Prema Tuza Rang Kasa | प्रेमा तुझा रंग कसा?

By
रोमियो-ज्यूलियट, लैला-मजनू, बाजीराव-मस्तानी ही नावे इतिहासाच्या पात्रातून वाहत प्रेम परगण्यात चिरंजीव झाली. या नावांभोवती कधी संशयाचे धुके दाटले आहे, कधी त्यांना विस्मयाचे वलय लाभले आहे. निस्सीम प्रेमाचे संदर्भ म्हणून माणसांच्या मनात ती आजही आहेत. त्याग, समर्पण, निष्ठा या भावनांना आपल्यात सामावून घेणारी ही नावे अमर्याद, अथांग प्रेम कसे असते, याची साक्ष देत स्मृतीतून विहरत आहेत. प्रेमपरगण्यात जगलेल्या या जोड्यांच्या जीवनाला अक्षय आशय प्राप्त झाला आहे. यांनी केलेले प्रेम उत्कट प्रेमाचा भावस्पर्शी आविष्कार होता. प्रेमाचे असे समर्पणशील क्षण किती जणांच्या आयुष्यात येतात? माहीत नाही. पण प्रेमभावनेशी कोणत्यातरी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कारणाने माणूस परिचित असतो. प्रेमाबाबत प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते एवढेच. काहींचं प्रेम मनातल्या मनात समीप राहणं असतं, तर काहींचं मनात उगम पावून जनात प्रकटतं, सर्जनाचा गंध लेऊन वहात राहतं. माणूस प्रेमाचा भुकेला असतो, असे म्हणतात, हे खरेही आहे. जीवनातून स्नेह बनून वाहणारा प्रेमाचा झरा काढून टाकल्यास मागे काय उरेल, हाही एक प्रश्नच आहे.

‘प्रेम’ शब्दाला शक्यतांच्या कोणत्या मर्यादांमध्ये स्थापित करता येईल, हे त्यावेळची परिस्थिती ठरवीत असते. म्हणूनच ते परिस्थिती सापेक्ष आहे. प्रेम शब्दाचे अर्थ शोधताना त्याचं अमर्याद, अथांग असणं लक्षात घेतलेले असतेच असे नाही. कोणाचे तरी कोणावर असणारे प्रेम, म्हणजे ‘विषयाच्या गुंत्यात गुरफटलेली मने.’ अशीच धारणा बहुदा दिसते. समाजाचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित विचारांनी घडणाऱ्या आकलनाच्या वर्तुळात ठरत असल्यामुळे प्रेमातील तरल भावनेला, नात्यातील ओलाव्याला बाधित करतो. प्रेम म्हणजे विशिष्ट वयातील कोणीतरी तो आणि कोणीतरी ती, असेच गृहीत धरून व्याख्या केली जाते. हा अनुदार विचार प्रेमाकडे बघण्याच्या बंदिस्त चौकटींतून तयार झालेला असतो. कोणातरी दोघांमध्ये असणाऱ्या प्रेमाच्या भावस्पर्शी नात्यातून निर्माण होणारा मनाचा गुंता बहुदा समजून घेण्याचा प्रयत्न झालेला नसतो. प्रेमात असेही काही असू शकते, हे गृहीत धरण्याची समाजाची बऱ्याचदा मानसिक तयारी नसते.

कोणत्यातरी चित्रपटातील नायक-नायिकेच्या प्रेमालापाची पडद्यावरील दृश्ये पाहून आनंद होतो, हे खरंय. पण ते प्रेम काही खरे नसते, याची जाणीव चित्रपट पाहताना मनात कायम असते. तरीही भावनिक पातळीवर आपणास त्याच्याशी जुळवून पाहतो. क्षणभर का असेना, ते आपल्या परिचयाचे आहे असेही वाटते. पण वास्तवात असं काही दिसलं की, आमच्यातील समाजपरायण भाव नको तेव्हा, नको तितके जागे होतात. मॉरल खळबळून उभे राहते. मग सुरु होतं पोलिसिंग. एक सीमित मर्यादेत हे ठीक आहे. प्रेमाच्या वाटेवरून नात्यांचा शोध घेण्यासाठी निघणारे सगळेच अगदी असे-तसेच असतात, अशी समजूत करून घेतो. समजा तसं काही असलं, तरी त्यांना व्यापकपणाच्या परिघात का पाहत नाहीत? नियतीने जोडलेल्या त्यांच्या नात्यातील भावना खऱ्या नाहीतच, असे कशावरून? अर्थात यापाठीमागे बरेवाईट काही अनुभवही असू शकतात. जे असं मत ठाम करायला बाध्य करतात. पण ते मत कायमसाठी असू शकत नाही. कारण, परिस्थिती परिवर्तनीय असते. यातील काही वैयक्तिक भावनेतून एकत्र येतही असतील, म्हणून तो काही सर्वमान्य नियम होत नाही.

