Rahun Gelela Kahi | राहून गेलेलं काही...

By // No comments:
अगणित दिव्यांनी आसपासचं अवघं आसमंत उजळून निघालेले आहे. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने धरती न्हाऊन निघाली आहे. सर्वत्र दीपोत्सवाची आनंदपर्यवसायी धावपळ सुरु आहे. घराच्या कोपऱ्यापासून देवाच्या गाभाऱ्यापर्यन्त सारंकाही प्रकाशाने पुलकित झालेलं. प्रकाशाची मुक्त उधळण सुरु आहे. प्रसन्न प्रकाश परिसरात पसरलेला आहे. चैतन्याच्या सुरांचा आनंददायी साज वातावरणाला लाभला आहे. माणसांच्या उत्सवप्रियतेचा आनंदाविष्कार होऊन प्रकाश इहतली विसावतो, पूजनाचा सोहळा बनून प्रकटतो. दिव्यांच्या अनंत रांगांनी तेजाचे रंग धारण करून चैतन्य उभे केले आहे. जीवनाच्या धावपळीत आनंदाचे चार क्षण हाती गवसले म्हणून माणसं सुखावली आहेत. पण या आनंदाची बरसात सगळीकडेच होतेय असेही नाही. आभाळभर पसरलेल्या प्रकाशातील ओंजळभर उजेड आपल्या वाट्याला का नसावा? हा विचार काहींना अवस्थ करत आहे. माणसांच्या गर्दीत हरवलेले काही हताश चेहरे या वाटेवर उभे आहेत. आपल्या वाट्यास आलेल्या अगतिक परिस्थितीला पाहत. त्यांच्या मनात अस्वस्थ कालवाकालव उभी आहे. परिसरात पसरलेल्या प्रकाशातील चिमूटभर उजेड आपल्या अंगणात आणण्यासाठी आपण काहीही करू शकत नसल्याची अस्वस्थता अंतर्यामी घर करते आहे.

नियतीने आखून दिलेल्या चौकटींच्या बाहेर उभ्या असणाऱ्या मनांची असहायता आतल्याआत पोखरते आहे. समोरील प्रश्नांचा गुंता वाढत जातो. अस्वस्थ मन विचारतेय काय करावे? कसे करावे? म्हणजे उजेडाचा कवडसा आपल्या अंधारल्या अंगणात आणता येईल? शोधशोध शोधूनही उत्तर हाती लागत नाही. अशावेळी परिस्थितीला शरण जाण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. ‘आलीया भोगाशी’ हेच विधिलिखित ठरते. समोरच्या परिस्थितीशी धडका देत मार्ग काढण्यासाठी माणसं प्रयत्न करीत आहेत; पण सगळं करुनही फारसं काही हाती न आल्याने दैवाला दोष देत दूर कोणत्यातरी कोपऱ्यात संकोचून उभी आहेत. विवंचना सोबत घेऊन कसेतरी जगणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती आहेत, ज्यांच्या घरात लखलखत्या दिव्यांचा प्रकाश पोहचलाच नाही. प्रकाशाने भरलेली तबकं त्यांच्यापर्यंत न्यायला दैव विसरलं आहे. दुसरीकडे आनंदाची मुक्त उधळण सुरु आहे. या वर्षावात आकंठ न्हाऊन निघालेली माणसं आपलं घर, अंगण उजळून निघताना पाहत आहेत. वाट्याला आलेल्या प्रकाशातील थोडासा कवडसा अंधारल्या दारापर्यंत न्यायची वाट कळत नकळत प्रकाशाच्या पखरणीत विसावणाऱ्याकडून विस्मरणात जाते.

