Rahun Gelela Kahi | राहून गेलेलं काही...

By
अगणित दिव्यांनी आसपासचं अवघं आसमंत उजळून निघालेले आहे. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने धरती न्हाऊन निघाली आहे. सर्वत्र दीपोत्सवाची आनंदपर्यवसायी धावपळ सुरु आहे. घराच्या कोपऱ्यापासून देवाच्या गाभाऱ्यापर्यन्त सारंकाही प्रकाशाने पुलकित झालेलं. प्रकाशाची मुक्त उधळण सुरु आहे. प्रसन्न प्रकाश परिसरात पसरलेला आहे. चैतन्याच्या सुरांचा आनंददायी साज वातावरणाला लाभला आहे. माणसांच्या उत्सवप्रियतेचा आनंदाविष्कार होऊन प्रकाश इहतली विसावतो, पूजनाचा सोहळा बनून प्रकटतो. दिव्यांच्या अनंत रांगांनी तेजाचे रंग धारण करून चैतन्य उभे केले आहे. जीवनाच्या धावपळीत आनंदाचे चार क्षण हाती गवसले म्हणून माणसं सुखावली आहेत. पण या आनंदाची बरसात सगळीकडेच होतेय असेही नाही. आभाळभर पसरलेल्या प्रकाशातील ओंजळभर उजेड आपल्या वाट्याला का नसावा? हा विचार काहींना अवस्थ करत आहे. माणसांच्या गर्दीत हरवलेले काही हताश चेहरे या वाटेवर उभे आहेत. आपल्या वाट्यास आलेल्या अगतिक परिस्थितीला पाहत. त्यांच्या मनात अस्वस्थ कालवाकालव उभी आहे. परिसरात पसरलेल्या प्रकाशातील चिमूटभर उजेड आपल्या अंगणात आणण्यासाठी आपण काहीही करू शकत नसल्याची अस्वस्थता अंतर्यामी घर करते आहे.

नियतीने आखून दिलेल्या चौकटींच्या बाहेर उभ्या असणाऱ्या मनांची असहायता आतल्याआत पोखरते आहे. समोरील प्रश्नांचा गुंता वाढत जातो. अस्वस्थ मन विचारतेय काय करावे? कसे करावे? म्हणजे उजेडाचा कवडसा आपल्या अंधारल्या अंगणात आणता येईल? शोधशोध शोधूनही उत्तर हाती लागत नाही. अशावेळी परिस्थितीला शरण जाण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. ‘आलीया भोगाशी’ हेच विधिलिखित ठरते. समोरच्या परिस्थितीशी धडका देत मार्ग काढण्यासाठी माणसं प्रयत्न करीत आहेत; पण सगळं करुनही फारसं काही हाती न आल्याने दैवाला दोष देत दूर कोणत्यातरी कोपऱ्यात संकोचून उभी आहेत. विवंचना सोबत घेऊन कसेतरी जगणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती आहेत, ज्यांच्या घरात लखलखत्या दिव्यांचा प्रकाश पोहचलाच नाही. प्रकाशाने भरलेली तबकं त्यांच्यापर्यंत न्यायला दैव विसरलं आहे. दुसरीकडे आनंदाची मुक्त उधळण सुरु आहे. या वर्षावात आकंठ न्हाऊन निघालेली माणसं आपलं घर, अंगण उजळून निघताना पाहत आहेत. वाट्याला आलेल्या प्रकाशातील थोडासा कवडसा अंधारल्या दारापर्यंत न्यायची वाट कळत नकळत प्रकाशाच्या पखरणीत विसावणाऱ्याकडून विस्मरणात जाते.

