कविता समजून घेताना... भाग: बावीस

By // No comments:
वस्ती आणि मोहल्ला

सकाळ उजाडली की,
वस्ती आणि मोहल्ल्याचा
मध्येच वाहणारा
नाल्याचा पुल ओलांडून
अहमद मामू
नान पाव, बन पाव अन् बटर पाव
आणि अशाच सटरफटर वस्तू
विकायला यायचा
तेव्हा साऱ्या वस्तीचा दिवस
चाय पावने सुरू व्हायचा

सारं अंग तेलकट मळकट केलेला
आणि कळकट कपडे घातलेला
मुख्तार चाचा
डोक्यावर मोठं टोमलं घेऊन
‘पप्पड ले लो... पप्पड ले लो...’
म्हणत भले मोठे तेलकट पापड विकायचा
सारी कळकट मळकट पोरं
चार-चाराने घेऊन त्याच्या भवती जमा व्हायची
आणि समदं टोपलंच्या टोपलं
सुपडं करून जायची,

‘दौ रूप्पे में बारा...’ ओरडत
आशाखाला केले विकायला यायची
आमच्या सिझनमध्ये
गुठली के दाम विकून सारी
पाटी झटकून जायची

दिवसातून दोनदा तरी
राजूचाचाच्या रंगीबेरंगी
बिल्लोरच्या किणकिणाटात
बाया रमायच्या घंटाभर तरी,
आपलं मनगट सोपवायच्या
त्याच्या हवाली बिनधास्त
बिल्लोर टिचला की हातातलं रक्तही
त्या पदरानं हलकेच टिपून घ्यायच्या हसत खेळत

अब्दुल किल्लीवाला घड्याळही
दुरूस्ती करायचा
मी थांबायचो त्याच्या घराच्या ओट्यावर
‘अब्बा, आरेले… बैठनेको बोलेल है’
अशा किणकिणत्या आवाजात
सांगणारी हमीदा
मान खाली करून बोलायची
तेव्हा
मीही शरमल्यागत
अंग चोरून खाटेवर बसायचो,
तिच्या अब्बाकडून
घड्याळ कधीच दुरूस्त झालं नाही
मी मात्र घड्याळ घ्यायला न चुकता गेलो
आणि एक दिवस
हमीदाच्या शादीची
दावत खाऊन आलो

मोहल्ल्यातले पोरं आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे
पण त्यांनी कधीच
रडीचा डाव खेळला नाही
मॉ-भैनीवरून शिव्या दिल्या तरी
जात धर्माचा उद्धार करून
अंगाशी कधी खेटलो नाही

फातिमा बुढ्ढी भर दुपारी
कुडकुड्या घेऊन यायची लपतछपत
आणि
पूर्ण दिवस बायांमध्ये सवतीचे
गऱ्हाणे करत बसायची
बस्तीतल्या बायांच्या दुःखाशी
आपल्या दुःखाचं नातं जोडायची
उस्मान चाचाच्या मैय्यतला
वस्तीने फाया जमा केला
त्याच्या बिबी बच्च्याला
दुखवटाबी दिला

वस्तीतल्या बालवाडीत
पंधरा ऑगस्ट साजरा व्हायचा
तेव्हा
मेहमूद भाई पाय आपटून
तिरंग्याला कडक सलाम हाणायचा
मोहल्ल्यात रंगायचा
शहाबानू आणि जॉनी बाबू
कव्वालचा रंगीन मुकाबला
तर
वस्तीत दणकायचा
वैशाली शिंदे आणि मिलिंदचा
आमना सामना...
तेव्हा वस्ती आणि मोहल्ला
रात्र रात्र जागायचा
आणि
एकमेकांना ओवाळून
पैसे उधळायचा

वस्तीला तोंडपाठ असायचे
अजानचे शब्द
आणि मोहल्ल्याला सांगता यायचा
प्रार्थनेचा अर्थ
आता कुठे विकासाची 'गंगा'
वस्ती आणि मोहल्ल्यावर अवतरलीय
स्वातंत्र्यानंतरच्या साठवर्षानंतर...
वस्ती आणि मोहल्ला
यांच्या मधून वाहणारा नाला
आता बंडींग करण्यात आलाय
वस्ती आणि मोहल्ल्याला जोडणारा पुलही
जमीनदोस्त करण्यात आलाय
आणि
त्यावरून संरक्षक भिंतही उभारली गेलीय
त्यामुळे वस्तीतून मोहल्ल्यात
आणि मोहल्ल्यातून वस्तीत
कोणी जाऊ शकत नाही
आता वस्तीला ऐकू येतात
दिवसातून चारदा मशीदीतले अजान
आणि
मोहल्ल्याला ऐकू जातात,
भारत माता की जय चे फर्मान...!!

डॉ. संजीवकुमार सोनवणे


गुंते अनेक प्रश्नचिन्हे दिमतीला घेऊन येतात. गुरफटणे त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. काही गुंते सहज सुटतात, काहींची उकल करताना सगळं कसब पणाला लागूनही हाती फारसे काही लागत नाही. पण काही गुंते असेही असतात, जे कळतं नकळत गोफ विणत राहतात. त्यांचे पीळ समजून घेता आले की कळते; केवळ गुंत्यांनाच नाही, तर त्याभोवती साकळलेल्या समस्यांनाही काही अंगभूत आयाम असतात. ‘भारत’ असाच एक गुंता आहे. भारतीय म्हणून आपले अनेक असणे आणि अनेकांत एक असणे, हाही सहजी न आकळणारा गुंताच. संभ्रमाच्या सीमारेषांवर सतत झोके घेत राहणारा. आपल्या सार्वजनिक जगण्याकडे एक कटाक्ष टाकला तरी याचं प्रत्यंतर सहज येतं. एखाद्या देशप्रदेशाचा, तेथील जगण्याचा शोध केवळ परंपरेचे किनारे धरून वाहत आलेल्या संचिताने पूर्ण नाही होत. कुठल्या तरी अक्षांशापासून रेखांशापर्यंत असलेल्या विस्ताराचा भूगोल समजून घेता आला, म्हणजे त्या प्रदेशाचे भविष्य सांगता येतंच असं नाही. भूगोल समजून घ्यायचा, तर इतिहासाचेही परिशीलन होणे आवश्यक ठरते.  

राष्ट्र, राज्य शब्दांच्या सुनिश्चित परिभाषा काय असतील, त्या असोत. त्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी कशाची आवश्यकता असावी, ते काळ ठरवतो. काळाने परिस्थितीच्या कातळावर कोरलेल्या कृती त्यांचे प्रयोजन असतात. समान आशा-आकांक्षांच्या पात्रातून वाहणारे समूह राष्ट्रराज्य संज्ञेस अनुरूप असतात. निर्धारित संकल्पनांच्या निकषास पात्र असणारी अनेक राष्ट्रे इहतली नांदत आहेत. परिभाषेच्या कोणत्यातरी सामान्य सूत्रात साकळून त्यांना सांधता येतं. पण ‘भारत’ नावाच्या खंडतुल्य भागाचा ल.सा.वि. काढणे अवघड प्रकरण आहे. समन्वयाच्या, समर्थनाच्या, स्वीकाराच्या, नकाराच्या, विरोधाच्या, विवेकाच्या, अविवेकाच्या विचारधारा शतकांचे किनारे धरून येथून वाहत आहेत. मार्ग भिन्न असले, तरी शांतीची सूक्ते सगळ्यांना प्रिय असल्याचे अधोरेखित केले जाते. अर्थात, यातही आकलनाचा अन् आचरणातील अंतराचा गुंता असतोच. भारत सहिष्णू वगैरे असल्याच्या वार्ता नित्य ऐकू येतात. यात काही वावगं नाही. शतकांच्या प्रवासात आपण जपलेलं हे संचित आहे.

माणूस माणसाला आपला म्हणताना अनेक व्यवधाने असतात. आपल्याकडे ते नाहीत असे नाही; पण किमान स्तरावर व्यवहार करताना येथे अधिवास करणाऱ्या माणसांना ही व्यवधाने गतिरोधक नाही वाटली. संस्कृती नावाची संकल्पना काही एखाददोन वर्षात नाही उभी राहत. काळाचे किनारे धरून ती वाहत राहते, अनेक ज्ञात-अज्ञात परगण्यातून. सहानुभूती अनुभूतीचे काठ धरून ती उभी राहते. समान आशा-आकांक्षा असणाऱ्या माणसांनी एकत्र येवून मनात गोंदवलेल्या स्वप्नांना दिलेला आकार म्हणजे संस्कृती, असे म्हणणे वावगे होणार नाही. स्वप्ने घेऊन विहार करणारी माणसे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रतिबद्ध होतात. त्यांच्या प्रयासांचा परिपाक संस्कृतीचे प्रवाह समृद्ध होणे असतो. संस्कृतीच्या उदरातून संस्कार जन्मतात अन् संस्कारांचे साकव घालून जगणं सुंदर करावं लागतं.

समाज नावाची संकल्पना योजनापूर्वक उभी करावी लागते. अगत्यपूर्वक जतन करावी लागते. त्यासाठी सत्प्रेरीत विचारांचे रोपण मनोभूमीत घडणे अनिवार्य असते. विचार तेव्हाच रुजतात, जेव्हा त्याचं अवकाश आकांक्षांपेक्षा अधिक अफाट असते. अफाटपण सांभाळण्यासाठी अथांग अंतःकरण असणारी माणसे वसती करून असायला लागतात. सत्शील विचारांची रोपटी वाढतात, तेथे संस्कारांचे पोवाडे कधी गावे लागत नाहीत. संस्कृतीने साठवलेल्या संचिताचे पडघम बडवण्याची आवश्यकता नसते. संस्कारांच्या शीर्षस्थानी संवेदनशील अंतःकरण असणारी माणसे असली की, विचारांना नैतिकतेचे कोंदण लाभते. देव, धर्म, वंश, जात असे अनेक शब्द इहलोकी नांदते राहण्यास बराच अवधी झालेला असला, तरी ती काही सहजप्रेरणेतून घडलेली निर्मिती नाही. कुठल्यातरी संकुचित स्वार्थातून प्रकटलेले हे अभिनिवेश. माणूस मूळचा नितळच; पण वाहणं विसरला अन् साचलेपण येऊन जगण्यात गढूळपण वसतीला आलं. पाणी कधी शिळं होत नाही, असे म्हणतात. पाण्याचा धर्म वाहतावाहता निवळणे; पण ते साचते, तेव्हा त्याला कुजण्याचा शाप असतो. माणसांच्या जगात माणूस सगळ्या सुखांचे केंद्र असायला हवा. पण विचार तर्काचे किनारे धरून वाहणे विसरतात, तेव्हा जगण्यात साचलेपण येणे अटळ भागधेय बनते.

काळाची सूत्रे ओळखून आयुष्याची उत्तरे ज्यांना शोधता येतात, त्यांच्या वाटेवर प्रगती पायघड्या घालून उभी असते. जगण्याचे मोल माहीत नसते, त्यांच्या अस्तित्वाची किंमत शून्याभोवती प्रदक्षिणा करीत असते. निसर्गनिर्मित प्रेरणांना प्रमाण मानून विहार करणारी मानव जात नितळपण घेऊन नांदती असल्याच्या कहाण्या ऐकत असतो. अर्थात, याला आपला प्रदेशही कसा अपवाद असेल? येथील समूहाचा कालसुसंगत जगण्याचा परीघ सीमित असला, तरी विचारांची वर्तुळे किमान काही सामावण्याएवढी विस्तृत होती. याचा अर्थ व्यवस्थेत सगळंच आलबेल होतं, असंही नाही. पण माणूसपण जपण्याएवढं विशाल अंतःकरण माणसांकडे होतं. विषमतेच्या वाटांनी चालणे घडत होते, तरी सीमित का असेना; पण एक मोकळेपण जगण्यात नांदते होते.

वर्तमानाचे पेच घेऊन जगणारी गावं विषमतेचे संदर्भ समर्पणपूर्वक सांभाळत असल्याचे सांप्रत दिसतं. बदलत्या काळाने पदरी घातलेलं हे दान आहे. नितळपणाला लागलेलं ग्रहण आहे. पण कधीकाळी याच गावांमध्ये परस्पर विरोधी विचारधाराही सुखनैव कालक्रमणा करीत होत्या. लहान-मोठा, आपला-परका अंतरे असली, तरी ती एवढी दूर कधीच नव्हती की, पार करता येणारच नव्हती. एक रोटीबेटी व्यवहाराच्या कुंपणांना वगळलं, तर जगण्याचे व्यवहार परस्पर सहकार्याचे साकव घालून सहज पार पडत असत. व्यावहारिक पातळीवरील जगण्यात कोणी कोणाला धर्माच्या, जातीच्या मोजपट्ट्यानी मोजल्याची उदाहरणे असलीच, तर अपवाद असतील. धर्म, वंश, जात या गोष्टींपेक्षा भाकरीचे प्रश्न गहन असतात. जातीधर्माच्या अभिनिवेशाने अस्मितांचा जागर घडत असेलही, माहीत नाही. पण पोटात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी भाकरीच लागते. या प्रश्नांची उत्तरे धर्म, जातीने आखलेल्या चौकटींनी दिली आहेत की नाही, सांगता येत नाही. पण भाकरीची उत्तरे माणूस शोधत आला आहे. भाकरीला कुठलाही धर्म नाही चिटकवता येत. तिचा धर्म भूक असतो अन् जात ती मिळवण्यासाठी करावे लागणारे कष्ट.

कवीने कवितेतून मांडलेला अनुभव हीच सार्वकालिक वेदना घेऊन येतो. त्यांना भेटलेली माणसे जगण्याच्या कलहात आयुष्याचे अर्थ शोधू पाहतात. त्यांच्या डोळ्यात बंगला, गाडी, माडीची स्वप्ने नाहीत. त्यांच्या जगण्याचं वास्तव भूक आहे अन् प्रत्यंतर भाकरी. भाकरीशी ईमान राखणारी ही माणसे माणसांशी इमानेइतबारे वर्ततात. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या माणसांना समोर माणसे नांदती दिसतात. त्यांचं माणूसपण अबाधित आहे. त्यांचे सण-उत्सव त्यांचा ओंजळभर आनंद आहे. त्याला धर्माची वसने कधीच चढवली नाहीत की, कोणी कुणाच्या विरोधात आवाज बुलंद केला नाही.

नाल्याचा पुल ओलांडून सकाळीच येणाऱ्या अहमदमामूने आणलेल्या पाव, बटरपावने वस्तीचा दिवस सुरु व्हायचा. त्याच्या दर्शनाने कुणाला अपशकून नाही झाला कधी. मुख्तारचाचाने आणलेले पापड अन् आशाखालाने विकायला आणलेल्या केळी आणि आंब्याना धर्माचा रस कधी चिकटला नाही. मुख्तारचाचाच्या मळक्या कपड्यांवरून पोरांनी जातीचे माग नाही काढले. राजूचाचाच्या रंगीबेरंगी बिल्लोरच्या किणकिणाटात बाया रमायच्या. त्याच्याकडून हातात बांगड्या भरून घेताना त्याच्यावर धर्माची लेबले लावून स्पर्श कधी टाळला नाही. बांगड्या भरून घेण्यासाठी परक्या पुरुषाच्या हाती आपलं मनगट सोपवायलाही विश्वास असायला लागतो. राजूचाचाचं मन कधी विकारांनी विचलित नाही केलं. त्याच्यासाठी प्रत्येक मनगट आईचं, बहिणीचं होतं. हातात बांगड्या भरताना बिल्लोर टिचला की, हातातलं रक्तही पदरानं त्या हसत हलकेच टिपून घ्यायच्या. त्या रक्ताला कधी धर्माचा रंग नाही दिसला. थोड्याशा विपरीत घटनांनी विचलित होऊन रक्ताचे सिंचन करण्याच्या वार्ता करणाऱ्या जगात या रक्ताचे रंग अन् अनुबंध कसे आकळतील?

