Shala, Shikshak ani Shikshan | शाळा, शिक्षक आणि शिक्षण

By
‘शाळा’ असा एक शब्द जो बहुतेकांच्या जीवनाशी कोणत्यातरी निमित्ताने जुळलेला असतो. शिकणारा असेल तर शाळेशी त्याच्या शैक्षणिक जगण्याचा थेट सबंध असतो. नसेल शिकलेला, तर मनात आपण शिकलो नाहीत याची खंत असते. निमित्त काहीही असो, माणसाच्या सुजाण होण्याच्या वाटा शाळेशी जुळलेल्या असतात. शाळा शब्दासोबत केवळ अभ्यास, परीक्षा, पुस्तके, शिक्षक आणि शिकणे एवढंच चित्र नजरेत उभं राहत नाही. एक विशिष्ट प्रतिमा शाळा नाव धारण करून मनाच्या कॅनव्हॉसवर प्रकटते. इमारत, क्रीडांगण, भौतिकसुविधांसोबत शाळेचा आसमंत चैतन्याचा गंधाने भरलेला असतो. मुलांच्या रूपाने चैतन्याचे प्रवाह प्रवाहित होत राहतात. या उत्साहाला आपल्यात सामाऊन घेणारा परिसर जगण्याचं समृद्धपण सोबत घेऊन उभा राहतो. शाळा आणि शिक्षक हे परस्परांना पूरक शब्द. यांच्या साहचर्यातून जगण्याचं आभाळ समृद्ध करणारी व्यवस्था उभी राहते. शाळा शब्दांमध्ये जगणं आकाराला आणण्याचं सामर्थ्य एकवटलेलं आहे. व्यक्तित्व घडविण्यासाठी माणूस जे काही करीत आला, त्यातील जीवनाच्या जडणघडणीची एक वाट शाळेकडे जाते. सक्षम व्यक्तित्वे घडविण्यासाठी शाळा नावाचे स्त्रोत माणसांनी निर्माण केले. त्यास नवे आयाम दिले. सद्विचारांचे मळे येथे फुलत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त होत राहिली. काळाचे अनेक आघात झेलत ही व्यवस्था वाढत राहिली. माणसाचं अस्तित्व तिच्यात सामावलं गेलं. शिकण्यासोबत शाळेतून उमलणं, फुलणं, बहरणंही घडत राहावं म्हणून प्रयत्न होत राहिले.

माणसाला जाणीवपूर्वक घडावे लागते. जीवनप्रवाहाला विधायक दिशेने नेण्यासाठी मार्ग आखावे लागतात. त्याच्या जडणघडणीचे नीतिसंमत प्रवाह निर्माण करावे लागतात. प्रवाहांचं उगमस्थान शाळेतून शोधले गेले. माणसांना शिकविण्याचं शाळा एक साधन आहे, भलेही ते एकमेव नसेल. विश्वाच्या अफाट, अमर्याद नभांगणाखाली माणूस स्वतःही शिकू शकतो, ती स्वयंसाधना असते. पण जीवनाचं समृद्ध आभाळ पेलण्यासाठी माणसाचं मनही आभाळाएवढं करणारे संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतात. म्हणूनच शाळा विचारांनी समृद्ध करणारी संस्कारकेंद्रे ठरतात. समाजाला परिवर्तनाच्या वाटेने नेण्यासाठी प्रेरित करणारी व्यवस्था म्हणून शाळेकडे पाहिलं जातं. नुसते पाहून अंतर्यामी परिवर्तनाची प्रेरणा रुजत नसते. बीज रुजण्यासाठी भूमीची मशागत करावी लागते. मगचच रोपटी तरारून वर येतात. त्यांचं यथासांग जतनसंवर्धन करावं लागतं. माणसाव्यतिरिक्त अन्य जिवांना औपचारिक शिक्षण देण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या गरजा देहधर्माशी निगडित असतात; पण माणसांना मनालाही घडवावं लागतं. म्हणून जडणघडणीच्या वाटा शाळा नावाच्या संस्कारकेंद्राकडे जाणीवपूर्वक वळत्या कराव्या लागतात. म्हणूनच शिकण्याइतकं माणसाला काहीही प्रिय नसावं. त्याच्या मनी वसणाऱ्या कुतूहल, जिज्ञासापूर्तीसाठी निश्चित दिशा असावी लागते. ती दिशा शिक्षणातून, शाळेतून माणसाला गवसते.

