Nikal Kunacha | निकाल कुणाचा?

By
दहावीचा निकाल झाला घोषित एकदाचा. माहितीतंत्रज्ञानाच्या युगाने एक क्लिकने गुणपत्रकाची छबी संगणकाच्या स्क्रीनवर दिसू लागली. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केलेल्या सायासप्रयासचे दर्शन गुणनोंदींच्या रूपाने पाहणाऱ्या प्रत्येकाना घडले. निकालाच्या नभांगणात काही तारे ठळकपणे दिसले. काही लुकलुकताना पाहिले. काहींना अंधाराच्या पटलाने पार झाकोळून काढले. ज्यांचं प्रयत्नांचं, परिश्रमाचं जसं संचित होतं, तसं त्याचं रूप साकार होत गेले. हाती यशाचं फुलपाखरू लागले, त्यांच्या मनाच्या आसमंतात आनंदाची बरसात झाली. आशेच्या मशाली उजळल्या. पुढील मार्ग कोणते, कसे असावेत याचे आडाखे बांधायला काहींनी सुरवात केली. इप्सितस्थळी पोहचायचे कसे, याचे आराखडे तयार केले गेले. काहींनी परीक्षेचा निकाल लावला, तर काहींचा निकाल परीक्षेने लावला.

‘नेमेचि येतो पावसाळा’ तसा जून महिना उजळला की याचेही आगमन ठरलेले. वाटचालीच्या मार्गात अडथळे नसतील तर प्रवास सहजसाध्य होतो. नाहीतर रेंगाळतो काहीकाळ आहे तेथेच. यावेळी रेंगाळला थोडा; पण आला एकदाचा. भिजले त्याच्या वर्षावात काही. काहींच्या अंगणात वर्षाव झालाच नाही. आसुसलेली भूमी जलधारांच्या वर्षावाने भिजून तृप्ततेचा हुंकार घेते. पण पाऊसच बरसला नाही तर तापत राहणं हेच तिचं भागधेय ठरतं. गुणांच्या वर्षावाने चिंब भिजणारे मोहरले. वर्षावच झाला नाही, तेथे भिजण्याच्या प्रतीक्षेत उभी असलेली रोपटी कोमेजली, काही करपली. ही कोमेजलेली रोपटी सांभाळायची कशी, हा प्रत्येक परीक्षांच्या निकालानंतर उभा राहणारा नेहमीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक अवघड होत जातोय. ज्यांच्याकडे वादळवाऱ्याशी, उन्हापावसाशी संघर्ष करीत अस्तित्वाची मुळे पायाखालच्या मातीत घट्ट रुजवून ठेवण्याइतके बळ आहे, ते संघर्षात टिकतील. पण ज्यांच्यात एवढे त्राण नाही त्यांना आधाराच्या काढण्या द्यायच्या कशा? आजपर्यंत संयुक्तिक उत्तर हाती न आलेला हा जटील प्रश्न. अशा प्रश्नांची उत्तरे शोधायची तर त्यांच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे.

परीक्षा एक तंत्रसाध्य बाब आहे. आपल्या परीक्षापद्धतीचं हे उघडं गुपित आहे. अभ्यासाचे तंत्र ज्यांना अवगत झाले, ते गुणांच्या शिड्या भरभर वर चढतात. त्यांनी संपादित केलेल्या गुणांचा चढता आलेख परिवाराला, आप्तस्वकियांना सुखद अनुभूती देणारा आनंद असतो. त्या  ‘गुणवैभवासमोर’ अंगभूत गुणवत्तेचे वैभव झाकोळले जाते. दुर्दैवाने गुणांनाच गुणवत्ता समजण्याचा प्रमाद आपल्याकडून गतानुगतिक चौकटीतूनच जग पाहण्याच्या प्रवृत्तीमुळे घडत असतो. गुणवत्तेपेक्षा गुणसंखेला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व दिले गेल्याने प्रश्नांचा गुंता अधिक वाढत जातो. अधिक गुणसंपादनाच्या आग्रहामुळे (की दुराग्रह?) परीक्षेतील गुणांपलीकडे असणाऱ्या गुणवत्तेबाबत सखोल विचार, चिंतन, मनन, मंथन आपण करीतच नाहीत.