प्रेम या शब्दाचं आकाश अफाट, अमर्याद आहे. प्रेम फक्त त्याचं आणि तिचंच नसतं. आणखीही काही असू शकतं. ते कोणावरही करता येते. त्याच्या प्रकटीकरणाचे आविष्कार भिन्न असू शकतात. आपले आपल्या कुटुंबावर प्रेम असते. नात्यांवर आपला जीव जडलेला असतो. आप्तस्वकीयांवर, आईवडिलांवर आपले प्रेम असते. बहीण-भाऊ नात्यातला स्नेह अथांग असतो, गहिरा असतो. मैत्रीच्या नात्यातील स्नेहगंध अमर्याद असू शकतो. कधीकधी दोन अनोळखी व्यक्तींच्या परिचयातून निर्माण होणारा स्नेह नात्यांतील नावांच्या कोणत्याही चौकटीत कोंबता येत नाही. कितीतरी नात्यांना आपल्यात सामावून प्रेमाचा निर्झर वाहत असतो. नात्यातील तरलपण समजण्यासाठी तो भाव अंतर्यामी उदित व्हायला लागतो. आईच्या वात्सल्यातून प्रकटणाऱ्या प्रेमाला कुणाच्या आदेशाची गरज नसते. बहीण-भावातील लटकी भांडणे प्रेमाचा गोडवा व्यक्त करीत असतात. मैत्रीचा गंध लेवून सजलेले प्रेम निरपेक्ष असू शकते. प्रेमाचा परिमल सोबत घेऊन प्रमुदित होणारे मन नव्या परिभाषेचे पाठ लेखांकित करीत असते. त्याला नात्यांचे नाव द्यायची गरजच नसते. मनी उमलणारे सहजभाव प्रेमाचे मळे फुलवीत असतात. स्नेहाचे साकव उभे करीत असतात. नात्यांमधून बहरणारा स्नेह नवा वसंत फुलवत असतो.

देशाच्या मातीवर, भाषेवर, संस्कृतीवर, इतिहासावर आपण प्रेम करतो. माणसाच्या प्रेमाची परिणती त्यागात, समर्पणात असते. देशाला देव समजायला लावणारे प्रेम मनात कोणतेच किंतू उपस्थित होऊ देत नाही. माणसं देशासाठी कोणताही त्याग करायला तयार का होतात? कारण एकच, ‘माझे माझ्या देशावर प्रेम आहे’ ही समर्पणशील, सोज्वळ भावना मनात असते म्हणूनच ना! या भावनेतून माणसं वर्ततात, तेव्हा त्यांच्या प्रेमाचा रंग कोणता? हा प्रश्न मनात येत नाही. जगावं का, या प्रश्नांची उत्तरे ज्याला सापडतात, त्याला जगावं कसं, हे प्रश्न पडत नाहीत. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे, असे म्हणणरे पाडगावकर माणसांकडून कोणत्या प्रेमाची अपेक्षा व्यक्त करतात? जगणं सुंदर करण्यासाठी आपलं मनही सुंदर असणं आवश्यक असते. ज्यांना आसपासच्या लहानातल्या लहान वस्तूवरही प्रेम करता येते. त्यांची मने प्रेमाचे गंधगार स्नेहसोहळे झालेले असतात. जीवनाविषयी असणारी भक्ती, जगण्याची आसक्ती, आपलेपणाचा जिव्हाळा प्रेमाचे झरे निर्माण करीत असतात. आपल्या संतमहात्म्यांनी अवघ्या विश्वावर प्रेम केले. विश्व माझे घर आहे, या प्रेमभावनेने वर्तले. देव त्यांच्या प्रेमाचे निधान असेल, अभिधान असेल; पण माणसांविषयी असणारा आंतरिक कळवळा त्यांच्या प्रेमाचा सर्जन सोहळा झाला.