माणसांच्या जगात अनेक घरं अशीही असतील, जेथे विवंचनेमुळे हवी असणारी आवश्यक वस्तूही आणता येत नसेल. मात्र, काही सुदैवी घरं अशीही असतील जेथे हौसेला कोणतेच मोल नसल्याने काही हजारांची ‘स्मार्ट’ खरेदी सहज केली जात असेल. वस्तूच्या किंमतीचा विचार कदाचित कुणाच्या गावीही नसेल. ज्यांच्या हाती पैसा नावाचा चंद्र विसावला आहे, ते त्याचा आल्हाददायक गारवा अनुभवत आहेत; पण तो हाती नसल्याने ज्यांच्या जीवनात अभावाची सोबत घडते आहे, त्यांच्यासाठी जगणं अंधारयात्रा ठरत आहे. अंधारवाटेने चालणे ज्यांचे प्राक्तन ठरले आहे. अशा पथिकाना आम्ही किती आठवतो? या लोकांच्या जगण्यात एवढा विरोधाभास का असावा? असा विचार आपल्या मनात कधीतरी येतो का? देशात कोणत्यातरी कोपऱ्यात अशीही काही माणसे आहेत, ज्यांना हाती पैसा नसल्याने आवश्यक गरजांची पूर्ततासुद्धा करता येत नाही. अनेक असेही आहेत जे ऑन लाईन शॉपिंगवर सवलत आहे, म्हणून कारण नसताना हजारो रुपयांच्या वस्तूंची खरेदी करतायेत. वस्तू खरेदी करायला कोणाची काहीच हरकत असण्याचा प्रश्न नाही; पण खरेदी करताना आवश्यकता किती आहे, हे लक्षात घेतले जाते का?

काहींना वाटेल की, आमच्याकडे हे करण्यासाठी आहे पैसा आणि परिस्थिती, मग आम्ही का करू नये? हे सगळं करायला कोणाची हरकत नाहीये. नसावी. आपल्याकडे नियतीने दिलेली सगळी सुखं आहेत. त्या सुखाचा उपभोग जरूर घ्यावा; पण इतरांसाठीही त्याचा थोडा विनियोग करायला काय हरकत असावी? समाजातून मिळवलेल्या संपत्तीचा समाजासाठी थोडातरी विनियोग आमच्या हातून घडायला नको का? देवदर्शनाला गेल्यावर आत्मिक समाधानासाठी हजारोंच्या देणग्या देताना आमचा हात आखडत नाही, पण सामाजिक कार्यासाठी काही देताना आमचे हात का अवघडतात? आमचा तोच हात माणसातल्या देवाला पूजताना का थांबतो? जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, रानी, वनी  देवाचे अस्तित्व असल्याच्या वार्ता करायच्या. तो अरत्र, परत्र, सर्वत्र असल्याचे आध्यात्मिक तत्वज्ञान सांगत राहायचे. अध्यात्माचे ज्ञान आम्हाला असावे; पण सामाजिक परस्थितीबाबत भान नसावे का? आमच्या आत्मभानाला माणसातला देव दिसू नये का? हृदयातला भगवंत हृदयात उपाशी राहणे, हा वर्तनाचा विपर्यास आहे.

आप्तांकडे गेल्यावर गरज नसतानाही आग्रहाने वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेल्या डिश हाती कोंबल्या जातात. समोरचा व्यक्ती नकार देत असेल तरीही त्याच्या हाती हे पदार्थ ठेवले जातात. आवश्यकता नसतानाही ते त्यांना देण्यात असा कोणता आनंद सामावलेला आहे? खरंतर त्यांचं आपल्या भेटीला येणं हाच आनंद आहे, असे आपण का मानू नये? त्यांना हे सगळं नको असेल, त्याऐवजी कोण्यातरी उपेक्षितांपर्यंत हे पदार्थ आस्थेने पोहचवले तर त्यातून मिळणारा आनंद खऱ्याअर्थाने सण असेल. वंचित चेहऱ्यावर प्रसन्न समाधान बनून पसरलेला प्रकाश जगातल्या कोणत्याच दिव्याला निर्माण न करता आलेला उजेड असेल. औपचारिकता म्हणून डिशमधील दोन घास समोरच्यांना वाईट वाटू नये, म्हणून नावापुरते खाल्ले जातात आणि राहिलेलं तसंच टाकून देतो. दूर कुठेतरी एखाद्या उपेक्षित कोपऱ्यात यातील काहीच आपल्या लहानग्या लेकरांना मी का देऊ शकत नाही, म्हणून परिस्थितीशरण गरिबीत जगणाऱ्या एखाद्या गृहिणीच्या डोळ्यात व्यथित अंत:करणाने टचकन पाणी उभं राहतं. त्या विकल मातेच्या अगतिक डोळ्यात उभं राहणारं पाणी, पदार्थ टाकून देताना का दिसत नसावे? अशा परिस्थितीतही माणसं जगत आहेत, हेही आम्हाला यावेळी आठवू नये का? दीपपर्वाच्या कोणत्यातरी शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने हजारो रुपयांच्या दागिन्यांची केवळ हौस म्हणून खरेदी होते. काही दिवस मिरवल्यानंतर हे दागिने एकतर लॉकरमध्ये स्थिरावतात किंवा तिजोरीत जाऊन विसावतात. पण दुसरीकडे सौभाग्याच्या संदर्भांशी जुळलेल्या भावनेतून पत्नी अनेक दिवसापासून साध्याशाच मंगळसूत्राची मागणी आपल्या यजमानाकडे करते आहे. काहीही करून तिच्या सौभाग्याच्या आस्थेचं प्रतीक निदान तिच्या समाधानासाठी आणून द्यावं, हे कधीपासून मनात असूनही अनेक कारणांनी मनात राहिलेल्या इच्छेला पूर्ण करता न आलेला, म्हणून पत्नी हाच आपला अनमोल दागिना आहे, अशी मनाची समज घालून वर्तणारा हताश पतीही या जगात आहे, हे जगण्याच्या धावपळीत आमच्याकडून बघायचे राहूनच जाते.