फातिमा बुढ्ढी दुपारी बायांमध्ये सवतीचे गाऱ्हाणे करत बसायची. वस्तीतल्या बायांच्या दुःखाशी आपल्या दुःखाचं नातं जोडायची. मनात साचलेले किल्मिषं एकेक करून सांडत राहायची. बाईचं असणं बाईलाच कळतं. जातधर्म बघून वेदनांची उंची नाही ठरत. बाईच्या जन्माचे भोग सगळीकडे सारखेच. दुःखाची नावे बदलली, तरी जखमांचे वाहणे तिच्या जन्माशी जुळलेलं असतं. तिच्या आयुष्याचा धर्म एकच; तो म्हणजे वेदना. उस्मानचाचाच्या मृत्यूने पोरका होणारा त्याचा संसार सावरायला मदतीसाठी पुढे येणाऱ्या हातांचा धर्म कुठला असेल? त्याच्या जगण्याला नडणारी गरिबी माणुसकीचा गहिवर घेऊन येते. हे करुणार्त रूप धर्माच्या नितळपणाची परिभाषा होते. माणसांच्या विचारांच्या, वागण्याच्या व्याख्या करता येतात. पण माणुसकीच्या परिभाषा शब्दांत नाही, कृतीत दिसतात. वस्तीने पैसे जमा करून त्याचे अंतिम संस्कार केले. त्याच्या बिबी बच्च्याला दुखवटा देताना धर्माच्या चौकटींची गणिते नाही आणली.

अब्दुल किल्लीवाल्याकडे घड्याळ दुरूस्तीसाठी जाणे घडताना तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या मुलासाठी ओसरीचा उंबरठा मर्यादांची लक्ष्मण रेषा ठरतो. ही मर्यादा काही कुणी सक्तीने घातली नसते. ती वागण्यातून प्रतीत होते अन् जगण्यातून दिसते. ‘अब्बा, आरेले… बैठनेको बोलेल है’ हे किणकिणत्या आवाजात सांगताना हमीदाने मान वर करायचं धाडस नाही केलं कधी. मनात आसक्तीचं आभाळ ओथंबून यायचं; पण मर्यादांचे बांध तोडून ते नाही वाहिले. मनात उमलत्या वयाची फुलपाखरे भिरभिरत असली, तरी कधी त्यांनी रंग नाही उधळले. घड्याळ घ्यायला न चुकता जाणाऱ्या मुलाला मनाची मनोगते न कधी हमीदाला सांगता आली, ना तिने तिच्या मनाची भाषिते कधी याला कळू दिली. न याला शोधता आली.

मोहल्ल्यातली अन् वसतीतली पोरं सोबत क्रिकेट खेळायचे, पण त्यांनी कधीच रडीचा डाव खेळला नाही. खेळताना एकमेकाला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, तरी जातधर्माचा उद्धार करून डोकी फोडण्यापर्यंत कलह नाही गेला. वस्तीतल्या बालवाडीत पंधरा ऑगस्ट साजरा व्हायचा, तेव्हा मेहमूदभाईकडून पाय आपटून तिरंग्याला कडक सलाम हाणताना भारत त्याच्या नजरेतून कृतीत उतरून यायचा. शहाबानू आणि जॉनी बाबू कव्वालचा मोहल्ल्यातला मुकाबला, वैशाली शिंदे आणि मिलिंद शिंदेंच्या गीतांचा वस्तीत दणकणारा आमना सामना कधी एकमेकांच्या आड नाही आला. कलेला कसला आलाय धर्म अन् जात? हे काही यांना कोणी पुस्तकातून शिकवलं नव्हतं. रातभर जागून, एकमेकांना ओवाळून पैसे उधळताना वस्ती अन् मोहल्ला माणसांमध्ये भिंत नाही झाला. या उधळण्यात निखळ माणूसपण एकवटलेलं होतं. वस्तीला अजानचे शब्द तोंडपाठ असायचे आणि मोहल्ल्याला प्रार्थनेचे अर्थ मुखोद्गत. ईश्वर, अल्ला यांच्या मनात वसतीला होते. राम-रहीम जगण्यात होते. त्यांनी म्हटलेली कवने भक्ती होती. एक दिलाने नांदणे तपस्या होती. माणूसपणाच्या संकुचित व्याख्या वस्ती अन् मोहल्ल्याला कधीच आचरणात नाही आणता आल्या. संस्कृतीचे किनारे धरून वाहत आलेल्या प्रवाहात साऱ्यांना सामावून जाता यायचे. एका धाग्यात ओवण्यासाठी कोणाला सूत्रे घेऊन सांधण्याचे काम नाही करायला लागले.

काळाने कूस बदलून वळण घेतलं. प्रगतीचे प्रवाह वळते झाले. विकासाची स्वप्ने सोबत घेऊन वाहणारे ओहळ वस्ती, मोहल्ल्याची वळणे पार करत वाहते झाले. विकासाची 'गंगा' अंगणी अवतरली. वस्ती आणि मोहल्लामधून वाहणारा नाला बंडींग करण्यात आला. पण त्यांना जोडणारा पुल जमीनदोस्त करून. किती पिढ्या चालत राहिल्या असतील या रस्त्याने? किती पावलांनी हे अंतर पार करताना मनांचे मार्ग सांधले असतील? पण प्रगतीच्या एका पारिभाषेने केवढं अंतराय वाढवलं. प्रगतीची पावले लावून आलेला विकास परिसरात सुविधांचे स्मारके बांधते झाला. पण नितळपण घेऊन वाहणाऱ्या स्नेहाच्या स्मृती सौहार्दाच्या सूत्रातून सुटत गेल्या. आताही वस्तीला ऐकू येतात मशीदीतले अजान आणि मोहल्ल्याला ऐकू जातात, भारत माता की जय चे फर्मान...! पण प्रर्थानांमधील आर्तता अवकाळी आटली. अजानमधून आपलेपण घेऊन वाहणारे आस्थेचे प्रवाह अनपेक्षित अवगुंठीत झाले. कोणाचा आवाज बुलंद याचीच चढाओढ सुरु झालीय. कोणाचे आवेश अधिक अफाट, अमर्याद यावरून अभिनिवेशांचे महत्त्व ठरू लागले.

वर्षामागून वर्षे सरतात. पुढे जाताना आपल्या असण्याचे, नसण्याचे प्रश्नही अटळपणे बदलतात. काळ चांगला की वाईट, हे त्या-त्या वेळची परिस्थिती ठरविते. सगळीकडे अनिश्चिततेचे मळभ पसरलंय. परिस्थितीच्या रेट्यात गावं-शहरं बदलली. त्यांचा चेहरा हरवला. माणसंही बदलली. जगण्याचे संदर्भ बदलले. स्वार्थपरायणतेत सामाजिक हित हरवलंय. निर्व्याज, नितळ स्नेह बाजूला पडून भाऊबंदकीचे नवे परगणे उभे राहातायेत. गावातलं ‘राज’ गेलं त्याला ‘कारण’ जुळलं अन् राजकारणाचे नवे फड रंगू लागले आहेत. नव्या समस्या अधिवासास येत आहेत. पद आणि पैशातून येणारा मुजोरपणा दिसतो, तशी परिस्थितीवश विकलताही नजरेस पडते आहे. निर्लेप, निर्मोही, निर्लोभीवृत्ती, उदारमनस्कता आदि गुणांनी बहरलेले परगणे उजाड होत चालले आहेत. मुखवटे धारण करणारे साध्याभोळ्या माणसांना फसवण्यासाठी तत्पर आहेत. सभ्यतेची वसने परिधान करून लुच्चे, लफंगे उजळमाथ्याने वावरत आहेत. समाज आंधळ्या विचाराने निर्मित आस्थेतून त्यांना प्रतिष्ठा देत आहे. सहज घडणाऱ्या शिकारीसाठी ते सावज हेरत असतात. परिस्थितीवश विमनस्क झालेली माणसं विनासायास यांच्या हाती पडतात. एकदा का ही सापडली की, यांचे मेंदू पद्धतशीर धुतले जातात. वॉश केलेले मेंदू स्वतःहून डोळ्यांवर पट्ट्या बांधून घेतात. डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीने फक्त समोरील उजेड हरवतो, पण अंधभक्तीच्या बांधलेल्या झापडबंद पट्ट्यांनी विचारविश्वात अंधार होतो. अंधाराशी सोयरिक करून उजेडाला विसरणे वंचना असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: एकवीस

By // No comments:

लक्षात ठेव पोरी

लक्षात ठेव पोरी
तू तुकडा आहेस काळजाचा
विपरीत काही घडलं
तर जीव जाईल आमचा

तुला घराबाहेर पाठवायला
मन आमचं धजत नाही
पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं
असही वाटत नाही
तळ हातावरच्या फोडाप्रमाणे
जपलयं तुला काळजीने
जाणिव ठेव त्याची
आणि झेंडा लाव तुझ्या यशाचा

उच्छृंखल, धांदरट राहू नकोस
स्वप्नात उगीच गुंतू नकोस
आरशापुढे उभं राहून
वेळ वाया घालू नकोस
मोहात कसल्या पडू नकोस
अभ्यास करण्या विसरु नकोस
पैसे देवूनही मिळणार नाही
तुझा वेळ आहे लाख मोलाचा

मन जीवन तुझं कोरं पान
त्यावर कुणाचं नांव लिहू नकोस
स्पर्श मायेचा की वासनेचा
भेद करण्यात तू चूकू नकोस
मोबाईल, संगणक आवश्यकच
त्यांच्या आहारी जावू नकोस
परक्यांवर विश्वास करू नकोस
अनादर नको करू गुरूजनांचा

देहाचं प्रदर्शन करण्यासाठी
संस्कार, कपडे टाकू नको
लाज वाटेल असं काही करण्यासाठी
चेहरा उगीच झाकू नको
चुकांना येथे नसतेच कधी माफी
गेलेली अब्रूही परत येत नाही
मुलीच्या चालण्या बोलण्याकडे
सतत डोळा असतो समाजाचा

असं विपरीत घडत असलं तरी
आमचा तुझ्यावर विश्वास आहे
जिजाऊ, सावित्री आणि अहल्या
तुझा आदर्श आहे
युग आहे गुणांचं-स्पर्धेचं
हिमतीनं तू संघर्षही करशील
मात्र, यशावरती स्वार होण्या
लगाम लागतो बेटा संयमाचा

लक्षात ठेव पोरी
तू तुकडा आहेस काळजाचा
विपरीत काही घडलं
तर जीव जाईल आमचा

- प्रा.बी.एन.चौधरी

सौंदर्य शब्दाची सुनिश्चित परिभाषा करायची असेल, तर ती कोणती असेल? त्याचे संदर्भ नेमके कोणत्या बिंदूना सांधणारे असतील? सौंदर्य देहाशी निगडीत असावे की, मनाशी जुळलेलं? देहाचं सौंदर्य विखंडीत होऊ शकतं. मनाशी बांधलेलं सौंदर्य अभंग असतं. असं असेल तर त्याबाबत विचारांचा गुंताच अधिक का दिसतो? ते असतं की, तसं समजायचं? खरंतर ही प्रश्नचिन्हे न थांबणारी. कदाचित याबाबत ज्याचेत्याचे अनुभव निराळे अन् उत्तरे वेगवेगळी असतील. ती तशी असू नयेत, असं नाही. कोणाला उगवत्या सूर्याचा हात धरून धरतीवर अवतरलेल्या प्रसन्नतेत सौंदर्याचा साक्षात्कार घडेल. कोणाला मावळत्या प्रकाशात ते गवसेल. कोणाला चांदण्याच्या शीतल प्रकाशाच्या संगतीने सांडलेलं आढळेल. कोणाला झुळझुळ पाण्यातून वाहताना दिसेल. कोणाला डोंगराच्या कड्यावर बिलगलेले दिसेल. कुणाला आसपासच्या आसमंतात विखुरलेलं. कोणाला ते मूर्तीत दिसेल, कोणाला माणसात. कोणाला आणखी काही. ते कुठे असावं, याला काही मर्यादांची कुंपणे घालून सीमांकित नाही करता येत. गवसेल तेथून ते वेचावे. वेचून साठवत राहवे. आहे त्यातून थोडे वाटतही राहवे.

सौंदर्य वाहणाऱ्या झऱ्याचे नितळपण असते. वाऱ्याची मंद झुळूक असते. मंदिरातल्या आरतीचा स्वर असते. सश्रद्ध अंतकरणाने केलेली प्रार्थना असते. नंदादीपाचा प्रकाश बनून ते मनाचा गाभारा भरून टाकते. त्याचा परिमल अंतर्यामी आस्थेच्या पणत्या प्रज्ज्वलित करतो. पावन शब्दाचा अर्थ सौंदर्याच्या चौकटीत आकळतो. सौंदर्याचा अधिवास असतो, तेथे विकल्पांना वसती करायला जागा नसते. कुणी परमेश्वराला सौंदर्याच्या परिभाषेत शोधतो. कुणी सौंदर्यालाच भगवान मानतो. कुणी सौंदर्यात सकल सौख्यांचा शोध घेतो. अवनीच्या अफाट पसाऱ्यात सौंदर्य ठायी ठायी साकळलेलं आहे. फक्त ते पाहण्यासाठी नजर असायला लागते. हे सगळं खरं असलं, तरी नितळ, निर्व्याज, निखळ सौंदर्याचा शोध माणसाला अद्याप काही पूर्णांशाने घेता आला नाही, हेही तेवढंच सत्य. सौंदर्य डोळ्यात कधी नसतेच, ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते. दृष्टीत पावित्र्याच्या परिभाषा अधिवास करून असतील, तर त्याला भक्तीचे साज चढतात. भक्ती असते तेथे श्रद्धा असते अन् श्रद्धेतून उदित होणारे विचार विश्वमंगलाच्या कामना करीत असतात. ते वासनेच्या, विकारांच्या, विषयांच्या दलदलीत अडकते, तेव्हा त्याला कुरुपतेचा शाप जडतो.

सौंदर्याच्या परिभाषा देहाभोवती येऊन थांबतात, तेव्हा जगण्याचे व्यवहार नव्याने पडताळून बघावे लागतात. आपणच आपल्याला परिणत करताना परिशीलन घडण्याची आवश्यकता असते. सगळीच माणसे काही सर्ववेळी, सर्वकाळी सोज्वळ, सात्विक वगैरे नसतात, म्हणून वर्तनव्यवहारांचे आकलन घडताना आसपास आढळणारे विसंगत विचार अन् विकृत नजरा समजून घ्याव्या लागतात. समाजाच्या चिंतेचे ते एक कारण असते. नितळ नजर लाभलेल्यांना अरत्र, परत्र पावित्र्याच्या परिमलाने गंधाळलेला परिसर दिसत असतो. विकार वसतीला असणाऱ्यांना विषय तेवढे दिसतात. विकारांचा विच्छेद करावा कसा? हा माणसांच्या जगातला सार्वकालिक चिंतेचा विषय आहे.

विकारांच्या वर्तुळात वसतीला असलेली विपरीत मानसिकता विश्वाच्या विवंचनेचा विषय राहिला आहे. विसंगतीच्या वर्तुळापासून विवक्षित अंतरावर वसती करावी कशी, या विवंचनेला घेऊन ही कविता विकल्प शोधू पाहते. काळजाचा तुकडा असणाऱ्या लेकीप्रती असणारी चिंता बापाच्या काळजातून वाहत राहते. तिच्या ललाटी लेखांकित झालेले अभिलेख सात्विकतेचे कवच घेऊन नांदते राहण्याची कामना करते. पोरीच्या प्रेमापोटी चिंतीत होणारा बाप म्हणूनच तिला समजुतीच्या चार गोष्टी सांगून शहाणे करू पाहतो. प्रसंगी तिच्या सुरक्षेच्या काळजीपोटी धास्तावतो. हे कुणाला रास्त वगैरे वाटणार नाही. लेकीच्या मनी वसतीला असणाऱ्या आकांक्षांच्या आभाळाचा संकोच वाटेल कुणाला. असे वाटू नये असेही नाही. एका अनामिक काळजीपोटी बापाच्या काळजात कातरकंप उठतात. अनुत्तरित प्रश्नांचे काहूर दाटून येते. तिच्या काळजीने काळजाचा ठोका चुकतो. जगणं कलंकित नसावं, यासाठी तिच्या भोवती वात्सल्याचे वर्तुळ उभे करून; तिच्या जगण्याला सुरक्षित करू पाहतो. तिच्या वर्तनाचा परिघ समाजसंमत वर्तनाच्या चौकटीत असावा, म्हणून विवंचनेत असणारा बाप लेकीला उपदेश करताना ‘लक्षात ठेव पोरी’ म्हणतो. त्याचे असे म्हणणे संयुक्तिक नाही, असे कसे म्हणता येईल?