दहावीचं सगळं वर्ष आपल्या अंतर्यामीच्या आसक्तीतून निर्मित शिखरे संपादन करण्यासाठीच असतं जणू, असा सार्वत्रिक आभास आसपास निर्माण केला जातो. याकरिता स्पर्धेचे घोडामैदान आखले जाते. मैदानात धावणारे स्पर्धेचे घोडे म्हणून परीक्षार्थ्यांना उभे केले जाते. एकेका घोड्यावर बोली लावावी, तशी यांच्यावरही लावली जाते. ते नसेल, तर तसं वातावरण निर्माण केले जाते. स्पर्धेत घोडं धावलं नाही, थोडं मागे पडलं तर त्याच्या नशिबी विजनवास आलाच म्हणून समजा. घोडं धावलं बऱ्यापैकी वेगात आणि आलं पहिल्या रांगेत, तर त्यावर बोली लावणाऱ्यांना कृतकृत्य झाल्याचे समाधान. त्याचं तोंडभरून कौतुक. (कारण तोंडात अख्खा लाडू कोंबल्यावर जागाच उरते कुठे.) त्याने मिळविलेल्या यशात थोडे का असेना, आपलेही योगदान कसे महत्त्वाचे आहे, हे दाखवण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरु. यशाच्या पाठीमागे सगळेच उभे. अपयश मात्र पोरके एकटेच. हिरमुसले होऊन दूर कुठल्यातरी कोपऱ्यात कुढत उभे. ही आमच्या जगण्याची रीत.

गावाकडच्या एका मित्राचा काहीतरी कामानिमित्त फोन आला. त्याच्या चिरंजीवाने यावर्षी दहावीची परीक्षा दिलेली. निकाल घोषित झाल्याने बोलण्याच्या ओघात मुलाच्या निकालाची सहज चौकशी केली. त्याच्या आवाजात नेहमीचा सहजपणा आज जाणवत नव्हता. मनात काहीतरी खंत असल्याचे जाणवत होते. कारण काय म्हणून विचारले, तर अगदी रागारागात तणतणतच बोलला, “अरे मास्तर, आमच्या दिवट्या चिरंजीवाने परीक्षेत लावले दिवे एकदाचे काय लावायचे ते! अरे, कार्ट्याने आणखी चारपाच टक्के गुण अधिक मिळवले असते थोडे जास्त प्रयत्न, परिश्रम करून तर याच्या काय बापाचं नुकसान झालं असतं?”

त्याच्या त्रासिक बोलण्याचा मतितार्थ आता कुठे माझ्या लक्षात आला. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यांला अपेक्षित असलेले यश मुलाने मिळवले नसल्याने त्याचा राग हताश शब्दांतून जाणवत होता. वाटले मुलाला खूपच कमी गुण असल्यामुळे रागावला असेल. विचारु या, नेमके काय आहे म्हणून. म्हणालो, “अरे, थोडं धीरानं घे! असं रागावतो काय पोरावर! असतील कमी गुण त्याला मिळाले, म्हणून काय सगळंच संपलं? साऱ्या वाटा आजच एकदम बंद झाल्या का? काहीतरी मार्ग निघेलच की यातून. मला आधी सांग, किती गुण मिळवलेत चिरंजीवाने?” त्याच्या मनातील नाराजी जराही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. नकारात्मक सुरात बोलला, “शहाऐंशी!” त्याचं बोलणं थोडं थांबलं. कदाचित रागाचा आवंढा गिळत असेल. नंतर पुढे बोलता झाला. आताही रागातच; पण संताप थोडासा कमी झालेला. म्हणाला, “हे काय गुण झालेत? अरे, याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी किती स्वप्ने पाहिली होती आम्ही. त्या नामांकित क्लासला पाठवायचे होते. तेथे एवढ्या टक्क्यांना कोण हिंग लाऊनही विचारणार नाही. जेथे नव्वदीची रेषा पार केल्याशिवाय हल्ली प्रवेश होतच नाहीत, तेथे हे थकलेलं घोडं काय धावणार?”