शाळा काही माणसाला नवी नाही. प्राचीनकाळापासून ती माणसासोबत आहे. गुरुकुलापासून ग्लोबलस्कूलपर्यंत वेगवेगळ्या काळी वेगवेगळी नावं धारण करून माणसांना सोबत करीत आहे. या शेकडो वर्षाच्या प्रवासात शाळा उभी करताना नेमके काय मिळविले, काय मिळवायचे राहिले याचे हिशोब जुळवायचे आहेत. आमच्यावेळी शाळा अशा नव्हत्या, अशा असायच्या, असे अनेक अभिप्राय शाळेविषयी ऐकत असतो. शाळा आज नवे साज लेऊन उभ्या आहेत. पण या देखणेपणातून आत्मा हरवत चाललाय अशी शंका मनात निर्माण होण्याइतकी परिस्थिती पालटली आहे. शाळा, शिक्षक आणि शिक्षण यांच्याविषयी समाजातून विशिष्टप्रसंगी नकारात्मक प्रतिक्रिया उमटतात, तेव्हा प्रकर्षाने अधोरेखित होते की, शिक्षणातून काहीतरी हरवत चाललं आहे. शिक्षणातून काहीतरी मिळवायचे राहिल्याची खंत समाजाच्या विचारात असणे आपल्या शिक्षणव्यवस्थेचे अपयश आहे. शिक्षणाचं अभियान उभं करून शिक्षणाला सार्वत्रिक करण्याचा प्रशासनाने प्रयत्न सुरु आहे. शिक्षणाची गंगोत्री खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर पोहचवण्याचा प्रयत्न होतोय; पण तिचं तीर्थरूप जल तेथल्या भूमीत झिरपत आहे का? त्याच्या प्राशनाने ज्ञानासक्त मने घडत आहेत का? असे काही प्रश्न अद्यापही सोबतीला आहेत.

युनोस्कोच्या एका अहवालात शाळाबाह्य मुलांच्या संख्येत भारताचा जगात चौथा क्रमांक असल्याचे काही दिवसापूर्वी वाचनात आले. एवढ्या संख्येने मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहत असतील किंवा परिस्थितीमुळे फेकली जात असतील, तर समाजव्यवस्थेत संपन्न विचारांचे मळे बहरतील कसे? व्यवस्थेचे संतुलन घडेल कसे? सर्वशिक्षा अभियान आणून प्रत्येक घरापर्यंत शिक्षणाच्या गंगेचा प्रवाह पोहचविण्याचा प्रयत्न होऊनही त्यात भिजण्याऐवजी कोरडाठाक राहण्यात कोणतं शहाणपण सामावलं आहे. भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्रात एखादी योजना कार्यान्वित करताना असंख्य प्रश्न, अनंत अडचणी उभ्या राहतात. भारत संघराज्य म्हणून एक असला, तरी येथे समाजव्यवस्थेत अनेक सामाजिक, आर्थिक, वर्गीय, जातीय पदर आहेत. अनेक धाग्यांचा विणलेला गोफ भारत असेलही; पण या सुट्यासुट्या धाग्यांचे अनेक पीळ असतात. त्यांच्या स्वतंत्र अस्मिता असतात. कधी टोकदार प्रश्न असतात. मतमतांतराच्या ठिणग्या असतात. अशावेळी त्यांना एकत्र बांधून ठेवण्यात बरीच ऊर्जा खर्ची पडते. नको त्यागोष्टींकडे लक्ष वळवावे लागते. विकासाचे पथ चालताना दुसऱ्याच वाटांची सोबत घडते.

शिक्षणाचे महत्त्व विद्यमानकाळी समाजाला बऱ्यापैकी समजले असले, तरी शिक्षणाविषयी असणारी अक्षम्य उदासिनताही दुर्लक्षित करण्याजोगी नाही. जगण्याचे प्रश्नच एवढे कठीण आहेत की, त्यांच्याशी भिडताना अनेक आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. घरातले सगळे हात राबल्याशिवाय हातातोंडाची गाठ पडणे शक्य होत नाही, तेथे शिक्षणाचं रोपटं जगेलच कसं? जगण्याचे प्रश्न मोठे होत असतांना अन्य प्रश्न दुय्यम होत जातात. पंधरावीस वर्षापूर्वीचा भारत आणि आजच्या भारताच्या स्थितीत प्रचंड स्थित्यंतर झाले आहे. जीवनात संपन्नता आलेली आहे. तरीही जगण्याच्या प्रश्नांना रोज सामोरे जाणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. रोजच समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर माणसं कोणत्या गोष्टींना प्राथमिकता देतील? भाकरीच्या प्रश्नासमोर सगळेच प्रश्न लहान वाटायला लागतात.