प्रेमभावनेचा परीसस्पर्श ज्याच्या मनाला झाला, त्याला अवघं विश्व आपलंच वाटतं. सर्वत्र आपल्याच अस्तित्वाच्या खुणा त्याला दिसतात. जगात सर्वत्र आनंद भरलेला दिसतो. प्रेमात पडलेल्या माणसांना सगळं जगच ‘आनंदी आनंद गडे...’ असंच वाटत असतं. उमलत्या वयात मनात प्रेमभाव निर्माण होणं स्वाभाविकच. या प्रेमभावामागे विचारांपेक्षा आकर्षणाचा भाग कदाचित अधिक असेलही. अशावेळी कोणीतरी तो आणि ती आपणास ‘मेड फॉर इच अदर’ समजतात. त्याला तिच्याशिवाय, तिला त्याच्याशिवाय आणि दोघांना एकमेकांशिवाय काहीही दिसत नाही. त्यांचं एकमेकांमध्ये गुंतत जाणं म्हणजे प्रेम. अशा निरतिशय प्रेमातून बहरत जाते ते जीवन. पण त्यात वास्तव प्रेमाचा भाग किती आणि आकर्षणाचा किती, हेही जरा समजून घ्यायला नको का? कदाचित आकर्षणच अधिक असण्याची शक्यता असते, असू शकते. प्रेमापेक्षा आकर्षणच अधिक असल्याचे लक्षात येते, तेव्हा उशीर झालेला असतो. हे लक्षात येऊन सावरेपर्यंत बराच मार्ग सोबत चालून झालेला असतो.

तुम्ही करीत आहात, हे प्रेम काही खरे प्रेम नाही. तात्कालिक भावनांचा फुललेला पिसारा आहे, असं समजावून सांगणारे त्यांना प्रेमाचे मारेकरी वाटतात. उमलत्या वयात प्रेमभाव मनात उदित होऊन विचार झापडबंद झालेले असतात. त्यामुळे कुणाचे अनुभवाचे बोल कवडीमोल वाटतात. या वयात प्रेम अनुभवणारे आपण प्रेमात पडलो, असं काहीतरी म्हणतात. पडणे हा अपघातही असू शकतो. पडणे ठरवून घडत नसते. पडताना विचारांना जागाच असते कुठे? अपघातातून सावरावे लागते. ‘लव अॅट फर्स्ट साईट’ पाहताच क्षणी प्रेमात पडणे, ही कल्पना कितीही मोहक वाटत असली, तरी वास्तव वेगळे असते. परस्परांच्या प्रेमात पडण्याला अपघात म्हणा किंवा आणखी काही, क्षणात होणाऱ्या प्रेमात निसर्गाचा सहजभाव किती आणि विचारपूर्वक निर्माण होणारे प्रेम किती? हा प्रश्न उरतोच ना! माणसं मोहाच्या मायावी क्षणांना फसतात. मोहरलेल्या क्षणांचे मनावरील गारुड ओसरते, डोळ्यासमोरील प्रेमाचे दाटलेले धुके विरते, तेव्हा समोरचे सारेकाही सुस्पष्ट दिसायला लागते, जाणवायला लागते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.

प्रेम कोणतीच बंधने वगैरे काही काहीच मानीत नाही, असं म्हणतात. ते खरेही आहे. प्रेम परगण्यात धर्म, जात, पंथ इत्यादी गोष्टी गौण ठरतात. तेथे एकच गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे, तू मला आवडतेस आणि मी तुला. प्रेम करणाऱ्यांना तितके पुरेसे असतेही. प्रेमाला आणखी कसली आलीय परीक्षा. पण दुर्दैवाने अशा परीक्षांना बऱ्याच जणांना सामोरे जावे लागते. सुरवातीच्या गाठीभेटी, अनामिक हुरहूर, आतुरता, कासावीस होणं, हे सारंसारं एका टप्प्यावर मागे पडते. प्रेमाचा फुललेला वसतऋतू कूस बदलतो आणि व्यवहाराचा रुक्ष शिशिर हलक्या पावलांनी दारी येतो. वास्तवाचे विखारी डंख टोचत राहतात. त्यांच्या निरतिशय प्रेमाला बाधित करणारे ‘इगोज्’ यक्षप्रश्न उभे करीत राहतात. त्यांच्याशी धडका देत काही होतात यशस्वी. काहींच्या प्रेमाची सांगता धक्कादायक होणे जणू नियतीची प्राक्तनरेषा ठरते. ओलांडताही येत नाही. तोडताही येत नाही. 