जगण्याच्या संघर्षात आनंद देणारी अनेक सुखं आयुष्यातून नियतीने हद्दपार केलेली असतात. त्यांच्या अंधारल्या जीवनात थोडातरी उजेड पेरण्याची व्यवस्था आपल्या समाजाला निर्माण करणे अवघड आहे का? इच्छा असूनही प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे स्वतःसाठी एकही नवा कपडा घेता न आलेली असंख्य माणसे आपल्या आसपास असतील. मनात असूनही एक साधासा ड्रेसही घेता आला नसेल. कारण कधी मुलांच्या शिक्षणाचा, तर कधी अनपेक्षित खर्चाचा, तर कधी जगण्याचाच प्रश्न समोर आवासून उभा होता. प्राथमिकता कशाला द्यावी या विवंचनेत बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्यात. एकेक प्रश्न सोडवताना दमछाक होत गेली. त्यांच्यामागे धावताना स्वतःसाठी काही घेताच आले नाही, म्हणून कधी तक्रार केली नाही, असे असंख्य आईबाप, बहिणभाऊ आपल्या नजरेतून निसटले असतील. केवळ काहीतरी खरेदी करायचे म्हणून आपण कपड्यांची खरेदी करतो. आवश्यकता असूनही परिस्थितीवश कपडे खरेदी करता आले नाहीत, अशांचे स्मरण आपणास अनावश्यक खरेदी करताना असू नये का?

जगात अशीही अनेक माणसे आहेत, ज्यांच्या अंगावर धड वस्त्रे नाहीत. आम्हांला मात्र आम्हीच घेतलेल्या कपड्यांचा कधी रंग आवडत नाही. कधी ते वापरायचा कंटाळा येतो. कधी फॅशन आउट डेटेड झाली म्हणून अवेळी अडगळीत टाकले जातात. यावेळी सामाजिकतेचे थोडेसे भान मनात का उदित होत नसावे? परिस्थितीशरण अगतिक माणसांच्या ओटीत नियती समृद्धीचे दान टाकायला विसरली आहे, असे अनेक अभागी जीव आला दिवस ढकलत जगत आहेत. माणूस म्हणून इहलोकी जन्माला आलेल्या; परंतु माणूस म्हणून जगण्यासाठी अहर्निश संघर्षरत राहूनही फारसं काहीच हाती न लागलेली असंख्य माणसे आपल्या आसपास आहेत. अशी दुर्लक्षित माणसं आपल्या प्रामाणिकपणालाच संपत्ती मानून जगत आहेत. परिस्थितीने सर्वबाजूंनी कोंडी केलेली असूनही, आहे त्यात समाधान मानून जगणारी ही माणसं आमची आहेत, याचं स्मरण असणं आवश्यक नाही का? दुर्दैवाने यांनी व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला तर... आमचा आनंद आमच्याजवळ उरेलच किती? परिस्थतीच्या भोवऱ्यात भोळवंडून निघालेली, दुर्दैवाच्या दशावतारात गुरफटलेली अशी किती माणसे आनंद साजरा करताना आम्हाला आठवतात? म्हणून, ज्यांच्याकडे नियतीने दिलेलं सगळं काही आहे; त्यांना जरा समजू दे की, जगात परिस्थितीच्या चाकाच्या आकाभोवती अनवरत फिरणारे असेही अनेक उपेक्षित, वंचित, दीन, दुःखी जीव आहेत. ज्यांचं रोजचं जगणं कधीही न थांबणारी संघर्षयात्रा आहे. व्यवस्थेत सरपटत कसेतरी जगणारी ही माणसं रोजच आपुले मरण आपल्या डोळ्यांनी अनुभवतात. त्यांच्याही मनात सुखाची आस असते. सुखांनीमंडित जगातील सगळेच नाहीत; पण काही थोडे तरी रंग आपल्या मिळावेत. सगळं जगणं नाही; पण जीवनाचा एखादा पदर तरी रंगवला जावा, असे वाटत असते. रंगांचे इंद्रधनुष्यच काय, पण त्यातील एखादा काळापांढरा रंगसुद्धा यांना न देता परिस्थितीशरण जगण्याचे दान नियतीने दिले आहे. वाट्याला आलेल्या जगण्याला आपले नशीब समजून मुकाटपणे चालणारी ही माणसं आपल्या जीवनाचा नम्रपणे शोध घेत आहेत.