माणसांच्या जगात अनेक घरं अशीही असतील, जेथे विवंचनेमुळे हवी असणारी आवश्यक वस्तूही आणता येत नसेल. मात्र, काही सुदैवी घरं अशीही असतील जेथे हौसेला कोणतेच मोल नसल्याने काही हजारांची ‘स्मार्ट’ खरेदी सहज केली जात असेल. वस्तूच्या किंमतीचा विचार कदाचित कुणाच्या गावीही नसेल. ज्यांच्या हाती पैसा नावाचा चंद्र विसावला आहे, ते त्याचा आल्हाददायक गारवा अनुभवत आहेत; पण तो हाती नसल्याने ज्यांच्या जीवनात अभावाची सोबत घडते आहे, त्यांच्यासाठी जगणं अंधारयात्रा ठरत आहे. अंधारवाटेने चालणे ज्यांचे प्राक्तन ठरले आहे. अशा पथिकाना आम्ही किती आठवतो? या लोकांच्या जगण्यात एवढा विरोधाभास का असावा? असा विचार आपल्या मनात कधीतरी येतो का? देशात कोणत्यातरी कोपऱ्यात अशीही काही माणसे आहेत, ज्यांना हाती पैसा नसल्याने आवश्यक गरजांची पूर्ततासुद्धा करता येत नाही. अनेक असेही आहेत जे ऑन लाईन शॉपिंगवर सवलत आहे, म्हणून कारण नसताना हजारो रुपयांच्या वस्तूंची खरेदी करतायेत. वस्तू खरेदी करायला कोणाची काहीच हरकत असण्याचा प्रश्न नाही; पण खरेदी करताना आवश्यकता किती आहे, हे लक्षात घेतले जाते का?

काहींना वाटेल की, आमच्याकडे हे करण्यासाठी आहे पैसा आणि परिस्थिती, मग आम्ही का करू नये? हे सगळं करायला कोणाची हरकत नाहीये. नसावी. आपल्याकडे नियतीने दिलेली सगळी सुखं आहेत. त्या सुखाचा उपभोग जरूर घ्यावा; पण इतरांसाठीही त्याचा थोडा विनियोग करायला काय हरकत असावी? समाजातून मिळवलेल्या संपत्तीचा समाजासाठी थोडातरी विनियोग आमच्या हातून घडायला नको का? देवदर्शनाला गेल्यावर आत्मिक समाधानासाठी हजारोंच्या देणग्या देताना आमचा हात आखडत नाही, पण सामाजिक कार्यासाठी काही देताना आमचे हात का अवघडतात? आमचा तोच हात माणसातल्या देवाला पूजताना का थांबतो? जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, रानी, वनी  देवाचे अस्तित्व असल्याच्या वार्ता करायच्या. तो अरत्र, परत्र, सर्वत्र असल्याचे आध्यात्मिक तत्वज्ञान सांगत राहायचे. अध्यात्माचे ज्ञान आम्हाला असावे; पण सामाजिक परस्थितीबाबत भान नसावे का? आमच्या आत्मभानाला माणसातला देव दिसू नये का? हृदयातला भगवंत हृदयात उपाशी राहणे, हा वर्तनाचा विपर्यास आहे.

