Achhe Din... | अच्छे दिन...

By // No comments:
मे महिन्याच्या सोळा तारखेच्या मुहूर्तावर उघडले एकदाचे इव्हीएमचे पेटारे. सोळाव्या लोकसभा निवडणूक निकालांविषयी मनातील उत्सुकता, कुतूहल, अपेक्षांचे घोंगावणारे भुंगे झाले एकदाचे स्थिरचित्त. अपेक्षांचे कमळ फुलले. पहिल्यांदाच स्वबळावर सत्तासंपादनाचा कौल मिळून विजयाच्या जयघोषात भाजपच्या अंगणी आनंद आला. स्वातंत्र्यसंपादनानंतर प्रथमतःच काँग्रेसेतर पक्षाला स्वसामर्थ्यावर बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ. लोकांना सत्तेत परिवर्तन आवश्यक वाटत होते. आपल्या मतांच्या ताकदीने त्यांनी ते घडविले. काँग्रेससह काही लहानमोठ्या पक्षांची वाताहत झाली. अच्छे दिन... आयेगेच्या भरात काही पक्षांवर सत्तासंपादनाबाबत वाईट दिवस येण्याची वेळ आली. टीव्हीवरील अखंड चर्चेच्या आवर्तनांनी जयपराजयाचे विश्लेषण केले. जाणकार, माहितगार विश्लेषकांनी केलेल्या विवेचनातून मतमतांचा एकच गलका उडाला. प्रत्येकाने आपापल्या विचाराच्या परिप्रेक्षात पक्ष जिंकण्याची, पराभूत होण्याची कारणमीमांसा केली. काळाची गणिते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करून जुन्यानव्या काळाच्या वाटचालीची समीकरणे मांडली. पुढच्या घडणाऱ्या बऱ्यावाईट राजकीय प्रवासाचे अंदाज घेतले गेले. अनुमानांमध्ये काहींना परिवर्तनात विकास दिसतोय, तर काहींना काहीतरी कमी राहिल्यासारखे वाटतेय.

परिवर्तनप्रियता माणसाचा स्वभावाच असल्याने तो परिवर्तनाचे पर्याय शोधीत असतो. यावेळेस त्याने सत्तापरिवर्तनाचा प्रयोग करून पाहिला. प्रयोग करताना निरीक्षणे, अनुमान, तर्क या गोष्टी ओघानेच येतात. प्रयोग केल्याशिवाय निष्कर्ष हाती येत नाहीत, हेही तेवढेच सत्य. सत्ताधारी पक्षाचे हे चुकलेच पासून ते अतिविश्वासाने गाफिलपण आल्याने सत्तेतील गुड फील गेल्यापर्यंत अनेक कारणे पाहिली गेली, सांगितली गेली. व्यक्तींकडून, व्यवस्थेकडून चुका घडतात त्या दुरुस्त करायला लागतात. सर्वस्वी बरोबर अन् सर्वस्वी चूक असे कुणीही नसतो. कदाचित झालेल्या चुकांचे अवलोकन केल्यावर न जाणो पुढे परिस्थिती बदलेलही. ती बदलेल तेव्हा बदलेल; पण सर्वसामान्य माणूस आताच बदल घडवण्याची संधी आहे, असे समजून घरातून मतदानासाठी बाहेर पडला आणि मतदान केंद्रात जाऊन त्याने बदलावर शिक्कामोर्तब केलं.

आधीचे सरकार पायउतार होऊन नव्या शिलेदारांच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या. सत्तेतील परिवर्तन शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न घडता घडू शकते, याचे प्रगल्भ उदाहरण म्हणजे भारतीय लोकशाही. याचे परत एकदा जगाला प्रत्यंतर आले. पण या निकालांनी आणखीही एक गोष्ट अधोरेखित केली; मातब्बरांनाही कधीतरी सत्तेचा सहवास विसरून विजनवास पत्करायला लागतो. नेता जोपर्यंत लोकांना सोबत नेत असतो, तोपर्यंत लोक त्याला सत्तेच्या सिंहासनावर अधिष्ठित म्हणून पाहतात. पण नेत्याची लोकांशी, लोकमनाशी जुळलेली नाळ कळत न कळत केलेल्या दुर्लक्षामुळे विखंडित होते, तेव्हा त्यांच्याकडील सत्ताही खंडित होते. सत्ता नेहमीच बदलत असल्याने फार काळासाठी एखाद्या हाती स्थिरचित्त राहू शकत नाही. नेत्यांची कार्यप्रणाली, धोरणांबाबत असणारी विसंगती, उदासीनता जाणवण्याइतपत होते, तेव्हा ती सत्ताधाऱ्यांना नेहमीच भोवत आली आहे. एखाद्या कृतीबाबत नेत्याकडून लोकनुनयाचे वर्तन घडत राहते. लोकानुनयात असणारी लोककल्याणची भूमिका विस्मरणात जाऊन धूसर होत असेल, तर त्यांची राजकीय कारकीर्दही त्या धुक्यात अदृश्य होत जाते. लोकांच्या भावनांना समजून घेत त्यांच्या कल्याणाची वार्ता करणारा दृश्य आकलनाच्या परिघासमोर राहतो. या निवडणुकांमध्ये घडून आलेले परिवर्तन लोकांच्या अपेक्षाभंगातून निर्माण झालेला दूरगामी आणि तात्कालिक परिणामांचा आविष्कार होता, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