आपल्या आसपास अशी असंख्य माणसे आहेत. कधी रस्त्यावर आहेत. कधी फुटपाथवर आहेत. कधी जगण्याच्या वाटा शोधत रानोमाळ भटकत भटक्यांचं आयुष्य जगत आहेत. कधी मानवनिर्मित सुविधांचा कोणताच प्रकाश पोहचू न शकलेल्या प्रदेशात आपली संस्कृती सांभाळत टिकून आहेत. झगमग जगापासून कोसो दूर कुठे तरी. त्यांच्या जगण्याची तगमग आम्ही किती आठवतो? दैवाने ललाटी लिहलेला परिस्थितीचा वणवा संपून परिवर्तनचा वसंत अशा अभाग्यांच्या आयुष्यात कधी बहरेल? समृद्धीचे भरभरून फुललेले मळे नकोत, निदान सुखाची चार रोपटी तरी त्यांच्या अंगणात रुजावीत, म्हणून प्रकाशाचा थोडा कवडसा अंधारल्या अंगणात आपणास नेता येणार नाही का? आस्थेची पणती हाती घेऊन एक पाऊल उचलता येणार नाही का? चालत्या पावलांनी परिवर्तनाचे पथ निर्माण होतील. कदाचित आसपासच्या आसमंताचे रंग बदलायला वेळ द्यावा लागेल; पण बदल घडेल हे नक्की, कारण जगात एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे परिवर्तन. माणूस हा प्रगमनशील, परिवर्तनशील प्राणी आहे. त्याला परिवर्तनाइतके काहीही प्रिय नाही, हेही खरेच आहे, नाही का?

Prema Tuza Rang Kasa | प्रेमा तुझा रंग कसा?

By // 12 comments:
रोमियो-ज्यूलियट, लैला-मजनू, बाजीराव-मस्तानी ही नावे इतिहासाच्या पात्रातून वाहत प्रेम परगण्यात चिरंजीव झाली. या नावांभोवती कधी संशयाचे धुके दाटले आहे, कधी त्यांना विस्मयाचे वलय लाभले आहे. निस्सीम प्रेमाचे संदर्भ म्हणून माणसांच्या मनात ती आजही आहेत. त्याग, समर्पण, निष्ठा या भावनांना आपल्यात सामावून घेणारी ही नावे अमर्याद, अथांग प्रेम कसे असते, याची साक्ष देत स्मृतीतून विहरत आहेत. प्रेमपरगण्यात जगलेल्या या जोड्यांच्या जीवनाला अक्षय आशय प्राप्त झाला आहे. यांनी केलेले प्रेम उत्कट प्रेमाचा भावस्पर्शी आविष्कार होता. प्रेमाचे असे समर्पणशील क्षण किती जणांच्या आयुष्यात येतात? माहीत नाही. पण प्रेमभावनेशी कोणत्यातरी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कारणाने माणूस परिचित असतो. प्रेमाबाबत प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते एवढेच. काहींचं प्रेम मनातल्या मनात समीप राहणं असतं, तर काहींचं मनात उगम पावून जनात प्रकटतं, सर्जनाचा गंध लेऊन वहात राहतं. माणूस प्रेमाचा भुकेला असतो, असे म्हणतात, हे खरेही आहे. जीवनातून स्नेह बनून वाहणारा प्रेमाचा झरा काढून टाकल्यास मागे काय उरेल, हाही एक प्रश्नच आहे.