शाळा आणि शिक्षणात आतापर्यंत अनेक बदल घडून आलेत. बदलांना कार्यान्वित करताना शाळा प्रयोगशाळा झाल्या. अपेक्षित निष्कर्ष हाती येण्यासाठी प्रयोग करावे लागतात हे मान्य; पण प्रयोगाचे परिणामही तपासून पाहावे लागतात. त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. तरीही एक सत्य नाकारून चालणार नाही, ते म्हणजे याच शाळांनी देशाच्या पिढ्या घडविल्या. भले येथे सुविधांची वानवा असेल. शिकण्या, शिकवण्याविषयी आस्था असायची. येथे वावरणारे मास्तर नावाचं विद्यापीठ संस्कारपीठ वाटायचं. हातांवर छम छम बसणाऱ्या छडीमुळेच विद्या घम घम येते, असं समजलं जात असे. गुरुजी साधेच होते. त्यांच्या साधेपणातून प्रकटलेले विचार जीवनसौंदर्य बनून मनःपटलावर अंकित होत राहायचे. असे ‘डिव्होटेड’ गुरुजी तेव्हा जागोजागी भेटत असल्याचे जुनी पिढी सांगते. विद्यमानकाळीही असे अनेक अध्यापक आहेत. अपवाद वगळल्यास अध्यापनाचे व्रत अंगिकारून प्रामाणिकपणे जगणारे खूप आहेत. मागच्या पिढ्यांचा गुरुशिष्य नात्यातील इमोशनल टच आजच्या गुरुशिष्य नात्याला नाही.  या नात्यातील ओलावा हरवत चालला आहे. माणसं कालोपघात एकेकटी होत चालली आहेत. समूहापासून सुटी होत आहेत. अशा जगण्यालाच सन्मान समजायला लागली आहेत.

आम्हा काही शिक्षकांमध्ये बोलणं सुरु होतं. विषय शाळा, शिक्षण आणि शिक्षकांकडे वळला. मनातील खंत व्यक्त करीत एक शिक्षक म्हणाले, “आपल्या शाळांची अवस्था पाहून वाटते, अजूनही आम्ही अंधारयुगात वावरतो आहोत. अशा शाळांना शाळा का म्हणावे, असा प्रश्न पडतो? यांना शाळा म्हणण्याऐवजी खरेतर कोंडवाडे म्हणणे अधिक योग्य वाटते.” तोच धागा पकडत दुसऱ्या शिक्षक म्हणाले, “सर, काही शाळा अशा असतीलही. शिकणाऱ्या मुलांचं भविष्य ज्यांच्या हाती आहे ते शाळेत कमी आणि अन्य ठिकाणीच जास्त रमलेले असतील, तेथे आणखी काय होणार आहे? ही माणसं कधी राजकारणाच्या फडात रंगतात. कधी अर्थकारणात रमतात. कधी कृषिकारणाला हातभार लावताना राबतात. पण शाळेतील अध्यापनाच्या प्रांगणात किती वेळ संचार करतात. असं वागताना यांच्या मनात काहीच वेदना होत नसतील का? इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवून समर्थ बनवणारी, ही माणसं स्वतःच नैतिकतेचे पाठ विसरले असतील का?”

आपलं मत कळकळीने व्यक्त करणाऱ्या या शिक्षकाची खंत खरी असेलही. पण सगळेच शिक्षक, शाळा अशा असतात असे नाही. काही अपवाद असतात. अशा चारदोन शाळा, शिक्षक असतीलही. ते असणे म्हणजे सगळी शिक्षण व्यवस्था कुजली आहे. सगळा प्रवासच अंधारयात्रा झाला आहे, असे नाही. पलीकडे उजेडाचेही एक जग उभं आहे. तेथे सदसदविवेकाच्या मिणमिणत्या का असेनात, पणत्या पेटल्या आहेत. काही पावलं धडपडत का होईनात, पण जीवनाचा शोध घेत प्रकाशाच्या दिशेने निघाली आहेत. कदाचित काहींना योग्य वाट न सापडल्याने चुकून काही पावलं आडवाटेने निघत असतीलही. पण ती वाट काही सगळेच चालत नाहीत. 

