Samvad | संवाद

By
जुनं वर्ष संपलं. नव्यातील काही दिवसांनी निरोप घेतला. नववर्षाचं स्वागत करीत माणसांनी आनंद साजरा केला. पण जाणारा कालचा दिवस अन् येणाऱ्या नव्या दिवसात असं काय विशेष होतं? मावळणाऱ्या वर्षात सूर्य तोच होता. चंद्राचा प्रकाशही तसाच होता. अन् नव्या वर्षाचं आगमन घेऊन येणारा सूर्यसुद्धा अगदी काल होता, तसाच होता. प्रश्न कालही होते. तसेच आजही आहेत. प्रश्नांची उत्तरे शोधण्याची धडपड तेव्हाही होती. आजही असणार आहे. त्यात नवीन असं काय घडलं किंवा घडणार होतं? कदाचित हे वाचून काही जण म्हणतील, काय अरसिक माणूस आहे हा! याला जीवनातला आनंद वगैरे, काही साजरा करता येतो की नाही? पण समजा, आपण आपलं सगळं जगणंच आनंदोत्सव करून जगलात, तर आणखी काही उत्सव साजरे करण्याची आवश्यकता उरतेच किती? नाहीतरी आनंद ही संज्ञाच व्यक्तिसापेक्ष आहे. तो कोणी, कुठून, कसा संपादन करावा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना! नाहीतरी आपण सगळे निखळ आनंदप्राप्तीसाठीच जगतो आहोत. यासाठीच तर माणसाने भौतिकसाधनं शोधली आणि त्या भौतिकसुविधांमध्ये तो स्वतःचं सुख शोधू लागला. जे मिळालं त्याचा आनंद होताच; पण जे मिळवता आले नाही, त्याचीही वेदना त्याला अस्वस्थ करीत राहिली. या अस्वस्थतेतून त्याची सुखसंपादनाची आकांक्षा प्रबल होत गेली. सुखांच्या शोधात माणूस धावत राहिला. ती मिळवता यावीत म्हणून तगमग वाढत गेली. काहीतरी मिळवण्यासाठी आपल्या आजूबाजूला झगमग उभी केली. झगमगाटासाठी त्याने काही निमित्तं उभी केली.

सण, उत्सव या साऱ्या गोष्टी माणसाच्या सामाजीकरणातून सांस्कृतिक संचित म्हणून प्रकटल्या. त्यांना परंपरांच्या कोंदणात बसवताना त्यांचं सार्वत्रिकीकरण झालं. जेव्हा एखाद्या गोष्टीचं सार्वत्रिकीकरण होतं, तेव्हा त्याची चिकित्सा होईल अथवा केली जाईलच, असं नाही. किंवा काहींना वाटेल, ती केली जावी, असंही काही नाही. आमचा आनंद आम्ही कसा मिळवावा, याचा शोध आमच्यापुरता लागला ना, मग पुरे! म्हणूनच वाट्यास आलेले क्षण चिरंजीव करून साजरे करण्याचे निमित्त अन् पर्यायही शोधले जाऊ लागले. माणसांच्या आनंदाला मुखरित करणारं एक माध्यम म्हणजे संवाद. माणसाला भाषा अवगत झाली, तेव्हापासून माणसं या माध्यमाचा वापर करीत आली आहेत. आता त्या संवादाने नवं रूप, नवं नाव धारण करून आधुनिक काळाने निर्माण केलेल्या संपर्क माध्यमांची सोबत केली आहे. मनात उदित होणाऱ्या भावभावना मुखरित करणारं एक माध्यम म्हणजे लिखित संदेश पाठवणं. हे संदेश पाठवताना नव्या पिढीने वापरलेली माध्यमे पाहताना खरंतर त्यांच्याविषयी कुतूहल वाटतं. क्षणात जगाशी कनेक्ट होणारी ही मुलं, मुली जणू काही प्रचंड उत्साह. पण या उत्साहात स्नेहाचा ओलावा किती आणि संदेश पाठविण्यातील यांत्रिकता किती? या प्रश्नाचा शोध घेतला तर उत्तर काय येईल, हाही एक प्रश्नच आहे.

विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित विद्यमानकाळ अनेक संपर्क साधने हाती देणारा आहे. प्रभावी संप्रेषण माध्यमांनी जगाला हाताच्या मुठीत मावण्याएवढं छोटं केलं. विश्वातल्या सुदूर टोकापर्यंत संवाद होऊ लागला आहे. पण हा संवाद ‘सुखसंवाद’ झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे. मला आठवते, आम्ही लहान असताना घरी येणारे पत्र संवादाचे एक लिखित माध्यम होते. पत्रांचा गठ्ठा हाती घेऊन येणारा पोस्टमनही आमच्यासाठी औस्तुक्याचा विषय असायचा. तेव्हा रेडिओवरून (टीव्ही असण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तोपर्यंत आमच्या गावात लाईटही आलेली नव्हती.) ऐकायला येणारी ‘डाकिया डाक लाया’ सारखी गाणी पोस्टमनविषयी आंतरिक जिव्हाळा निर्माण करणारी वाटायची. ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं, ते कोणाला सापडलं’ यासारखे खेळ आमच्या पिढ्या खेळायच्या. (आता कदाचित माझ्या मामाचा मोबाईल हरवला, तो कोणाला सापडला असं म्हणत असतील का?) काळ बदलला तशी संपर्कमाध्यमे बदलली त्यांचा वेगही प्रचंड वाढला. या वेगाच्या आवेगात आमच्या काळातील पत्र हरवण्याचा तो खेळही हरवला अन् पोस्टमनही औपचारिक पत्रे आणण्यापुरता उरला. येणाऱ्या पत्राच्या वाट पाहण्याची हुरहूर आता नाही राहिली. त्याकाळी चित्रपटांच्या गाण्यांमधून ‘हमने सनम को खत लिखा’ असं म्हणणारी लावण्यवती आज कदाचित ‘हमने सनम को मॅसेज लिखा’, असंही म्हणत असेल का?

मॅसेज पाठवणं, शुभेच्छा देणं; हेही सणवाराच्या निमित्तानं ठरलेले कामच वाटावं, इतकं यांत्रिकपणे आज होत असतं. कुणीतरी, कुणासाठीतरी, कोठूनतरी लिहिलेले, मिळवलेले मॅसेज फॉरवर्ड होत असतात. हे फॉरवर्ड करताना त्यात ‘फार वर्ड’ नसावेत, ही काळजी घेताना शब्दच असे काही तोडफोड करून, कात्री चालवून संक्षिप्त लिहिले जातात की, त्यांचा अर्थ समजून घेताना आमच्या पिढीला धाप लागायचं तेवढं बाकी असतं. यातील कितीजण स्वतः लिहून, स्वतःचे शब्द वापरून, तयार करून मॅसेज पाठवतात, हाही एक प्रश्नच आहे. ‘गुगलसर्चच्या’ पुण्याईने मिळवलेल्या रेडिमेड वाक्यांमध्ये यांना जीव ओतण्याचे कारणच नाही. घेतला मॅसेज दिला पाठवून, आला मॅसेज दिला फॉरवर्ड करून. तेवढेच पुण्यसंपादन आपल्या खाती जमा! आपल्या हाताने, आपल्या आप्तस्वकीयांना लिहिल्या जाणाऱ्या पत्रातून साधली जाणारी जवळीक या ‘फास्टफूडने’ निर्माण होईल तरी कशी?

नाही तरी आता ही पत्रे लिहितोच कोण? ती बिचारी मराठी विषयाच्या उत्तरपत्रिकेत लिहिल्या जाणाऱ्या पत्रलेखन या प्रश्नाच्या चार गुणांपुरतीच उरलीत. (आता तर दहावीच्या अभ्यासात कौटुंबिकपत्रही अभ्यासाला नाही.) ते गुण मिळवायचे कसे, तेव्हढं सांगा सर; ही मुलांची अपेक्षा. बाकी आता अनौपचारिक पत्र लिहितो तरी कोण म्हणा, सरळ बोलणंच होतं ना! मग कशाला ही उठाठेव करायची. हा त्यांच्या दृष्टीने साधासरळ हिशोब. पत्र कसं लिहावं हे वर्गात कितीही शिकवलं, तरी मुलाचं आपलं पहिले पाढे पंचावन्न ठरलेले, कारण रेडिमेड मार्गदर्शकाच्या जमान्यात स्वतः विचार करून आम्ही लिहितोच असं किती आणि कुठे? लिहिण्यासाठी आधी विचार करायला लागतो. रेडिमेड फास्टफूडच्या काळात तो करण्याची आवशकताच उरत नाही. बरं हे रेडिमेड घेताना काहीतरी थोडं तारतम्य असावं की नाही. पण त्याही नावाने शून्यच. एखाद्याने त्याच्याकडील ज्ञानाचा थोडा वापर करून मॅसेजच्या त्या आयत्या ओळीत खाली स्वतःचं नाव दिलं जोडून आणि पाठवला पुढे, तर तो ज्याला मिळाला, तोही काही न करता जसाच्या तसा आधीच्या नावासकट आणखी दुसऱ्याला पाठवतो. निदान त्यातील नाव बदलून आपले तरी लिहावे ना! काय म्हणावं आता याला? अनुकरण की, संप्रेषण माध्यमांचे सार्वत्रिकीकरण!