‘प्रेम’ शब्दाला शक्यतांच्या कोणत्या मर्यादांमध्ये स्थापित करता येईल, हे त्यावेळची परिस्थिती ठरवीत असते. म्हणूनच ते परिस्थिती सापेक्ष आहे. प्रेम शब्दाचे अर्थ शोधताना त्याचं अमर्याद, अथांग असणं लक्षात घेतलेले असतेच असे नाही. कोणाचे तरी कोणावर असणारे प्रेम, म्हणजे ‘विषयाच्या गुंत्यात गुरफटलेली मने.’ अशीच धारणा बहुदा दिसते. समाजाचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित विचारांनी घडणाऱ्या आकलनाच्या वर्तुळात ठरत असल्यामुळे प्रेमातील तरल भावनेला, नात्यातील ओलाव्याला बाधित करतो. प्रेम म्हणजे विशिष्ट वयातील कोणीतरी तो आणि कोणीतरी ती, असेच गृहीत धरून व्याख्या केली जाते. हा अनुदार विचार प्रेमाकडे बघण्याच्या बंदिस्त चौकटींतून तयार झालेला असतो. कोणातरी दोघांमध्ये असणाऱ्या प्रेमाच्या भावस्पर्शी नात्यातून निर्माण होणारा मनाचा गुंता बहुदा समजून घेण्याचा प्रयत्न झालेला नसतो. प्रेमात असेही काही असू शकते, हे गृहीत धरण्याची समाजाची बऱ्याचदा मानसिक तयारी नसते.

कोणत्यातरी चित्रपटातील नायक-नायिकेच्या प्रेमालापाची पडद्यावरील दृश्ये पाहून आनंद होतो, हे खरंय. पण ते प्रेम काही खरे नसते, याची जाणीव चित्रपट पाहताना मनात कायम असते. तरीही भावनिक पातळीवर आपणास त्याच्याशी जुळवून पाहतो. क्षणभर का असेना, ते आपल्या परिचयाचे आहे असेही वाटते. पण वास्तवात असं काही दिसलं की, आमच्यातील समाजपरायण भाव नको तेव्हा, नको तितके जागे होतात. मॉरल खळबळून उभे राहते. मग सुरु होतं पोलिसिंग. एक सीमित मर्यादेत हे ठीक आहे. प्रेमाच्या वाटेवरून नात्यांचा शोध घेण्यासाठी निघणारे सगळेच अगदी असे-तसेच असतात, अशी समजूत करून घेतो. समजा तसं काही असलं, तरी त्यांना व्यापकपणाच्या परिघात का पाहत नाहीत? नियतीने जोडलेल्या त्यांच्या नात्यातील भावना खऱ्या नाहीतच, असे कशावरून? अर्थात यापाठीमागे बरेवाईट काही अनुभवही असू शकतात. जे असं मत ठाम करायला बाध्य करतात. पण ते मत कायमसाठी असू शकत नाही. कारण, परिस्थिती परिवर्तनीय असते. यातील काही वैयक्तिक भावनेतून एकत्र येतही असतील, म्हणून तो काही सर्वमान्य नियम होत नाही.

प्रेम या शब्दाचं आकाश अफाट, अमर्याद आहे. प्रेम फक्त त्याचं आणि तिचंच नसतं. आणखीही काही असू शकतं. ते कोणावरही करता येते. त्याच्या प्रकटीकरणाचे आविष्कार भिन्न असू शकतात. आपले आपल्या कुटुंबावर प्रेम असते. नात्यांवर आपला जीव जडलेला असतो. आप्तस्वकीयांवर, आईवडिलांवर आपले प्रेम असते. बहीण-भाऊ नात्यातला स्नेह अथांग असतो, गहिरा असतो. मैत्रीच्या नात्यातील स्नेहगंध अमर्याद असू शकतो. कधीकधी दोन अनोळखी व्यक्तींच्या परिचयातून निर्माण होणारा स्नेह नात्यांतील नावांच्या कोणत्याही चौकटीत कोंबता येत नाही. कितीतरी नात्यांना आपल्यात सामावून प्रेमाचा निर्झर वाहत असतो. नात्यातील तरलपण समजण्यासाठी तो भाव अंतर्यामी उदित व्हायला लागतो. आईच्या वात्सल्यातून प्रकटणाऱ्या प्रेमाला कुणाच्या आदेशाची गरज नसते. बहीण-भावातील लटकी भांडणे प्रेमाचा गोडवा व्यक्त करीत असतात. मैत्रीचा गंध लेवून सजलेले प्रेम निरपेक्ष असू शकते. प्रेमाचा परिमल सोबत घेऊन प्रमुदित होणारे मन नव्या परिभाषेचे पाठ लेखांकित करीत असते. त्याला नात्यांचे नाव द्यायची गरजच नसते. मनी उमलणारे सहजभाव प्रेमाचे मळे फुलवीत असतात. स्नेहाचे साकव उभे करीत असतात. नात्यांमधून बहरणारा स्नेह नवा वसंत फुलवत असतो.