सुंदरतेचा समानार्थी शब्द ‘नारी’ असला तर... त्यात काही अतिशयोक्त नाही. तो आहे. असावा. तिच्या व्यक्तित्वाला सौंदर्याच्या परिभाषेत समजून घेता यावे. तिच्या अस्तित्वाने आयुष्याला अनेक आयाम लाभतात. तिच्या आगमनाने आयुष्याचे सगळेच परगणे प्रसन्नतेचा परिमल घेऊन जगणे गंधित करीत असतात. तिच्याशी जुळलेल्या प्रत्येक नात्यांनी आयुष्याचे अर्थ नव्याने आकळतात. या वास्तवापासून विचलित कसे होता येईल? हे असं सांगणं देखणं वगैरे वाटत असलं, तरी विचारांत अन् वर्तनातही ते तसेच असेल असे नाही. तिच्याकडे बघणाऱ्या सगळ्याच नजरा नितळ असतील, दृष्टीकोन निकोप असेल असेही नाही. हेच एक कारण तिच्या ललाटी दुय्यमत्वाचे अभिलेख लिहायला पुरेसे ठरते. नेमकी हीच चिंता ही कविता घेऊन येते.  

‘तू काळजाचा तुकडा आहेस, विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा’ म्हणताना तिच्या काळजीपोटी विचलित होणाऱ्या बापाचं मन तिला घराबाहेर पाठवायलाही धजत नाही. पण तिच्या विस्तारणाऱ्या विश्वाला सीमित करून कसे चालेल, म्हणून शिक्षणापासून तिला दूर ठेवावं असंही वाटत नाही. शिक्षणाशिवाय आयुष्याचे अर्थ आकळण्याचा काळ कधीच विस्मृतीच्या निवाऱ्यात विसावला आहे. आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी कुंपणाच्या मर्यादांचे उल्लंघन अनिवार्य आवश्यकता असते. सुरक्षेच्या कवचात जगण्याची प्रयोजने कशी आकळतील? ही जाणीव असल्याने यशोशिखरे संपादित करण्यास प्रेरित करताना तिला हेही सांगायला विसरत नाहीत की, उच्छृंखल, धांदरट राहून उथळ स्वप्नांच्या विश्वात रममाण होऊ नको. 

 

तिचं वयच झोपाळ्यावाचून झुलायचं. असं असलं तरी आभाळाशी गुज करू पाहणाऱ्या झोक्यांना जमिनीवरील वास्तवाचा विसर पडू नये, म्हणून अवगत करून देतो. उमलत्या वयाचा तिचा सगळ्यात निकटचा सवंगडी आरसा. आपणच आपल्याला परतपरत न्याहळण्यास सांगणारा अन् स्वतःच स्वतःशी संवाद घडवणारा हा सखा. प्रतिमेच्या प्रेमात पडायला प्रयोजने असायला लागतातच असे नाही. आपल्या प्रतिमेवर प्रेम अवश्य करावे, पण तिच्या पाशात बंदिस्त होऊ नये सांगताना म्हणतात, आरशापुढे उभं राहून वेळ वाया घालवण्यापेक्षा मनालाच आरसा करून त्यात आपल्या आकांक्षांचे प्रतिबिंब पाहा. मोहाचे क्षण हलक्या पावलांनी चालत येतात. मोहतुंबी क्षणांना टाळता येते, त्यांना यशाची परिमाणे नाही शिकवावी लागत. वेळेची समीकरणे विसरतात, त्यांना यशाची परिमाणे कशी अवगत होतील?  

तारुण्यसुलभ भावनेतून आवडणारे एखादे नाव नकळत आयुष्याचा भाग बनते; पण त्यात आस्थेचा भाग किती अन् आसक्तीचा किती? हा विचार होतोच असे नाही. ओढ कोणतीही असो, तिला काही अंगभूत अर्थ असतात. ते आकळले की, जगण्याची प्रयोजने कळतात. आसक्तीत विकारांचा अधिवास किती अन् विकल्पांचा किती? यातले अंतर समजून घेता यायला हवं. भल्याबुऱ्या गोष्टीत फरक करता यायला हवा. वाढत्या वयाचा हात धरून येणारे मोह अनेक स्पर्श आपलेसे वाटायला लावणारे असतात. त्यांचीही भाषा असते. ती अवगत करावी. तिचे अर्थ समजून घेता यायला हवेत. स्पर्श वात्सल्याचा की, वासनेचा हे समजून घेण्यात गल्लत होऊ नये. आपलेपणाची खात्री झाल्याशिवाय परक्यांवर विश्वास करू नकोस, हे सांगतातच. पण याचा अर्थ गुरुजनांचा, जेष्ठांचा अनादर करावा असा नाही होत. हेही तिच्या लक्षात आणून द्यायला विसरत नाहीत.

देहाचे सोहळे साजरे करण्यात तात्कालिक आनंद असेलही; पण त्यासाठी संस्कारांना तिलांजली देवून देहावर विसावलेल्या वसनांचा विस्तार कमी करत नेणे, असा होत नाही. अशा वस्त्रात विहार करण्यात वावगे काहीच नसेलही; पण विकृत नजरा वस्त्रांचा विच्छेद करून वेदना देणारच नाहीत, हे कसे सांगावे? मुलीच्या चालण्याबोलण्याकडे समाजाचा सतत डोळा असतो. लाज वाटेल असं काही करण्यासाठी विचार करावा लागत नाही. त्यासाठी एक लहानशी विसंगत कृतीही पर्याप्त असते, पण उजळ चेहऱ्याने वावरताना चेहऱ्याचं निर्व्याजपण जाणीवपूर्वक जपावं लागतं. चेहरा झाकून वावरायला लागेल असे काही घडूच नये, कारण चुकांना येथे कधी माफी नसतेच अन् गेलेली अब्रूही नव्याने उगवून येत नाही. हे तिला सांगताना अजूनही आपल्या परिवेशात पावित्र्याच्या परिभाषा देहाशी निगडीत असल्याचे त्यांना विस्मरण होत नाही.

लेकीला हे सगळं समजावून सांगताना इतिहासाच्या पानात स्मृतिरुपाने विसावलेले आदर्शांचे स्मरण करून द्यायला बाप विसरत नाही. जिजाऊ, सावित्री, अहल्या तुझा आदर्श आहेत. कोणीतरी बनणे सहज असते; पण उन्नत जगण्यासाठी आदर्शांच्या वाटेवर चालताना सहनशीलतेचा कस लावणाऱ्या क्षणांना वारंवार सामोरे जावे लागते. ती परीक्षा असते, आपणच आपल्याला उत्तीर्ण करण्याची. खरंतर लेकीवर बापाचा विश्वास नाही, असे नाही. विश्वासाची वासलात लागू नये, असं वाटण्यात काही वावगे नाही. अडनीड वयात मनात वसतीला आलेल्या विकल्पांना समजून घेता आलं की, आयुष्याची अवघड गणिते सुघड होतात. बाप यशाची सूत्रे लेकीच्या हाती देऊ पाहत असला, तरी त्यांचे उपयोजन तिलाच करायचे आहे. वेग घेऊन वाहणारा वर्तमान स्पर्धेच्या गुंत्यात गुंफला आहे अन् यश गुणांच्या आलेखात. ही वर्तमान युगातील विसंगती आहे. हिमतीनं तू संघर्षही करशील मात्र, यशावरती स्वार होण्यास संयमाचा लगाम लागतो, थोड्याशा यशाने हुरळून न जाता मनाला नियंत्रणाचे बांध घालता यायला हवेत, हेही आवर्जून लक्षात आणून देतो.   

प्रणयाच्या प्रवेशद्वारावर पहिले पाऊल टाकणाऱ्या वयाच्या पोरीला बापाचा हा उपदेश कदाचित सांस्कृतिक संचित म्हणून ठीक असेलही, पण येथेही तिची स्त्री म्हणून अधिक चिंता त्याला वाटते. मूल्यांच्या वाटेने वर्तताना, विचार करतांना हे सगळं संयुक्तिक वगैरे वाटत असले, तरी स्त्री म्हणून तिच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आहे, तिच्या अवकाशाचा अधिक्षेप होतो आहे, असं कुणाला वाटणार नाही असेही नाही. पण हेही वास्तव दुर्लक्षित करता येत नाही की, जगाच्या स्वार्थपरायण व्यवहारांपासून अनेक योजने दूर असणाऱ्या अनभिज्ञ, अननुभवी मनाला हे कळावं कसं? यौवनाच्या पावलांनी चालणाऱ्या लेकीला निसरड्या वाटांची जाणीव करून देताना येथे ‘चुकांना नसतेच कधी माफी आणि गेलेली अब्रूही परत येत नाही.’ म्हणण्यात उपदेश असला, तरी त्यापेक्षा अधिक काळजी आहे. याच विवंचनेतून हे समजावणे येते. आपल्या व्यवस्थेतील विचारांच्या चौकटींची लांबी, रुंदी आणि खोली अजून वाढायची असल्याची जाणीव असणारा बाप मनातलं बोलून दाखवतो. असं असलं तरी नात्यातील तरल अनुबंध अधिक भावनिकतेने मांडण्यात कवीची लेखणी यशस्वी झाली आहे.

सिमोन बव्हुआर ही फ्रेंच लेखिका म्हणते, ‘स्त्री जन्मत नाही, तिला घडवले जाते.’ आजही या विधानाचा अर्थ फार बदलला आहे असे नाही. आयुष्याच्या प्रवासात माणसाने जे काही मिळवले असेल ते असो; पण अद्याप त्याला नितळ नजर कमावता आली नाही. नारी म्हणून तिला निखळ स्वातंत्र्य देता आले नाहीये. याचा अर्थ समाजात सगळेच संकुचित विचारांनी वर्ततात, असं अजिबात म्हणायचं नाही. संख्येने थोडेच असले तरी ते असतात, हे कसं नाकारणार आहोत? व्यवस्थेच्या चाकोऱ्या धरून वाहणारे संख्येने अधिक असतात. विपरीत मानसिकतेने वागणारे बोटावर मोजण्याइतके असूनही ही दुरिते आसपास का नांदताना दिसतात? सज्जनाची शक्ती दुर्जनांचे जगणे का नियंत्रित करू शकत नसेल? की आखून दिलेल्या सीमांकित वर्तुळांचे उल्लंघन करून परिस्थितीला भिडायचे सामर्थ्य त्यांच्यात नसते? माहीत नाही. पण स्व सुरक्षित राखण्याचा प्रयास सामान्य वकुबाचा माणूस करीत राहतो. या काळजीपोटी उदित झालेले विचार घेऊन, ही कविता लेकीभोवती सुरक्षेचे कवच उभं करीत राहते.

स्त्री काही कुणाची दासी नाही की, कुणाची बटिक. तिला तिच्या जगण्याचा पैस असावा, नसेल तर सन्मानाने तिला द्यावा. या विचाराचे समर्थन करणारी माणसे कदाचित बापाची चिंता व्यर्थ म्हणून आपलं मत मांडतील. पण नवथर यौवनात नुकत्याच पदार्पण करणाऱ्या पोरीच्या बापाला वाटणारी विवंचना वैयक्तिक कशी असेल? निखारा वाऱ्याच्या झुळकीपासून सुरक्षित सांभाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सव्यापसव्याची अनुभूती तशी सार्वत्रिक. अस्मिता, स्वातंत्र्य, स्वमत, संकोच याबाबत कोणाला काय वाटावे, हा वैयक्तिक प्रश्न. पण एक मात्र खरंय की, विश्वास नावाच्या गोष्टीवर समाजाचा विश्वास स्थापित होत नाही, तोपर्यंत विवंचनेला विमोचनाचे विकल्प शोधावेच लागतील. नाही का?

चंद्रकांत चव्हाण

••

कविता समजून घेताना... भाग: वीस

By // No comments:


नकळत

मानेभोवती दोराची गाठ
हळूहळू घट्ट करत नेताना,
त्याच्या डोळ्यात काय बरं थरथरलं असेल?

माणसांनी गच्च भरलेलं अंगण,
हळहळणारे दीर्घ श्वास
चिरफाड केलेला स्वतःचाच
श्वेत निश्चल देह
गावाच्या वेशीवरूनच
धाय मोकलत येणारी पोटूशी लेक की,
पायाशी शिळा होऊन पडलेली
ऊन-पावसाची सोबतीण?

दिसली असतील का त्याला
कवाडाआड भेदरलेली
त्याचीच दोन पाखरं
उजवायला आलेली दुसरी कुँवार पोर
सैरभैर झालेली खुंट्यावरली जोडी
मातीत चाक रूतून,
झिजत गेलेली जुनाट बैलगाडी

तरीही का थांबले नसतील थरथरणारे हात?

डोळ्यांपुढे
फिरले नसेल का ऋतुचक्र
पूर्वजांच्या वारशाचे
वावराच्याच मातीत मिसळल्या
बापाच्या हाडांचे
हिरव्या पिवळ्या ओंब्यांचे
मोहर जळल्या आंब्यांचे
करपलेल्या रानाचे
हरपलेल्या भानाचे

तेव्हाही आठवली असेल का,
फेडरेशन समोर चार दिवस
ताटकळलेली कापसाची बंडी?
बाजार समितीत भिजलेली तूरीची रास
हातात आलेली आलेली उत्पन्नाची राख

जिच्या कुशीत उभं आयुष्यचं नांगरलं
त्या मातीनं दाखवल्या असेल का वाकुल्या?
की देऊन पाहिलं असेल शेवटलं फोल आश्वासन

जो चोच देतो
तोच दाणा देईल
या भंगार समजुतीवर
श्रध्दा ठेवून
माघारी होणाऱ्या
निष्प्राण
खोपटाच्या परवडीकडे
केला म्हणावं कानाडोळा?

की,
निस्तेज दिवाळी,
बेरंग शिमगा,
भणंग दसरा
अन् उमेदीची पानगळ
करीत येणारी
बेचव संक्रांत
यांचीच दिसत होती पुनरावृत्ती?

आतून पाझरली असेल का
विवेकाची बासरी
की हललं असेल
आठवणींचं रानं?

की ठेवला असेल
कर्जाएवढाच मोठ्ठा धोंडा
छातीत धडधडणाऱ्या हृदयावर
परतीचे दोर हातीच लागू नये म्हणून

शेवटी ह्या लटकलेल्या
देहाचं संपणं
सगळ्यांनी बघितलं
पाझरणाऱ्या नेत्रांनी

खरंतर
त्याने याआधीच हजारदा
घेतला होता फास
आतल्या आत
जगाच्याही नकळत

पुनीत मातकर


विश्वाच्या अफाट पसाऱ्यात माणसांचे अस्तित्व नगण्य. त्याच्या असण्याला अनेक आयाम असले तरी प्रत्येकवेळी ते आकळतातच असे नाही. दैव, नियती, नशीब या शब्दांना आयुष्यात काही अर्थ असतो का? माहीत नाही. पण असला, नसला म्हणून त्यानी काही आमूलाग्र परिवर्तन घडून जगणं सुगम होतं असंही नाही. दैव जगण्याच्या दिशा निर्धारित करते, असे मानणाऱ्यांना अरत्र परत्र नियती खेळ खेळताना दिसते. नाकारणाऱ्यांना ते केवळ विकल मनाचे खेळ वाटतात. या सगळ्या शब्दांचा कोशातला अर्थ काही असू द्या; पण आयुष्याच्या कोशात त्यांना काही अर्थ असतात आणि प्रत्येकासाठी ते वेगळे असतात, असं म्हणणाऱ्यांची इहतली वानवा नाही. अर्थात, असं मानणाऱ्यांना तेवढं स्वातंत्र्य असलं, म्हणून इतरांनीही कोणतीही प्रश्नचिन्हे अंकित न करता त्याचा स्वीकार करावा असेही नाही. मनाचे खेळ मनात उदित होतात अन् मनातच मावळतात. प्रारब्धवाद प्रयत्नांपासून विचलित करीत असतो एवढं मात्र नक्की. मनगटावर विश्वास असणारी माणसे परिस्थितीने केलेल्या आघातावर पर्याय शोधत राहतात. जगण्यात दैवाधीनतेचा अधिवास असणे, प्रारब्धाला प्रमाण मानणे त्यांच्या दृष्टीने पराभव असतो.