बदललेल्या स्थिती परिस्थितीचे अवलोकन करताना लोकांना परिवर्तन हवेच होते, असे दिसते का? हे म्हणणे कदाचित घाईचे ठरेल. दुसऱ्याही बाजूने विचार करून पाहताना हेही जाणवते की, भारतीय लोकशाही प्रगल्भ होत चालली आहे. आघाड्या, युत्यांचे एकत्र कडबोळे घेऊन सरकारे आतापर्यंत गेल्या काही निवडणुकांपासून चालत राहिली. त्यांच्या चालण्यात मर्यादा होत्या. सरकार तर आहे; पण पूर्णतः निर्णय स्वातंत्र्य नाही. पुढे जाण्यासाठी उचलली चार पावले, तर दोन पावले मागे सरायची वेळ अपरिहार्यता बनून अनेकदा समोर येत राहिली. निर्णयातही हितसंबंध, महत्वाकांक्षांचा कोलदांडा येत राहिला. मनाविरुद्ध केलेल्या लग्नातून कसातरी चाललेल्या संसारांसारखी परिस्थिती समोर येत राहिली. सोडताही येत नाही आणि मोडताही येत नाही. तडजोड हीच अगतिक अपरिहार्यता ठरत राहिल्यास आणखी नवे काय घडणार होते. भरीसभर महागाई, कथित-अकथित घोटाळ्यांच्या, भ्रष्ट्राचाराच्या आरोपांनी उरलासुरला विश्वास वेशीला टांगला. सुशासनाचे अभिवचन लोकांना पचनी पडलेच नसावे. की लोकांना सारेच कळत होते, काय घडतंय ते. पण आत्ताच आपण काहीच करू शकत नाहीत, म्हणून योग्य संधीची प्रतीक्षा करीत होते. आपल्या देशाच्या लोकशाहीत एक व्यापकपण जन्मदत्त आहे. व्यापक विचारांना सामोरे जाताना साहजिकच सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा परिघही व्यापक होत जातो. विस्तारत जातो. जनतेला ‘सर्वजन हिताय’ या विचारांनी कार्य करणाऱ्या पद्धती स्वीकार्ह वाटतात. सांप्रत घडून आलेला बदलही अशीच काळाची अनिवार्य व्यापक आवश्यकता होती का?

लोकांना आहे यापेक्षा आणखी काही चांगले हवंय, असंतर वाटत नव्हतं ना? की खरंच एवढे वाईट दिवस भारताच्या शासनप्रणालीला आले होते की, आणखी याहून चांगलेपणाच्या आवश्यकतेची प्रकर्षाने जाणीव व्हावी. ‘यथा राजा, तथा प्रजा’ असे म्हणतात. पण राजाच यथातथा वर्तत असेल, तर प्रजाही अथपासून इतिपर्यंत विचार करतेच करते. या परिवर्तनामागे सत्ता आणि सत्ताधिशांविषयी असलेला सुप्त रोष, सत्तावर्तनाचा लोकांना आलेला उबग, हेही आणखी काही कारणं असू शकतील. सामान्य लोकांपुढे निदान किमान गरजांची पूर्तता होऊन सुखाने जगता यावे या अपेक्षांचे स्वप्न होते. महागाईने आधी त्याचे कंबरडे मोडले. नंतर भ्रष्ट्राचाराच्या आरोपांनी आकड्यांचे उच्चांक गाठले. कोटीकोटीची उड्डाणे पाहून लोकांच्या डोळ्यासमोर दिवसा तारे दिसू लागले. काहींचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. या साऱ्या पसाऱ्यात सरकारने केलेली चांगली कामेही झाकोळून गेली. उरले सुरले तर केलेलं चांगलं काही कामही लोकांपर्यंत वेळेवर पोहचलेच नाही. जे पोहचले ते सर्वसामान्यांना पचनी पडलेच नसावे.

जीवनयापनाचे प्रश्न गंभीर होतात, तेव्हा माणसं परिवर्तनाची शस्त्रे परजून संघर्षात सहभागी होतात. सर्वंकष सत्तांची संवेदनहीनता संभ्रम निर्माण करते, तेव्हा संवेदनशील मने सत्तांतराचा पर्याय स्वीकारतात. सर्वसामान्यांच्या अपेक्षा फार काही मोठ्या नसतात. गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा, उद्याचे चांगले दिवस, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला सन्मानजनक भाव, कामगारांना रोजगाराची शाश्वती, मध्यमवर्गीयांना नोकरीची शाश्वती, एक छोटेसे घर, मुलांचे शिक्षण नंतर त्यांची लग्ने. एवढे झाले तरी खूप वाटते. पदरी अपेक्षाभंगाचे दुःख येते, तेव्हा आपल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी परिवर्तनाचा प्रयोग करावा लागतो. समाज नावाचं अस्तित्व अशा लहान-लहान अपेक्षांनी घडत असते. अपेक्षापूर्ती करण्यापासून त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी कोसो दूर राहून सत्तेच्या पाशात बद्ध राहत असतील, तर आणखी काही घडायचे बाकी राहत असते का?

हाताला काम, कामाला दाम आणि दामाला सन्मान असेल, तर माणूस मिळाले आहे, तेच सुख समजून वर्ततो. सर्वसामान्यांना मूलभूतगरजांची पूर्ती व्हावी एवढीच माफक अपेक्षा असते. अपेक्षापूर्तीत येणारी व्यवधाने यक्षप्रश बनून समोर उभी राहत असतील, तर साहजिकच सत्तापरिवर्तनाचा विचार प्रबळ होतो. स्वातंत्र्य संपादनाच्या पासष्ट वर्षांनंतरही समाजकारण, राजकारण जात, धर्म, वंश, पंथाच्या कक्षेतच फिरत आहे. या साऱ्यां घटकांच्यापलीकडे ‘माणूस’ नावाचं अस्तित्व असतं तेथे ‘माणुसकी’ नावाचा प्रगल्भ विचार उभा असतो. या विचारला नैतिक अधिष्ठान लाभणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करायचे विसरून आपले परगणे तयार करून सांभाळण्यात, धन्यता मानण्यात शक्तीचा व्यय होणे, हा वर्तन विपर्यास आहे.