हे सगळं खरं असलं तरी कधीकधी निराशेचे मळभ काही काळासाठी विचारांच्या आभाळात दाटून यावेत असंही घडतंय. गेल्या पंधरावीस वर्षात शिक्षणातून विधायक विचारांना रुजवण्याचे प्रयत्न झालेत. आपण बरेच पुढे सरकलो असलो तरी मंझील अभी बहोत दूर है, अशीच परिस्थिती दिसते आहे. समाजव्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्या वर्गातील मुलामुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण, विशिष्ट चौकटींमध्ये बंदिस्त झालेले शाळा, शिक्षक आणि शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवताना कौशल्यसंपादनातील समस्या; असे अनेक लहानमोठे प्रश्न आहेत, अडचणी आहेत. सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुले कोणत्या वर्गाची आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते खाजगी शाळांमध्ये विसावतात. ज्यांच्याकडे नाहीच काही, ते येतात सरकारी शाळांच्या आश्रयाला. या शाळांचा दर्जा उंचावणार नसेल, तर सामान्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवावे कसे अन् शिकावे कसे?

शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावण्याचे आव्हान समोर उभे आहे. देशाचा उच्चशिक्षणाचा आलेख अद्यापही अठरा-एकोणावीस टक्क्यांवर रेंगाळतो आहे. उच्चशिक्षणाचा सोपान चढणे सामान्यांना दमछाक करणारे ठरतेय. तेथे पोहचले त्यांचे ठीक आहे असे समजलो, तरी राहिलेल्या बाकीच्यांचे काय? हा प्रश्न उरतोच. परीक्षांच्या निकालानंतर गुणवंतांच्या गुणवत्तेला गौरवान्वित करणारे गौरवसोहळे पार पडतात. पण संधी मिळाली नाही म्हणून मागे पडलेल्या गुणवंतांचे काय? या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपल्याला सापडत नाहीये. ‘माणसाला जगण्यासाठी सक्षम बनविते ते शिक्षण’, असे म्हणतात. शिक्षणातून या कसोटीस पात्र ठरणारी गुणवंतांची मांदियाळी अजूनही उभी राहत नसेल तर दोष नेमका कुणाचा? शिक्षकांचा, शिक्षणव्यवस्थेचा की धोरणांचा? कुठलीही गोष्ट फारशी गांभीर्याने न घेण्याची आपली मानसिकता आणि सामाजिक, राजकीय अनास्था शैक्षणिक विकासास मारक ठरते. पदव्यांचा टिळा ललाटी लावून हजारो सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या शोधार्थ अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण सोबत घेऊन हिंडत आहेत. पदवी मिळवणाऱ्या शंभरातील वीस-पंचवीस जणच आवश्यक कौशल्य संपादन करून रोजगारास पात्र असल्याचे सांगतात, याचाच अर्थ पंचाहत्तर टक्के अपात्र ठरतात. म्हणजे यांना घडविणाऱ्या शाळाही इतकेच टक्के अपात्र आहेत का?

शाळांच्या परीक्षेच्या निकालांचा उंचावलेला आलेख म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता नाही. शाळेचा शंभर टक्के निकाल म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण असा अर्थ होत नाही. गुणवत्ता संपादण्याचे शिक्षण एक साधन आहे, ते साध्य नाही. आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून दोन्ही हातांचा वापर होतो का? असा प्रश्न महात्मा गांधींनी शिक्षणव्यवस्थेविषयी कधीकाळी विचारला होता. समस्यांशी संघर्ष करून स्वतःला आणि सोबतच समाजाला आकार देणारे सक्षम हात आमचं शिक्षण घडवीत आहे का? सांगणे अवघड आहे. समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. सक्षम हातांसोबत प्रगल्भ मनेही शिक्षणातून, शाळेतून घडत राहण्यात शिक्षणाचे यश असते. समृद्ध मने घडविणारा शिक्षक कुशल शिल्पकार असतो. सुंदर शिल्पे घडविण्याचे उत्तरदायित्व त्यालाच पार पडायचं आहे. भलेही प्रवासात अनंत अडचणी, असंख्य प्रश्न उभे राहतील. एखादी कलाकृती  तयार करण्यासाठी अवधी लागतो. झाड लावल्यानंतर लागलीच फलप्राप्ती होत नाही. मधुर फळांसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्याआधी रोपट्याची काळजी घेऊन त्याचं अवकाश मिळवून द्यावं लागतं. आपला अवकाश घेऊन उभी राहणारी झाडं निकोप फळे देतात. झाडांच्या निकोप वाढीत माळ्याची मशागत उभी असते. शिक्षकही कुशल माळी असतो. झाड जोमाने वाढावे म्हणून माळी तण काढून त्याला सुरक्षित करतो. आम्हा शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या मनातील विकल्पाचं तण वेळीच उपटून काढायला लागेल. तेव्हाच आम्ही लावलेली रोपटी शाळा नावाच्या उद्यानातून जोमाने वाढतील, वाढताना बहरतील, नाही का?

0 comments:

Post a Comment