आतामात्र या महोदयाची कमालच झाली! पोरानं शहाऐंशी टक्के गुण मिळवूनही हा समाधानी नाही. मग याला काय शंभर टक्केच गुण हवे होते का? आणि ते तरी कशासाठी? याचं कारण त्याने आपल्या मनाने परस्पर ठरवून टाकलेलं. चांगलं महाविद्यालय, चांगला क्लास. (या शब्दांची नेमकी चांगली व्याख्या काय असावी?) चांगलं-वाईट ठरवलं कोणी, कसे आणि केव्हा? आहेत का या प्रश्नांची उत्तरे आपल्याजवळ? माहीत नाही. पण ‘चांगलं’ या आपल्यापुरत्या सीमित, स्वानुभवनिर्मित निकषांनी प्रश्नांचा गुंता अधिक वाढवला आहे. मुलांकडून अशी अपेक्षा करणाऱ्या पालकांची संख्या आसपास काही कमी नाही. अर्थात सगळेच असे असतील, असेही म्हणण्याचे काहीच कारण नाही. दुसऱ्याबाजूने विचार करणारेही असतात. तरीही आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर का? कदाचित, मला हे करता आले नाही. तू करून दाखव. थोडक्यात, माझ्या इगोसाठी तू हे करायलाच हवं असंच यांना वाटतं. आपल्या शेजारचा गोट्या, गोल्या, पिंकी, बबलीला चांगले गुण मिळतात, तुला का नको? ते तू मिळवायचेच आहेत! तू फक्त सांग अभ्यासासाठी कोणती गोष्ट तुला हवी आहे, आत्ताच आणून देतो. पण निकालमात्र आमच्या मनाजोगताच यायला हवा. म्हणजे येथेही काहीतरी देण्याच्या मोबदल्यात अपेक्षांचा सौदा.

मग इगोपूर्तीसाठी सुरु होतो पुढचा सिलसिला. मुलांसोबत आईबाबांचाही अभ्यास, रात्रीची जागरणे. मुलाची परीक्षा आहे म्हणून कार्यालयातून काही दिवसांची सुटी. मुलांपेक्षा पालकांनाच परीक्षेचे अधिक टेन्शन. परीक्षेच्या आधी काही दिवस घरात कलम १४४ लागलेले. सर्वत्र संचारबंदी. स्टडीरूम नावाच्या सजवलेल्या खुराड्यात हा नजरकैद झालेला. बाहेर आईबाबा नावाचे सतत जागते पाहारे. टीव्ही नावाची इडियट बॉक्स (?) दहावी, बारावीचं शैक्षणिक वर्ष सुरु होताच घरातून काही काळासाठी हद्दपार. घरात निरव शांतता. वाराही आत यायला लाजवा, असं सगळं वातावरण. टेबलावर पुस्तकांच्या राशी उभ्या. त्या ढिगाआड दिसणारा थकलेला, कोमेजलेला, आंबलेला चेहरा. त्यावर चिंतेचं सावट. चेहऱ्यावरील रेषानरेषा सांगतायेत काय होईल, माझ्या परीक्षेच्या निकालाचं? सारीसारी घुसमट सुरु.

मानगुटीवर बसलेलं परीक्षेचं भूत केव्हा एकदाचं उतरतं, असं मुलांना झालेलं. डोळेही निस्तेज झालेले. ताणतणावाचा पारा वरवर सरकत जातोय. अगदी परीक्षेच्या दिवशी परीक्षाकेंद्रापर्यंत जाऊन पोहचतो. केंद्रावर परीक्षार्थ्यांपेक्षा आप्तांचीच गर्दी अधिक. परीक्षाकेंद्रावरून वारंवार सूचना दिल्या जातात. परीक्षार्थ्यांनाच आत प्रवेश आहे. आपण पालकांनी बाहेर जावे. पण यांचे पाय तेथेच घुटमळत असतात. बाहेर पडावेसेच वाटत नाही. आपल्या पाल्यावर जरा विश्वास ठेवा, त्याला काय करायचे आहे, ते चांगले ठाऊक आहे. पण यांचा विश्वासच नाही. आधीच मुलांना ताण का कमी दिलेला असतो. त्यात आणखी ही भर कशासाठी? कळतं पण वळत नाही. काय म्हणावे अशा वागण्याला. या साऱ्या ताणातून जे धीराचे ते सावरतात. थोडे अधिक हळवे, अधिक भावनाशील मनातून खचत जातात. त्यातील काही कोसळतात, कोलमडतात. यालाच आपण जीवन ऐसे म्हणावे का?