काही दिवसापूर्वी गावी गेलो होतो. गावाकडे लहान भाऊ शेती करतो. परिवारातील सदस्यांशी इकडचं तिकडचं कौटुंबिक बोलणं झाल्यावर घरात सुरु असलेल्या टीव्हीवरील बातम्यांकडे थोडं लक्ष गेले. ऐकू लागलो. निवडणूक निकालांचे विश्लेषण सुरु होते. निवेदक, निवेदिका संबंधित विषयाच्या तज्ज्ञांच्या सोबत पायउतार होणाऱ्या आणि पदासीन होणाऱ्या सरकारांच्या यशापयश, उपलब्धी, ध्येयधोरणांबाबत काहीसे विवेचन करीत होते. मी ते ऐकतोय. टीव्हीकडे पाहत भाऊ म्हणाला, “सरकार बदललं; पण आम्हा शेतकऱ्यांचे नशीब कधी बदलेल कुणास ठाऊक?” त्याच्या बोलण्याचा हेतू लक्षात घेऊन आतापर्यंतच्या सरकारांनी कार्यान्वित केलेली शेतीबाबतची धोरणे, योजनांविषयी माहीत असलेली माहिती सांगू लागलो. शेती कसण्याचे, शेती करण्याचे कालचे आणि आजचे तंत्र, बदललेली पद्धती याविषयी सांगत होतो. तो शांतपणे ऐकत होता. माझं बोलणं थांबल्यावर मला म्हणाला, “भरल्यापोटी माणसाला शहाणपण सहज सूचतं, नाही का? तुमचं बरं आहे; दर पाचसहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढून मिळतो, तरीही तुम्ही महागाईच्या नावाने गळे काढतात. आमच्या शेतमालाला थोडा अधिक भाव मिळाला ठीक आहे. पण मातीमोल भावाने वस्तू विकतो, तेव्हा कोणीच कसे काही म्हणत नाही. आम्हां शेतकऱ्यांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न काय प्रश्न नाहीत? तुम्ही नोकरी मिळाली की, सातआठ वर्षात कुठल्याकुठे पोहचतात. पण आम्ही... काल तुम्ही आम्हाला सोडून गेलात; तेथेच अजूनही सरपटतो आहोत. शेती, शेतीविषयक धोरणे बदलली असतील, तर शेतकऱ्यांची पोरे शेती सोडून शहरांकडे का पळत आहेत? परिस्थितीसमोर हताश होऊन शेतकरी आपली जीवनयात्रा का संपवत आहेत? सरकार कोणाचेही असू द्या, त्याने आम्हांला असा काय फार फरक पडणार आहे? कोणीही निवडून आला तर येऊ द्या, सरकार कोणाचेही असू द्या; मात्र ते आमच्यासारख्या सामान्य माणसांचे, गरिबांचे असू द्या. एवढं झालं तरी खूप आहे.”

मनातील सात्विक संताप तो व्यक्त करीत होता. या परिस्थितीचे कारण काय, याचा त्याच्या परीने शोध घेऊ पाहत होता. त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मनात मुद्दे आठवून जुळवाजुळव करीत राहिलो; पण ते किती समर्थनीय असतील आणि असले तरी याला पटतीलच याची खात्री काय, या शंकेने याबाबत पुढे बोललोच नाही. तरीही मनातून वाटतच राहिले की, त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. शेतकरी, मजूर, कामकरी, भटके, विमुक्त, उपेक्षित, वंचित साऱ्याच सामान्य माणसांची अशीच अपेक्षा, व्यथा असेल का? माहीत नाही, पण असावी असे वाटते. सामान्यांच्या मनातली किमान अपेक्षाही पूर्ण होत नसेल, धोरणांविषयी, अंमलबजावणीविषयीची संदिग्धता वारंवार प्रत्ययास येत असेल, तर आणखी दुसरे काय घडावे? सरकारे आली आणि गेली, तरी आम्ही आहोत त्याच वर्तुळात आणि तेथेच का? या प्रश्नाचं उत्तर आम्ही अद्याप शोधलंच नाही. शेतीविकासाच्या वाटा चारदोन फार्महाउसवर जाऊन विसावल्या असतील, तर यालाच शेतकऱ्यांचा विकास समजावं का? लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणताना अर्थव्यवस्थेतील शेतीच्या योगदानाचं महत्त्व मान्य करायचं. पण तिचं उध्वस्त होत जाणे, याच डोळ्यांनी हताशपणे पहायचं का?

काहींनी सर्वत्र असायचं आणि काहींनी कुठेच नसायचं का? विकास सार्वत्रिक असावा. सर्व समावेशक असावा. देशाच्या सव्वाशे कोटी लोकंसाठी असावा. अच्छे दिन यायचेच असतील तर साऱ्यांसाठीच यावेत. काहीजण तुपाशी अन् काही उपाशी, म्हणजे निरामय लोकतंत्राचे लक्षण नाही. व्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्यांनाही आमच्यासाठी काय? या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थेकडून मिळावे. या प्रश्नाचं उत्तर ‘विकास’ असं असावं. शासन, प्रशासनाची उक्ती, कृती, धोरणे विकासाभिमुख करताना त्यांना सामान्य माणसाचा चेहरा असावा. नुसता विकासाचा मुखवटा नसावा. सरकार कोणत्याही पक्षाचे का असेना. त्याने काय फरक पडतो. प्रत्येकाचं स्वतंत्र आणि सामूहिक स्वप्न संपन्न भारत हेच असावं. घडेल हे सारे? हो शक्य आहे. देजेव्हा शातील नागरिकांच्या डोळ्यात एकच स्वप्न असेल. उज्ज्वल वारसा असणारा भारत. जगाचे नेतृत्त्व करणारा भारत. असा भारत घडविण्यासाठी कोणताही त्याग, समर्पण करण्याची तयारी. पक्ष, सत्ता, सरकार कोणते आहे, हे प्रश्न अशावेळी थोडे गौण ठरतात. असा विकसित भारत घडेल तेव्हा साऱ्यांसाठीच अच्छे दिन असतील, नाही का?

