत. बरं, ज्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या कधी इंग्रजीचं अक्षरही कोणी पाहिलं नाही, त्यांचा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्याचा अट्टाहास केवळ अज्ञानमूलक विचारातून मनात उदित झालेला नाही का? याचा अर्थ त्यांनी आपल्या अपत्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून शिकवू नये, असा अजिबात नाही. पण निदान आजूबाजूला थोडं तरी पाहावं की नाही? केवळ कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा कुणी आपल्या मुलास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवले. त्याचे पोर कदाचित स्मार्ट वगैरे झालं असेल, म्हणून आपलंही मूल तसंच होईल, हा वेडा आशावाद का असावा? ते तसं व्हावं म्हणून ऐपत नसताना त्यांच्याप्रमाणेच सगळं करण्याचा अट्टाहास का? हे कितपत योग्य आहे?

आपल्या आजूबाजूच्या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पीक उदंड आलेलं दिसत आहे. दुसऱ्याबाजूला मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. मराठी शाळा ओस पडत जाणं आणि अन्य माध्यमांच्या शाळांचे आकर्षण वाढत जाणे याला मराठीची वैभवशाली वाटचाल, असं आपण म्हणावं का? बरं, इंग्रजी माध्यमातून शिकल्यानं प्रचंड विकास वगैरे झाल्याची अपवाद वगळता, अशी कितीशी उदाहरणे आपल्या आसपास आहेत? आपली भाषा जतन करणं आपल्या सगळ्यांचं काम; पण गेल्या तीसचाळीस वर्षात आम्ही मराठी समाजाने आणि भाषा टिकवण्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर देता येईल असे समाजातील धुरिण, जाणकार, शिक्षक, प्राध्यापक आदी मंडळीकडून मराठीची वाट लागण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न; अपवाद वगळले, तर कितीसे झाले आहेत? वेतनाचा विकास, हाच आमच्या मराठीचा विकास समजून आम्ही काम करीत आहोत का? असा प्रश्न समाज करीत असेल, तर चुकतो कोण आहे? समाज की शिक्षक.

मराठी विषयाचा तास वर्गात सुरु आहे. मुलं तासात रंगली आहेत. साहित्याच्या आस्वादाचं इंद्रधनुष्य त्यांच्या चेहऱ्यावर विलसत आहे. मुलं स्वतःला विसरली आहेत. आणि शिक्षक देहभान हरपून साहित्यरंगाची वर्गात मुक्त उधळण करीत आहेत. दोघांची ब्रह्मानंदी टाळी लागली आहे. ही दृश्ये अपवादानेच वर्गातून दिसत असतील, तर भाषेला वैभव कसे प्राप्त होईल? अवघड सोपं करून सांगतो तो शिक्षक आणि सोपं अवघड करून सांगतो तो प्राध्यापक, असं विनोदाने म्हटलं जातं. यात खरंच तथ्य असेल का? वर्गामधून आजही अध्यापनाला परंपरांचे पायबंद पडलेले दिसतात. पाठाचं वाचन, कठीण शब्दांचे अर्थ, जमल्यास थोडं वेगळं विवेचन, आयत्या नोट्सचा रतीब आणि थोडा गृहपाठ; म्हणजे मराठीचे अध्ययन, अध्यापन संपन्न झाले असं होत नाही. मराठी विशेष विषय घेऊन एम.ए. बी.एड. पदवी धारण करणाऱ्या, मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या काहींना मराठीचे व्याकरण शिकवताना धाप लागत असेल, धड चार वाक्ये अलंकारांनी मोहरलेल्या वाक्यांनी, तर्कशुद्ध, वैचारिक प्रगल्भतेने बहरलेल्या शब्दांनी बोलता येत नसतील, तर ‘भाषिक विकासाचं’ दान कोणत्या क्षितिजाला आपण मागावं? भाषावैभवाचा सूर्य कोणत्या क्षितिजावरून उदित होण्याची आपण प्रतीक्षा करावी?