‘पराधीन आहे पुत्र मानवाचा’ म्हणताना नियतीशरण अगतिकता अधोरेखित होत असल्याचे काहींना वाटते, काहीना नाही. परिस्थिती सगळीकडून कोंडी करते, तेव्हा पर्याप्त पर्याय हाती नसलेली माणसे करूही काय शकतात? सारे प्रयास विफल होऊ लागतात, तेव्हा आयुष्याची सूत्रे हाती घेतलेल्या अनामिक प्रयोजनांना श्रेय दिले जाते. आयुष्यात येणारे ऋतू जगण्याच्या वाटेवर हरवतात, तेव्हा परिस्थितीने पेरलेल्या अन् नियतीने करपलेल्या आकांक्षांच्या कोंबांना मातीतून उखडताना पाहण्याशिवाय आणखी काय करता येणे संभव असते? दैवाने मांडलेल्या जुगारात फेकलेले प्रत्येक फासे नकार घेऊन येत असतील, तर उरतेच काय हाती? प्रयत्नवादाच्या परिसीमा गाठल्या जातात, टोकाचा संघर्ष करूनही परास्त होणे भागधेय होते, तेव्हा नियतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा अटळ प्राक्तन ठरते. नियतीने नेमलेल्या वाटा सगळ्यांनाच नेमक्या गवसतात असे नाही. पण हे सगळं मानायला मन तयार नसतं.

माणूस मुळात श्रद्धाशील जीव. त्याच्या आयुष्याची प्रयोजने कशाशी तरी निगडीत असतात. काही प्रयत्नांना परमेश्वर मानतात. काही परमेश्वरावर सगळं सोपवून निष्क्रिय कर्मवादाचे अध्याय वाचत परिस्थिती परिवर्तनाची प्रतीक्षा करीत राहतात. काही भिडतात आयुष्याला. कारणे निसर्गनिर्मित असतील, तर त्यावर कोणाचे आधिपत्य नसते. माणसांच्या निमित्ताने ते आयुष्याचे किनारे धरून वाहत येऊन जगण्यात विसावत असतील, तर प्रयत्नांना काही एक अर्थ उरतो. पण कधी कधी प्रसंगच असे काही उद्भवतात की, कोण्यातरी अनामिक शक्तीच्या हाताचे माणूस कळसूत्री बाहुले होतो. खेळत राहतो रोजच जगण्याशी. कुणीतरी खेळवत राहते आयुष्याला. मनात वसतीला असलेली एकेक स्वप्ने सुटू लागतात. आयुष्याची सगळीच सूत्रे अन् उत्तरे चुकू लागतात. चुकलेले पर्याय अनेक गुंते आणतात.

शेतीने जग वसवलं. माणसाच्या अस्तित्वाची मुळं मातीत रुजली. या जगाभोवती माणसाचे मूठभर जग साकारले. या जगाने त्याला जागा दिली. जगण्याची प्रयोजने त्याने शोधली. मातीतून केवळ पिकांचे कोंबच नाही, तर तोही उगवून आला. व्यवस्थेचे चाक शेतीमातीच्या वाटेने प्रगतीच्या दिशेने पळू लागले. मातीत मिसळून जाण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. लाखांचा पोशिंदा म्हणून व्यवस्थेने त्याचं मोल अधोरेखित केलं. कृषीसंस्कृतीवर मोहर अंकित झाली. जगाच्या भुकेचे प्रश्न सोडवणारा, म्हणून मातीत राबणाऱ्यांच्याप्रती कृतज्ञभाव समाजात सतत राहिला. काळ बदलला तशी माणसे बदलली. जगण्याची सगळीच समीकरणे नव्या दिशांचा शोध घेऊ लागली. कोणी उद्योगाच्या वाटेने निघाला. कुणी नोकरीच्या दिशेने पळाला. कोणी कुणाच्या चाकरीत अडकला. पोटासाठी दाही दिशा धावणारी माणसे आयुष्याची प्रयोजने नव्याने शोधू लागली. टिकून राहण्याची साधने होती, त्यांनी साध्याच्या दिशेने कूच केले. पण ज्याच्याकडे जमिनीच्या तुकड्यापलीकडे काहीच नव्हते, ते मातीच्या मोहात अडले. तेथेच आपल्या प्राक्तनाचा शोध घेऊ लागले. मातीचा लळा असणारी ही माणसे मातीमोल होतील, असे कधी वाटले नाही. पण काळानेच चाके अशी फिरवली की, ही माणसे परिस्थितीच्या आवर्तात आहे तेथेच भिरभिरत राहिली.

अख्खं आयुष्य मातीत मिसळलेल्या माणसांच्या जगण्याच्या दिशा हरवल्या. आयुष्याची दशा झाली. कुणी आहे त्या प्रसंगाना सामोरे जात राहिला. पण नियतीनेच त्यांना अशा वळणावर आणून उभे केले, जेथून परतीचे मार्ग संपले. अभिमन्यूचं प्राक्तन घेऊन ही माणसे व्यूहात लढत राहिली. परिस्थिती परिवर्तनाचे पर्यायही परागंदा झालेले. एखाद्या दुःखाला प्रारब्ध किती कारण असतं? माहीत नाही. पण धोरणे कारण होत असतील, काहीकेल्या आयुष्याचे हरवलेले ऋतू बदलत नसतील, केवळ वणवण वाट्यास येत असेल, तर कोणत्या क्षितिजाकडे आशेने पाहावे? सगळीकडून होणारी कोंडी जगण्यावरील श्रद्धा विचलित करते. सगळे विकल्प संपतात, तेव्हा कोणत्या दिशांना आयुष्याचे दान मागावे? मूठभर देह विसर्जित करण्याचा निर्णय घेताना नेमकं काय वाटत असेल? त्याचा जीव कशाकशातच गुंतत नसेल का? की गुंतून राहण्याइतकेही पाश समोर राहत नसतील?

ही कविता वाहती वेदना घेऊन अंतर्यामी अस्वस्थपण कोरत जाते. हे उसवणं केवळ एका जिवाचं नाही, व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या सगळ्यांचंच आहे. मरणाला मुक्तीचा मार्ग मानणाऱ्या विचारांपर्यंत पोहोचणाऱ्या अभागी आयुष्याचं आहे. काळजाला चिरत जाणारी वेदना आहे. जळत्या निखाऱ्यावरून चालणे आहे.

शेतकरी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक, पण व्यवस्थाच एखाद्याला नाकारायला लागली तर? वाटा अवरुद्ध होतात, तेव्हा काय करावे? मरणाचं काही कोणाला अप्रूप नसतं. इहतली अधिवास करणाऱ्या जिवांच्या प्रक्तनातला मरण अटळ भाग असला, तरी त्याला अवकाळी येण्याचा शाप नसावा. टाळता न येणारं कारण आयुष्य विसर्जित करायला एक निमित्त असू शकते. पण ही काही जगण्याची प्रघातनीती नाही. बिकट वाट असली, म्हणून काही ती वहिवाट होत नसते. मरणाच्या डोळ्यात डोळे घालून दोन हात करण्यात जिवाची इतिकर्तव्यता असते. पण आपलेपणाने ओथंबलेलं आभाळ दूरदूरही दृष्टीस दिसत नसेल, सगळ्याच दिशा अंधारून आल्या असतील, तर चालावं किती अन् कुठपर्यंत? आस्थेचा लहानसाही कवडसा कुठे गवसत नसतो, तेव्हा प्रश्नचिन्हे गहिरी होत जातात.

शेतकऱ्याच्या मरणवार्ता सरावाच्या झाल्या असल्याच्या अदमासाने वर्तमानपत्राची पाने निर्विकारपणे उलटली जातात. मरणाचेही सुतक वाटू नये, अशी परिस्थिती अवतीभोवती नांदते आहे. मने कोरडी होत आहेत. संवेदनाचे पाझर आटत आहेत. आसपास उध्वस्त होताना दिसत असूनही कोणाला आकळत नाही, असे तरी कसे म्हणावे? व्यवस्थेत कोरडेपण सामावले असेल, तर माणूस समाजपरायण आहे, हे कोणत्या विश्वासाने सांगावे. ‘मानेभोवती दोराची गाठ हळूहळू घट्ट करत नेताना त्याच्या डोळ्यात काय बरं थरथरलं असेल?’ हा प्रश्न वेदनेचे एकेक पदर उकलत राहतो. आपणच आपल्याला उसवत नेताना ही कविता नि:शब्द करते. जगण्याला विस्तार आहे, मरणाला संकोच. मरणाने देह सुटतो, पण देहाशी निगडीत नाती अन् नात्यांना बिलगून असणाऱ्या भावनांचे काय? मरण एका न उलगडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर असेलही; पण त्यातून आणखी शंभर प्रश्नांच्या वाटा प्रशस्त होतात, त्याचं काय? मरणाऱ्याला कसले आलेयेत पाश अन् कसली आलीयेत बंधने? कोणतेच मोह त्याला अवरुद्ध करू शकत नसतील का? मनात मोहाचा एकही तुटका धागा दिसत नसेल का? की या सगळ्यांच्या पलीकडे तो पोहचलेला असतो? की त्याच्यापुरतं सगळं जगच निरुपयोगी होत असेल? जगण्याइतके इहतली सुंदर काहीही नसल्याचे सांगून सगळेच द्रष्टे, विचारवंत, महात्म्ये थकले, तरी त्यांनी पेरलेल्या विचारांच्या पलीकडे पोहचण्याची परिस्थिती एखाद्यावर का येत असावी?

जगण्याचा उत्सव व्हायला आयुष्य आनंदतीर्थ व्हायला लागते. कृतार्थ शब्दाचा आयुष्यात अधिवास असायला लागतो. सगळीकडे अभावाचे मळभ दाटून आलं असेल, तर ओथंबून वाहणाऱ्या मेघांची आस कशी लागावी? मरणदार काही प्रसन्नतेच्या परिमलाने भरून आलेलं नसतं. माणसांनी गच्च भरलेलं अंगण काही सुखांच्या वार्ता करण्यासाठी एकत्र आलेलं नसत. बापाच्या अवकाळी जाण्याने पोरांवर होणारे आघात शब्दांत कसे अंकित करता येतील? गावाच्या वेशीवरूनच धाय मोकलत येणारी पोटूशी लेक कोणत्या जन्माचे दुःख अनुभवत असेल? पायाशी शिळा होऊन पडलेली ऊन-पावसाची सोबतीण कोणत्या कृत्यांची शिक्षा भोगत असेल?  कवाडाआड भेदरलेली पाखरं, उजवायला आलेली पोर, कारुण्याची ही चित्रे मरणाची पट्टी डोळ्यांवर बांधताना त्याला दिसलीच नसतील का? बापाचं मरण डोळ्यांनी पाहणाऱ्या लेकरांना काय वाटत असेल? मालकाच्या जाण्याने सैरभैर झालेली खुंट्यावरली बैलजोडी- खरंतर ही मुकी जित्राबं, त्यांनाही हे जीव लावणं कळलं. सगळं काही समोर असून यापैकी काही काहीच दिसले नसेल त्याला? कदाचित दिसलेही असतील, पण त्यांच्यात जीव गुंतवावा, असं काही गवसलं नसेल. सगळं असून सारं संपलं असेल त्याच्या विश्वात.  

गळ्याभोवती दोर गुंडाळताना का थांबले नसतील थरथरणारे हात? उन्मळून टाकणाऱ्या संकटांना सामोरे जात केलेला संघर्ष डोळ्यांपुढे क्षणभरही तरळला नसेल? राबराब राबून, हाडाची काडे करून वावराच्या मातीतच मिसळलेल्या बापाचे स्मरण झाले नसेल का? घराला सावरून धरणाऱ्या बापाची जिगीषा समजलीच नसेल का? कदाचित कळलेही असेल. करपलेल्या रानाचे उदासवाणे दिसणे जिव्हारी लागले असेल. आठवली असेल फेडरेशनसमोर चार दिवस ताटकळलेली कापसाची बैलगाडी. बाजार समितीत भिजलेली तूरीची रास. हातात आलेली उत्पन्नाची राख. सगळंच उखडून टाकणारं. जिच्या कुशीत उभं आयुष्यच नांगरलं, त्या मातीनंच वाकुल्या दाखवल्या तर कोणाकडे पदर पसरायचा? सगळेच विकल्प संपलेले. प्रश्न सहजपणे करता येतात. सुखी आयुष्याचे सूत्रे शिकवता येतात, पण जगण्याची उत्तरे का देता येत नसतील विनासायास?  

‘जो चोच देतो तोच दाणा देईल’ या समजुतीवर श्रध्दा ठेवून आपल्या माघारी निष्प्राण होणाऱ्या खोपटाच्या परवडीची जाणीव अंतर्यामी अंशमात्रही स्पंदित झाली नसेल का? की कानाडोळा करून अगतिकतेने काळजावर धोंडा ठेवला असेल? चोच दिली, चाराही दिला; पण दाणे वेचण्याची ताकदच उरू दिली नसेल, तर कसं लढावं माणसाने? सणांचे रंग आयुष्याला बेरंग करीत राहिले येताना अन् जातांना ओरखडे सोडून गेले. येणारा दिवस फक्त कर्जाचे आकडे वाढवत जीवनाशी खेळत राहिला. विवेकाने वागला तर माणूस प्रेषित होतो, पण व्यवस्थेने कोणताही विवेक आयुष्यात राहूच दिला नसेल, तर तो कुठून उसनवार आणावा? सारासार विचार करण्याची प्रेरणा परागंदा झाली असेल अन् कुठूनही आपलेपण घेऊन येणारे कवडसे प्रवेशायला जागच राहू दिली नसेल, तर दोष नेमका कुणाचा? नियतीचा की निसर्गाचा की निर्माण झालेल्या परिस्थितीचा?

मरणाऱ्याला पलायनवादी ठरवून मोकळं होता येतं, पण हताश होण्यामागची कारणे शोधायला लागतात. उत्तरे तयार करून कोसळलेले बुरुज बांधावे लागतात. जगणं उभं करायला लागतं. लढण्यासाठी बळ देणारे हात दिमतीला असायला लागतात. व्यवस्था असा हात का होऊ शकत नसेल? आयुष्याचीच माती झाल्यावर मनाने दगड होण्याचा निर्णय घेतला असेल. ठेवला असेल धडधडणाऱ्या काळजावर उचलून तो. परतीचे दोर हाती लागूच नये म्हणून मनातून आधीच कापून घेतले असतील तर? त्याच्या देहाचं संपणं पाझरणाऱ्या नेत्रांनी सगळ्यांनी बघितलं. पण याआधीच हजारदा फास घेतला होता आतल्या आत त्याने, जगाच्याही नकळत. त्याचं रोजचं मरणं कोणत्या जन्माची झाडाझडती असेल? त्याचं आपणच आपल्यापासून असं तुटत जाणं अन् आसक्तीच्या वर्तुळातून सुटत जाणं दिसलंच नाही. उपेक्षेच्या वाटेने घडणारा त्याचा प्रवास कुणालाही दिसला नसेल का? की काळाने कोणाला बघायला उसंतच मिळू दिली नसेल? निसर्गाने दिलेलं आंधळेपण अटळ असेल; पण डोळे असून दृष्टी हरवणे अगतिकता असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: एकोणीस

By // No comments:

कवच

पगार कधी होणार?
तिचा जीवघेणा प्रश्न
आणि
हँग झालेल्या कम्प्युटरसारखा
असतो तिच्यासमोर उभा
मागणी तसा पुरवठा हे तत्त्व
लागू होत नाही तिच्या आयुष्यात
तिने केलेल्या कोणत्याही
मागणीचा पुरवठा
पुरा करू शकत नाही
माझ्या जगण्यातील
पंचेचाळीस मिनिटाचा काटा
तिने सांगितलेल्या वेळेत

म्हणूनच
तिने दिलेली वस्तूंची यादी
छेदत जाते माझे नेटसेटचे कवच
आणि
उघडा पडत जातो मी
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी
तिच्या पगाराच्या प्रश्नाने

जयप्रभू शामराव कांबळे

विश्वातील सगळ्यात मोठे वर्तुळ कोणते? कदाचित हा प्रश्न अगोचरपणा वाटेल कुणाला. पण असं काही वाटत असलं, तरी वास्तवापासून विचलित नाही होता येत. भाकरीच्या वर्तुळाहून मोठे वर्तुळ अद्याप तरी तयार झाले नाही. जगण्याचे संघर्ष भाकरीच्या वर्तुळात एकवटलेले असतात. व्यवस्थेचे सगळेच व्यवहार तिच्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे भौगोलिक सत्य असले; तरी ती भाकरीभोवती भ्रमण करते आहे, हे ऐहिक सत्य आहे. पृथ्वीच्या भ्रमणाला निसर्गाने निर्धारित केलेले नियम असतात. दिशा असते. मर्यादा असतात. पण भाकरीच्या शोधासाठी घडणाऱ्या भटकंतीला ना निर्धारित दिशा असते, ना मर्यादांचे परीघ. तिच्या संपादनाची सूत्रे कोणत्याच साच्यात सामावून सोडवता नाही येत. तो शोध असतो, आपणच घेतलेला आपला. भाकरी स्वप्न असतं, उपाशी पोटातून उगवणारं. माणसे केवळ भाकरीवर जगत नसतात, हे म्हणणं कितीही तर्कशुद्ध, प्रेरणादायी वाटत असलं, तरी स्वप्नांचा प्रारंभ भाकरीच्या वर्तुळातून होतो, याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? सगळ्याच स्वप्नांना पूर्तीचं सौख्य असतं असं नाही. मनात कोरून घेतलेल्या समाधानाच्या परिभाषा प्रत्येकाच्या वेगळ्या आणि प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. जीवनपथावरील प्रवासाचे एक कारण असतात त्या. पण वंचनेच्या धुक्यात हरवणे त्यांचे भागधेय असेल, तर अंधारून आलेल्या क्षितिजांकडे पाहण्याशिवाय हाती उरतेच काय? स्वप्नांचे तुटणे ठसठसणारी वेदना असते. भळभळणारी जखम असते. सगळ्या जखमा भरून येतातच असे नाही. खपल्या धरल्या तरी कधीतरी अनपेक्षित धक्का लागून त्या वाहत्या होतात. त्यांचं भळभळत राहणं टाळता न येणारं भागधेय असतं.