Sampark | संपर्क

By // No comments:
एक-दीड महिन्यापासून सुरु असलेली निवडणुकांची धामधूम बारा तारखेला शेवटची फेरी होऊन एकदाची थांबली. अनेक दिग्गजांचे भवितव्य इव्हीएमच्या कंट्रोल युनिटच्या पेटाऱ्यांमध्ये झाले बंदिस्त एकदाचे. पण त्या आधी एक्झिट पोलचे अंदाजांचे आकडे टीव्हीच्या पडद्यावर खेळू लागले आहेत. सोळा तारखेला कळेल सत्ता कोणाच्या गळ्यात माळ घालते ते. तोपर्यंत आकड्यांचे खेळ राहतील सुरु. होत राहतील त्यावर भाष्य. काही मानतील अंदाजाचे आकडे खरे. काही पेटाऱ्यात काय आहे, याची प्रतीक्षा करतील. गेल्या काही दिवसापासून फक्त आणि फक्त निवडणूक विषयाभोवती देश पिंगा घालत आहे. मीडियानेही निवडणूक विषय केंद्रस्थानी ठेऊन वार्तांकने केली. सामान्य माणसापासून असामान्य माणसापर्यंत साऱ्यांचेच लक्ष निवडणुकांकडे केंद्रित झाले होते. देशातील, देशाबाहेरील सगळ्यांचीच नजर तिकडे वळलेली अन् वेध निवडणूक निकालांचे. पण सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न; सरकार कोणतेही येवो, आमच्यासाठी त्याची धोरणे काय असतील? त्याने आमचे जगणे सुसह्य होणार आहे का?

प्रचाराची चरमसीमा गाठलेली. शो, रोड शो, सभा वगैरेंनी सारे वातावरण दणाणून गेलेले. प्रचारकी थाटापासून तर प्रचार सभेतील थाटामाटापर्यंत आणि गाव-वस्तीच्या वाटा आडवाटापासून वळणवाटांपर्यंत चाललेली धावपळ. लोकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक रस्ते शोधले गेले. त्यांचा कल्पकतेने वापर केला. स्वनातीत गतीचे वरदान लाभलेल्या सोशलमीडियाचा प्रचाराचे माध्यम म्हणून प्रचंड वापर झाला. दुसरीकडे दहापंधरा कोटी नवमतदारांच्या मतांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांच्या मनीमानसी विलसत राहणाऱ्या तंत्राचा वापर करून आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, हे मनांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. आपापले परगणे तयार करून संपर्क वाढवीत ठेवण्याचा प्रयत्न होत राहिला.

लोकशाही शासनप्रणालीत निवडणुकांमधील प्रचार अनिवार्यता असतो. सांप्रतकाळी त्याचा थाट आणि घाट सगळंच बदलेले आहे. विज्ञानतंत्रज्ञानाच्या साह्याने त्याचं अवघं रूपच पालटलेले आहे. देशात याआधीही निवडणुका झाल्या आहेत. त्यांचा प्रचारही झाला आहे. प्रचाराला आज व्यापक रूप मिळालं आहे. त्यापाठीमागे विज्ञानाच्या किमयेतून निर्मित वाटांचे योगदान मोठे आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सिंग, थ्रीडी सभांनी विज्ञानप्रणीत जगाचं सामर्थ्य केवढं मोठं आहे याची प्रचीती जवळजवळ साऱ्यांनाच ‘याचि देहा याचि डोळा’ दिली. माणसाने कुतूहल, जिज्ञासाबुद्धीतून इहलोकीचा प्रवास सुखावह करण्यासाठी ज्ञानतंत्रज्ञानाची निर्मिती करून प्रत्यक्ष देवालाही क्षणभर विस्मयचकित करणारे शोध लावले. शोधनिर्मित साधनांनी जग पूर्वीपेक्षा सहज, सुगम, सुसह्य केलं आहे. हे संपर्कसाधन निवडणुकीत प्रचार, प्रसार करणाऱ्यांसाठी सोबत करीत राहिले.

संपर्कासाठी फार काळ प्रतीक्षा करण्याचा काळ कधीच इतिहास जमा झाला आहे. पूर्वी एक साधा निरोप पाठवायचा असला तरी वाट पाहण्याशिवाय माणसाच्या हाती काहीच नसायचे. दूरवर निरोप पाठविणे एक दिव्य वाटायचे. आज जगाच्या कोणत्याही टोकाशी क्षणात संपर्क होतो आहे. संपर्कसाधनांनी विश्वातील प्रदेशांचे हजारो किलोमीटरचे अंतर काही सेकंदावर आणले आहे. सारं जग हातात सामावण्याएवढं लहान झालं आहे. संपर्कक्रांतीने विश्व जवळ आले. पण माणसं जवळ आली आहेत का? आपल्या गोतावळ्यासाठी, त्यांच्या भेटीगाठीसाठी वाट पाहणारे, त्यांच्या येण्याचा सांगावा आला असेल, तर त्याच्या रस्त्याकडे घरातील साऱ्यांचे डोळे लागलेले असायचे. आज यातील काही शिल्लक असेल, नसेल; पण माणसांच्या अंतर्यामी वसणाऱ्या भावनांचा पदर तसाच आहे. तो ओलावा अजूनही टिकून आहे.

निवडणुकांनी बहुतांची अंतरे कमी करीत बहुतेकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. कधी नव्हे इतका मतदानाचा टक्का वाढविला. सामान्य माणसांना आपल्या असामान्य मतांचं मोल प्रकर्षाने जाणवले. त्यांची पावले मतदानकेंद्राकडे वळली. मतांच्या वाढलेल्या टक्केवारीची आणखीही काही कारणं असतील. पण निवडणूक आयोगापासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत साऱ्यांनीच मतांचं मोल अनमोल असल्याचं अधोरेखित करून मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं. मीडियाने मतांचं महत्त्व पटवून देताना जनसागराला एकत्र करण्याचं काम केलं. तरुणाईला आपल्या पहिल्यावहिल्या मतदानाची नवलाई जाणवायला लागली. प्रचार, प्रसार माध्यमांनी आपलं एक मत देशात परिवर्तन घडवू शकते, भविष्य आकारू शकते, म्हणून महत्त्व पटवून दिले. कधी काळी ५०-५५ टक्क्यांपेक्षा जास्त न होणारे मतदान ७०-८० टक्क्यांचे गड सर करू लागले. ही बाब लोकशाहीच्यादृष्टीने नक्कीच आनंदपर्यवसायी आहे. यामागे सातत्याने होणारा प्रचार आणि प्रसार हे एक महत्त्वाचे कारण आहे.