नव्या पिढीच्या या नव्या संप्रेषण साधनांच्या नवलाईपासून आमची पिढीही काही अलिप्त नाही, अथवा राहूही शकत नाही. कोणत्यातरी सणवाराच्या निमित्ताने जर मोबाईल, फेसबुक, इमेल उघडून पाहिले तर त्यांचे इनबॉक्स परिचित, अपरिचित, अल्पपरिचिताकडून आलेल्या संदेशांनी ओसंडून वाहताना दिसतील. एकाच छापाचे संदेश (अपवाद वगळून) वाचताना खरंच कौतुक वाटते. जणूकाही आम्ही सगळे भारतीय सारखाच आणि एकच विचार करतोय. (यालाच राष्ट्रीय एकात्मता वगैरे म्हणावं का?) येणाऱ्या मॅसेजेसमधील बरेचसे मॅसेज अगदी तेच ते दिसतील. त्यातील अक्षरांमध्येही फरक नसावा, इतके. खरंतर मला वैयक्तिक पातळीवर अशा आलेल्या संदेशांना प्रतिसंदेश पाठवणं प्रकरण जरा अवघडच वाटतं. अगदी स्पष्टच सांगायचं झालं, तर असा प्रासंगिक स्नेह नाही आवडत मला. याचा अर्थ मी माणसांना टाळणारा वगैरे आहे, असं नाही. मला माणसांमध्ये राहायला आवडते; पण त्यांचा असा प्रासंगिक शुष्कस्नेह टाळणेच मी स्वीकारतो.

माझ्या या अशा वर्तनाची समीक्षा करून सौभाग्यवतींच प्रशस्तिपत्र हाती असतं. “तुम्हाला नं, माणसाचं महत्त्व कळतच नाही! कोणी आपलं आपुलकीने पाठवला मॅसेज तर त्यांना तुम्ही का नाही पाठवत परत मॅसेज, असे कितीसे कष्ट होतात हो तुम्हाला परत मॅसेज पाठवायला?” असं बरचं काही काही तत्वज्ञानपर प्रबोधनातून मिळालेलं प्रशस्तिपत्र स्वीकारून काहीही वादप्रतिवाद न करता मी माझ्या वर्तनाचं समर्थन करताना सांगतो, “प्रत्येकाला स्वतःची एक ‘स्पेस’ असते आणि ती असावीही. ती त्याला मिळायला नको का?” पण मग समाज, सामाजिकता वगैरे विषयावरील तिचे उद्बोधन ऐकून, मतांचं खंडन-मंडन करता करता आमचा संवाद सुरु असतो. हा संवाद एवढा वेळ प्रेक्षक म्हणून ऐकणाऱ्या आमच्या दोन्ही मुलांचं मात्र मस्त मनोरंजन होत असतं. त्यावेळी त्यांच्या हाती असणाऱ्या मोबाईलवरून त्यांची बोटं सराईतपणे फिरत असतात. त्यांना विचारावं काय करतायेत हे? ठेवा ना, तो मोबाईल जरा बाजूला. अर्थात तेवढ्याच सराईतपणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मोबाईलमधील काय काय अॅप्स असतील तेवढ्यांवरून त्यांच्या स्नेह्यांना असाच कोणतातरी, कोणीतरी लिखित संवाद फॉरवर्ड होत असतो किंवा केलेला तरी असतो. आता काय म्हणावं याला? कालमहिमा की तंत्रमहिमा?

0 comments:

Post a Comment