आप्तांकडे गेल्यावर गरज नसतानाही आग्रहाने वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेल्या डिश हाती कोंबल्या जातात. समोरचा व्यक्ती नकार देत असेल तरीही त्याच्या हाती हे पदार्थ ठेवले जातात. आवश्यकता नसतानाही ते त्यांना देण्यात असा कोणता आनंद सामावलेला आहे? खरंतर त्यांचं आपल्या भेटीला येणं हाच आनंद आहे, असे आपण का मानू नये? त्यांना हे सगळं नको असेल, त्याऐवजी कोण्यातरी उपेक्षितांपर्यंत हे पदार्थ आस्थेने पोहचवले तर त्यातून मिळणारा आनंद खऱ्याअर्थाने सण असेल. वंचित चेहऱ्यावर प्रसन्न समाधान बनून पसरलेला प्रकाश जगातल्या कोणत्याच दिव्याला निर्माण न करता आलेला उजेड असेल. औपचारिकता म्हणून डिशमधील दोन घास समोरच्यांना वाईट वाटू नये, म्हणून नावापुरते खाल्ले जातात आणि राहिलेलं तसंच टाकून देतो. दूर कुठेतरी एखाद्या उपेक्षित कोपऱ्यात यातील काहीच आपल्या लहानग्या लेकरांना मी का देऊ शकत नाही, म्हणून परिस्थितीशरण गरिबीत जगणाऱ्या एखाद्या गृहिणीच्या डोळ्यात व्यथित अंत:करणाने टचकन पाणी उभं राहतं. त्या विकल मातेच्या अगतिक डोळ्यात उभं राहणारं पाणी, पदार्थ टाकून देताना का दिसत नसावे? अशा परिस्थितीतही माणसं जगत आहेत, हेही आम्हाला यावेळी आठवू नये का? दीपपर्वाच्या कोणत्यातरी शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने हजारो रुपयांच्या दागिन्यांची केवळ हौस म्हणून खरेदी होते. काही दिवस मिरवल्यानंतर हे दागिने एकतर लॉकरमध्ये स्थिरावतात किंवा तिजोरीत जाऊन विसावतात. पण दुसरीकडे सौभाग्याच्या संदर्भांशी जुळलेल्या भावनेतून पत्नी अनेक दिवसापासून साध्याशाच मंगळसूत्राची मागणी आपल्या यजमानाकडे करते आहे. काहीही करून तिच्या सौभाग्याच्या आस्थेचं प्रतीक निदान तिच्या समाधानासाठी आणून द्यावं, हे कधीपासून मनात असूनही अनेक कारणांनी मनात राहिलेल्या इच्छेला पूर्ण करता न आलेला, म्हणून पत्नी हाच आपला अनमोल दागिना आहे, अशी मनाची समज घालून वर्तणारा हताश पतीही या जगात आहे, हे जगण्याच्या धावपळीत आमच्याकडून बघायचे राहूनच जाते.

जगण्याच्या संघर्षात आनंद देणारी अनेक सुखं आयुष्यातून नियतीने हद्दपार केलेली असतात. त्यांच्या अंधारल्या जीवनात थोडातरी उजेड पेरण्याची व्यवस्था आपल्या समाजाला निर्माण करणे अवघड आहे का? इच्छा असूनही प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे स्वतःसाठी एकही नवा कपडा घेता न आलेली असंख्य माणसे आपल्या आसपास असतील. मनात असूनही एक साधासा ड्रेसही घेता आला नसेल. कारण कधी मुलांच्या शिक्षणाचा, तर कधी अनपेक्षित खर्चाचा, तर कधी जगण्याचाच प्रश्न समोर आवासून उभा होता. प्राथमिकता कशाला द्यावी या विवंचनेत बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्यात. एकेक प्रश्न सोडवताना दमछाक होत गेली. त्यांच्यामागे धावताना स्वतःसाठी काही घेताच आले नाही, म्हणून कधी तक्रार केली नाही, असे असंख्य आईबाप, बहिणभाऊ आपल्या नजरेतून निसटले असतील. केवळ काहीतरी खरेदी करायचे म्हणून आपण कपड्यांची खरेदी करतो. आवश्यकता असूनही परिस्थितीवश कपडे खरेदी करता आले नाहीत, अशांचे स्मरण आपणास अनावश्यक खरेदी करताना असू नये का?