देशाच्या मातीवर, भाषेवर, संस्कृतीवर, इतिहासावर आपण प्रेम करतो. माणसाच्या प्रेमाची परिणती त्यागात, समर्पणात असते. देशाला देव समजायला लावणारे प्रेम मनात कोणतेच किंतू उपस्थित होऊ देत नाही. माणसं देशासाठी कोणताही त्याग करायला तयार का होतात? कारण एकच, ‘माझे माझ्या देशावर प्रेम आहे’ ही समर्पणशील, सोज्वळ भावना मनात असते म्हणूनच ना! या भावनेतून माणसं वर्ततात, तेव्हा त्यांच्या प्रेमाचा रंग कोणता? हा प्रश्न मनात येत नाही. जगावं का, या प्रश्नांची उत्तरे ज्याला सापडतात, त्याला जगावं कसं, हे प्रश्न पडत नाहीत. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे, असे म्हणणरे पाडगावकर माणसांकडून कोणत्या प्रेमाची अपेक्षा व्यक्त करतात? जगणं सुंदर करण्यासाठी आपलं मनही सुंदर असणं आवश्यक असते. ज्यांना आसपासच्या लहानातल्या लहान वस्तूवरही प्रेम करता येते. त्यांची मने प्रेमाचे गंधगार स्नेहसोहळे झालेले असतात. जीवनाविषयी असणारी भक्ती, जगण्याची आसक्ती, आपलेपणाचा जिव्हाळा प्रेमाचे झरे निर्माण करीत असतात. आपल्या संतमहात्म्यांनी अवघ्या विश्वावर प्रेम केले. विश्व माझे घर आहे, या प्रेमभावनेने वर्तले. देव त्यांच्या प्रेमाचे निधान असेल, अभिधान असेल; पण माणसांविषयी असणारा आंतरिक कळवळा त्यांच्या प्रेमाचा सर्जन सोहळा झाला.

प्रेमभावनेचा परीसस्पर्श ज्याच्या मनाला झाला, त्याला अवघं विश्व आपलंच वाटतं. सर्वत्र आपल्याच अस्तित्वाच्या खुणा त्याला दिसतात. जगात सर्वत्र आनंद भरलेला दिसतो. प्रेमात पडलेल्या माणसांना सगळं जगच ‘आनंदी आनंद गडे...’ असंच वाटत असतं. उमलत्या वयात मनात प्रेमभाव निर्माण होणं स्वाभाविकच. या प्रेमभावामागे विचारांपेक्षा आकर्षणाचा भाग कदाचित अधिक असेलही. अशावेळी कोणीतरी तो आणि ती आपणास ‘मेड फॉर इच अदर’ समजतात. त्याला तिच्याशिवाय, तिला त्याच्याशिवाय आणि दोघांना एकमेकांशिवाय काहीही दिसत नाही. त्यांचं एकमेकांमध्ये गुंतत जाणं म्हणजे प्रेम. अशा निरतिशय प्रेमातून बहरत जाते ते जीवन. पण त्यात वास्तव प्रेमाचा भाग किती आणि आकर्षणाचा किती, हेही जरा समजून घ्यायला नको का? कदाचित आकर्षणच अधिक असण्याची शक्यता असते, असू शकते. प्रेमापेक्षा आकर्षणच अधिक असल्याचे लक्षात येते, तेव्हा उशीर झालेला असतो. हे लक्षात येऊन सावरेपर्यंत बराच मार्ग सोबत चालून झालेला असतो.