अपेक्षाभंगाचं दुःख शब्दांच्या चौकटीत मंडित करता येतंच, असे नाही. तो एक अटळ रस्ता असतो परिस्थितीने ललाटी गोंदलेला. आयुष्याचे खेळ नियतीच्या हातातील सूत्रांच्या स्थानांतराने घडत असतीलही. पण जगण्याची प्रयोजने शोधण्यासाठी चालणे टाळता कुठे येते? आस्था आयुष्याचे अर्थ नव्याने शोधायला लावते. आशेचे कवडसे अंतर्यामी एक वात तेवती ठेवण्यासाठी धडपडत राहतात. अंतरीचा ओलावा आटत जातो. जगण्याला तडे पडत जातात, तेव्हा माझ्या मना बन दगड म्हणण्याशिवाय हाती उरतेच काय? परिस्थितीने पायाखाली अंथरलेल्या वाटेने निमूट चालण्याशिवाय विकल्प असतोच कुठे. सगळं करूनही हाती शून्य उरणाऱ्या मनाची वेदना घेऊन येणारी ही कविता एक अस्वस्थपण पेरत जाते, मनाच्या गाभाऱ्यात. कोरत जाते वेदनेच्या आकृत्या काळाच्या प्रस्तरावर. दुभंगल्या मनाचा सल घेऊन चालत राहते. आयुष्याचे किनारे धरून वाहताना विखंडीत होणाऱ्या विश्वासाचा, सुटत जाणाऱ्या संयमाचा शोध घेते. विकल आयुष्याचे अर्थ शोधू पाहते. शिक्षणाने गिरवलेल्या स्वप्नांचा शोध घेता घेता आयुष्याच्या पाटीवरून जगणंच पुसलेल्या आकृत्यांचा माग काढताना होणारी मनाची घालमेल घेऊन येते.

शिकून आयुष्य मार्गी लागेल. जगण्याचं सार्थक शोधता येईल, या लहानशा आशेने शाळा नावाचा अध्याय जीवनग्रंथात लेखांकित होतो. पण त्याची पाने सगळ्यांच्याच आयुष्यात महत्त्वाच्या नोंदींनी अधोरेखित होतातच असे नाही. अर्थ हरवलेल्या अध्यायांचा शोध कवी घेऊ पाहतो. परिस्थितीच्या कातळावर घाव घालून आत्मशोध घेण्यासाठी शिक्षणाच्या वाटेने धावाधाव केली. इयत्तांचे सोपान पार केले. पदव्यांचे टिळे ललाटी लावले. पात्रतेचे मळवट भरले, पण अभागी आयुष्याला परतत्वाचा परीसस्पर्श घडलाच नाही. पुस्तकाकडे वळती झालेली पावले स्वप्ने दिमतीला घेऊन धावत राहिली सुखांच्या शोधात. सुख भाकरीकडे आणि भाकरीचा शोध नोकरीच्या बिंदूवर येऊन विसावतो. आस्थेचा एक हलकासा कवडसा अंधाऱ्या क्षितिजावर लुकलुकताना दिसला. त्याच्या थरथरत्या रेषांचे हात पकडून स्वप्ने सोबत आली. शिक्षकीपेशाच्या पावित्र्याने भारावलेलं मन आदर्शांच्या, मूल्यांच्या परिमाणांना अंकित करू लागते. पण मनात वसतीला आलेल्या सगळ्याच गोष्टी पूर्ण व्हाव्यात, अशी काळाची गणिते नसतात.

गाव सुटतं. शहर धावाधाव करायला लावतं. भणंग आयुष्य मात्र तोंड लपवत खेळत राहतं जगण्याशी, रोज नवे खेळ. शिक्षणाच्या चौकटी त्याच, ज्ञानही तेच. पण त्यातही विषमतेचे मनोरे बांधलेले. पूर्णवेळ, अर्धवेळ, तासिका तत्व, अनुदानित, विना अनुदानित, टप्पा अनुदानित. मजले वाढत जाणारे. समतेची सूत्रे वर्गात शिकावयाची अन् विषमतेच्या सूत्रात आयुष्य शोधायचं. हा विपर्यास विकल करणारा असतो. विषमतेच्या भिंती आपल्या व्यवस्थेला नव्या नाहीत. पण काळाचे किनारे धरून वाहत आलेल्या विषमतेच्या नव्या परिभाषा खपल्या काढत राहतात. जगण्याचे एकेक पदर उसवत जातात. व्यवस्थेने दिलेल्या वेदना सरावाच्या झाल्याने कदाचित प्रासंगिक विकल्प म्हणून समजून घेतल्या जातात. काळाच्या वाटेने वाहताना त्यांची ठसठस संपेल, हा आशावादही असतो. त्या संपतील की नाही, माहीत नाही. पण काळाचे किनारे धरून वाहत आलेल्या नव्या विषमतेचे काय?

या वेदना परिस्थितीवश आयुष्याच्या वाटा धरून चालत आलेल्या असतील किंवा कुठलेच विकल्प नसल्याने लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन विकत घेतलेल्या असतील अथवा अभिवचनाच्या वाटेने आयुष्यात आल्या असतील. कारणे काही असोत, त्यापासून पलायन नाही करता येत. व्यवस्थेने आखलेल्या चक्रव्यूहात अभिमन्यू लढत राहतात. समरांगणात एकेक वीर धारातीर्थी पडावा, तशी मनात साकळलेली स्वप्ने आकांक्षांच्या प्रांगणात पतन पावतात. घरच्यांसाठी वाढत्या वयाची गणिते संसार नावाच्या चौकटीत अधिष्ठित करण्याकरता पुरेसे कारण असते. कुठल्यातरी विद्यालयात, महाविद्यालयात शिक्षक, प्राध्यापक असल्याच्या धागा हाती घेऊन सप्तपदीच्या वाटेने पडणारी पावले मनात मोरपंखी स्वप्ने गोंदवत उंबरठ्याचे माप ओलांडून येतात. शुभमंगल घडते. पदरी पडलेले पळ पुढे पळायला लागतात. स्वप्नांचे प्रदेश परिस्थितीच्या धुक्याआड विरघळत जातात अन् तोच प्रवास अमंगलाकडे वळायला लागतो. स्वप्नांच्या सोबतीने घडणारा प्रवास परिस्थितीच्या रखरखत्या उन्हात करपायला लागतो. वाटेवरचे काटे टोकदार बनतात. सौख्याच्या परिमलाने गंधाळलेले ऋतू कूस बदलून वास्तवाचे वारे वाहू लागतात. आकांक्षांच्या झाडावर आलेला मोहर झडू लागतो. सुखी संसाराची अन् पर्याप्त समाधांची सूत्रे धाग्यातून सुटू लागतात.

अर्थात तिचंही काय चुकतं? तिनेही काही स्वप्ने पाहिलेली असतात. त्यांचे मोहरलेपण तिच्या सुखांची परिमित परिभाषा असते. पण दैवाचे फासे उलटे पडतात अन् सुरु होतो खेळ वंचनेचा. तीच तगमग. तोच कोंडमारा. तेच ते जगणं. तेच वर्तुळ आणि त्याभोवतीच्या त्याच प्रदक्षिणा अन् भ्रमणाला असणारा उपेक्षेचा शाप. संयमाचे बांध तुटतात. मनाच्या मातीआड दडलेला लाव्हा जागा होतो. अंगावरील हळदीचे ओले रंग विटू लागतात. सुखांच्या नक्षीत समाधान शोधणारं इंद्रधनुष्य रंग हरवून बसते. आयुष्याचे झाड मुळापासून हादरू लागते. आकांक्षांची एकेक पाने फांद्यावरून सुटू लागतात. गळ्यातले आवाज गळ्यात अडतात. संसाराचे सूर जुळून गाणे होत होता साज हरवतात.

पगार कधी होणार? एक लहानसा प्रश्न; पण त्याच्या आत एक अस्वस्थपण सतत नांदत असतं. तिचा हाच प्रश्न त्याच्यासाठी जीवघेणी वेदना घेऊन येणारा. पण उत्तराचे विकल्प कधीच व्यवस्थेच्या दारी पडलेले, शरणागतासारखे. परिवर्तनाच्या पदरवांचा कानोसा घेत. गोठणबिंदूवर येऊन थांबलेला तो. आतून धग कायम ठेवणारी सगळी ऊर्जा संपलेली. हँग झालेल्या कम्प्युटरला रीस्टार्ट करून घेण्याचा निदान पर्याय तरी असतो. पण आयुष्यच गोठतं, तेव्हा मागणीची गणिते पूर्ण करणारी सूत्रे संपलेली असतात, हे तरी तिला कसं सांगावं? मागणी तसा पुरवठा, हे तत्त्व सगळ्याच ठिकाणी लागू होत नसते. आयुष्याची उत्तरे शोधण्यासाठी भाकरीच्या परिघाभोवती फिरणारी याच्या जगण्यातील पंचेचाळीस मिनिटे कधीच परास्त झालेली असतात. तिच्या वेळेची आणि आयुष्याची उत्तरे शोधण्यासाठी स्वप्नांभोवती फिरणाऱ्या याच्या मिनिटांची गणिते कधी सारखी उत्तरे देणारी नसतात.

तिने दिलेल्या वस्तूंच्या यादीला वास्तवाची धग असते. यादीला एकवेळ पर्याय असू शकतो, पण पोटात खड्डा पाडणाऱ्या भुकेला विकल्प कुठे असतो? परिस्थितीने पुढ्यात आणून अंथरलेल्या आयुष्यातील उसवलेल्या आकांक्षांना नेटसेटचे कवच नाही सुरक्षित करू शकत. पदवीची झूल पांघरून पात्रतेची पूर्तता करणाऱ्या कागदाच्या चतकोर तुकड्यावर कोरलेली अक्षरे अभिवचन नसते; पर्याप्त समाधान घेऊन नांदणाऱ्या आयुष्याचे. अक्षरे अन् अंक यापलीकडे त्यांना काही अर्थ नसतो अशावेळी. पात्रतेच्या अवघड वाटांनी घडणारा प्रवास हाती लागणाऱ्या पदवीच्या कागदाच्या चौकोनी विश्वात आयुष्याचे अर्थ शोधत नव्या जगाची रचना करीत असतो. त्याचा प्रत्येक कोन अन् त्या कोनात सामावलेली अक्षरे समाधान अंगणी नांदते राहण्याचे अभिवचन वाटते. पण तीही एक वंचना ठरते. विना अनुदान अन् पूर्णवेळ श्रमदान नावाचे नवे सूत्र अंगीकारणाऱ्या व्यवस्थेत उघडं पडत जाण्याशिवाय हाती असतेच काय शेष? महिन्याच्या शेवटच्या दिवशी तिच्या पगाराच्या प्रश्नाने आयुष्यातील अभावाची रेघ आणखी थोडी वाढत जाते पुढे. समस्यांचे बिंदू तिच्या वाटेवर अपेक्षाभंगाचे दुःख गोंदवत राहतात.

शिकवता शिकवता शिक्षणावरचा विश्वास विरू लागतो. पानावर पडलेल्या मोत्यासारखे वाटणारे शिक्षण परिस्थितीच्या प्रकाशात ओघळून जाते. वर्षे सरत जातात. मागे उरतात ओरखडे. जिवाच्या आकांताने ओरडावे वाटते, पण कुणीतरी गळाच आवळल्याने आतले आवाज आताच हरवतात. शाळा, शिक्षक, शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेली बेटे. यांनी जगण्याला संपन्नता येत असते; पण त्यात व्यवहार आला की, त्यांचा आत्मा हरवतो. कधीकाळी शाळा जीवनशिक्षणाचे मंदिरे म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या जागी एज्युकेशन देणारी पंचतारांकित संकुले उभी राहिली. या संकुलांमध्ये आपापल्या कुलांना इतमामाने सामावून घेण्याची व्यवस्थाही आली. शिक्षणसम्राट उपाधीनेमंडित नव्या सम्राटांचा वर्ग अस्तित्वात येऊन स्थानापन्न झाला. यांच्या अधिपत्याखाली गुणवत्ता, विद्वत्ता मांडलिक झाली. राजा, राज्य, राज्याभिषेक, राजसिंहासन हे शब्द कधीच कालपटावरून संपले. व्यवस्थेने संस्थानिकांचा नवा वर्ग उदयास आणला. त्यांनी संस्थाने उभी केली. संस्थानांच्या सेवेत रममाण असणाऱ्यांच्या वाटेला मधुर फळे यायला लागली. तत्त्व, तत्त्वनिष्ठा शब्दांचा अर्थ कोशात बंदिस्त झाला. कोणातरी स्वयंघोषित आदरणीय महात्म्याच्या कृपाकटाक्षाकरिता, मर्जीसंपादनाकरिता स्पर्धा सुरु झाली. तत्त्वनिष्ठ माणसं मांडलिकांच्या जगात वेडी ठरली.