भाषेची संपन्नता हे भाषेला बोलींचं देणं असतं, असं म्हणतात. हे खरेही आहे. बोलीभाषेला नाकं मुरडून प्रमाणभाषा संपन्न होत नसते. बोलीतील निरागसता प्रमाणभाषेला अनुभवसंपन्न करते. भाषा म्हणजे केवळ प्रमाणभाषाच असते का? पुणे, मुंबईकडील लोकांनी बोललेली, प्रमाण म्हणून पुस्तकातून छापलेली आणि सुशिक्षितांच्या व्यवहारात दिसणारी भाषाच तेवढी शुद्ध वगैरे असते का? व्यवहार म्हणून प्रमाणभाषेचा, शुद्धलेखनाचा आग्रह समजून घेऊ शकतो; पण बोलींच्या स्पर्शापासून प्रमाणभाषेला अस्पर्श ठेवणं, म्हणजे भाषेचा विकास का? ग्रामीण परिसरातील लोकभाषेचा लहेजा प्रमाणभाषेने योग्य ठिकाणी आत्मसात का करू नये? नुसत्या बोलीच कशाला; अन्य भाषांमधील मौलिक विचार, संकल्पना, साहित्य मराठी भाषेत यावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच मराठीतूनही असे साहित्य अन्य भाषेत जाणेही आवश्यक आहे. कोशवाड्.मय भाषेला संपन्नता प्रदान करीत असते. तसे अनुवादित साहित्यानेही विश्वातील साहित्याची, तेथील माणसांच्या जीवनाची, संस्कृतीची, जगण्यातील समस्यांची जाणीव होऊन मन प्रगल्भ होत असते. कोशांची मराठीत कमतरता नाही; पण किती जण कोशवाड्.मयाचे परिशीलन करतात? विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवीत जतन, संवर्धन करताना दिसतात? साहित्याचे अनुवादही होत आहेत, नाही असे नाही; पण तरीही ते सीमित आहेत. प्रवाहापेक्षा वेगळी पुस्तके मराठीत तयार होतात. त्यांच्या जेमतेम हजार प्रती विकण्यासाठी विक्रेत्याला वर्षानुवर्षे प्रतीक्षा करायला लागत असेल, तर प्रकाशक अशा पुस्तकांकडे वळतील कितीसे?

दर्जेदार साहित्याचं लेखन, वाचन, चिंतन, मनन, परिशीलन होणे मानसिक तसेच भाषिक विकासासाठी आवश्यक आहे. वर्षभरात मराठी भाषेतून अनेक पुस्तकं प्रकाशित होतात; पण त्यांच्यातील दर्जेदार निकषांपर्यंत पोहचणारी किती असतात? बोटावर मोजण्याइतकीच. ग्रंथप्रदर्शनातून पुस्तक खरेदीचे आकडे कोटी कोटीचे उड्डाणे घेतात; पण येथेही त्याच-त्याच पुस्तकांना परत-परत मागणी असल्याचे जाणकार बोलतात. म्हणजे मराठी मनाची अभिरुची अद्यापही त्याच त्या वलयात फिरत आहे. बरं, या ग्रंथप्रदर्शनातून उपलब्ध असणाऱ्या वैचारिक आणि मानसिक जाणीवा समृद्ध करणाऱ्या पुस्तकांच्या भागाकडे कितीशी गर्दी दिसते? किती पाऊले त्या पुस्तकांकडे वळतात? किती हात ते खरेदी करतात? पुस्तकप्रदर्शनातून माणसं कोणती पुस्तकं पाहतात, खरेदी करतात; हे पाहिलं तर आपल्या अभिरुचीचा दर्जा आपल्यास कळतो. मराठीच्या साहित्यप्रवाहाला संपन्न करणारी अनेक चांगली पुस्तके महाराष्ट्र शाशनाच्या वतीने प्रकाशित करून, फार थोड्या किमतीत वाचकांना उपलब्ध करून दिली जातात. मराठी अभिरुचीचे संवर्धन करणारी, संपन्न करणारी ही पुस्तके. पण ती वेळीच मिळायची मारामार. बऱ्याचदा तर आवृत्ती संपलीचा उद्घोष. मिळालीच तर फक्त मोठ्या शहरातूनच. निदान जिल्हास्तरावर ती नियमित मिळण्यासाठी व्यवस्था करण्याचे शाशनाने ठरविले तर अशक्य आहे का? सरकारी काम अन् सहा महिने थांब, अशी एक म्हण आपल्याकडे आहे. त्याचं प्रत्यंतर अशावेळी यावं का? सर्वच स्तरावरून दिरंगाई असेल, अनास्था असेल तर मराठीच्या संपन्नतेचे स्वप्न सर्व सामान्यांनी पाहण्याच्या नादास लागू नये, हेच खरे.