आम्ही लहान असतानाचा काळ आठवतोय. तेव्हा निवडणूक प्रचारासाठी गाव, वाड्या, वस्त्यांवर ‘ताई माई, अक्का...’ करीत रस्त्यावरील धूळ उडवीत कोणत्यातरी पक्षाच्या प्रचारासाठी गाड्या यायच्या. स्पीकरचा आवाज साऱ्या गावभर फिरत राहायचा. गाड्यांमागे पोरांचं लाटांबर गाडी गावाबाहेर जायीपर्यंत फिरत राहायचे. प्रचाराची पत्रके, मिळालेले एखाद-दोन झेंडे दिवसभर मुलांच्या हातात फडकत रहायचे. पक्षाचे चिन्ह असलेला बिल्ला घेण्यासाठी मुलांची किती धडपड चालायची. ज्याला मिळाला तो स्वतःला काहीतरी वेगळा समजायचा. आपल्या फाटक्या सदऱ्यावर लावून दिवसभर मिरवत राहायचा. साऱ्यांना अभिमानाने दाखवायचा. जणू काही अनमोल ठेवा फक्त आपल्याच हाती लागला आहे अशा अविर्भावात. पक्ष, पक्षाचा उमेदवार, मत, मतदान यांच्याशी त्याला काही देणं घेणं नसायचं. चिन्हाचा बिल्ला मिळाला की मोठी लढाई जिंकल्याच्या अविर्भावात गावभर फिरत राहायचा. बऱ्याचदा वेगवेगळ्या पक्षांचे बिल्ले एकाच सदऱ्यावर एकाचवेळी विराजमान झालेले असायचे. दोन-तीन वेगवेगळे बिल्ले सदऱ्यावर लागले असतील त्याची छाती अभिमानाने वगैरे फुलून यायची. खरंतर त्या वयात निवडणूक काय असते, हेही माहीत नसायचे. तर पक्ष, पक्षाचा उमेदवार, मतदान यांचा विचार करतोय कोण. आज वाटते केवढी ही निरागसता. एकाचवेळी सर्व पक्षांना आपल्या अंगावरील फाटक्या सदऱ्यावर मिरवणारी पोरं. हीच खरी राष्ट्रीय एकात्मता नव्हती का?

आजमात्र परिस्थिती पालटली आहे. प्रचाराच्या मर्यादांचे कधीही उल्लंघन न करणारा तो काळ. प्रचारात मर्यादा ओलांडल्या गेल्या तरी फारसे कळण्याचा तो काळ नव्हताच. कारण आजच्यासारखी चोवीस तास वार्ता सांगणारी चॅनल्स नव्हती. आज आरोप, प्रत्यारोप, वाद, वितंडवाद, बेताल विधाने यांनी शिष्टसंमत संकेतांचे, मर्यादांचे सीमोल्लंघन होत चालले आहे. प्रचार करताना प्रतिस्पर्ध्यावर मनाला वेदना देणाऱ्या शब्दांचा प्रयोग न करण्याचा काळ इतिहासजमा होत चालला आहे. एकीकडे प्रगतीचे शिखरे संपादित करीत आहोत. देशाच्या इतिहास, भूगोलाला गौरवान्वित करण्याचा हा काळ असावा. वारसा जतन करण्याची, त्याला संपन्न करण्याची वार्ता करणारा असावा. पण एकमेकांची उणीदुणी काढण्याची वेळ का यावी?

देशाच्या संस्कृतीचा उन्नत वारसा सांगण्यासारखा असूनही; तो न सांगता वैयक्तिक टीका का व्हाव्यात? की अमाचाकडे सांगण्यासारखे काहीच मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. आम्ही संयम विसरत चाललो आहोत का? ज्या देशाला संस्कारांचा संपन्न वारसा आहे. त्या देशात मूल्यांचा प्रवास प्रचंड वेगाने अवनतीकडे होत आहे काय? ही घसरण देशाचं भाग्य परिवर्तन करणारी खचितच नाही. सत्ता, संपत्ती फारकाळ एकाठायी वास्तव्य करीत नसते, असे म्हणतात. त्यांना चंचलतेचा शाप असतो. त्यात परिवर्तन होणं नियतीचा खेळ असेल, तर या खेळाचे नियम समजून तेवढ्याच खिलाडूवृत्तीने तो आम्ही का खेळत नाहीत? काळ बदलतो तशा अपेक्षाही बदलतात. मूल्यही काळसुसंगत गरज म्हणून बदलावे लागतात. त्या बदलांमध्ये विकार नसतात. विकास असतो. हा विकासपथ सांप्रतकाळी आम्हाला दिसत नसावा का?