पाल्याकडून अपेक्षा बाळगण्यात गैरवाजवी काहीही नाही. वाईट असेल, तर अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादणं. अवाजवी अपेक्षा करणाऱ्यांनी आपला विद्यार्थीदशेतला काळ आठवून बघावा. आपली गुणपत्रके पाहावीत. आपल्याला किती गुण होते ते तपासा, मग आपल्या अपत्याकडून आकांक्षा बाळगा, असं कुणी यांना म्हटलं तर यांचं उत्तर ठरलेलं अहो, तो काळच वेगळा. तेव्हा एवढी स्पर्धातरी होती का? असेलही तसे, म्हणून काय चैतन्यशील मनालाच आपल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी पणाला लावणार आहात का? त्याला काय हवं, नको ते तर जाणून घ्या. कदाचित शाळेच्या अभ्यासापेक्षा त्याला चित्रं काढणं अधिक प्रिय वाटत असेल. गावावेसे वाटेल. निसर्गाच्या सानिध्यात फिरावेसे वाटत असेल, निसर्गाचे फोटो काढावेसे वाटतील. मनाप्रमाणे आणखी काही करावसं वाटत असेल. त्याच्या मनाचा जरा विचार केला, तर त्यानी असा काय फरक पडतो? आपल्या वकुबानुसार जगायला, वागायला प्रत्येकजण समर्थ असतो. नसेल अभ्यासात अपेक्षित गती म्हणून काय झाले. प्रगतीची अन्य ठिकाणे आहेतच ना जगात. केवळ आपण म्हणतो म्हणून त्याने तेच आणि तेच करायला हवं का?

जगातील साऱ्याच यशस्वी माणसांनी परीक्षेच्या गुणवत्तायादीत स्थान मिळवले होते का? छत्रपती शिवाजी महाराजांचं अलौकिक यश परीक्षेतील कोणत्या गुणांनी मोजता येईल? ते काही राज्यशास्त्राचे पदवीधर नव्हते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांनी तत्वज्ञान विषयात पी.एच.डी. केली नव्हती. कर्मयोगी गाडगे महाराज समाजशास्त्र विषयाचे सुवर्णपदक विजेते नव्हते. लौकिक अर्थाने तंत्र असलेल्या कोणत्याही मंत्रात न अडकलेली, ही आभाळाएवढी उत्तुंग व्यक्तित्वे. त्यांनी कर्तृत्वाचे हिमालय उभे केले. मान्य आहे, साऱ्यांनाच काही छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम होता नाही येत. यांचे मोठेपण स्वयंभू होते. असं स्वयंभू अस्तित्व घडवण्यासाठी आपण आपल्या अपत्यांना किती प्रेरित करतो? गुणांचा आणि अंगभूत गुणवत्तेचा संबंध असतोच असा किती? समाजात अशी कितीतरी माणसे असतील जी परीक्षेतील गुणांच्या उंचीत कमी पडली. पण अंगभूत गुणवत्तेमुळे यशाची शिखरे, कर्तृत्वाचे डोंगर उभे केले. त्यांच्या यशाची उंची परीक्षेतील गुणसंपादनाच्या मिळवलेल्या कोणत्याही यशतंत्राने मोजता नाही आली. कधी-कधी आकाशही जागोजागी रिते असते; पण कोते कधीच नसते. असं अफाट, अमर्याद, अथांग मन आमच्याकडे का नसावं? संकुचित विचारांचा अव्हेर केल्याशिवाय व्यापकपण कळत नाही. व्यापकतेला वैयक्तिक अभिनिवेशात बंदिस्त करून हे घडणं शक्य नाही. 

परीक्षेतील गुणवत्ता संपादन करणाऱ्यांचे कौतुक होईल. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यासह वर्तमानपत्राची पानेही हसतील. गुणवंतांचे कौतुक जरूर व्हावं, याबाबत संदेहच नाही. वर्तमानपत्राच्या पुढच्या कुठल्यातरी पानावर परीक्षेतील अपयशाने खचलेल्या जिवाने देहाची सांगता केल्याची मन विदीर्ण करणारी वार्ताही असते. गुणवत्तेच्या झगमगाटात तिचं अस्तित्व कदाचित त्यावेळी जाणवणार नाही. जाणवलं तर हळहळ व्यक्त करणारे चार शब्द तेवढे ऐकायला येतील. काही संवेदनशील माणसे, शिक्षणतज्ज्ञ याबाबत चिंतन, मनन, मंथन करतील. चर्चा घडतील. उपाय सुचवले जातील. दिवस मावळेल. नवा दिवस उगवेल. साऱ्यासाऱ्या गोष्टी रात्रीच्या गर्भात साठवल्या जातील. रोजचं तेच ते धावपळीचे चक्र पुन्हा सुरु होईल. माणसं काळाच्या गतीसोबत धावतील. काहींना धावताना धाप लागेल. काही थकतील. काही थांबतील. काही कोसळतील, काही कोसळून परत उभे राहतील. चालावं, धावावं सगळ्यांना लागतंच. ते टाळता येत नाही आणि येणारही नाही. ‘कालाय तस्मै नमः’ म्हणतात हे खरंय.

0 comments:

Post a Comment