विद्यमान जग आणि काळ मोबाईल, सोशलमीडिया, इन्टरनेटचा आहे. यांचा वापर मोठ्याप्रमाणावर आज जगात, समाजात होतो आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे मराठीला युनिकोडमध्ये लेखांकित करता यायला लागले. मनाची स्पंदने स्वभाषेत, स्वलिपीत मराठी माणसे संगणकाच्या पडद्यावर अंकित करायला लागली. फेसबुकवर मायबोलीतील संवाद सहज आणि सुगम झाला. गुगलने युनिकोडच्या माध्यमातून मराठी आणि मराठी माणसांच्या भावनांना शब्दांकित करणारे साकव उभे केले. नेटकऱ्यांची मांदियाळी उभी राहिली. त्यांची संख्या वाढायला लागली. ईबुक्स, ब्लॉग्ज हजारोने तयार झाले. यातील काही ब्लॉग्जमधून चिंतनशील विचारांची स्पंदने अंकित होत आहेत, नाही असे नाही. भाषासंपर्काच्या, संवर्धनाच्या वाटा आणि क्षेत्रे खूपच विस्तृत होत आहेत. एवढे तंत्रज्ञान हाती असून आणि विश्व हातात सामावण्याएवढे झाले असूनही माणसं मात्र सुटी सुटी होत चालली आहेत. जात, धर्म, पंथ, भाषा अशा अभिनिवेशाचे परगणे आपल्या आजूबाजूला का उभे राहत आहेत? याने भाषा संपन्न होणे तर दूरच; पण माणूसही संपन्न होणार नाही.

नव्या पिढीचा दृष्टिकोन व्यापक, विस्तृत असल्याचे आपण ऐकतो, तसे दिसतेही; पण व्यापक असणं आणि स्वभाषेबाबत, तिच्या सर्वांगीण विकासाबाबत आग्रही असणं वेगळं. एकीकडे भाषाशुद्धीबाबत आग्रह, तर दुसरीकडे नव्या पिढीने मोबाईल मॅसेज, फेसबुक, व्हॉटसअॅपवर लिहिलेले संक्षिप्त संदेश वाचताना केलेली भाषेची, लिपीची मोडतोड. ही वाचताना आपण कोणत्यातरी अगम्य सांकेतिक लिपीचे वाचन करतो आहोत, की काय असे वाटते. तरुणाईची ही भाषा एकीकडे. तर दुसरीकडे मराठी साहित्यात पदवी घेणाऱ्यांचं मराठी बोलणं, लिहणं एक अगम्य, अतार्किक गोष्टच वाटावी असं.

ब्लॉग्जसारखे प्लॅटफॉर्म एक आशास्थळ आहे; पण येथील विषयांमध्ये फक्त नैमित्तिक, प्रासंगिक विचारांची गर्दीच अधिक. विचार प्रकटीकरणासाठी माध्यम हाती आले; पण प्रगल्भपण यायला अजून अवधी आहे. कालांतराने ते येईलही. वरवरचं लेखन आणि त्यातही उथळपण असल्याचा या लेखनावर समाजाकडून, जाणकारांकडून, बुद्धिमंतांकडून आक्षेप घेतला जातोय, हेही खरंय. पण या भाऊगर्दीत काही चांगले लेखनही हाती लागते. कदाचित कालांतराने या परिस्थितीत परिवर्तन होईलही. लेखनातील उथळपण जाऊन शब्द माणसांच्या जीवनातील समस्यांना भिडणारे असतील, समाजातील परिस्थितीचे वास्तव अधोरेखित करणारे असतील. लेखन जितक्या वैचारिक, गंभीर विषयांकडे वळते तितक्या प्रमाणात भाषा प्रगल्भ विचारांना, वाटांना आपल्यात सामावून घेते, हे वास्तव नाकारता येत नाही.