यावर्षाच्या निवडणुकांच्या प्रचारतंत्राने उबग आणल्याचे बरेच जण म्हणतात. अर्थात हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक अनुभव. प्रचाराचा उबग आलेले माझे एक स्नेही म्हणाले, “सर, या निवडणुकांमध्ये प्रचाराचं जरा अतीच होतंय नाही का? टीव्ही लावा तेच. वर्तमानपत्र उघडा तेथेही तेच. चर्चा ऐका तेव्हाही तेच. सोशल मीडिया पाहा तेथेही तसेच. शेतात काम करताना विषय निवडणुका, गावात पारावर गप्पा करीत बसलेल्यांच्या चर्चेतही निवडणुकाच. अहो, देशात दुसरे आणखी काही प्रश्न, दुसऱ्या काही समस्या नाहीतच का? की संपल्या साऱ्या एकदाच?” त्यांचं बोलणं ऐकून शांतपणे त्यांना म्हणालो, “तुमचं म्हणणं ठीक आहे. लोकशाहीत लोक निवडणुकांव्यतिरिक्त आणखी कोणत्या चर्चा करतील? देशाने लोकांच्या तंत्राने चालणारी शासनप्रणाली स्वीकारली असेल, तर लोकांपर्यंत पोहचावेच लागेल ना! आणि प्रचाराचं म्हणाल, तर तो कधी नसतो. कालही होता, आजही आहे. फक्त प्रचाराचे रूप पालटले आहे. पूर्वी भिंती रंगवल्या जायच्या, आज सोशल मीडियाच्या भिंती रंगवल्या जात आहेत, ऐवढेच. तेव्हा आपल्याकडे टीव्ही तरी होता का? काही धनिकांकडे, शहरवासियांकडे असलातरी त्यावरील चॅनल्स संख्या किती होती? अहो, काळ बदलला तसं आपणही बदलायला नको का?”

माझं म्हणणं त्यांना समर्थनीय वाटले नसावे. ते पुन्हा म्हणाले, “पण प्रचारात असे एकमेकाचे गळे नव्हते धरले जात. असा चिखल नव्हते उडवत एकमेकावर.” तुमचं म्हणणं एकदम मान्य, आज असे होतही असेल कुठे, पण सगळंच वाईट घडतंय असं कुठं आहे. तेव्हाही असं घडलं नसेल, असं नाही. संपर्क माध्यमे वेगवान नसल्याने कदाचित तेव्हा आपणास कळले नसेल. आज माध्यमे प्रचंड वेगवान असल्याने घटना तात्काळ कळतात इतकंच.” माझ्या बोलण्याने त्यांचं समाधान झालं नसावं. म्हणाले,” “घटना घडतातच ना! हे घडू नये म्हणून काही करता येणार नाही का? थोडासा संयमाचा बांध आपण घालू नये का?” असंच बरंच काही-काही बोलत राहिले. अजूनही सांगत राहिले असते असंच काहीतरी. पण माझाच संयम ढळत चालला होता. माझा स्वभाव फारकाळ एकाच विषयात गुंतून त्याची टरफले सोलीत राहावा, त्याचा भुसा काढीत राहावा असा नसल्याने तो तेवढ्यावर संपवून त्यांचा निरोप घेतला. माझ्या कामाकडे वळता झालो. पण न कळत मनात त्यांचा तोच प्रश्न शंका म्हणून उभा राहिला. खरंच आम्ही समाजसंमत सभ्येतेच्या मर्यादांच उल्लंघन तर करीत नाही ना? 

Result | रिझल्ट

By // 4 comments:
संपलं एकदाचं शाळेचं शैक्षणिक वर्ष. वर्षभराच्या प्रगतीचे कागद प्रगतिपुस्तक, प्रगतिपत्रक अशी गोंडस नावं धारण करून शिकणाऱ्या मुलामुलींच्या हाती पडले. मास्तरांनी ठरवून दिलेल्या मोजपट्ट्या वापरून मुलांच्या वर्षभराच्या शैक्षणिक प्रगतीची मोजमापे केली. दिलेल्या मापात काही फिट्ट बसली. काहींची जोडपट्ट्या वापरून उंची वाढवावी लागली. त्या उंचीसह मुलांची प्रतवारी ठरली. कोण हुशार, कोणी साधारण, कोणी अप्रगत इत्यादी इत्यादी. आपापले परगणे घेऊन त्यांची शैक्षणिक प्रगती प्रगतिपत्रकात बंदिस्त झाली. हे प्रगतीबंद पेटारे उघडण्याचा दिवस साऱ्या शाळांमध्ये निकालाचा दिवस म्हणून ‘नेमेचि येतो पावसाळा’ तसा येत राहतो, प्रत्येक वर्षी. ठरलेल्या वेळी न चुकता. येताना एक अनामिक हुरहूर सोबत घेऊन येत असतो. आता मात्र ती हुरहूर हरवत चालली आहे. परीक्षेच्या निकालाचा दिवस केवळ उपचारापुरता उरला आहे. ना त्याची कोणाला फारशी उत्सुकता. ना कुतूहल. आठवीपर्यंत मी पास होणारच (?) म्हणून सारे कसे निर्धास्त. पुढच्या वर्गातला प्रवेश ठरलेला असल्याने प्रत्येकजण आपापल्या सवडीने शाळेत येतो. निकाल घेतो आणि पळतो. थोड्याफार फरकाने शाळाशाळांमध्ये दिसणारे हे दृश्य सगळीकडे सारखेच आहे.

निकालाचा दिवस म्हणण्यापेक्षा, शालेय शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस म्हणूया. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल द्यायचा असल्याने पाचवी ते आठवीचे सगळे वर्गशिक्षक आपापल्या वर्गांचे प्रगतिपत्रके इत्यादी साहित्य घेऊन वितरणासाठी शाळेत तयार. शाळेची बेल झाली. राष्ट्रगीतासाठी सारे शाळेच्या चौकात एकत्र उभे. बेल होऊन दोनतीन मिनिटे झाली. शाळेतील अडीच-तीन हजार विद्यार्थ्यामधून फक्त शेदोनशे डोकीच तेवढी रांगेत उभी. राष्ट्रगीत झाले. निकाल वाटपासाठी सूचना दिल्यानुसार विद्यार्थी नेमून दिलेल्या वर्गखोल्यांकडे वळले. वर्गशिक्षक नसणारे काही शिक्षक शाळेच्या चौकात उभे होतो. निकाल वाटपाच्या आजच्या दिवसाचे दृश्य पाहून आमच्यातील एक शिक्षक म्हणाले, “सर, पाचसहा वर्षापूर्वीचे शाळेचा निकाल वाटपाचे आणि आत्ताचे चित्र पाहून तुम्हाला काही फरक जाणवतो का?” त्यांच्या बोलण्याचा रोख लक्षात न आल्याने प्रश्नांकित चेहरे त्यांच्याकडे नुसतेच पाहत राहिले. आमच्या चेहऱ्यावरील पालटणारे भाव त्यांना समजले. म्हणाले, “पाचसहा वर्षापूर्वीचा परीक्षेच्या निकालाचा दिवस आठवा. दिलेल्या वेळेच्या आधीच मुलं, मुलांचे पालक शाळेत उपस्थित. बेल व्हायचा अवकाश दीडदोन हजारांचा लोंढा वेगाने आत शिरायचा. त्यांना आवरताना नाकीनऊ यायचं. आज- ना कोणाला निकालाची उत्सुकता. ना कोणाला हुरहूर.”