तुम्ही करीत आहात, हे प्रेम काही खरे प्रेम नाही. तात्कालिक भावनांचा फुललेला पिसारा आहे, असं समजावून सांगणारे त्यांना प्रेमाचे मारेकरी वाटतात. उमलत्या वयात प्रेमभाव मनात उदित होऊन विचार झापडबंद झालेले असतात. त्यामुळे कुणाचे अनुभवाचे बोल कवडीमोल वाटतात. या वयात प्रेम अनुभवणारे आपण प्रेमात पडलो, असं काहीतरी म्हणतात. पडणे हा अपघातही असू शकतो. पडणे ठरवून घडत नसते. पडताना विचारांना जागाच असते कुठे? अपघातातून सावरावे लागते. ‘लव अॅट फर्स्ट साईट’ पाहताच क्षणी प्रेमात पडणे, ही कल्पना कितीही मोहक वाटत असली, तरी वास्तव वेगळे असते. परस्परांच्या प्रेमात पडण्याला अपघात म्हणा किंवा आणखी काही, क्षणात होणाऱ्या प्रेमात निसर्गाचा सहजभाव किती आणि विचारपूर्वक निर्माण होणारे प्रेम किती? हा प्रश्न उरतोच ना! माणसं मोहाच्या मायावी क्षणांना फसतात. मोहरलेल्या क्षणांचे मनावरील गारुड ओसरते, डोळ्यासमोरील प्रेमाचे दाटलेले धुके विरते, तेव्हा समोरचे सारेकाही सुस्पष्ट दिसायला लागते, जाणवायला लागते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.

प्रेम कोणतीच बंधने वगैरे काही काहीच मानीत नाही, असं म्हणतात. ते खरेही आहे. प्रेम परगण्यात धर्म, जात, पंथ इत्यादी गोष्टी गौण ठरतात. तेथे एकच गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे, तू मला आवडतेस आणि मी तुला. प्रेम करणाऱ्यांना तितके पुरेसे असतेही. प्रेमाला आणखी कसली आलीय परीक्षा. पण दुर्दैवाने अशा परीक्षांना बऱ्याच जणांना सामोरे जावे लागते. सुरवातीच्या गाठीभेटी, अनामिक हुरहूर, आतुरता, कासावीस होणं, हे सारंसारं एका टप्प्यावर मागे पडते. प्रेमाचा फुललेला वसतऋतू कूस बदलतो आणि व्यवहाराचा रुक्ष शिशिर हलक्या पावलांनी दारी येतो. वास्तवाचे विखारी डंख टोचत राहतात. त्यांच्या निरतिशय प्रेमाला बाधित करणारे ‘इगोज्’ यक्षप्रश्न उभे करीत राहतात. त्यांच्याशी धडका देत काही होतात यशस्वी. काहींच्या प्रेमाची सांगता धक्कादायक होणे जणू नियतीची प्राक्तनरेषा ठरते. ओलांडताही येत नाही. तोडताही येत नाही. 

जगाच्या रुक्ष व्यवहारात भावूक प्रेम करपते. प्रश्न अभिमानाची टोकं विखार धारण करतात. कुल, घराणे, जात, धर्माच्या नावाने इभ्रतीच्या भक्कम भिंती उभ्या केल्या जातात. त्यांना उध्वस्त करणं काही सहजसाध्य गोष्ट नसते. समस्यांशी दोन हात करून हवे ते मिळवता येतेही. पण संसाराचा मांडलेला पट कोणत्यातरी कारणाने अनपेक्षित उधळला जातो. प्रेमाचे विणलेले धागे तुटायला लागतात. पीळ सुटायला लागतात. प्रेमात पडताना दोघांचे दोघांच्या दोषांकडे दुर्लक्ष होते किंवा जाणीवपूर्वक केले जाते. व्यवहारात वर्तताना वास्तव अधोरेखित होत जाते. परिस्थितीच्या पेटलेल्या वणव्याची प्रखर दाहकता जाणवायला लागते, तेव्हा जाण आणि भान येते. प्रेमाचा बहरलेला ऋतू संपतो पानगळ सुरु होते. मग सुरु होते दोघांच्या मनातील घालमेल.