जगाच्या रुक्ष व्यवहारात भावूक प्रेम करपते. प्रश्न अभिमानाची टोकं विखार धारण करतात. कुल, घराणे, जात, धर्माच्या नावाने इभ्रतीच्या भक्कम भिंती उभ्या केल्या जातात. त्यांना उध्वस्त करणं काही सहजसाध्य गोष्ट नसते. समस्यांशी दोन हात करून हवे ते मिळवता येतेही. पण संसाराचा मांडलेला पट कोणत्यातरी कारणाने अनपेक्षित उधळला जातो. प्रेमाचे विणलेले धागे तुटायला लागतात. पीळ सुटायला लागतात. प्रेमात पडताना दोघांचे दोघांच्या दोषांकडे दुर्लक्ष होते किंवा जाणीवपूर्वक केले जाते. व्यवहारात वर्तताना वास्तव अधोरेखित होत जाते. परिस्थितीच्या पेटलेल्या वणव्याची प्रखर दाहकता जाणवायला लागते, तेव्हा जाण आणि भान येते. प्रेमाचा बहरलेला ऋतू संपतो पानगळ सुरु होते. मग सुरु होते दोघांच्या मनातील घालमेल.

प्रेमातील उदात्तभावनेला समजायला विचारांमध्येही उमदेपण असायला हवे. नैतिकतेचे अधिष्ठान असायला हवे. प्रेम करता येणे आणि ते सर्व संकटांशी सामना करून निभावून नेणे; या परस्पर भिन्न बाबी आहेत. कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात, ‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणे, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणे.’ आसपास वणवे लागलेले असताना वास्तवाच्या विखारी विळख्यात जळतानाही टिकून रहायची तयारी ठेवावी लागते. प्रेम कोणालाही, केव्हाही, कसेही करता येईल इतके सहजसाध्य सोपे असते तर... जिवापाड प्रेम कुणी केलेच नसते. पर्यायी विकल्प शोधले गेले असते. प्रेमाच्या मोहरलेल्या क्षणांचे जीवनात महत्त्वच किती उरले असते? प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं, असं सांगता तरी आलं असतं का? टोकदार प्रेम करण्यासाठी मनातील प्रेमभावही धारदार व्हायला लागतात. त्यासाठी प्रेमाचा परिघ समजणे, समजून घेणे आवश्यक असते.

प्रेम विषयात अडते तेव्हा त्यातील भव्यता, उदात्तता संपलेली असते. देहावरील प्रेमाला प्रतीक्षा करायला वेळ नसतो. मनावरील प्रेमाला प्रतीक्षेत आनंद असतो. यासाठी यगानुयुगे थांबण्याची मानसिक तयारी असायला लागते. असे निर्व्याज प्रेम कधी मीरा नाव धारण करून भक्ती बनते. कधी राधा बनून समर्पणाच्या गाथा लेखांकित करते. प्रेमासाठी समर्पित अनेकांनी आपापल्यापुरता इतिहास लेखांकित केला. त्यांच्यापुरते ते शहाजहान आणि मुमताज झाले. त्यांनी स्वप्नांचे आरस्पाणी महाल उभे केले. प्रेमाच्या साम्राज्याचे सम्राट झाले. बाजीराव मस्तानीच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांच्या रणांगणावरील पराक्रमाला सीमा नव्हती; पण या पराक्रमी योध्याच्या प्रेमाला मर्यादांची कुंपणे का पडली असावीत? प्रेमासमोर सारेकाही तुच्छ असले तरी अशावेळी पराक्रमही द्वंदात सापडून हताश का होत असावा? समर्पित प्रेमाची कासावीस व्यवहारी जगास कळू नये का? की कळूनसुद्धा स्वार्थासाठी निस्सीम प्रेमाला वेदीवर चढायला लागते, माहीत नाही. पण समर्पित प्रेमालाच वारंवार परीक्षेला सामोरे जावे लागते.