व्यवस्थेतील काहीक्षेत्रे संदेहाच्या परिघात पाहिली जात असतीलही. ती एक वेळ प्रदूषित झाली तरी चालतील; मात्र शिक्षणक्षेत्र कलंकरहित असावे, अशी अपेक्षा कोणी व्यक्त करीत असेल, तर त्यात वावगं काय आहे? ज्या संस्कृतीत माता-पित्यानंतर गुरूलाच देवतास्वरूपात पाहिले जाते, ब्रह्म, विष्णू, महेशाच्याठायी गुरु शोधला जातो; त्यादेशात गुरूला लघूरूप येणं परिस्थितीचा विपर्यास नाही का? गुरूच्या सानिध्यात जीवन सफल झाल्याच्या, आयुष्य घडल्याच्या कहाण्या माणसे ऐकत, वाचत, लिहित, शिकत आली, तेथे या गुरूला लघुरूप का येत आहे? जगण्याचे संदर्भ बदलत आहेत. सुखाच्या दिशेने ते प्रवाहित होत आहेत. मी आणि माझं सुख तत्त्वांपेक्षा महत्वाचं ठरू लागलं. कधीकाळी पैशापेक्षा वर्तनाने माणूस ओळखला जायचा. चारित्र्यसंपन्न माणसे समाजासाठी मूल्यसंवर्धनाचे वस्तुपाठ असत. पैसाच मोठा झाल्याने माणूस छोटा झाला. शिकविण्यासाठी मूल्ये एक आणि वागताना दुसरीच, हा वर्तनविपर्यास विसंगत नाही का? मातीशी अस्तित्वाची घट्ट नाळ असणारी मुळं खिळखिळी होत चालली आहेत. आसपास दुभंगतो आहे. जगणं उसवत आहे. स्वार्थ परायण विचारांचा परीघ समृद्ध होताना माणूस अभंग राहणे आवश्यक आहे. पूजा आदर्शांचीच होते. उंची कळसाची मोजली जाते. पायथ्याची नाही. आदर्श जगण्यात सामावणे आनंदाचे अभिधान असले, तरी केवळ आदर्शांच्या परिभाषा करून आयुष्याचे अर्थ सापडत नसतात. त्याकरिता मनात उगवणारं विकल्पांचं तण वेळीच उपटून काढता यायला हवं, नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: अठरा

By // No comments:
नाही रमत जीव या अजस्त्र शहरात

नाही रमत जीव
या अजस्त्र शहरात
इथले रस्ते रस्त्यांना मिळतात
आणि गिळतात देखील...
पसरून आहेत अजस्त्र अजगरासारखे हे रस्ते
स्वतःमधे वाकडे तिकडे गोलगोल
जीवे वाचण्याच्या अट्टाहासाला
हे शहर बर्म्युडा ट्रँगलसारखे
खेचत जाते आतआत
नि नेत असते खोल खोल

सहमत नाही होता आले की,
तोहमत येतेच मग...
त्यापेक्षा वाहत राहावे इथल्या रस्त्यावरून
स्वतःच्या इच्छेला चार गोष्टी समजावत
इच्छा असो वा नसो

विरोध हेच मरण
शरण हेच जीवन
हेच अजस्त्र शहराचे सूत्र

मी मित्राच्या फोरव्हिलरमधून,
लोकलमधून, बसमधून, रिक्षामधून
तर कधी पायीपायी
वाहतो आहे या शहरातून

हे गोलगोल गरगरणे
मला नेईल या शहराच्या मुळाशी
निमुळत्या स्क्रूसारखे

मला खात्री आहे
सहमतीचे स्मित करत
हे शहर
माझे बोट सोडणार आहे
तोपर्यंत
इथे
सहमतीने गरगरायला
पर्याय नाही

कमलाकर आत्माराम देसले
*
माणूस कसा असावा हे सांगता येतं. पण तो कसा असतो, हे अनुभवल्याशिवाय नाही कळत. कोणत्या विचारांनी त्याने वर्तावे याबाबत काही अपेक्षा करता येतात. प्रासंगिक वर्तनावरून त्याच्यासंदर्भात काही अनुमानही बांधता येतात. पण तो आकळतोच असे नाही. विशिष्ट परिभाषा वापरून आयुष्याची प्रयोजने जशी अधोरेखित करता येतात, तश्याच भरल्यापोटी वर्तनाच्या परिभाषा तयार करता येतात. पण हातातोंडाची गाठ सहजी न पडणाऱ्याला विचारा त्याचे आदर्श नेमके कोणते असतात? आदर्शांची परिमाणे शोधायचीच असतील, तर भुकेइतके प्रांजळ उत्तर मिळणे असंभव. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस अख्खं आयुष्य हातावर घेऊन वणवण करीत असतो. कोणी काहीही सांगितले, तरी जगणं भाकरीभोवती बांधलेलं असतं, या वास्तवापासून पलायन करता येत नाही. नाकारताही येत नाही? स्वीकारावे तर पर्याप्त संधी प्राप्त होतीलच असे नाही. आयुष्याचे उन्नत, प्रगत वगैरे प्रयोजने अधोरेखित करून कोणी मांडली, तरी जगण्याचे संदर्भ आणि टिकून राहण्याचे संघर्ष भाकरीजवळ येऊन संपतात, हे कसे नाकारता येईल? आकाशातला चंद्र पाहणाऱ्याला देखणा वगैरे वाटत असला, तरी भाकरीचा चंद्र जगण्याचं वास्तव असतं अन् त्यावर काही प्रेमकविता लिहिता येत नसतात. भाकरी आयुष्याच्या असल्या नसल्या प्रयोजनांचं उत्तर असतं अन् या उत्तराच्या शोधात घडणारी वणवणही.

आयुष्याने जगण्यात अधोरेखित केलेले प्रश्न समजून घायला लागतात. उत्तरांसाठी मार्ग निर्धारित करून विकल्प पडताळून पाहायला लागतात. पोटाला जगणं बांधून कोणी वहिवाटीच्या वाटा निवडून निघतो. कोणी अज्ञात परगण्याकडे नेणाऱ्या मार्गांचे परिशीलन करतो. कोणी मळलेल्या वाटा मोडून चालता होतो. वाटा केवळ वळत्या पावलांना दिशा देण्याचे साधन नसतात, तर जगण्याच्या प्रयोजनांना मोहरलेपण देणाऱ्याही असतात. अज्ञात प्रदेशांना जोडणाऱ्या वाटेवरचा प्रवास माणसांच्या तात्कालिक गरजांचा शोध असतो. अर्थपूर्ण जगण्याची आस मनात अधिवास करून असते. कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपसित हवे असणारे काहीतरी शोधत चालणे घडते. उपजीविकेसाठी देशांतर घडून माणसे ज्ञात-अज्ञात प्रदेशात पोहचतात. आकांक्षेच्या गगनात सुखाचे सदन शोधत राहतात. पण मनी वसतीला असलेल्या क्षितिजांपर्यंत पोहोचणं काही सहजसाध्य नसतं.

आयुष्यात समस्यांची कमतरता कधी नसते? कालानुरूप त्यांची रूपे वेगळी असतात इतकेच. पोटात खड्डा पाडणारी भूक अस्वस्थ वणवण करायला भाग पाडते. जगणं पणाला लावणारा संघर्ष सार्वकालिक सत्य आहे. भाकरीभोवती साकळलेल्या ओंजळभर आकांक्षांचा शोध आयुष्यभर पुरतो. अनेकांची आयुष्ये या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपतात. आजही यात फार सुगमता आली आहे असे नाही. अपेक्षांच्या पावलांनी चालत येणाऱ्या विवंचना संपल्या आहेत असेही नाही. प्रश्न कधी नव्हते? काल होते, आज आहेत आणि उद्या कदाचित तीव्र-कोमल किंवा आणखी काही असतील. मनात सुखांची संकल्पित चित्रे साकारलेली असतात. तेथे पोचण्याच्या मनीषेने सगळेच पळतायेत आपापली गाठोडी घेऊन. भलेही ती स्वेच्छेने डोईवर घेतलेली असतील अथवा परिस्थितीने लादलेली असतील. पळती पावले भटकंती सोबत घेऊन येतात हेही खरेच.

गाव, गावगाडा, आपली माणसे सोडून काही कोणी सहजी स्थलांतर करीत नाही. स्थिर जगण्याचे साधन उपलब्ध असेल, तर मनात संदेह नसतो. भाकरीच्या शोधार्थ वेस ओलांडून जाणं आनंददायी कसं असू शकतं? पायाखालच्या मातीला घट्ट बिलगून असलेली  अस्तित्वाची मुळं सैलावणं वेदनादायीच असतं. मातीचं सत्व आणि स्वत्व घेऊन वाढणारं रोपटं काढून दुसऱ्या जागी रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी होईलच असे नाही. केला तरी ते जोमाने वाढेलच याची शाश्वती नाही देता येत. मातीपासून विलग होण्याची सल घेऊन ही कविता वाहत राहते. आस्थेचा गंध घेऊन मनाच्या आसमंतात विहरत राहते. आशयघन शब्दांचा हात पकडून वाचकासोबत भटकत राहते. आपलं असं काहीतरी मागे टाकून आल्याची रुखरुख घेऊन. समर्पक प्रतिमा कवितेच्या आशयाला उंची प्रदान करतात. सहजपणाचे साज लेवून आलेल्या शब्दांच्या प्रतिध्वनीचे पडसाद मनाच्या प्रतलावरून परावर्तीत होत राहतात. जगण्याचा वाटा कोणाला कुठे आणतील, हे काळालाही अवगत नसते बहुदा. अनेकातील एक वाट उपजीविकेच्या उतारांना धरून शहराच्या दिशेने सरकत राहते अन् थांबते प्रश्नांचे गुंते घेऊन विणलेल्या जाळ्यात. जगण्याची प्रयोजने शोधतांना हरवत जाणाऱ्या आपणच आपल्या असण्याशी आणि त्या असण्याने आलेल्या अर्थांशी जुळवून घेताना होणारी मनाची तगमग कवितेतून ठळक होत राहते. जाणिव करून देते आपल्या अगतिकतेची. आयुष्यात अधिवास करणाऱ्या अपुरेपणाची.

शहर नावाच्या अजस्त्र पसाऱ्यात आपल्या अस्तित्वाचे आयाम शोधतांना आतून तुटणं कोणालाही नाही विसरता येत. येथला झगमगाट डोळ्यांना सुखावणारा असला, तरी मनाला समाधान देणारा असेलच असे नाही. विकास, अभ्युदय वगैरे परिस्थतीसापेक्ष संज्ञांचा अर्थ कोणाला कसा समजावा, हा भाग वेगळा. पण वास्तव हेही आहे की प्रगतीच्या परिभाषा शहराभोवती प्रदक्षिणा करीत आल्या आहेत आणि असतीलही. बेगडी झगमगाटाच्या विश्वात उपरेपण घेऊन नांदणाऱ्या जगातला सामान्य वकुब असणारा माणूस सामावतोच असे नाही. अंगावरून गुळगुळीतपणा पांघरून पडलेले रस्ते गर्दीने भरून वाहत असले, तरी त्यात आपलेपणाचा ओलावा असेलच असे नाही. रस्त्यांच्या दुतर्फा ओसंडून वाहणारी संपन्नता, म्हणजे आयुष्याच्या विकासाचे हमीपत्र नसते. आकाशाला स्पर्श करू पाहण्याची इमारतींमध्ये लागलेली स्पर्धा म्हणजे जगण्याची उंची नसते. महागड्या गाड्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावतांना दिसणे, याचा अर्थ जगण्याच्या प्रगतीने वेग धारण केला आहे असा होत नाही. इकडून तिकडून आलेल्या रस्त्यांनी गळाभेट घेणे, म्हणजे त्यावरून चालणाऱ्या माणसांच्या प्रगतीचे पथ प्रशस्त झाले असा नाही. रस्त्यांच्या संगमठिकाणांनावर थुईथुई नाचणारी कारंजी नेत्रसुखद असतीलही; पण कोरड्या डोळ्यात अनेक प्रश्नचिन्हे घेऊन शहराच्या उदरात साकळलेली सुखे वेचून आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणा प्रगतीचे परिमाण नसते. रस्ते केवळ शहराच्या सीमांना वेढून नसतात. अजगरासारखे पडलेले रस्ते विळखा घालून बसतात अनेकांच्या आकांक्षांना.

बर्म्युडा ट्रँगलमध्ये जहाजे, विमाने हरवली. कदाचित गूढ असं काही असेल या प्रदेशात. त्यामागे असणाऱ्या कारणांची उकल विज्ञानाने केली. आणखी काही हाती लागेलही. पण शहरांच्या कोणत्याही कोनात गेला तरी माणूस हरवतो, स्वतःपासून, आपल्या असण्या-नसण्यापासून, त्याची उकल कोणत्या शास्त्राने करता येईल? शहर नावाच्या वर्तुळात अशी कोणती शक्ती अधिवास करून असते कोणास ठावूक, जी माणसांना आपल्यात ओढून तर घेते; पण बाहेर पडायचे मार्ग अवरुद्ध करते. अभिमन्यूच्या चक्रव्यूहातील प्रवेशात परतीची संधी होती, पण शहराच्या व्यूहातून परतीचे मार्ग धूसर का राहत असतील? शहरात केवळ स्वप्ने हरवतात असे नाही, तर आनंदाचं सदन शोधण्यासाठी वणवण भटकणारी माणसे आकांक्षांचे गगन हरवून बसतात. त्याच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडायचा कितीही प्रयत्न केला, तरी निघता येणं अवघड होऊन जातं. शहरे माणसांच्या कोणत्या अगतिकतेला ओळखून असतात, कोणास माहीत?

समस्याच्या साच्यात अडकलेल्या जगण्याला कसले आलेयेत आकार अन् कसल्या आल्यायेत आकृत्या. विकल्प हरवलेल्यांच्या हाती निवडीचे पर्याय असतातच किती? सहमत व्हा अथवा तोहमतीला सामोरे जा, एवढा एकच पर्याय हाती असेल, तर हतबल होण्याशिवाय उरतेच काय? प्रवाहाच्या विरोधात वाहणे पराक्रमाची परिभाषा असेलही. पण मनगटात बळ असूनही केवळ अगतिकतेमुळे शस्त्र म्यान करावं लागत असेल तर... आल्या गोष्टीना आपलं म्हणावं का? आकांक्षा, अस्मितांना गहाण टाकून जगणं आयुष्याचं संयुक्तिक प्रयोजन नाही होऊ शकत. अगतिकता स्वप्नांना, अस्मितांना संपवते, हे कसे नाकारता येईल?

जगण्याची समाजसंमत सूत्रे असली, तरी शरणागताला कोणत्या सूत्रांच्या निवडीचं स्वतंत्र्य असतं? तुम्ही एकदाका गर्दीचा भाग झालात की, कसला आलायं स्वतंत्र चेहरा? खरंतर तो बिनचेहऱ्याच्या गर्दीत कधीच आपली ओळख भिरकावून आलेला असतो. मागे उरतो केवळ मुखवटा. तो स्वच्छेने स्वीकारलेला असेल अथवा नसेल. त्याला परिधान करून जगणं भागधेय बनलं की, गर्दीत विहरताना आघातांची काळजी करण्यापेक्षा गर्दीचा एक भाग बनण्याची धडपड क्रमप्राप्त होते. अफाट पसाऱ्यात वाहत राहण्याशिवाय मार्ग नसतो. शहरच आपल्याला आत ओढत नेतं. एखाद्या स्क्रू सारखं आत ढकलत राहतं, चौकटीत फिट्ट बसवताना. चौकटी काही अभावग्रस्तांच्या मर्जीने आकारास येत नसतात. प्रभाव असणाऱ्यांच्या आज्ञेने त्या घडतात. अभावात आयुष्याचे अर्थ शोधणाऱ्यांनी चौकटींच्या आकारचं व्हावं अथवा आहे ते पर्याप्त मानून जगण्याच्या वाटा वाहिवाटीच्या म्हणून चालत राहावं, एवढेच विकल्प हाती उरतात. सामावणे आधी, मग विचार करणे चौकटींच्या जगाचा अलिखित नियम असतो. अगतिकांच्या आयुष्याला तसेही विचार करण्याचे स्वातंत्र्य असतेच किती?

अर्थात, या सगळ्यामागे कारणवश सहमती असेल अथवा नसेलही. कारणे काही असली, तरी चेहऱ्यावर स्मित कायम ठेऊन शहराचा एक घटक व्हावं लागतं. सहमतीचं शास्त्र अवगत झालं की, वेदनांचे आवाज हळूहळू हरवतात. हताशा असो की, निराशा शहराच्या हाती एकदाका बोट दिलं की, ते सहजी नाही काढून घेता येत. त्याला पर्यायही नसतो. तसेही आयुष्य काही फुलपाखराचे रंग लेऊन विहार करीत नसते. त्यात संगतीपेक्षा विसंगतीच अधिक असते. उपेक्षा, विवंचना, समस्यांना आयुष्यात कमतरता कधी असते? सुखांचा सोस असणे वेगळे आणि पावलापुरता प्रकाश शोधत अंधारलेल्या कोपऱ्याच्या पदरी उजेडाचं दान टाकणारं चांदणं आणण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, त्याहून वेगळे असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
**

कविता समजून घेताना... भाग: सतरा

By // No comments:

तू गप्प असतोस

तू गप्प असतोस
आणि मी बोलते
मी बोलत रहाते तासनतास
मुलांबद्दल
घराबद्दल
तुझ्याबद्दल
माझ्याबद्दल

मग अचानक सगळा संवाद एकतर्फी असल्याचं जाणवतं
जाणवतं की ह्या सगळ्या संवादात
तुझा एक साधा 'हुंकार'सुद्धा नाहीये
जाणवतं की आतापर्यंतचं सगळं काही हवेत विरलंय
जाणवतं की माझ्या कुठल्याच शब्दाला
गाठता आला नाहीय तुझ्या मनाचा तळ

किंवा असंही जाणवतं की-
तू आकाश आहेस अन् माझी झेप तोकडी
किंवा मला आवाजच नाहीये
किंवा तुला कानच नाहीत
किंवा तू इथे नाहीयेस
किंवा मी उगाचच इथे आहे !
किंवा... किंवा... किंवा... कितीतरी शक्यता !