एक शिक्षक बोलते झाले. म्हणाले, “अहो, पास आणि नापास या द्वंद्वाची आता काळजी उरलीच आहे कोठे? जर सगळेच पास होणार असतील आणि पुढच्या वर्गात प्रवेश होणारच असेल, तर येथे या. रांगा लावा. निकाल घ्या. हे सगळे करायला वेळ आहेच कुठे पालकांना हल्ली एवढा.” त्यांना थांबवत दुसरे शिक्षक म्हणाले, “सर, तुमचं काहीतरी चुकतंय! पास नापास नाही कसं! सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाने मुलं नापास होत नाहीत, असं कुठंय? जर पोरगं काहीच अभ्यास करणार नसेल तर त्याचा मुक्काम ठरलेलाच.” “ठीक आहे सर, मुक्काम होऊ शकतो. पण असे मुक्काम घडतातच किती? नापास केलेच कोणाला तर त्याच्या अभ्यासाचे पुनर्भरण करूनच पुढच्या वर्गाला पाठवावे लागेल. पर्यायाने त्याच्यासाठी संबंधित शिक्षकाला आपला अधिकचा वेळ देवून हे सोपस्कार पार पडावे लागतील. आहे एवढे सारे सव्यापसव्य करायची तयारी? त्यापेक्षा द्या धक्का. पाठवा वरच्या वर्गात, हे सोप्पं नाही का? पहिले शिक्षक म्हणाले.

संवादात सामील होत आणखी एक शिक्षक आपला अनुभव कथन करीत उपहासाने म्हणाले, “सर, दे धक्का तंत्र खरंच महान कार्य आहे हो, आपल्या शिक्षक पेशाचे! काय सर्जनशीलता असते बघा आपल्या एकेकाकडे. अहो, पोरगं पहिलीपासून ढकलत ढकलत थेट नववीत. येथे पोहचल्यावर कळते त्याच्या प्रगतीची गती आणि अधोगतीही. माझ्याच वर्गातील अनुभव सांगतो, माझा मराठीचा तास. म्हटलं आपण काय शिकवलं, मुलं काय शिकली, हे पाहावं जरा. लागलो शिकविलेल्या घटकावर प्रश्न विचारायला. एकेक करीत शक्य होईल तेवढ्यांना प्रश्न विचारीत गेलो. जमलं त्यांनी दिली उत्तरे आपापल्यापरीने. एका विद्यार्थिनीला केलं उभं. उत्तर देण्यासाठी ती काही उभी राहीना. तिला परत सारं समजावून सांगितलं. म्हणालो, सांग बरं आता, या प्रश्नाचं उत्तर. तिच्याकडून उत्तराबाबत काहीच प्रतिसाद नाही. शेवटी थोडा रागावून म्हणालो, नाहीना येत उत्तर! असं कर, हा धडा आहे. वाच मोठ्याने. नाईलाजाने का होईना, काहीतरी वाचण्याशिवाय पर्याय नसल्याने ती पुस्तकातील पाठ वाचू लागली. तिने केलेले वाचन ऐकून बेशुध्द व्हायची वेळ आता माझी होती. स्वतःला थोडं सावरलं विचारलं, बाबा काय करतात ताई तुझे? म्हणाली, शिक्षक आहेत. आता मात्र, माझा घसा कोरडा पडायला लागला. काय हे? काय म्हणावं याला? सर्वशिक्षा अभियानाचे सार्वत्रिक यश की आपल्या व्यवस्थेतील शैक्षणिकप्रगतीचे यश? ही मुलगी या टप्प्यापर्यंत पोहोचली कशी? याचंच आश्चर्य वाटतं. शिक्षकपाल्याची ही स्थिती आणि तीही या वळणावर. तर इतरांचं काय असेल? खरंतर तिला येथपर्यंत आणणारी व्यवस्था महान वगैरेच म्हटली पाहिजे.”

आमच्यातील आणखी एक शिक्षक आपला राग व्यक्त करीत म्हणाले, “सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धत चांगली की, वाईट हा वादाचा मुद्दा जरा बाजूला ठेवू या! शिक्षणव्यवस्थेत प्रयोगशीलता आवश्यक असते, ही गोष्ट एकदम मान्य! प्रयोगच केले नाहीत तर काळाच्या नव्या प्रश्नांशी आपण भिडणार कसे? प्रयोगशीलता मान्य. पण प्रयोग करून जगाला निष्कर्ष देणारे आईनस्टाईन आपल्या प्रयोगशाळांमध्ये आहेत किती? असले तरी बोटावर मोजण्याएवढे. प्रयोग करावे लागतात. निरीक्षणे करून निर्णय घ्यावे लागतात. चुकलो तर पुन्हा दुसरा प्रयोग हाती घ्यावा लागतो. अनुमान बांधावे लागतात. आम्ही मात्र हे प्रयोग कागदावर शक्य करून दाखवितो. पर्यायाने कागदी गुणवत्तेचे घोडे थयथय नाचते. त्याचा पदन्यास पाहण्यात आम्ही हरकून जातो. पण त्याच्या पावलांनी उडणाऱ्या धुळीकडे आमचे साफ दुर्लक्ष. असं का घडावं? आपण याची काळजी का करीत नाहीत?”