प्रेमींचे जग त्यांच्यापुरता परीघ निर्माण करते. वातावरण अनुकूल असेल, तर तो क्वचितप्रसंगी विस्तारतोही. आजूबाजूचा अवकाश आपल्यात सामावून घेतो. प्रेमात स्नेहाचे मळे फुलवण्याची किमया असते. माणसांच्या जगातून प्रेम भावनेला काढून टाकले तर... साहित्य, कला सारंकाही ओस पडेल. कवींच्या कविता शून्य होतील. कथा-कादंबऱ्या निरस होतील. रुक्ष, वैराण, निरस जगणे अभिशाप वाटेल. निर्हेतुक वाटेल. उद्यानातील फुले कोमेजतील, उंचावरून स्वतःला झोकून देत कोसळणारे प्रपात आटतील, कोकिळेचे कूजन बेसूर भासेल, पूर्व क्षितिजावरून सोन्याची पखरण करीत येणारा सूर्य निस्तेज दिसेल, शीतल गारवा देणारा चंद्र दाहक वाटेल, गायींचं वासरांसाठी हंबरणे करुण वाटेल. जात्यावरील ओव्यांतील सौंदर्य हरपेल. जग जागच्या जागी असेल. त्याचं चक्रही सुरळीत चालेलं असेल. क्षणाला लागून क्षण येतील आणि जातील; पण त्यांचा चिरंजीव नाद संपलेला असेल. निसर्गाच्या सुंदर चित्रातले रंग विटतील. आनंदाचे निर्झर आटतील. मातीवर, फुलांवर, फुलपाखरांवर चराचरावर प्रेमाची पाखर घालणारं, त्याला जिवापाड जपणारं, आसमंताला आपल्यात सामावून घेणारं प्रेम माणसांच्या आयुष्यातून संपल्यास जीवनगाणे सूर हरवून बसेल.

12 comments:

  1. सर खरच प्रेम हे प्रेम असतं.प्रत्येक नात्यागणिक भावना वेगळ्या असतील,परंतु प्रेम आहे म्हणूनच 'हे जीवन सुंदर आहे.'

    ReplyDelete
  2. सर, या वैश्विक विषयावर इतकं छान सविस्तर लिहील्याबद्दल आभार. पुढच्या लेखनाची वाट पाहतोय

    ReplyDelete
    Replies
    1. आभार नामदेवजी, आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे.

      Delete
  3. फारच छान!प्रेम हे प्रेम असते,तुमचं आणि आमचं सारखं असतं.प्रेमाच वेगळेपण आणि वैशिष्ट्य सांगणारे उत्कृष्ठ लिखाण.👍👍👍

    ReplyDelete
  4. फारच छान!प्रेम हे प्रेम असते,तुमचं आणि आमचं सारखं असतं.प्रेमाच वेगळेपण आणि वैशिष्ट्य सांगणारे उत्कृष्ठ लिखाण.

    ReplyDelete
  5. फारच छान!प्रेम हे प्रेम असते,तुमचं आणि आमचं सारखं असतं.प्रेमाच वेगळेपण आणि वैशिष्ट्य सांगणारे उत्कृष्ठ लिखाण.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद योगेश, जीवनात एकच शाश्वत सत्य आहे ते म्हणजे 'प्रेम' ही अडीच अक्षरे जगण्यातून वजा केली की बाकी शून्यच.

      Delete
  6. गणिताच्या भाषेत, जीवन-प्रेम=नीरसता

    ReplyDelete
    Replies
    1. योगेश, आभार! जीवनाचा शाश्वत रंग प्रेमच आहे. मग ते कुठलेही असू देत.

      Delete
  7. गणिताच्या भाषेत, जीवन-प्रेम=नीरसता

    ReplyDelete
  8. रमाकांत, आभार! तसे लिहता आले असते, पण लिहताना विचार विशिष्ट वर्तुळापुरता सीमित होता.

    ReplyDelete