जगात अशीही अनेक माणसे आहेत, ज्यांच्या अंगावर धड वस्त्रे नाहीत. आम्हांला मात्र आम्हीच घेतलेल्या कपड्यांचा कधी रंग आवडत नाही. कधी ते वापरायचा कंटाळा येतो. कधी फॅशन आउट डेटेड झाली म्हणून अवेळी अडगळीत टाकले जातात. यावेळी सामाजिकतेचे थोडेसे भान मनात का उदित होत नसावे? परिस्थितीशरण अगतिक माणसांच्या ओटीत नियती समृद्धीचे दान टाकायला विसरली आहे, असे अनेक अभागी जीव आला दिवस ढकलत जगत आहेत. माणूस म्हणून इहलोकी जन्माला आलेल्या; परंतु माणूस म्हणून जगण्यासाठी अहर्निश संघर्षरत राहूनही फारसं काहीच हाती न लागलेली असंख्य माणसे आपल्या आसपास आहेत. अशी दुर्लक्षित माणसं आपल्या प्रामाणिकपणालाच संपत्ती मानून जगत आहेत. परिस्थितीने सर्वबाजूंनी कोंडी केलेली असूनही, आहे त्यात समाधान मानून जगणारी ही माणसं आमची आहेत, याचं स्मरण असणं आवश्यक नाही का? दुर्दैवाने यांनी व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला तर... आमचा आनंद आमच्याजवळ उरेलच किती? परिस्थतीच्या भोवऱ्यात भोळवंडून निघालेली, दुर्दैवाच्या दशावतारात गुरफटलेली अशी किती माणसे आनंद साजरा करताना आम्हाला आठवतात? म्हणून, ज्यांच्याकडे नियतीने दिलेलं सगळं काही आहे; त्यांना जरा समजू दे की, जगात परिस्थितीच्या चाकाच्या आकाभोवती अनवरत फिरणारे असेही अनेक उपेक्षित, वंचित, दीन, दुःखी जीव आहेत. ज्यांचं रोजचं जगणं कधीही न थांबणारी संघर्षयात्रा आहे. व्यवस्थेत सरपटत कसेतरी जगणारी ही माणसं रोजच आपुले मरण आपल्या डोळ्यांनी अनुभवतात. त्यांच्याही मनात सुखाची आस असते. सुखांनीमंडित जगातील सगळेच नाहीत; पण काही थोडे तरी रंग आपल्या मिळावेत. सगळं जगणं नाही; पण जीवनाचा एखादा पदर तरी रंगवला जावा, असे वाटत असते. रंगांचे इंद्रधनुष्यच काय, पण त्यातील एखादा काळापांढरा रंगसुद्धा यांना न देता परिस्थितीशरण जगण्याचे दान नियतीने दिले आहे. वाट्याला आलेल्या जगण्याला आपले नशीब समजून मुकाटपणे चालणारी ही माणसं आपल्या जीवनाचा नम्रपणे शोध घेत आहेत.

आपल्या आसपास अशी असंख्य माणसे आहेत. कधी रस्त्यावर आहेत. कधी फुटपाथवर आहेत. कधी जगण्याच्या वाटा शोधत रानोमाळ भटकत भटक्यांचं आयुष्य जगत आहेत. कधी मानवनिर्मित सुविधांचा कोणताच प्रकाश पोहचू न शकलेल्या प्रदेशात आपली संस्कृती सांभाळत टिकून आहेत. झगमग जगापासून कोसो दूर कुठे तरी. त्यांच्या जगण्याची तगमग आम्ही किती आठवतो? दैवाने ललाटी लिहलेला परिस्थितीचा वणवा संपून परिवर्तनचा वसंत अशा अभाग्यांच्या आयुष्यात कधी बहरेल? समृद्धीचे भरभरून फुललेले मळे नकोत, निदान सुखाची चार रोपटी तरी त्यांच्या अंगणात रुजावीत, म्हणून प्रकाशाचा थोडा कवडसा अंधारल्या अंगणात आपणास नेता येणार नाही का? आस्थेची पणती हाती घेऊन एक पाऊल उचलता येणार नाही का? चालत्या पावलांनी परिवर्तनाचे पथ निर्माण होतील. कदाचित आसपासच्या आसमंताचे रंग बदलायला वेळ द्यावा लागेल; पण बदल घडेल हे नक्की, कारण जगात एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे परिवर्तन. माणूस हा प्रगमनशील, परिवर्तनशील प्राणी आहे. त्याला परिवर्तनाइतके काहीही प्रिय नाही, हेही खरेच आहे, नाही का?

0 comments:

Post a Comment