“आस्था असते ना, तेथे आपलेपण असते. असं आपलंपण आपल्यात आणि समाजातही आज कितीसं उरलंय? आपल्या वेळेचा शाळेचा काळ आठवून पाहा तेव्हाचे शाळामास्तर. त्यांची सेवापरायणता. समाजाकडून मिळणारा मान. मास्तर फक्त वर्गापुरता नसायचा. सगळ्या गावाचा असायचा. गावातील सुख, दुःखाचा सोबती असायचा. साक्षीदार असायचा. बनगरवाडी कादंबरीतील राजाराम मास्तरासारखा मास्तर आपल्या वाड्यावस्त्यांमध्ये दिसतो का? ‘रातवा’मधील नलगे मास्तर दूर दुर्गम भागातील शाळेशीच नाही, तर गावाशीही एकरूप होतो. तेथून बदली झाली म्हणून व्यथित होतो. आज असा मास्तर आपल्या भोवती दिसतो तरी का? मोक्याच्या जागी बदली नाही, म्हणून जीवाचं रान करण्याचा हा काळ. आडवळणी भाग म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा मानण्याची मानसिकता. तेथे बदली नको म्हणून काहीही करायचं बाकी न ठेवणारी आम्ही माणसं. एवढंच कशाला, आपणच आपल्याला बघाना! आपण कोणत्या वर्तुळात उभे आहोत? वैयक्तिक प्रयोजनासाठी कोणत्यातरी दावणीला बांधलेले. बांधले गेल्यावर आपल्याला स्वातंत्र्य तरी कितीसे असणार आहे? शाळेत असताना आपणास शिकवणारे गुरुजी आजही आठवतात. आज आपण गुरुजी आहोत. मुलं आपणास किती काळ आठवत राहतील? यंत्रयुगानं सारं जगणंच यांत्रिक केलं आहे. व्यवसायाची नाळ जुळली, पण नात्यांचे पीळ सुटत चालले आहेत.”-आमच्यातील आणखी एक शिक्षक.

“खरंय सर तुमचं म्हणणं, काळ बदलला तशी काळाची परिमाणंही बदलली आहेत. आजूबाजूला परिस्थितीच अशी तयार होत गेलीय. मला काय त्याचं, हे वाटणं स्वाभाविक होत चाललयं. सगळ्यांच्या अपेक्षाच बदलल्या आहेत. अंगभूत गुणांवरून गुणवत्ता ठरण्याचा, ठरवण्याचा काळ मागे पडला आहे. प्रगतिपत्रकातील गुणांवरून गुणवत्ता ठरण्याचा हा काळ. प्रगतिपत्रकातील गुणांपेक्षा जीवनाची गुणवत्ता मोठी असते, हे समजण्याचा काळ कधीच मागे राहिला आहे. शर्यतीत आपलं घोडं जोतो पुढे दामटतोय. मग आणखी दुसरं होणार तरी काय आहे?” दुसरे शिक्षक म्हणाले. बराच वेळ आमचं बोलणं सुरु होतं. परिस्थितीवश शरणता, परिवर्तन, अपेक्षा, हताशा, निराशा आदी भावनांच्या हिंदोळ्यावर विचार झोके घेत होते.

निकाल घेण्यासाठी आलेली मुलामुली प्रगतिपत्रक हाती घेऊन वर्गाबाहेर पडत होते. सहावी,सातवीच्या वर्गातील काही मुलं शाळेच्या चौकात येऊन एकमेकाशी बोलत थांबली. प्रगतिपत्रक पाहून एकमेकांना विचारत होते; अ१, ब२, क१ म्हणजे नक्की किती गुण आपल्याला मिळाले असतील. त्यांचं मिळविलेल्या गुणांविषयी बोलणं आमच्या कानी आले. आम्ही बोलणं थांबवलं. त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्याचं आमच्याकडे लक्ष नसावं. त्यातील एक पोरगं दुसऱ्याला म्हणालं, “अरे, कितीका असेनात? आपण पास झालो ना, पुरे!” दुसरा मुलगा त्यांना म्हणाला, “अरे, मला हा पेपर थोडा कठीण गेला होता. त्या विषयात नक्की किती गुण मिळाले असतील रे? जर गुण समजले असते तर...” त्याचं आपापसात बोलणं सुरु होतं. काही प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी होती. ती मिळण्याचे मार्ग माहीत करून घ्यायचे होते. त्यांच्या मनात उदित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या शिक्षणव्यवस्थेत मिळतील की, नाही माहीत नाही.

आमच्यातील एका शिक्षकाने त्यांना आवाज देऊन जवळ बोलाविलेही शिक्षकांनी त्यांच्याशी बोलणं सुरु केलं. आस्थेने विचारपूस केली. प्रगतिपत्रक पाहून अभिनंदन केले. मुलांचे चेहरे खुलले. हातातील प्रगतिपत्रक सावरत पोरं वाकली. एकेका शिक्षकांच्या पायांना स्पर्श करीत आपल्या अंतर्यामीचा कृतज्ञभाव व्यक्त करीत उभी राहिली. त्यांना म्हणालो, “तुमच्या हाती असणाऱ्या प्रगतिपत्रकातील गुण महत्त्वाचे आहेतच. ते किती असावेत, हे तुम्हालाच ठरवायचं आहे; पण जीवनाच्या प्रगतिपत्रकात असणारी श्रेणी आणि गुण त्याहून महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला निदान आत्तापुरते तरी खूप मिळाले आहेत.” पोरांना माझं बोलणं समजलं की नाही, माहीत नाही. घरी जाऊन आईबाबांना आपला निकाल सांगायचा होता. तशी घाई त्यांच्या हालचालीवरून दिसत होती. आम्ही घरी जातो म्हणून पोरं निघाली. प्रसन्न चेहऱ्यासह त्यांची पावले शाळेच्या चौकातून क्रीडांगणाकडे आणि क्रीडांगणाकडून रस्त्याकडे आनंदाने पळाली. पळणाऱ्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे आम्ही कौतुकाने पाहत राहिलो.