आणि सर्व शक्यतांचे निदान एकच-
'तुझ्या जगातून मी उठलेय!'

पण…
हे कळेपर्यंत सगळं संपलेलं असतं
मी हळूहळू वजा होत गेलेय हे कळतं
शब्दांसह हवेत मीही विरलेय हे समजू लागतं
मी म्हणजे काहीही नाही हे उमजू लागतं
मग माझी समज, उमज मी प्राणपणाने जपू लागते

इतक्यात कधीतरी लहर येऊन तू विचारतोस-
"गप्प का आहेस?"

मी गप्पच

मग आर्जवतोस-
"बोल ना! बोल काहीतरी…"

मी गप्पच

मग अगदीच न राहवून तू सांगतोस-
"तू काहीही बोलू शकतेस,
हवं ते, हवं तितकं, हवं तसं..."

त्याहीवेळी मला काहीच बोलता येत नाही,
कारण
शून्याला बोलता येत नसतं !
 

विनया निलेश
*
लग्नाआधी ती बोलते, तो ऐकतो. लग्नानंतर तो बोलतो, ती ऐकते आणि मुलंबाळं झाली की, दोनही बोलतात अन् शेजारी-पाजारी ऐकतात. या विधानातील विनोद वगळला, तरी वागण्यातली विसंगती कशी वगळता येईल? आयुष्याच्या वाटेने चालताना असे काही मुक्कामाचे पडाव येतात, ज्यावर रेंगाळताना आनंद ओतप्रोत भरून वाहत असल्याचं वाटतं. हे सगळं पाहताना हरकून जातो आपण. ते जगण्याचा भाग कधी होतात, कळतही नाही. कुणीतरी तो आणि कुणीतरी ती ठरवून म्हणा, अनपेक्षित म्हणा किंवा अरेंज मॅरेजच्या मान्यतेची मुद्रा अंकित करून असेल किंवा आणखी काही, एकमेकांच्या आयुष्यात येऊन सामावतात. त्यांचं आयुष्यात सामावणं मुरत जातं मातीवर पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखं. त्याचीही सवय होते कालांतराने. समीप येण्याची अनामिक ओढ असतेच प्रत्येकाच्या मनात अधिवास करून. समाजमान्यतेची मोहर अंकित करून एकत्र आलेल्यांचे जरा बाजूला राहू देत. पण प्रेमात असणाऱ्यांसाठी मर्यादांचे कसले आलेयेत बांध. वयात आलेल्यांचं एकमेकांसाठी झुरणी लागणं स्वाभाविकच. ते काही नाकारता नाही येत. यालाच कुणी समर्पण म्हणतात, कुणी प्रेम, कुणी आणखी काही एवढंच.

‘मेड फॉर इच अदर’ असा काहीसा प्रकार एकमेकात रमणाऱ्या जिवांच्या प्रत्ययास येणे काही नवीन नाही. अर्थात, यात निसर्गप्रणीत प्रेरणांचा भाग किती आणि आतूनच उमलून येणाऱ्या आस्थेचा किती, हा विचार तसा नंतरचा. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात शोधलं, तर यांच्या अस्तित्वाचा बिंदू शोधूनही सापडणं अवघड, तरी सारं विश्व आपल्याला आंदण मिळाल्याच्या थाटात वावरत असतात. उगवणारी प्रत्येक पहाट यांच्यासाठी प्रसन्नतेचा परिमल घेऊन येते. मावळणारी संध्याकाळ उगीचच लाजून चूर होते. चांदण्यांनी लगडून आलेल्या रात्री हितगुज करीत राहतात. बरसणाऱ्या जलधारा, वाहणारा वारा, रंग पंखांवर घेऊन भिरभिरणारी फुलपाखरे सगळं सगळंचं आपलं वाटत असतं यांना. नात्यांचे बहुपेडी गोफ विणले जातात. त्याचे पीळ जसजसे घट्ट होतात, तशी आकांक्षांच्या आभाळात स्वप्नांची एकेक नक्षत्रे उमलू लागतात.

संगतीने आयुष्य व्यतीत करण्याची स्वप्ने रंगू लागतात. व्यवस्थेने आखलेल्या चाकोऱ्यांचे रस्ते धरून सप्तपदीच्या वाटेने चालत उंबरठ्याचं माप ओलांडून दोघेही सामावून जातात आयुष्याच्या चौकटीत. एकेक मनसुबे कोरले जातात मनी वसणाऱ्या क्षितिजावर. प्रवाह बनून मनाच्या प्रतलावरून प्रेम वाहत राहतं, अवखळ झऱ्यासारखं. शिशिर सरून आयुष्यात वसंत येतो. सगळं काही आपलं आणि आपल्यासाठी असल्याचं उगीचच वाटत राहतं. बहर ओसरला की पानगळ हलक्या पावलांनी चालत येते, तेव्हा जगण्याचे सगळेच ऋतू काही बहरलेले नसतात, याची प्रकर्षाने जाणिव होते. आयुष्याच्या पटलावर अंथरलेले एकेक रंग आकळत जातात. त्याच्या आणि तिच्या जगण्यातला ऋतू कूस बदलतो. वावटळी अवतीभोवती फेर धरू लागतात. तेही सरावाचं होत जातं. मग सुरु होतं गृहीत धरणं. आनंदाच्या लाटांवर विहार करताना दुर्लक्षित झालेले एकेक पैलू प्रकर्षाने प्रकट व्हायला लागतात. सौख्याच्या झुल्यावर झोके घेत आभाळाला स्पर्श करू पाहताना आयुष्यात असलेल्या अभावाच्या चौकटी दिसत नाहीत. गुणांचा गौरव करण्यात दोष कसे दिसतील? त्यांचा तर स्वप्नातही विचार केलेला नसतो. काळ पुढे सरकायला लागतो, तशा एकेक आकृत्या ठळक व्हायला लागतात, अगदी नजरेत भरण्याएवढ्या. आणि सुरु होतो एक नवा खेळ. हा तिला, ती त्याला खो देण्याचा.

तिच्या प्रेमाची परिभाषा फुलपाखराचे पंख लेऊन आकांक्षांच्या गगनात विहरत असते. तो व्यवहाराच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत असतो. तिला हवं असतं शारीर नात्यापलीकडे उरणारं तिचं वर्तुळ. रेशीमधाग्यांनी विणलेलं घरटं. तिच्या संसाराची व्याख्या तो आणि ती असली, तरी त्यात आणखीही काही धागे गुंफलेले असतात. त्याची स्वप्ने तिच्याजवळ येऊन संपतात. तिची त्याच्यापासून सुरु होऊन नवी क्षितिजे कवेत घेऊ पाहतात. ती शोधत राहते मनाचे गुंते प्रत्येक धाग्यात. हा चालत राहतो परिस्थितीने अंथरलेल्या वाटेवरून. खेळत राहतो वास्तवाच्या निखाऱ्यासोबत. घरातील प्रत्येक कोपऱ्यात सामावलेल्या सुविधांच्या सुखात याचं प्रेम वसती करून असतं. तिचं प्रेम आभाळच बनू पाहतं. अर्थात, वस्तूंनी आबाद असणाऱ्या घरात सुख नांदतेच असे नाही. सुखाला समाधानाचा सात्विक स्पर्श असावा लागतो. तिचं समाधान आस्थेचा ओलावा घेऊन वाहणाऱ्या शब्दात विसावतं. हा शब्दांपासून सरकत राहतो दूर आणखी दूर. काळ चालत राहतो त्याच्याच तालात. त्याचा तोल सगळ्यांना सांभाळता येतोच असं नाही. एकेक ओरखडे उमटत राहतात त्याचे आयुष्याच्या वाटांवर. सुखाच्या व्याख्या विसंगतीत संगती शोधू लागल्या की, अपेक्षांना तडे जायला लागतात. प्रत्येकाचे परीघ वेगळे आणि प्रदक्षिणा वेगळ्या कधी होतात, हे कळतही नाही.

संसाराच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करताना अपेक्षांचं क्षितिज घेऊन आलेलं त्याचं आणि तिचं एक वर्तुळ कवयित्री शब्दांकित करते. कविता केवळ कुण्या मानिनीच्या मनाचं मनोगत नाही राहत. मनात वसतीला आलेली सल शब्दांचे हात धरून चालत राहते आपल्याच शोधात, एक अस्वस्थपण घेऊन. स्त्री-पुरुष नात्याला केवळ निसर्गदत्त ओढीपुरते अर्थ नसतात. त्याही पलीकडे आणखी काही आयाम असतात त्याला. हे सगळ्यांना आकळतंच असं नाही. विवाह सामाजिक मान्यतेची मोहर असेल, पण सुखांची खात्री असतेच असे नाही. वास्तव अवास्तव अपेक्षांची गाठोडी घेऊन चालत राहतात माणसे विवाहवेदिकडे. असलेल्या नसलेल्या गुणांचा शोध सुरु होतो. शोधले जातात पत्रिकेतले, पत्रिकेबाहेरचे गुण, तिच्यात अन् त्याच्यातही. गुणांच्या बेरजा वजाबाकी बनून आयुष्यात येऊन कधी विसावतात, ते कळतही नाही.

लग्न नावाचा संस्कार पार पडला की, ती तिची उरतेच किती? विवाहासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या, कुटुंब, नातीगोती अशा एक ना अनेक गोष्टीत तिला गृहीत धरले जाते. तीही आपले कर्तव्य म्हणून समर्पित होते या सगळ्यात. पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवलेल्या संस्कारांची सोबत करीत निघते एका अनोख्या विश्वात. हाती लागलेल्या वर्तुळात आपलं ओंजळभर जग वसवू पाहते. कालांतराने तिचं असणं आवश्यकता होते सगळ्यांची. हे जमलं ना तुला! मग याहून संसार म्हणजे वेगळे काय असते? आहे यापेक्षा काहीही नवीन करायचे नसते, याबद्दल सगळ्याचे एकमत असते. स्त्री म्हणजे त्याग, समर्पण, स्नेह, सौहार्द वगैरेवगैरेचे मूर्तिमंत उदाहरण होते. मन नावाची वस्तू तिच्या आयुष्यातून वजा झाली की, मागे उरते फक्त स्त्री. खरंतर तिला सखी व्हायचे असते. तिला राधा नाही बनता आलं अन् त्याला कृष्ण, तरी त्याच्या सुरांत तिचे श्वास समर्पित करायचे असतात. सूर सुटतात अन् सोबत येते तडजोड. तिही सवय झाली की, उरतात केवळ उपचार. उपचारांत कसला आलाय ओलावा?

शुष्क होत जाणाऱ्या पसाऱ्यातही ती आपलेपणाचा ओलावा शोधत राहते. तिच्यासाठी तो केवळ तो नसतो. तिच्या कपाळावरील कुंकवाच्या वर्तुळाभोवती तो गुंफला गेला असला, तरी त्याचं आयुष्य तिने मनात बांधून घेतलेलं असतं. तिच्या सुखा-दुःखाचा सवंगडी असतो तो. नव्हे तिला आपल्या आयुष्यात विरघळलेला प्रियकर हवा असतो. नवरा बनता येणं खूप सोप्पं असतं. पण नवऱ्यातला प्रियकर शोधणं अवघड. नवरा बनला की, त्याच्यातला प्रियकर संपतो. ती प्रियकर शोधत राहते. चालत राहते त्या वाटेने. हा तिच्या स्वप्नांपासून किती योजने पुढे निघून गेलेला असतो.

तिला त्याच्याशी काय काय बोलायचं असतं... मनात वसतीला आलेली किती गुपिते सांगायची असतात. दिवसभराच्या कामाचा आलेख काढून घ्यायचा असतो. मनात उगीच घर करून असलेल्या चिंता सांगायच्या असतात. मुलांच्या प्रगतीच्या पायऱ्या समजून घ्यायच्या असतात. केवळ आणि केवळ त्यालाच ऐकवायचं असं काही असतं तिच्या अंतरी. लाजून चूर झालेला चेहरा हातानी लपवत त्याला काही सांगायचं असतं. असं आणखी किती किती... काही आपलं, काही दुसऱ्यांचं, काही वाहण्याचं, काही सापडण्याचं, काही सुटण्याचं, काही निसटण्याचं, काही आयुष्याचं, काही भविष्याचं... अनेक विषय. तो मात्र तिला ऐकल्यासारखं करत पद्धतशीर दुर्लक्ष करीत राहतो.

तिला कळू लागतं, या सगळ्या चिवचिवाटात मी आहेच कुठे? तिला फक्त त्याच्या मनाचे तीर दिसले, तळ कुठे गाठता आला. मग तिची चिवचिव हळूहळू ओसरू लागते. आकांक्षा बनून अंतरी वसतीला आलेली स्वप्ने एकेक करून पांगतात. ओथंबून येणारे डोळे आटत जातात कोरड्या ऋतूसारखे. मन शुष्क होत जातं रखरखीत उन्हाळ्यातल्या भेगाळलेल्या भूमीसारखं. डोळ्यात कोंडलेली क्षितिजे धूसर होत परिस्थितीच्या मृगजळात हरवतात. त्याच्या मनाच्या आसमंतात तिला पंख पसरून भरारी घेताच आलेली नसते. त्याच्यापर्यंत पोहचण्याचा किती प्रयत्न केला. कितीदा साद घातली त्याला, पण त्याच्या मनाच्या रित्या दऱ्यांमध्ये प्रतिसादाचा प्रतिध्वनी विखरून गेला. ज्या पोकळीत तिचं सगळं सगळं अस्तित्व सामावलेलं असतं. जेथून तिच्या स्वप्नांचा प्रदेश प्रकाश घेऊन येणार असतो, तेच परगणे ओसाड होतात. त्याच्या जगाचे किनारे सुटलेले असतात. उरतात काठांवर कोरल्या गेलेल्या वाहण्याच्या खुणा. परिस्थिती तिच्याभोवती शून्य गुंफत राहते. ती सरकू लागते त्याच्याकडे, एकेक पावलांनी.

कधीतरी तिच्या अस्तित्वाची त्याला धूसर जाणिव होते. त्या विरघळत्या विश्वाला सूर देण्याचा प्रयत्न करतो तो. पण बोलता काहीच येत नाही, कारण शून्यातून कसले आलेत निनाद अन् कसल्या बेरजा. शून्याचं स्थान संख्येनंतर मोलाचं असलं, तरी संख्येच्या आधी त्याचं भविष्य शून्यच असतं. सावरण्याचा प्रयत्न करतोही तो, पण हे सगळं त्याला समजेललं असतंच असंही नाही. समजा समजलं असलं, तरी त्याच्या अस्तित्वाच्या आकृत्या आयुष्याच्या उतरत्या पडावावर पोहचलेल्या असतात, एवढं मात्र खरं. कवयित्री म्हणते, शून्याला कुठे बोलता येत असतं? समजा हे शून्यच त्याचं झालं, तर या शून्याला ऐकणारं आणखी एक शून्य सोबत असेल? कदाचित नाही. अगदी त्याची अन् त्याचीच 'ती'सुद्धा.

‘शून्याला बोलता येत नसतं!’ म्हणून कविता थांबली असली, तरी या शून्याच्या गर्भात एक धगधगता लाव्हा वाहतो आहे. त्याची दाहकता त्याला वेळीच आकळली असती, तिच्या धगीसह किंवा भूगर्भाच्या आत होणारी उलथापालथ समजली असती, निदान तिचे धक्के तरी. तर... शून्याला अर्थाचे नवे आयाम असते?
 

चंद्रकांत चव्हाण

*

कविता समजून घेताना... भाग: सोळा

By // No comments:

निघून जावे सरळ सुरत

रोहिण्यांनी
अंडे गाळले
जिवाची काहिली
थोडी थंड झाली

मग
आर्द्रा, मृग कोरडाच गेला
मधे थोडा
आडवा-तिडवा पाऊस
फूर-गधडा
आला नि गेला
तो परतलाच नाही

त्याची
वाट पाहून
अंगावर होतं नव्हतं ते
किडकूमिडकू मोडून
पेरणी केली
याही वर्षी!