कालौपघात मराठीला अन्य भाषेतील शब्द स्वीकारावे लागतील. म्हणून काही मराठीभाषा प्रदूषित होणार नाही किंवा होत नाही. काही नवं स्वीकारणं, कालबाह्य असेल ते नाकारणं विद्यमान काळाची अनिवार्यता आहे. नव्याचा स्वीकार करताना नवे शब्द, नवे संदर्भ मातृभाषेत वापरले जात असल्यास त्यांचे शक्य तितके मराठीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या भाषेत प्रतिशब्द तयार करावे लागतील, हेही तितकेच खरे. अरबी, फारसी, इंग्रजी आदी परकीय भाषेतील शब्द मराठीत आले आणि कधीच एकजीव होऊन तिच्यात बेमालूम सामावले आहेत. रुळले आहेत. त्यांनी या भाषेचा संसार सजवला आहे. मराठीला आणखी समृद्धपण येण्यासाठी असेच काही अनेकपदरी काम करावे लागेल.

मराठी केवळ राजभाषा झाली म्हणून सारेच प्रश्न सहज सुटतील, असे मानण्याचे कारण नाही. तिला समाजात हवं ते स्थान लागलीच मिळेल, असेही नाही. समाज जेव्हा मातृभाषेचा वापर जाणीवपूर्वक अधिकाधिक करतो, तेव्हाच भाषेच्या मोठेपणाच्या वाटा जवळ येत असतात. याचा अर्थ अन्य भाषांचा अव्हेर करावा, असे अजिबात नाही. त्या भाषा आत्मसात करणे काळाची अनिवार्य आवशकता आहे. पण मातृभाषेचा यथोचित अभिमान त्यासोबत असणेही तितकेच महत्वाचे आहे. आपली भाषा सीमित राहत असेल, तर आपला समाजही विचारांनी, वर्तनाने सीमित होतो. माणसांचे जगण्याचे अनेक प्रश्न रोजचे आहेत. ते कधी सामाजिक, कधी सांस्कृतिक, कधी आर्थिक आहेत. या प्रश्नांना भिडणारं मन मातृभाषेतून घडणं, घडवणं आवश्यक आहे. व्यवस्थेत परिवर्तन घडवण्यासाठी आधी मन घडवावे लागते. मन घडवण्याचे काम भाषा करते. घडलेली मने परिवर्तनाचे पथ निर्माण करतात. आजच्या विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांच्या जगाला संपन्नतेच्या आकांक्षांचं नवं क्षितिज दिलं आहे. डोळ्यात नवं स्वप्न दिलं आहे. त्याचाच वापर करून स्वप्नपूर्तीपर्यंत आम्ही पोहचायला हवं.

मराठी मरणासन्न अवस्थेत जाईल. तिचं अस्तित्व आणखी काही वर्षांनी इहतलावरून संपेलेलं असेल, असं म्हणण्याचं कोणतंही संयुक्तिक कारण आहे, असं वाटत नाही. कारण सुमारे चारपाचशे वर्षे यवन सत्ताधीशांचे, दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य या देश-प्रदेशावर होतं. या काळात मराठीत बदल घडले नाहीत, असंही नाही. बदल घडले म्हणून ती काही नामशेष झाली नाही. जर ती नामशेष होणारच असती, तर गेले दोनअडीच हजार वर्षे महाराष्ट्रदेशी तिचं अस्तित्व असल्याचे पुरावे तरी मिळाले असते का? आजही मराठी संस्कृतीची, संस्कारांची गंगा अनवरत प्रवाहित आहे, अभंग आहे. संत, पंत, तंत साहित्याने या प्रवाहाला संपन्नता प्रदान केली आहे. जोपर्यंत वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरच्या वाटेने चालत राहतील, महाराष्ट्राचा शेतकरी श्रमाने काळ्या मातीतून हिरवी स्वप्ने रुजवतील, लावण्यांमधून शृंगाराचे रंग बरसत राहतील, छावण्यांमध्ये शूरांच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकायला येतील, भजनांमधून भक्तिरंग भरत राहतील, कीर्तनातून मराठी मनांना आख्याने समृद्ध करतील; तोपर्यंत मराठी अभंग असेल. ती संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेतून, संत तुकोबांच्या गाथेतून, सारस्वतांच्या साहित्यातून, लोकसाहित्यातून, लोककलातून, संस्कृतीच्या पात्रातून जीवनाचे रंग घेऊन; त्यांना नवतेचे साज चढवीत अनवरत वाहत राहील. लोकमानसाच्या अंतर्यामी तिचे स्वर गुंजत राहतील, तोपर्यंत ती अक्षुण्ण असेल. यासाठी गरज आहे, मराठी माणसांनी मराठी अन् मराठमोळेपण जपण्याची.