प्रेमातील उदात्तभावनेला समजायला विचारांमध्येही उमदेपण असायला हवे. नैतिकतेचे अधिष्ठान असायला हवे. प्रेम करता येणे आणि ते सर्व संकटांशी सामना करून निभावून नेणे; या परस्पर भिन्न बाबी आहेत. कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात, ‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणे, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणे.’ आसपास वणवे लागलेले असताना वास्तवाच्या विखारी विळख्यात जळतानाही टिकून रहायची तयारी ठेवावी लागते. प्रेम कोणालाही, केव्हाही, कसेही करता येईल इतके सहजसाध्य सोपे असते तर... जिवापाड प्रेम कुणी केलेच नसते. पर्यायी विकल्प शोधले गेले असते. प्रेमाच्या मोहरलेल्या क्षणांचे जीवनात महत्त्वच किती उरले असते? प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं, असं सांगता तरी आलं असतं का? टोकदार प्रेम करण्यासाठी मनातील प्रेमभावही धारदार व्हायला लागतात. त्यासाठी प्रेमाचा परिघ समजणे, समजून घेणे आवश्यक असते.

प्रेम विषयात अडते तेव्हा त्यातील भव्यता, उदात्तता संपलेली असते. देहावरील प्रेमाला प्रतीक्षा करायला वेळ नसतो. मनावरील प्रेमाला प्रतीक्षेत आनंद असतो. यासाठी यगानुयुगे थांबण्याची मानसिक तयारी असायला लागते. असे निर्व्याज प्रेम कधी मीरा नाव धारण करून भक्ती बनते. कधी राधा बनून समर्पणाच्या गाथा लेखांकित करते. प्रेमासाठी समर्पित अनेकांनी आपापल्यापुरता इतिहास लेखांकित केला. त्यांच्यापुरते ते शहाजहान आणि मुमताज झाले. त्यांनी स्वप्नांचे आरस्पाणी महाल उभे केले. प्रेमाच्या साम्राज्याचे सम्राट झाले. बाजीराव मस्तानीच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांच्या रणांगणावरील पराक्रमाला सीमा नव्हती; पण या पराक्रमी योध्याच्या प्रेमाला मर्यादांची कुंपणे का पडली असावीत? प्रेमासमोर सारेकाही तुच्छ असले तरी अशावेळी पराक्रमही द्वंदात सापडून हताश का होत असावा? समर्पित प्रेमाची कासावीस व्यवहारी जगास कळू नये का? की कळूनसुद्धा स्वार्थासाठी निस्सीम प्रेमाला वेदीवर चढायला लागते, माहीत नाही. पण समर्पित प्रेमालाच वारंवार परीक्षेला सामोरे जावे लागते.

प्रेमींचे जग त्यांच्यापुरता परीघ निर्माण करते. वातावरण अनुकूल असेल, तर तो क्वचितप्रसंगी विस्तारतोही. आजूबाजूचा अवकाश आपल्यात सामावून घेतो. प्रेमात स्नेहाचे मळे फुलवण्याची किमया असते. माणसांच्या जगातून प्रेम भावनेला काढून टाकले तर... साहित्य, कला सारंकाही ओस पडेल. कवींच्या कविता शून्य होतील. कथा-कादंबऱ्या निरस होतील. रुक्ष, वैराण, निरस जगणे अभिशाप वाटेल. निर्हेतुक वाटेल. उद्यानातील फुले कोमेजतील, उंचावरून स्वतःला झोकून देत कोसळणारे प्रपात आटतील, कोकिळेचे कूजन बेसूर भासेल, पूर्व क्षितिजावरून सोन्याची पखरण करीत येणारा सूर्य निस्तेज दिसेल, शीतल गारवा देणारा चंद्र दाहक वाटेल, गायींचं वासरांसाठी हंबरणे करुण वाटेल. जात्यावरील ओव्यांतील सौंदर्य हरपेल. जग जागच्या जागी असेल. त्याचं चक्रही सुरळीत चालेलं असेल. क्षणाला लागून क्षण येतील आणि जातील; पण त्यांचा चिरंजीव नाद संपलेला असेल. निसर्गाच्या सुंदर चित्रातले रंग विटतील. आनंदाचे निर्झर आटतील. मातीवर, फुलांवर, फुलपाखरांवर चराचरावर प्रेमाची पाखर घालणारं, त्याला जिवापाड जपणारं, आसमंताला आपल्यात सामावून घेणारं प्रेम माणसांच्या आयुष्यातून संपल्यास जीवनगाणे सूर हरवून बसेल.