धोंडी, साधू, फकिरांच्या
आळवणीतून
मग तो आला
लहरिया
मेघुराया..!

पुन्हा मोड-घड झाली
तरी-
मूग, उडिदाने
बरा हात दिला,
साजरा झाला
पोळा

मग पाऊस पुन्हा
गडप झाला
अस्वस्थता
शिगेला पोहचली
घामातून निथळत राहिली
रस्ते, बाजार ओस पडले
निळ्या स्वच्छ आकाशात
पांढरे फट ढग
विकट हसत राहिले

मी करुणा भाकतो
देवा, आता इथे कसे भागवावे?
जनावरांचे, आपले...
आहे ती
ओल टिकवावी
कोळप्याने
मुळांना माती
आशेने लावावी बस्स!

उरलेल्यांनी
गाठावे कारखाने ऊसाचे
वा थापाव्या विटा शेकड्याने
किंवा
निघून जावे सरळ
भुसावळ-सुरत पॅसेंजरने
तिकिटही न काढता
पथारी टाकून
संडास, मुतारीजवळ
कुठेही झोप लागतेच!

लोंढ्यांनी
काम करावे
मिळेल ते
साच्यांवर विणत रहावे
धागे उभे-आडवे
गुंते सोडत रहावे
आपआपल्यापरीने वा
घासावे हिरेही असे
की एक दिवस
आपलेही दैव उजळावे!

धरावा धीर
पहावी वाट
गावाकडे नक्कीच येईल पाऊसही
अन् फुलेल कापूसही!

महेंद्र भास्करराव पाटील

माणसाच्या आयुष्यातील सुखाची पर्याप्त परिभाषा आणि जगण्याचे सगळे संघर्ष भाकरी या एका शब्दाजवळ येऊन थांबतात. ती मिळवण्यासाठी पर्याय शोधायला लागतात. ते काही सहजी हाती लागत नसतात. भाकरीकडे नेणारी एक वाट शेताकडे वळून विसावते. शेती-मातीचे अर्थ पाण्याशी निगडीत आणि पाण्याची सलगी आभाळातल्या भरलेल्या मेघांशी अन् श्रमणाऱ्याचे सख्य पावसाशी असते. एकूण आयुष्याचं गणित केवळ आणि केवळ भाकरीवर येऊन संपत असलं, तरी तिचं वर्तुळ खूप मोठा परीघ आपल्यात घेऊन नांदत असते. भाकरीचे प्रश्न अथांगपण घेऊन येतात. ते सहज असते, तर आयुष्याचे अर्थ प्रत्येकवेळी नव्याने शोधावे लागले नसते. बिरबलाला विचारलेला प्रश्न सर्वश्रुत आहे. सत्तावीसमधून नऊ वजा केले. बाकी शून्य. श्रमिकांच्या आयुष्याची सगळी सूत्रे आणि त्यांची उत्तरे या ‘नऊ’ अंकाभोवती प्रदक्षिणा करीत असतात, असे म्हटले तर अतिशयोक्त ठरू नये. पाऊसपाण्याची गणिते जुळली की, जगण्याला पैस प्राप्त होतो. एखादा हातचा सुटला की, ते अधिक टोकदार होत जातात. जगण्याच्या जखमा दिसत नसल्या, तरी ठसठसणाऱ्या वेदना आयुष्यातील कमतरतेची सतत जाणीव करून देत असतात.

ही कविता याच वेदनेची सोबत करीत वाहत राहते, अस्वस्थ आयुष्याचे तीर धरून. शेतकऱ्यांच्या जगण्याची सूत्रे आकाशातून बरसणाऱ्या धारांसोबत जुळलेली असतात. पडत्या पाण्यासोबत वाहत असतात ती. ‘पोटासाठी दाही दिशा का हिंडवीशी आम्हां जगदीशा’ या एक वाक्याने माणसांच्या मर्यादांना अधोरेखित करता येते. आयुष्याचे आपल्यापुरते अर्थ शोधत प्रत्येकाला वर्तावे लागते. भले त्या जगण्यात सुखांचे वाहते स्त्रोत नसतील. जवाएवढं सुख वेचून आणण्यासाठी पर्वताएवढे कष्ट उपसायला लागतात. अपेक्षांची अवजड ओझी घेऊन आपणच आपला शोध घ्यावा लागतो. उपजीविकेसाठी अनभिज्ञ वाटांनी निघणे नियतीचे संकेत ठरतात. गाव परिसर काही कोणी सहजी सोडून जात नाही. गावाची वेस ओलांडणे कधीही आनंददायक नसते. आपल्या अस्तित्वाची मुळं तुटण्याची जखम क्लेशदायक असते. या वाहत्या जखमांना घेऊन ही कविता मनात अस्वस्थपण पेरत जाते.    

पाऊस एक, मात्र त्याची रूपे कितीतरी. कोणासाठी तो लोभस असतो, कुणासाठी विलोभनीय, कुणाला रमणीय वाटतो. आणखी कुणाला काही काही. त्याच्या आगमनाची नांदी अनेकांच्या प्रतिभेला पंख देणारी. कोणासाठी सर्जनाचा सांगावा घेऊन येणारी. कोणाच्या पदरी भिजल्या क्षणाचं संचित पेरणारा. प्रेम पथावर प्रवास करणाऱ्यांसाठी त्याचं असणं किती विलोभनीय असतं. संवेदनांच्या प्रतलावरून वाहणाऱ्यांना तो रमणीय वगैरे वाटतो. असेलही तो तसा, पण प्रत्येकवेळी तो दिसतो तसा असेलच असे नाही. आकाशाच्या विस्तीर्ण पटावरून उतरताना तो देखणा वगैरे वाटत असला, तरी तोच पट रिता होतो अन् कुशीत वांझोटेपण घेऊन वसतीला उतरतो, तेव्हा त्यात केवढातरी गुंता सामावलेला असतो. तो ठरल्या वेळी येतो, मनाजोगता येतो, तेव्हा त्याचं असणं आनंदाचं अभिधान असतं. पण त्याने वाकुल्या दाखवायला सुरवात केली की, तो किती वेदनादायी असतो, हे त्याच्याशी ज्याचं जगणं बांधलं गेलं आहे त्यांना विचारा. त्याच्या कृपेने संसार बहरतात. अवकृपेने विखुरतात. आगमनाने आकांक्षांची अगणित पाखरे आभाळभर भिरभिरायला लागतात. आयुष्याच्या वाटा त्याच्या भिजलेपणात न्हाऊन निघतात. त्याच्या येण्याने केवळ सृष्टीलाच नाही तर आयुष्याला चैतन्याचा मोहर येतो. हे मोहरणे, उजडणे नियतीचे अभिलेख असतात की काय माहीत नाही, पण पाऊस या एका शब्दापाशी अनेकांच्या आकांक्षा अडकलेल्या असतात.    

रोहिणी नक्षत्राचा हात धरून तो धरतीवर हलक्या पावलांनी उतरतो. त्याचं चारदोन थेंब घेऊन येणं जगण्यात आश्वस्तपण पेरून जातात. ग्रीष्माची काहिली थोडी थांबते. क्षितिजावरून एक धूसर उमेद जागते. आशेचा क्षीण कवडसा मनाच्या आडून अलगद डोकावतो. पण कधीकधी ही उमेदच राहते. कारण ओंजळभर पाण्याने काही शेतशिवार आपल्या देहावर हिरवाई पांघरून घेत नाही. असे असले तरी पुढच्या नक्षत्रांची नांदी असते ती. आभाळाकडे डोळे लागलेले असतात. विस्तीर्ण निळ्या पटलावर काळ्या मेघांनी गर्दी करायला सुरवात केली की, उमेदीचा एकेक अंकुर मनाच्या मातीतून अलगद मान वर काढू लागतो. आयुष्याचे काही आडाखे, काही आराखडे आखले जातात. पण त्याचे आराखडे कोणाला कळले आहेत? असते कळले तर कशाला प्रार्थना करायला लागली असती त्याची. तो त्याच्या खेळी खेळतो. माणसे पळत राहतात त्याच्या पाठी. तो खेळत राहतो. आषाढातील काळ्या मेघांनी दाटून आलेलं आभाळ रस्ता चुकतं अन् वांझोट्या वाटांनी वाऱ्यासोबत धावत राहतं. प्रतीक्षेचे तीर कोरडे होतात. मृगात धारांनी धरतीला अभिषेक करावा, पण तो कोरडेपण घेऊन रखडत चालत राहतो. आर्द्रा कोरड्याच जातात. अधेमधे थोडा असल्या-नसल्यासारखा येऊन जातो. आशेचा एक कवडसा जागतो, पण तोही कुठे समाधानाची गंगा घेऊन वाहतो. कुठे येतो आणि कुठे जातो...

मनात असणारी आस काही सहजी टाकून देता येत नाही. उमेद कशी सोडता येईल? एक ही उमेदच तर जगण्याच्या गणितांना परत नव्याने शोधायला लावते. कधीतरी जमा केलेलं तोळा-मासा किडूकमिडूक कुठल्या कोपऱ्यात अडीनडीसाठी दडवून ठेवलेलं काढून आयुष्य पेरले जाते. नियतीसोबत जुगार खेळला जातो. वाहणं विसरून गेलेला तो जातो; तो परत येतच नाही. त्याच्या वाटेकडे आस लावून बसलेल्या डोळ्यातून मात्र वाहत राहतो. तो लहरीच. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना म्हणतात ना! मग देवालाच साकडे घातले जाते. धोंडी काढून माणसे पाणी मागत राहतात. महादेवाला गाभाऱ्यात कोंडले जाते. हताश मने एक आस्थेचा कवडसा शोधत राहतात सश्रद्ध अंत:करणाने. कधी साधू, फकिरांच्या आळवणीतून आली दया अन् आलाही थोडा, तरी तो नांदेलच असे नाही. पुन्हा मोड-घड होऊन गणिते विसकटतात, ती काही केल्या जुळत नाहीत. दैव संयमाची परीक्षा पाहते. अस्वस्थता टोक गाठते. आकाशातून पाणी नाही, पण आयुष्यातून अपेक्षाभंगाच्या वेदना निथळत राहतात. रस्ते, बाजार शेत-शिवारावर उदासपणाची चादर ओढली जाते. आभाळाची निळाई मोहक वाटत असेलही कुणाला. नितळ गगनात दिसणारा पौर्णिमेचा चंद्र देखणा वगैरे वाटत असेल. पण पावसाळ्यातल्या रात्री चांदण्यांनी हसणारं आकाश वेदनादायीच. शेतकरी करुणा भाकतो. उत्तरे काही हाती लागत नाहीत. विवंचना असते, आहे त्यात भागवावे कसे? जगावे कसे? माणसे कसेतरी पोट भरून घेतीलही, पण जनावरांचे काय? आकाशातून पाण्याच्या नाही, पण आयुष्याच्या कोरड्या आभाळातून प्रश्नांच्या धारा बरसत राहतात अपेक्षाभंगाच्या वेदना घेऊन.  

जगणं काही असं वाऱ्यावर भिरकावून देता येत नाही. आयुष्याला अपूर्णतेचा शाप असला, तरी उमेदीचं आश्वस्तपणही असतंच. ही उमेद माणसांना ढकलत नेते भाकरीच्या शोधात. घरातल्या कर्त्यांना जडावलेल्या पावलांनी निरोप घेणे भाग असते. मागे राहिलेले रखडत दिवस ढकलत राहतात. कोणी ऊसाचे कारखाने गाठतात. कोणी विटांच्या धगधगत्या भट्ट्यात आयुष्य जाळत राहतात. शेकड्याने हजाराने तयार होणाऱ्या विटा हाती चिल्लरशिवाय काही देत नाहीत. भटकंतीच्या वाटा सैरभैर करतात माणसांना. कोणी कुठे, कोणी कुठे वळचणीला जावून पडतो. कोणी निघून जातो  सरळ पॅसेंजरने तिकिटही न काढता, सुरतच्या रस्त्याने. पथारी टाकून संडास, मुतारीजवळ मूठभर देह विखरून पडतो. क्लांत देहाला कसली आलीयेत सुखांची स्वप्ने? कुठेही झोप लागतेच. शहरातही कुठल्याश्या गर्दीचा चेहरा बनून काम करावे. मिळेल ते घ्यावे. कुणी साच्यांवर धागे विणत राहतो. उभे-आडवे गुंते सोडवत. पण आयुष्याचे गुंते काही सहज नसतात सुटायला. कुणी घासतो हिरे. एकेक पैलू चमकत राहतात त्यांचे. मोल वाढत जातं त्यांचं, पण यांच्या जगण्याचं मोलाचं काय? एक दिवस आपलेही दैव उजळावे, या आशेने नशिबाला तो घासत राहतो. धरून असतो सुटणारा धीर. डोळे मात्र गावाच्या वाटेकडे लागलेले. प्रतीक्षा असते गावाकडे बरसणाऱ्या पावसाची. येईल अन् करपलेलं आयुष्य पुन्हा तरारून येईल याची.

देश बदलला आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्याएवढा. पण देशात राहणाऱ्या साऱ्यांना चेहरा मिळाला आहे का? ज्याच्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा आहे त्यांनी सर्वत्र असावं; पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही त्यांनी कुठेच नसावं का? देश स्वयंपूर्ण वगैरे झाल्याच्या वार्ता झडत राहतात. पण किती शेतकरी स्वयंपूर्ण झाले? काही थोड्यांच्या आयुष्यात समृद्धीचा वसंत फुललाही असेल. ते प्रगतीशील वगैरे झाले असतील, फार्महाउसचे मालकही असतील. पण ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडा नावालाच आहे, त्यांनी जगावं कसं?

खेड्यातही प्रगतीच्या वाटेने चालत आलेल्या काही पाउलखुणा दिसू लागल्या. तरीही शेतकरी प्रसन्नतेच्या भावनेतून शेती व्यवसायाकडे का पाहत नाही? शेती कसत आहेत, त्यांना जाऊन विचारा, या व्यवसायात तो किती संतुष्ट आहे. यातील बहुतेक शेतीला रामराम ठोकण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसेल. कितीही राबा मातीतलं जीवन मातीमोल असल्याची खंत मनातला सल बनून, त्यांच्या बोलण्यातून प्रकटते. ज्यांच्याकडे खूप शेती आहे, त्यांच्या घरांचे पालटलेले रूप, धान्याच्या पडलेल्या राशी, दूधदुभात्याने भरलेले गोठे, अंगणात उभी असणारी वाहने, हे प्रगतीचं सार्वत्रिक चित्र नाही. कुडाच्या सारवलेल्या भिंती, धुरानं कोंदटलेले छप्पर, दाराशी असणारी चारदोन जित्राबं आणि छतातून गळणाऱ्या पावसाच्या पाण्यासह मनातलं गळणारं अवसान सावरत उभा असणारा विकल चेहराच नजरेसमोर दिसतो. खिशात खुळखुळणाऱ्या पैशातून आलेल्या समृद्धीने ब्रॅन्डेड वस्तूंचा तोरा मिरवणारे एकीकडे, तर दुसरीकडे कोणताच ब्रॅन्ड नसलेलं जगणं. कोंड्याला मांडा आणि निद्रेला धोंडा, असं जगणं सोबत घेऊन परिस्थितीशी धडका देत माणूस उभा आहे. उजाड झालेल्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आशेचे कोणतेही ओअॅसिस दमलेल्या जिवांना दिसू नये का?

एखाद्या गोष्टीविषयी नुसती सहानुभूती असून चालत नाही. तिची अनुभूतीही असावी लागते. अनुभूतीशिवाय सहानुभूती विफल असते. जगण्याच्या वाटा शोधत माणसं शहरांकडे धावत आहेत. शहराचं बकालपण वाढत आहे. बाहेर पडलेली माणसे नव्या प्रश्नांना सामोरी जात आहेत. भाकरीसाठी चाकरी शोधत आलेली, ही माणसं उपेक्षेच्या नव्या गुंत्यात गुरफटत आहेत. प्रश्न सुटण्याऐवजी नवेच प्रश्न जन्माला येत आहेत. साध्यासाध्या गोष्टींकरिता अस्वस्थता वाढत चालली असेल, तर त्यांनी करावं काय? गाव तेथे पार आहे. पारावरील स्वारही आहेत. पण तेथून चालणारा कारभार गावाला गावपण देणारा आहे का? हे एकदा तपासून पाहायला काय हरकत असावी, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••